Welcome to misalpav.com
लेखक: शुचि | प्रसिद्ध:
वीणा, आनंद दोघांनीही घाईघाईनी नाश्ता उरकला अन पायात कसेबसे बूट्/सँडल्स चढवून दोघेही आपापल्या वाटांनी कचेरीकडे पळाले. वीणा बसमध्ये चढली तरी डोक्यात विचारांच चक्र अव्याहत चालूच होते. - हं पांघ्रुणांच्या घड्या तर केल्यात पण रचून ठेवायला विसरले.- जाऊ देत संध्याकाळी पाहीन. - बरं आज भाजीही भेंडीची, आनंदच्या नावडीची आहे : ( - प्रयत्न तर केला आहे मसालेदार बनवायचा पण त्याला नेहमीप्रमाणे नाहीच आवडणार. - हे अस्सं आहे - कुठे कुठे मी एकटी पुरी पडणार? - उन्नीस्-बीस होणारच पण आपण जरा कमी पडलो की मन कुरतडत रहातं. मनाला कोण समजावणार? : ( - हं एकदा ऑफीसात पोचलं की स्नेहाशी बोलून मन हलकं करता येईल - पण सगळच नाही ना सांगता येत स्नेहाला - म्हणजे तसं दोघी खूप व्यक्तीगत पातळीवर बोलतो पण आर्थिक अडचणी सांगायला संकोच वाटतो. अन कुठेशी ते सुभाषितही वाचलं आहे - कामविषयक, अर्थ विषयक अन अजून काहीतरी अगदी निकटच्या मित्रासही बोलू नये का काहीसं - जाऊ देत. प्रत्येक नात्याला सीमा ही असणारच. ________ तो दिवस नेहमीच्या घाई-गडबडीत गेला.संध्याकाळी दोघेही थकून घरी आले. वीणाला आनंदचा हेवा-असूया वाटत राहीली. - हं आला की तंगड्या पसरुन, टीव्ही लावून बसेल.- बातम्या होई-होईपर्यंत गरमागरम जेवण हजर आहीच आयतोबांसमोर : ( - जरा विचार दिवस कसा गेला.- पण नाही. आनंदच्याही मनात याच प्रकारचे विचार चालू असत - हीला कुठे फ्लॅटचे हप्ते भरावे लागतायत? - बाहेरची कामं मीच पहायची. - ऑफीसात बॉसवर इम्प्रेशन मारताना जीव मेटाकुटीला येतो. - प्रत्येक जागी कट-थ्रोट कॉम्पिटीशन : ( -जरा ढीलं पडलं तर नोकरीचे वांधे. ते जाऊ दे आज सान्यानी काहीतरी नवीन पदार्थ दिलाय - २ लाडू आहेत म्हणाला - डोळा मारत म्हणे "रात्री झोपायच्या आधी खा." - येडपटच आहे, मी ठरवेन ना कधी खायचं ते. अरे बापरे व्हायाग्रा सारखं तर काही :ऑ - नाही नाही साने डिसेंट आहे - सांगीतल्याशिवाय तो उगाच काही देणार नाही. ___________________ दोघांनी रात्री ती वडी खाल्लीए. स्ट्रॉबेरीसारखी पण गोड चवीची ती वडी चविष्ट होती. पण सकाळी उठले तेव्हा अजबच घटले होते. वीणा अन आनंदच्या आत्म्यांची अदलाबदल झाली होती. अरे बापरे!! भल्या पहाटे, फुल पंख्याखाली दोघांनाही घम फुटला. पण सांगणार कोणाला. कॅज्युअल घ्यावी का न घ्यावी या विचारांती शेवटी दोघांनीही तो दिवस रेटायचे ठरविले. ______________ आनंदचा (वीणाच्या शरीरातील) दिवस :- वीणाच्या शरीरात शिरलेल्या आनंदला विचीत्र वाटत राहीलं. पण खरी डोकेदुखीला सुरुवात झाली ती बसप्रवासात्.