Welcome to misalpav.com
लेखक: चिन्मय श्री जोशी | प्रसिद्ध:
मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी . टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही . तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही. आणि मी सुद्धा त्यातलाच एक.. तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू . मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची .. तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला . पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं . तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू इ.) पदवीधर झालो . आमचा नम्बर Accenture नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला (हल्ली campus selection ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे ). आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले. आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले .. तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले .. (वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे ) खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून) . पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे . त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह. गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती .. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो . (एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय) मुंबई नगरी मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला . MNC मध्ये असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती . राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता . पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण . सदैव घाई गडबड आणि पळापळ . हे सगळ वेगळच वाटत होतं . सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली. त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे . १. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे (चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे ) मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते . २. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात .. ३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात . यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला . असो. ४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते . परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला . असो . ५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात . त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये खरेदी करताना "खेकसणे" या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते .. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत) ६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात . ७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी बोलू लागतात .. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात .. ८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो . ९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे . (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे ). असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात. (हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे . असू दे, असते एका एका शहराची मजबुरी) १०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात. (पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही .) ११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत . ( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .) १२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो . व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो. असो . जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो . . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे . मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे ) टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही .. सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती .
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

लोडशेडिंग साठी फक्त वीजचोरीच जबाबदार आहे असे म्हणायचे असेल तर सॉरी पण पटत नाही. आणि त्यातही
म्हणजे इतर भागानी वीज चोरी करायची आणि मुंबई ठाणे भागाने त्यांचे पैसे भरायचे.
म्हणजे मुंबई सोडून इतरत्र वीज चोरी होते आणि मुंबईत नाही हेही पटत नाही. वीज चोरताहेत म्हणून लोडशेडींग की लोडशेडींग मुळे वीजचोरी अधिक होते आहे हा प्रश्न देखील आहेच काही प्रमाणात. पुढे फार चर्चा करण्यात हशील नाही असे वाटते. तेव्हा असो.

लोड शेडींग हे त्यात्या भागातून होणार्या बिलाच्या वसुलीच्या प्रमाणात आहे.
इंट्रेष्टींग! जेनसेट आणि इन्व्हर्टर विकणार्‍यांनी वीजचोरीला प्रोत्साहन दिलं तर आश्चर्य वाटायला नको.

प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देणे शक्य नाही परंतु … काही मजेदार मुद्दे मात्र जाणवले … स्वतः काही न लिहिता दुसर्याने केलेलं (लेखन) चवीने चघळून थुंकून देण्याची वृत्ती मात्र मुंबई, पुणे व भारतात सारख्याच प्रमाणात दिसते … मिपा वरहि असे भरपूर मित्र आहेतच कि … मुंबई कारण ते जुन्या मुंबई चे असल्याचा माज, तर ठाणे कारला तो मुंबई चा असल्याचा माज …. कल्याण चे गर्वाचे मुद्दे वेगलेच… आणि हे मुंबई मधेच नाही , पुण्यातही असाच आहे… पेठेतले पुणेकर कात्रज, हडपसर करांना आणि ते चिंचवड करांना तिरस्काराने बघतातच कि… सर्व कम्मेण्ट मनापासून केल्या आहेत असे मानून सगळ्यांचे माझा लेख वाचल्या बद्दल आभार….

स्वतः काही न लिहिता दुसर्याने केलेलं (लेखन) चवीने चघळून थुंकून देण्याची वृत्ती मात्र मुंबई, पुणे व भारतात सारख्याच प्रमाणात दिसते … मिपा वरहि असे भरपूर मित्र आहेतच कि … काय हे ? तुमच्या या लेखाला मिपाकरांनी इतके उदंड प्रतिसाद दिले .. त्या बद्दल कृतज्ञता व्यक्तं करायची की असा त्रागा करायचा? हीच का ती तुमच्या मुंबईची संस्कृती ? पेठेतले पुणेकर कात्रज, हडपसर करांना आणि ते चिंचवड करांना तिरस्काराने बघतातच कि… हे ज्ञान तुम्हाला कुठुन प्राप्तं झाले म्हणे?

