Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:
दुर्योधन : महाभारत काय म्हणते ? श्री.मृत्युंजय यांचा दुर्योधनावरील लेख वाचून थोडी निराशा झाली.. रामायण व महाभारत हे आपले नुसते धार्मिक ग्रंथच नव्हेत तर सांस्कृतिक धन आहे. त्यावर आपले विचार अवष्य मांडावेत पण तसे करतांना " ग्रंथात असे आहे पण मला त्यातून हा अर्थ लावावा असे वाटते " असे लिहले पाहिजे. दुर्गा भागवत वा इरावती कर्वे या महाविदुषी देखील हाच मार्ग चोखाळतात. याने दोन गोष्टी साधतात. वाचकाला ग्रंथात काय आहे व मग तुम्हाला काय म्हणावयाचे आहे ते सापेक्ष कळते. नच, तुम्ही मांडता ते ग्रंथात आहेच अशी चुकीची समजुत होऊं शकते. श्री. मृत्युंजय यांच्या लेखातील पुढील विधानांचे पुरावे मला महाभारतात सापडले नाहीत. (संपूर्ण महाभारत, भाषांतर : राजिवडेकर-भानू-दातार आठल्ये ; तपासणारे : उपासानी-अभ्यंकर) मी कलकत्ता प्रत वाचलेली नाही, तेथे असे असेल तर संदर्भ द्यावा) श्री. मृत्युंजय यांनी काही ठाम विधाने केली आहेत व काही ठिकाणी आपली मते दिली आहेत. पहिल्या बाबतीत त्यांनी पर्व-अध्याय यांचा संदर्भ द्यावा व दुसर्‍या बाबतीत ही मते नोंदवतांना त्यानी कशाचा आधार घेतला तेही स्पष्ट करावे. " महाभारतात आधार नसेल तरीही माझे मत " असे म्हणावयासही हरकत नाही. (1) भीष्मांचा आदर्श अंबा-अंबालिका प्रकरणात कसाला लागतो. (२) हजार पापे करणारा युधिष्ठिर (३) more humane म्हणजे नक्की काय ? व त्याचा महाभारतात संबंध काय ? (४) स्वतःच्या पोराचा जीव जायचा वेळ येइतो सर्वांकडे दुर्लक्ष करणारी, कोण ? कशी ? (५) डोके फोडणारा-हातपाय तोडणारा बाल वयातील भीम (६) कौरवांचा एक एक महिन्या नंतरचा ज्न्म (असे फक्त दु:शीलेबद्दल लिहले आहे) ( ७) राजाचा मोठा मुलगा तोच राजा होणार, धृतराष्ट्र राजा केव्हा झाला ? ( ८) युद्धप्रसंगीही दुर्योधनाने कुरुवंशातल्या बहुतेक सगळ्या सदस्यांना आपल्या बाजुने ओढले. हे कोठून आणले ? ( ९) दुर्योधन म्हणजे दु: युधम अर्थात युध्दात जिंकता येण्यास दुर्धर / अवघड असणारा. अर्जुन, अभिमन्यु, सात्यकी, घटोत्कच,... यांच्याबरोबरच्या युद्धात नुसता हरणाराच नाही तर पळून जाणारा जिंकण्यास दुर्धर ? ( १०) प्रजाहितपालक दुर्योधनाचा अधःपात सुरु झाला द्रौपदी वस्त्रहरण प्रकारात. ही सुरवात म्हणावयाची तर बालवयातच भीमाला पाजलेले विष व लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा केलेला प्रयत्न, यांचे काय ? (११ ) द्युतप्रसंगी कर्णाने त्याला द्युतापासुन परावृत्त करण्याचा आणि सरळसरळ युद्ध करण्याचा सल्ला दिला होता संदर्भ ? (१२) योग्य राजकीय खेळ्या खेळुन याद्वांची सेनाच काय तर कृष्णाची चतुरंग सेनाही स्वतःकडे जमा केली. शल्यासारख्या पांडवांच्या आप्तालाही आपल्या बाजुने ओढले. फक्त कृतवर्मा स्वत: कौरवांकडे गेला, अंतर्गत भांडणांमुळे. शल्याची तर चक्क फसवणुक करण्यात आली. याला "योग्य" खेळी म्हणावयाचे ? असो. वरील मुद्दे काढावयाचे कारण जन्म सदाशिव पेठेत गेला. दुर्योधन खलनायकच आहे व त्यात सारवासरवी करण्यास वावही नाही. त्याच्या जमेची बाजूला युधिष्ठिराच्या स्पर्धेतून आलेला, दानशूरपणा. उत्कृष्ट प्रजापालन, दूरदर्शीपणा, धोरणीपणा व नेतृत्व. नमुद करावयास पाहिजे त्याचे अलौकिक धैर्य. श्री. मृत्युंजय यांच्या नजरेतून निसटलेला त्याच्या आयुष्यातील एकमेव दैदिप्यमान क्षण म्हणजे सरोवरातून बाहेर आल्यावर युधिष्ठिराने मूर्खपणाने त्याला सांगितले की "तू आम्हा पाचांपैकी कुणाशीही लढ.’ धर्म, अर्जुन,.नकुल, सहदेव यांचेपैकी कोणीही त्याच्या समोर क्षणभरही जिवंत राहू शकला नसता.. पण त्याने निवडले भीमाला.. जेथे लोकांनी थरकांपावे तेथे त्याने दाखविलेल्या असामान्य धैर्यानेच त्याला सद्गति मिळालेली आहे. शरद
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