अर्धे धक्के खात अन अर्धे चुकवत वीणा कशीबशी ऑफीसात पोचली. आनंदला पहील्यांदा सामान्य साध्या गोष्टीतल्या आनंदाचे अन आत्मविश्वासाचे मोल कळले. ताठ मानेनी, छातीवर हाताची घडी अथवा पिशवी न दाबता , मोकळेपणाने वावरण्यातला आनंद. पण असोच. ऑफीसमध्ये गेल्यागेल्या स्नेहानी वीणाला रेस्टरुम मध्ये खेचले अन गप्पांना सुरुवात केली. मग काल काय विशेष झालं, आज डब्यात काय आणलय ते फेसबुकच्या स्टेटसपर्यंत सगले विषय त्यात आले. आनंदला मात्र हा "स्मॉल टॉक" डोकेदुखी वाटू लागला म्हणजे पाल्हाळ कशाला लावायचं थेट मुद्द्यावर यायचं की. अन त्याच्या पुरषी स्वभावाला अनुसरुन प्रत्येक लहान सहान गोष्ट शेअर करण्यात त्याला अजीबात गम्य वाटेना. स्नेहाला कळेचना की आज वीणाला झालय तरी का. : ( दिवसभरात तिने मेसेंजरवर कानोसा घ्यायचा प्रयत्न केला पण वीणाच्या शरीरातील आनंदने दाद दिली नाही. मीटींगमध्येही आनंदला त्याचा व्हॅलीड मुद्दा दुप्पट आवएशाने मांडावा लागला.म्हणजे त्याला तरी तेवढा आवेश दुप्पट वाटला. अन तरीही आज कंठ फुटल्याबद्दल त्याची टिंगल झाली ती झालीच. : ( एकंदर दिवस व्यस्त/तक्रारखोर अन उगाचच डिफेन्सीव्ह्/आवेशपूर्ण गेला. ___________________ वीणाचा (आनंदच्या शरीरातील) दिवस - वीणा वेळेवर ऑफीसात पोचली.काम खूप होतं. पण मुख्य तिला हा अनुभव आला की केलेल्या कामाचं अ‍ॅप्रिसिएशन नव्हतं. आनंद काम करणारच नव्हे केलच पाहीजे हे गृहीतच धरलं होतं. काम संपल्यावर अजून ढीगभर मिळालं तेही थॅकलेसली.दिवसभरात तिला ३-४ प्रॉस्पेक्टीव्ह एंप्लॉयर्स चे कॉल आले व ३-४ फायनॅन्शिअल अ‍ॅड्व्हायझर्स चे. तिला हे नीट कळलं की आनंदने स्वतःला किती अपमार्केट अन अप-टू-डेट विथ टेक्नॉलॉजी ठेवलं आहे. बचतीचा तसेच इन्व्हेस्ट्मेंटचा किती विविध अंगांनी तो विचार करतो आहे. हे सारम तिच्यासाठीच नव्हतं का? तिला बेनेफिशिअरी करुन तो थांबला नव्हता तर त्याच्या अकस्मात मृत्यूपश्चात नीट आर्थिक कुशनची तजवीज त्याने तिच्यासाठी केली होती. खरं तर वीणाला उगाचच गुन्हेगार वाटू लागलं. इतका विचारी, सूज्ञ अन धोरणी नवरा मिळायला भाग्य लागतं असे विचार तिच्या मनात डोकावू लागले : ) __________________ संध्याकाळी दोघे घरी आली ते एकमेकांची नजर चुकवतच्.चहा घेऊन वीणा आंघोळीला गेली अन अचानक दोघांना अंधेरी आली अन डोळे उघडतात तो परत सर्व पूर्ववत झालेले आढळले. पण या एका दिवसाने उलथापालथ केली होती. एकमेकांचे विश्व अनुभवायला मिळाले होते अन त्या एका दिवसाने दोघांचे भावविश्व पार बदलून टाकले होते. दोघेही मनाने अतिशय जवळ आलीली होती. अन हेही कळून चुकली होती - "जेणो काम तेणो भाय दुजा करे सो गोता खाय" : )
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

