Welcome to misalpav.com
लेखक: चिन्मय श्री जोशी | प्रसिद्ध:
मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी . टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही . तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही. आणि मी सुद्धा त्यातलाच एक.. तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू . मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची .. तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला . पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं . तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू इ.) पदवीधर झालो . आमचा नम्बर Accenture नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला (हल्ली campus selection ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे ). आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले. आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले .. तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले .. (वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे ) खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून) . पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे . त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह. गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती .. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो . (एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय) मुंबई नगरी मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला . MNC मध्ये असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती . राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता . पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण . सदैव घाई गडबड आणि पळापळ . हे सगळ वेगळच वाटत होतं . सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली. त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे . १. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे (चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे ) मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते . २. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात .. ३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात . यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला . असो. ४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते . परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला . असो . ५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात . त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये खरेदी करताना "खेकसणे" या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते .. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत) ६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात . ७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी बोलू लागतात .. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात .. ८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो . ९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे . (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे ). असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात. (हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे . असू दे, असते एका एका शहराची मजबुरी) १०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात. (पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही .) ११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत . ( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .) १२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो . व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो. असो . जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो . . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे . मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे ) टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही .. सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती .
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मूळ मुद्दा मुंबईची भौगोलिक सीमा नसून मुंबईची कामसू वृत्ती आहे. आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर मुंबईत आणि पुण्यात अनुभव घेऊन पहा जमीन अस्मानाचा फरक जाणवेल. १९९२ साली पुण्यात दुपारी १ वाजता क्रोसिन ची गोळी मिळण्यास औषधाचे दुकान औषधाला सुद्धा उघडे नव्हते. १९९० साली माझ्या भावाने आपला याव्साय सुरु केला तेंव्हा नोकरी करून संध्याकाळी सहा वाजता तो बाहेर पडे लोकांना भेटून रात्री दहा वाजता परत आल्यावर मोटरसायकल दुरुस्तीला घेतली तर रात्री अकरा वाजेपर्यंत हार्ड वेअर ची दुकाने उघडी असत. मुंबईत प्लास्टिक बंदी येण्यागोदर पाव किलो गाजर घेतले तरी भाजीवाला प्लास्टिकची पिशवी देत असे हेच लक्ष्मी रोडवरील शगुन सारखे तीन मजली दुकान तीन साड्या ( बाराशे रुपये १९९२ साली) एकाच प्लास्टिकच्या पिशवीत कोंबून देण्याचा प्रयत्न करता असताना मी त्याला थांबविले आणि सांगितले कि मला साड्या नकोत. तुमची मला साड्या विकायची लायकी नाही. यावर बाबापुता करून त्याने तीन वेगवेगळ्या पिशव्यात सद्य भरल्या. ठाण्यात माझी बहिण नागरिक स्टोर्स मध्ये साडी घायला गेली. दीड तास "पाहून" तिला साडी पसंत पडली नाही म्हणून ते दुकानाच्या पायर्या उतरू लागले तेंव्हा दुकानाच्या मालकाने विचारले कि काय झाले?माझे मेहुणे म्हणाले तिला साडी पसंत पडली नाही.त्यवर तो मालक अदबीने म्हणाला साहेब आपल्याला किमतीबद्दल आक्षेप असेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण माझ्या दुकानात आपल्याला साडी पसंत पडली नाही हा माझा अपमान आहे माझ्याकडे दहा हजार साड्या आहेत . आपण मला दहा मिनिटे द्या मी स्वतः आपल्याला पसंत पडेपर्यंत साडी दाखवतो.तुम्ही नाही घेतली तरी चालेल त्याने थंड पेय मागविले आणि पुढच्या पाऊण तासात जवळ जवळ एक हजार साड्या दाखविल्या. शेवटी माझी बहिण एकाच्या ऐवजी तीन साड्या घेऊन बाहेर पडली. पुण्यात पहिल्यान्दा आपले बजेट विचारतात त्यानंतर एखादी साडी आवडली म्हणून दाखवा सांगितले तर ती तुमच्या बजेटच्या बाहेर आहे म्हणून हिणवून सांगतात. मी तीन चार वेळेस खिशातील नोटा दाखवून त्यांना सांगितले कि माझे बजेट कितीही होते पण तुम्ही मला साडी विकावी हि तुमची लायकी नाही. चितळे बंधू च्या दुकानात लोणी घेतले तर ते वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून दिले लोण्याला लागलेली काळी शाई दाखवून मी दस्तुरखुद्द श्री चितळे यांच्या व्यवसाय कौशल्याचे वाभाडे काढले तेंव्हा ते लोणी त्यांनी बटर पेपर मध्ये गुंडाळून द्यायला सांगितले आणि इतर सर्व ग्राहकांना तसेच बटर पेपर मध्ये देण्याच्या सूचना दिल्या. पुण्याची दळभद्री वृत्ती आताशा बरीच सुधारली आहे असे ऐकतो.आय टी च्या पैश्याने लोकांची कोती वृत्ती बरीच कमी झाली आहे. ( मी पुण्यात वेगवेगळ्या काळात अकरा वर्षे राहून काढली आहेत आणि पुण्याच्या गल्लो गल्लीत सायकलने फिरलो आहे.). असे अनेक व्यक्तिगत किस्से आहेत. म्हणून शेवटी मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. आजही व्यवसाय करायचा तर मुंबईला पर्याय नाही.

