Welcome to misalpav.com
लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काही प्रमाणात नासाडी होण्यातच भलं आहे अशी सध्याची व्यवस्था आहे. ती बदलून जवळपास शून्य नासाडी पण तरीही कोणाच्या पोटावर पाय नाही या व्यवस्थेपर्यंत जाणं भल्याचं. पण ते कसं जाता येईल याची कोणाला कल्पना नाही.
संस्कार. जे ह्या लेखाद्वारेसुद्धा होत आहेत. पुढच्या पिढीवर तसे संस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच बरोबर अशा चर्चांमधून, कांही अनुभवांमधून समवस्यकांवरही अन्ननाश टाळण्याचे संस्कार करता येतील. आमच्या उपहारगृहात कोणी अन्न टाकले असेल तर (तसे माझ्या लक्षात आल्यावर) मी त्या गिर्‍हाईकास व्यक्तीशः विचारतो की, 'अन्न का टाकून दिलं आहे?' 'आवडलं नाही का?' 'चवीबाबत कांही समस्या आहे का?' इ.इ.इ. शिवाय उरलेले अन्न पॅक करून घरी नेण्यासाठीही प्रवृत्त करतो. पार्टीच्या वेळी लोकं आमच्या इथे ज्या ऑर्डर्स बुक करतात त्यांनाही पार्टीला किती माणसे येणार आहेत? माझ्या पदार्थांव्यतिरिक्त आणखिन काय पदार्थ आहेत? वगैरे विचारून त्यानी ऑर्डर केलेले पदार्थ जास्त असतील तर ते कमी करून हे कमी करून दिलेले पदार्थ कसे पुरतील हे त्यांना समजावून सांगतो. त्यांचे पैसे आणि अन्नाची संभाव्य नासाडी टळते. माझा नफा कमी होतो पण गिर्‍हाईक टिकून राहते. उपहारगृह बंद पडली तर त्या व्यवसायाशी निगडीत मालक/कामगार उपाशी मरतील ही भिती अनाठायी आहे. इकॉनॉमिक्स मध्ये सप्लाय-डिमांड नात्यात 'Supply creates its own Demand' असाही एक निष्कर्ष आहे. एखादा व्यवसाय बंद पडला तर त्या व्यवसायाशी निगडीत माणसे दुसरा एखादा व्यवसाय शोधून काढतात आणि तिथे ही माणसे सामावली जातात. गरज आणि उपलब्धता दोन्ही एकमेकांना साहाय्यक आणि पुरक ठरून समतोल साधला जातो. तेंव्हा भिती नसावी. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी संस्कार आणि समाज प्रबोधनाशिवाय तरणोपाय नाही.

बाकीचं ठीक, पण
'Supply creates its own Demand'
हे बरोबर नाही हो. नाहीतर प्रचंड सप्लाय आहे, पण डिमांडच नाही अशी रेसेशनची परिस्थिती कधी आलीच नसती. सत्तरीच्या दशकात दिसून आलेलं स्टॅग्फ्लेशन दिसलं नसतं. लोकांनी डिमांड कमी केली की धंदे बुडतात, त्या धंद्यांत काम करणाऱ्या लोकांची नोकरी जाते. कदाचित त्यांना इतर ठिकाणी मिळेलही नोकरी, पण या बदलासाठी अनन्वित कष्ट होतात. १९२९ सालची मंदी कित्येक वर्षं टिकली. एवढ्या मागे कशाला जा, २००८ सालचा गोंधळ अजून पूर्णपणे निस्तरलेला नाही. तेव्हा घरांचा सप्लाय केवढा तरी वाढलेला होता. पण डिमांड धाप्पकन खाली आलीच की. आणि मग लाखो लोकांची घरं गेली. अन्न हे पूर्णब्रह्म, देव वगैरे नसून एक अत्यावश्यक का असेना पण प्रॉडक्ट आहे हे लक्षात घेतलं की नासाडीकडे एक्सेस डिमांड किंवा रिसोर्स युटिलायझेशन इनएफिशियन्सी वगैरे स्वरूपात बघता येतं. मग नासाडी कमी करण्याच्या फायद्यातोट्यांचा विचार करता येतो. असो, आत्ता जे प्रतिसादांचं स्वरूप दिसतं आहे त्यात कोणाला असा विचार करण्याची इच्छा दिसत नाही.

