Welcome to misalpav.com
लेखक: प्रकाश घाटपांडे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

विषारी पदार्थांमुळे व्हायचा तो त्रास होतोच, पण जास्त त्रास ध्वनिप्रदूषणामुळे होतो. त्यामुळे आमच्या आवडीच्या झाड-भुईचक्रादि फटाक्यांवर आणलेल्या संक्रांतीला विरोध केल्या गेला आहे.

ध्वनी वायु प्रदूषण झाले तरी चालेल पण आम्ही फटाके उडवणारच असा वर्ग हा समाजात असणारच आहे. प्रदुषणाचा परिणाम तर सर्वांवर होणार आहे. जे त्यांचे होईल ते आमचे होईल.कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का ले लो मजा| भावी पिढ्यांची चिंता आम्ही कशाला करु जे होईल ते त्या त्या वेळी बघतील.आमची पिढी तर आरामात जगते आहे ना! अंधश्रद्धांनिर्मुलनात जसे अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात हे समजावुन घ्यावे लागते. तसेच इथे आहे. गुटख्याच्या वेळी असेच झाले. पण त्याचे परिणाम हे त्या त्या व्यक्तिपुरते असतात. मरु दे ना गुटखा खाउन! समाजाची कीड तेवढीच कमी होईल. कशाला त्यांना समजावयला जाताय? त्यांच त्यांना समजेल त्यावेळी उशीर झाला असेल. असे म्हणणारे लोकही असायचे. समाज शेवटी व्यक्तींचाच बनला आहे. तोच जर आत्मघातकी असेल तर समाजाचेच त्यात अंतिम नुकसान असते. समाज बदल हा केवळ प्रबोधनाने होणार नाही व केवळ कायद्यानेही होणार नाही. दोन्ही गोष्टींचा वापर होईल तेव्हा कुठे त्याचे बदल दिसू लागतील. सतीची प्रथा हे त्याचे एक उदाहरण आहे. डॉ दाभोलकरांना जर श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर यंदापासून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करेन एवढे जरी केले तरी खूप झाले.

माझा लेक त्याच्या बाबांना म्हणतो, बाबा हे तुमचं बरं शास्त्र, मी फटाके वाजवायची वेळ आली तर प्रदूषण होते, पण तुम्ही लहानपणी भरपूर फटाके वाजवलेत! प्रमाण कमी करायला हरकत नाही, पण योग्य काळजी घेऊन थोडे वाजवायला काय हरकत आहे? मुलांना लहान वयात असतेच ना याचे आकर्षण! (मला अजूनही आवड्तात!)

>>प्रमाण कमी करायला हरकत नाही, पण योग्य काळजी घेऊन थोडे वाजवायला काय हरकत आहे? मुलांना लहान वयात असतेच ना याचे आकर्षण! आपण म्हणता ते बरोबर आहे.प्रमाण कमी होणे ही देखील चांगली सुरवात आहे.व्यसनी माणस जस आपल व्यसन कमी कमी करण्याचा प्रयत्न करतात. मुलांना विज्ञानाची रुची वाढवणे, ज्ञान आणि रंजन असे कार्यक्रम राबवणे, असे पर्याय दिले गेले पाहिजे.

फटाके न उडविल्यास त्या पैशांत एक छोटी सहल, एखादी वस्तू, सायकल, विडीओ गेम, क्रिकेट किट ई चे आमिष दाखवा. मग हळूहळू आवड कमी होईल मुलांची.

मी १०वी पर्यंत फटाके उडवत होतो.मोठ्या मुलाने पण १०वी झाल्यानंतर फटाके उडवणे बंद केले आहे.लहान मुलाला मात्र अज्जुन पण हौस आहे. एक्/दोन वर्षांत त्याची पण आवड कमी होईल.

