Welcome to misalpav.com
लेखक: सुहास झेले | प्रसिद्ध:
जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता. नेमके २०१४ हे वर्ष राजवाड्यांचे १५० वे जन्मवर्षदेखील आहे आणि हाच योग साधून इतिहास प्रेमींसाठी, ह्या अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते. मी इतिहासाचा इतका अभ्यासू नाही, जशी जशी माहिती मिळाली ती संग्रही ठेवत गेलो. आणि शिकत गेलो. श्री. निनादराव बेडेकर, श्री. पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे, हे ह्या अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते होते. आजच्या अभ्यासवर्गानंतर मला मिळालेली माहिती, तिथे उपस्थित असलेल्या मान्यवर वक्त्यांनी राजवाड्यांची आणि त्यांच्या विपुल संशोधनाची आम्हाला करून दिलेली ओळख, इथे थोडक्यात मांडत आहे. जनसेवा समिती आयोजित अभ्यासवर्ग.  स्थळ - साठ्ये महाविद्यालय जनसेवा समिती आयोजित अभ्यासवर्ग. स्थळ - साठ्ये महाविद्यालय[/caption] विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, ह्यांचा जन्म २४ जून १८६३ वरसई ह्या कोकणातला छोटेखानी गावातला. (ह्या जन्म तारखेबद्दल काहींचे दुमत आहे, सर्वसामान्य इतिहासाप्रमाणे ही तारीख १२ जुलै १८६३ आहे). १८९० मध्ये बी. ए. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांनी न्यूइंग्लिश स्कूलमध्ये नोकरी स्वीकारली आणि मग पुढे अडीच वर्षांनी ती नोकरी सोडली. त्यांचा विवाह १८८९ मध्ये झाला होता, परंतु १८९२ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार न करता, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ऐतिहासिक साहित्याचा आणि साधनांचा शोध घेणे सुरु केले. त्यांच्या मते इतिहासाबद्दल संशोधन करणे म्हणजे, त्यासंबंधीची कागदपत्रे आधी जमवणे आणि त्यावरून इतिहास पुराव्यानिशी लोकांसमोर मांडणे. ह्यासाठी त्यांनी अखंड भटकंती सुरु केली. दऱ्याखोऱ्यात प्राचीन अवशेष पाहत व देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विविध दप्तरातून, त्यांनी महत्वाची कागदपत्रे जमा करायला सुरुवात केली. त्यांचा हा निश्चय इतका दांडगा होता की, पार काबूलपर्यंत त्यांनी ही शोधमोहीम हाती घेतली होती. आता इतकी भटकंती करणे, कागद पुरावे जमा करणे, लोकांना त्या कागदांचे महत्त्व पटवून ते आपल्या ताब्यात घेणे, मग त्याची नीट वर्गवारी करणे, कोणी कागद देण्यास मनाई केल्यास, ते कागद जसेच्यातसे नकलून घेणे..हे सर्व प्रचंड कष्टाचे आणि जिकरीचे काम होते.. आणि ह्या कामात पैसा ही लागणारच. त्यासाठी त्यांना काही संस्थानिकांना मदत मागितली, पण कोणी त्यांना मदत देऊ केली नाही. नंतर काहीजण पुढे झाले, पण तोवर आपल्या पदरचे पैसे टाकून..घरदार, भांडीकुंडी विकून, ते आपला हा धंदा (हो...संशोधन कार्याला ते धंदा असेच संबोधत असे) मनापासून करत राहिले. हे सर्व करत असताना त्यांचे विविधांगी लेखन ही सुरु होतेच. सार्थ, ग्रंथमाला, विश्वृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इत्यादी नियतकालिकांतून ते सतत आपले विचार मांडत राहिले. इतिहास हा कल्पित नसतो, तो कागदपत्रांवर अवलंबून असतो. हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. त्यांच्या अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा की, "अस्सल कागदपत्राचं एक चिठोरं, अवघ्या बखरींचं बहुमत हाणून पडायला समर्थ आहे". त्यांनी अखंड संशोधनकरून जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर, "मराठ्यांच्या इतिहासाची साधने" शीर्षकाचे अस्सल मराठी बावीस खंड त्यांनी प्रसिध्द केले (१८९८-१९१७). ह्या पैकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. निनादराव ह्यांनी त्यांची ओळख करताना राजवाड्यांच्या प्रस्तावनेचा आवर्जून उल्लेख करतात. ही खंडाची मांडणी आणि त्यात दिलेला पत्र व्यवहार सलग नाही अशी त्यांच्यावर टीकाही झाली. जस जसे त्यांचे संशोधन होत गेले, तसेतसे ते खंड प्रकाशित करत गेले आणि लोकांना, इतिहासकारांना त्यावर चर्चा, टीका करण्यास भाग पाडले, जेणेकरून त्या चर्चेतून, टिकेतून इतिहासाची खरी ओळख समोर यावी. त्यापुढे १९२२ आणि १९२४ ह्या साली राधा माधव विलास चंपू आणि महिकावतीची बखर हे दोन ग्रंथ संपादून छापले. ह्या दोन्ही ग्रंथांनासुद्धा मोठ्या विवेचक प्रस्तावना त्यांनी जोडल्या. ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहत काल असे काही त्यांनी संपादिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिध्द झाले. राजवाड्यांनी लिहिलेल्या लेखांचे आणि प्रस्तावनेचे काही खंड शं,ना जोशी ह्यांनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. तसेच धुळ्याच्या संशोधक अंकामधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांनी नुसता इतिहास लोकांसमोर मांडला नाही, तर त्याची त्यांच्या शब्दात कारणमीमांसादेखील केली. जी त्यांनी प्रस्तावना आणि लेखरुपात वेळोवेळी मांडली. राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधणे जमवण्यासाठी केलेला खटाटोप अगदी विलक्षण आहे. अस्सल आणि अमुल्य कागदपत्रे त्यांनी देशाच्या विविध भागातून जमा केली होती आणि त्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ह्याचे काही उदाहरण देण्याचे झाल्यास... महाराजांच्या दक्षिण दिग्विजय ह्या मोहिमे अंतर्गत कर्नाटकात बिलवडी इथे, एका स्थानिक पाळेगर देशमुख बाईने स्वराज्यात सामील व्हावे, म्हणून मराठ्यांनी तिच्या गढीवर हल्ला केला होता. तिने त्याचा कडवा प्रतिकार केला. महाराजांना ही गोष्ट कळल्यावर, त्यांनी देशमुख बाईला बहिण मानून, तिची पुनर्स्थापना केली आणि तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्यानां शिक्षा केली. त्याचे ऋण म्हणून, तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे स्थापन केली. ही माहिती मिळाल्यावर तिथे काही कागदपत्रे नक्की मिळतील, म्हणून राजवाड्यांनी धाव घेतली. ते जेव्हा तिथे पोचले तेव्हा, ती गढी अगदी पडक्या स्वरुपात होती आणि तिथे एक विधवा म्हातारी राहत होती. तिला त्यांनी त्या वळचणीला पडलेल्या कागदपत्रांची मागणी केली. तिला म्हातारीला कळले की त्यात नक्की काही महत्त्वाचे असणार. तिने त्यासाठी नकार दिला आणि त्या कागदांच्या मोबदल्यात राजवाड्यांना स्वतःची धुणीभांडी, स्वयंपाक आणि सेवा करायला लावली. राजवाड्यांनी ती अगदी मनापासून विनातक्रार केली