>>>वरील मुद्दे काढावयाचे कारण जन्म सदाशिव पेठेत गेला. ह्याची गरज नव्हती. आम्ही सदाशिव पेठ नेमकी कुठली हे सांगू शकत नाही. (सुरु कुठे होते नि संपते कुठे ते) तरीही मत तुमच्यासारखंच आहे. प्रचंड प्रतिभा नि शब्द संपदेच्या जोरावर माणूस काहीही लिहू शकतो. मात्र ते एक 'नवं लिखाण' होतं. मूळ संहिता तीच राहते. आमच्याकडं लोक त्यांच्या कामांची बिलं घेऊन येतात. काहीही क्लेम असतात. आता कुणाला सांगावं? पेन त्याचं, कागद त्याचा, डोकं त्याचं... लिहीतो काहीही. पण म्हणून काम काम असतं. क्लेम क्लेम असतो. चालायचं. एकदा मोदी हिंस्त्र, जातीयवादी नि हिटलर ठरवला की तो तसाच असतो. विषय संपला. -खवचट ;) प्यारे

त्याच्या जमेची बाजूला युधिष्ठिराच्या स्पर्धेतून आलेला, दानशूरपणा. उत्कृष्ट प्रजापालन, दूरदर्शीपणा, धोरणीपणा व नेतृत्व.
हे वाचुन कोण नजरेसमोर येतो ?? विनोद१८

