Welcome to misalpav.com
लेखक: मालविका | प्रसिद्ध:
रेडीओशी माझ नात तस म्हटल तर लहानपणापासून.अगदी लहान असताना मी जेव्हा आजोळी सुट्टीत रहायला जायचे तेव्हा सकाळी आजीचा रेडीओ चालू असायचा.आमच्याकडे का कोण जाणे पण जवळच रत्नागिरी स्टेशन कधी लागल नाही.नेहमी मुंबईच लागायच.आजीची सकाळी काम चालू असताना बरोबरीने रेडीओ चालू असायचा.मी कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिल तेव्हा.पण तेव्हा रेडीओ कानावर पडलेला आठवतोय.शिवाय आमच्या घरी तर मोठे काका सकाळी उठत तेव्हापासूनच ते रेडीओ चालू करत.थोड्या वेळाने रेडीओ चा आवाज सहन न होऊन आम्ही पण उठायचो.आम्ही किती तरी वेळा काकाना संगयाचो की निदान सुट्टीच्या दिवसात तरी आम्हाला झोपू दे.पण त्यानी ते कधीच ऐकल नाही.बर तेव्हाच्या घराला आता सारख्या वेगळवेगळ्या स्वतःच्या अशा खोल्या नव्हत्या .घर जरी १२/१४ खोल्यांच असल तरी बेडरूम म्हणावी अशा २ ते ३ च.पण एकदा उठल्यानंतर परत बेडरूम मधे जाउन झोपन काकांच्या आणि एकूणच घरच्या शिस्तीत बसत नसे.त्यामुळे जबरदस्तीने उठावाच लागे.लहानपणी रेडीओशी संबंध आला तो एवढाच. नंतर शाळेच्या वयात देखील वर्गातील एखाद्या मैत्रिणीच गाण रेकॉर्ड झालाय किंवा सराच भाषण झालाय एवढाच . तसा आमच्याकडे टी वी लवकर आला त्यामुळे तेव्हा कधी रेडीओ ची गरजच नाही वाटली. मी जेव्हा मुंबई ला पेयिंग गेस्ट म्हणून रहायला आले,तेव्हा रेडीओशी माझा अगदी जवळचा संबंध आला.मी मुंबईत दाखल झाले तेव्हा एफ एम च प्रस्थ फार वाढल होत.मी आले तेव्हाच ४/५ हिंदी गाण्याचे चॅनेल्स सुरु होते.मी तेव्हा एका बीपीओ मधे कमाला लागले होते .त्यामुळे तिथे शिफ्ट ड्यूटीज होत्या.मी जेव्हा सकाळच्या शिफ्ट ला जायचे तेव्हा ६.१५ ची ठाण्याहून बस असायची.मी ६लाच घर सोडायचे.तेव्हा (आता नाव लक्षात नाही)पण कुठल्यातरी मराठी चॅनेल वर सुंदर मराठी गाणी लागायची. बस ६.५० ला कंपनी च्या दारात उभी रहायची तोपर्यंत मी पुर्ण वेळ ती सगळी मराठी गाणी ऐकायचे.एरवी दिवसभर जाता येता एफ एम वर हिंदी गाण्यांचा रतीब चालूच असायचा.या सकाळच्या गाण्यांप्रमाणे माझा आणखी अगदी आवडता कार्यक्रम म्हणजे रात्री ९ वाजता लागणारा "पुरानी जिन्स ".रेडीओ मिर्ची किंवा रेडीओ सिटी किंवा अशाच कुठेतरी तो कार्यक्रम लागायचा.तो मात्र मला खूप आवडायचा.दुपारची शिफ्ट रात्री १० ला संपायची .तेव्हा परत येताना जो एफ एम चालू व्ह्यायचा तो अगदी घरी येऊन झोपेपर्यंत.मला मनापासून जुनी गाणी खूप आवडतात.त्यात किशोर कुमार माझा जास्त आवडीचा.त्यामुळे हा पुरानी जिन्स कार्यक्रम मला विशेष आवडे.