Welcome to misalpav.com
लेखक: विकास | प्रसिद्ध:
आत्ताच बातमी वाचली: ज्येष्ठ कवी, संगीतकार सुधीर मोघे यांचे निधन त्यांचे कविता समजण्याच्या वयात काही लाईव्ह कार्यक्रम. दूरदर्शनवर शांता शेळके तसेच इतर तत्कालीन ज्येष्ठ साहीत्यिकांबरोबरील कार्यक्रमात पाहील्याने आणि नंतर त्यांच्या गाण्यांबरोबरच मुख्यत्वे "पक्षांचे ठसे" या काव्यसंग्राहातल्या कविता वाचल्याने डोक्यात राहीले... हा खेळ सावल्यांचा, फिटे अंधाराचे जाळे, सारखी चित्रपट गीते, "सखी मंद झाल्या तारका", "दिसलीस तू फुलले ऋतू" सारखी अवीट गोडीची भावगीते, एकाच या जन्मी जणू, अधांतरी, माझे मन तुझे झाले, सारखी मालीकांची गीते.. काही गीतांना त्यांनी संगित दिग्दर्शन देखील केले आहे. वास्तवीक साहित्यिकांचे/विचारवंतांशी नाते त्यांचे वाचले ऐकलेले असल्याने बहुतेकदा तेव्हढ्यापुरतेच असते. सुधीर मोघ्यांच्याबाबतीत देखील तेच आहे. त्यांचे फोटो बघताना अथवा इकडे-तिकडे क्लिप्स बघताना त्यांच्या चेहर्‍यावर कायम समाधान दिसायचे, पण कुठेतरी त्यांचे यश हे ज्या काळात ते उदयास आले त्या काळाच्या सीमेमुळे असेल कदाचीत पण मर्यादीतच राहीले असे वाटते. त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांचीच एक आठवणारी कविता खाली देत आहे. त्यांनी (का त्यांच्या सोबत बसलेल्या सुधीर गाडगीळांनी) एकदा कार्यक्रमात ज्या संदर्भाने वाचली त्यावरून ती सावरकरांवर लिहीली असावी हे समजत होते. पण कुठेतरी वाटते की कुठल्याही ध्यासाने/ध्येयाने वेड लागलेल्या व्यक्तीला हे अनुभवयास मिळते. भाषा-विचार समृद्ध करणारा साहित्यिक ही त्यातलीच एक जातकूळ...
ही तक्रार नाही, की गार्‍हाणे नाही, पश्चाताप तर अजिबात नाही आहे फक्त वस्तुस्थिती, तुझ्यासाठी केली सार्‍या आयुष्याची माती
खुणावणारे राजरस्ते तसेच जाउंद दिले, तळहातावरचे ऋतुंचे पक्षि अलगद सोडून दिले चालत राहीलो फक्त एका अटळ आवेगा पाठी...
उकळ्णार्‍या काळोखाने प्राण मंत्रून टाकले, स्फुरणारे उत्सुक ओठ घट्ट शिवून घेतले पापण्यांना दिली सक्त सजा, एका थेंबासाठी...
जे झाले ते चांगले का वाईट? खरंच कळत नाही, आभाळाचे दान टाळून टळत नाही श्रेय एकच, अपादमस्तक तुझी दाहक मिठी...
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आत्ताच फेसबुक वर कळलं व यु ट्यूब वर जाऊन सुधीर मोघ्यांचं माझं आवडतं गाणं ऐकत बसलो. “मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल” मनाबद्दल काय अजून लिहायचं राहू शकतं? भावपूर्ण श्रद्धांजली

. अत्यंत संवेदनाशिल कवीला भावपूर्ण श्रद्धांजली. कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही, पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही, जुळले अतूट नाते, दोन्ही मनामनांचे, ...घर दोघांचे घरकुल पाखरांचे या मोघ्यांच्या ओळींनी तिच्याशी नातं जपतांना सतत साथ दिली. मग त्या नंतर आम्ही कितीही भांडलो, पार वाट्टेल त्या थराला वाद गेले तरी एकानं हात पुढे केला की दुसर्‍यानं तो बेशर्त हातात घ्यायचाच असं कायमचं झालं.

"बोलावल्यावाचुनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का" कवी, गीतकार, संगीतकार, गायक आणि चित्रकार कलावंत हरपला.

कवी सुधीर मोघे यांची एक आठवण सुमारे १८/१९ वर्षापूर्वी दापोली कर्दे येथील एका निवांत हॉटेल मध्ये मोघे साहेब आणि त्यांचे मित्र सुधीर नेवूर्गावकर यांची अचानक भेट झाली. त्यावेळी त्यांच्या कविता माहित होत्या पण चेहऱ्याने ओळखत नव्हतो. ती संध्याकाळ आणि दुसरा दिवस पूर्ण वेळ मोघे पती पत्नी ,त्यांचे मित्र आणि त्यांच्या पत्नी आणि आम्ही तीघ (मि, पत्नी व मुलगी) भरपूर गप्पा ,काव्य शास्त्र विनोद आणि खाणे पिणे असा छान सहवास लाभला. इतका मोठा कवी आणि प्रसिध्द व्यक्तिमत्व पण गर्वाचा लवलेश नाही, त्यांचा सहवास लाभलेले क्षण आमच्या साध्याशा आयुष्यातील अनमोल असे क्षण होते. माझ्या मुलीने त्यांना कवी अनंत काणेकर यांची एक कविता "मी कागद झाले आहे " पूर्ण म्हणून दाखवली त्याचे त्यांनी खूप कवतुक केले होते.

त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1939 चा . म्हणजे ७५ वर्षांचे होते. किर्लोस्कार वाडी ला त्यांचे वडील कारखान्यात काम करत व कीर्तनकार देखील होते. ज्येष्ठ बंधू श्रीकांत मोघे हे त्यांच्या पेक्षा दहा वर्षानी मोठे आहेत असे त्यांच्या ब्लॉग वरून दिसते. गदिमा यांच्या जातकुळीतले हे गीतकार , कित्येक सुंदर गाणी मनात घर करून राहिली आहेत. रहातील. त्याना श्रद्धांजली! http://sudheermoghe.blogspot.in/2011_12_01_archive.html

सखी मंद झाल्या तारका, दिसलीस तू फुलले ऋतू, दयाघना, सांज ये गोकुळी.. अनेक सुंदर गाणी.. त्यांच्या गाणी आणि कवितांमधून ते कायमच आठवत राहतील.. श्रद्धांजली..

गुज ओठांनी ओठांना सांगायचं, एका पावसात दोघांनी भिजायचं. गोमू संगतीनं, जरा विसावू या वळणावर, झुलतो बाई रासझुला या आणि अशा कितीतरी गीतांची आठवण होतेय. :( -दिलीप बिरुटे