Welcome to misalpav.com
लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
येsप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:I तेsपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् I अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च l न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्च्यवन्ति ते l (भगवद्गीता ६.२३ व २४) अर्थ: भगवंत म्हणतात, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुत: माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ही पूजा चुकीच्या मार्गाने केलेली असते. खरं, म्हणजे मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वत: जाणत नाही त्यांचे पतन होते. स्वामी त्रिकालदर्शी म्हणाले, अर्थात कुठल्या ही देवतेची पूजा करा, ती पूजा मुख्य देवतेपाशी पोहचते आणि त्यानुसार भक्ताला त्याचे फळ ही प्राप्त होते. भक्ताने विचारले स्वामीजी, हे कसें शक्य आहे? स्वामी त्रिकालदर्शी: इतर देवतांची पूजा करणारे लोक जड बुद्धीचे अर्थात बुद्धिहीन असतात, त्यांचे अध्यात्मिक पातळी कमी असते आणि मुख्य देवतेला ओळखणे त्यांना शक्य नसते. भक्त: स्वामीजी, मुख्य देवतेला कसे ओळखावे? स्वामी त्रिकालदर्शी: ज्या देवतेच्या समोर अन्य देवता हात जोडून उभ्या असतील. तीच मुख्य देवता. जसे श्रीरामा समोर हनुमंत हात जोडून उभे असतात. श्री राम मुख्य देवता आणि हनुमंत कनिष्ठ देवता. कनिष्ठ भक्त हनुमंताची भक्ती करतात आणि त्याला नवैद्य दाखवितात. श्री रामाच्या कृपेचा प्रसाद त्यांना ही मिळतो. हे असेच आहे, जसे संकटात अडकलेला माणूस सरकारी कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्याला नेवैद्य अर्पित करतो आणि वरिष्ठांची कृपा त्यावर होते. आपल्याला देशात हनुमंताचे मंदिरे अधिक दिसतात कारण सामान्य माणूस अर्थात कनिष्ठ भक्त मुख्य देवता ओळखण्यास समर्थ नसतो. हरकत नाही. मुख्य देवतेच्या सेवकावर सुद्धा वक्र दृष्टीने पाहणे कुणाला ही शक्य नसते म्हणूनच समर्थांनी म्हंटले आहे, ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे’. उच्च अध्यात्मिक पातळी असलेले भक्त, मुख्य देवतेला ओळखतात. विभीषण आणि सुग्रीवाने श्री रामाची भक्ती केली, दोघांना श्री रामच्या कृपेने राज्यपद लाभले. मोठे फळ मुख्य देवतेच्याच कृपेने प्राप्त होते. अर्थात कनिष्ठ देवतेची भक्ती केल्यास लहान-सहन कामे पूर्ण होतात. मुख्य देवताच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे, त्याचाच कृपेने देशाचा कारभार चालतो. मुख्य देवतेला न ओळखणारे चुकीच्या देवतेची भक्ती भक्ती करतात आणि संकटात पडतात. अश्या मूढ भक्तांचा सर्वनाश अटळ असतो. भक्त: स्वामीजी, आपल्या देशात अनेक देवता आहेत. त्या आपसांत भांडतात ही. अश्या परिस्थितीत मुख्य देवता कशी ओळखायची? कुठल्या देवतेला मतरुपी नेवैद्य अर्पित करावा. स्वामी त्रिकालदर्शी: मुख्य देवता स्वर्गात सिंहासनारूढ असते, अन्य कनिष्ठ देवता किती ही आपसांत भांडत असल्या तरी मुख्यदेवतेचे सिंहासन आपल्या पूर्ण ताकदीने उचलून धरतात. काही देवता हात जोडून समोर उभी राहतात. पूर्वी महाभारताच्या काळी, इंद्राने कर्णाची कवच-कुंडले मागून, त्याला शक्तीहीन केले होते. त्याच प्रमाणे मुख्य देवते जवळ ब्रम्हास्त्रापेक्षा ही घातक असे ‘शुकास्त्र’ असते. मुख्य देवता बनण्यासाठी शुकास्त्र हे साधावेच लागते. शुकास्त्राच्या पाशात अडकून, कनिष्ठ देवता मुख्य देवते समोर हात जोडून उभ्या राहतात आणि तिचे सिंहासन उचलून धरतात. अश्यारितीने मुख्य देवता कनिष्ठ देवतांना अर्पित केलेला नैवेद्य (मत) हरण करते. भक्त गोंधळात पडतो. वत्सा तुला माहितच आहे रामायणात बाली ज्याच्या बरोबर युद्ध करीत असे, त्या योद्ध्याचे अर्धे बळ बालीला मिळत असे. त्यामुळे त्याला पराजित करणे कोणत्याही योद्ध्याला शक्य नव्हते. स्वयं श्री रामाला बालीवधासाठी क्षत्रियांना न शोभणारा मार्ग वापरावा लागला. असो. मुख्य देवता ही प्रसन्न होऊन, कनिष्ठ देवतांना ‘सुवर्णास्त्र’ प्रदान करते. सुवर्णास्त्राच्या कृपेने कनिष्ठ देवता स्वर्गसुखाचा उपभोग घेतात. कनिष्ठ देवतांची भक्तांवर कृपा करण्याची क्षमता ही कमी असते, त्यांच्या भक्तांच्या पदरी निराशाच पडते. दुसरीकडे पराजित देवतांना स्वर्गातून हाकलून दिल्या जाते अश्या देवतांची भक्ती करणार्याचा विनाश निश्चित असतो. स्वामी त्रिकालदर्शी म्हणतात, अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभांकरिताअन्य देवतांची उपासना करतात आणि त्यांचे पतन होते. अध्यात्मिक दृष्टीने उन्नत लोक मुख्य देवतेला ओळखतात आणि तिची पूजा करतात आणि आपल्या सर्व भौतिक कामना पूर्ण करतात. वत्सा, आध्यात्मिक पातळीच्या उच्च स्तरावर पोहचल्यावर तू हीमुख्य देवतेला ओळखण्यास समर्थ होईल. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

