Welcome to misalpav.com
लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:
काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही आजची मराठीतील आघाडीची जोडी! 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका, 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट तसे छान हलके-फुलके आणि नर्मविनोदी वाटले होते. 'मुंबई-पुणे-मुंबई' तर छान निवांत चित्रपट वाटला होता. थोडा संथ होता पण पुण्यातल्या भांडारकर रस्त्यावरचे क्रिकेट खेळतांनाचे प्रसंग, सिंहगडावरील प्रसंग, रेल्वे स्टेशनवरील प्रसंग आणि चित्रपटाचा एकूणच निवांतपणा असे सगळे खूप छान वाटले होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी खूप छान अभिनय केला होता. हा अनुभव जमेस असल्याने आम्ही 'मंगलाष्टक वन्स मोअर' मोठ्या आशेने सुरु केला. वाटले आता दोन तास जरा मनाला तजेला देणारं, थोडं निखळ हसवणारं असं काहीतरी खुमासदार बघायला मिळेल. आधी मला वाटलं की या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडेच आहेत. त्यामुळे मी निर्धास्त होऊन चित्रपट सुरु केला. आणि जांभया देत देत कसाबसा संपवला... आरती (मुक्ता बर्वे) आणि सत्या (स्वप्नील जोशी) हे एक तरुण जोडपं. सत्या रेडिओ मिर्ची मध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो आणि आरती सत्याची 'मॅनेजर' म्हणून काम करते. त्यांचं भलंमोठं घर असतं. (एवढं मोठं घर कसं काय परवडतं देव जाणे; आम्ही तर टिचभर घराचा खर्च भागवता भागवता इंचभर मरतो रोज) सत्या सकाळी ऑफीसला जातांना नेहमी त्याचे इस्त्री केलेले कपडे, रुमाल, मोबाईल, वगैरे सगळं त्याच्या बेडवर तयार असतं. हे बहुतेक सगळ्या नवर्‍यांचं स्वप्न असतं. पण फार थोड्या नशीबवान नवर्‍यांवर देव, नियती, लेडी लक, वगैरे सगळे एकदम प्रसन्न होतात. एरवी...जाऊ द्या; उगीच कशाला कुणाला दुखवा. तर सत्या बाथरूममधून बाहेर आला की त्याचा नाश्ता, चहा-कॉफी टेबलवर तयार असतं. हे ही एक स्वप्नच! कमीत कमी पाच वेळा ओरडून झाल्याशिवाय नाश्ता हातात दिला तर तमाम सांस-बहू मालिकांमधल्या सांस-बहूंचे तळतळाट लागतील असा साधारणपणे बायकांचा समज असतो. सकाळी जाग आल्यानंतर सत्याने थोडं जरी 'ऊं आं' केलं किंवा डोळ्यांची दोनपेक्षा अधिक वेळा उघड-झाप केली की आरतीचा जीव टांगणीला लागतो. मग ती त्याला, "काय होतय राजा? बरं नाही वाटत आहे का? गोळी घेतोस का? जाऊ दे, सुटी घेऊन आराम कर, राजा" असं चेहर्‍यावर शंभरदा हात फिरवून विचारते-बजावते. रात्री एकदा सत्या थोडा वैतागलेला असतो. चिडून तो "माझ्या छातीत जळजळतंय" असं आरतीला म्हणतो. आरती लगेच त्याची शांत झोप लागण्यासाठीची सीडी लावते आणि त्याला छान पांघरूण घालून झोपी घालते. मग सत्या अंगठा चोखत चोखत झोपी जातो! तर असं हे बाळबोध कुटुंब! सत्याला हे सुख मानवत नाही. आरती त्याला नेहमी त्याच्या बीयर पिण्यावरून टोमणे मारत असते. आपल्या सगळ्या मैत्रिणी, सत्याचे बालिश मित्र आणि जो कुणी भेटेल तो फक्त आपल्याच संसाराची चिंता करण्यासाठी जन्माला आलेला आहे असा आरतीचा घट्ट समज असल्याने ती जो भेटेल त्याला आपण सत्याची कशी नीट काळजी घेतो हे पुराण ऐकवून पकवत असते. त्याच्या तथाकथित बीयर पिण्याबद्दल आणि निष्काळजीपणाबद्दल मुक्ताफळं उधळून आपण आहोत म्हणूनच कसं त्याचं व्यवस्थित चालू आहे हे पटवून देण्यात तिचे दिवस जात असतात. या दोघांना मूल होत नसल्याने वैद्यकीय उपाय सुरु असतात हा अजून एक वेगळाच ट्रॅक! डॉक्टरचं म्हणणं असतं की नुसता फिजीकल काँटॅ़क्ट वाढवून उपयोग नाही; मने देखील जुळली पाहिजेत. आरती अगदी मनापासून मने जुळवण्याचा प्रयत्न करते. तिचे सत्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवणे वाढते (काँटॅक्ट वाढवणे म्हणजे हेच वाटत असावे बहुधा तिला); त्याचं वजन मोजून त्याने योगा आणि सायकलिंग करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगण्याची फ्रि॑क्वन्सी वाढते; प्रत्येक वाक्यागणिक 'राजा' म्हणणे मळमळ होण्याइतपत वाढते. "असं रे काय करतोस राजा", "आलेच रे राजा", "तिथेच असेल ना ते राजा", "सायकलिंग करत जा बरं राजा" असं सतत 'राजा राजा' ऐकून आपल्याच मस्तकात तिडीक जाते. सत्याच्या ऑफीसमधल्या कामात खूप टेंशन असते. त्याचं सेल्स टारगेट एक कोटी रुपयांचं असतं. त्याची बॉस शालिनी (सई ताम्हणकर) खूप जास्त अग्रेसीव्ह आणि भडक डोक्याची असते. सई ताम्हणकरचा असल्या भूमिकांमध्ये हातखंडा आहेच. आणि आरतीसारख्या काकूटाईप व्यक्तिरेखेला बॅलन्स करण्यासाठी शालिनीसारखी बेबटाईप व्यक्तिरेखा असणं हे आपण ख्रिस्तपूर्व काळापासून बघत आलो आहोत. तीच शिळी विटकी खिचडी पुन्हा इथे आहेच. या सगळ्या प्रकाराला सत्या आधीच वैतागलेला असतो. एक दिवस त्याचं आणि आरतीचं भांडण होतं. आरती सत्याला फक्त मनेच जुळण्याचं महत्व सांगत असतांना "सत्याचा स्फोट" होतो. "नुसती मने जुळून उपयोग नाही; फिजीकल काँटॅक्टदेखील व्हायला हवा असं डॉक्टर म्हणतात पण फिजीकल काँटॅक्टसाठी माझी बायको असते कुठे?" असा सत्याचा उद्रेक झाल्यावर आरती वेड्यासारखी पुन्हा पुन्हा त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवायला लागते (पुन्हा तेच). शेवटी त्याचा कडेलोट होतो आणि तो तिला घराबाहेर काढतो. टिपीकल मराठी कादंबरीच्या नायिकेसारखं आरतीचं 'सैरभैर होणं' 'उध्वस्त होणं' 'उन्मळून पडणं' 'कोलमडून पडणं' वगैरे सगळं यथासांग होतं. मध्येच एक चोर तिची पर्स चोरून पळून जातो. त्याचा राग ही सैरभैरवी एका वॉचमनला दगडं मारून काढते. तिचं कोलमडून