सुबोधा, अरे मुंबाई सोडली तर उर्वरित भारत पुण्यासारखाच आहे. माझ्या-ह्यांच्या ४-५ राज्यांच्या वास्तव्यावरून हे सांगते. साड्यांच्या अनुभव अगदी तसाच चेन्नई,विजयवाडाआम्हाला,अहमदाबाद येथेही असाच आलाय आम्हाला.

@अरे मुंबाई सोडली तर उर्वरित भारत पुण्यासारखाच आहे +1 आमच्या आजोबांनी साहेबांच्या काळात मुंबई पहिली आहे. साहेबाने गेटवे ऑफ इंडिया बांधले तर काळ्या साहेबांच्या राज्यात मुंबईत धारावी उभे राहिले. मुंबई वेगळे राज्य असते तर त्याचे चित्र वेगळे दिसले असते का किंवा केंद्र शासित प्रदेश झाला असता किवा ती गुजरात मध्ये राहिली असती तर आजच्या पेक्ष्या वेगळी दिसली असती का आजच्या मुंबईत उध्वस्त गिरणगाव तर गिरगाव पार कर्जत ,कसारा ,विरार पर्यत पसरले आहे. ह्यावर काथ्याकुट करायला हवा.

एकाच प्लास्टिकच्या पिशवीत कोंबून देण्याचा प्रयत्न करता असताना मी त्याला थांबविले आणि सांगितले कि मला साड्या नकोत, तुमची मला साड्या विकायची लायकी नाही
कापडी पिशवी न वापरता प्लास्टिकच्य अट्टाहासाची तुमची वृत्ती आवडली बरं का. शिवाय एकाच पिशवीत साड्या देणे तुम्हाला पटलं नसलं तरी दुकानदाराची लायकी काढणारे तुम्ही कोण?
मी तीन चार वेळेस खिशातील नोटा दाखवून त्यांना सांगितले कि माझे बजेट कितीही होते पण तुम्ही मला साडी विकावी हि तुमची लायकी नाही.
पुन्हा तेच.
पुण्याची दळभद्री वृत्ती आताशा बरीच सुधारली आहे असे ऐकतो
ही दळभद्री वृत्ती कोकणातून आलेल्या गोखलें, चितळें, कर्वें, लेलें अशा एकारान्त मंडळीमुळेच ना हो? आणि हो मुंबै कोकणातच मोडते का हो?

हुंबै कोकणातच बर्का! आम्ची जुनी मागणी आहे, मुंबईसह कोकणीस्तान झालाच पैजे! बरें, तुम्ही काय मुक्काम पोश्ट पुणें ३० का?

आमची पोष्ट कोणतीही असो. तसा मी पुणेकर आणि मुंबईकर पण नाहीच. माझा आक्षेप फक्त स्वताला हुच्च्भ्रू समजत दुसर्याची लायकी काढण्यावर आहे.

अरे धाग्यात कोकण काढू नका.... आधीच मी मुंबईकर त्यात कोकणी .. तुर्तास मला एकाच प्रांतावर कॉन्संट्रेट करू द्या .. अभिषेक नाईक साळसकर - मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग !!