कितीतरी जुनी पण खूप सुंदर गाणी त्यात लागत.अगदी उशिरा बरेच रेडीओ चॅनेल मग अशीच जुनी गाणी लावत.आणि मुख्य म्हणजे यात त्या आर जे ची बडबड नसे.बर्याच वेळा अस व्ह्यायच की तो आर जे बडबड करायला लागला की लगेच दुसरीकडे नवीन गाण सुरु करायच.त्यामुळे दर थोड्या वेळाने मोबाइल वरून बोट चॅनेल बदलत असायची. बर्याच वेळा रात्री फोन चार्जिंग ला लावायचा आणि हेडफोन्स कानात घालून गाणी ऐकत झोपायच हा माझा आवडता प्रकार होता. २वर्ष मुंबईत घालवल्यावर मी पुण्याला शिफ्ट झाले.इथेही तोच प्रकार.पण इथले एफ एम चॅनेल्स हिंदी मिश्रित मराठी बोलायचे.गाणी सगळी हिंदीच.पण सोबत लागणारी बडबड मात्र हिंदी इंग्रजी आणि मराठी अशी एकत्र.पुण्यात आल्यावर हातात गाडी आली आणि मग टिपिकल पुणेकर मुलामुलींप्रमाणे मी कानाला हेडफोन्स लावून गाडी चालवायची सवय लवकरच करून घेतली.इथे सुध्हा मी पीजी म्हणूनच रहात होते.पण मुंबईत अनोळखी मुली सोबत राहून अगदी मस्त मैत्री जमली तर पुण्यात माझ्या चिपळूणकर मैत्रिणीच साथीला मग काय मजाच.इथे आम्ही मोठ्याने एफ एम वर गाणी लावून ठेवायचो.कोणताही काम करताना बरोबर गाणी हवीच.मग बाहेर जायच तर तयारी करताना गाणी.अगदी घराबाहेर पाउल टाकेपर्यंत मोबाइल मोठ्याने वाजत असायचा.आणि दराबाहेर पडल की लगेच हेडफोन कानाला चिकतायचे.पुण्याचा ऑफीस मधे फोन डेस्क वर न्यायला परवानगी होती . त्यामुळे इथे सकाळची शिफ्ट असेल तर सकाळी ७ वाजता शिफ्ट सुरु होई तेव्हापासून ९ वाजता मॅनेजर येईपर्यंत फोन वर गाणी चालू असत.आणि जर दुपारची शिफ्ट असेल तर ६ वाजता मॅनेजर घरी गेला की मग रात्री १०ला शिफ्ट संपेपर्यंत एफ एम वर गाणी चालू असायची .शिवाय मी पुण्याहून चिपळूणला रात्रीच्या एस टी ने जायचे.तेव्हा अगदी सातार्यपर्यंत एफ एम चालायचा.त्यामुळे मला रेडीओ त्या प्रवासात सोबती वाटायचा. आता परदेशी आले आणि रेडीओची साथच सुटली.आजकालचे फोन पण भरपूर मेमरी असलेले.शिवाय इथे हाय स्पीड इंटरनेट असल्याने हवी तेवढी गाणी हवी तेव्हा ऐकता येतात. पण आजही रेडीओ म्हटल की मला माझे मुंबई पुण्याचे दिवस आठवतात.तेव्हाची गाणी आता जुनी झाली.ती काही जुन्या काळातल्या लता,किशोर,रफी,आशा यांच्या गाण्यांसारखी अजरामर गाणी नाहीत.पिक्चर नवीन असताना ती गाणी सारखी ऐकून ऐकून आवडायला लागली होती.पण त्या सगळ्या गाण्यांबरोबर माझ्या काही आठवणी गुन्फल्या गेल्या आहेत इतकाच.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मनापासून लिहिलेला छान लेख! आठवणींची सोबत मनाला फार भावते. तुम्ही कुठल्या देशात आहत? तिथे आणखी काही सुखद आठवणींचा खजिना तयार करा...:-)