कुणीही कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो मलाच पोहचतो असं म्हणणं म्हणजे बाकीच्यांच्या देवांना निकालात काढण्यासारखं झालं. :) एक श्लोक आठवला, आकाशं पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्व देवं नमस्कारं केशवं प्रति गच्छति (शुद्धलेखनाच्या बाबतीत चुकभुल देणे घेणे.)

बाकीच्यांच्या देवांना निकालात काढण्यासारखं झालं
बाकीचे म्हणजे कोण ? "एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति " द्वैत नाहीच...'सत्य' एकच आहे...आपण फक्त वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधतो ...ते एकच आहे ...एकटेच ...दुसरं कोणी नाहीच !!

ईस्कॉन वाले असावेत बहुधा. मस्कत ला होते आमचे शेजारि. ते सान्गायचे 'हाच (भगवद्गितेत वर्णिलेला, म्हणजेच क्रुष्ण) एक प्राईम गॉड, बाकी सगळे डेमी गॉड'.

एकदा पूजनीय / वंदनीय म्हंटल्यावर ज्येष्ठ ( मुख्य) अथवा कनिष्ठ हा वाद कशाला? रामायणात रामाने शंकराची पूजा केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ज्येष्टतेची पायरी शंकर - राम - हनुमान - रामदासस्वामी अशीच झाली. अर्थात हे एक उपमत झाले. बाकी लेखात लिहीलेल्या निरर्थक मतांशी पूर्ण असहमत.

सौ. पूजा करीत होती. चहा मिळायला वेळ लागणार, सहज भगवद्गीता चाळत होतो आणि या श्लोकांवर लक्ष गेल. मग भन्नाट विचार डोक्यात घुसले. ...