माझ्या परीने ह्यातल्या काही प्रश्नांची महाभारतातील संदर्भासहीत आणि काही संदर्भाशिवाय उत्तरे.
(1) भीष्मांचा आदर्श अंबा-अंबालिका प्रकरणात कसाला लागतो.
भीष्माने स्वतःसाठी जरी अंबा, अंबिका, अंबालिकेचे हरण केले नसले तरी त्या प्रकरणात स्वयंवरातील इतर राजांकडून भीष्माला बोल लागलेलाच आहे. अगदी काही राजे तर हा म्हातारा आपले शुभ्र केश, सुरकतलेला चेहरा घेऊन येथे कशाला आला आहे शिवाय हा ब्रह्मचर्याव्रताचे निष्ठेने पालन करतो यची किर्ती आज धुळीस मिळाली म्हणायची असेही भीष्माला म्हणालेले आहेत.
(२) हजार पापे करणारा युधिष्ठिर
ह्यात मुख्यतः स्वतः दास असताना द्रौपदीला पणाला लावणे, अर्जुनाने जिंकलेल्या द्रौपदीला पाचांची पत्नी करण्यास आग्रह दर्शवणे आणि नरो वा कुञ्जरो वा हे उल्लेख असावेत.
(५) डोके फोडणारा-हातपाय तोडणारा बाल वयातील भीम
भीमाने आपल्या अफाट ताकदीच्या बळावर कौरवकुमारांना त्रास द्यायला सुरुवात केली याचे महाभारतात लै उल्लेख आहेत. अगदी त्यांचे केस ओढत ओढत फरफटत बुक्क्या मारत नेणे, त्यांना आपल्या बगलेत दाबून त्यांचा जीव अर्धमेला होईतो पाण्यात बुडवणे, मुले झाडावर फळे तोडण्यास चढली असता झाड गदागदा हलवून फळांसकट पोरांना झाडावरून खाली पाडणे.
(६) कौरवांचा एक एक महिन्या नंतरचा ज्न्म (असे फक्त दु:शीलेबद्दल लिहले आहे)
सहमत
( ७) राजाचा मोठा मुलगा तोच राजा होणार, धृतराष्ट्र राजा केव्हा झाला ?
पांडूनंतर धृतराष्ट्राच्या अभिषेकाचा जरी प्रत्यक्ष उल्लेख महाभारतात नसला तरी राजा मात्र तोच झाला होता. ह्याचे कैक उल्लेख महाभारतात आहेत. उदा. पांडवांना वारणावतात जाण्याची अनुज्ञा देणे, हस्तिनापुराची फाळणी करून खांडवप्रस्थ पांडवांना देणे, द्युताचे आमंत्रण, शेवटी भीमार्जुनांच्या प्रतिज्ञेने भयभीत होऊन द्रौपदीने तीन वर प्रदान करून पांडवांची दास्यमुक्ती. युद्धारंभी विदुर, भीष्म, कृष्ण यांछे धृतराष्ट्राला समजावणे व दुर्योधनापुढे हतबल असल्याची राजाची बतावणी.
( ८) युद्धप्रसंगीही दुर्योधनाने कुरुवंशातल्या बहुतेक सगळ्या सदस्यांना आपल्या बाजुने ओढले. हे कोठून आणले ?
कुरुवंशावतील बहुतेक सर्वच सदस्य कौरवांच्या बाजूने लढले. शांतनुचा बंधु बाल्हिक, त्याचा पुत्र सोमदत्त, पौत्र भूरीश्रवा हे त्यातले काही प्रमुख योद्धे. पांडवांच्या बाजूला कुरुवंशातले युयुत्सु सोडून कुणीच नव्हते.
( ९) दुर्योधन म्हणजे दु: युधम अर्थात युध्दात जिंकता येण्यास दुर्धर / अवघड असणारा.
तसेही महाभारतात अर्जुन सोडून कुणीच अपराजित नाही. त्यामुळे ह्या पदव्या तशा फक्त नामापुरत्याच.
(११ ) द्युतप्रसंगी कर्णाने त्याला द्युतापासुन परावृत्त करण्याचा आणि सरळसरळ युद्ध करण्याचा सल्ला दिला होता संदर्भ ?
माझ्या मते हा उल्लेख महाभारतात नाही. घोषयात्रेप्रसंगावेळच्या दुर्योधनाच्या लज्जास्पद पराभवानंतर प्रायोपवेशन करू पाहणार्‍या दुर्योधनाला कर्ण परावृत्त करतो आणि युद्ध करून जिंकायचा सल्ला देतो असे काहीसे आहे.
(१२) योग्य राजकीय खेळ्या खेळुन याद्वांची सेनाच काय तर कृष्णाची चतुरंग सेनाही स्वतःकडे जमा केली
कृष्णाच्या स्वतःच्या नारायणी चतुरंग सेवेचा उल्लेख हा नक्कीच प्रक्षिप्त आहे. ह्या सेनेचा उल्लेख नंतर अगदी पुसटसा येतो अगदी जेमतेम एक दोनच ठिकाणी. प्रमुख यादवांनी आपापले मैत्रभाव स्मरून कौरवपांडवांची बाजू पत्करली. कृतवर्म्याचे कृष्णाशी तसेही स्मयंतक मणी प्रकरणापासून काहीसे शत्रुत्वच होते तसेच तो बलरामाच्या बाजूचा. साहजिकच तो आपल्या भोजवंशीयांसकट दुर्योधनाकडून लढला तर सात्यकी हा अर्जुनाचा शिष्य आणि कृष्णाचा परमभक्त. साहजिकच शिनीकुलाने पाण्डवांची बाजू घेतली. बाकी महाभारतानुसार दुर्योधन पूर्णपणे खलनायकच होता ह्यात कसलीही शंका नाही.