हीच का ती तुमच्या मुंबईची संस्कृती ?
नाही, ही आहे त्यांची पुणेरी संस्कृती... लेख व्यवस्थित वाचलेला दिसत नाही. ;)
तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले ..

मी नीट वाचलाय हो ... तुम्हाला खात्री आहे का की तुम्ही नीटच वाचला आहे.. ते मुंबईवासी झाल्यावर त्यांना झालेले हे साक्षात्कार आहेत.. (आणि हो ...जरा इतरांचे प्रतिसादही नीट वाचा बरं का !)

ते मुंबईवासी झाल्यावर
हे बरय... मुंबईला पाय लगताक्षणी माणुस मुंबईवासी होतो हे मला माहीती नव्हते. धन्यवाद, माझ्या तुटपुंज्या माहीतीत भर घालण्याबद्दल. म्हणजे ज्या शहरात अर्धे आयुष्य जगुन सुद्धा मुंबईला आल्याक्षणी तो/ती लगेच मुंबईकर का...असोच. बाकी चालु द्या.

पुणेकर कात्रज, हडपसर करांना आणि ते चिंचवड करांना तिरस्काराने बघतातच कि… बाकी वाद कायपण घाला पण पूर्वीचे धागे म्हणजे अतिप्राचीन मिपावरचे पाह्यले तर टार्‍या म्हणजे टारझनशी (पिंपरी चिंचवडकर) हातमिळवणी करून त्यात हडपसर आणि कात्रजवाल्यांना जोडून आम्ही कित्येकांचा कात्रज केलाय (जेंव्हा तसे करायला जमले नाही त्याचा उल्लेख टाळतिये पण ते जौ द्या!). गेले ते दिवस. टंकाळा येतो आताशा! मुद्देही तेच ते! हां, तर काय म्हणायचय की वरील वाक्य पटले णाही.

आम्ही ठाणेकर मामलेदारची मिसळ खातो, तिच्या चवीवर व तिखट्पणावर आमचे प्रेम आहे, लाडाने तिला आम्ही **फाडी मिसळ असे म्हणतो, ज्याच्या **त दम असेल तोच तिच्या वाटेला जातो, 'आमंत्रणाची' गरज पडत नाही. तलावपाळी म्हणजे ठाणेकरांचा प्राण. उपवनचे तळे आणि येऊरचा डोंगर पाहून कोणालाही ठाणे शहराचा हेवा वाटेल. शेजारच्या मुंबईशी आमचे संबंध चांगले आहेत, एकमेकांची उणीदुणी काढत बसत नाही. एकदा मी प्रिंसेस स्ट्रीटला केमिकल्स घ्यायला नेहमीच्या दुकानात गेलो होतो. मालक गुजराथी होता, या या गोडसेसाहेब असे नेहमीप्रमाणे त्याने माझे स्वागत केले व नोकरास माझी केमिकल्स आणायला सांगितले. दोन मिनिटात सगळी केमिकल्स माझ्यासमोर ठेवली. माझ्या बाजुला एक गोरा तरूण हातात यादी घेऊन बसला होता, तो जर अस्वस्थ वाटत होता, तो मालकाला म्हणाला अहो मला घाई आहे माझी ऑर्डर लवकर पूर्ण करा. त्याला वाटले असेल हा मागून येवून ह्याची ऑर्डर कशी काय पहिली घेतली. मी नेहमीच फोनवर ऑर्डर द्यायचो हेतू हा की येथे उपलब्ध नसेल तर दूसरीकडे ऑर्डर द्यायला, त्यामुळे वेळही वाचायचा. मी सगळी केमिकल्स यादीप्रमाणे तपासून घेतली तोपर्यंत शेजारच्या तरूणाचीही ऑर्डर पूर्ण झाली होती. त्याने मला विचारले 'डेक्कन' का? मी म्हणालो, नाही.. ठाणे. मी ठाणे असे म्हणाल्यावर त्या तरूणाने चक्क मुरका मारला व माझ्याकडे न बघता दूकानाबाहेर पडला. आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या पुरुषाला मुरका मारताना प्रत्यक्ष बघितले. मालक गालातल्या गालात हसत मला म्हणाला तो नेहमीच घाईत असतो, फोनचे बिल वाढेल म्हणून फोनवर ऑर्डर देत नाही. ह्या लोकांना वेळेची किंमतच नाही.

