Welcome to misalpav.com
लेखक: पिलीयन रायडर | प्रसिद्ध:
परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. क्विन! आवडला.. जाम आवडला.. क्विन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय.. भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी.. तिचं लग्न मोडतं.. भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. एक तर ते झालंच पाहिजे.. दुसरं ते जातीमध्येच झालं पाहिजे, मग गाढवाशी का होईना.. पण परजातीतील कर्तुत्ववान पुरुष सुद्धा त्या गाढवापुढे किस झाड की पत्ती..शिवाय लग्न योग्य वयातच झालंच पाहिजे नाही तर मग आख्या जगाला तुमची काळजी करावी लागते.. कारण लग्ना शिवाय आयुष्य म्हणजे.. छे.. उपमा देण्यालायक सुद्धा उरत नाही.. असं लग्न मोडलं म्हणजे तुम्ही खरं तर जीव द्यायला हवा.. कारण काहिही असो.. चुक मुलीची असते.. "आता आपलं कस्सं होणार" हा प्रश्न पण त्यांनाच पडायला हवा.. मुलांना ह्या चिंता नसतात..* पण रानी "अब मेरा क्या होगा.." च्या गम मध्ये न डुबता चक्क स्वतःच्या हनिमुनच्या तिकीटावर पॅरिसला जाते..! मला हेच्च लई लई आवडलं.. तिची कारणमीमांसा काही का असेना.. आयडिया भारी आहे.. तिथे गेल्यावर तिला खुप वेगळं आयुष्य पहायला मिळतं.. वेगळेच लोक.. त्यांच्या विचित्रच पद्धती.. मुल्य वेगळी.. विचार वेगळे.. त्यांनाही त्यांची दु:ख.. पण त्याची ओझी वाहताना कुणी दिसत नाही.. "दु:खाच्या अलंकरणाची दिप्ती.." बाजुला सारुन चक्क आनंदी रहाण्याची उलटीच रीत.. रानीला कुणी फालतु (भोचक) प्रश्न विचारत नाही.. रानी दारुच्या नशेत जी काही बकवास करते ते ही शांतपणे ऐकुन घेतल्या जातं.. स्वतःच्या (इन मिन छटाक) आयुष्यातुन आलेल्या अनुभवांमधुन सल्ले कुणी देत नाही.. सल्ले नाहीत?! गेलाबाजार "क्या पता..कल हो ना हो" टाईप कॅचलाईन्स पण नाहीत? मग लोकांची आयुष्य बदलणार कशी? अरे "बस उसकी एक बातने मेरी तो दुनियाही बदलदी" बॉलीवुडची बदाम सत्ती आहे.. इथेच तर गेम सुरु होतो ना जिंदगी बदलण्याचा... कशी बदलणार मग दुनिया आता? मीच हैराण..परेशान झाले... किमान रानी स्वगता मधुन स्वतःला उलगडुन दाखवत आहे असं तरी दाखवायचं.. मग तरी प्रेक्षकांना समजेल पिक्चर आणि त्यातला अर्थ.. कारण प्रेक्षक चित्रपटातलं सगळ्यात मुर्ख पात्र असतं.. त्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स ची कोडी घालण्यावर बॉलीवुडचा विश्वास नाही.. त्यामुळे ह्या न त्या प्रकारे शब्दबंबाळ डायलॉग मधुन त्याला "जिंदगी".."मोहोब्बत"..विषयी तत्वज्ञान नाही दिलं तर मग घरी जाऊन त्याची जिंदगी कशी बदलणार? पण इथे एकंदरीत कुणी कुणाला काहीच उलगडुन दाखवत नाही.. सगळेच समजुन घेतात.. रानी सगळा राग फक्त दात ओठ खाउन.. केस मोकळे सोडून नाचुन व्यक्त करते.. पुर्वी एकदा नातेवाईकां समोर नाचल्याबद्दल होणार्‍या नवर्‍याच्या शिव्या खाल्याचा प्रसंग आठवुन फक्त एक छ्द्मी हास्य.. बास.. आणि पुन्हा हंगामा हो गया..सुरु.. रानीला ३ मुलांसोबत रहावं लागतं.. आधी त्यांना घाबरलेली रानी नंतर चक्क त्यांची मैत्रीण होते.. एका स्ट्रिप क्लब मध्ये जाऊन नाचते.. गाडी चालवते..एका स्पर्धेत जाउन तिथल्या लोकांना पाणीपुरी खाऊ घालते.. एक लिप किस पण करते.. रानीला ह्या सगळ्या दरम्यान काही नवीन सापडत नाही.. फकत तिच्यात जो आत्मविश्वास आहे ह्याची तिला कल्पनाच नसते तो तेवढा सापडतो.. आता एवढी मोठी गोष्ट गवसल्यावर हिरोईन कशी आमुलाग्र बदलली पाहिजे.. बॉलीवुडमध्ये हिरोईन आमुलाग्र बदलते म्हणजे ती खरं तर ड्रेसची लांबी, केसांची हेअर स्टाईल आणि तोंडावरती अत्यंत सहनशीलच्या ऐवजी माजोरडे भाव एवढंच बदलत असते.. आणि हो मग तिनी १-२ तरी मोठे डायलॉग मारले पाहिजेत.. मग हिरो स्तब्ध व्हायला पाहिजे..मग ती ताडताड तिथुन निघुन जाणार..