वगैरे पडणं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा केविलवाणा आणि थातूर-मातूर प्रयत्न! सत्याचा कडेलोट का होतो ते ही खरं म्हणजे नीटसं उलगडत नाही. तो का कोलमडून पडतो ते ही कळत नाही. बालिश बायका सांभाळणारे काही कमी नाहीत या जगात आणि बीयर बेली मिरवणारे नवरे देखील कमी नाहीत. पण चित्रपटात कोलमडणं वगैरे असलं की चित्रपटाला वजन येतं असाच अजून मराठी दिग्दर्शकांचा समज असावा बहुतेक. जितकं कोलमडणं आणि पिचलेलं असणं जास्त तितका क्रिटीकल अ‍ॅक्लेम जास्त! पुरस्कार जास्त! आणि मग "मराठी सिनेमा कात टाकतोय" छाप लेखांचा अजीर्ण होण्याएवढा रतीब सुरु!! हे ही आता शिळं झालंय. गेली १५ वर्षे मराठी चित्रपट अजून कातच टाकतोय. अरे हा साप मोठा तरी किती? एवढी मोठी कात आहे याची? जमाना दिवसागणिक बदलतो आणि मराठी चित्रपट मराठी माणसासारखाच आळसावत पडलाय असे तर वाटत नाही ना? नवनवीन विषयांवर चित्रपट काढून मानवी मनाचा थांग-बिंग आणि धांडोळा-बिंडोळा घेणारे मराठी चित्रपट आता बघवत नाहीत. 'जोगवा' '७२ मैल एक प्रवास' 'मी सिधूताई सपकाळ बोलतेय' 'मला आई व्हायचंय' वगैरे चित्रपटांची पोस्टर्सदेखील बघायची भीती वाटते ती याच कारणांमुळे. एक समस्या घ्यायची आणि प्रेक्षकांना रड-रड रडवायचं फक्त हेच मराठी सिनेमामधले 'धांडोळा'छाप चित्रपट करत असतात. साहजिकच गल्ला रिकामा जातो आणि पोस्टरच्या वरची थोडी जागा चार-दोन फुटकळ पुरस्कारांनी भरते. 'द शॉशँक रीडींप्शन' एका निरपराध बॅक अधिकार्‍याला तुरुंगात २० वर्षे कसे खितपत पडावे लागते आणि तो कशी स्वतःची सुटका करून घेतो याची कहाणी आहे. मजाल आहे की चित्रपट कुठे कंटाळवाणा, बापुडवाणा, ठिगळं लावलेला, आणि रडका वाटेल! तिच गत 'शिंडलर्स लिस्ट'ची. इतक्या महाभयंकर आणि क्रूर अत्याचाराच्या कहाण्या क्वचितच कुठे सापडतील. पण ३.१५ तास चित्रपट खिळवून ठेवतो की नाही? पण मराठी सिनेमा अजून हृदय पिळवटून टाकण्याच्या भानगडीतच गुंतलेला आहे. असो. इकडे सत्या मात्र कूल असतो. म्हणजे थोडक्यात आता नेमकं काय करायचं हेच त्याला (दिग्दर्शक, लेखकाला) कळत नाही. मग तो काहीतरी फडतूस ऑफीसच्या मीटींगा करतो. आश्चर्य म्हणजे बायको घरातून निघून गेली आहे; आपणच तिला घराबाहेर काढली आहे याविषयी खेदाची, निराशेची, अनिश्चिततेची, काळजीची छटादेखील त्याच्या चेहर्‍यावर दिसत नाही. शालिनी तारस्वरात ओरडून त्याचं जगणं हराम करत असतेच. मध्येच जगाच्या आरंभापासून जो सीन आपण बघत आलो आहोत तो देखील साग्रसंगीत होतो. सत्या, त्याचा निखिल नावाचा बालिश मित्र आणि अजून एक बायकोने सोडलेला मित्र दारूमध्ये आपले दु:ख बुडवत असतात. आता या सीनमध्ये काय बघायचं? मग ते तिघे काहीतरी बाष्कळ बडबड करतात. एकमेकांना विनाकरण शिव्या देतात. असं दाखवल्याने चित्रपट वास्तवाच्या जवळ जात असावा बहुतेक. स्वतःचं खाजगी आयुष्य चिवडत बसतात आणि तिथे दारूच्या नशेत सत्याला साक्षात्कार होतो की आपली फार मोठी भयंकर चूक झालेली आहे. बघा, ज्या दारूमुळे आरती सत्याला टोमणे मारते त्याच दारूच्या नशेत सत्याला सत्याचा साक्षात्कार होणे ही दिग्दर्शकाच्या चित्रपटीय भाषेच्या जाणीवांची प्रगल्भता दर्शवते.. हुश्श!! मध्येच सत्याला शालिनीचा मुलगा पाचगणीमध्ये, नवरा दिल्लीमध्ये आणि ती पुण्यात अशा शालिनीच्या भौगोलिक कुटुंबाची कहाणी शालिनीच्या झरणार्‍या डोळ्यामधून बयान होते. वरून कशीही असले तरी मी माझ्या कुटुंबाला मिस करते, करीअरपुढे कुटुंबाची आबाळ होते, ही रेस आहे, प्रत्येकाला पुढे जायचे आहे वगैरे घासून-घासून गुळगुळीत झालेली फालतू वाक्ये शालिनी सत्याच्या तोंडावर फेकते. सत्या बावळटपणाचा मूर्तिमंत कहर असतोच; तो ती वाक्ये कॅच करतो आणि चघळत बसतो. मला एक समजत नाही इतक्या साध्या गोष्टी चित्रपटातल्या नायक-नायिकांना अशा कुणा दुसर्‍याच्या कृतीमुळे किंवा सांगण्यानेच का समजतात? स्वतःचं डोकं काय गहाण ठेवलेलं असतं का या नायक-नायिकांनी? पण आता सत्या अंतर्बाह्य बदललेला असतो. शालिनी आणि त्याच्या फडतूस मित्रांनी दोन-दोन मिनिटांत त्याच्यामध्ये आणि त्याच्या स्वभावामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणलेला असतो. मिनव्हाईल, आरतीची एक मैत्रिण (कादंबरी कदम) आरतीच्या नखर्‍यांना सहन करण्यासाठीच जन्माला आलेली असल्याने आरतीला आपल्या घरी ठेवून घेते. आरती तिथं सगळं भडाभडा ओकते. मग आपल्या बापाचं घर असल्यासारखी आरती तिथे राहू लागते. मैत्रिण (व्यक्तिरेखेचे नाव आठवत नाही; काहीही समजा, दगडी, धोंडी, क्या फरक पडता है?) आरतीच्या आयुष्यात नाक खुपसण्याव्यतिरीक्त कधी-मधी कामावर पण जाते. आरती हप्ता वसूल केल्यासारखे मैत्रिणीकडून वारंवार पैसे पण घेते. मग मैत्रिणीच्या आग्रहाखातर आरती रिसेप्शनिस्टची नोकरी धरते. आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे; मैत्रिण किती दिवस फुकाचा घास गिळायला देणार ही किरकोळ गोष्टदेखील आरतीला स्वत:ची स्वत: कळत नाही. विनोद म्हणजे ती एमबीए असते. आता बोला? आता प्रेक्षकच 'सैरभैर' 'उध्वस्त' होण्याच्या मार्गावर असतात. इकडे सत्या सायकलिंगला जातो; मोलकरणीला फक्त उकडलेल्या भाज्या करायला लावतो आणि वजन कमी करतो (वाटत नाही पण तसं भासवलेलं आहे). आणि मग ते दोघे पुन्हा भेटतात. पुन्हा काहीबाही पाणचट गप्पा, तथाकथित बाष्कळ रोमान्स वगैरे होतो. दोघांना आपण दोघेही चुकत असल्याचा साक्षात्कार होतो आणि शेवटी दोघे पुन्हा एकत्र येतात. **प्रचंड मोठी जांभई** माझ्या मनात काही प्रामाणिक प्रश्न 'मंगलाष्टक वन्स मोअर' पाहतांना सतत येत होते. अगदी माफक रोमान्स किंवा रोमँटीक आठवणींच्या प्रसंगात मराठी चित्रपटात बॅकग्राऊंडला "हे हे हे..