आणि तीन दिवसांनी त्या म्हातारीला लाज वाटून, तिने ती गाठोडी राजवाड्यांच्या हवाली केली. अजून एक प्रसंग सांगायचा झाल्यास, राजवाडे पैठणला किराणामालाच्या दुकानात काही सामानाची खरेदी करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी पहिले की तो दुकानदार ज्या कागदात सामान बांधून देत होता, ती मोडी लिपीतली कागदपत्रे होती. दुकानदाराने त्या "मोडी रद्दीच्या" बदल्यात तितकीच रद्दी मागितली आणि ती राजवाड्यांनी विकत आणून त्या दुकानदारास दिली आणि ते लाखमोलाचे कागद मिळवले. ह्या कागदपत्रांमध्ये सापडलेले महत्वाचे असे काही उल्लेख करायचे झाल्यास - १७५२ ला कनोजला झालेल्या अहमदी तहाची प्रत खंड क्रमांक १ मध्ये प्रसिद्ध केली आहे आणि त्यात मराठ्यांना संपूर्ण हिंदुस्थानच्या चौथाईचा अधिकार आणि मुघल बादशाहने अब्दालीपासून देशाचे रक्षण करायची जबाबदारी मराठ्यांना दिली होती हे नमूद केलेले आहे. तसेच खंड एक मध्ये पानिपतच्या युद्धाच्या आधीची आणि त्या मोहिमेदरम्यान सुरु असलेल्या पत्र व्यवहारातील ३०० पत्रे प्रकाशित केली आहेत. तसेच १७५७ मध्ये शिवनेरी किल्ला मिळवण्यासाठी सलाबतजंगाबरोबर झालेल्या तहाची बोलणी आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. नानासाहेब आणि शाहूमहाराज ह्यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहारदेखील प्रकाशित केला गेला. खंड दोनमध्ये विस्तृत पेशवे शकावली आहे. जंजिरा मोहीम, उदगीर स्वारी, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या संस्थानाची व्यवस्था, वसई किल्ला मोहीम, हसबनीस नियुक्तींची पत्रे, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, संभाजी राज्यांची पत्रे, राजाराम महाराजांची पत्रे, शहाजी महाराजांची पत्रे, असे नानाविध कागद त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या ह्या अपार संशोधन कार्याने प्रेरित होऊन, इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांची एक फळी निर्माण महाराष्ट्रात निर्माण झाली. ज्यामुळे इतिहासावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. हे संशोधन करत असताना १९१० ला पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना राजवाड्यांनी केली. त्यांचा विश्वास होता की कुठल्याही कार्यसिद्धीसाठी संघटना, ही गरजेचीच आणि त्यामुळेच ह्या संशोधक मंडळाची स्थापना झाली. समविचारी माणसे एकत्र आली, की कार्यसिद्धीस लवकर जाते. त्यांनंतर अनेक समविचारी, इतिहासकार संशोधन कार्याकडे वळू लागले. राजवाडे हे एका दीपस्तंभासारखे इतर इतिहासकारांना त्याकाळी प्रेरणा देत राहिले आणि आजही देत आहेत. याच भारतीय इतिहास संशोधक मंडळात आज लाखो मोडी कागदपत्रे पडून आहेत, ज्यांचा अभ्यास करायला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. मोडी जाणकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि काही ५० वर्षांनी कोणी मोडी जाणकार उरणारदेखील नाहीत. तेव्हा ह्या कागदांना काही किंमत उरणार नाही. आज आपण इतिहास विविध संवादाने भरलेल्या कादंबरीरूपाने वाचतो. काही संदर्भ न देता...आपण मोठे जाणते इतिहासकार म्हणून स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेणारे चिक्कार आहेत. त्यांनी लिहिलेला-मांडलेला, हाच इतिहास असे आजच्या पिठीला वाटत आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या १०-१२ आवृत्या सहज खपतात, पण पुराव्यानिशी कागदपत्रांचे दिलेले खंड आवृत्ती क्रमांक १ आजही मंडळात धूळखात पडून आहे, ही मोठी शोकांतिका आहे. नुसते इतिहासात रमून जायला मी सांगत नाही, पण त्या इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अगदी आजच्या जीवन पद्धतीतही. एक छंद म्हणून तरी किमान मोडीचा अभ्यास तरुणाईने केला, तरी खूप झाले असे काकुळतीने बलकवडे सर सांगत होते. हा अभ्यासवर्ग माझ्यासारख्या नवशिक्याला नक्कीच मोलाची माहिती देऊन गेला. एका थोर संशोधकाची, मला झालेली ही आजवरची सर्वोत्तम ओळख आहे. त्यासाठी जनसेवा समिती आणि मान्यवर वक्त्यांचे खूप खूप आभार. डावीकडून - प्रा. मोहनराव आपटे, श्री. निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिव शिवदे आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे डावीकडून - प्रा. मोहनराव आपटे, श्री. निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिव शिवदे आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे[/caption] राजवाड्यांनी केलेल्या अपार संशोधन कार्यामुळे निदान ४५०० पत्रे तरी आपल्याला देवनागरीत लिप्यांतर करून उपलब्ध आहेत. त्यांनी त्यांचे संबध आयुष्य इतिहासाच्या संशोधन कार्याला वेचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी फकिरी घेतली तशीच राजवाड्यांनी राष्ट्रीय स्मृतीसंचालनासाठी तशीच फकिरी घेतली. मराठ्यांच्या इतिहासाच्या या महान भाष्यकाराला आणि एक अद्वितीय संशोधकाला मन:पुर्वक दंडवत !! - सुझे !! -------------------------------------------------------------- लेखन संदर्भ आणि इतर काही महत्त्वाचे १. कार्यक्रमात दिलेली माहिती पुस्तिका [लेखक सदाशिव आठवले] (ही माहिती कौस्तुभ कस्तुरे ह्याने, आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिली) २. मान्यवर वक्त्यांनी त्यांच्या भाषणातून दिलेले विविध संदर्भ. ३. मोडी शिकण्यासाठी काही मदत, मार्गदर्शन हवे असल्यास कौस्तुभशी संपर्क करावा. कौस्तुभचे अजून एक महत्त्वाचे सांगायचे झाल्यास त्याने पेशवाई विषयवार विविधांगी लेखन केले आहे. त्याच्या ब्लॉगवर इतिहासाची सुवर्णपाने इथे उपलब्ध आहे आणि तसेच त्याने असंख्य मोडी पात्रांचे लिप्यांतरदेखील केलेले आहे. जरूर वाचा !! ४. पानिपत ह्या विषयवार अनेक ग्रंथ, पुस्तके आजवर येऊन गेलीत. ह्या विषयावर हल्लीच प्रकाशित झालेले पुस्तक Solstice At Panipat: 14 January 1761 हे उजवे आहे असे निनादरावांनी सांगितले. ५. पानिपतचा महासंग्रमाबद्दल झालेल्या अभ्यासवर्गाच्या काही नोंदी मागे मी ब्लॉगवर इथे दिल्या आहेत. ६. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा ऑनलाईन वाचनास उपलब्ध आहे - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सुरेख लिहिलंयस सुझे. धन्स ह्या लेखाबद्दल. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, महिकावतीचि बखर, राजवाडे लेखसंग्रह अशी काही पुस्तके संग्रही आहेतच.