'Supply creates its own Demand' कोकाकोला, पेप्सी इत्यादी शितपेयांच्या बाबतीत काय? कोणाला या पेयांची काही गरज नसताना उगाचच विकली जातात ना.

अन्नाची नासाडी टाळणे -> रेस्टराँ बिझनेसमधे डिमांड कमि होणे-> त्या बिझनेससंबंधी लोकांच्या पोटावर पाय पडणे हे गृहीतक चुकीचं आहे अन्नाची नासाडी टाळ्णे-> पुष्कळसं रॉ मटेरीअल मार्केटमधे उपलब्ध होणे-> त्यातुन निम्न आर्थीक परिस्थितीवाल्या लोकांसाठी माफक दरात अनेकानेक छोटेखानी खानावळी सुरु होणे-> रेस्ट्राँ व्यवसायाची वृद्धी होणे. असा मस्त कारभार होईल. आज एका फूडचेनवाल्याच्या खिशात जाणारा पैसा अनेक खानावळीमालकांकडे डायवर्ट होईल. तस्मात चिंता नसावी.

छे हो, अन्नाची नासाडी टाळ्णे-> पुष्कळसं रॉ मटेरीअल मार्केटमधे उपलब्ध होणे-> शेतकऱ्याला कमी भाव मिळणे-> कर्ज फेडणं अधिक कठीण होणे -> शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणे असं साधं समीकरण आहे. तुम्हाला मध्यम खाणावळवाल्यांची का चिंता आहे कळलं नाही.

तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मार्केट्मधे रॉ मटेरीअल वाजवी किमतीत अव्हेलेबल आहे, सामान्यांना गरज आहे, उपासमारी घटवायची चांगली संधी आहे... पण सुज्ञ लोक या संधीचा फायदा घेण्याऐवजी सगळं साहित्य गटारात फेकुन देतील व शेतकरी आत्महत्येला मोकळे होतील. पण मग श्राद्धाचं जेवण बनवणार्‍यांचा बिझनेस जोमात चालेल ना... तो कसा रोखायचा? ह्म्म्म.. सगळं अन्न कावळ्यांना खाऊ घालायचं... उरलेलं नदीत फेकुन द्यायचं... पण मग स्मशान चालवणारे आणि कोळ्यांचा धंदा तेजीत येईल... छ्या... कसंही करुन फायदा काहि टळत नाहि बॉ :(

>>शिवाय उरलेले अन्न पॅक करून घरी नेण्यासाठीही प्रवृत्त करतो. >> मी सुद्धा कधीही हॉटेलमध्ये गेलो आणि अन्न उरले (जसे रोटी भाजी खाल्ल्यावर उरलेली भाजी) तर पॅक करुन घरी घेउन जातो. आणि बाहेरच्या देशातसुद्धा could you please box it for me? विचारतो किंबहुना तेच विचारतात पदार्थ उरलेला बघुन

मी पूर्वी काम करत असलेल्या एका एम एन सी (नॉन आय टी ) मध्ये उरलेले अन्न हे अनाथालयाला पोचते व्हायचे व सध्या च्या सरकारी हाफिसात उरलेले व टाकलेले अन्न हे बायोगास प्लांट मध्ये वापरले जाते . आय टी लोकांची वृत्ती बदलणार नाही तुम्ही तुमच्या हापिसात बायोग्यास ची कल्पना मांडा बघू कदाचित "ओउट ऑफ बॉक्स थिंकिंग" चे बक्षीस पण मिळेल :D शंका : पिझ्झा बायोग्यास निर्मितीला तरी मदत करतो का ?

आज काल आय टी च्या लोकांना शिव्या दिल्या शिवाय उच्चभ्रु होता येत नाही.

शंका : पिझ्झा बायोग्यास निर्मितीला तरी मदत करतो का ?
पिझ्झ्यामुळे शरीराच्या पश्चिम आघाडीवर ढामढूम होते. त्यामुळे बायोग्यास-निर्मिती होते असं म्हणायला हरकत नाही.