स्वामी,भक्त किंवा तुम्ही आम्ही सर्व सामान्य लोक ह्यांना थोड्या फार फरकाने जड बुद्धीचे अर्थात बुद्धिहीन आहोत हे नक्की. भगवद्गितेत वर्णिलेला, म्हणजेच कृष्ण एक प्राईम गॉड, बाकी सगळे डेमी गॉड अशी शंका येणे किंवा मुख्य देवता आणि कनिष्ठ देवता असा भेदभाव होणे रास्त वाटते. अशीच शंका अर्जुनालाही आली असती, हे भगवंताला ठावूक होते, त्यामुळे भगवंत गीतेच्या अकराव्या अध्यायात सांगतात न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा । दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥ ८॥ ज्ञानेश्वरी/अध्याय अकरावा मग म्हणें उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे । परी दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥ १५४ ॥ हे बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणियातें म्हणितलें । आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परी न देखसीच तूं ॥ १५५ ॥ यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ? । तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥ १५६ ॥ हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दाऊं बैसा । बहिरियापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥ १५७ ॥ मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा । वायां धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥ १५८ ॥ जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें । तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखें ॥ १५९ ॥ परी हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें । एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥ १६० ॥ साच विश्वरूप जरी आम्ही दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें । परी बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ॥ १६१ ॥ काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे । तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज ॥ १६२ ॥ मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥ १६३ ॥ ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोक आद्यें । बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥ १६४ ॥ भावार्थ : किन्तु तू अपनी इन आँखो की दृष्टि से मेरे इस रूप को देखने में निश्चित रूप से समर्थ नहीं है, इसलिये मैं तुझे अलौकिक दृष्टि देता हूँ, जिससे तू मेरी इस ईश्वरीय योग-शक्ति को देख। (८) साभार : राधाकृपा विश्वरूप दर्शन!! बहुविधरूपे आणि आकृती परमेश्वराच्या सर्व पहाती वसू, वायू रुद्र, भास्कर एकवटले परमेश्वरी चराचर!! तेजोराशी रविपरी दिप्तीमान अग्नीपरी मुकुट, गदा, चक्रधारी असावा ईश्वर हृदयांतरी!! सर्व विश्वाचे निधान अनादी अनंत रवी-शशी नयन दाही दिशात भरूनी राहे रूप हे दिग्मूढ आहे!! भव्यदिव्य अन विशाल दाढाही त्या अती कराल पाणीमात्र तयात सापडतील पापमार्गा जे आचरतील!! परमेश्वराच्या नामसंकीर्तने विराटरूपी या दर्शने विश्व भारले अनंताने तया वाहावी सहस्त्र नमने!! मुगुटधारी चक्रपाणी विराटरूप सौम्य होवोनी पहाता आनंद हूय मनी शांती, संतुष्टी वाटे!! तयाचरणी लीन होवोनी प्राणीमात्रांशी वैरभाव टाकोनी कर्म करी जो ईशस्मरोनी एकरूप होई आनंदे विश्वरूप दर्शनी!! (संदर्भ : श्रीमद भगवत गीता – अध्याय ११) साभार : सुगंध बकुळ फुलांचा किंवा आपल्याला सर्वांना समजेल अशा बॉलीवूडच्या भाषेत सांगायचे झाले तर मुझको देखोगे जहातक, मुझको पाओगे वहा तक साभार: आवाज:सुरेश वाडकर, संगीत:रवींद्र जैन, दिग्दर्शक:राजकपूर अशी हि दिव्य दृष्टी तुम्हा आम्हा सर्वांना मिळो हीच तया “विराटरुपी" "अनंत” "सर्वेश्वर" भगवंताला प्रार्थना माझी सही सुद्धा हेच सांगते: पहा

मुख्य देवता स्वर्गात सिंहासनारूढ असते, अन्य कनिष्ठ देवता किती ही आपसांत भांडत असल्या तरी मुख्यदेवतेचे सिंहासन आपल्या पूर्ण ताकदीने उचलून धरतात.
हे त्यांनी स्वतः पाहिलंय का? ते स्वर्गात केंव्हा गेले होते? (आणि हे सगळं सांगायला परत कोणत्या मार्गानं आणि वाहनानं आले?)
त्याच प्रमाणे मुख्य देवते जवळ ब्रम्हास्त्रापेक्षा ही घातक असे ‘शुकास्त्र’ असते.
या अस्त्राचा प्रताप (जनसामान्यांना ठाऊक असावा पण) तो स्वामीजींना कसा कळला?
मुख्य देवता बनण्यासाठी शुकास्त्र हे साधावेच लागते.
म्हणजे नक्की काय करायच असतं? (सामान्यतः अस्त्र असलं की झालं, बाकी काही साधावं लागू नये)
शुकास्त्राच्या पाशात अडकून, कनिष्ठ देवता मुख्य देवते समोर हात जोडून उभ्या राहतात आणि तिचे सिंहासन उचलून धरतात.
सिंहासन उचलून धरणं तीन शिफ्टमधे चालतं का? आणि हात जोडणं आणि सिंहासन उचलणं एकावेळी कसं जमतं? समजा त्यांनी सिंहासन सोडलं तर मुख्य देवता पडेल काय? शुक्रास्त्राच्या पाशात इतका वेळ अडकून राहणं याला स्टे-ऑन म्हणतात काय?
दुसरीकडे पराजित देवतांना स्वर्गातून हाकलून दिल्या जाते अश्या देवतांची भक्ती करणार्याचा विनाश निश्चित असतो.
सगळे सिंहासन धरतात म्हटल्यावर युद्ध कसे खेळतात? आपले वय किती असावे?