>>ही दळभद्री वृत्ती कोकणातून आलेल्या गोखलें, चितळें, कर्वें, लेलें अशा एकारान्त मंडळीमुळेच ना हो? दंडवत स्वीकारा राजे !! *i-m_so_happy* >>आणि हो मुंबै कोकणातच मोडते का हो? आहो मुंबै कधीच कोणाची न्हवती. पोर्तुगीजांकडनं नंतर ब्रिटीशांच्या ताब्यात आलेलं येवढंसं बेट ते!! जी महाराष्ट्रात यायला लोकांनी जीव दिला तिथं महाराष्ट्राची मराठी बोलायला लोकांना लाज वाटते. काय करायचा असला पोकळ अभिमान बाळगून. मोठं घर पोकळ वासा नि वारा गेला भसाभसा. लोकांना कसलं कवतिक वाटेल नि कसलं नाही. असो.

जी महाराष्ट्रात यायला लोकांनी जीव दिला तिथं महाराष्ट्राची मराठी बोलायला लोकांना लाज वाटते. हा एकतर बहुतांश लोकांनी चुकीचा काढलेला निष्कर्श आहे किंवा जाणीवपूर्वक पसरवलेली अफवा. साधा सरळ हिशोब आहे, एखाद्याशी संवाद साधताना कम्युनिकेशन होणे महत्वाचे. मुंबईत हे एक गावखेडॅ वा छोटेमोठे शहर नसून मेट्रोसिटी आहे, इथे अठरापगड जातीप्रांताचे लोक आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना सामाईक अश्या राष्ट्रभाषेतच बोलणे सोयीचे पडते. मागाहून समजले की आपण दोघेही मराठी आहोत तर मराठीतच बोलणे सुरू होते. यात लाज वा अभिमान हे दोन्ही कुठेच हिशोबात येत नाहीत.

सायगल साहेब तीन साड्या -एक आई , एक सासू आणि एक बायको यांच्यासाठी सांगून घेतल्या होत्या. आपल्या नातेवाईकाला आपण अशी वेष्टनाशिवाय साडी आहेर म्हणून देता काय?दुसर्याला आहेर करताना कापडाची पिशवी वापरतात हे आमच्या कमी बुद्धीच्या लक्षात आले नाही. ( जेंव्हा सोने ३२०० रुपये १० ग्राम ला असताना १२०० रुपयाच्या साड्या एकाच प्लास्टिकच्या पिशवीत घालून देणे हे आजही मला वाटते कि दळभद्रीपणाचेच लक्षण आहे. म्हणूनच त्यांना असे बोलून दाखवणे आवश्यक होते. त्यांची लायकी काढताना आमच्या कडे दिडक्यांचे अधिष्ठान होते. आणि पुण्यातील मारवाडी दुकानदार पुण्य्च्या आसपासच्या खेड्यातील लोकांना कसे घालून पडून बोलत असत हे आपण पाहिले नसावे. त्या लोकांना हे तुमच्या बजेटच्या बाहेर आहे म्हणून हिणवले कि ती बिचारी माणसे इर्षेने महाग असलेल्या खरेदी करत असत. म्हणूनच त्या माणसाना त्यांच्या पैश्यातच आहेर देणे आवश्यक होते. "गोखलें, चितळें, कर्वें, लेलें" अशी मंडळी पुण्यासारखी मुंबईत पण आली ( आमचे पूर्वज पण त्यातलेच) पण त्यांनी मुंबईचे गुण घेतले पुण्याचे नाही असे का झाले असावे हे आपणच शोधा. मला असे वाटते पुण्याच्या पाण्यातच हा गुण असावा. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसर्याची रेषा लहान करण्यात धन्यता मानण्याच्या वृत्तीमुळे पुणे असे राहिले असावे. तेंव्हाही ( जेंव्हा पेट्रोल ८ रुपये लिटर होते तेंव्हा माणसे आपल्या बजाज स्कूटर मध्ये ५ रुपयाचे पेट्रोल भरत असत. आश्चर्य म्हणजे आजही २२० सी सी ची पल्सार एक लाख रुपयाला घेऊनही पन्नास रुपयांचे पेट्रोल भरताना पुण्यातच दिसते. जाऊ द्या. आपले कोतेपण त्यावर शब्दांचे डोंगर रचून झाकून ठेवण्यःची पुणेरी वृत्ती इतकी सहज कशी बदलणार. मुंबईचा माणूस मुंबईत गर्दी आहे, उकाडा आहे लोकांना वेळ नसतो यावर शब्दांचे डोंगर रचून नाकारत बसण्यात मुळीच स्वारस्य दाखवत नाही आणि पुण्याशी तुलना करायला उगाच जातच नाही. जाता जाता -- मुंबई कोकणातच मोडते आणि कोकणाला जगवते सुद्धा. शिवाय मुंबईत आलेला कोकणी माणूस आपली कोकणाशी नाळ तोडत नाही तर अभिमानाने जपतो. मुंबई आणि कोकणात तिला मुंबईच म्हणतात. अर्धवट "बॉम्बे" म्हणत नाहीत.