महाभारतानुसार दुर्योधन पूर्णपणे खलनायकच होता ह्यात कसलीही शंका नाही.
असहमत. मी महाभारताचा अभ्यासक नाही. पण जेवढं वाचलंय आणि ऐकलंय त्यावरून मलातरी तो खलनायकापेक्षा महाभारताचा बळी(victim) जास्त वाटतो. आधी कर्ण वाटायचा. पण आता नाही वाटत.

:) ज्याला जसे वाटेल तसे. बाकी पांडवाना राज्य मिळूनही साध्य काहीच झाले नाही. युधिष्ठिर सर्वकाळ पश्चातापाच्या आगीत जळतच राहिला.

महाभारताबाबत्च काय तर एकुणच सगळ्याच पौराणिक पात्रांबाबत कल्पनारंजन करुन कादंबर्‍या लिहिण्याची फॅशन आल्याने हे सारे झाले आहे ... मागे एके ठिकाणी झोपेत असलेल्या पांडवपुत्रांची हत्या करणार्‍या ...इतकेच नव्हेतर अजुन जन्मालाही न आलेल्या गर्भावार सश्त्र चालवणार्‍या अश्वस्थाम्याबद्दल सहानभुती पुर्वक उल्लेख ऐकले आहेत ( एक नमर्दा परिक्रमा वासी तर "पवित्र आत्मा" असा उल्लेख करत होता त्याचा ) शुर्पणखेला एकाने मस्त रंगवुन "बिचारी " ह्या नोट वर पुढे आणले होते ... तर एक जणाने बली राजावर वामनाने कसा अन्याय केला ह्यावर प्रवचन झाडत होता (शिवाय त्याला आर्य वि. द्रविड असा मसाला आहे )...किंव्वा रामाने वालीला मारणे कसे अन्याय्य आहे ह्यावर बरेच लोक बोलतात आणि मृत्युंजय ह्या कादंबरीने तर कहर केला ... एक मैत्रिण कर्णावर कसा अन्याय झाला ह्यावर तावातावाने बोलत होती .. ( माझा माहीती नुसार वस्त्रहरण प्रसंगात प्रोवोक करणार्‍यात कर्णच पुढे होता ...एक स्त्री त्याची बाजु घेतीये हे पाहुन मला हसु का रडु असे झाले होते ) काळानुसार आणि मेजॉरीटी नुसार न्याय्य अन्याय्यच्या व्याख्या बदलत रहाणार ....काय सांगता , उद्या कोणी संपुरण महाभारतच हे "कौरवांच्या बाबतीत क्रुर व अन्यायी आहे आणि खरे दुष्ट पांडव आणि कृश्णच होते" असे रीव्हाईझ करुन लिहिल .... अस्तु ||तुका म्हणे उगी रहावे| जे जे होईल ते ते पहावे ||

रामायण व महाभारत हे आपले नुसते धार्मिक ग्रंथच नव्हेत तर सांस्कृतिक धन आहे. त्यावर आपले विचार अवष्य मांडावेत पण तसे करतांना " ग्रंथात असे आहे पण मला त्यातून हा अर्थ लावावा असे वाटते " असे लिहले पाहिजे..............................................वाचकाला ग्रंथात काय आहे व मग तुम्हाला काय म्हणावयाचे आहे ते सापेक्ष कळते. नच, तुम्ही मांडता ते ग्रंथात आहेच अशी चुकीची समजुत होऊं शकते.
या विचाराशी अतिशय सहमत झालो आहे!

कशाला डोक्याला शॉट लावून घेताय. मुळात महाभारत खरंच घडलं होतं की ते एक मुळच्या जय नावाच्या काव्याचं अनेकांनी भर टाकून तयार झालेलं महाकाव्य आहे इथपासून शंका आहेत.