मग हिरोला उपरती व्हायला पाहिजे.. (हे उलटं ही होऊ शकतं.. हिरोईन कपड्यांची लांबी कमी करते.. मग हिरो तिला भारतीय संस्कृतीबद्दल ऐकवतो.. मग हिरोइन स्तब्ध.. मग हिरो ताडताड जाणार..हिरोईनला उपरती..) इथेही हिरोईन बदलते आणि हिरोला उपरती होते.. फक्त मधल्या स्टेप्स घडत नाहीत.. म्हणजे कंगना अजुनही तिला कंफरटेबल वाटेल अशाच नॉर्मल कपड्यात असते.. सतत घट्ट उराशी बाळगलेला स्वेटर तेवढा काढते.. पण ते कदाचित तिची भीती ओसरत जाते तसं ती जात मोकळी होते हे दाखवण्या इतपतच.. ती कूणालाही स्तब्ध करत नाही.. अवाक करत नाही.. कुण्णा कुण्णाला तिच्या शब्दबंबाळ डायलॉगमुळे उपरती होते नाही.. कुणाचही आयुष्य एक पल मध्ये बदलत नाही.. बरं इथवर तरी ठिक आहे.. पण जेव्हा हिरोला उपरती होऊन तो रानी कडे येतो.. तेव्हा तरी "जिंदगी" आणि "मोहोब्बत" च्या फुलबाज्या उडणार असं मला वाटत होतं.. पण छे.. चांगली रडुन पडून "तुम ऐसा कैसे कर सकते हो मेरे साथ विजय????" असे आर्त प्रश्न विचारायचे सोडुन ही बया रॉक शो ला निघुन जाते.. कमाल आहे.. अरे प्यार सामने रो रहा है.. माफी की भीक मांग रहा है.. डायलॉग मारने की सुवर्णसंधी डायरेक्टर दे रहा है.. तर ह्या पोरीला पुन्हा कधी न भेटु शकणारे मित्र महत्वाचे वाटतात? "ये बाते हम दिल्ली मे भी कर सकते है.." असा लॉजिकल डायलॉग मारुन हिरोईन मित्रांना भेटायला जाते?? छे.. असं कुठे घडतं का? म्हणलं ठिके.. पण शेवटी "प्यार की च जीत" होत असते.. त्यामुळे तिथे तरी हरदासाची कथा मूळपदावर येईलच.. पण हे भगवान! आता जरी प्यार भीक मागत असला तरी उद्या ह्याच प्यार सोबत "लग्न" नामक गोष्ट झाल्यावर प्यार नवरा बनुन परत डोक्यावर मिर्‍या वाटणार, सासु घरात किटी पार्टी आणि पार्लर मध्ये अडकवणार हे संभाव्य धोके लक्षात घेऊन हिरोईन चक्क साखरपुड्याची अंगठी परत देऊन निघुन जाते.. काहीही म्हणजे अगदी काहीही झालं तरी बये लग्न आणि नवरा महत्वाचा ही "भारतीय संस्कृतीची" आणि प्यारे के आगे सब गुनाह माफ असतात ही बॉलीवुडची आम्हाला शिकवण आहे..त्यामुळे अगदी ऐन्वेळेस नवरा मुलगा मागे हटला तरी कुणी ना कुणी बोहल्यावर उभं राहुन "प्रसंग निभवायचा".. म्हणजे त्या अभागी मुली सोबत लग्न करायचं.. मग ती मुलगी आयुष्यभर त्याला परमेश्वर मानुन "मै धरा की धुल हूं" म्हणणार.. एक तर ही रानी घरात तोंड लपवुन बसायचं सोडुन पॅरिसला जाते.. तिथे चक्क आनंदात रहाते (दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी.. त्यातही तु कितीही मॉडर्न असलीस (कितीही लहान कपड्यात वावरणारी बोल्ड अभिनेत्री = मॉडर्न, खुल्या विचारांची, स्वतंत्र स्त्री) तरी जेव्हा सवाल इश्क, मोहोब्बत का असतो तेव्हा तू डोकं गहाणच ठेवायचं असतं.. अगं स्वतःला आमुलाग्र बदलायला तयार होतात हिरवणी (म्हण्जे रिव्हर्स केस.. तोकड्या कपड्यातुन बॅक टु साडी फॉर हिरोज सेक..).. आणि तू चक्क माफी नाकारतेस हिरोला? अंगठी परत करतेस??? मी कानात प्राण आणुन आता एका मोठ्या डायलॉगची वाट पहात होते.. पण नाही.. "थँक्यु" व्यतिरिक्त चकार शब्द नाही.. काही मोठी मोठी स्पष्टीकरणं नाहीत.. शाब्दिक थोबाडित मारणं नाही.. आयुष्यभर गप्प बसुन पिक्चरच्या शेवटाला दुनियाभरची बडबड करुन समोरच्याला (आपल्याला बोलता येतं आणि १० ओळी सलग बोलु शकु एवढी अक्कल आपल्याला आहे हे दाखवुन) अवाक करण्याचा प्लान नाही.. "हमारा रास्ता जरुर एक है लेकीन मंजिल नही.." टाईप छळ नाही.. फक्त एक "थँक्यु".. विथ स्माइल..! ?? व्हाय??? हम्म.... आय गेस बिकॉज शी इज जस्ट "क्विन".. ए क्विन विदाऊट ड्रामा..! *- हे सगळं माझं बॉलिवुड ग्यान आहे.. माझी मतं नाहीत.. त्यामुळे कुठल्याच मुक्ती मोर्चांनी माझ्यावर धावुन येऊ नये.. मी उत्तरं देत बसण्याचा टाईमपास करणार नाहीये..
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मस्त चुरचुरीत लिहिलंयस पिरा ! आता बघावाच काय क्वीन ?