आवाजाचाच जास्त त्रास वृद्धांना आणी हृदय रोग्यांना होतो. आणी चुट्-पुट वाजणार्‍या शोभेच्या फटाक्यातुन डोळ्याचे पारणे फेडून घेतल्यापेक्षा '१ गाव १ गणपती' सारखा '१ गाव १ फायरवर्क्स शो' दणक्यात करायची कल्पना कशी वाटते? ज्यांना हौस आहे ते येतील पोरा बाळांना घेउन. हां इतर देशात होतात तस्से. ;)

यसवायजी,उत्तम कल्पना आहे. पुण्यात नदीकिनारी पात्रात असे शो करणे चालु झाले आहे. तसेच संशोधन क्षेत्रातील लोकांनी पर्यावरण पुरक फटाके कसे करता येतील याचेही प्रयत्न चालू आहेत.

अर्थात सगळ्या समाजसुधारणा हिंदू धर्माच्या मुळावर उठणार्‍या असतात असा दृढ समज असलेल्या व्यक्ती आणि प्रवृत्तीकडून विरोध होणारच. तिकडे लक्ष देऊ नका. फटाके शोभेचे असोत किंवा आवाजाचे. दोन्ही प्रदूषण करतातच. त्याशिवाय ते ज्या हातांनी बनवले जातात त्या बहुतांश चिमुकल्या हातांबद्दल, त्यांच्या आरोग्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ राहून, कधीकधी डोळेझाक करून आपल्या चिमुकल्यांना ते उडवू द्यायचे हा मला खरंच दांभिकपणा वाटतो. इथे यांचा धर्म काय सांगतो हे जाणून घ्यायला आवडेल. पर्यावरणाचे बोलाल तर मनुष्यांनी आपली परिसंस्था आधीच एवढी नासवून ठेवली आहे की त्याच परिसंस्थेत, त्याच अधिवासात निसर्गाचे इतरही भाऊबंद राहतात, त्याच्या समतोलावर अवलंबून असतात हे मनुष्य केव्हाच विसरले आहेत. जेव्हा आंधळेपणाचा हा जगरनॉट गरागरा फिरू लागतो तेव्हा त्याच्या विरोधात उभे राहू पाहणार्‍या मूठभर मंडळींना तो दाद लागू देत नाही. पण म्हणून निराश व्हायचे काहीच कारण नाही. प्रयत्नांति ध्येय्यप्राप्तीचा परमेश्वर. जग बदलेन. नक्की बदलेन. सुरुवात आपल्यापासून करूयात. मी लहान होतो तेव्हापासूनच फटाक्यांसारख्या गोष्टींपासून आपणहून बाजूला झालो. प्रबोधन स्वतःचे व इतरांचेही करणे सुरुवातीला अवघडच जाते. पण ते अशक्य मात्र नसते. फटाक्यांविषयी - त्यातल्यात्यात इकोफ्रेन्डली असे फटाके कुठे मिळू शकतील काय याविषयी माहिती असल्यास जरूर सांगा.

"सगळ्या समाजसुधारणा हिंदू धर्माच्या मुळावर उठणार्‍या असतात असा दृढ समज ...." हे असं होणऱ्याला बरेचदा लेख लिहिणारे/ पत्रकार/ कलाकार/ दिग्दर्शक पण जबाबदार असतात,, समाजातील वाईट गोष्टी दाखवताना "सर्वधर्म" समभाव हि लोक पाळीत नाहीत त्यामुळे अंधश्रेढीचं विरोधात असणारा माझ्यासारखा माणूस सुद्धा २-३ वेळा हे वाचून एक दिवस वैतागतो आणि म्हणतो.. का रे बाबा तुला वाईट गोष्टी फक्त एकाच धर्मात दिसतात का? सर्व धर्मातील/ समाजातील दाखव ना "निःपक्षपातीपणे" असो पण फटाके आणि ते सुद्धा एवढया मोठया प्रमाणात काय हानी करीत असतील या बद्दल जागरूकता निर्माण व्हायलाच पाहिजे हे पटते .. जमेल तसे हळू हळू परिवर्तन झाले पाहिजे ...