हे हे हे हे" अशा संतापजनक सुरावटी का असतात नेहमी? कुणी उत्तर देता का उत्तर? आपले मराठीमधले सुरेश वाडकरछाप गोड गोड गळ्याचे गोड गोड गायक दर दोन-पाच मिनिटांनी 'हे हे हे हे हे हे' करत विव्हळत असतात. प्रेक्षकांनी एकदम रोमँटीक मूडमध्ये जाण्यासाठी या निरर्थक सुरावटी घुसडलेल्या असतात का? आणि गाणी तरी किती फालतू. "तुझ्यासवे मी उमलले.." "हे का भासे असे..." "स्पंदनांची हाक.." वगैरे अतिशय छापील आणि तोचतोचपणाचा प्रत्यय देणारी गाणी किती रटाळ वाटतात हे संगीतकरांना कधी कळेल. हे शब्द आजकालच्या रोमँटीक गाण्यांचे प्रतिनिधित्व करतात; ही 'मंगलाष्टक वन्स मोअर' मधली गाणी नाहीत पण त्यातली गाणी इतकीच निरर्थक आणि गचाळ आहेत. अचानक सत्याची सिंगापूरला बदली होते आणि शालिनीसहित सगळं टोळकं सत्याला न सांगता सत्याच्या घरी धूडगूस घालायला येतं. अरे हे काय आहे? डायरेक्ट घरी जाऊन बॉस सांगते की तुझी सिंगापूरला बदली झाली आहे? अरे सिंगापूर म्हणजे काय शनि शिंगणापूर आहे का? नाही तेव्हा सत्याला टारगेट पूर्ण होत नाही म्हणून झापणारी शालिनी एकदम एक कोटीच्या १६% जास्त टारगेट पूर्ण झाल्याची खबर देते. अगदी ३-४ महिन्यातच हे टारगेट पूर्ण होऊन १६% वर बिझनेस होतो. आहे की नाही कमाल? आणि अभिनंदन करतांना शालिनी मोठ्या भावाने आपल्या लहानग्या बहीणीला जवळ घ्यावे तसे शालिनी सत्याला मिठीमध्ये बोलावते. आणि येस्स यू गेस्सड इट राईट! नेमकी तेव्हाच आरती तिथे दारात येऊन कडमडते. किती फालतूपणा करावा? मग थोडा संशयकल्लोळ होतो. ही फोडणी नित्याचीच आहे त्यामुळे तिचा ठसकाही लागत नाही, चवही लागत नाही, आणि ही फोडणी दिलेल्या पदार्थाने पोटही भरत नाही. सत्याला काय खुपत असते हे तो कधीच आरतीला सांगत नाही. ती बोलते, विचारायचा प्रयत्न करते, फाटण्याच्या आधीच शिवण्याचा प्रयत्न करते पण का कुणास ठाऊक सत्या तिला सांगतच नाही. त्याने आधीच सांगीतलं असतं तर पुढचं सगळं रामायण कसं दाखवता आलं असतं? आणि मग दारू ढोसतांना एका मित्राच्या अनुभवावरून याला कळतं की आपण प्रॉब्लेम काय होता हे सांगीतलच नाही; त्यावर नीट बसून चर्चाच केली नाही; एवढे शिकलेलो आपण पण एवढी साधी गोष्ट आपल्या मठ्ठ डोक्यात आलीच नाही. हे कुठल्या अँगलने तार्किक वाटतं यावर लेखक-दिग्दर्शकासोबत मला पुण्याच्या ना. सी. फडके सभागृहात चर्चासत्र आयोजित करायला आवडेल. नक्की यायचं हं! उपस्थितांपैकी प्रत्येकाला आम्ही 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे स्टँम्प साईझचे एक पोस्टर (साईझ रिडक्शन करून झेरॉक्स केलेले), एक पारले-जीचे बिस्कीट, आणि 'मंगलाष्टक वन्स मोअर'च्या डीव्हीडीवर १.५% ची घसघशीत सूट देणारे कुपन देणार आहोत. पुण्यातल्या मंडळींनी तर यायलाच पाहिजे. तासभर बसून एवढा ऐवज (किंवा घबाड म्हणा हवं तर) मिळणार असेल तर काय हरकत आहे? स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या व्यक्तिरेखाच फालतू आहे त्यामुळे यांच्या अभिनयाबद्दल न बोललेलंच बरं. सत्याचा एक अत्यंत बालिश मित्र बालिश आवाजात (याला आपण विनोदी समजायचं) बडबड करत असतो; तो डोक्यात जाणारच असतो; जातोच. आरतीची मैत्रिण हे एक फालतू कॅरॅक्टर. तिला काही कामधंदा नसतोच. सई ताम्हणकर आता जरा जास्तच 'भारदस्त' वाटते. तिने काळजी घ्यावी ही विनंती नाही तर तिची समीरा रेड्डी व्हायला वेळ लागणार नाही. मदत करण्याचा लेखकाचा स्वभाव असल्याने तिला हवे असल्यास मार्गदर्शन पुरवले जाईल. बाकी तिच्या भूमिकांचा साचा जवळपास ठरत चाललेला आहे. ही देखील एक काळजीचीच बाब! कथेत आणि पटकथेतच आनंदी-आनंद असल्याने दिग्दर्शनात परमानंद आहे. प्रेक्षकांना थोडेसे जरी बरे वाटले तर अहमदनगर-भिंगार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या वज्रकमळाचे चान्सेस कमी होतील ही भीती असल्याने दिग्दर्शकाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहेच. आणि बाकी सगळ्यांनी मनापासून साथ दिलेली आहे. टीमवर्कशिवाय असा मास्टरपीस शक्य नाही हेच खरे! ...शेवटी कळलं हा सतीश राजवाडेचा चित्रपट नव्हताच. समीर हेमंत जोशी नावाच्या दिग्दर्शकाचा होता. 'समीर' नावातच काही दोष आहे स्साला...जो भी करेंगे पचकाच करेंगे...डॅम इट!!!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नाही नाही सगळे समीर नाही पचका करत! तुम्ही असे परिक्षण लिहून कितीतरी जणांना सावध केलयत. मी हा शिनेमा बघितला नसता किंवा कधी येऊन गेलाय हेही समजले नसते पण मैत्रिणीने परवा सक्काळपासून तिनदा फोन करून पाह्यलास का? असे विचारले. एकतर विकांताशिवाय चित्रपट पाहणे किंवा एकंदरीतच चित्रपट पाहणे कमी असते. त्यात पाहून कोणता पाहिला तर 'हा'! दर दहा मिनिटांनी मी घरातील कामे करणे, फोडण्या असे करत कंटाळवाणा शिनेमा पाह्यला. भरपूर कामे झाली हीच काय ती जमेची बाजू! आधी यांच्या मूल न होण्यावर शिनेमा बेतलेला वाटत होता, नंतर नंतर आरती मानसिक रुग्ण असण्यावर असावा असा संशय येत होता. शेवटी तर जहाजाचा क्याप्टन ----- असल्याचा समज पक्का झाला. एम बी ए असलेली आरती रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करत होती की काय कोण जाणे! मी मध्येच उठून गेले तेवढ्यात काहीतरी घडले की काय हेही माहित नाही. वरताण म्हणजे मैत्रिणीने नंतर फोन करून "उगीच तुला बघायला सांगितला, सॉरी" असे सांगितले. जखमेवर मीठ! देव तिला अजून निदान २ असे शिनेमे बघण्याची बुद्धी देवो!