बरंच पब्लिक उतरलेलं दिसतंय मुंबईच्या बाजूने. पूर्वी असं नव्हतं. मुंबईकरांना एका डावाने मात खावी लागायची. (हरहर. गेले ते दिवस.) मिपा बदललंय खरं.

सहमत. चला, या निमित्ताने तरी का होईना, बदल पहावयास मिळाला हे कै कमी आहे ;)

मुंबईकरांना एका डावाने मात खावी लागायची. ज्या मुंबईने देशाला गावस्कर, तेंडुलकर, वेंगसरकर, साळसकर सारखे शैलीदार आणि फटकेबाज फलंदाज दिले त्याची डावाने मात, कसे शक्य आहे ;)

अभिषेक, मनावर नको घेउस. जिंकल्याचे नाही तर निदान तसे भासवल्याचे समाधान त्यानां मिळावे म्हणून मुंबईकर इथे गप्प आहेत.

माझेही पुण्याचे अनुभव. मात्र केवळ या अनुभवांवरुन संपूर्ण पुणे किंवा पुण्याची पब्लिक बेकार आहे असा माझा दावा नाही. तसे माझे म्ह्णणे नाही हे प्रथमच नमुद करतो. चांगली वाईट माणसे काय सगळीकडेच भेटतात. मात्र वरील अनुभवांत प्रत्येक वेळी वाईटच माणसे भेटली म्हणजे माझेच कमनशीब समजतो. प्रसंग १ : साधारण २००४ उन्हाळ्यातली गोष्ट आहे. मी विशाखापट्टनम वरुन ट्रेनने पुण्याला येत होतो. विशा़खापट्टणला तीव्र उन्हाळा असल्यामुळे मी तेथून निघतांना टी शर्ट व ३/४ प्यान्ट अशा वेशात आलो होतो. पुण्यात उतरुन मला संगमनेर ला जायचे होते. रात्री साधारण १०.००-१०.३० ची वेळ असावी. मी पुण्यात प्रथमच आलेलो व विचारपुस करता कोणीतरी मला संगमनेर ला जाण्यासाठी आता साधी एस्टी मिळणार नाही त्याऐवजी तुम्ही शिवनेरी ने जा असे सांगीतले. जवळच पुणे नाशिक शिवनेरी उभी होती त्यात मी जाऊन बसलो. पुण्यात आणी शिवनेरीमधेही माझा पहिला प्रवास असल्यामुळे शिवनेरी चे तिकिट खालीच घ्यायचे असते हे मला ठाऊक नव्हते. जेव्हा कंड्क्टर साहेब वर आले तेव्हा मी तिकिटासाठी पैसे पुढे केले तसे ते माझ्यावर जोरदार उखडले. "ओ, तुम्हाला काय अक्कल बिक्कल हाय का नाय ? आँ ? तिकीट खालीच घ्यायचे माहित नाही का ?" मी त्यांना सांगीतले की मी पहिल्यांदाच पुण्यात येतोय आणि या गाडीचे तिकीट खालीच घ्यायचे असते हे मला माहित नव्हते. तरीही त्या माणसाने आपली बडबड चालूच ठेवली. आणी खाली उतरताना मजबूत डायलॉग हाणला. "च्यायला, कुटुनबी येडी येतात हाफ चड्ड्या घालून आणी चढत्यात डायरेक्ट गाडीत. " मला इतका राग आला पण बळेच गिळला कारण अजानता का होईना चुक माझी होती. जेव्हा जेव्हा मी सचिन किंवा इतर प्रसिद्ध व्यक्तींचे विमानतळावर जाताना किंवा येतानाचे फोटो बघायचा तेव्हा नेह्मी या प्रसंगाची आठवण येते. विचार येतो की सचीन, बाबा रे हाफ चड्डीत लंडनला जातोस पण पुण्याला जाऊन दाखव एकदा. प्रसंग २ : पुणे स्टेशनजवळचे कुठलेतरी हॉटेल. नाव विसरलो. आम्ही २-३ मुंबईचे काही कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. काम आटोपून आम्ही त्या हॉटेलमधे जेवायला बसलो होतो. आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो ती जागा पार्टीशन ने वेगळी केलेली होती. आम्ही बसताच वेटर आला आणि म्हणाला, "इथून उठा, फ्यामिली रुम आहे." बाहेर जाऊन बसा." आता फ्यामिली रुम हा काय प्रकार आहे ? आजुबाजूला बघितले तर कॉलेजची पोरं पोरी बसली होती. कदाचित पुण्यात फ्यामिलीची व्याख्या वेगळी असावी म्हणून गप बाहेरच्या टेबलावर जाऊन बसलो आणी पाणी मागीतले. त्याने समोरच्या जग कडे हात केला आणि म्ह्णाला, "त्यात आहे. स्वतः ओतून घ्या." मुंबईत बरीचशी हॉटेले उडीपी व्यवस्थापनाची असतात आणि तुम्ही हॉटेलात गेलात की पहिले तुम्हाला पाणी भरलेले ग्लास दिले जातात. ग्लास खाली झाले की वेटर येऊन ते भरतो किंवा दुसरे ग्लास देऊन जातो. प्रसंग ३ : शिवाजीनगर एस टी डेपो. शिवाजीनगर डेपोतुन बाहेर पडले की डेपोच्याच आवारात फ्रुटचे स्टॉल आहेत. (त्या बाजुला एक उसाचे दुकान देखील आहे.) त्यातील एका स्टॉलवर गेलो, १०० रु दिले आणी २० रु. एक फ्रुट डीश दिली. मला शक्यतो कोणतेही सामान देताना पहिले पैसे देण्याची सवय आहे. डिश संपल्यावर मी त्याला उरलेले ८० रु. परत मागीतले तर तो चक्क नाही होऊन पडला. तुम्ही मला १०० रु. दिलेच नाही आणि वरुन २० रु. परत मागू लागला. मी बरेच भांडण केले, पोलीसाला बोलावण्याची धमकी दिली पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तिथून निघून गेलो तेव्हा मात्र त्याने पैसे मागीतले नाही. प्रसंग ४ : स्थळ राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी. काहि कामानिमित्त येथे गेलो होतो आणि काम संपवून बाहेर पडायला जवळजवळ रात्रीचे ९.०० वाजले. वाकड ब्रीजला जाऊन मुंबईची गाडी पकडावी म्हणून रिक्षावाल्या साहेबांना विचारले तर त्यांनी २५० रुपये सांगीतले. त्यांना म्हटलो की अहो एवढ्या पैशात तर मी मुंबईहून इथे आलोय. तर म्हणाले, आता बसला तर २५० रुपयात जाल. अजून अर्धा एक तास इथेच बसलात तर ५०० रु. देऊन पण रिक्षा मिळणार नाही. काय करतो, अडला हरी धरी गाढवाचे पाय, दिले पैसे. असे प्रसंग इतरत्र पण घडतच असतात पण पुणेरी टोन अशावेळी जास्तच काटेरी असतो असे वाटते. आता पुणेरी माणूस फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे" असा असेलदेखील. पण अजून आम्ही काटेरी चिलखत भेदून आतल्या अमृताच्या साठ्यापर्यंत पोहोचू शकलो नाहिये हे माझे दुर्दैव ! वरील ३-४ प्रसंगांमुळे मी तर पुण्यात जायची धास्तीच घेतली आहे. गेलो तरी अपमान होऊ नये म्ह्णून शक्यतो हाताची घडी, तोंडावर बोट असाच अप्रोच ठेवतो.