घाटपांडे काकांशी पूर्णतया सहमत. फटाके उडवणे १०/१२ वर्षांपूर्वीच सोडले. पण तरीही दिवाळीत उडायला लागले की ते हौसेने बघायला टेरेसवर येतोच.

मला हा एकंदर फटाकेमुक्त वगैरे विचार पटत नाही. फटाके चार दिवस वाजवले जातात. बाकी लाखो प्रकारची प्रदूषणं दररोज, अव्याहत होत असतात. फटाके हा दिवाळीचा एक महत्वाचा भाग आहे आणि ते वाजवले तर इतकं प्रदूषण नक्कीच होत नाही जितकं रोजच्या रोज जेंव्हा एकेकटे लोक, हगल्या-पादल्याला दुचाकी चारचाकी वापरतात त्यामुळे होतं. त्यामुळे, थोडक्यात हा प्रकार म्हणजे, मोठे (बिग टिकिट म्हणतात ज्याला कॉर्पोरेट भाषेत) प्रॉब्लेम दुर्लक्षून, छोटे कुठले तरी प्रॉब्लेम मोठे करून ठेवण्याचा प्रकार झाला. हे माझं मत. आणि त्यामुळे, मी या धाग्याशी, त्यातल्या विचाराशी, असहमत.

मग गणपती, नवरात्र, इ. वेळच्या ध्वनिप्रदूषणाबद्दल मत काय आहे? बाकी वेळच्या प्रदूषणाला नाकारत कोणीच नाही, पण यावेळी कमी वेळात फार जास्त प्रदूषण होतं. ते कमी केलं तर काय वाईट आहे? उपमा अंमळ ताणायचीच तर "बलात्कार करायला ५-१० मिनिटे, फार तर अर्धा तास लागतो, त्या इतक्या कमी वेळ चालणार्‍या त्रासाचे भांडवल कशाला करायचे?" असे म्हटल्यापैकी वाटते हे लॉजिक.

आपल्याकडे बरेच लोक असे आहेत कि बटर चिकन, शाही पनीर खातात आणि क्यालरीज जास्त होऊ नये म्हणून डाएट पेप्सी पितात. तसेच वर्षभर चार पावले चालत नाहीत मोटारने जाऊन पेट्रोल जाळतात. बाहेरची हवा थंड असेल तरी हि बाराही महिने मोटारचाच काय घराचा सुद्धा ए सी चालू. पण दिवाळी आली कि प्रदूषणावर भाष्य करून आपला पुरोगामीपणा दाखवतात. घाटपांडे साहेबांसारखे कळकळीचे लोक कमीच जे चार दिवस नव्हे वर्षभर या गोष्टी करीत असतात. अशी गोष्ट सातत्याने करणे जास्त गरजेचे आहे. पण आपल्याकडे दांभिकता जास्त आहे. मी गेली काही वर्षे शक्यतो मोटारने जाणे टाळून रेल्वेने जातो आणि जवळ जायचे असेल तर चालत जातो. लोक चिकू म्हणाले तरी चालतील. त्याने आपले वजनहि प्रमाणात राहते.मला स्वतःला फटाके फार आवडतात परंतु आता या प्रदुषणा बद्दल जागरुकपणा म्हणा (जनाची किंवा मनाची लाज म्हणा) आता मी फटाके वाजवत नाही. पण लोकांचे फटाके पाहतो जरूर. फटाक्याच्या दारूचा वास बालपणात घेऊन जातो हे मात्र खरे

माझ्या मुलाच्या शाळेत काहीतरी कार्यक्रम होता 'Go Green' चा. त्या कार्यक्रमाअंतर्गत मुलाने फटाके फोडणार नाही अशी शपथ घेतली आहे. हे त्याने मला जेव्हा सांगितले तेव्हा मला काय बोलावे तेच कळेनासे झाले होते. पण सुरुवात चांगली आहे. -(आनंदी) सोकाजी

चुकीचं आहे, मुलांचा आनंद आहे यार तो; तुम्ही मोठ्या केलेल्या प्रदूषणाच्या राक्षसामुळे आता मुलांनी दिवाळी च्या चेकलिस्ट मधून फटाकेच वगळायचे??? बुलशिट!