कालच आम्ही देखील पाहिला, अगदी याच भावना...फार अपेक्षेने बघितला खरा,पण उगाच कसबसा संपवला. अशानेच बाकी चित्रपट पहायला धजावत नाहिये. एका लग्नाची दुसरी गोष्ट चा टयार्पी बघुन तोच फॉर्मुला वापरलेला दिसतोय.

>>>काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले >>>मोठ्या आशेने सुरु केला. अमेरिकेत मराठी चित्रपटांच्या डीव्हीडी मिळू लागल्या???

तसं असेल तर प्रत्येक मराठी चित्रपटनिर्मात्याला नुसता चित्रपट काढल्याबद्दलच पारितोषिक द्यायला पाहिजे. म्हणजे पहा, लाखो रुपये खर्चून पिक्चर काढायचे. मग आपला सुशिक्षित, सुखवस्तू मध्यमवर्ग ते चित्रपट डाऊनलोड करून 'घरातली कामं करत' पाहणार, वर किती फालतू चित्रपट होता ते इतरांना सांगणार. काही लोक तर समीक्षकी अभिनिवेशात नेटवर परिक्षणं वगैरे लिहून हजारो लोकांना त्या चित्रपटापासून 'वाचवून' निर्मात्यांचे आणखी पैसे बुडवणार. मग त्यापेक्षा जो वर्ग पैसे टाकून पिक्चर पाहतो त्याच्याच अभिरुचीचे चित्रपट काढले तर निर्मात्यांना कोण दोष देणार? यावरून एक गंमत आठवली. "तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला." "अहो, सिंधूचा पार्टी कसला ? बाई आहे ती काम करणारी." "सांगताय काय ? कसला तो आवाज नि कसलं ते दिसणं ? मनात आणील तर कडेवर घेईल सुधाकराला. सिंधू कसली ? सिंधूदुर्ग आहे मालवणचा नुसता." "पाहिलंत वाटतं नाटक ?" "उगीच जरा. त्या कोपर्‍यातली दोन झापं बाजूला करून पाहिलं घटकाभर... छ्याः ! ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे."