फालतू आणि घिसीपिटी. जेणो काम तेणो थाय. शी:. म्हणजे बचत/ बायकोसाठी पैशाची तजवीज हजबंडनो काम? आणि स्वयंपाकपाणी बायकोचे? धन्य आहे . या जमान्यातली आहे गोष्टं की मागच्या? मागच्याच असणार कारण आत्मा बदलेपर्यंत बायकोला नवर्याने काय काय आर्थिक तरतूद केलीय याचा पत्ता नसणे या काळातले दिसत नाही.

पण थबकलो की अजुन तिकडे क्विनचा लोच्या विड्रा झालेला नसताना लगेच पुन्हा कशाला नवा राडा करा, त्यात पुन्हा सर्व पोसीटिव व निगेटीव प्रतिसाद मोजणींची टांगती तलवार डोक्यावर असताना तो धोका नकोच वाटले.

सरसकटीकरण करण्याबद्दलचे डिस्क्लेमर टाकायचे राहीले आहे. बाकी शी! फालतू, घिसीपीटी वगैरे तीन तीन विशेषणांनी इन्टेन्सिटी कळली आहे. पण अजूनही काही जोडपी पारंपारीक साच्यात अडकलेली असू शकतात अन फक्त त्यांच्याबद्दल ही कथा आहे.

अय्या खरंच? फक्तं 'काही पारंपारिक' जोडप्यांबद्दलच लिहायचंय का? मला वाटलं प्रातिनिधिक वैगेरे.

अय्या वगैरे उपरोधीक लिहीण्यापेक्षा समोरच्याचं अनुभवविश्व अन त्यातून आलेले विचार समजून घ्यायचा प्रयत्न करा. पण तुम्हाला वेडावून दाखवण्यापलीकडे जाता येत नसेल तर तुम्ही तरी काय करणार म्हणा. असो.

शिवाय भारतातील सदद्यस्थिती काय आहे माहीत नाही पण अमेरीकेत बरेच नवरे काम करतात अन बायका घरी अ‍ॅड्जस्ट होताना पाहील्या आहेत. उदाहरणार्थ ५२९ - स्टुडंट सेव्हीन्ग्स प्लॅन, इन्श्युरन्स हे नवरा त्याच्या कमाई मधून करतो अन बायको एक तर नोकरी शोढून अन एच-४ , एच-१ मध्ये बदलून घेताघेता मेटाकुटीला आलेली आहे अन मग शेवटी निरुपायाने अथवा अगतिकतेने म्हणा किंवा स्किलसेट कमी पडल्याने फक्त स्वैपाकपाणी-रांधा-वाढा-मुलांना वाढवा पर्यंत मर्यादित झालेली पाहीली आहे. स्त्रीमुक्ती सगळीकडे आली असे नाहीये. अन स्थलांतरानंतरही अ‍ॅजस्ट्मेंटसमुळे कधीकधी पारंपारीक साच्याकडे लोक वळलेले आहेत. अन तरीही शीSSSS!!!फालतू, घीसीपीटी अशाही प्रतिक्रियांचे स्वागतच आहे कारण आपले अनुभवविश्व ते माझे असणार नाही ना! सिंपल! असो. इति स्पष्टीकरणाची लेखनसीमा

ज्याचा पगार जास्तं तो त्याच्या कमाईतून सेविंग करतो हे ठिक पण त्याच्या जोडिदाराला त्याबाबतीत अश्या ड्रामाटिक इवेंटशिवाय हे कळु नये हे अतीच. माझ्या कनिष्ठ मध्यमवर्गिय ते उच्चमध्यमवर्गीय अश्या अनुभवविश्वात हे कधिच आलं नाही. (अर्थात आमचा अनुभव कै परदेशातला नाही. पण जितक्या परदेशस्थ मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्गाकडूनहि असे ऐकले नाही)

होय तो इव्हेन्ट ड्रॅमॅटीक आहे हेही मान्य आहे त्याच्बरोबर शेवटचा श्लोक अस्थानी झाला आहे हेदेखील. बायकोने सेव्हींग्स्/इन्श्युरन्स याबद्दल जागरुक अन अवेअर असले पाहीजे हे मान्य आहे. पण अगदी नेहमीच्या आयुष्यातली कथा लिहीता आली नाही थोडे नाट्यमय करावे लागले.

रितेश देशमुख आणि अंतरा माळी यांनी हा प्रकार अगोदरच पुरेसा ड्रामाटिक करून ठेवला आहे. :) व्यक्तिशः मला दोघांनाही एकमेकाच्या कामाची उपयुक्तता / काठिण्य कळल्याने दोघांनिहि एकमेकांच्या जबाबदार्‍या वाटून घेतल्या असे काही लिहिले असते तर बरे वाटले असते. तुमच्या 'जेणु काम तेणो थाय , बिजा करे सो गोता खाय' या म्हणीमुळे जे पूर्वी चालत होते ते योग्यच असा चुकीचा निश्कर्ष निघतोय. त्यापेक्षा अगदी 'जावे ज्याच्या कर्मा' हे ही चाललं असतं.