आम्ही तर लई दणक्यात फटाके उडवतो. कधी गो ग्रीनची हौस म्हणून सायकले जातो जवळच्या अंतराला. पण शेवटी काळाबरोबर रहायचे तर गाडी वापरावी लागते. तसेही आवड बदलली म्हणून हल्ली आवाजाचे फटाके कमी व आकाशात जाऊन फुटणारे फटाके जास्त आवडू लागले आहेत.

मुलांचा आनंद = फटाके हे समिकरण कशावरून इतकं बरोबर आहे. आनंद कशात मानायचा हे जर मुलांना शिकवलं तर त्यांचे हट्ट पुरवतांना ही नाकी नऊ येणार नाहीत.

३१ डिसेबरच्या रात्री जगभर जी जी रोषणाई केली जाते, नेत्रदिपक शोभेच्या फटाक्यांची आताषबाजी केली जाते त्याने प्रदुषण होते काय ? ते साधारण आपण दिवाळी, नवरात्र, गणपती, लग्नाची वरात यात दारुकाम करतो त्यापे़क्षा जास्त असते की कमी असते याच्याबद्दल माहिती मिळेल काय ? तिथेदेखील आपल्यासारखे प्रबोधन करणारे लोक आहेत का ? असतील तर ते वर्षभर हे कार्य करतात की अशा मोकाच्या वेळीच जनजागृती करतात ?

हा तर आनंदाचा मामला आहे' आपल्या चोइस चा मामला आहे. 4 दिवसाच्या दंग्या ने शष्प वाट लागत नाही. ते बालपण ते काय जे दिवाली फटाक्यांच्या धामधुमी शिवाय गेले ? अजुनही किल्ले बनवायला हात शीवशीवतात पण....!

फटाके वाजवायला सुरुवातही उशीरा केली, आणि फटाके वाजवणं थांबवलंही लवकर. आजोबा गेले त्या वर्षी दिवाळी साजरी केली नाही. त्यानिमित्ताने घरात बसून बाहेरच्या रोषणाई आणि आतिशबाजीचा कसा त्रास होतो सगळ्यांना ते अनुभवलं. तेव्हापासून फटाके वाजवणं बंद केलं. मी राहतो ते ठिकाण जरा उंचावर आहे. टेकडीच म्हणा ना. त्यात तिसरा मजला. दिवाळीच्या दिवसात आणि त्यानंतर जवळपास आठवडाभर खिडकीतून किंवा गच्चीतून चारी दिशांकडे बघितलं तर रात्री जमीन आणि आकाश यांमध्ये एक गडद काळसर आणि धुसर पट्टा दरवर्षी नजरेस पडतो. यालाच स्मॉग म्हणतात वाटतं. एरवी वर्षभरात साधं कोणीतरी लग्ना-बिग्नाच्या निमित्ताने सुद्धा एखादी लवंगी माळ लावली तरी आकाशात पक्षांचे थवेच्या थवे घाबरून त्या आवाजाच्या ठिकाणापासून लांब सैरावैरा उडत सुटताना दिसतात. दिवाळीत त्यांचं काय होत असेल?? आपण एवढी भलीमोठी माणसं असूनही आपल्याला छोट्या फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा त्रास होतो. त्या पक्ष्यांच्या चिमुकल्या जीवांचं काय होत असेल?? आधी वाटायचं, की यार दिवाळी फक्त चार-पाच दिवसातंच का संपते? निदान दोन आठवडे तरी हवी. पण आता, 'चारच दिवस तर उडवतो फटाके' असं म्हणणारी माणसं भेटायला लागल्यापासून दिवाळी हा वन-डे फेस्ट झाला तरी चालेल. कारण आपल्या मौजेची किंमत इतरांना(आणि आपल्याला सुद्धा) त्यांच्या आरोग्याला त्रास देऊन मोजावी लागते. 'इतर देशात ३१ डिसेंबरला वगैरे उडवतात त्याचं काय?' - आपण लहान मुलं आहोत का? 'त्यानं माती खाल्ली मग मीसुद्धा खाल्ली तर काय बिघडलं?' 'सगळे रस्त्यात कचरा टाकून घाण करतात, मग मीसुद्धा फेकला तर काय मोठं होणार आहे?' 'सगळे थुंकतात कुठेही, मग मीसुद्धा थुंकतो आता' सुधारणेला सुरुवात स्वतःपासूनच करावी. आणि आपण सुधारलो की आपल्या परीने इतरांनाही सुधारावं.