तोंडाला केक फासण्याची गलिच्छा फ्याशन कोणी आणली हे कळाले तर त्या महाभागाला एक पार्श्वभागावर लत्तप्रहार बक्षीस देईन म्हणतो

२०-२५ हजार आय टी कामगार असलेल्या आणि आपली मुल्ये जपणार्या कंपनीच्या फुड कोर्ट चा माझाही अनुभव असाच काही आहे.येथे ताटात अन्न टाकण्याचे प्रमाण खुप आहे. या विषयावर कंपनीच्या फोरम वर नेहमी खुप चर्चा झडतात आणि प्रत्येकाचा रोख हा अन्नाची नासाडी रोखली जावी असाच असतो. फोरम वर आपले विचार मांडताना तर प्रत्येकजण तसे भासवत असतो पण फुड कोर्ट मधील द्रुष्य एकदम वेगळे. डिश लॅंडींग एरिया मध्ये १० मिनीटे थांबुन टाकल्या जाणार्या अन्नाकडे बघितले तर डोके सुन्न होइल असे. वाढदिवसाच्या पार्ट्या तर अगदी आली लहर केला लहर या स्वरुपाच्या असतात.सरळ सरळ केकची रंगपंचमीच जणु.आगोदर ज्याचा वाढदिवस त्याला/तिला मग मोर्चा बाकी लोकांकडे, त्यासाठी मग केक लावण्यासठी पळापळ, नाहीतर मग फेकाफेकी.यानंतर तोंडाला लावलेला केक धुवुन बेसिन एरिया घाण आणि बेसिन ब्लॉक करणे आले. काही दिवसांपुर्वी एक स्त्री एम्प्लोयी ओरडत पुढे पळतेय आणि मागे तोंडावर केक फासलेला हातात केक चा मोठ्ठा तुकडा घेऊन तिचा परुष सहकारी तिच्या मागे मागे पळतोय असे द्रुष्य बघितले. आसिफ.

काय..थोड सांगुन बघायच. थोड आपण आपला नियम पाळायचा अस करुन बघा. बाकी मलाही अन्न टाकणारे लोक अजिबात आवडत नाही. मी माझ्या मुलांना सांगते, भाताच एक कण शिजायला जरी अर्धातास लागला तरी त्याला शेतात चार महिने लागतात तयार व्हायला. सो एकही शित टाकायच नाही. कधी ऐकतात कधी नाही. यु आर ऑलवेज लाइक धिस पण म्हणतात. :(

भावाने सांगितलं की पुण्यात म्हणे एक रेस्टॉरंट आहे जिथे त्याने जेवण पूर्ण संपवल्यावर मालकाने १०% डिस्काऊंट दिला, अन्न वाया न घालवल्याबद्दल. (भावाने आनंदाने २०% टीप दिली!) रेस्टॉरंटचं नाव विसरलो, पण तिथे म्हणे ही कायमची प्रथा आहे.

चिपळूणात ह्या विरुद्ध पाटी पाहिली. 'नको असल्यास आधीच सांगावे. ताटात अन्न टाकल्यास ५ रुपये दंड करण्यात येईल.' हे मला १० टक्के सवलत देण्यापेक्षा जास्त योग्य वाटतं. ताटात टाकणार्‍यांची संख्या तशी, न टाकणार्‍यांपेक्षा, कमी असते. त्यामुळे लोकांना शिस्त लावताना, सवलती पोटी, उपहारगृहाच्या मालकालाच भुर्दंड पडेल. शिवाय ह्यांनी आधीच १०% किमती वाढविलेल्या आहेत ( नाही तर कसे परवडते?) असा गैरसमज जनमानसात पसरू शकतो. त्यामुळे पदार्थांच्या किमती रास्त ठेवून अन्नाची नासाडी करणार्‍यास दंड आकारणे जास्त व्यवहार्य आणि नैतिक ठरेल.

'तु नही तो और सही' म्हणणारे पण असतात. त्यामुळे दंडापेक्षा सवलतच गिरर्‍हाईकाला जास्त आकर्षीत करेल. शेवटी मालकाला हॉटेल चालवताना विचार तर करावाच लागेल ना काका.. (मला असं वाटतं.. बाकी पेठकर काकांचा (मालकांचा) एक्ष्पेरिएन्चे जास्तच आहे म्हणा..)

उपहारगृह उत्तम प्रकारे चालत असेल तर दंडाचेही कौतुक होते. न चालणार्‍या उपहारगृहाला सवलतीच्या कुबड्या घ्याव्या लागतात. दुर्वांकुराचे नांव नक्कीच मोठे आहे. ते कांही न चालणार्‍या उपहारगृहांपैकी नाही हे मी जाणतो. मी एक सर्वसामान्य नियम सांगितला आहे. तसेच, स्थानपरत्वेही उपहारगृह मालकांची धोरणे बदलत असावित.