माझ्या लहानपणी (६० च्या दशकात), आमच्या एका सुखवस्तू नातेवाईकांकडे मर्फीचा रेडिओ आला. ट्रान्झीस्टर अजून भारतात आला नव्हता. व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. व्हॉल्व्ह तापून रेडिओचे स्टेशन लागेपर्यंत धीर धरावा लागायचा. तर, सांगायची गोष्ट अशी की घरात रेडिओ असणे हे श्रीमंतीचं लक्षण होतं. आपली श्रीमंती इतरांच्या लक्षात आणून देण्यासाठी लोकं धडपडायचे. आमच्या 'त्या' श्रीमंत नातेवाईकाने आम्हाला रविवारी सकाळी चहापाण्याला बोलावले. आणि नवा रेडिओ आणल्याचे दाखविले. तेंव्हा सकाळी नऊ (की साडेनऊ) वाजता रेडिओवर 'गम्मत-जम्मत' हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा. 'गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐकाहो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण' असं त्या कार्यक्रमाचं शिर्षक गीत लागायचं. त्यातलं शेवटचे 'गम्मSSSSत जम्मSSSSत' हे शब्द मला खुप आवडायचे. इथून मुलांचा कार्यक्रम सुरु व्हायचा. तेंव्हा रेडिओवर जास्त करून मराठी कार्यक्रमच ऐकले जायचे. मराठी सिने संगीत, शास्त्रीय संगीत, श्रुतिका, चर्चा, किर्तनं, बाजारभाव इत्यादी इत्यादी. पैकी रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकवायचे कार्यक्रम. हिन्दी कार्यक्रम ऐकायचेच नाही असेही नाही. दुपारी अडीच वाजता विविधभारती, त्यातील 'फौजी भाईयों कि खिदमत में' सादर होणार्‍या कार्यक्रमात येणार्‍या मोठेमोठ्या निर्माते, दिग्दर्शक, हिरो - हिरॉइन्स वगैरे ग्लॅमरस व्यक्तींना प्रत्यक्ष 'ऐकायला' मिळायचं. गाणी तर सुंदर असायचीच. बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' आणि अमिन सयानीचं सादरीकरण हा एक हवाहवासा वाटणारा कार्यक्रम होता. अमिन सयानीचे भाऊ हमिद सयानी रविवारी दुपारी 'कॅडबरी क्विझ कॉन्टेस्ट' सादर करायचे तोही माहितीपूर्ण कार्यक्रम होता. रात्री सव्वानऊला 'ईगल फ्लास्क' प्रस्तुत इन्स्पेक्टर ईगल ह्यांची विनोदी मालीका लागायची तर 'हवामहल' कार्यक्रमात वेगवेगळ्या पुरातन ऐतिहासिक वास्तू स्वतः इतिहास कथन करायच्या. असा सर्वांगिण मनोरंजन आणि ज्ञानाचा धबधबा असलेल्या रेडिओने सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध केले होते. त्याकाळी घरेदारे उघडीच असायची त्यामुळे कोणाकडे स्टोव्हवरून दुध उतू गेलंय (त्याचा विशिष्ट वास असतो), कोणाकडे मांसाहार शिजतो आहे, कोणाकडे कुकरची शिट्टी झाली आहे पासून घरची भांडणं, छोट्यांच्या मारामार्‍या, मोठ्या व्यक्तीचं सातमजली हसणं तर एखाद्या मनमोकळया वृद्धांचे आवाजी वायू निस्सारण ह्या सर्व गदारोळात रेडिओ आपले अस्तित्व जाणवून द्यायचाच. एखादे आवडीचे गाणे लागले असेल तर धावतपळत घरी येऊन रेडिओचा कान पिळायचा आणि ते हिन्दी चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं असेल तर मोठ्यांकडून आपला कान पिळून घ्यायचा हे नित्यनेमाने व्हायचे. अभ्यासात 'ढ' असणार्‍या मुलाला 'रेडिओ दुरुस्ती शिक निदान उपाशी तरी मरणार नाही' असा मोलाचा सल्ला दिला जायचा. ह्या सर्व गोष्टींची चमचमती झालर लाभलेलं आमचं बालपण आठवलं की अजूनही मन हळवं होतं.