सिनेमा आणि त्या निमित्ताने आणखी जे लिहिलंस ते सगळंच आवडलंय. सीडी आणलीय. कधी मुहूर्त मिळतो बघू!

>>मी कानात प्राण आणुन आता एका मोठ्या डायलॉगची वाट पहात होते.. पण नाही.. "थँक्यु" व्यतिरिक्त चकार शब्द नाही.. अगदी हेच आलं होतं शेवट्चा सीन बघताना डोक्यात. एका थँक्युवर कसं काय संपू शकतं सगळं!! पण त्याचं उत्तरही इथेच मिळालं आणि त्या उत्तराबरोबर बरेच प्रश्न सुटले...माझेही !! :)

(दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? >>>>> ,थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी.. >>>> +++१११११११११११११ मस्त लिहिलयं, आवडलं..

>>>(दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? >>>>थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी..

आधी चेपुवर बघितला. खरंच सांगतो, कुणाचा शेअर वगैरे केलाय का ते पाहिलं. :) (लेख जमल्याचं लक्षण आहे हे. उगाच दंगा करु नये.) पुन्हा लेख वाचला. आवडलाच्च. कंगना आवडत नसल्यानं क्वीन बघेन की नाही ठाऊक नाही. महिन्या भरात येईल कुठंतरी. चाळेन तेव्हा.

अर्धा सिनेमा बघेतो लईच्च बोर व्हायला लागलं, मग बंद केला आणि तुकड्या-तुकड्यात पाह्यला. सलग तीन तास बसून बघावं असा नाय वाटला. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.

अर्धा सिनेमा बघेतो लईच्च बोर व्हायला लागलं, मग बंद केला आणि तुकड्या-तुकड्यात पाह्यला. सलग तीन तास बसून बघावं असा नाय वाटला. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
की एप्रिल फुल वगैरे करतोयस ? काहीही असो. प्रतिसाद पटला.... म्हणजेच आवडलाही. बरं वाटत लोकांना अभिव्यक्त होताना जेंव्हा मनातलंच बोलतात आणी स्वतःसाठी बोलतात तेंव्हा.