सौ. पूजा करीत होती. चहा मिळायला वेळ लागणार, सहज भगवद्गीता चाळत होतो आणि या श्लोकांवर लक्ष गेल. मग भन्नाट विचार डोक्यात घुसले. खरं तर मी विचार करतच नाही आणि मला ते जमत ही नाही. विचार केल्यावर असे लिहिणे शक्यच नाही. मनावर घेऊ नका गम्मत म्हणून वाचा. बाकी वय म्हणाल तर माझे पोर ही म्हणतात 'तुमचे वय केव्हा वाढणार' अजूनही टाॅम-जेरी, सारखे कार्टून पाहतो. असो

विचार केल्यावर असे लिहिणे शक्यच नाही. मनावर घेऊ नका गम्मत म्हणून वाचा.
आणि
बाकी वय म्हणाल तर माझे पोर ही म्हणतात 'तुमचे वय केव्हा वाढणार' अजूनही टाॅम-जेरी, सारखे कार्टून पाहतो.
देव हा बालवयाचा आणि मजेत घ्यायचाच विषय आहे *mamba*

बर्‍यापैकी गोंधळ आहे असे वाटते. समर्थांनी मुख्य देव अथवा थोरला देव ही संकल्पना फार विस्तृतपणे विषद केली आहे. (तशी ती अन्य ग्रंथात देखील असेलच ! ) दासबोधातील दशक ६ - देवशोधन ते दशक ८ /९ - देवदर्शन या समासात ही संकल्पना अगदी व्यवस्थित स्पष्ट केली आहे. समर्थांचा राम हा दाशरथी राम जितका आहे त्याही पेक्षा त्यांनी अनेक वेळा आत्मा रामाचा संदर्भ दिला आहे. अगदी मनाच्या श्लोकात देखील हा विषय आलेला आहे. ब्रह्मा - विष्णु - महेश हे देखील मुख देव नाहीत. खरा मुख्य देव एकच एक - निर्गुण , निश्च्ळ परब्रह्म! मुख्य देवास जाणावें| सत्य स्वरूप वोळखावें |नित्यानित्य विचारावें| या नांव ज्ञान ||५-६-२|| देव जाले उदंड| देवांचें मांडलें भंड |भूतादेवतांचें थोतांड| येकचि जालें ||११-२-२०|| मुख्य देव तो कळेना| काशास कांहींच मिळेना |येकास येक वळेना| अनावर ||११-२-२१|| आणि मनाच्या श्लोकात आणखी स्प्ष्टपणे - विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी। परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥ हरू जाळितो लोक संहारकाळी। परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥ जया मानला देव तो पुजिताहे। परी देव शोधुनि कोणी न पाहे॥ जगी पाहता देव कोट्यानुकोटी। जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥ तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले। तया देवरायासि कोणी न बोले॥ जगीं थोरला देव तो चोरलासे। गुरूवीण तो सर्वथाही न दीसे॥१७९॥

ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | यांसी निर्मी जो थोर | तो ओळखावा सर्वेश्वर | नाना यत्ने || अशी बहुतेक समर्थांचीच ओवी आहे. बाकी इस्कॉनवाले पर्सनल गॉडचे स्तोम उग्गीच माजवतात हे मत आहे.