बायको एक तर नोकरी शोढून अन एच-४ , एच-१ मध्ये बदलून घेताघेता मेटाकुटीला आलेली आहे अन मग शेवटी निरुपायाने अथवा अगतिकतेने म्हणा किंवा स्किलसेट कमी पडल्याने फक्त स्वैपाकपाणी-रांधा-वाढा-मुलांना वाढवा पर्यंत मर्यादित झालेली पाहीली आहे.
एवढा निरुपाय किंवा अगतिकता होण्याजोगे यात काय आहे हे कळले नाही. नवराबायको दोघांनी नोकरी करुन विशिष्ट लाईफस्टाईल परवडण्याइतके जितके पैसे भारतात कमावता येतात त्याच लाईफस्टाईलसाठी परदेशात नवऱ्याने नोकरी केलेली पुरु शकते असे मर्यादित निरीक्षणावरुन लक्षात आले आहे. शिवाय वेळ घालवण्यासाठी व्हॉल्युंटीअर वगैरे कामे करता येतात. अगदीच जमले नाही ... तर भारतात परतण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. त्यामुळे नक्की अडचण समजली नाही.

एका तर फक्त सुधारलेले जीवनमान / पैसे आदीसाठी नोकरी लागते हे गृहीतक अमान्य आहे. आत्मविकासासाठी देखील नोकरीची आवश्यकता असते. चेरॆटॆ करता येते वगैरे ठीक आहे पण शिवाय जो आत्मविश्वास स्वत:च्या पायावर ऊभे असताना असतो तो अन्य कोणत्याही प्रकाराने मिळत नाही. दुसरं मी भले हॉस्पिटल मध्ये , वृद्धाश्रमात वगैरे volunteer Karen पण माझ्या रेझ्युमेवर त्याने काय भर पडणार आहे? डाउन द लाइन बर्याच वर्षांनी माझ्या नवर्यावर अनावस्था प्रसंग ओढवला किंवा मांडी आली तर या वोलनटॆर कामाचा उपयोग तसा काहीच नाही. अन एवढं सर्व होउनही खरच काही बायका welladjusted दिसतात तर काही कुढ्या. एकदा परदेशात गेल्यावर परत यायचा निर्णय घेणेही कठीण होते. याची कारणं बरीच आहेत.

मुद्दा मान्य आहे पण एच-४ संदर्भातील अटी या सर्वत्र माहितीसाठी उपलब्ध आहेत. या अटी मान्य करुन, परदेशात जाऊन नंतर अगतिक झाल्याचा दावा करणे चुकीचे वाटते.

कालच माझ्या कलीगबरोबर ५२९-स्टुडंट सेव्हींग प्लॅन बद्दल चर्चा करत होते. तो रीसर्च मोडमध्ये आहे अन माझ्या रीसर्चचा त्याला थोडा फायदा झाला. पण त्याचीही बायको घरीच आहे. माझी नणंद नोकरी शोधून थकली अन तिच्या उदाहरणातून मी शिकले. पूर्वी मी दूर होते त्या कॉप्लेक्स मध्ये खूप साऊथ इंडीयन जोडपी होती .... नवरे माझ्याबरोबर पण बायका घरी होत्या. त्यात वाईट काही नाही. प्रयत्नांनंतर यश - अपयश आपल्या हाती नसते. पण मुद्दा हाच की बरेचदा पीपल हॅव्ह फॉलन बॅक ऑन ट्रेडीशनल सेटप. _______ अर्थात बायकोने आर्थिक व्यवहाराबद्दल जागरुक असलेच पाहीजे. बेनेफिशीअरी/कंटींजंट बेनीफीशीअरी/खाती/शेअर्स सगळच आलं मग त्यात :)

सातीशी सहमत. बा द वे, जर का फक्त एकानेच लाडू खाल्ला असता तर? विडंबनाला कच्चा माल मिळालाय बरेच दिवसांनी. आता वेळ काढला पाहिजे.

लाडुचा पण आत्मा बदल झाला आणि रात्री खाईपर्यंत त्याची वडी झाली. कसला जबरदस्त फॉर्म्युला असेल. सध्या मिपावर पण हे लाडु/ वड्या वाटायची वेळ आली आहे असे काहि धागे/ प्रतिक्रिया वाचल्यावर खेदाने म्हणावेसे वाटते.

कहर आहे ही प्रतिक्रिया! =)) अशाच अर्थाच्या गोष्टीचा एक सिनेमा होता असं वाटतं. पण कोणता ते नाव आठवत नाहीये.