लेख आवड्ला. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचून इतिहासाचार्यांबद्दल अंमळ वेगलेच मत बनले होते. त्यांच्या विक्षिप्तपणाच्याही अनेक कथा ऐकल्या होत्या. तुम्ही छान ओळख करुन दिली, धन्यवाद !

काही अपरिहार्य कारणा मुळे ह्या कार्यक्रमाला जाता नाही आले. तुमच्यामुळे ती रुखरुख दूर झाली. मनापासून धन्यवाद.

रोचक माहिती आणि दुव्यांबद्दल धागाकर्त्यास धन्यवाद. मराठी विकिपीडियावर मोडी नावाचा लेख आहे. चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी या मोडी वळणांमधील फरका बद्दल अधिक सचित्र माहिती हवी आहे. राजवाडे यांचे छायाचित्र (सौजन्य:इंग्रजी विकिपीडियावर Hsarpotdar1 यांनी चढवलेले छायाचित्र) Rajwwade

राजवाड्यांवरील माहिती आणि कार्यक्रमाचा वृत्तांत वाचनीय आहे. या लेखा बद्दल मनःपूर्वक आभार! पुरंदर्‍यांचे वाक्य आहे का माहीत नाही पण त्यांच्या तोंडून ऐकलेले आहे: "केवळ वेडी माणसेच इतिहास घडवू शकतात..." अर्थात यात वेड हे उपरोधाने म्हणलेले आहे. राजवाड्यांनी इतिहास संकलन ज्या एका असामान्य वेडाने केले होते त्यामुळे त्याचाच त्यांनी एक इतिहास घडवला आणि नंतरच्या इतिहासकारांसाठी मार्ग तयार केला असे वाटते.