बरेचदा यु ट्युबवर "ceylone song"" सर्च देऊन जुनी गाणी ऐकते. सकाळी जाग यायची तेव्हा बाबांनी सिलोन स्टेशन लावलेलं असायचं. दिवसाची सुरुवातच संगीतमय होत असे.

पेठकरकाकांशी सहमत. रेडिओवरील अजून १ आवडता कार्यक्रम आढवतो, तो म्हणजे रविवारी दुपारी २ वाजता लागणारा "क्रिकेट विथ विजय मर्चंट" रेडिओबद्दलचे माझे एक आवडते गाणे

तुमच्याशी सहमत, या रेडिओमुळेच आपले बालपण समृद्ध झाले आहे, त्या काळी माझ्या वडीलांनी आमच्या खेडेगावात पहिला रेडिओ आणला,मग काय सकाळ संध्याकाळ सगळे कुतुहलाने यायचे, मास्तर बातम्या लावा की, फर्माईश व्हायची, रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकता ऐकायला त्या रेडीओ भोवती कोंडाळे केले जायचे,तसेच रविवारी सकाळी ११ वाजता आपली आवड असायची, बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' तर सर्वांच्या आवडीचीच. पहाटे पासून हा रेडिओ आपले अस्तित्व जाणवुन द्यायचा. पुढे कॉलेजला गेल्यावर सुद्धा ही रेडिओची आवड तशीच राहिली, त्या वेळी रात्री ११ वाजता विविध भारतीवर जुनी गाणी लागायची ती आर्वजुन ऐकत होते. आज सुध्दा सकाळी लवकर उठल्याबरोबर आधी रेडिओ लावते. पुणे स्टेशन मला फार आवडते, सर्वच माहिती तिथे मिळते.

वा प्रभाकरपंत ! आमचं पण लहानपण व रेडिओ च नातं असंच. आमच्या वडिलांनी रेडिओ आणला ते विम्याच्या पैशातून. ( म्हण्जे त्यावेळी विम्याची म्याचुरिटी किंमत काय असेल पहा !!!!! हा ! हा ! ) .अहो पंत ते क्रिकेट विथ विजय मर्चंट राहिलं की ! आपल्या मुबईचा पदमाकर शिवलकर या बोर्नविटा चा मला वाटत> एक डवल ऑर क्विट असा कार्यक्रम आला होता त्यात सर्वात जास्त पैसे कमविलेला स्पर्धक होता. सुशील जव्हेरी, एम के धर्मराजा, सुजित सेन पामेला सिंग, बोरून हालदार या बरोबरच " दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत ....." चे एक ग्लॅमर होते. मला शास्त्रीय संगीताची आवड लावण्यात विविध भारतीच्या 'संगीत सरिता' चे फार मोठे ऋण आहे. ( हा कार्यक्रम आजही चालू आहे ) .

होय. तो 'बोर्नव्हिटाचा'च कार्यक्रम होता. मी चुकून 'कॅडबरी' लिहिलं आहे. कदाचित 'बोर्नव्हिटा' हे 'कॅडबरीचे'च असल्याने चुक झाली असावी.

सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही. बातम्यांच्या सुरुवातीला निवेदक खर्जात "ये (पॉज) आकाशवाणी है" असं म्हणाला की त्यापुढचं वाक्य "कोई बच्चों के खेलने की चीज नहीं" असं त्याच्या मनात वाजलेलं आहे, हे लक्षात येतं. यांना अचूकतेची भारी हौस. "तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ" वर ऐकू येणार्‍या आकशवाणी पुणे केंद्रातून "सकाळचे सात वाजून पंचावन्न मिनिटं आणि अठरा सेकंदं झाली आहेत" वगैरे तपशील मिळतात. बाजारभाव, तापमान हे दुसर्‍या डेसिमलपर्यंत सांगतात. कार्यक्रम आणि त्यांचे प्रायोजक कधी बदलतात काय माहीत! "स्वामिनी मराठी भक्तिगीत" आणि "जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल" ऐकतो आहे. आठवणच काढतो आहे तर "बाळाराम मार्केट"ची जाहिरात द्यायचा मोह आवरत नाही:
"ओओ...ओ" "अय्या टारझन!" "आणि तो देखील बाळाराम मार्केटमध्ये!!" "अक्सा सटाकाना सुटाकाना सफारीटागा..." "तो म्हणतोय, सूटिंग शर्टिंग आणि रेडिमेड्सची व्हरायटी अन्य कुठे?" "ओओ...ओ" "अय्या गेला पण!" "बाळाराम मार्केट, लक्ष्मी रोड, पुणे"
अजून खूप खूप खूप आठवणी आहेत. पण परत कधीतरी...