सुंदर परीक्षण.. 'क्विन' मलापण अत्यंत आवडला तो त्याच्या सटल टचेस (मराठी प्रतिशब्द?) मुळेच.. रानी स्वतंत्र, मुक्त होत जाते, पण सैरभैर होत नाही. "हंगामा हो गया" गाण्यावर नाचतांना अंगातला स्वेटर काढते, मात्र गरागरा फिरवून झाल्यावर फेकत नाही तर हँडबॅगेत कोंबते, ते लैच भावलं.. कसलेही लंबेचौडे डायलॉग,अभिनिवेष आणि "ओव्हर द बोर्ड" असे स्वभावपरीवर्तन न दाखवता, अत्यंत संयमित रित्या "स्व"ची रानीला झालेली जाणिव दाखवली आहे..
इथेही हिरोईन बदलते आणि हिरोला उपरती होते.. फक्त मधल्या स्टेप्स घडत नाहीत.. म्हणजे कंगना अजुनही तिला कंफरटेबल वाटेल अशाच नॉर्मल कपड्यात असते.. सतत घट्ट उराशी बाळगलेला स्वेटर तेवढा काढते.. पण ते कदाचित तिची भीती ओसरत जाते तसं ती जात मोकळी होते हे दाखवण्या इतपतच.. ती कूणालाही स्तब्ध करत नाही.. अवाक करत नाही.. कुण्णा कुण्णाला तिच्या शब्दबंबाळ डायलॉगमुळे उपरती होते नाही.. कुणाचही आयुष्य एक पल मध्ये बदलत नाही..
हे आणि हेच मला क्विन जाम आवडण्याचे कारण आहे.. कंगणाचा अभिनय तर सुंदर आहेच, पण दिग्दर्शनाचे प्रचंड कौतूक वाटले.. आणि हो, बरेच दिवसांनी प्रसंग आठवून आठवून हसण्यासारखा आणि गप्पा मारण्याजोगा पिक्चर दिल्याबद्दल्ही "क्विन"चे आभार.. पिराताई, लेख आणि त्यातले पंचेस जाम आवडलेत, हेवेसांनल.. :-)

चिगो साहेब, अगदी सहमत.. स्वेटरचा प्रसंग सगळ्यात जास्ती आवडला..

वाहव्वा! ष्टोरी तरी आवडलीये हे वाचून! छान लिहिलयस. मेरेकूभी ये शिनेमा देखना हय. कब टैम मिलता अल्ला को मालूम! भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. हे वाक्य व यासंदर्भातील सगळी वाक्यं आवडली. भयंकर सहमत. ;)

पिरा..मस्स्स्त लिहिलयस! आधी फॅन्ड्री पाहिला आणि पाठोपाठ क्विन. दोन्हिकडे तीच घुसमट...मुक्त मोकळा श्वास घ्यायची तीच चिरंतन धडपड. पण फॅन्ड्री चा शेवट 'पुढे काय झाल असेल..?' ची फार भीषण उत्तरं देतो... तर क्विन चा शेवट म्हणजे पुढे काहितरी नक्की सुखद घडले असणार याची खात्री देतो.

खरं तर विजय नाही तर अजय शी लग्न केलं हे उत्तर नसावं म्हणजे मिळवलं..! पण मुळात अशा बॅकग्राउंडच्या मुलीनं लग्न खानदान की इज्जत च्या नावाखाली मान्य केलं नाही हिच मोठी गोष्ट आहे..!

'फँड्री' सारखे चित्रपट बघू नये. खिन्न विषण्ण होऊन काय करणार? त्यापेक्षा सुखद आशा काय वाईट?

वा वा, पर्फेक्ट लिहिलं आहे. पिच्चर पाहताना असंच काहीसं वाटलं. शिवाय भारतीय ते भारी समजायच्या आणि सगळ्याचं भारतीयीकरण करायच्या प्रवृत्तीवर मारलेले शालजोडीतले तर अप्रतिमच आहेत. पण एक बात खटकली, क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं. वास्तवात भारतात राहूनच जगण्याची लढाई लढणार्‍या कित्येक अनग्लॅमरस क्वीन्स असतात. ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.

ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.
लोकं शाणी नैत हो आपल्याकडची. मूर्खांसाठी पिच्चर काढायचे तर ते टोन डौन केलेले असावेत तरच झेपतात, नैतर घंटा कै होत नै. किमान यात बेशिक गोष्ट तरी बरोबर दाखवलीय हेच लै आहे म्हंटो मी तर. तुमचा आक्षेप मान्यच आहे, पण लोकं मूर्खागमनी आहेत त्याला इलाज नै.

बरोबर आहे; पण मूर्खागमनी लोकांना तसेही अशा विषयांवरचे चित्रपट फारसे आवडत नाहीत आणि त्यांच्यामुळे ना कलाकाराला समाधान ना प्रेक्षकांना अत्युत्तम पाहिल्याचे समाधान. अर्थात चित्रपट चांगलाच आहे; पण अजून चांगला नक्कीच होऊ शकला असता एवढेच.

पण एक बात खटकली, क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं. वास्तवात भारतात राहूनच जगण्याची लढाई लढणार्‍या कित्येक अनग्लॅमरस क्वीन्स असतात. ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.
अगदी नेमकं मांडलंत.