कशाला डोक्याला शॉट लावून घेताय.
कारण त्याचे समाजमनाशी धार्मीक, सांस्कृतीक व अध्यात्मीक नाते जडलेले आहे. हॅरि पॉटर बद्दल असा शॉट लावून घ्यायची मात्र गरज नाही.

कारण त्याचे समाजमनाशी धार्मीक, सांस्कृतीक व अध्यात्मीक नाते जडलेले आहे.
या नात्याची चाचपणी करुन ते अनावश्यक असेल तर तोडणं उत्तम नाही का? उगाच आपलं काव्याचा काव्य म्हणून आस्वाद न घेता त्याचा सांस्कृतिक वारसा म्हणून फुकाचं लोढणं गळ्यात बांधण्यात काय हशिल आहे?

>>> या नात्याची चाचपणी करुन ते अनावश्यक असेल तर तोडणं उत्तम नाही का? कोण ठरवणार? >>> उगाच आपलं काव्याचा काव्य म्हणून आस्वाद न घेता त्याचा सांस्कृतिक वारसा म्हणून फुकाचं लोढणं गळ्यात बांधण्यात काय हशिल आहे? नेमकं काय टोचतंय? ;)

नेमकं काय टोचतंय?
माहितीच्या जंजाळात ज्ञानाची प्रचिती पारखी झाली, ही टोचणी पुरेशी नाही काय ? मुळात ते टोचतय हीच फार चांगली गोष्ट आहे.
उगाच आपलं काव्याचा काव्य म्हणून आस्वाद न घेता त्याचा सांस्कृतिक वारसा म्हणून फुकाचं लोढणं गळ्यात बांधण्यात काय हशिल आहे
कृपया विषय भरकटवु नये. मी मुळ काव्यातुन वैयक्तीक अर्थ-अनर्थ लादु नयेत इतपतच सहमत आहे. ज्याला जे इंटप्रीट करायचे आहे त्यासाठी तो मो़कळाच आहे मी स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तिव्र पुरस्कार करतो पण वैयक्तीक मते ही वैयक्तीक आहेत त्याच्याशी मुळ संहीता सहमत आहेच असे अजिबात नाही हे डिस्क्लेमर जरुर असावे इतपतच माझा मुद्दा होता. मला वाटते मुळ मुद्याचे चुकिचे (न्हवे वैयक्तीक) इंट्रप्रिटेशन कसे गैरसमजावर आधारीत असते प्रसवण करते, याचा आपला प्रतिसाद हा एक अजुन चांगला पुरावा ठरावा. जो माझ्या महाभारतासारख्या काव्याच्या बाबतीतल्या मुलभुत आग्रहाला अजुन बळकटी आणतो.

एखादे काव्य आहे तसे स्विकारुन लागतो की त्याचे वैयक्तीक इंटरप्रिटेशन करताना जास्त लागतो (अनुकुल विरोधी हा वेगळा मुद्दा आहे) याचा धनाजीरावांनी तसे म्हणण्यापुर्वी नक्किच विचार करणे अपेक्षित आहे.

एखादी सुंदर गोश्ट आपण केमिकल लोच्या झाल्यावर प्रसवता असे आपण म्हटले आहे... मग ते सखुचे सामान असो की मुक्ताइचे अभंग. परिणामी आपण एखादी गोश्ट आपल्या इछ्चेवर नियंत्रीत न करता इतर काही तरी प्रभाव आपली इछ्चा नियंत्रीत करु देता. ज्यातुन आपल्या केमीकल लोच्याची भरती ओहोटी होत असते परीणामी आपण दिवाळी अंकासाठी लेखन करु शकत नाही :(. आपला केमीकल लोच्या खरा ज्ञानाचा परिस आहे जो मुग्धकरणारे विचार प्रसवतो पण त्याची भरती ओहोटी मात्र याच विचारांवर असलेला डळमळीत विश्वास प्रकट करतात. थोडक्यात आपल्याच विचारांवर आपला विश्वास पुरेसा नाही म्हणुन आपल्याला डोक्यातील केमीकल लोच्याची (ज्ञानाच्या परिस स्पर्शाची)वाट बघावी लागते व लेखन करावे लागते. थोडक्यात आपल्याकडे लिखाणाची क्षमता आहे (माहितीचा खजीना/जंजाळ) पण ज्ञान मात्र येजा करते... थोडक्यात ते स्थिर नाही. म्हणजे जी गोश्ट छान तर आहे पण पुरेशी उपल्ब्ध नाही. हे वाटणे मानवी स्वभाव आहे पण त्याचे प्रकटन प्रस्तुत नाही म्हणून ते "टोचणी" संबोधले जाते.