तुमचा मुद्दा बरोबर आहे पण प्रॅक्टीकल अजिबात नाही आणि म्हणूनच वास्तवाला धरून नाही. आणि जे प्रॅक्टीकल नाही त्याचे मह्त्वदेखील क्षुल्लकच असते कारण ते अस्तित्वात येणे कधीच शक्य नसते. यासंदर्भात खाली काही कारणे दिली आहेत. १. मराठी चित्रपट भारताबाहेर रीलीज होत नाहीत. २. भारतात आम्ही कधीच डाऊनलोड केलेले चित्रपट पाहत नाही. सगळे चित्रपट सिनेमागृहात जाऊनच बघतो; परवडत नाहीत म्हणून एकपडदा चित्रपटगृहात बघतो. ३. मराठी सिनेमाला शासन २५ लाखाचे अनुदान देते. कित्येक चित्रपट हे अनुदान लाटण्यासाठी आणि अमराठी चित्रपटनिर्मात्यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीदेखील निघतात. ४. मराठी चित्रपट टॅक्स फ्री असतात. ५. चांगला चित्रपट असेल तर लोकं डोक्यावर घेतातच. मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कितीतरी महिन्यांनी इंटरनेटवर येतात; त्यामुळे त्यांचे व्यावसायिक चक्र तोपर्यंत थांबलेले असते. उलट इंटरनेटवर आल्यानंतर चित्रपट चांगला असेल तर चित्रपटाला फायदाच होतो. ६. असंख्य मराठी चित्रपट इंटरनेटवर येण्याआधीच झोपलेले असतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतके मराठी चित्रपट वितरकाला नफा कमावून देतात. बाकी सगळा कचरा वितरकांचे कंबरडे मोडतो. निर्माता हक्क विकून नफा काढून मोकळा झालेला असतो. ७. 'मंगलाष्टक वन्स मोअर' नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि ताबडतोब आपटला कारण चित्रपट सुमार दर्जाचाच होता. आता ५ महिन्यांनंतर तसेही हा चित्रपट सिनेमागृहात असणे शक्यच नाही. त्यामुळे वितरण, टीव्ही हक्क वगैरे मधून मिळणारा पैसा निर्मात्याने कधीच कमावला आहे. ८. लोकांच्या अभिरुचीनुसार चित्रपट काढले असते तर धोधो चालले असते. तसे होतांना दिसत नाही. 'श्वास' पुण्यासारख्या ठिकाणी चालतो पण सिन्नर आणि भुसावळसारख्या ठिकाणी प्रदर्शितदेखील होत नाही. तिथल्या लोकांना असा कुठला चित्रपट आला होता हे माहितदेखील नसतं. ९. उलट अमेरिकेसारख्या आणि युरोपसारख्या ठिकाणी, परदेशात मराठी लोकं आवर्जून मराठी चित्रपट बघतात हीच खूप महत्वाची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. चित्रपट चांगला असेल तर इंटरनेटच्या माध्यमातून निर्मात्याला अधिक पैसा कमवता येऊ शकतो. अ‍ॅमेझॉन किंवा युट्युबवर कित्येक चांगले अधिकृत इंग्रजी सिनेमे १-२ डॉलर्सला मिळतात. अशी झेप घेतली तर ते स्वागतार्हच आहे पण त्यासाठी चित्रपट त्या तोडीचे पाहिजे असतात; उगीच 'गोंद्या मारतंय तंगडं' सारख्या भिकार चित्रपटाला कुणी दमडीदेखील देणार नाही हे उघडच आहे. नेटफ्लिक्सवर किंवा इंटरनेटवर पैसे भरून कित्येक परदेशस्थ मराठी लोकं अमराठी चित्रपटांचा आनंद लुटतातच की. मराठी चित्रपटांबाबत देखील हे शक्य आहे पण त्यासाठी दर्जा हवा. निरर्थक भावना आणि पैसे हे समीकरण कधीच चालत नसते. १०. तेलुगू चित्रपटांसारखे बघण्यासारखे चित्रपट परदेशात प्रदर्शित झाले तर मराठी लोकं सिनेमागृहात जाऊन ते चित्रपट बघतील यात शंका नाही. पण दर्जा नसलेल्याने मराठी चित्रपट अजून अशी उंची गाठू शकलेला नाही. ११. कुठेही पाहिला तरी चित्रपटाचा दर्जा बदलत नाही. तो कसा आहे हे ठरवणं प्रेक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे समीक्षा होणारच. चांगला असेल तर चांगला म्हणणार, वाईट असेल तर शिव्या घालणार हे वैश्विक सत्य आहे. शेवटी चित्रपट नफ्यासाठी काढला जातो; लोकांवर उपकार म्हणून नाही काढला जात. तसे असते तर 'बाबूराव ला पकडा' आणि 'लावू का लाथ' सारख्या अभिजात कलाकृती अजरामर झाल्या असत्या. १२. लोकं निर्मात्यांचा पैसा सत्कारणी लागावा आणि त्याला फायदा व्हावा म्हणून चित्रपट बघत नाहीत. आपण दूध चहा पिण्यासाठी घेतो; दूधवाल्याला पैसे मिळून त्याचं भलं व्हावं म्हणून नाही घेत. व्यवसायाची ही तत्वे मानवाच्या मूळ वृत्तीतून नैसर्गिकरीत्या आलेली असतात. इथे अव्यावहारिक तात्विक आणि भावनिक आदर्शवाद आणि अतिचिकित्सक वितंडवाद ना कधी इतिहासात चालले ना कधी भविष्यात चालतील! बाजार असाच चालतो आणि त्याच्यानुसार माल तयार करून खपवावा लागतो हे सत्य आहे आणि ते बदलवणे पोपटपंची करून जनरली दुटप्पी विचारधारेत जगणार्‍या सामान्य लोकांच्या मर्यादेतली गोष्ट नाही. मजूर कष्टकरी लोकांना श्रमाचे जास्त पैसे मिळाले पाहिजेत म्हणून चार भिंतीआड सोफ्यावर लोळत गप्पा ठोकणारे आणि नोकरांना देण्याच्या पगारात एक-एक रुपयाचा हिशेब करून त्यांच्या तोंडाला पाने पुसणारे अगणित आहेत.

सही जवाब. विशेषतः
मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कितीतरी महिन्यांनी इंटरनेटवर येतात; त्यामुळे त्यांचे व्यावसायिक चक्र तोपर्यंत थांबलेले असते.
आणि
नेटफ्लिक्सवर किंवा इंटरनेटवर पैसे भरून कित्येक परदेशस्थ मराठी लोकं अमराठी चित्रपटांचा आनंद लुटतातच की. मराठी चित्रपटांबाबत देखील हे शक्य आहे

तसं असेल तर प्रत्येक मराठी चित्रपटनिर्मात्याला नुसता चित्रपट काढल्याबद्दलच पारितोषिक द्यायला पाहिजे>>> द्याच तुम्ही . म्हणजे पहा, लाखो रुपये खर्चून पिक्चर काढायचे. मग आपला सुशिक्षित, सुखवस्तू मध्यमवर्ग ते चित्रपट डाऊनलोड करून 'घरातली कामं करत' पाहणार, वर किती फालतू चित्रपट होता ते इतरांना सांगणार. >>> तुम्हाला कोणी सांगितलं हो घरातली काम करतं करतच सुशिक्षित, सुखवस्तू मध्यमवर्ग चित्रपट पाहतो म्हणून ??? काही लोक तर समीक्षकी अभिनिवेशात नेटवर परिक्षणं वगैरे लिहून हजारो लोकांना त्या चित्रपटापासून 'वाचवून' निर्मात्यांचे आणखी पैसे बुडवणार. मग त्यापेक्षा जो वर्ग पैसे टाकून पिक्चर पाहतो त्याच्याच अभिरुचीचे चित्रपट काढले तर निर्मात्यांना कोण दोष देणार?>>> लिहू द्या कि हो लोकांना समिक्षकी आवेशात आणि वाचवू द्या हजारो लोकांना . त्याच हजारो लोकांचे आशीर्वाद ( दुवे ) मिळतील समिक्षकी अभिनिवेशात लिहिणार्यांना . कारण हजारो लोक रक्ताच पाणी करून पैसे कमावतात ते पैसे फालतू , पानचट , संवेदनांची गळवे (Thanks to मिपा ) गाळणाऱ्या शिनेमावर का उधळावे ? *sad* *SCRATCH*

अहो चिन्मयसाहेब, कोणाला वेळ आहे सारखे शिनेमे बघायला! ते जालावर येतात तेंव्हा काय अवस्थेत असतात हे समीरसूर यांनी सांगितलेले आहेच पण मागे एकदा मिपावर प्रेम म्हणजे प्रेम असतं या शिनेमाचे परिक्षण आल्यानंतर अनेक महिन्यांनी (बहुतेक) तो जालावर आला व त्याबद्दल आधी वाचले होते म्हणून पाहिला. त्यानंतर हाच दिव्य शिनेमा पाहिला. कुण्णाचे पैशे बुडवुन आम्ही काही करत नाहीये. आणि आम्ही लाख बुडवू पण त्यांना आपल्या पैशांची काळजी आहे ना!

