Welcome to misalpav.com
लेखक: आयुर्हित | प्रसिद्ध:
फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड, (मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात. सयाजीराव गायकवाड जन्म: सयाजीराव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तहसीलात कळवण(आज हा स्वतंत्र तालुका आहे) या गावी मेहेरबान श्रीमंत काशिराव भिकाजीराव उर्फ दादा साहेब गायकवाड (१८३२-१८७७) आणि श्रीमंत अखंड सौभाग्यवती उमाबाई साहेब यांच्या पोटी मराठा कुटुंबात द्वितीय सुपुत्र म्हणून जन्माला आले व श्रीमंत गोपाळराव गायकवाड हे नाव दिले गेले. उत्तराधिकारी निर्णय: बडोद्याचे बहुचर्चित महाराजा सर श्रीमंत खंडेराव (१८२८-१८७०) यांच्या मृत्युनंतर त्यांचे बंधू मल्हारराव (१८३१-१८८२) राज्याचे उत्तराधिकारी होणार अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी खंडेराव महाराजांच्या जीवाला धोका पोचवण्याचे कारस्थान केल्याने पूर्वाश्रमी अटक झाली असल्याकारणाने आणि गंगा भागीरथी महाराणी जमनाबाई (१८५३-१८९८) ह्या गर्भवती असल्याने पोटातील मुलाचे लिंगनिदान न झाल्याने निर्णय होऊ शकला नाही. यथावकाश ५ जुलै १८७१ रोजी मुलीने जन्म घेतल्यामुळे मल्हाररावांना गादी प्राप्त झाली. परंतु मल्हाररावांनी पैसे उडवून(ज्यात प्रामुख्याने मोत्याचा गालीचा व चक्क सोने वापरून दोन तोफा बनवल्या) दौलतीचे अतोनात नुकसान केले. आपली चूक दडविण्यासाठी अर्सेनिकच्या संयुगाचा विषप्रयोग केल्यामुळे १० एप्रिल १८७५ रोजी भारतीय राज्याचे सचिव लॉर्ड सॅलीस्बरी यांनी आदेश देवून मल्हाररावांना पदमुक्त केले. राज्यप्राप्ती: सिंहासनावर कोणीच बसू न शकल्याने महाराणी जमनाबाई राज्याच्या सर्व परगणा(विभाग)प्रमुखांना दौलतीसाठी उत्तराधिकारी शोधण्यासाठी आपल्या मुलांना घेवून बोलावले.कळवणहून काशिराव आनंदराव(१८५७-१९१७), गोपाळराव (१८६३-१९३८) आणि संपतराव (१८६५-१९३४) या आपल्या तिन्ही मुलासोबत ३५०(कि ६००?)किलोमीटर दुरून आले. असे समजते कि प्रश्नोत्तरांच्या दरम्यान बडोद्याला का आले असे विचारले असता गोपाळरावांनी बडोदा येथे “मी राज्य करण्यासाठी आलो आहे” असे रोखठोक उत्तर देवून निवडसमितीचे मन जिंकून ब्रिटीश सरकारचे बडोदा संस्थानाचे उत्तराधिकारी म्हणून निवडले गेले. महाराणी जमनाबाईंनी गोपाळरावांचे २७ मे १८७५ रोजी रीतसर दत्तकविधान करून सयाजीराव असे नामकरण केले. कायद्याने सज्ञान झाल्यावर २८ डिसेंबर १८८१ रोजी त्यांना बडोदा संस्थानाचे पूर्ण अधिकारी बनवले गेले. तोवर राजा सर टी. माधव राव यांच्या अधिपत्याखाली सयाजीरावांना राज्यव्यवस्थेचे शिक्षण दिले गेले. क्रमश: ता.क. हा इंग्लिशविकिपिडीयावरचा मूळ लेख मराठीत भाषांतरीत केला असून मराठी विकिपिडीयावर देण्यासाठी काळजीपूर्वक लिहिण्याचा प्रयत्न आहे. आपल्याकडे अधिक माहीत असल्यास वा या लेखात काही तफावत किंवा चूक आढळल्यास अवश्य नमूद करावी ही विनंती.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

चांगली माहिती आहे. भाषांतराबरोबरच आणखी काही माहितीची भर घालता आली तर पहा.