Mr Ya Miss,आफताब शिवदासानी,रितेश देशमुख आणि अंतरा माळी,आनी सोनी टीवीवर भास्कर भारती म्हनुन सिरीयल पन होती.

यामध्ये ती लिंगबदल दाखवल्यानंतर कमालीची गचाळ वाटली होती. अभिनय सुद्धा खूपच लाऊड. अंगावर आल्यासारखी वाटत होती. बाकी असते कुठे ती सध्या ?? कथा वाटते खरी टिपिकल, पण काही वेगळ्या वा हटके शैलीत ट्राय मारायला हवी होती..

खूप दिवसांनी लिहितेयस शुचि. शेवट जरा गुंडाळल्यासारखा वाटला. अजून विचार करुन शेवट लिहिला असतास तर किस्सा इफेक्टिव्ह होउ शकला असता.

या विषयावरचा एकाही सिनेमा/सिरॆअल मी पाहिलेली नाही. पण एक इंग्रजी सिनेमा पाहिला आहे ज्यात फ़ोर्चुन कुकी खाउन मुलीच्या अन आईच्या आत्म्याची अदलाबदल होते :)

तू सिनेमा बघून लिहिलंस असं म्हणत नाहीये. कथाबीज चांगलं आहे. त्यावर ३ तासाचा सिनेमा आणि एक सीरियल होऊ शकते तर तू पण अजून फुलवू शकली असतीस!

विषय जुनाच आहे. करमणुकीसाठी अजून फुलवता आला असता. तसे न केल्याने टिकेस कारण झाल्यासारखा वाटतो आहे. मुळात ही समस्या सर्व नात्यांमध्ये अनुभवास येते. 'जावे त्याच्या वंशा, तेंव्हा कळे' ही म्हण त्यामुळेच पडली आहे. प्रत्येक भूमिकेचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. एकदा एक नवरा कामावरून घरी परततो तर घरात सगळीकडे पसारा पडलेला असतो. त्याचा सकाळी आंघोळीनंतर बेडवर टाकलेला ओला टॉवेल तसाच असतो. कालचे बदललेले कपडे तसेच जमिनीवर पडलेले असतात. मुलांची दप्तरे इथेतिथे अस्ताव्यस्त असतात, त्यांचे शाळेचे युनिफॉर्म जमिनीवर असतात, घरभर हा न तो कचरा पसरलेला असतो. त्याला आश्चर्य आणि चिंता वाटते. बायकोला दोन चार हाका मारतो पण कांही प्रतिसाद मिळत नाही. शेवटी तिला शोधत तो शयनगृहात जातो तर बायको पलंगावर गादीवर लोळत हसत हसत मैत्रिणीशी गप्पा मारत असते. ह्याला संध्याकाळचा चहा, नाश्ता हवा असतो पण तो ही तयार नसतो. हा बायकोला फोन बंद करायला लावून खडसावतो, 'हे काय चाललय काय? काय ही घराची अवस्था? नुसता उकिरडा करून ठेवलाय. आणि खुशाल मैत्रीणीशी गप्पा मारत हसत खिदळत बसली आहेस.' बायको शांतपणे म्हणते 'तुम्ही रोज म्हणता नं, काय काम असतं बायकांना घरात? खायचं-प्यायचं आणि फोनवर मैत्रीणीशी गप्पा मारत दिवसभर लोळत राहायचं. आज, ठरवलं तेच करायचं. कळलं दिवसभर काय कामं असतात ते?' असो. बायकोच्या घरकामाबद्दल नवर्‍यांचे गैरसमज असतात तर नवरे 'बाहेर मजा मारतात' हा बायकांचा एक गोड गैरसमज असतो. दोघांनीही एकमेकांशी चर्चा करावी, एकमेकांच्या जबाबदार्‍या समजून घ्याव्यात, एकमेकांच्या भूमिकेचा आदर करावा आणि आपापली भूमिका नेटकेपणाने पार पाडायचा प्रयत्न करावा.

>>>एकमेकांशी चर्चा करावी, एकमेकांच्या जबाबदार्‍या समजून घ्याव्यात, एकमेकांच्या भूमिकेचा आदर करावा आणि आपापली भूमिका नेटकेपणाने पार पाडायचा प्रयत्न करावा. असं कसं असं कसं????????? ट्यार्पी कसा वाढायचा मग? :-/ एक मिनिट! तुम्ही संसाराबद्दल लिहीलंय? ऊप्स. मला वाटलं....