इस्कॉन वाले YZ आहेत ... कैच्याकै लिहितात ... मागे एकदा एस्कॉनचे "कृष्ण " हे पुस्तक वाचयला घेतले त्यात "नायं आत्मा बलहीनेन लभ्यः" ह्याचे मराठीत भाषांतर "बलरामाच्या कृपेशिवाय आत्मतत्त्व समजणार नाही" असे केले होते ... =)))) हसता हसता गादीवरुन पडलो ...तेव्हा ते पुस्तक ही हातातुन पडले ते आजवर उचललेले नाहीये :D शिवाय हे वाचल्यावर मी एक क्वोटेबल क्वोट टाकला होता ... "If you are wishing to Join ISKON and follow their path , I would suggest you , better to convert to any other religion ... Even the path of Paganism has better chance of enlightenment than this westernized version of Hinduism " यं शैवास्समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटवः कर्तेति नैयायिकाः । अर्हन्नित्यथ जैनशासनरताः कर्मेति मीमांसकाः सोऽयं वो विदधातु वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो हरिः ।।

सहमत. या इस्कॉन वाल्यांच्या 'गीता जशी आहे तशी' मधे ( हे चोपडे हल्लीच्या पाश्चात्त्य विद्याविभूषितांमधे लोकप्रिय आहे म्हणे) 'निष्काम कर्म' चा अर्थ "प्रमाणित गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे" असा दिलेला आहे. 'प्रमाणित गुरू' म्हणजे अर्थातच इस्कॉन वाले. हे वाचल्यावर आम्ही सुद्धा ते पुस्तक हाती धरलेले नाही.

आत्मा बलहीनेन लभ्यः" ह्याचे मराठीत भाषांतर "बलरामाच्या कृपेशिवाय आत्मतत्त्व समजणार नाही" असे केले होते ...
अगागागागागागागा =)) =)) =)) धन्य ते प्रभुपाद स्वामी आणि धन्य ते श्रीकृष्ण यादव =)) _/\_ पण बाकी कै म्हणा, गोर्‍यांना चांगलेच नादी लावलेय त्यांनी. असले कैक नमुने भरले असले तरी बाकी तो प्रकार तसा ठीकच आहे. अन महाभारतवाली चित्रे कसली जबरी काढतात राव. बेंगळूरुला यशवंतपूर इथल्या इस्कॉन टेंपलमध्ये एखाद्या चर्चमध्ये असावीत तशी कृष्णादींची चित्रे आहेत, दिल लय खूष झाला बगा. पण शेवटी वायझेडपणा जात नाही हेही तितकंच खरं. पर्सनल गॉड, व्हेजनॉनव्हेज, इ. बद्दलची हास्यास्पद मते वाचून त्यांची कीव करावी तेवढी थोडीच.

@धन्य ते प्रभुपाद स्वामी >>> =)) ह्यांचे ते सगळे स्वामी...आहेत कि अत्ताच गेलेत??? की गेले नाहीत म्हणून स्वतःचच सुतक स्वतःच्याच चेहेर्‍यावर आलय? (मृतपूर्व आत्म-अशौच म्हणून?) अश्या फ्रेममधले असतात.. मी त्यांना गोपिचंद(न)-मृत्युं..जयस्वामी म्हणतो! =)) ह्या पंथाला आधुनिक मनुवादी हे नाव हंड्रेडपरसेंट शोभतं!

ह्यांचे ते सगळे स्वामी...आहेत कि अत्ताच गेलेत??? की गेले नाहीत म्हणून स्वतःचच सुतक स्वतःच्याच चेहेर्‍यावर आलय? (मृतपूर्व आत्म-अशौच म्हणून?) अश्या फ्रेममधले असतात.. मी त्यांना गोपिचंद(न)-मृत्युं..जयस्वामी म्हणतो! बौद्धिक दिवाळखोरीचे उत्तम लक्षण ! ज्या व्यक्तिच्या अध्यात्मिक पात्रतेच्या जवळपास देखील जाण्याचा प्रयत्न आपल्याचे होणे नसेल तर फक्त असभ्य भाषेतच लिहुन अशा प्रकारे त्या व्यक्तिरेखेवर थिल्लर टिका करण्या पलिकडे काहीही साध्य करता येत नाही हे या वरील प्रतिसादातुन जाणवले. प्रभुपाद स्वामींचे गुरु भक्तिवेदांत सरस्वती ठाकुर यांनी चैतन्य महाप्रभुंच्या {जाके देखो तारे कहो कृष्ण उपदेश }या संदशाचाच प्रसार त्यांनी करायला सांगितला. त्याचप्रमाणे कुठलाही वैयत्किक लाभ,स्वार्थ आणि मोह न ठेवता प्रभुपाद स्वामींनी श्रीकॄष्णाचे नामसंकिर्तनादी कार्य जगभर पसरवले आणि जग भरातील अनेक लोकांना आध्यात्माची,भक्तीची ओळख करुन दिली.त्यांची पुस्तके नुसतीच बेस्ट सेलर नसुन त्यांचा अनेक अभ्यास क्रमात देखील समावेश केला गेला आहे, यावरुन या लेखकाची {अर्थातच प्रभुपाद स्वामींची} या विषयातील पात्रता तसेच सामर्थ्य देखील लक्षात येते. असो... * मी कुठल्याही प्रकारे इस्कॉनशी संबंधीत नाही, परंतु एक वाचक म्हणुन प्रभुपाद स्वामींचे कार्य हे अवर्णियच आहे असे नमुद करु इच्छितो.