हाहाहाहा खत्री जाहीरात! लहानपणापासून रेडिओशी जुळलेली नाळ अजूनही टिकून आहे. आत्ताही रात्री झोप आली नाही की १००.७ स्टेशन लावून ऎकत बसतो. बर्याचश्या जून्या गाण्यांचा आस्वाद घेता येतो तिथे.

पण रेडिओवरच्या जाहीराती साधारण खत्रीच असतात. फुल्ल मिमिक्री टाईप. कारण समोरच्याला चित्र दिसत नसते तर शब्दच त्याच्या मनात ठसवायचे असतात. त्यामुळे कधी अतिरेक होणे वा येडे चाले केले जाणे होतेच.

सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही.
एकदम सहमत. मिर्ची वगैरे च्यनल्स वर खूssssssप जाहिराती असतात. पण विविध भारतीवर चांगले दिवस आणि वाईट दिवस असा ढळढळीत फरक असतो. छान गाणी लागली की एका मागे एक भारी गाणी लागतात. पण एखाद दिवशी सगळी भिकार गाणी ! वटवट-वटवट नावाच्या नाटकात पुलंनी मस्त वातावरण उभं केलं आहे रेडीओ स्टेशनच्या कामकाजाचं.
"जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल"
यातल्या जीतेंद्र मधल्या दीर्घ 'जी'चा उच्चार अगदी भाषाशिक्षकाकडून घोटवून घेतल्या सारखा दीर्घ. जीsतेंद्र त्या बाळारामबरोबरच 'घराला घरपण देणारी माणसं' ही डीएस्के ची जाहिरात पण वर्षानुवर्ष चालू आहे.

आणि फिनोलेक्स्ची झायरात हो? ती विसरला का? शेत पिकली सोन्यावाणी. कसला विचार करतोयय रामय्या ही पत्रेवाली जाहीरात. ग्रीटवेल संदेसे आते है. हॅलो मधुमालती. तसेच सांजधारा हे विविधभारतीवर लागणारे कार्यक्रम. ११:३० ला मुंबईवर लागणारी कामगारसभा. मला वाटायचे की आता खरंच कोणतीतरी सभा होणार आहे. करंट मधे गलानी फॅशन्स रतीब घालते आहे. मजा मजा असते.

(सांगली/कोल्हापुर) रेडीओवरच्या काही जाहिराती अजुन आठवतात. ---- सुवासिनीनं कुकवाला आणी मर्दानं 'च्या'ला न्हाई म्हणू नये.. पण आमी नेहमी मगदूमचा कडक च्याच पितो आणी आमी काय उन पाणी पितो काय? ---- वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड. ---- झुळझुळ वाणी.. खेळवा पाणी.. आणायचं कुणी.. सांगतो राणी

वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड.
वारणा दुधाचे दर्जेदार उत्पादन! "सरस्वती च्या" ची अ‍ॅडही तशीच आठवतेय. फिनोलेक्सनं आणलं पाणी, तसेच मगदूम च्या, इ.इ. अनेक खास आपल्या पट्ट्यातल्या झैराती मस्त असायच्या राव. ६:५५ ला संस्कृत बातम्याही असायच्या. "इयं आकाशवाणी | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः |" किती वर्षे तोच होता. नंतर पुढे "प्रवाचकः सूर्यनारायणानन्दः" झाल्यावर त्यातली मजा गेली राव.

च्यायला, या जाहिराती ऐकल्याशिवाय सकाळ झाल्याचे वाटायचेच नाही राव!! अजून एक. लाडा पंप्सची जाहिरात. "लाडा लाडा.......... पाणी वाहे निर्मळ, हिरवी होई शेती...."

लाडा लाडा सब्मर्सिबलं पंपं.. पाणी मीळे मुब्लकं.. हिरवी होई शेऽती, हिरवी होई शेऽती... धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... लाडा लाडा...