सहमत.. लक्ष्मीपूजन म्हणजे अमावस्या पण या दिवशी प्रदूषणाच्या ढगामूळे एक तारका सुध्दा नजरेस पडत नाही. वारा जरी वाहात असेल तरी जळलेल्या फटाक्यांचे वास सोबत घेऊन. ही परिस्थिती मी ज्या लहान शहरात राहाते तिथली आहे. पूण्या-मुंबई कडे काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. अन् स्वत: पासून सुधारणेला सुरवात झालेल्यांचे अभिनंदन आणि आभार पुष्कळ आधी फटाक्यांशी असलेला रिश्ता तोडलेली ;)

स्वॅप्स ह्यांच्या प्रतिसादशी बराचसा सहमत. लहानपणीही मोठ्या आवाजाची तिडिक होती. त्यामुळे त्याच्या वाटी गेलो नव्हतो. नावापुरते एखाद दोन भुईनळे आणि भुईचक्र उडवायचो. तेसुद्धा आठवी नववीपासून बंदच झाले. . ह्याबाबतीत मी निराशावादी आहे. माज्झ्या कानांना असह्य असा त्रास देणे हा पब्लिकचा जन्मसिद्ध अधिकार हतबलतेतून मान्य केला आहे. आख्खा भारत देश बापानच भेट दिल्यासारख्या तोर्‍यात बहुसंख्य पब्लिक कधी सणांना धत्तड तत्त्ड करत रस्ते अडवणार, कान फाटेस्तोवर आवाज काढणार ही फ्याक्ट आहे. तुमच्यासारखांच्या म्हणण्याकडे काणाडोळा होणार ह्याची ग्यारंटी. तरी तुम्ही लोकं " माना के इस चमन को गुलजा़र न बना सके हम मगर कुछ काटे तो किये कम, गुजरे जिधर से हम" असा मानवतावादी विचार करत समजावणीच्या सुरात बोलत राहणार. पकाकाका,तुम्हाला कधी मठ्ठ आणि कधी कमलिच्या आडमुठ्या लोकांशी सतत शांतपणे बोलण्याचा उद्वेग कसा येत नाही ह्याचं आश्चर्य वाटतं.

मी १`९९८ नंतरच्या एकाही दिवाळीत एकही फटाका वाजवल्याचे किंव्वा फुलबाजी उडवल्याचे स्मरत नाही कारण आवडतच नाही वेळ वाया जातो ( तेवढ्या वेळात मी चार चकल्या अन २ लाडु येक्ष्ट्रा खाऊन घेईन ना ;) ) ....पण आता ह्या महाशयांनी फटाके उडववणे हे अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळीत घुसवल्याने यंदा किमान १००० रुपायाचे फटाके आणुन , टिच्चुन , उडवावेत असा मानस आहे ... ह्या लोकांना हिंदुंच्याच सण समारंभात नेहमीच खोट का दिसते देव जाणे . आला गणपती की पाणीप्रदुषण/ ध्वनीप्रदुषण , होळीला वृक्षतोड , वारीला अस्वच्छता , दिवाळीत आता हे ...देवीपुढं बोकडाचा बळी द्यायला विरोध .... सातार्‍यात तर पाठशाळेतर्फे एकदा यज्ञ करण्यात आला होता त्यालाही यांचा विरोध ... अरे दुसर्‍यांच्या अंधश्रध्दांविषयी विषयी बोलुन तरी दाखवाल का ? उगाचच हिंदु गपगुमान बसतात म्हणुन म्हणुन किती चेपायचे ? (अवांतर : हिंदुंच्या जुनाट आणि कालबाह्य रुढी हटवण्याकरीता संघानेच / विहिंपनेच पुढाकारुन घेवुन श्रध्दा सबलीकरण समिती सुरु केली पाहिजे आणि भरकटत जाणार्‍या प्रथांना पुन्हा नीट केले पाहिजे .)