एक ग्राहक म्हणून मला दुर्वांकुरची पद्धत बरोबर वाटते. मी जेव्हा जागेवर बसतो तेव्हा मला माहिती असते की मला २०० रुपये द्यावे लागणार आहेत. त्यातले २० कमी झाले तर उत्तमच आहे. काही कारणाने मी ताट पुर्ण रिकामे नाही करु शकलो तर चूक माझी आहे आणि मी पुर्ण पैसे भरेन जे भरण्याची मानसिक तयारी मी आधीच केली आहे. एखाद्या माणसाला सवलत देण्याचा अधिकार उपहारगृहचालकाला नक्कीच आहे. शिक्षा देण्याचा नाही. जर उपहारगृह चालक पोलिसाच्या भूमिकेत शिरला (दंड वगैरे) तर त्याची आणि गिर्‍हाइकांची भांडणे होतील. शिवाय ताटाचा दर जर १८० असेल तर जेवायला बसताना गिर्‍हाइकाची मानसिकता १८० भरण्याचीच असते. जर त्याला २०० रुपये भरण्याची सक्ती केली गेली तर तो आपसूक बिथरेल. मेनु कार्डावर, हॉटेलमध्ये आणि अगदी टेबलावर जरी ही दंडाची सूचना स्पष्टपणे लिहिली असेल तरी शेकडा दहा टक्के लोक आम्ही हे वाचलेच नाही अशी भूमिका घेइल्. अगदी त्याला हे स्प्ष्टपणे सांगितले जरी तरी त्याला हे ज्यादा आकार देणे अपमानास्पदच वाटेल. याउलट सवलत नाही मिळाली तर ठीक आहे म्हणून कोणीही सोडुन देइल. दंडात्मक कारवाईने उपहारगृहातल्या कटकटी वाढतील. मॅनेजरला दुसरे काही काम नसल्यासारखे त्याला लोकांशी या पॉलिसीवरुन हुज्जत घालत बसावे लागेल. सवलत मिळवण्यावरुनही एक दोन जण कटकट करण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ती संख्या खचितच कमी असेल.