क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं.
रानीसारखी स्वतःचा शोध घेणारी व्यक्ती उच्चमध्यमवर्गातली असेल याबद्दल मला फार शंका वाटत नाही. हे असे प्रश्न बूर्ज्वा वर्गालाच पडतात, परवडतात. या वर्गातले लोक जेव्हा रोमँटिक विचार करतात तेव्हा 'सरसों का खेत'चा किंवा मामाच्या गावाचा विचार करत नाहीत, ट्युलिप गार्डन किंवा फॅशन, सौंदर्यदृष्टी असणाऱ्या फ्रांस, पारी (पॅरीस)चा विचार करतात यातही मला काही विचित्र वाटत नाही. 'डोर'मधली, बऱ्या राजस्थानी घरातली तरुण विधवा स्वातंत्र्याचा विचार नवऱ्याशिवाय करू शकत नाही हे जितपत खटकत नाही तितपत मला हे ही खटकत नाही. आता चित्रपट सेट करतानाच गरीब-बिचाऱ्या, दुःखी-कष्टी बाईचा केला नाही, याला 'व्यावसायिक सोय' म्हणायचं असेल तर त्याबद्दल काही चर्चा संभवत नाही.
(उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते.
यातल्या छद्मामागचं कारणही समजलं नाही. एकटी परदेशात जाऊन भटकण्याचा अनुभव फक्त रानीला नाही, मलाही आहे. आणि अशा अनेक मुली माझ्या ओळखीच्या आहेत ज्या कामानिमित्त किंवा उगाच भटकायला परदेशात जातात. त्यांना काही वाईट अनुभव येत नाहीत, चांगले लोक भेटतात त्यांच्या ओळखीमुळे प्रवासात आणखी रंगत येते. पुढे हे संबंध टिकतात किंवा टिकत नाहीत. 'क्वीन' हा चित्रपट आहे, बातमीपत्रक नाही. काहीतरी वेगळं झालं, कोणावर अन्याय झाला तर बातमी येते. दारू प्यायलेल्या मुलीवर बलात्कार झाला (मुलावर दरोडा पडला) तर बातमी येते. दारू पिऊन, गांजा ओढून झिंगलेल्या मुलीची मित्रांनी काळजी घेतली, तिला कॉफी पाजली तर बातमी होत नाही. पण त्या प्रसंगामुळे त्या मुलीचं आयुष्य किंचित अधिक समृद्ध होऊ शकतं. या अशा तऱ्हतऱ्हेच्या अनुभवांमुळे मला उलट 'क्वीन' वास्तववादी असेलसा वाटतो. माझ्या दृष्टीने, उच्चमध्यमवर्गीय मुलींसाठी वास्तव जग हे असंच असतं. पण स्वतःचा शोध वगैरे चैन हवी कशाला, असं काही म्हणायचं असेल तर मग 'व्यावसायिक सोय' म्हणणं (पटलं नाही तरी) समजू शकतं. --- 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' रंगमंचावर आणणाऱ्या वंदना खरे म्हणतात - एकूणातच ‘दु:खाचा’ अनुभव पोचवणं ही अडचण नव्हतीच. स्त्रियांवर अत्याचार होतात आणि ते होऊ नयेत इतपत समजूत समाजात तयार झालेली आहे. खरी अडचण दिसली ती स्त्रियांनी स्वत:ला "सुख होत आहे" हे जाहीरपणे म्हटलेले पचवण्याची. अगदी जेन्डरविषयी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेदेखील येऊन सांगत असत की "बलात्काराबद्दल सांगणारे गंभीर भाग छान आहेत पण बाकी विनोदी भाग जरा कमी करा ना!"

दारू प्यायलेल्या मुलीवर बलात्कार झाला (मुलावर दरोडा पडला) तर बातमी येते. दारू पिऊन, गांजा ओढून झिंगलेल्या मुलीची मित्रांनी काळजी घेतली, तिला कॉफी पाजली तर बातमी होत नाही. पण त्या प्रसंगामुळे त्या मुलीचं आयुष्य किंचित अधिक समृद्ध होऊ शकतं.
फ्रेम करावा असा प्रतिसाद. अतिशय आवडला.
स्त्रियांवर अत्याचार होतात आणि ते होऊ नयेत इतपत समजूत समाजात तयार झालेली आहे
नक्किच.खरी
अडचण दिसली ती स्त्रियांनी स्वत:ला "सुख होत आहे" हे जाहीरपणे म्हटलेले पचवण्याची.
व्यवस्थीत कळला नाही पण कोणीही व्यक्ती तो सुखी आहे म्हणु लागला की जग जळु लागते हे वास्तव आहे. त्यात स्त्रि पुरुष भेद कितपत धरावा ?