आपल्या क्षणैक विनोदनासाठी दुसर्‍यांच्या श्रद्धा मूल्यांची अश्लाघ्य थट्टा करणे हा दंड्नीय अपराध असला पाहीजे. आम्ही १७ वर्षापूर्वी बर्फाळ स्वीडन आणि नोर्वेमधे इस्कॉन च्या कृपेने जिवंत राहीलो अन्यथा अभक्ष्य भक्षणाशिवाय पर्याय नव्हता. They are more Indians than Indian ! * मी ही कुठल्याही प्रकारे इस्कॉनशी संबंधीत नाही,

इस्कॉनच्या इतर लीला माहीत नाहीत... असे वाटते! बाकी एखाद्या व्यक्ति पंथाने हे तथाकथित चांगले काम का केले? त्या पंथाची मूल्य कोणती? त्याचा इहलौकिक जीवनावर घडणारा परिणाम कोणता? याचीही माहिती ठेवीत चला! आध्यात्माचे क्षेत्रच डेंजर...२ कामे चांगली केली..की तोच "त्याचा" मेसेंजर! असो...

मी तर म्हणतो की इतर लीला सोडुन द्या हो इस्कॉनच्या ...पण "नायं आत्मा बलहीनेन लभ्यः" चे भाशांतर "बलरामाच्या कृपेशिवाय आत्मतत्व प्राप्त होत नाही " हे म्हणजे सरळसरळ लोकांच्या डोळ्यात धुळ फेकणे झाले ... अहो खुद्द बलरामही पोट धरुन हसेल ह्या भाषांतरावर =)))) स्वतःचे मत पटवण्यासाठी असत्याचा आधार घेणे ही हिंदु संस्कृती निश्चितच नव्हे ! ह्या असल्या , लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेवुन प्रसार पावलेल्या पंथापेक्षा त्या अफ्रिकेतील जिंगालाला जिंगालाला करणार्‍या आदिवास्यांचा संप्रदायही कैक पटीने श्रेश्ठ आहे !! हिंदु संस्कृती खरच समजुन घ्यायची असेल तर रामकृष्ण मठाचा आधार घ्यावा , त्यांची भाष्आंतरे ही असल्या परसनल बायस पासुन कोसो मैल दुर असतात ...किंव्वा भगवद गीतेवर "जशी आहे तशी " ह्यापेक्षा टिळकांचे गीतारहस्य हे करोडो पटीने उत्तम पुस्तक आहे ... भाशांतरांच्या बाबतीत चिन्मय मिशनचेही नाव ऐकुन आहे ... किंव्वा इशा फाऊडेशनही फार चांगले काम करत आहेत ...

इस्कॉन म्हणजे आजची अध्यात्मिक ईस्ट इंडिया कंपनी आहे. http://www.youtube.com/watch?v=4qlX3P4B1q8