मुंबईत आलेला कोकणी माणूस आपली कोकणाशी नाळ तोडत नाही तर अभिमानाने जपतो. +७८६ कोकणी चाकरमान्यांना नेहमीच मुंबई आपली वाटते. कदाचित एकच सागरकिनारा जोडत असल्याने असावे, येथील हवा पाणी माती आपलीच वाटते. शहरात राहणार्‍या कोकणवासीयांना आपले गाव कोकणात आहे जसे वाटते तसेच कोकणात राहणार्‍यांना आपले शहर मुंबई आहे अशीच भावना असते. आणि म्हणूनच हे कोकण-मुंबईचे नाते, मुंबईतून मराठी माणूस कधीच हद्दपार होऊ देणार नाही .!

जाता जाता -- मुंबई कोकणातच मोडते आणि कोकणाला जगवते सुद्धा. शिवाय मुंबईत आलेला कोकणी माणूस आपली कोकणाशी नाळ तोडत नाही तर अभिमानाने जपतो. मुंबई आणि कोकणात तिला मुंबईच म्हणतात. अर्धवट "बॉम्बे" म्हणत नाहीत. हो पण अस्सल मुंबईकर वांद्र्याला बँड्राच म्हणतो. आमच्या हापिसात या कमीतकमी २०० च्या सँपलचा सर्वे समक्ष करून सिद्ध करून देईल. तसेच अस्सल मुंबईकर पहिळ्यांदा हिंदीत बोलून मारे कम्युनिकेशन झालंय ना वगैरे कारणे देऊन मराठीहृदयसम्रात राज ठाकरेंना मते देत असतो. वरच्या नाईकांच्या प्रतिसादात हे आलेच आहे. बाकी तुमच्या निरीक्षणांशी सहमत आहे.

ही दळभद्री वृत्ती कोकणातून आलेल्या गोखलें, चितळें, कर्वें, लेलें अशा एकारान्त मंडळीमुळेच ना हो? नाही पुण्याबाहेरून येणार्‍या आणि पुण्यात राहून पुण्याच्या नावाने खडे फोडणार्‍या लोकांमुळे हे असे होते..

चितळे बंधुंच्या दुकानात लोणी घेण्याच काम माझं आणि माझ्या भावाचं होतं म्हणुन सांगते ते लोणी आणि चक्का प्लास्टिकच्या कागदात आधी नंतर त्यावर पेपर फार पूर्वीपासुन (८३-८४ सालापासुन) देतात, म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे झाली. बाकी व्यक्ती तितक्या प्रकृती जगात सगळीकडे असतात त्यामुळे मुठभर लोकांच्या विचित्र वागण्याने सगळ्या शहराला कोते/गर्विष्ट म्हणायची फॅशन गेले काही वर्षे चालु आहे असे म्हणावेसे वाटते.

हा मुद्दा पुणे विरुद्ध मुंबै असा नसून पुणे व मुंबै सोडून उरलेल्या महाराष्ट्रात काय बघण्यासारखे आहे या प्रश्नाशी निगडित होता. पुणं कसं आणि त्या तुलनेत मुंबै कशी हा घिसापीटा वाद करकरून मिपाची ब्यांडविड्थ तुंबवलेले कैक धागे मिळतील.मूळ मुद्याचं काय ते बोला. वरील प्रतिसादात मूळ मुद्याला अनुसरून काहीही दिसले नाही.