राजवाड्यांच्या आयुष्यावर एक छान चित्रपट बनू शकेल...
नाटक बनले होते. आत्ता नाव आठवत नाही.

सुंदर लेखन व सुंदर कथा नायक! धन्यवाद अशी मोलाची माहिती दिल्याबद्दल. मला तर वाटते, ह्या विषयावर नक्कीच एक चांगला सिनेमा होऊ शकतो!

मिपावर असे लेख जास्तीतजास्त यायला हवेत. हिच खरी आपल्या भाषेची सेवा. एका उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या उत्तुंग कार्याचा एक छोटाखानी आलेख बघुन सुद्धा छाती दडपुन जाते. काय अफाट माणसं होती हि. किती प्रचंड कार्य. धुळ्याच्या शं.कृ.देव यांचं समर्थ रामदासस्वामींबाबत कार्य सुद्धा असच प्रचंड आहे. ते समर्थभक्त होते व त्याचा अभिनिवेष त्यांना टाळता आला नाहि हे खरं... पण समर्थ साहित्य कलेक्शन प्रचंड आहे त्यांचं.

+१११ >>>काय अफाट माणसं होती हि. किती प्रचंड कार्य. तंतोतंत!

अवलिया माणसांचं "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" वाचुनच त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रचिती आली होती. अक्षरक्षः डोकं गरगरायला लागलेलं. चांगली माहीती. - वाट्या...

एक जबरदस्त व्यक्तिमत्व होते. असे ऐकुन आहे की स्वैंपाक करण्यात वेळ जाउ नये म्ह्णुन ते भातावर एक वाटीभर मध ओतुन जेवण करत असत. अश्या सेवाव्रती मनुष्याची ओळख करुन देणार्या लेखाबद्दल आभार

अत्यंत विक्षिप्त गृहस्थ होते.त्यांच्या मताच्या विरोधी मत मांडले तर ते काठीने मारीत देखील असत वगैरे त्यांच्या विक्षिप्तपणाच्या काही मनोरंजक कथा दुर्गाबाईंनी एका जाहीर मुलाखतीत सांगितल्या होत्या. अर्थात त्यामुळे त्यांचे मोठेपण आणि त्यांच्या कार्याचे मोल जराही कमी होत नाही. पी एच डी करणार्‍यांसाठी राजवाड्यांनी बराच कच्चा माल अपार कष्ट सोसून जमवून ठेवलेला दिसतो आहे. पण त्यावर काम केले तर मार्गदर्शक (पी एच डी गाईड) मिळणे कठीण. मार्गदर्शक मिळाला तर परीक्षक ते संशोधन स्वीकारणे कठीण. वशिल्याने विद्यापीठातल्या मोक्याच्या जागा भ्रष्टाचारी प्रतिगाम्यांनी अडवणार्‍यांमुळे अशा अस्सल कागदपत्रातून होणारे संशोधन दुरापास्त झाले ही देखील शोकांतिकाच आहे. असो माहितीपर लेखाबद्दल धन्यवाद.