जर उपहारगृह चालक पोलिसाच्या भूमिकेत शिरला (दंड वगैरे) तर त्याची आणि गिर्‍हाइकांची भांडणे होतील.
'दंड केला जाईल' असे म्हंटले म्हणजे लगेच पोलीसाच्या भूमिकेत शिरला असे होत नाही. दंड भरला नाही तर लगेच ऊपहारगृहाने पाळलेलेल गुंड गिर्‍हाईकाला बदडून, उचलून बाहेर फेकून देत नाहीत. समजावून सांगितले जाते असे करू नका. हे गैर आहे. दंडापोटी रक्कम वसूल करणे हा उद्देश नसून पाटी पाहून अन्नाची नासाडी करणार्‍यांचे प्रमाण कमी व्हावे ही त्यामागील भावना आहे. पाटी लिहून ठेवली म्हणजे लगेच दंड वसूल केला जातो असे नाही. ह्या उलट सवलतीच्या फलकाच्या बाबतील अटीची पूर्तता करणार्‍या गिर्‍हाईकास सवलत ही द्यावीच लागेल. उपहारगृहात हात धुवायच्या जागीही 'केस विंचरू नयेत', 'नाक शिंकरु नये', 'घसा खाकरू नये', 'ताटात हात धुवू नयेत' वगैरे वगैरे सूचना फलक असतातच त्यापैकीच हा 'ताटात अन्न टाकले तर ५ रुपये दंड केला जाईल' एक फलक. दंड केलाच जाईल असे मला वाटत नाही. पण फलकाचा परिणाम नक्की होतो. (माझ्यावर तरी झाला होता) त्या मागिल भावना ओळखून गिर्‍हाईके समंजसपणा दाखवतात. आपल्याला हवे तेवढेच ताटात वाढून घेतात.
शिवाय ताटाचा दर जर १८० असेल तर जेवायला बसताना गिर्‍हाइकाची मानसिकता १८० भरण्याचीच असते. जर त्याला २०० रुपये भरण्याची सक्ती केली गेली तर तो आपसूक बिथरेल
दंडाची रक्क्म फक्त ५/- रुपये आहे. म्हणजे १८०/- भरायची मानसिकता असणार्‍याला खरोखर दंड वसूल करायचा म्हंटला तरी फक्त १८५/- रुपये खर्च येईल. शिवाय त्याची चूक त्याच्या पदरात घातल्यावर तो कांही कटकटही करणार नाही. उलट पुढच्या वेळी तो ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवेल. सवलतीच्या धोरणात सर्वांनीच ताट साफ केले तर ते ताट प्रत्येकाला १६२/- रुपयाला पडेल. आणि तोच दर वाजवी आहे असे सिद्ध होईल (कारण १६२/- रुपयातही उपहारगृह मालकाला अपेक्षित फायदा आहेच) आणि १८०/- हा दर अवाजवी आहे असा समज गिर्‍हाईकांमध्ये पसरेल. (दुर्वांकूराचे दर मला माहित नाही. पण इतर उपहारगृहांपेक्षा नक्कीच १०% जास्त असतील असे मला वाटते आहे. असो.) अजून एक सवलत मला ठाऊक आहे. ती म्हणजे, 'होम डिलीव्हरी वर १०% सूट देण्यात येईल.' गिर्‍हाईकांनी ओसंडून वाहून जाणार्‍या उपहारगृहातील ही पाटी आहे. त्या मागील व्यवहार असा आहे की गिर्‍हाईकाने आपल्या घरी जेवण मागवले तर जे टेबल त्याने उपहारगृहात अडवून ठेवले असते ते मो़कळे राहून तिथे दूसरे गिर्‍हाईक बसू शकते आणि विक्री वाढते. इथे सूट दिल्याने कमी होणारा फायदा वाढीव विक्रीतून भरून निघतो त्यामुळे वाजवी किमतीच्या खाली दर लावण्याचे समर्थन होते. मूळ दर अवाजवी वाटत नाही.
दंडात्मक कारवाईने उपहारगृहातल्या कटकटी वाढतील. मॅनेजरला दुसरे काही काम नसल्यासारखे त्याला लोकांशी या पॉलिसीवरुन हुज्जत घालत बसावे लागेल.
असे कांही घडत असल्याचे मी तिथे असतानाच्या एका तासात जाणवले नाही. उलट त्या फलकाचे गिर्‍हाईकांकडून कौतुक होत असल्याचे दिसून आले. शिवाय फलकातील वेगळेपणामुळे ती एक 'बातमी' होऊन, बाहेर गेल्यावरही चर्चा होऊन (जशी इथे होत आहे) त्यामागच्या मूळ भावनेचा, अन्नाची नासाडी करू नये, प्रसार होण्यास मदत होत आहे.

मी स्वतः पुरत पहिले बघतो,जेवढ पाहिजे तेव्हढे घेणे आणि घेतले तेवढे संपवणे. माझ्या बरोबर कोणी जेवत असेल आणि ताटात काही टाकले की मोठा असेल तर आवडले नाही म्हणून सांगतो आणि बरोबरचा मित्र असेल तर सरळ लाज काढतो. एखाद्या पदार्थाची चव बिघडली असली तर मालकाला वाद घालून टेस्ट करायला लावतो. आधी तुझ काय जातय, मी पैसे देतो, कशाला शहाणपणा शिकवतो वेगॆरे व्हयाच पण आजकाल माझ्याबरोबर जेवणारे मित्र स्वतःहून संपवण्याचा प्रयत्न करतात आणि हसत/चेष्टेत का होईना सॉरी म्हणतात. जग एका दिवसात बनले नाही त्यामुळे बदल पण एका दिवसात होणार नाही

अन्न वाया गेले की फार मानसिक त्रास होतो. आग्रह करु करु खायला घालणार्‍या लोकांपासून लांब राहतो. मला आग्रहाचा त्रासही होतो व चीड ही आहे.

पुर्वी वरपक्षाकडील चिमुरड्या पोरीचे ताट देखील स्वतंत्र पान म्हणून मोजावे लागायचे. हल्ली बुफे मुळे अन्नाची नासाडी कमी झाली आहे ते एक बर आहे.

बुफे मुळे अन्नाची नासाडी कमी झाली अस फार दिसून येत नाही ,उलट पहिल्यांदाच जास्त नाही घेतले तर कांउटर बंद होईल आश्या पद्धतीने "भरगच्च" ताट घेऊन अत्य अल्पोहार करणारेच जास्त. आणी हे जर दाखवून दिले तर "तुझ्या @@@@चे टाकतोय का असा अविर्भाव" हमखास.