बहुत धन्यवाद! दोन सुचवण्या: "सोने वापरून दोन तोफा" ऐवजी "शुद्ध सोन्याच्या दोन तोफा" "आपली चूक दडविण्यासाठी ब्रिटिश रेसिडेंटवर अर्सेनिकच्या संयुगाचा विषप्रयोग केल्यामुळ"

"रेसिडेंट" हे पद असे. बडोदा, जम्मू काश्मीर, हैद्राबाद आणि (बहुतेक) त्रावणकोर या मोठ्या संस्थानांमध्ये रेसिडेंट असे - तो थेट व्हाईसरॉयच्या अखत्यारीत येई. इतर बारक्या संस्थानांसाठी "पोलिटिकल एजंट" असे - तो प्रांतीय गवर्नरच्या अखत्यारीत येई. या हिशोबाने रेसिडेंटसाठी "निवासी अधिकारी" हा शब्द योग्य ठरावा.

"रेसिडेंट" किंवा पूर्ण नाव "रेसिडेंट मिनिस्टर" हे भारतिय राजाकडे कायम राहत असलेल्या ब्रिटीश राजसत्तेच्या प्रतिनिधीच्या पदाचे नाव होते. त्यामुळे त्या शब्दाचे भाषांतर करू नये हेच ठीक आहे.

ब्रिटीश रेसिडेंटवर (ब्रिटीश राजसत्तेच्या प्रतिनिधीवर)असे लिहिता येईल की. आदुबाळजी व इस्पीकचा एक्काजी दोघांनाही मनापासून धन्यवाद.

१२व्या वर्षी राजा बनण्यासाठी आलेल्या महाराजांचा राजा म्हणून पसंत झाल्या नंतरचा पहिला ऐतिहासीक फोटो .

मित्रा, आजच नेमके नरेंद्र मोदी आपल्या खासदारकीसाठी निवडणुकीत सामील व्हायला अर्ज करायला आले असल्याने धागा प्रसंगोचित वाटला. नमो बडोद्यासह देशाची सेवा करायला सज्ज झालेत असा संदेश ही मिळतोय. दत्तक वारसदार जास्त कर्तबगार निघतात असे अनेकदा दिसून येते.

आज मोदींनी बडोद्यात निवडणूक अर्ज दाखल करतांना "महाराजा सयाजीराव गायकवाड" यांनी जनतेबद्दल दाखविलेले प्रेम व जनतेच्या भलाईसाठी केल्या कामाचा आदर्श सर्वांसमोर आणला आहे. त्यावरूनच मला या लेखाची प्रेरणा मिळाली आहे. जमले तर त्यांचे आजचे भाषण ऐकावे ज्यावरून महाराजा सयाजीराव गायकवाड किती महान होते हि कल्पना येईल.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरची मदत घेण्यासाठी त्याची सुभाषचंद्र बोस यांनी १९४१ मध्ये भेट घेतल्याचा इतिहास आतापर्यंत ज्ञात असताना त्याच्या तब्बल पाच वर्षे आधी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी हिटलरशी करार केल्याची माहिती उघडकीस आली आहे. बर्लिनच्या ऑलिम्पिकसाठी अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा एक संघ युरोपला रवाना होणार होता. या संघाला आर्थिक मदत हवी असल्याने त्यातील सदस्यांनी सयाजीरावांची भेट बडोद्यात घेतली. सयाजीरावांनी त्यांना विचारले, ‘‘सुरुवातीच्या संचलनामध्ये मानवंदना देताना कोणाचा ध्वज वापरणार?’’ त्यांना उत्तर मिळाले, ‘‘युनियन जॅक.’’ सयाजीरावांनी सांगितले, ‘‘तुम्ही बडोदे संस्थानचे प्रतिनिधी म्हणून जा आणि बडोद्याचा भगवा ध्वज बर्लिन शहरी फडकवा.’’ बडोद्याचे प्रतिनिधी म्हणून त्या संघाचा जाण्या-येण्याचा खर्च बडोदे संस्थानने सोसला. हिटलरला भगव्या ध्वजाने मानवंदना दिली. ऑलिम्पिकचे खेळ पाहण्यासाठी सयाजीरावांनी इंग्रज सरकारची परवानगी मागितली आणि ते खेळ पाहण्यास गेले. तिथे हिटलरच्या प्रेक्षागृहातील बसण्याच्या खास जागेखालीच सयाजीरावांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था, हिटलरने सयाजीरावांचा केलेला मानसन्मान, जेवणाचे आमंत्रण आणि भगवा ध्वज या गोष्टी इंग्रजांच्या हेरांना खटकल्या होत्या. ऑलिम्पिकच्या खेळांचे निमित्त करून बडोदे-बर्लिन करारावर या दोघांनी सहय़ा केल्या. भारतातील संस्थानिकांनी युरोपच्या युद्धात हिटलरला पाठिंबा द्यायचा आणि त्या बदल्यात हिटलरने भारताला इंग्रजांच्या विरोधातील स्वातंत्र्यलढय़ात मदत करायची, असा हा करार होता. मात्र त्यानंतर काही काळातच सयाजीरावांचे दुर्दैवाने निधन झाले. सयाजीराव जिवंत असते तर हिंदूू संस्थानिकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध उठाव केला असता. त्यांचे पाहून ब्रिटिश इंडियातील हिंदू जनता गांधी-नेहरूंना न जुमानता त्याच मार्गाने गेली असती. जगाचे सारे चित्रच बदलून गेले असते, असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. ‘सयाजीराव गायकवाड’ हे पुस्तक श्रीगंधर्ववेद प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे. कोणी वाचले आहे का? हिटलरला भेटणारे पहिले भारतीय होते सयाजीराव गायकवाड!