मस्त लेख. या निमित्ताने वि का राजवाड्यांची अजून अनेक जणांना ओळख होतेय हे लै भारी काम झालं. हा माणूस नसता तर मराठ्यांच्या इतिहासाचं काय झालं असतं असं अनेक वेळेस वाटत राहतं. एक मुद्दा मात्र वरील लेखात राहिलाय अन तो महत्त्वाचा आहे असं वाटतं. पेशवाई खालसा केल्यावर त्यांचे सगळे रेकॉर्ड्स हे ब्रिटिशांनी ताब्यात घेतले. ते इतके अवाढव्य होते की ३५०० बैलगाड्या भरून ऐवज झाला. तो त्यांनी पुण्यातल्या पेशवे दफ्तरात ठेवला आणि सुरुवातीला काही जमिनीचे वाद इ. असतील तर त्याचा रेफरन्स घेत असत. पण पुढे ग्रँट डफनंतर नीळकंठराव कीर्तने इ. लोकांपासून 'नॅशनॅलिस्टिक' इतिहासाची सुरुवात झाली आणि जुन्या कागदपत्रांच्या आधारे हे लोक भडकाऊ कैतरी लिहितील अशी भीती ब्रिटिशांना वाटल्यामुळे त्यांनी ते आर्काईव्ह लोकांसाठी बंद करून ठेवले. या आर्काईव्हमध्ये जवळपास ३ कोटी मोडी कागदपत्रे आहेत- त्यांपैकी बहुसंख्य कागदपत्रे अजूनही कोणीही वाचलेली नाहीत. पुढे रियासतकारांनी पेशवा दफ्तरातील काही डॉक्युमेंट्स वाचून त्यांचे ४५ खंड प्रकाशित केले. तरीही अजून कैक डोंगर बाकीच आहेत. रियासतकारांचे सरकारदरबारी वजन तसे होते-जदुनाथांचे ते सहकारी असल्याने त्यांना वशिला मिळाला, पण पुण्यातच राहणारे राजवाडे इ. लोकांसाठी मात्र हा खजिना समोर दिसत असूनही बंद होता. त्यामुळे त्यांची जळजळ व्हायची प्रचंड. रियासतकार विरुद्ध पुणेरी इतिहासकार असे व्यक्तिगत हल्ले तेव्हा जे काही झाले त्याचे मूळ इथे आहे. असो. पण या अडचणीमुळेच राजवाडे कामाला लागले. अख्खा मावळ पिंजून काढला आणि भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. जिथून मिळतील तिथून, जशी मिळतील तशी शेकडो-हजारो-लाखो कागदपत्रे गोळा केली आणि क्रियासिद्धि: सत्त्वे भवति महतां नोपकरणे हे वचन खरे ठरवले. त्यांच्या संशोधनाला फळ आले आणि एक अख्खी संशोधकांची फळी उभी राहिली. आज खुद्द मंडळात १५ ते १६ लाख कागदपत्रे आहेत. त्यांतही अनेक अनपब्लिश्ड आहेत. राजवाड्यांची मते आयुष्यात नंतर बदललेली दिसतात असे शेजवलकरांनी दाखवून दिलेले आहे. कधीकाळी कम्युनिस्ट होऊ घातलेले राजवाडे नंतर सनातनी मताचे झाले हे त्यांनी एके ठिकाणी उद्धरणांसहित सिद्ध केलेले आहे. शेजवलकरांच्या निवडक लेखसंग्रहात त्यांनी राजवाड्यांवर लिहिलेला मृत्युलेख सुंदर आहे. त्यात त्यांनी राजवाड्यांच्या आयुष्याचे सार सांगणारी रॉबर्ट ब्राउनिंग या कवीची 'a grammarian's funeral' ही सुंदर कविता उद्धृत केलेली आहे ती इथे पेष्टवतो. लै मोठी आहे पण अतिशय यथार्थ आहे. A Grammarian's Funeral BY ROBERT BROWNING Shortly after the Revival of Learning in Europe Let us begin and carry up this corpse, Singing together. Leave we the common crofts, the vulgar thorpes Each in its tether Sleeping safe on the bosom of the plain, Cared-for till cock-crow: Look out if yonder be not day again Rimming the rock-row! That's the appropriate country; there, man's thought, Rarer, intenser, Self-gathered for an outbreak, as it ought, Chafes in the censer. Leave we the unlettered plain its herd and crop; Seek we sepulture On a tall mountain, citied to the top, Crowded with culture! All the peaks soar, but one the rest excels; Clouds overcome it; No! yonder sparkle is the citadel's Circling its summit. Thither our path lies; wind we up the heights: Wait ye the warning? Our low life was the level's and the night's; He's for the morning. Step to a tune, square chests, erect each head, 'Ware the beholders! This is our master, famous, calm and dead, Borne on our shoulders. Sleep, crop and herd! sleep, darkling thorpe and croft, Safe from the weather! He, whom we convoy to his grave aloft, Singing together, He was a man born with thy face and throat, Lyric Apollo! Long he lived nameless: how should spring take note Winter would follow? Till lo, the little touch, and youth was gone! Cramped and diminished, Moaned he, "New measures, other feet anon! My dance is finished"? No, that's the world's way: (keep the mountain-side, Make for the city!) He knew the signal, and stepped on with pride Over men's pity; Left play for work, and grappled with the world Bent on escaping: "What's in the scroll," quoth he, "thou keepest furled Show me their shaping, Theirs who most studied man, the bard and sage, Give!" So, he gowned him, Straight got by heart that book to its last page: Learned, we found him. Yea, but we found him bald too, eyes like lead, Accents uncertain: "Time to taste life," another would have said, "Up with the curtain!" This man said rather, "Actual life comes next? Patience a moment! Grant I have mastered learning's crabbed text, Still there's the comment. Let me know all! Prate not of most or least, Painful or easy! Even to the crumbs I'd fain eat up the feast, Ay, nor feel queasy." Oh, such a life as he resolved to live, When he had learned it, When he had gathered all books had to give! Sooner, he spurned it. Image the whole, then execute the parts Fancy the fabric Quite, ere you build, ere steel strike fire from quartz, Ere mortar dab brick! (Here's the town-gate reached: there's the market-place Gaping before us.) Yea, this in him was the peculiar grace (Hearten our chorus!) That before living he'd learn how to live No end to learning: Earn the means first God surely will contrive Use for our earning. Others mistrust and say, "But time escapes: Live now or never!" He said, "What's time? Leave Now for dogs and apes! Man has Forever." Back to his book then: deeper drooped his head: Calculus racked him: Leaden before, his eyes grew dross of lead: Tussis attacked him. "Now, master, take a little rest!" not he! (Caution redoubled Step two abreast, the way winds narrowly!) Not a whit troubled, Back to his studies, fresher than at first, Fierce as a dragon He (soul-hydroptic with a sacred thirst) Sucked at the flagon. Oh, if we draw a circle premature, Heedless of far gain, Greedy for quick returns of profit, sure Bad is our bargain! Was it not great? did not he throw on God, (He loves the burthen) God's task to make the heavenly period Perfect the earthen? Did not he magnify the mind, show clear Just what it all meant? He would not discount life, as fools do here, Paid by instalment. He ventured neck or nothing heaven's success Found, or earth's failure: "Wilt thou trust death or not?" He answered "Yes: Hence with life's pale lure!" That low man seeks a little thing to do, Sees it and does it: This high man, with a great thing to pursue, Dies ere he knows it. That low man goes on adding one to one, His hundred's soon hit: This high man, aiming at a million, Misses an unit. That, has the world here should he need the next, Let the world mind him! This, throws himself on God, and unperplexed Seeking shall find him. So, with the throttling hands of death at strife, Ground he at grammar; Still, thro' the rattle, parts of speech were rife: While he could stammer He settled Hoti's business let it be! Properly based Oun Gave us the doctrine of the enclitic De, Dead from the waist down. Well, here's the platform, here's the proper place: Hail to your purlieus, All ye highfliers of the feathered race, Swallows and curlews! Here's the top-peak; the multitude below Live, for they can, there: This man decided not to Live but Know Bury this man there? Here here's his place, where meteors shoot, clouds form, Lightnings are loosened, Stars come and go! Let joy break with the storm, Peace let the dew send! Lofty designs must close in like effects: Loftily lying, Leave him still loftier than the world suspects, Living and dying.