मुळात जगात चांगले लोक आहेत यात दुमत नाहीच. रानी युरोपमध्ये फिरायला जाते वगैरेही ठीक. पण मुळात रस्ता चुकणे किंवा बॅग चोरीला जाण्याचा प्रसंग उद्भवणे किंवा झिंगलेल्या मुलीला कॉफी पाजणे हे फक्त युरोपातभारतात? इथे भारतात यासगळ्याबरोबर शारीरिक अंगलटीला वगैरे तोंड देत गावातून तालुक्याला कॉलेजसाठी जाणार्‍या मुलींची कमतरता नाही. अतिसुरक्षित वातावरणात वाढलेल्या आपल्याला बॅग चोरीचा प्रयत्न व झिंगल्यावर कोणीतरी कॉफी पाजली हेच प्रसंग लै भारी वाटतात म्हणून आपल्या मुक्तीच्या आणि वास्तवाच्या कल्पना फारच बाळबोध आहेत असे वाटते. घरून पैशाचं मजबूत पाठबळ असेल तर प्यारिसला एकट्याने जाणे म्हणजे स्वत्वाचा शोध असं असेल तर स्वतःभोवतीचा सुरक्षित कोश मोडायचा फार मोठा पल्ला गाठायचा आहे असेच मी म्हणेन. स्त्रियांना सुख होत आहे ही गोष्ट बोचणारे लोक असतीलच, म्हणूनच दुसर्‍याच्या जीवावर सुख मिळवू नये. विजयालक्ष्मीचं व त्या पाकिस्तानी मुलीचं पात्र मला आवडलं. त्यांच्या तुलनेत रानीचे स्वातंत्र्याकडे फक्त एक पाऊल आहे आणि त्याचंच इतकं कौतुक असेल तर अवघड आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे उत्तरेपेक्षा बरी स्थिती आहे तरीही इथल्या स्त्रियांना ती एकटी पॅरिसला जाते आणि तिला असे "अग्गंबाई" अनुभव येतात याचंच अप्रूप वाटावं हे अनाकलनीय आहे.

मला तिच्या पेरिसला जाण्याच कौतुक नाहिये.. कौतुक वाटतं ते जनरली अशा वेळेस महाराष्ट्र काय किंवा उत्तर भारत काय.. मुली दु:खाला कवटाळुन, स्वतःच्या नशिबाला बोल लावत..घरातच दडुन बसतात.. त्यात ती पॅरिसला जाण्याचा निर्णय घेते.. आता इथे ती आई वडीलांना "मला फार फार दु:ख झालय, जरा २-३ लाख काढा बरं..पॅरिसला जाऊन दु:ख हलकं करुन येते जरा.." असं म्हणत नाही.. तिचं स्वप्न असतं पॅरिसला हनिमुन ला जाणं. त्यासाठी तिने पैसे गोळा केलेले असतात.. इथेही "ज्या हनिमुनची स्वप्न आपल्या प्रियकरासोबत पाहिली, तिथे एक्ट्यानी जायचं म्हणजे कित्ती सॅड..." असं ही जनरली घडलं असतं.. पण तिचं स्वप्न तिला तिच्या दु:खा पेक्षा महत्वाचं वाटतं.. हे मला जास्त भावलं.. इथे मुद्दा "पॅरिस" चा नाहीचे.. स्वतःच्या स्वप्नाला पुर्ण करण्यासाठी दु:खाला मागे सारण्याचा आहे..ज्यानी आयुष्यात काहिही फरक पडणार नाहीये अशा रडारडी पेक्षा हातात असलेलं पॅरिसचं तिकिट वापरणे हा प्रॅक्टिकल विचार ती करते हे जास्त कौतुकास्पद आहे.. आता नेमकी तिचं स्वप्न हे "पॅरिसला हनिमुनला जाणे" हे असल्याने लोकांना आता पॅरिसच का? हनिमुनच का? असे प्रश्न पडत आहेत.. तिला तिथे सगळेच अनुभव चांगले येतात.. चांगलीच माणसे भेटतात.. आता हा कथेचा भाग झाला.. दरवेळी खुप अन्याय होऊन मग त्यातुन उभी राहिलेलीच स्त्री स्वतंत्र होते का? आणि आधीच भेदरलेल्या रानीसाठी लोकांनी चांगलं वागणं सुद्धा वेगळा अनुभव असु शकतो ना.. पारंपारिक घरातल्या रानीसाठी बाइनी तिर्‍हाईतासोबत झोपणे, लग्नाशिवाय झालेले मुल आनंदाने न अभिमानाने सांभाळणे, घरातल्यांचे पोट भरण्यासाठी स्ट्रिप क्लब मध्ये काम करणे हे अनुभवच धक्कादायी आहेत.. तिच्या साठी पब मध्ये दारु पिऊन, केस मो़कळे सोडुन नाचणं सुद्धा मोठी गोष्ट आहे.. कारण तिला घरात नातेवाईकांसमोर नाचणं सुद्धा "अलाऊड" नाही.. तिच्या दृष्टीने हे सगळच खुप लिबरेटींग आहे.. इथे तिची तुलना विजयालक्ष्मी किंवा इतर कुणाशी करुन कसं चालेल.. तिची परिस्थिती वेगळी होती.. म्हणुन तिच्यासाठी "स्वतंत्र" होण्याचा मार्गही वेगळा होता.. मोडलेलं लग्न परत जोडण्याची संधी मिळणं ही भारतीय मुलीसाठी निश्चित मोठी गोष्ट आहे.. स्वत: रानी सुद्धा विजयला म्हणतेच ना "आप जो कहेंगे मै वैसेही करुंगी.. ये शादी मत तोडीये..".. आयुष्यभर तुझ्या तालावर नाचायला मी तयार आहे इतकी ती अगतिक होते.. फक्त एक लग्न व्हावं म्हणुन.. अशावेळी जेव्हा विजय परत येतो तेव्हा त्याला नाकारणं ही मला मोठी गोष्ट वाटते.. मी जर रानीच्या जागी असते तर तसही विजयला समोर उभा केला नसता.. आणि तरीही ती स्वाभाविकच गोष्ट असती.. नो बिग डील.. रादर अपेक्षितच असतं अशा मुलाला नाकारणं.. पण भारतात (जिथे लग्न हा खानदानाच्या इज्जतचा सवाल असतो..)अशा अनेक रानी आहेत ज्यांच्यासाठी विजयला नाकारणं ही मुक्त होण्याची पहिली पायरी आहे..