जालावर नटरंग ,श्वास , डोंबिवली फास्ट बिपी असे अनेक सिनेमे आले आहेत. मुळात मी मराठी वर जे सिनेमे टीव्ही वर दाखवले जातात ते लगेच येतात , तेव्हा त्यांच्या दर्जाचा व जालावर येण्याचा काहीही संबंध नाही , बहुतेक सर्व सिनेमे कालांतराने जालावर येतात.

ते आहेच पण ते शिनेमे जेंव्हा जालावर (किंवा कोणत्याही चॅनलवर) येतात त्यावेळी त्यातून आर्थिक नफा/ तोटा व्हायचा तो आधीच झालेला असतो, त्यानंतरच तो चित्रपट तमाम जनतेसाठी उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे त्या चित्रपटाची आर्थिक गणितं घालून नंतरच्या अवस्थेत तो आपल्याला दाखवला जातो. बेकायदेशीर मार्गानेही चित्रपट रिलीज झाल्याच्या दुसर्‍या मिनिताला मिळत असावा पण आपल्यापर्यंत ते फारसं पोहोचत असेल असं वाटत नाही. किंवा रिलीज डेटकडे डोळे लावून बसण्याइतकी माहिती आपण ठेवत नाही. अपवाद, श्रीदेवीचा मागल्या वर्षी येऊन गेलेला कोणतातरी.

हां हां, तोच! रिलीजच्या आधी २ दिवस या सिनेमाबद्दल समजले व आख्खे २ दिवस वाट पाहिली रिलीजची. त्यानंतर चार पाच दिवसांनी पहायला गेले ती गोष्ट वेगळी! ;)

बीपी जालावर प्रदर्शित झाल्यानंतर ८ महिन्यांनी आला. बीपी जानेवारी २०१३ मध्ये प्रदर्शित झाला आणि साधारण ऑगस्ट २०१३ च्या आसपास तो जालावर आला. तोपर्यंत त्याचे व्यवसायचक्र पूर्ण थांबले होते. डोंबिवली फास्ट प्रदर्शित झाल्यानंतर कितीतरी महिन्यांनी जालावर आला. मुद्दा हा आहे की मराठी चित्रपट जालावर येतात तेव्हा त्यांचे व्यवसायचक्र पूर्णपणे थांबलेले असते. दर्जाचा आणि जालावर येण्याचा काही संबंध नाहीये फक्त एवढंच की दर्जा जर खरच उत्कृष्ट असेल तर परदेशस्थ मराठीजन तो पैसे खर्चून देखील जालावर बघतील.

असे काही नाही नटरंग सिनेमा जेव्हा ऐन भरात होता तेव्हा तो जालावर आला व आताच कोटी च्या कोटी उड्डाणे केलेला time पास हा सिनेमा दुसर्या आठवड्यात जालावर आला तेव्हा रवि जाधव ह्यांनी चेपू लिहिले की हा सिनेमा जालावर येउन सुद्धा तो दहा दहा वेळा थेटरात जाऊन पाहणारे प्रेक्षक मला लाभले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. जे कमल हसन त्याच्या मागच्या सिनेमाच्या बाबतीत केले त्यामुळे मल्टीप्लेक्स वाल्यांनी त्यांच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. नेटवर सिनेमा पाहायला देणे ही कल्पना थेटरवाल्यांना अमान्य व फक्त अनिवासी लोकांना ही सुविधा देण्याचे म्हटले तर काहीतरी तांत्रिक जुगाड करून भारतात हे सिनेमे नेटवर पहिले जातील. ह्यावर उपाय एकच मराठी सिनेमाने दाक्षिणात्य सिनेमांच्या सोबत करार करून परदेशात आपले सिनेमे प्रदर्शित करावे उदा लंडन मध्ये काही निवडक तमिळ सिनेमे एक आठवडा भर लागतात , आता जे तमिळ सिनेमे ज्यात रजनी व धनुष नसेल त्यांनी मराठी सिनेमा बरोबर एक आठवडा शेअर करण्यास काहीच हरकत नाही. एखादा ब दर्जाचा बॉलीवूड सिनेमा प्रदर्शित होत असेल तर परदेशात त्यांचे संध्याकाळचा एखादा शो मराठी सिनेमासाठी देऊ शकतात , परदेशात युके , अमेरिका , व अनेक ठिकाणी मराठी अनिवासी विपुल संख्याने राहतात मराठी सिनेमे तेथे प्रदर्शित झाले पाहिजे.

'राजा' हळू 'राजा' हळू.... किती बरं त्या चित्रपटाला आपटायचं ? बरं नाई का वाटत? ;) =)) चल दोन बीअर मारु. ;) अरे कं ल्हिवलाय, कं ल्हिवलाय.... मुंबई पुणे मुंबई लई आवडलेला. पण ह्या वरच्या मंगलाष्टकानी पार वाट लावलेली दिसतेय.

मस्त लिहिलं आहे परिक्षण. कसला दांडपट्टा चालवला आहे आडवा, उभा. परिक्षण वाचताना मजा आली. आणि प्रेक्षकाला होणार्‍या यातनांचा अंदाज आला :) चित्रपटाबद्दल खूप अपेक्षा असल्याने चित्रपट नक्की पहाणार होते. पण आता फेरविचार करेन.

काय लिवलय, काय लिवलय. पण देव करो असं काही लिहिण्याची वेळ तुम्हावरच काय इतर कुणावरही फार वेळा न येवो. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यादरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळाद्वारे मंगलाष्टक वन्स मोअर व पितॄऋण या चित्रपटांचे उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळांना वितरण करण्यात आले. याकरिता चित्रपटाच्या एका खेळासाठी काही शे डॉलर्स निर्मात्याला पाठवावे लागतात. १ मार्चला फिनिक्स अ‍ॅरिझोना येथे या चित्रपटाचा खेळ झालेला दिसत आहे. आमच्या मंडळाने २२ मार्चला पितृऋणचा खेळ ठेवला आहे. किमान एक टुकार चित्रपट पाहण्यापासून वाचलो असे म्हणायचे. बघुया पितृऋण कसा निघतो ते?