काही महाभाग बुफे मध्ये देखील अगदी भरमसाठ वाढून घेतात कारण काय कोण सारखं सारखं रांगेत उभे राहणार. आणि मग हेच अन्न मग सरळ टाकून देतात.

ना युद्ध चालूय ना म्हादुश्काळ. उणिव आहे ती फक्त व्यवस्थेची जी सर्वाकड़े अन्न विकत घेण्या इतपत पैसा वितरित करेल.... उगा वाया जाणारे अन्न वाचवून किती पोटे भरणार ? आज दान करालहि उद्या सुधा ते शक्य असेल का?

अग्निकोल्हा तुम्ही आजतक वर असता काय ! नाही म्हणजे तुमचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात

एक किलो तांदूळ शेतात तयार होण्यासाठी ५००/७०० लिटर पाणी लागते. नेरळ येथील भडसावळे यांच्या "सगुणा बाग" येथे याविषयी सविस्तर माहिती मिळते. अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी लहानपणीच प्रबोधन होणे आवश्यक आहे. अलीकडेच कल्याण ला एका हॉटेलात पाटी पाहिली " Food is God do not waste it " असो देव म्हणून का होईना नासाडी थांबवण्याचे आवाहन आवडले या निमित्ताने एक श्लोक हि आठवला. वदनी कवल घेता नाम घ्या मातृ भू चे सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे कृषीवल क्रुशिकर्मि राबती दिन रात्र श्रमिक श्रम करोनी वस्तू त्या निर्मितात स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल उदर भरण होते चित्त होण्या विशाल ||

प्रकाश घाटपांडे यांचे नि माझे एवढे एकमत कसे होते कोणास ठाऊक. लग्नातला आग्रह ही तर तिडीक आणणारी गोष्ट आहे. त्यातही वराच्या किंवा वधूच्या लांबच्या नात्यातल्या नातेवाइकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. एका जवळच्या लग्नातली गोष्ट, लोकांची जेवणे आटोपत आली, पंगत उठायला लागली तेव्हा मुलीच्या वयोवृद्ध काकांना हुक्की आली. ते गुलाबजामाचे पातेले घेवून आले आणि ज्यांच्याशी ओळख पाळख नाही अशाही लोकांना आग्रहाने वाढायला लागले. एका तरुण मुलापाशी आले. त्याने जेवण संपवून पान अगदी स्वच्छ केले होते. तो एकच वाढा म्हणत असताना त्यांनी जास्त वाढले वर मखलाशी "माझं गणित कच्चय, एक म्हटलं की मी दोन वाढतो" तो तरुण मुलगा खवळलाच, "भांडाभांडी वादावादी सुरु झाली" ते आजोबा छोटं तोंड करुन माघारी निघून गेले...

आग्रह माझ्या शारिरिक व मानसिक प्रकृतीला मानवत नाही हे मी प्रथम स्पष्ट पणे व नम्र पणे सांगतो. तरीही काही लोक ऐकत नाही. मग मी आवडत नसताना आग्रह करणार्‍या लोकांकडे मी परत कधीही जात नाही असे स्पष्टपणे सांगतो. ऐकत नसलेल्या जुनाट लोकांवर मी " तुम्हाला वाढायच तेवढ तुम्ही वाढा मला जेवढ खायच तेवढ मी खाईन. अन्न वाया गेल्याचे पाप तुम्हाला लागेल." असे सांगतो.

हा असा अतिआग्रह एका मारवाडी मित्राच्या लग्नात झाला होता. जेवण तर एकदम गोड आणि तुपाळ. त्यात आम्ही मुलाकडचे असल्याने अतिआग्रह करुन वाढतच होते. कसेबसे संपवले. नवर्‍यामुलाची तर कीवच येत होती. जो तो येत होता आणि लाडू भरवून्(कोंबून) जात होता. बिचार्‍याच्या पोटाचे काय झाले असेल देव जाणे. आम्हीही त्याची बिकट परिस्थिती जाणून आहेरात हाजमोला दिला. :)

यावर मी थोडा विचार केला होता …एक वेब साईट काढायची आणि तिथे गरजू संस्था आणि हॉटेल, मंगलकार्यालये यांना जोडायचे…अनेक नवीन कल्पना यात घालता येतील…कोणी वेब डेव्लोपर आणि मदत करायची इतरांची(तुम्हा सर्वांची) इच्छा असेल तर निश्चित प्रयोग करून बघू शकतो…!!!