बरोबर आहे... पण तुम्ही म्हणताय त्या लोकांनी हे सुरू केलं की तो पुन्हा एक राजकीय फार्स ठरेल. सगळ्यांना हे समजलं पाहिजे...आणि त्यांनी तसं केलं पाहिजे

फटाके वाजवणं फार पूर्वीच बंद झालं. पण रोषणाई आवडते. आवाजाच्या फटाक्यांचा मर्यादित वापर बरा वाटतो. बाकी... >>>अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. पकाकाका, मुदलात घोळ आहे की हा! ;) दिवाळीच मनवायला नकोय ना अंधश्रद्धा निर्मूलन कर्त्यांनी. ह्या अंनिस वाल्यांची नेमकी भूमिकाच कळत नाही राव. टोटल देव ही संकल्पनाच न मानणे की देव मानणे पण ज्योतिष न मानणे की सामाजिक रुढी न मानणे की दारुबंदी करणे की स्वच्छता अभियान चालवणे की आणखी काही? अरे नक्की काय करायचंय काय (म्हणजे तुला कशाला चौकश्या नव्हे तर खरंच नेमका काय बदल अपेक्षित आहे? ) तुम्हाला म्हणजे अंनिस वाल्यांना. लोकशिक्षण हा जास्त योग्य मार्ग नाही वाटत? बाकी जागृती आपोआपच येईल की.

>>टोटल देव ही संकल्पनाच न मानणे की देव मानणे पण ज्योतिष न मानणे की सामाजिक रुढी न मानणे की दारुबंदी करणे की स्वच्छता अभियान चालवणे की आणखी काही? या प्रश्नांच्या शोधात गेल्यावर जो प्रवास आपला होतो त्यात आपल्याला जी उत्तरे मिळत जातात त्यातूनच आपला वैचारिक विकास होत जातो. अंनिस ही देवाधर्माबद्दल तटस्थ आहे. पण धर्माची कालसुसंगत चिकित्सा केली गेली पाहिजे अशी भुमिका असते. त्यामुळे अंनिस ही देवाधर्माविरोधी आहे अशी प्रतिमा तयार होते. >>लोकशिक्षण हा जास्त योग्य मार्ग नाही वाटत? बाकी जागृती आपोआपच येईल की. तोच मार्ग योग्य आहे. चिकित्सा हा लोकशिक्षणाचाच भाग आहे. जागृती हळू हळू होतेच आहे.विज्ञानाच्या प्रगतीमुळे तो वेग वाढत जाईल.

चला दिवाळीच्या अतिरेक फटाक्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी आपण दिवाळीतून फटाके भाग वजा केला. ग्रेट. बाकी धर्माचे, वंशाचे लोक त्यांच्या सणांतून प्रदूषणकारक पद्धती, घटक वगळतील का?