पितृऋण नावावरूनच मेंटल टॉर्चर वाटतोय. सुधा मूर्तींच्या एका गोष्टीवर आधारित आहे आणि त्यांनी स्वतः यात अभिनय देखील केलेला आहे असे ऐकले आहे. अतिरंजित रडापड बघवत नाही आणि त्यात आपल्याकडे पार्श्वसंगीत इतके जास्त असते की प्रसंगातला मेलोड्रामा अंगावर येऊन हृदयातून डोळ्यात येतो... बघा आणि परीक्षण टाका...:-)

आत्ताच चित्रपट पहिला. आरती सारखी बायको जगात असते ???? मला वाटतं स्वप्नील आणि मुक्ता बर्वे या जोडीची लोकप्रियता कॅश करण्यासाठी हातात कथा(?) नसताना घाई घाईत काढलेला चित्रपट आहे. आरती रेवाला डबा बनवून देते तेव्हा रेवा आरतीला म्हणते "ए बाई,माझा सत्या करू नकोस" यातच कथेचं(?) सार आहे

परीक्षण लिहावे तर समीरसुर यांनीच. मस्त वाक्या-वाक्याशी सहमत. तुमच्या वरील प्रतिसादातील सर्व मुद्द्यांशी सहमत. केवळ मराठीच नाही तर सर्वच चित्रपट निर्मात्यांचा काळा पैसा पांढरा करण्याचे सर्वात मोठे आणि सुरक्षित माध्यम आहे.
डॉक्टरचं म्हणणं असतं की नुसता फिजीकल काँटॅ़क्ट वाढवून उपयोग नाही; मने देखील जुळली पाहिजेत
डॉक्टरला दंडवत. अवांतरः पुढचे टार्गेट 'गुलाब गँग' ;) आजच चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलल्याचे वाचले. माधुरी, जुही वगैरे गँगमुळे उत्सुकता आहे. या चित्रपटाचे परिक्षण 'तुमच्याकडुन' वाचण्यास उत्सुक.

गुलाब गँग मी बघेन की नाही थोडी शंका आहे. परवा इथून निघणार. पुण्यात पोहोचल्यावर सुरुवातीचे २-३ आठवडे कामात आणि तिथे थोडं स्थिरस्थावर होण्यात जातील; तोपर्यंत गुलाब गँग चित्रपटगृहातून उडालेला असणार आहे. हा चित्रपट आपटणार हे नक्की. हे माझे म्हणणे खोटे ठरल्यास मला संभाजी पुलावर गुलाबकळ्यांनी ठेचून मारा... :-) डेढ इश्किया चे पण वाभाडेच निघाले. माधुरी दीक्षितच्या एकटीच्या खांद्यावर चित्रपट यशस्वी होऊ शकत नाही हे आजा नच ले, डेढ इश्किया या दोन्ही चित्रपटांच्या अपयशाने सिद्ध झाले आहे. तरी लोकांना वेडी आशा असते! 'हमरी अटरिया पे...' हे गाणे ऐकून मला एका मराठीतल्या लावणीची चाल आठवते. शब्द अजिबात आठवत नाहीयेत पण चाल लख्ख आठवतेय. "...सोडू नका...मला क्षक्षवरती करू नका..हो राया, क्षक्षवरती करू नका" असे काहीसे शब्द आहेत. कुणाला आठवतेय का ही लावणी?

वाहवा ! चांगली पीसं काढलीत राजे. आपल्याला तुझी परिक्षणं जाम आवडतात. उगाच कणेकर, सिंझगिरी यांची नक्कल करत अतिरेकी उपमा नसतात. (वरील दोघेही हल्ली बरेचदा वात आणतात.)

मला माझ्या बहिणीने शिनेमा थेटराच्या बाहेर आल्या आल्या पुण्याहून फोण करुण सांगितले कि हा चित्रपट पहा , तुला मी शिडी / डीव्हीडी , अजून जे काय असत ते पाठवते . तिला कस बस रोखलं. *stop* मी पाहिला कारण मुक्ता . मला आवडते , कामही चांगल करते .बाकी झ.बा. बद्दल नो चोम्मेंत्स . :D आता तिला ह्यालेखाची लिंक पाठवणार आहे. हे रेडीओ मिर्ची वाले नक्की काय सेल करतात? ज्येनुइन प्रश्न . असं चेहर्‍यावर शंभरदा हात फिरवून विचारते-बजावते.>>> हे प्रचंड डोक्क्य्यात गेलं. *dash1* सत्याचे बालिश मित्र >>> हेमंत ढोमे आणि प्रदीप पटवर्धन . एक अत्यंत बालिश मित्र बालिश आवाजात >>> तोच हेमंत उर्फ निख्या . खरतर हे दोन्ही कलाकार चांगले आहेत . एखाद्याला वाया घालवण म्हणजे काय हे यांच्या या व्यक्तीरेखांवरून सहज समजू शकते . :( आरतीची एक मैत्रिण (कादंबरी कदम) >>> रेवा तीच शिळी विटकी खिचडी पुन्हा इथे आहेच. >>> ++१ १ जितकं कोलमडणं आणि पिचलेलं असणं जास्त तितका क्रिटीकल अ‍ॅक्लेम जास्त! पुरस्कार जास्त! आणि मग "मराठी सिनेमा कात टाकतोय" >>> *clapping* हे अगदी माझ्या मनातले लिहिले असे वाटते मला . गेल्या काही दिवसातले शिनेमे आठवून बघा . परत काही लिहील तुम्ही संवेदनाशुन्य अस जाहीर करून लोक मोकळे होतात . शिनेमे बघून रडण्याने , समाजातली दुःखे आपल्यालाच समजली आणि आपणच तारणहार अशा आविर्भावात लोक वावरतात तेंव्हा खरच हसावे कि रडावे हे कळत नाही . समाज म्हणतो शिनेमे / शिरेली पाहून मुल /मुली बिघडतात तर हे शिनेमे / शिरेली तयार करणारे म्हणतात जे समाजात घडत तेच आम्ही दाखवतो . हे कधी संपणार देवच जाणे . तुमच लिखाण , चिरफाड , सालं काढणं अतिशय आवडल . फक्त हे जर थोड आधी आलं असत तर मी वाचले असते . :D

समस्याप्रधान चित्रपटात सतत समस्यांचे रडगाणे दाखवून प्रेक्षकांना अपराधी वाटावे असे काहीसे प्रयत्न असतात. आणि अपराधी वाटले की चित्रपटाला कुणी नावे ठेवण्यास धजावतच नाही. आणि अजून असे चित्रपट काढणार तरी किती? आता त्या साच्यातून बाहेर पडले पाहिजे. समस्या मनोरंजक रीतीने देखील प्रभावीपणे मांडता येतात. त्यासाठी प्रेक्षकांना धायमोकलून रडवलेच पाहिजे असे अजिबात नाही. असो. तो विजय पटवर्धन आहे; प्रदीप नव्हे.