फक्त श्रीमंतीचा निकष लावायचा तर हैदराबादच्या नबाबानंतर देशातील सर्वाधिक श्रीमंत राजघराणे म्हणून गायकवाड संस्थानाचा उल्लेख होतो. या राजघराण्यातील तब्बल 16 राजांनी या रियासतीवर राज्य केलं. या राजघराण्याची स्थापना दामाजीराव पहिले यांनी केली. तर या रियासतीचा उत्कर्ष झाला महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या कारकिर्दीत... सयाजीरावांनी या रियासतीची धुरा संभाळली तेव्हा ते फक्त अठरा वर्षांचे होते आणि इंग्रजी कॅलेंडरवरील वर्ष होतं 1875... सयाजीराव तिसरे यांनी तब्बल 64 वर्षे राज्यकारभार केला. आज वाटणी झालेलं सर्व वैभव हे त्यांच्यात काळात कमावलेलं आहे. ते फक्त कमावते शासक नव्हते तर पुरोगामीही होते, त्याकाळी त्यांनी आपल्या राज्यात स्त्रीशिक्षण अनिवार्य केलं होतं. आपलं संस्थान देशातील एक प्रमुख संस्थान बनवलं. सयाजीराव गायकवाड यांच्या काळातच बदोडा रियासतीची आर्थिक भरभराटही झाली. ही भरभराट किती यासाठी हे एक उदाहरण पुरेसं आहे. इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांनी स्वतःचा ग्रेट ब्रिटनचे राजे म्हणून घोषणा करतानाच भारताचा सम्राट असल्याचीही घोषणा केली. त्यावेळी म्हणजे 1903 दिल्ली दरबाराचं आयोजन करण्यात आलं. या दरबारात तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी भारतातील रियासतीच्या सम्राटांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केलं होतं. या दरबारात भारतातील संस्थानिकांनी आपल्या निष्ठेचंही प्रदर्शन करावं अशी अपेक्षा होती. देशभरातील मांडलिक संस्थानिकांना हा दरबार म्हणजे आपल्या संपत्तीचं सार्वजनिक प्रदर्शन करण्याचीही संधी होती. त्यावेळी महाराजा सयाजीराव (तिसरे) गायकवाड यांनी पर्ल कारपेट म्हणजे मोत्यांचा गालिचा प्रदर्शनात ठेवला. अनमोल मोती आणि हिऱ्यांनी जडलेल्या या गालिच्याची त्यावेळी किंमत होती अंदाजे एक कोटी रूपये... 1903 सालच्या एक कोटी रूपयांची आज किती किंमत असेल, याचा अंदाजच लावलेला बरा... 1989 मध्ये जेव्हा त्या गालिच्याचं मूल्यांकन करण्यात आलं तेव्हा त्याची किंमत निश्चित करण्यात आली ती होती तीन कोटी दहा लाख अमेरिकी डॉलर्स... महाराजा सयाजीराव गायकवाड 1939 मध्ये स्वर्गवासी झाले. त्यांच्या इच्छेनुसारच बडोदा संस्थानाची जबाबदारी त्यांचे नातू प्रतापसिंहराव गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. देशाला स्वातंत्र्या मिळालं तेव्हा प्रतापसिंहराव गायकवाड यांच्याकडेच बडोदा संस्थानची जबाबदारी होती. मात्र त्यांना सत्तेच्या राजकारणात फारशी रूची नसल्यामुळे त्यांना गादीवरून हटवून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव फतेहसिंहराव गायकवाड यांचा राज्याभिषेक करण्यात आला. हा सत्तापालट झाला त्यावेळी साल होतं 1951. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी घालून दिलेल्या नियमांविरूद्ध जाऊन प्रतापसिंहराव महाराजांनी एका घटस्फोटीत महिलेशी विवाह केला. त्याचं नाव सीता देवी. त्यामुळेच प्रतापसिंहराव महाराजांना राजगादी सोडावी लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली. इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड यांच्या सन्मानार्थ ज्या अनमोल गालिच्याचं प्रदर्शन करण्यात आलं होतं, तो गालिचा प्रतापसिंहराव महाराजांनी सीता देवीच्या सांगण्यानुसारच देशाबाहेर नेला. आज तो गालिचा कुठे आहे, याविषयी कुणालाही माहिती नाही. मराठी रियासत असलेल्या बडोद्याच्या गायकवाड संस्थानाची अखेर वाटणी