झक्कास प्रतिसाद. बादवे येवढ्या प्रचंड शोधकार्याला योग्य न्याय न मिळाल्यामुळे कदाचित नैराश्यातून अशा गोष्टी घडल्याही असतील. त्यांच्या विक्षिप्तपणाबद्दल एक गोष्ट अशी ऐकायला मिळाली की त्यांनी महत्प्रयासाने ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन अशी ज्ञानेश्वरीची प्रत/नक्क्ल मिळविली होती. त्यात त्यांच्या मतानुसार ज्ञानेश्वरांच्या काळात संस्कृताचा प्रभाव जास्त असल्याने ळ च्या ऐवजी ल चा वापर जास्त होता याला पुष्टी देणारी अनेक उदाहरणे होती आणि ळ चा वापर नगण्य होता. त्यावरून तत्कालीन इतिहासकारांमधे वादंग झाल्याने चिडून राजवाड्यांनी ती प्रत स्वतःच जाळून टाकली होती. आणि त्यामुळे एक मोठा द्स्तऐवज नष्ट झाला असे सांगितले जाते . असो. त्यांच्या कार्याची दखल आता घेतली जात आहे ही मोठी कौतुकास्पद बाब आहे.

असेलही. पण राजवाड्यांसारखे लोक कितीही झाले तरी हे असे करणे अशक्य. राधामाधवविलासचंपूसारखे काव्य चिंचवडास कुणी कबाडे यांच्याकडून माळ्यावर अडगळीत पडलेले, पाली-उंदरांच्या लेंड्यांत पडलेले अन वाळवीने खाल्लेले असे त्यांनी मिळवलेले आहे. अन्य वस्तूही कशा मिळवल्या हे वरील लेखात आलेले आहेच. त्यामुळे वाद झाले तरी ते प्रत जाळून टाकणे केवळ अशक्य. पुढे राजवाड्यांचे मंडळातील लोकांशीही वाद झाल्यावर त्यांनी धुळ्याला अजून एक मंडळ काढले. तेच हे धुळ्याचे राजवाडे संशोधनमंदिर. कुणीतरी या इतिहासकारांचा इतिहास लिहिला पाहिजे. सुदैवाने बर्‍याच लोकांबद्दल माहिती उपलब्ध आहे. राजवाडे, मिरजेचे वासुदेवशास्त्री खरे, ग.ह.खरे, रियासतकार सरदेसाई, भिलवडीचे मियाँ सिकंदरलाल अत्तार, दत्तोपंत आपटे, वा.कृ. भावे, आज्ञापत्रवाले शं.ना.जोशी, शेजवलकर, वा.सी.बेंद्रे अशी अनेक नावे सांगता येतील. या लोकांनी इतके प्रचंड काम केले म्हणून मराठ्यांच्या इतिहासाबद्दल बरीच विधाने आपण ठामपणे करू शकतो. अशा लोकांमुळेच महाराष्ट्रात अन्य प्रांतांच्या तुलनेत पुराभिलेखागारेही जास्त आहेत. साधारणपणे प्रत्येक राज्यात एक नैतर दोन शासकीय पुराभिलेखागारे असतात. महाराष्ट्रात मात्र शासकीय अभिलेखागारे तब्बल पाच आहेत: मुंबै, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर अन नागपूर या ठिकाणी आहेत. हे सोडून प्रायव्हेट संस्था आहेत त्या आणि वेगळ्याच. भारतात नक्की अशा किती संस्था आहेत आणि त्या कुठे आहेत, तसेच प्रत्येक संस्थेचे नक्की वैशिष्ट्य काय आहे, आणि संस्था कशी आहे याची ओळख करून देणारी एक लेखमाला खरे तर अतिशय आवश्यक आहे.

या आर्काईव्हमध्ये जवळपास ३ कोटी मोडी कागदपत्रे आहेत- त्यांपैकी बहुसंख्य कागदपत्रे अजूनही कोणीही वाचलेली नाहीत.
हे आर्काईव्ह पुण्यात कुठेशी आहे? अजूनही बंदच असतं का आता उघडलंय? पेशवाईतली कागदपत्रं म्हणजे सरासरी २५० वर्षांपूर्वीची असं धरू. अजून किती वर्षं ती टिकतील?

सदर आर्काईव्ह पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात... पेशवे दप्तरात आहेत. तिथे जाऊन विचारणा करता येईल. बलकवडे सर असतात तिथे बराच वेळ...