प्रतिसाद आवडला, पिराताई.. "क्विन" हा चित्रपट रानीने स्वत:ला जाणण्याचा, एन्जॉय करण्याचा प्रवास आहे. त्याला ह्या किंवा त्या स्त्रीमुक्तीच्या कल्पना लावत "कंपॅरेटीव स्टेटमेंट" सारखं बघण्यात काय हशील?

+१ प्रतिसाद आवडला.. मोजक्या शब्दात बरेच काही व्यवस्थित मांडलय.. :)

त्यांच्या तुलनेत रानीचे स्वातंत्र्याकडे फक्त एक पाऊल आहे आणि त्याचंच इतकं कौतुक असेल तर अवघड आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे उत्तरेपेक्षा बरी स्थिती आहे तरीही इथल्या स्त्रियांना ती एकटी पॅरिसला जाते आणि तिला असे "अग्गंबाई" अनुभव येतात याचंच अप्रूप वाटावं हे अनाकलनीय आहे.
क्या. बात. मला हेच म्हणायचय. क्विन बघुन त्याणूभवात असलेल्या व्यक्तीचा अभिनीवेश, आणी अशा व्यक्तींसाठीच्या सहानुभुतीच्या कृत्रीम अभिनीवेशात लेखीकेने लिखाण करताना मोठी गल्लत करुन क्विन चित्रपटावर या धाग्यात अन्याय केला आहेच, पण त्यामुळे तिला नक्कि काय म्हणायचे आहे, बॉलीवुडला काय सांगायचे आहे, प्रत्यक्ष अशा स्थितीत गेलेल्या व्यक्तीरेखेची काय भावना असते आणी स्त्रिमुक्ती म्हणजे काय या डिमेनशनचा अचुक माग घेण्याचा बट्याबोळ या धाग्यात व्हायला वेळ लागलेला नाही. क्विन पात्र मस्त आहे. चकदे मधे नाही काय हॉकी-चंडीका क्रिकेटरला जिंकुन परत आल्यावर लग्नास नकार देते हे विसरुन की ती हारुन जरी परत आली असती तरी त्याने प्रपोज केलेच असते.