' धुमधडाका ' या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेचा एक डायलॉग आहे तो अगदी फिट्ट बसेल हल्लीच्या पिच्चरला ...".सत्यघटणेवर आधारित ष्टोरी असली कि लगेच काळजाला भिडते मग पिच्चर चालत...लेक चालली सासरला ....नव्हेत अश्रू , आशीर्वच हे ..." (लक्ष्मीकांत बेर्डेची पंखी / ए.शि.) :P :D

मरण्यापेक्षा या सापाने शेपूट तोंडातून सोडावी हे बरे! :-) किंवा प्रेक्षकांना असल्या टॉर्चरगेम्समधून सुटका द्यावी. कात टाकणे न टाकणे या वृत्तपत्रीय गप्पा आहेत... :-)

हे
तिचे सत्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवणे वाढते (काँटॅक्ट वाढवणे म्हणजे हेच वाटत असावे बहुधा तिला); त्याचं वजन मोजून त्याने योगा आणि सायकलिंग करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगण्याची फ्रि॑क्वन्सी वाढते;
आणी हे
इकडे सत्या सायकलिंगला जातो; मोलकरणीला फक्त उकडलेल्या भाज्या करायला लावतो आणि वजन कमी करतो (वाटत नाही पण तसं भासवलेलं आहे).
माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ह्या "झबा" चे वजन कमी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो कसा? म्हणजे आधी पुर्ण पिच्चरभर स्वेटर नी मग बिनास्वेटर का? अनुमान काय, जास्त पोदलुपणा आलातर शारीरिक संबंध प्रस्थापित करता येत नाहीत !.....की मी समजुन घेण्यात काही चुकतोय ?

हाण्णा तिच्यामारी.. जबरा परीक्षण.. तुमच्या असल्या फाडू परीक्षणांसाठी तरी असले पुचाट सिनेमे निघत राहोत आणि तुम्हाला ती बघणण्याची दुर्बुद्धी होत राहो. आणि ते "भावनिक गळवं" असलेल्या प्रतिसादास दिलेलें प्रत्युत्तरपण जबराट..

हायवे नावाच्या शिनेमाचे पाहून आल्यावर असेच परिक्षण लिहावे ही विनंती. मैत्रिणीने माझ्या वाया गेलेल्या वेळाची भरपाई म्हणून तिला फुकट मिळालेली डिव्हिडी देण्याचे ठरवेले आहे. तिने आधी दिलेली धूम ३ ची डिव्हिडी तशीच पडून आहे. आता मिपावर परिक्षण आल्याशिवाय हायवे पाहणार नाही असे तिला सांगितल्याने परवाच्या वाया गेलेल्या वेळाची भरपाई होईल असे वाटते शिवाय अपराधीपणाची भावना जरा कमी होईल. ;)

माझ्या सुदैवाने मला हायवेची प्रेक्षकांना लागणारी हाय आधीच कळली होती. मी हायवे सुरु केला आणि अक्षरशः २० मिनिटात संपवला. शक्यच नव्हतं! तो रानरेडा रणदीप हुडा मला अजिबात आवडत नाही. आणि आलिया भटला पळवून नेल्यावर त्यांच्यात प्यार होणार ही काळ्या दगडावरची रेघ मला सिनेमा सुरु झाल्यावर त्या रानरेड्याच्या काळ्या थोबाडावर लगेच दिसली होती. पुढचं काही बघण्यात तथ्य नव्हतं. त्याच त्याच हरियाण्वी भाषेतले रासवट संवाद कितीवेळा ऐकणार? मग झुम्म्म्म्म्म्म्म्म्म पुढे पळवत नेला सिनेमा आणि शेवट बघून नि:श्वास टाकला. :-) बघू नका! अत्यंत रटाळ आहे हे नक्की! :-) आलिया भट 'स्टुडंट ऑफ द ईअर' मध्ये छान वाटली होती. हायवे मध्ये तिने अभिनय चांगला केला आहे असं ऐकीवात आहे. आणि ते थोडं फार खरं आहे. पण तेवढ्यासाठी हायवे पूर्ण चालत जाण्याची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. पण मेकपशिवाय ती खूप सामान्य दिसते. तिला तसं बघवत नाही. :-( बाकी मग हरियाणातल्या गावात ती रानरेड्यासोबत राहते आणि मग तिला तिथं मोकळं वाटतं वगैरे नेहमीचा चोथा आहेच. त्यात काहीही नावीन्य नाही; प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकेल असं काहीच नाही. ए आर रहमानची नेहमीची "मौला, अल्ला, मालिक, तेरा दर, ख्वाजा" छाप कंटाळवाणी गाणी आहेत. ए आर रहमानने थोडी सुटी घ्यावी आणि पुन्हा ३-४ वर्षांनी ताजे संगीत देण्याचा प्रयत्न करावा. त्याची ती सुफी टाईपची गाणी ऐकून खरोखर कान किटले. सतत थोड्या थोड्या वेळाने कुणी सुफी गायक "मेरे मौला तेरे दर पे..." छाप गाणी सुरु करतो तेव्हा मी आवाज शून्य करतो! गेल्या ४-५ वर्षात चांगले असे संगीत ए आर रहमानने दिलेलेच नाही. जे दिलयं त्यातलं ७०% "मौला ख्वाजा" छाप गाणी..."कितना मौला मौला करेगा यार? जरा उसको भी तो आराम दे..." असा टेलिग्राम त्याला पाठवायची इच्छा होते मला. पण आता टेलिग्रामदेखील बंद झाले. :-(

सिनेमा पाहून आल्या आल्याच हे टाकलं होतं थोबाड पुस्तकावर..

खरं तर तुझ्या परिक्षणालाच वन्स मोर म्हणावंस वाटतंय.
पण फिजीकल काँटॅक्टसाठी माझी बायको असते कुठे?" असा सत्याचा उद्रेक झाल्यावर आरती वेड्यासारखी पुन्हा पुन्हा त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवायला लागते
याची टोटल लागली नाही (पण यात चित्रपटाचं रहस्य दडलेलं दिसतंय!)

हा हा हा, भारी फाडलाय, मला तर त्याची जाहीरात पाहिताना एका लग्नाची तिसरी गोष्ट मालिकाचा येतेय की काय असे वाटायचे, पण नंतर खरोखरच तशी मालिका आली तेव्हा त्यात उमेश कामत दिसला आणि समजले की ती जाहिरात मंगलाष्टक नावाच्या चित्रपटाची होती, पण हे समजेपर्यंत चित्रपट थिएटरातून उतरला होता आणि पुढे केबलबिबल वर बघायच्या आधीच हि असली परीक्षणे वाचून झाली होती... पण हे मात्र जबरीच.. काही न सोडता पुरते आडवेतिडवे धुपवणे यालाच म्हणतात..

काय छान लिहितोस राजा ! आम्ही गणितात जो सिध्दांत शिकलो तो व्यवहारात पाहायला मिळतोय "तीन लग्ने आणि तीन गोष्टी यांटटययपासून एकूण तीन गुणिले तीन नऊ प्रकार करता येतात ". मुक्ताने खुपते तिथे -- कार्यक्रमात सांगितले होते "माझा चेहरा तीन तास पाहाण्यासारखा नाही"