हिंदु संस्कृती खरच समजुन घ्यायची असेल तर रामकृष्ण मठाचा आधार घ्यावा
रामकृष्ण मिशनने आम्हाला हिंदू म्हणू नये अशी भूमिका घेतली होती ! In 1980, in an act that caused "considerable debate" within the order, the mission petitioned the courts to have their organisation and movement declared a non-Hindu minority religion.[35] Many generations of monks and others have been of the view that the religion propounded and practised by Ramakrishna and his disciples is very much different from that practised by Hindu masses then. They held that the Ramakrishna's "Neo-Vedanta" is a truer version of the ideals of Vedanta. So it was honestly felt that this makes the followers of Ramakrishna eligible for the legal status of "minority". It is possible that the immediate cause for the appeal for minority status was because there was a danger that the local Marxist government would take control of its educational institutions unless it could invoke the extra protection the Indian constitution accords to minority religions. While the Calcutta High Court accepted Ramakrishna Mission's pleas, The Supreme Court of India ruled against the Mission in 1995. तरीही रामकृष्ण मिशनची पुस्तके चांगली असतात यात दुमत नाही. पण हा पंथ निर्गुण उपासना करतो आणि ठाकुरजी शारदा देवी आणि विवेकानंदाची मूर्तीपूजा हे केवळ अपवाद आहेत. खरा भर नरामधल्या नारायण सेवेवर आहे.आणि अतिशय समयोचित काम मिशनद्वारे केले जाते. अबूजा माड येथील नारायणपूरचा आश्रम पाहून थक्क झालो होतो. केवळ अशक्य काम करतात हे लोक ! भाषांतराच्या बाबतीत - मूळ संहीता वाचून आपल्याला भिडतो तो खरा अर्थ ! गीतारहस्याबाबत ही काही आक्षेप आहेतच. केवळ आचार्यांवर टिका करावी असाच हेतू होता की काय अशी शंका येते. पण आपण काही बोलणे म्हणजे पींडीला पाय लावण्यासारखे आहे ! गीतेबाबतीत - मी माऊली प्रमाण मानतो.. कधी कधी तिथेही पूर्ण कळतच नाही .. मग आपल्या विनोबांची गीताई .. ते तर समश्लोकी... फार बोलत नाहीत फक्त अंगुलीनिर्देश करतात.. तिथेही जमले नाही तर गीताप्रेस वाल्यांचा ठोकळा ( रामसुख दास ).. तिथे ही अडकलो तर मात्र शरणागती ...! गीतारहस्य जोडीला घेतो पण टिळकमहाराज काही काही श्लोकांत तर्ककर्कश वाटतात ..! कधी कधी वि य कुलकर्णी ( गीता धर्म मंडळ ) पण छान समजावून सांगतात. असे सारे कडबोळे आहे.. एक पुस्तक प्रमाण मानता येणे अवघड आहे! परवा स्वधर्मे निधनं ला जाम अडकलो होतो, स्वधर्म म्हणजे काय ? काही केल्या पटेना.मग रामसुखदासांनी सोडविले! म्हणजे मला कळले असे वाटले ! बाकी शब्द बापुडे केवळ वारा.. ते फक्त अर्थाकडे निर्देश करतात, पुढचे आपले आपण .. एकला चलो रे !

हा प्रतिसाद आवडला . मला स्वतःला हा "Neo-Vedanta" पंथ आवडतो / पटतो ! किंबहुना हाच खरा "आर्य" "सनातन" "वैदिक" "हिंदु" धर्म आहे असे माझे वैयक्तिक मत आहे ! आज शंकराचार्य / माऊली / एकनाथ / रामदास / कबीर ह्या पैकी कोणीही असते तर त्यांनी रामकृष्णसंप्रदायातील लोक जे सांगतिल तेच सांगितले असते असे माझे मत आहे ...श्रध्दा आहे ... किमान एकनाथांबाबत तरी मी १००% शुअर आहे :) बाकी हेच एक खरे ...बाकी संप्रदाय खोटे असे माझे मत मुळीच नाही ...आणि बहुध्दा रामकृष्ण संप्रदायाचेही नसेल ... पण इस्कॉन वाले जे सांगतात ते सरळ सरळ खोटे बोलणे आहे त्यामुळे त्यांचा मी निषेध करतो . बाकी एकदा ह्या विषयावर आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे

इस्कॉनच्या इतर लीला माहीत नाहीत
खरेच माहीत नाहीत ! काही प्रकाश टाकता आला तर समजून घेण्यास मदत होईल. हवे तर व्य. नि. करा.

मलाही सांगा... मला वाटतं {नक्की नाही} विकासरावांनी मध्यंतरी इस्कॉनचे लोक कसे प्रचार करतात त्याचे व्हिडीयो दिले होते, ते थोडेसे पाहिले होते आणि मलाही तो प्रकार आवडला नाही. एखादी संघटना /संस्था इं. जर चुकीच्या पद्धतीने जात असेल तरी ती उभारणार्‍याचा त्यात दोष कसा ? त्यांच्यावर अयोग्य भाषेत टिका करणे हे चुकीचेच आहे.

ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | यांसी निर्मी जो थोर | तो ओळखावा सर्वेश्वर | नाना यत्ने || अरे देव दानवा नरे निर्मिले .....रे बाबानो

भो मिपाकर्हो (आय्ला ह्ये लय भारी सुर्वात जमलि बर्का), आमाला तर हे विवेकपटाईत लई पटाईत वाटत्यात ! जर्रा मुख्य देव्ता म्हंजे मॅडम आनि युव्राज आनि उप्देव्ता म्हंजे त्येंच्याबाजूचा गोताव्ळा आसं इचार करून बगा. आमाला तर लेखात अजून येक आय्डिया दिसतुया. म्हंजे केजरीवालला (उप्देव्ता) मत दिल तर त्येचा खर्रा फाय्दा मुख्य देव्तेलाच व्हनार आसा. बगा. तुमी लय हुश्शार. तुमी डायरेक आद्यात्मात का कायते घुस्नार आनी लई डिप्पिकल्ट आस बाजू घेवुन नाय्तर इरुद्द बोलनार. आमी बाबा आडानी. आमी आसा इचार कर्तू.

कोण म्हणतो तुम्हास्नी अडाणी? आमच्यापेक्षा ही पुढे गेले हो तुम्ही. बाकी भक्तलोक आजकाल मुख्य देवतेच्या शोधात संभ्रमात इकडे-तिकडे भटकत आहेत. त्यांची अध्यात्मिक(?) पातळी उंच असेल तर सिंहासनावर बसणाऱ्या मुख्य देवतेला ओळखू शकतील आणि मग काय 'स्वर्गसुख' आहेच. अन्यथा...

हैला, असो, १ बि.एच. वरुन २ बि ला जाण्यास कुणाला आळवावे, मुख्य वा़ डेमी. असो, खुप दिवस झाले शुकास्त्र लेख आला नाही.( मुवि लक्ष द्या जरा)

मला वाटते कि त्यांनी मुकेश अम्बानिबद्दल रूपकात्मक लिहिले आहे. मुकेश अंबानी मुख्य देवता आणि भाजप, काँग्रेस कनिष्ठ देवता. कोणालाही मत दिले कि ते मुकेसभौनाच पोचते. :)

शुकास्त्र म्हणजे काय, हे ठाऊक नाही, पण 'शुक-शुक' अस्त्रात भलेभले ही सापडतात, जसे विश्वामित्र मेनकेच्या शुक-शुकास्त्रात सापडले, शांतनु गंगेच्या शुक-शुकास्त्रात सापडला, वगैरे. . ... बाकी या लेखातील मुख्यदेवता म्हणजे मोठ्या फिरंगी बाई वगैरे आम्हालाही वाटले.

चित्रगुप्त साहेब 'सुंदर चित्रे बघून मलाही पहिल्यांदा 'शुकास्त्र' नावाचे अस्त्र होते हे कळले. बाकी मुख्य देवता कोण आहे सध्या तरी कुणालाच माहित नाही. कळेल थोड्या दिवसात. पण जो आज ओळखण्यास समर्थ असेल. तो निश्चित स्वर्ग सुख भोगणार.

आपल्याला हा श्लोक अपेक्षित आहे का ?
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ||

देव ह्या विषयावरच्या कोणत्या धाग्यात हे सांगाव ते कळेना.. पण सांगायची खुमखुमी आहेच.. काल "Trapped In Kedarnat" हा कार्यक्रम पहात होते.. त्यात केदारनाथ मध्ये अडकलेल्या लोकांचे अनुभव दाखवत होते.. एक अनुभव फारच "बोलका" होता.. ३-४ दिवस तिथे अडकलेला प्रवासी सांगत होता.. "मी परत कधीच जाणार नाही केदारनाथ ला.. देवा पेक्षा जीव महत्वाचा.. माणुस जिवंत राहिला तर देव.. जीव नसेल तर देवाला कोण विचारतो..?"

काही आयडी भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करणार्‍यांविरुद्ध घाणेरडी भाषा का वापरतात? की हे आयडी विचारवंत आहेत? विचारवंत असतील तर सोडून देऊ कारण विचारवंत होण्याची पात्रता ती पूर्ण करत आहेत असे समजु !!