स्टेशनजवळ साधू वास्वानी चौकात वास्वानी पुतळ्याजवळ आहे. आता स्वातंत्र्यानंतर उघडे असते. जाण्याआधी एक फॉर्म भरावा लागतो. ओळखीचे आहात कुणाच्या तरी इ.इ. वाले शिफारसपत्र असते. तो फॉर्म घेऊन मंडळात गेले तर लोक मदत करतात असे ऐकून आहे. पण स्वतः मी अजून तिथे गेलेलो नाही. एकदा जायचे आहे, पाहू कधी जमते ते. अन सुहास, भारत इतिहास संशोधक मंडळातले आर्काईव्ह अन हे पेशवा आर्काईव्ह दोन्ही वेगळे आहेत. मंडळातले आर्काईव्ह बघायचे असेल तर फापटपसारा तुलनेने बराच कमी आहे कारण तिथे गवर्मेंटचा संबंध णाही.

पेशवाईतली कागदपत्रं म्हणजे सरासरी २५० वर्षांपूर्वीची असं धरू. अजून किती वर्षं ती टिकतील?
योग्य काळजी घेतली तर अजून किमान शंभरदीडशे वर्षे टिकायला काहीच हरकत नाही. दणकट कागद असतो जण्रली. भारताच्या हवामानामुळे कागद युरोपासारखे हजारो वर्षे टिकत नसले तरी पाचेकशे वर्षांपूर्वीची पत्रे मी स्वतः पाहिली आहेत. काही होत नाही, फक्त कोरड्या ठिकाणी सुरक्षित ठेवायचे, वाळवी इ. पासून दूर ठेवले की झाले. अर्थात केमिकल इ. लावले तर अजून काही वर्षे टिकेलही. पण या पत्रांचे वाचन इ. होणे परम आवश्यक आहे. लोक करताहेत बरंच काही, पण ते पुरेसं आजिबात नाहीये. यासाठी परदेशात लोकांनी एक अभिनव मार्ग अवलंबला होता. इजिप्तमध्ये एके ठिकाणी उत्खनन करता करता ग्रीक भाषेतले हजारो कागद सापडले. किमान लाखभर असावेत. आता मूठभर संशोधक ती कागदपत्रे ताब्यात घेणार अन वाचणार, किमान दहाएक वर्षे सहज जाणार आणि काही लोक त्यात फुलटाईम एंगेज राहणार. त्याऐवजी त्यांनी शक्कल लढवली. सर्व कागदपत्रे स्कॅन केली आणि नेटवर अपलोड केली आणि एक क्राउडसोर्सिंग अ‍ॅप तयार केले. त्यात आपल्यासमोर रँडमली कुठलाही कागद येतो वेबसाईट उघडल्यावर. आणि बाजूला अल्फा बीटा गॅमा थीटा सर्व अक्षरे असतात. वरिजिनल पत्रातले एखादे अक्षर आपल्याला वाचून वाटले की अल्फा असेल. तर त्यावर क्लिक करून अल्फा अक्षराची आयकॉन तिथे चिकटवायची. असे करून मग आपले वाचन तिथे सबमिट करायचे. असे अनेक लोक करतील अन मग त्यांचे रिझल्ट्स अ‍ॅव्हरेज औट करून कागदपत्रांचे फायनल अ‍ॅनॅलिसिस करता येईल असा तो एकूण प्रकार आहे. आपल्या इथेही असे करता येईल. किंवा यापेक्षा साधं म्हणजे टॉपला चारपाच लोक, त्यांच्या हाताखाली चाळीसपन्नास लोक अन त्यांपैकी प्रत्येकाने कैक विद्यार्थ्याकडून प्रत्येकी एकेक पत्र वाचून घ्यायचं. इतके केले तरी पाचेक वर्षांत लाखो कागद वाचून होतील. अन एकदा का वाचून झाली की मग फायनल अ‍ॅनॅलिसिस करणे तुलनेने बरेच सोपे. पेशवा दफ्तरापेक्षा कैक पटीने असे मुघल अन राजपूत सत्तांचे डोक्युमेंट आर्काईव्ह बिकानेर येथे आहे. तिथे ८ लाख रुमाल आहेत अन ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज प्रत्येक रुमालात १००० कागद असतात. म्हणजे ८ लाख गुणिले १००० पाहिले तर ८० कोटी कागद झाले. त्याचीही अवस्था अशीच आहे. नाही म्हणायला ग.ह. खरे तिथे एकदा चारपाच महिने आपली टीम घेऊन गेले होते अन १० हजार पर्यंत कागद वाचले होते. पण तो समुद्रातून बादलीने पाणी काढण्याचा प्रकार झाला. आणि हे झाले फक्त शासकीय कागदपत्रांबद्दल. संस्कृत पोथ्या इ. पाहिल्या तर एका अंदाजानुसार भारतभर अदमासे ३ कोटी संस्कृत पोथ्या असाव्यात. पैकी ८० लाख एकट्या राजस्थानात आहेत. त्यांचे संकलन करणारेही थोडेच आहेत. जे आहेत ते जबरी आहेत, तरीही गरजेपेक्षा खूपच कमी आहेत. या क्षेत्रात इतके काम होणे अजून बाकी आहे की सांगता पुरवत नाही. असो. याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.