रिक्षावाल्यांचं म्हणाल तर सहमत आहे. पुण्यात आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात जेव्हा सकाळी सिंहगड पकडून मुंबईला निघायचं असायचं तेव्हा रिक्षावाले वाटेल ती किंमत सांगायचे. मी राहतो तिथून पुणे स्टेशनचं मीटरचं भाडं जेमतेम ६५ ते ७० रुपये होतं, अशावेळी रिक्षावाले दीडशे वैगरे भाडं सांगायचे पहाटे. त्यांचा बोलण्याचा स्वर बघून त्याच स्वरात मी उत्तर देत नसे 'निघा' असं म्हणून. नाईट चार्ज वैगरे म्हणला तर मी सरळ सांगायचो की मी काल आलेलो नाही इथून जेमतेम अमुक इतकं भाडं होतं, निघा तुम्ही!! पण 'गोठ्यात निजणारान् बैलाच्या मुताची घाण करुन चालत नाही' या न्यायाने आताशा त्रास करुन घेत नाही.

तुमच्यासारखा रिक्षाचा अगदी सेम अनुभव मला हुबळीला काहीच वर्षांपूर्वी सकाळी ५:३० च्या दरम्यान आला, नंतर हॉटेलवर आणि ज्या कामासाठी आले होते त्या ऑफीसमधल्या लोकांनी सांगितले की हे तर फारच घेतले पैसे तुमच्याकडुन, पण कोणी जास्त ओळखीचे नाही त्यामुळे कोणाला स्टेशनवर बोलवले नाही मग काय अडला नारायण. पहील्या प्रसंगातील कंडक्टरला तुमची लायकी काढायचा काहीही अधिकार नाही अगदी त्याच पद्दतीने साडीच्या दुकानातील काम करणा-या लोकांचा लायकी काढायचा अधिकार ग्राहकाला नाही/नसावा. मधुरा, संयत प्रतिसाद आवडला.