आपल्यासारखा प्रकांड पंडीत मी कुठल्या प्रतिसादात काय लिहिले हे लक्षात थेवतो हे कळल्यानंतर माझ्या अंगावर मुठभर मास चढले. असो. थोडीशी सुधारणा करतो, मी माझे लेखन प्रासंगिक असते असं म्हटले होते. एखादी सुंदर गोश्ट आपण केमिकल लोच्या झाल्यावर प्रसवता असे आपण मी कुठेही म्हटले नाही. जे मी लिहिलेच नाही ते वाचण्याचा प्रयत्न करु नये ही नम्र विनंती. अधिक काय लिहिणे, आपण सुज्ञ आहात.

आपल्यासारखा प्रकांड पंडीत मी कुठल्या प्रतिसादात काय लिहिले हे लक्षात थेवतो हे कळल्यानंतर माझ्या अंगावर मुठभर मास चढले.
पुरेसे नाही.
एखादी सुंदर गोश्ट आपण केमिकल लोच्या झाल्यावर प्रसवता असे आपण मी कुठेही म्हटले नाही.
खात्री आहे ?

मत मतांतरे दुसरे काय? पण धागाकर्त्याच्या,"रामायण व महाभारत हे आपले नुसते धार्मिक ग्रंथच नव्हेत तर सांस्कृतिक धन आहे." या वाक्याशी सहमत.

फुकाच्या लोढण्याबद्दल सहमत आहे. त्याचा काव्य म्हणून आस्वाद घ्यावा, त्याचा प्रभावही अप्रीशिएट करावा. पण मग त्यातला सर्वच भाग डोळस नजरेने पहावा. राम वैग्रे लोक अरण्यात काय अन अयोध्येत काय, दाबून नॉनव्हेज 'वडत' असताना व्हेजची टिमकी वाजवणे, मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे.

चर्चा जरा ट्रॅकवर ठेवा राव! शरद म्हणत आहेत की मूळ महाभारतात असे संदर्भ नाहीत. ठीक आहे ना! महाभारताच्या खूप संहिता वापरात आहेत. सगळ्यात वेगवेगळं काही ना काही सापडेल. तेही ठीक. प्रत्येकजण आपल्या प्रतिभेने त्यात भर घालतो. महाभारतातलं कोणतेही पात्र एखाद्या प्रसंगी तसं का वागलं असेल यावर कारणं शोधतो. तेही ठीक आहे. पण त्याचवेळी मूळ प्रमाण महाभारत म्हणून जे काही मानलं गेलंय त्यात असं असं लिहिलंय हे माहित असावं असं वाटणं काही चूक नाही. धृतराष्ट्र अभिषिक्त राजा कधीच नव्हता. त्यामुळे दुर्योधनाचा राज्यावर दावा कधीच योग्य म्हणता येणार नाही असं मीही वाचलं आहे. पंडु वनात गेल्यावर त्याचा विश्वस्त म्हणून धृतराष्ट्राने रामाच्या भरताप्रमाणे राहणे अधिक उचित ठरले असते. कारण पंडुने संन्यास नक्कीच घेतला नव्हता आणि कशीही असोत त्याला मुले पण झाली होती. त्यामुळे धृतराष्ट्राचा राज्यावर हक्क राहिलाच नव्हता. अर्थात पंडुने किंवा पांडवांनी रामाप्रमाणे राज्याची वाटणी केली असती तर काही प्रश्न नव्हता. अर्थात महाभारत हे रामायण नव्हे! त्यामुळे त्यात हाडामांसाची वाटणारी सर्व गुणदोषांनीयुक्त माणसे आपल्याला बघायला मिळतात. आधीच्या प्रथा आणि आदर्श बाजूला ठेवून वेगळेच काही घडलेले महाभारतात अनेक जागी वाचायला मिळते.