जन्मगाव कळवण(आज हा स्वतंत्र तालुका आहे)च्या ऐवजी कौळाणे(नि.)ता.मालेगांव जि.नाशिक असेच असावे. आज हे मालेगावशहराचा/मालेगाव कॅम्पचा एक भाग बनले असावे, कारण फक्त १० किलोमीटर वर आहे. इतका सुंदर वाडा इतक्या चांगल्या अवस्थेत आहे हे विशेष! कोणी पहिलाय का आजकाल? कृपया माहिती पुरवावी. कौळाणे ता.मालेगाव येथील गायकवाड वाडा साभार:श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा कौळाणे (नि.) ता. मालेगांव जि. नाशिक येथील प्रशस्त चिरेबंदी वाडा.

हो पाहिलाय, आनि आमच्या शेति पासुन फक्त ३ की.मी. आहे. वाडा तोड्फोड झाला आहे. वाडयात सोने आहे आनि ते शोधन्या साठि लोकल लोकानी पड्झड, तोड्फोड, खोद्काम केले आहेत.

बडोदे संस्थान म्हटले की अनेक गोष्टी आठवतात. मराठी साहित्यात महाराजा सयाजीरावांचे संदर्भ अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. वि.द. घाट्यांनी त्यांचे सुंदर शब्दचित्र रंगवलेले आहेच. सयाजीरावांच्या कर्तृत्वामुळे तोवर प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या (आणि गायकवाडांना हीन समजणार्‍या) जयपूर सारख्या राजपूत घराण्यांनी बडोद्याशी सोयरिकी केल्या. गायत्रीदेवींच्या आत्मकथनामध्ये घराण्यातल्या विवाहप्रसंगी कोणी कायकाय नजराणे दिले ते लिहिताना बडोद्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. कलाक्षेत्रातही त्यांच्यामुळे बडोद्याचे फारमोठे योगदान आहे. माने सरदार, अब्दुल करीम खाँ, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर यांची नावे बडोद्याशी जोडलेली आहेत. देशातल्या स्वातंत्र्यचळवळीला त्यांचा गुप्त पाठिंबा आणि मोठी मदत होती. सशस्त्र क्रांतिकारकांनाही त्यांचा पाठिंबा होता.डॉ आंबेडकरांनाही त्यांच्याकडून अधिक मदत होऊ शकली असती पण एका दुर्दैवी घटनेमुळे बाबासाहेबांना तिथून बाहेर पडावे लागले. लो.टिळकांशी त्यांचा संपर्क होता. महाराष्ट्रातल्या नाटक कंपन्या विशेषतः गंधर्व नाटक कंपनीला आश्रय होता. मुंबईत जगन्नाथ शंकरशेठ यांच्याशी निकटचे संबंध होते. जुनी पुस्तके वाचताना असे अनेक उल्लेख सापडतात आणि या राजाचे चतुरस्र कर्तव्य पाहून मन स्तिमित होते.

वासुदेव बळ्वंत फडके हे इंग्रजांना अटक करता येऊ नये या साठी काही काल भूमिगत होऊन वावरत होते. त्या वेळी सयाजीरावांनी संस्थानाच्या हद्दीतील नर्मदेच्या किनार्यावरील एका गावात त्यांची रहाण्याची सोय केली होती, असे ऐकले आहे.

इथे अवांतर होईल अशी माहिती: सयाजीरावांची मुलगी कुचबिहारच्या राजघराण्यात सून म्हणून गेली, तिची मुलगी म्हणजे जयपुरच्या दिवंगत महाराणी गायत्रीदेवी.