विचार येतो की सचीन, बाबा रे हाफ चड्डीत लंडनला जातोस पण पुण्याला जाऊन दाखव एकदा. *lol* मात्र पुण्याच्या रिक्षावाल्यांचा मलाही आलेला अनुभव हा वाईटच होता. अनुभव १) पंधरा वीस मिनिटाच्या अंतराचे मला दोनशे रुपये सांगितले होते, जायला तासभर लागतो असेही सांगितले होते, आणि तब्बल वीस किलोमीटर लांब आहे असेही सांगितले होते. वीस किलोमीटर अंतर कोणी रिक्षाने जाते का, हास्यास्पद ! प्रत्यक्षात मात्र मी गूगाळून गेलो असल्याने फसलो नाही, तर बस पकडून दोघांचे ७+७ चौदा रुपयांचे तिकीट काढून गेलो. चौदा रुपयांत काम झाले. आणि हो, चौकशी करायच्या आधी या रिक्षावाल्याला मी शंभरचे सुट्टे देऊन एक छोटीशी मदतच केली होती. भाऊ त्याची तरी जाण ठेवायची, जरा कमीचाच चुना लावायचा प्रयत्न करायचा होतास. कि हाच रेट कमी करून होता ? *shok* अनुभव २) मुंबईहून खाजगी बसने जाताना चुकून एक स्टॉप अलीकडे की पलीकडे उतरलो. त्या ठिकाणी दुसर्‍यांदा आणि या रूटने पहिल्यांदाच जात असल्याने गोंधळलो आणि अलीकडे की पलीकडे हे पण समजत नव्हते. एका रिक्षावाल्याला मदत म्हणून विचारले तर म्हणाला, अहो खूप दूर निघून आलात, बसा मी पोहोचवतो. आता त्या रटरटीत उन्हात विचार केला जाऊ दे एखाद मीटरचे दहा-पंधरा रुपये. पण मीटर हा प्रकार नसल्याने नशीब बुद्दी झाली भाडे विचारायचे तर त्याने काय बोलावे? चक्क साठ रुपये. त्याला वाटले मी अलिबाग वरून आलोय (ही म्हण आहे हा, कोणी अलिबागकर भांडायला येऊ नका प्लीज) पण मी आलेलो मुंबईवरून, मी लागलीच रिक्षा सोडून उतरलो. तर त्याने दुसर्‍या रिक्षावाल्याला हाक मारून बोलायला सुरुवात केली. तो पण बोलला, की साठ रुपये बरोबर आहेत. मी मनातल्या मनात म्हणालो या आता. पुढे जाऊन चौकशी करूया म्हटले तर निव्वळ शंभरेक पावले चालताच मला पहिल्या वेळचा ओळखीचा परीसर दिसू लागला आणि बस पुढे आणखी शंभर पावले चालून इच्छित स्थळी पोहोचलो देखील. असो, वरचे किस्से वाचून हे आठवले, शीतावरून भाताची परीक्षा करायची नाही, वा पुण्यातले रिक्षावाले भामटे म्हणून पुणेकर भामटे असा निष्कर्शही काढायचा नाहीये. पण हे असे घडले खरे. त्यामुळे पुण्याला जाणार्‍या पर्यटकांना एक सल्ला - आपल्या स्मार्टफोनमध्ये नकाशे वगैरे गूगाळायची सोय नेहमी हाताशी ठेवा.

मुटकेसाहेब, सूड आणि सखी तुम्ही बंगलोरचे रिक्षावाले काय प्रकार आहेत ते एकदा अनुभवा, तुम्हांला पुण्यातले रि़क्षावाले बरे वाटतील! ;)

हे असचं मागे दिल्लीमधल्या टॅक्सीवाल्यांबद्दलही कोणीतरी लिहील होतं ना गं? अर्थात यात वाईट/चुकीचे वर्तन करणा-यांना पाठींबा देत नाहीये पण दोन्ही प्रकारची लोक जगात सगळीकडेच असतात.

मुंबई, ठाणे, पुणे, चाकण, रांजणगाव, अहमदनगर, सुरत, बरोडा, अमदाबाद, जयपूर, उदयपुर, बंगलोर, मैसूर, चेन्नै, कोलकाता, दिल्ली सगळीकडचे रिक्शावाले, ट्यक्सीवाले अनुभवून झाले आहेत हो ! एक झाकावा आणि दुसरा काढावा असाच प्रकार आहे. मात्र महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणचे संभाषण हे मातृभाषेतून न झाल्यामुळे भाषेचा गोडवा / कडुपणा थोडा बोथट जाणवतो इतकेच. मात्र या सगळ्यांच्या तुलनेत मुंबईचा रिक्षावाला खरोखरच संत म्हणावा लागेल. हो, आता शरद राव कधीकधी पिसाळतात तेव्हा ते रिक्षावाल्यांचा संप घडवून आणतात. पण मुंबैकरांना रोजच काही ना काही अडचणींचा सामना करायचा असतो त्यामुळे तेवढे सिरीयसली नाही घेत. विवेकानंद म्हणतात ना : “In a day, when you don't come across any problems, you can be sure that you are traveling in a wrong path”