शरदराव, मनातले बोललात. दुर्गाबाईंबद्दल कितीही आदर असला (भावमुद्रा वगैरे वाचल्यानंतर) तरीही व्यासपर्वाने मात्र फार निराशा केली. त्यातले लेख अत्यंत रूक्षपणे लिहीलेले वाटले. प्रसंगी कृष्ण आणि द्रौपदी यांच्याबद्द्लचे लेख तर खोडसाळपणाचा वास येतील असेच आहेत. ( (म्हणजे कृष्ण-द्रौपदी संबंधांचे वर्णनात कृष्णसख्या सख्या पेक्षा ठोक्या जास्त आहे असा दर्प जाणवतो) )परंतु प्रचंड वाखाणण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचा अभ्यास आणि व्यासंग. असो या लेखामुळे असा विचार करणारा मी एकटाच नाही असे वाटले.

व्यासपर्वात काय आहे ते ठौक नाही, पण कादंबर्‍यांत मात्र या नात्याचे जास्तच ओव्हरबोर्ड इ. जाऊन चित्रण केलेय असे वाटते. म्हणजे द्रौपदीच्या तोडीचा एकच पुरुष अन तो म्हणजे कृष्ण असे काहीसे. ते अंमळ खटकलं होतं. असो.

रामायण आणि महाभारत हे दोन्ही माझ्या मते काल्पनिक होते. एवढं संशोधन वगैरे करून काय साधतं हा मला पडलेला प्रश्नच आहे. त्यात ऊर्जा, वेळ, पैसा खर्च करून काय साध्य होणार आहे? पुराण, इतिहास भविष्य घडवण्यासाठी वापरावे पण संशोधनावर वर्तमानातली ऊर्जा खर्च करून, वितंडवाद घालून काही साध्य होत असेल असे वाटत नाही. असो. हे एक माझे मत; चुकीचे असू शकेल. मला राजू श्रीवास्तवच्या एका विनोदी सादरीकरणातला प्रसंग आठवला. मुंबईमधले भाई गुन्हेगारी सोडून सत्संगाचा व्यवसाय करायचे ठरवतात. कमी कष्टात भरपूर पैसा आणि मान मिळवून देणारा तो एकमेव व्यवसाय आहे असे त्या गुंडांचे मत असते. एक स्टेज बांधून आणि बंदूकधारी गुंड जागोजागी बसवून मुख्य भाई प्रवचन सुरु करतो. त्यांची नावे पण विचित्र असतात. बाबू जलेला, पप्पू काणा, बबन कुर्ला अशी. मुख्य भाई सुरु करतो, "प्रथम अध्याय शुरु कर रेला हूं...जब द्रौपदी का चीर हरण होरेला था, द्रौपदी प्रार्थना करेली थी...कुंभकर्ण द्रौपदी का चीर खिंच रहा था पर चीर था की खतम होने का नाम ही नही लेरेला था...क्युंकी द्रौपदी की रक्षा कर रहे थे सुदर्शनचक्रधारी भगवान गणेश...". एक भक्त उठतो आणि म्हणतो, "क्षमा कीजिये महाशय, वह कुंभकर्ण नही थे, दु:शासन थे और द्रौपदी की रक्षा भगवान गणेश ने नही, भगवान कृष्ण ने की थी, महाभारत मुझे कंठस्थ है..." नंतर भाई त्या अभ्यासू श्रोत्याला मागे बोलावून घेतो आणि विचारतो, "द्रौपदी का चीर हरण दु:शासन के बदले कुंभकर्ण करेंगा तो तेरे बाप का क्या जायेंगा?" आणि मग त्या श्रोत्याची धुलाई होते हे सांगणे न लगे! :-) अतिशयोक्ती आणि विनोद सोडले तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ;-) बाकी राजू श्रीवास्तवने काही काही प्रसंग छान रंगवले आहेत. बातम्या वाचणारी तर्‍हेवाईक माणसे, मोठ्या लग्नात जेवणाची होणारी गंमत वगैरे प्रसंग खूप गंमतीदार आहेत. युट्युबवर आहेत. अवश्य बघा.