नग्गग्ग... अवो सुवासिनिनी कुक्वाला अन मर्दान्न च्याला नगं म्हनू नये... पण आम्ही नेमी मर्दांचा कडक ***चहाच पितो मंग आमी काय उन पानी पितो व्हय ? आम्हीबी आमच्या आबा आज्यापासुं मर्दांचा कडक ***चहाच पितो आसं म्हणता ? मग़ हुञ्जाउदे डबल (का धमाल आठवत नाही)

:)) मला आधी ते- "धन धान्याची बरकत लाडा पंपाची अपुर्वाई" असं वाटायचं. मग नंतर लाडा पंपाचीया किरपेने.. असं. अजुन समजलेलं न्हाई.. असो.

राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका अशी कुठ्ल्यातरी मिरजेतल्या कपड्यांच्या दुकानाची जाहीरात होती. माझ्या बहीणीच नाव राधिका आहे तिला या जाहीरातीप्रमाणे हाक मारायचो आम्ही. वालावालकर कापड दुकान (ट्रस्ट्)ची जाहीरात.. लग्नाचा (इथे काय शब्द होते आठवत नहियेत).. कोल्हापुरच्या अंबाबाईचा आणि लग्नाचा बस्ता वालावालकरांचा. लाडा पंपाची पण अशीच काहीतरी जाहीरात होती, ती कायम शनिवारी सकाळच्या शाळेलाच जाताना ऐकल्याने, एरवी ती जाहीरात कधीही लागली तरी सकाळ झाल्यासारखी वाटायची.. बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.

राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका
एकदम एकदम!!! दिल राधिका राधिका हो गया. :)
बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.
एक लिंबू झेलू बै दोन लिंबू झेलू दोन लिंबू झेलू बै तीन लिंबू झेलू तीन लिंबू झेलू बै चार लिंबू झेलू चार लिंबू झेलू बै पाच लिंबू झेलू पाचा लिंबांचा पानोठा अभय नारायण पोद्दारान्नी पोद्दारान्नी किमया केली दागीन्यान्नी गृहलक्ष्मी सजली

कसला विचार करतोय रामय्या घराला आनि गोठ्याला कुठले पत्रे लावावे अरे, चारमिनार अ‍ॅस्बेस्टॉस सिमेंटचे पत्रे घे, माझ्या आजोबांनी लावलेले अजूनही मजबूत आहेत. अरे हो, खरंच की. चारमिनारचे पत्रे वापरा..

माझ्या आजोबांनी लावलेले अजूनही मजबूत आहेत. मजबुत नाय वो ते शाबुत आहे शाबुत.

बिन सेल बिन लाईट चा रेडिओ तयार केला होता. अर्थातच त्याला स्विचोफ़ ऑन कळ न्हव्ती. ऐकायचे असेल की हेडफोन डोक्याला लावायचा नको असेल तर बाजुला काढायचा. विशेषत: लाईट गेली की हां बिन विजेचा रेडिओ रात्री अंधारात ऐकत बसने ओसम थिंग होती. टॉप ऑफ़ द वर्ल्ड. - मुलांसाठी सोपे वैज्ञानिक प्रयोग पुस्तकात याची रेसिपी होती.... आहे.

सकाळची शाळा असायची... सहा वाजता उठलो कि त्याच वेळी मुंबई ब आकाशवाणी केंद्रावरून 'मंगलप्रभात' हा भक्तिपर गीतांचा कार्यक्रम सुरू व्हायचा... तो ऐकत चहा, आंघोळ वगैरे उरकली जायची... बरोब्बर सात वाजता घोषणा ऐकू यायची... "आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!!" ती आमची शाळेला जायला घराबाहेर पडायची वेळ!! मी तिसरी किंवा चौथीत असेन... ती घोषणा मी इतक्या वेळा ऐकली होती की एकदा मी आईवडिलांकडे हट्ट धरला की या मे महिन्याच्य सुट्टीत पुण्यालाच जायचं!! आता आम्ही कोकणी माणसं!! दर सुट्टीला कोकणात किंवा गोव्याला पळणारी... अगदीच हट्ट धरला तेंव्हा शेवटी वैतागून बाबांनी विचारलं, "पुण्याला कशाला? तिथे काय ठेवलं आहे तुझं?" मी म्हंटलं, "मला सुधा नरवणेंना बघायचंय!" "कोण सुधा नरवणे?", बाबांना काही कळेना. "त्या, आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!! मधल्या सुधा नरवणे!", मी नरवणेबाईंच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत सांगितलं... कधी नव्हे ते आमचे पिताश्री ठ्ठोऽऽऽ करून गदागदा हसले!!!!! :)