चेन्नै आणि दिल्लीतील रिक्षावाले बघितले तर पुण्यातले बरे वाटतील. चेन्नैत एयरपोर्टापासून अर्धातास अंतराला ट्याक्सीने दीड हजार रुपये सांगितलेन मेल्यानं, खरेतर पाचशेच होतात. मग प्रिपेडमनुष्यानं ;) ५०० रू मध्ये नेलं आणि दिरांकडून ५०० रू. टिप घेतली. मी नको म्हणत होते पण भाऊजी म्हणाले हे असेच आहे. ट्रॅफिक ज्याममुळे तो प्रवास एक तासाचा झाला, शिवाय चेन्नैत गेल्यावर तुम्ही एकतरी सिल्कची साडी घेताच, मग जास्त खर्च होतो तो वेगळा! ;) दिल्लीतील रिक्षावाल्यानं ९ वर्षांपूर्वी पाऊण तासाला ४०० रू. घेतलेले आठवतात. अश्या महागाईमुळे दिल्लीकरांवर चाट खाऊन जेवणाचे पयशे वाचवायची वेळ येत असावी. याचा अर्थ पुण्यातील रिक्षावाले संत आहेत असा अज्याबात नव्हे पण असे सगळीकडे अनुभवास येते. मुंबई एयरपोर्टापासून ट्याक्सीनं अनेकदा अनेक ठिकाणी गेलीये तेंव्हाही ते जास्त पैशे चार्ज करत होतेच पण अपरात्री पोहोचल्यावर आणि लहान मुले , सामान बरोबर असताना वाद घालायची अजिबात इच्छा नसते हे एक, शिवाय ते अश्लील गाणी म्हणत इच्छित स्थळी नेतात ही गोष्ट वेगळी. एयरपोर्टाजवळ्च्या सिग्नलला भिकार्‍यांना भीक दिली नाही तर ते शिव्या शाप देतात पण आम्ही कधी नावे ठेवली नाहीत कारण आपल्या सोयीबरोबर गैरसोयी आल्याच. नाहीतर जावा मग दिल्लीला आणि तेथून पुण्याची फ्लाईट घ्या! जे सगळ्यांचं होतय तेच आपलं होणार्......निदान पब्लिक ट्रान्सपोर्टाच्या बाबतीत तरी!

काय गं बाई! काही बरं बोलायचं झालं तर बोलूही देत नाहीत म्हातारीला! कलियुग आलं म्हणतात ते हेच! आता खूप पूर्वी पुण्यातल्या एका टांग्याच्या घोड्यानं माझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं होतं हे मी कुण्णा कुण्णाला म्हणून बोलल्ये नव्हते हो! काय तरी मेले पुण्यातले घोडे (प्राण्यांनाच म्हणतीये, गैरसमज नसावा).

धागा मुंबईचा असो वा डोंबोलीचा, कुठल्याही शहराचा एक साधा धागादेखिल पुण्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होतच नाही. शिंचांनो, आपणांस काय निमंत्रण पत्रिका पाठवतें काय कोणीं या आमच्या पुण्यात म्हणोन? सारखें सारखें तेंच ते सांगावे लागतें की! आणि आता असे धागे काढताना त्यात आधी पुण्यासंबंधीच्या जुन्या धाग्याचे दुवे टाकून स्पष्ट पाटी लिहा - "पुण्याच्या पुणेरीपणाविषयीची चर्चा तिकडेच करावी." बाकी याआधीच्या व यानंतरच्या प्रतिसादांसी फाट्यावर मारण्यात आलेले आहे.

धागा मुंबईचा असो वा डोंबोलीचा, कुठल्याही शहराचा एक साधा धागादेखिल पुण्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होतच नाही. अहो असे काय करता, (निदान या) धाग्याच्या (तरी) नावातच पुणे आहे, पुण्याचा उल्लेख होणारच, आणि मुंबईचे नावही असल्याने मुंबईकरही इथे येणारच .. आता मुंबईचे नाव दोनदा असल्याने मुंबईचे थोडे वेटेज जास्त आहे इतकेच ;)