क्विन बघुन त्याणूभवात असलेल्या व्यक्तीचा अभिनीवेश, आणी अशा व्यक्तींसाठीच्या सहानुभुतीच्या कृत्रीम अभिनीवेशात
लेखीकेने लिखाण करताना मोठी गल्लत करुन क्विन चित्रपटावर या धाग्यात अन्याय केला आहेच, पण त्यामुळे तिला नक्कि काय म्हणायचे आहे, बॉलीवुडला काय सांगायचे आहे, प्रत्यक्ष अशा स्थितीत गेलेल्या व्यक्तीरेखेची काय भावना असते आणी स्त्रिमुक्ती म्हणजे काय या डिमेनशनचा अचुक माग घेण्याचा बट्याबोळ या धाग्यात व्हायला वेळ लागलेला नाही
मी काय म्हणते, तुम्हाला एवढं कळलय ना मग तुम्हीच का लिहीत नाही? कसं असतं ना शुन्य भाउ.. दुसर्‍याच्या लेखाची पीसं काढायला खरच काही अक्कल लागत नाही.. पण स्वतः विचार करुन १० ओळी लिहायला बरंच काही असावं लागतं माणसात.. हे जे काही तुमचं ओथंबुन वहात आहे ना, ते जरा नीट व्यक्त होऊ द्या की.. उगाच "बट्ट्याबोळ केलाय.. समजलच नाहीये.. अभिनिवेश आहे.." वगैरे पेक्षा मला तुम्ही स्वतःच एक परीक्षण लिहुन दाखवाच..

झकास परी़क्षण. एकच नंबर आहे क्वीन. सगळ्यांनी भारी काम केलय. डायरेक्टरला १०० गुण. ताका,इटालियन शेफ,चित्रकार,कंगनाचा धाकटा भाऊ, आणि ऑफकोर्स विजे..भारी कॅरेक्टर्स आहेत. लेख वाचुन परत एकदा बघावासा वाट्टोय.

पिरा ताई, अगदी योग्य शब्दात मांडले आहे तुम्ही.. क्वीन पाहून आल्यावर खरेतर कितीतरी दिवस 'हंगामा हो गया' आणि 'रांझा' हि दोन गाणी मनात गुणगुणत होतो.. 'हंगामा हो गया' हे गाणे तर अगदीच आवडले.. राणी जेव्हा म्हणते कि 'हिंदी गाना लगा है' तेव्हा मी विचार केला कि अश्या प्रसंगात कोणते गाणे वापरले असेल दिग्दर्शकाने ?(कारण गाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता), पण जेव्हा हे गाणे ऐकले तेव्हा त्यातील शब्दनिशब्द अगदी समर्पक वाटला. इथे दिग्दर्शकाचे कौतुक करावे लागेल. चिगो सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप सटल (मराठी?) गोष्टी चित्रपटात आहेत.. उदा: ती फ्रांस मध्ये तिच्या नातेवाइकांना भेटायला जाते तो प्रसंग तर समाजात दांभिकपणा किती कुटून कुटून भरला आहे हे समजण्यास पुरेसा आहे, ती जेव्हा लीप कीस करते तेव्हा फक्त इम्रान हाश्मी किस करतो म्हणून सगळे भारतीय चांगले लीप किस करू शकतात हे तिचे गृहीतक, आयफेल टावर* पासून दूर पळतानाचा सीन, ती अ‍ॅमस्टरडॅममध्ये असताना जो टीशर्ट घालते तो पण तितकाच सूचक आहे (Alice In Wonderland with white rabbit), जेव्हा ताका आपल्या आईवडिलांचा फोटो होस्टेल मध्ये सोडतो तेव्हाच राणी पण आपली लग्नपत्रिका तिथे सोडते असो.. असे कितीतरी सुंदर, सूचक आणि समर्पक प्रसंग आहेत.. तिचे थँक्यु म्हणणे तर खूपच भावते.. सगळ्यात शेवटी टायटल येतात तिथे तरी ती Married असेल कि काय असे वाटत राहते पण टायटल संपले तरी ती सिंगलच राहते (Queen Foerver). हे अतिशय सुखद होते.. *- हे Tower मराठीत कसे लिहायचे ते कुणी सांगेल का?

मी पयला मनणार होतो पण पाच अनाहिताचा प्रतिसाद येऊ द्या मनल आणी गप राहिलो . परीक्षण आवडल पण पैसे मोजुन म . इं . हिं चित्रपट बगत नाय त्यामुळे टिवीवर आल्यावर बगेन

परीक्षण छान लिहले आहे मी हा picture youtube वर पहिला त्यामुळे असेल कदाचित पण जास्त भावला नाही इंग्लिश विन्ग्लीश चीच सुधारित आवृत्ती उत्तर भारतीय पंजाबी संस्कृती/समाज जीवनाचे चित्रण हाच फरक आणि शेवट चांगला घेतला आहे पूर्वी दूरदर्शन वर telefilms यायच्या १-२ तासांच्या तसा वाटला