ठ्ठो =)) पिडांकाकांनी खरे तर त्यांच्या बालपणाबद्दल एखादी सेरीजच सुरू केली पाहिजे.

सुधा नरवणेंमुळे माझ्या देखील आठवणी जागा झाल्या सात पाच च्या बातम्या असायच्या त्या. अशी किंचीत ऑड वेळ का असायची माहीत नव्हते. पण मला वाटते ७ ते ७:०५ पुणे केंद्रावर (मुंबईवाल्यांना नाही) संस्कृत मधे बातम्या असायच्या! सुधा नरवणे आणि त्यांचा आवाज आजही आठवतो. अत्यंत स्पष्ट आवाजात आणि १० मिनिटात त्यावेळचे जग समजायचे.. त्यांच्या आवाजाने (खरी) जाग येयची त्यामुळे आम्ही मुले त्यांना गंमतीत डरावणे म्हणायचो! :) खाली बहुगुणींनी आकाशवाणी केंद्राची सिग्नेचर ट्यून दिली आहेच. तशी आपली आवडची पण सिग्नेचर ट्यून आठवते. पण कुठे मिळू शकली नाही. :(

मला वाटते संस्कृत बातम्या ६:५५ ला असत.. ७ वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या प्रक्षेपित होत असत. मी जेव्हा या बातम्या ऐकायचो तेव्हा भालचंद्र कुलकर्णी बातम्या द्यायचे.. मजा होती राव..!

वरून आठवले, याच नावाचा एक चित्रपट सुधाआहे, हिमेशजी रेशामिया भाऊ त्यात नायक असून त्यातले मन का रेडिओ बजने दे जरा.... फुल्टू एटिट्युड देदे तु जरा गाणे आवडल्याने बराच वेळ थेटर हुडकत फिरत होतो.... मग क्ळाले चित्रपट 3 दिवसात उतरवला होता ते. :( बिचारा हिमेस...

जुन्या आठवणी जागवल्यात. कामगारसभा म्हणजे खरोखर कामगारांची जेवणाची वेळ पाहून त्याच वेळी प्रसारीत होणारा कार्यक्रम होता. कामगार सभा सकाळी ११ वाजता सुरू होई अन काका बजाज मधून बरोबर ११.०३ ला घरी जेवायला हजर होत. हीच वेळ शाळेसाठी तयारी करण्याची असे अन ११.३० ला घराबाहेर पडण्याची असे. हवामहलमध्ये विनोदी किस्से असायचे. शालेय कार्यक्रम तर बहार होती. बाकी माझ्या रेडिओ कवितेची आठवण आली.

जुन्या ट्रांझीस्टर रेडीओचे काय करायचे ?आता मोबाईलमध्ये छान एफेम लागते .ते रेडीओ चार रुपये किलो प्लास्टीक भावाने विकण्यापेक्षा स्पिकर म्हणून खोल्यांतून लावून टाकले .

दर सोमवारी संध्याकाळी ७ वाजता गोवा स्टेशनवर १ तास आपली आवड लागायची. त्यात संपूर्ण १ तास फक्त मंगेशकर भावंडांची गाणी लागायची.ते स्टेशन स्पष्टपणे मिळायचे नाही. अगदी कान देउन ऐकावे लागायचे. पण, मन आनंदाने भरून जायचे.रेडिओच्या आठवणी नेहमीच येतात.आमच्या 'घडत्या' वयात आम्हाला रेडिओवरचे दर्जेदार कार्यक्रम ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच म्हणायचे.