लेखकू नया है. अस्सल पुणेकरांना पुण्याबाहेरच्यांच्यावर धागे उसवून खरडत बसायला वेळच नसतो. पुणेकर फक्त पुण्याचे पुणेरीपण कुणी काढले की त्याला रीतसर खाली आणतात. आता ते कुणाला खटकले तर त्याला पुणेकरांचा इलाज नाही. आणि पुण्याबद्दलही धागे हेही पुण्याबाहेरचेच काढतात हेसुद्धा लक्षणीय-मननीय-चिंतनीय-आणि-गप्प-बसनीय आहे. अवांतर - बाकी मला व्यक्तिशः मुंबई मनापासून आवडते. रिमझिम गिरे सावन (लताच्या आवाजातलं) हे इतर कुठल्याच चित्रणस्थळी चित्रित झाले असते तरी ती धुंदी त्यात उतरली असती काय! मुंबईला दिल्लीसारखी मस्ती नाही. बंगळूरूसारखा अघळपघळपणा नाही. चेन्नैसारखा तिखटपणा नाही की कलकत्त्याची मिठास नाही. मुंबई ही मुंबई आहे. मॅक्झिमम सिटी. ह्रदयासारखी. कधीच बंद न पडणारी. पुणे आणि मुंबई हातात हात घालून जाणारी दोन मुले. एक आरामात आळोखेपिळोखे देऊन झाले की दुसर्‍याच्या लगबगीकडे बघणारा आणि दुसरा आयुष्यभराच्या धावपळीने दमलाभागला की पहिल्याच्या ओसरीवर जरा शिळोप्याच्या गप्पा मारायला येणारा. या कधी. तसे तुमचा चहा घेऊन झालेला असेलच. ;)

अवांतर - बाकी मला व्यक्तिशः मुंबई मनापासून आवडते. या आधी अवांतर लिहिले नसते तरी चालले असते, धाग्यावर दुसर्‍या शहराचे नावडत्याच गोष्टी लिहाव्यात असा नियम नाहीये ;) बाकी मला स्वताला पुण्याला राहण्याचा अनुभव नाही त्यामुळे पुण्याबद्दल नेमके लिहू शकत नाही. पण इतर सामान्य जणांप्रमाणे पुणे म्हटले की विद्येचे माहेरघर, मानाचे गणपती, पुणेरी पाट्या आणि चितळेंच्या बाकरवड्या या चार गोष्टी एकालगोलग डोक्यात येतात.

अवांतर - बाकी मला व्यक्तिशः मुंबई मनापासून आवडते. या आधी अवांतर लिहिले नसते तरी चालले असते, धाग्यावर दुसर्‍या शहराचे नावडत्याच गोष्टी लिहाव्यात असा नियम नाहीये Wink
मनापासून लिहिल्याने ते काय डोक्यात आलेच नाही. नुकतेच एका मुंबईकर फटाकडीने पुण्यात काय पाहण्यासारखे आहे हा प्रश्न विचारला होता. तिला इथली माणसं पाहण्यासारखी असतात असा सल्ला दिला. *dirol*

मलाही तेच समजत नाही की पुणेकर काय आमंत्रण घेऊन येतात का की पुण्यावबद्दल लिहा म्हणून! ;) नुसतेच आपापल्या शहराची स्तुती (करण्यासारखं काय असेल तर) करा की! हां जरा कठीण आहे म्हणा ते!

"गरूडासारखे उडायची इच्छा असेल तर बदकांबरोबर पोहत बसण्यात वेळ घालवू नका."
काल टिळक रोड कि लक्ष्मी रोडवर कुठेशी तरी एका दुकानाच्यावर हे वाक्य वाचलं होतं.

काल एका दुकानाच्यावर हे वाक्य वाचलं होतं.
दुकानाच्यावर??? आज फोटो काढून आणा.

हमखास शतकी-दीडशतकी धागा काढायला कोणकोणते स्फोटक विषय योग्य असतात बरे? यासाठी एखादा क्लास असल्यास जाणकारांनी माहिती द्यावी. ;)