सगळे मुद्दे पटताहेत खरं. साधारण ९-१०वीत असताना फटाके उडवणं बंद केलं ते गेल्यावर्षीपर्यंत. आमच्या राहत्या जागेपासून जवळच एक 'गार्डन'वालं कार्यालय आहे. वर्षभर लग्नं असतील तेव्हा कचकून फटाके उडवले जातात. दोन-सव्वादोन वर्षाचं आमचं पोरगं खिडकीच्या जाळीला नाक चिकटवून मान वाकडी करकरुन आतीषबाजी पहायचा प्रयत्न करायचं. त्या दिवाळीला इतक्या वर्षांनंतर घरात फटाके आणले गेले.. आता प्रदुषण वगैरे वैज्ञानीक अन 'जुन्या रुढी भंगारात काढा' वगैरे मतं एकवेळ मला पटताहेत असं म्हणू....अडीच-तीन वर्षाच्या लेकराच्या चेहर्‍यावरच्या चार दिवसांचा फटाक्यांचा आनंद अन त्या आठवणींवर पुढे निघालेला त्याचा महिना महिना...हे सुख कसं दुर्लक्षित करु? समजसुधारणा, जुन्या रुढी, अमुक तमुक सगळे आवेशपुर्ण, त्रासलेले, प्रामाणिक प्रतिसाद वाचले. पण एकदा पोटच्या पोराच्या चेहर्‍यावरचा हा आनंद पाहिला तर असे विचार त्याक्षणी सुचतील तरी का असा प्रामाणिक प्रश्न पडला.

अडीच-तीन वर्षाच्या लेकराच्या चेहर्‍यावरच्या चार दिवसांचा फटाक्यांचा आनंद अन त्या आठवणींवर पुढे निघालेला त्याचा महिना महिना...हे सुख कसं दुर्लक्षित करु?
अगदी पटलं धमाल मुला. अरे! मला सुद्धा शाळेला दांडी मारायला मिळाली की कोण डोंगराएवढा आनंद व्हायचा. पण आमच्या पालकांनी तो निर्मळ आनंदही कधी मिळवू दिला नाही. मारुन मुटकून शाळेत पाठवायचे आणि मी रडतखडत, पाय ओढत हिरमुसल्या मनाने शाळेत जायचो. मुलाच्या भवितव्याचा विचार करून त्याचे वर्तमान सुख हिरावून घेतात हि पालकमंडळी. फटाक्यांनी होणारे प्रदुषण आणि मुला-मोठ्यांची फटाके फोडून आनंद मिळविण्याची संधी, दोन्ही अबाधित कसे ठेवता येईल? सर्व धर्मियांच्या ध्वनी प्रदुषणावर बंदी घाला, भेसळयुक्त इंधन (पेट्रोल-डिझेल) विकणार्‍यांवर कारवाई करा, प्रत्येक वाहनाला दर दोन वर्षांनी तपासणी बंधनकारक करा. (पीयुसी प्रमाणपत्र पुरेसे आहे? मला शंका आहे.), मलमुत्र विसर्जनाच्या सार्वजनिक सुविधा वापरायोग्य बनवा, औद्योगिक, रासायनिक कचराद्रव्य नदी-नाल्यात सोडले जाणार नाही ह्यावर लक्ष ठेवा, कारखाने, उपहारगृहे, स्मशाने येथे निर्माण होणार्‍या धुराचे उंच चिमणीद्वारे निस्सारण, अन्नातील प्रदुषण (भेसळ) ताबडतोब थांबवा, फटाक्यांच्या बाबतीत धूर करणार्‍या फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी, आवाजाच्या (डेसिबल) मर्यादेवर बंदी आणि काटेकोर अमलबजावणी इ.इ.इ. उपाययोजना सक्तीने अमलात आणल्या पाहिजेत.