पण या पत्रांचे वाचन इ. होणे परम आवश्यक आहे. लोक करताहेत बरंच काही, पण ते पुरेसं आजिबात नाहीये.
बॅटमन यांनी सांगीतलेली अ‍ॅप जास्त एलॅबोरेट आहे ती येईल तेव्हा छानच. पण तो पर्यंत आपल्याकडे ऐतिहासिक कागदपत्रे किंवा दस्तएवज बखरी पोथ्या असतील तर स्कॅन पिडिएफ कॉपी चढवण्या करता मराठी संस्कृत फार्सी विकिस्रोत प्रकल्प उत्तम पर्याय आहेत. कारण तेथे युनिकोडीकरणाकरता मुद्रीत शोधनाकरता वर्गीकरणाकरता शोध आणि वाचनाकरता काही उत्तम सुविधा आहेत. नवीन मराठी टायपिंग शिकणार्‍यांनी मराठी विकिस्रोत प्रकल्पाचा उपयोग केला आणि ज्यांना मराठी टायपिंग येते त्यांनी प्रत्येकी १०० जरी टाईप केले तरी बरेच काम क्राऊड सोर्सींग मधून होऊ शकेल. आपल्याकडील ऐतिहासिक दस्तएवज सांभाळणार्‍या संस्थामधील कार्यरत लोक तंत्रज्ञानापासून एकतर दूर आहेत किंवा एखाद्याच विशीष्ट तंत्रज्ञान पुरवठादारावर एवढे अवलंबून असतात की दुसरा कुणी अधीक चांगले तंत्रज्ञान घेऊन गेला तरी त्याला उभे केले जाणार नाही अशी सर्व साधारण स्थिती असते. म्हणजे इंटरनेट आणि स्कॅनींग उपलब्ध झाल्यावरही मंडळी फक्त मायक्रोफिल्मींग आणि तेही कोणा परकीय संस्थेने केलेले इत्यादीवर समाधानी असतात. आणि आर्थीक बजेटची तर सर्वात मोठी बोंब असते.

व्हॉट आर यु सेयिंग डुड ? आयेम स्टन्ड !! पेशवे दफ्तराबद्दल ऐकुन होतो पण .... ३ कोटी संस्कृत पोथ्या ??!! हायला जॉब बिब सोडुन फुल्ल टाईम उतरलो ह्या क्षेत्रात तरीही कमी पडेल ... पण कालिदास / भास / बाणभट्ट ह्यांचे काही ओरीजीनल स्क्रिप्ट हाती लागले तर आयुष्याचे सार्थक होईल ! किंव्वा आचार्यांचे काही नवीन ओरीजिनल साहित्य सापडले तर ... ओह्ह माय ग्वाड ...थ्रिल्ड !!

येस्सार. शेल्डन पोलॉक नामक एक संस्कृतज्ञ आहे त्याच्या अंदाजानुसार इतक्या पोथ्या असाव्यात भारतभर मिळून. खरेच लै कै कै मिळण्याचे चान्सेस आहेत.

भारतातच इतक्या आहेत? मग भारताबाहेर ज्या बर्‍याच पोथ्या गेल्या त्याची काही आकडेवारी आहे का? कारण ब्रिटीश इंडीयामधे देखील बरे संशोधक येऊन पोथ्या संशोधन कार्यासाठी जमवून नेत असत. निनाद बेडेकरांनी एकदा एका उल्लेखात शिवभारताच्या पोथीबद्द्लची माहीती एका जर्मन ग्रंथालयाकडून मिळाल्याचे सांगितले होते. ती पोथी सरस्वतीमहाल ग्रंथालयात असल्याचे त्या जर्मन ग्रंथालयाने कळवले होते ठावठीकाण्यासकट असे ऐकल्याचे नक्की आठवते.

भारताबाहेर असलेल्या भारतीय हस्तलिखितांची-त्यात संस्कृतबरोबर मराठी, हिंदी, कन्नड, तमिऴ, उर्दू, फारसी, अरबी, इ. सर्व घेतले तर एकच एक राउंड फिगर एस्टिमेट मला ठाऊक नाही, पण साधारणपणे धरा की तोही आकडा लाखोंत असेल. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, हॉलंड, अमेरिका या देशांत इंडॉलॉजी हा प्रकार जोरात आहे तस्मात लय हस्तलिखिते आहेत. भारतात जे नाही ते बाहेर मिळण्याची शक्यता कमी आहे पण बाहेर जे आहे ते तुम्हाला विनासायास मिळू शकते, तुमचे रक्त आटवावे लागत नाही. भारतातही सर्व ठिकाणी त्रास होत नाही, पण काही मोठ्या संस्थांमध्ये इतके मूर्खपणाचे नियम आहेत की झक मारली आणि हस्तलिखिताची झेरॉक्स घ्यायला आलो असं वाटतं. यद्यपि मंडळासारख्या काही संस्थांत हा जाच तितकासा नाही.

अनेक वेबसाईटस वर लावलेले कॅप्चा प्रकरण याच प्रकारचे असते. यातून विचित्रप्रकारे स्कॅन झालेल्या शब्दांचे स्पेलिंग क्राऊडसोर्स करून मिळवले जाते असे वाचनात आले आहे.

अगदी अगदी... दोन्हीही प्रतिसाद उत्तम. बॅटमन लिहायचे खूपच होते रे, पण म्हटलं चर्चेतून येऊ देत काही मुद्दे तुमच्यासारख्या जाणकारांकडून :)