आमचे फॅमिली डॉक्टर होते. 'त्या' काळात त्यांनी, आपल्या नंबराची वाट पाहात बसलेल्या, रुग्णांच्या करमणूकीसाठी असाच मर्फीचा रेडीओ आणला होता. तो कोणाचाही हात पोहोचणार नाही (अगदी त्यांचाही), अशा उंचीवर फळी ठोकून तिथे ठेवलेला होता. तेंव्हा त्या रेडिओची डिलीव्हरी करायला आलेल्या विक्रेत्याकडून यांनी त्यावर 'मुंबई ब' हे स्टेशन लावून ठेवले होते. (हे पुढे आयुष्यात बदलले नाही. एकच स्टेशन ते ऐकायचे), आवाजाची पातळी ठरवून घेतली होती. आणि त्या रेडिओला विजेचा पुरवठा करणारे बटण हात पोहोचेल तिथे होते. डॉक्टरांनी दवाखाना उघडला की ते बटण ऑन करायचे, दवाखाना बंद झाला की बटण बंद करायचे. मधल्या वेळात (ऑन स्थितीत) 'मुंबई ब' वरचे सर्व कार्यक्रम अगदी ओळीने ऐकायला मिळायचे. आम्ही हसायचो. भावगीतं, बाजारभाव (त्यात 'कांदा - लासलगाव, प्रति क्विंटल....' हे माझं आवडतं वाक्य), चर्चा, हवामानाचा अंदाज, बातम्या सर्व सर्व 'पार्श्वसंगित' चालू असायचं. डॉक्टरांना त्याचं कांही सोयरसुतक नसायचं. दवाखान्याच्या वेळात ते रेडिओ ऐकायचेच नाहीत. त्यांचं रुग्ण तपासण्याचे काम अगदी आत्मियतेने चालायचं. त्या रेडियोवर 'हांव अमूक तमूक कोंकणींतून खोंबरें देतां' ह्या वाक्यावरही हसू आवरणं मला अवघड जायचं. डॉक्टर चष्म्याच्या वरून माझ्याकडे कटाक्ष टाकायचे आणि गालातल्या गालात हसायचे. ते कारवारी होते. ह्या आमच्या डॉक्टरांवर एक वेगळा व्यक्तिचित्राचा धागा होऊ शकेल.

सुरेख मालविका! पण धागा खुलला तो प्रतिसादांनी. प्रपे काकांचे प्रतिसाद तर अतिशय वेधक. अन पिडां काकांची "सुधा नरवणे" :))

गीतमालेसाठी पान पट्टी गाठत असू.. घ्यायचे काहीच नाही पण तरी पानपट्टीवाला काही आक्षेप घेत नसे.जर पोहचायला उशीर झाला तर आम्च्या वरातीमागून घोड्या सारख्यांसाठी गाण्यांची उजळणी असायची. अगदी अलिकडे म्हणजे "हिरो" (जॅकीचा) पर्यंत ही बिनाका गीतमाला ऐकली आहे.. पेठकर काकांनी "मंतरलेल्या" दिवसांची आठवण काढली हेच खरय.

एकदम मस्त लिहीलयस मालविका...आणि सर्वांचे प्रतिसाद पण मस्त!! पुरानी जिन्स बद्दल एकदम सहमत.
इथे आम्ही मोठ्याने एफ एम वर गाणी लावून ठेवायचो.कोणताही काम करताना बरोबर गाणी हवीच.मग बाहेर जायच तर तयारी करताना गाणी.अगदी घराबाहेर पाउल टाकेपर्यंत मोबाइल मोठ्याने वाजत असायचा.
+ १ पुण्याला पीजीमधे राहायला आल्यावर एफएम रेडिओ तर रूमवर कायम सुरू असायचा आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा :) ऑफिसला जातानाही बसमध्ये पूर्ण वेळ एफएम सुरूच असायचं. तुझ्या लेखातल्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असल्यामुळे अगदी रीलेट करु शकले. तू चिपळूणची आहेस का गं? :)

आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा हे बरेच जण करत असावेत, आमचेही करून झालेय. त्या गाण्यांबरोबर आपणही गाणे, सोबतीला सबमिशनच्या नाईटस या ईंजिनीअरींगमधील बेस्ट आठवणी .. बहुतांश ईंजिनीर्सनी अनुभवल्या असतीलच.