शाळा-दांडी-वर्तमान सुख-भवितव्य ह्या संदर्भातलं वाक्य सरळ होतं की तिरकस ते काही मला नीट उमजलं नाही त्यामुळं मी आपलं सोयीस्कररित्या ते सरळच आहे असं गृहित धरतो. :) बाकी मुद्यांवर अर्थातच सहमती. ज्या इतर गोष्टी करणं शक्य आहे त्या तशाच सोडून लोकांच्या भावना, आनंद जिथे निगडीत असतात तिथे विरोध करण्यात काय हशील आहे ते मात्र आजवर मला कळालेलं नाही. (तशीही आमची आकलनक्षमता दिव्यच आहे म्हणा.) आज पुण्यासारख्या शहरांमध्ये रस्त्यावरुन जाताना नजरेच्या टप्प्यात क्षितीजाकडं नजर टाकली तर काळाकुट्ट धुराचा पट्टा दिसतो. रोज! दिवाळीसारखा चार दिवस नव्हे. त्याविरोधात पावलं उचलणं जास्त गरजेचं नाही का? रस्त्यानं जाणार्‍या आणि विशेषतः सिग्नलला थांबलेल्या सिटी-बसमधून काळ्याकुट्ट धूराचे लोटच्या लोट वहात असतात, त्याबाबत ह्या सार्वजनिक वाहनांच्या देखभालीबद्दल कुणी काही प्रयत्न का करत नाही हेही मला कळालेलं नाही. कारखान्यांमधून सोडल्या जाणार्‍या घातक रसायनांबद्दल बोलण्यात अर्थ नाही, कारण त्या गोष्टींचं शुध्दीकरण, रिसायक्लिंग वगैरेसाठी लागणार्‍या खर्चाचा मुद्दा पुढे येऊन मग परत उत्पादनाचे भाव वाढणं वगैरे अर्थशास्त्रीय भानगडीकडं वळावं लागेल. थोडक्यात काय, तर सॉफ्ट टार्गेट्सच नेहमी धोपटले जातात. मग ते दिवाळीतले फटाके असो नाहीतर देवदेवता असो. असो, हे विचार म्हणजे पेठकरकाकांच्या मुद्द्याला प्रत्युतर असं नव्हे, तर विचारांच्या ओघात सुचलं ते लिहिलेलं आहे. जाताजाता: वर्षभर जी लग्नं लागत असतात, त्या लग्नांच्या मिरवणूकीत रस्त्यातली वाहतुक थांबवून पन्नास हजार / लाखभर फटाक्यांच्या लडी लावल्या जातात, संपुर्ण मिरवणूकीत रस्ताभर फटाक्यांचा रतीब घातला जातो त्यांचे प्रबोधन कशा प्रकारे केले जाते ते वाचायला आवडेल.

मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर पाण्याची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प लोकशाही राजाने केला व अनासक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचे आवाहन केले. कोणी विचार करु लागला कि इतर लोक दुध टाकणार आहेत च आपली एखादा तांब्या पाण्याने काय होणार आहे? चला आपण पाणीच टाकू कोणी विचार करु लागला कि इतर लोक साले चोर आहेत पाणी टाकतील मग आपण दुध टाकले तरी त्याचा काय उपयोग? चला आपणही पाणीच टाकू. अशा रितिने सर्व गाभारा पाण्याने ओसंडून वाहू लागला. तसे इथे माझ्या एकट्याच्या प्रदूषणाने काय होणार आहे इथे कितीतरी प्रदूषण करणारे अन्य घटक आहेत.माझ्या एकट्याच्या फटाके न वाजवण्याने वा कमी वाजवण्याने काय होणार आहे? फटाकेमुक्त अभियान हे अंनिस चळवळीने विवेकी लोकांना केलेले आवाहन आहे. व्यापक परिवर्तनाची चळवळ ही विवेकी विचारांची चळवळ आहे, वैज्ञानिक दृष्टीकोनाची चळवळ आहे. प्रदूषण या गोष्टी शी श्रद्धा अंधश्रद्धा धर्म याचा काही संबंध नाही. अंनिसच्या काही गोष्टी लोकांना पटत नसतील हे मान्य आहे. तिथे वाद संवाद होउ शकतात. पण इथे मुद्दा प्रदूषणाचा आहे. प्रदुषणाचे आकडे आपण पेपरमधे वाचत असतोच ना! प्रत्येक ठिकाणी अंनिसचा संबंध असलाच पाहिजे असे काही नाही.समाज प्रबोधन ही काही केवळ अंनिसची मक्तेदारी नाही.

प्रतिसाद आवडला तसही बरेच वर्ष फटाके वाजवले नाहीत. उगाचच : कुंडल्या तयार करुन मग जाळताना प्रदुषण होते का?