एक मुद्दा कळाला नाही. पुण्यातले दुकानदार असे असतील, तर व्यवसाय (तसा न) करणार्‍याला पुण्यात सर्वात चांगली संधी आहे असा अर्थ होत नाही का? अजून एक महत्त्वाचा मुद्दा: जेथे दुकाने रात्री उशीरापर्यंत उघडी असतात तेथे बर्‍याच ठिकाणी कामगारांना वेठीला धरून ती तशी ठेवलेली असतात. कित्येक ठिकाणी राजस्थान ई हून आणलेली कामगार पोरे तेथेच काम करतात, तेथेच राहतात. सगळीकडे असे नाही हे माहीत आहे, पण अनेक ठिकाणी चालते. मिठाई वाली दुकाने खूप आहेत अशी.

अजून ७१ च?? पुर्वी असे धागे सकाळी आले की संध्याकाळपर्यंत शंभरी गाठत असत. आमच्याकडल्या काड्या संपल्या बुवा. तरीही लोक पेटलेले बघून अंमळ मौज वाटली. =)))) पूर्वीचं मिपा राह्यलं नाही हेच खरं!! ;)

तुम्ही जर हुंबैकर असून पुण्यात राहू शकता, तर मिपाने हुच्च होऊ नये काय!

ते अलिकडे पलिकडे तिकडे पुण्यात अस्तंय. सगली हुंबै एकच!

सूड साहेब, एका कानडी माणसाने मला (गोव्यात असताना) कल्याणची माणसे स्वतःला मुंबईकर म्हणतात म्हणून आक्षेप घेतला होता त्यावर मी त्याला हेच म्हटले होते कि मुंबई हि एक मानसिक वृत्ती आहे भौगोलिक सीमा नाही. रात्री अकरा वाजता सुद्धा तुम्हाला स्टेशनरीचे दुकान उघडे मिळते.( तुमची मुले बहुधा रात्री दहा वाजता शाळेत काही तरी आणायला सांगितले आहे हे सांगतात) या वेळेस फक्त मुंबईत दुकाने उघडी मिळतात. भारतात जितकी शहरे मी फिरलो तेथे हे दिसत नाही. व्यवसाय करायचा तर मुंबईतच. अजून एक उदाहरण -- आमच्या वडिलांच्या मित्राने नाशिकला जागा स्वस्त म्हणून रबरी हातमोजे तयार करण्याचा आणि निर्यात करण्याचा कारखाना काढला आणि तीन वर्षात तेथून गाशा गुंडाळून परत मुंबईत आला. वडिलांनी का म्हणून विचारले त्यावर तो म्हणाला "जागा स्वस्त आणि पगार कमी असे असले तरी कामगारांची काम करण्याची वृत्ती नाही. मी जर फ्रान्सला अमुक इतके हातमोजे पुरविन अशी ऑर्डर घेतली तर मला ती वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. मग त्यात गणेशोत्सव आहे नवरात्र आहे किंवा घरी पूजा आहे आज आमचे डोके दुखत आहे असली कारणे मुंबईचा कामगार देत नाही. मुळात सकाळी वेळेवर न येणे आल्यावर अर्धा तास तंबाखू खायला मग परत अर्धा तास चहा प्यायला असे करून काम फक्त ५०-६०% होते. त्यामुळे मुंबईत कामगारांना दीडपट पगार देऊन वर ओव्हरटाइम देणे सुद्धा परवडते." कारण मुंबईची कार्य संस्कृती दुसर्या कोणत्याही शहरात मिळत नाही. बाकी टेम्पो रिक्षावाले दिल्या वेळेत येणे, व्यवस्थित कामे करणे या बाबतीत मुंबईची तुलना कुठेही होत नाही. (माझे वातानुकूलन यंत्र बिघडले तर ते पाहायला/ दुरुस्त करायला माणूस रात्री दहा वाजेपर्यंत केंव्हाही बोलवा मी येतो म्हणाला) मग यात तुम्ही बृहन मुंबई धारा किंवा कल्याण डोंबिवली अंबरनाथ धरा( अंबरनाथला माझ्या भावाचा कारखाना आहे) इथली कामाची संस्कृती (work culture) इतर कुठेही नाही. मग तुम्ही तिला टीचभर मुंबई म्हणा किंवा काही. अखिल आणि बृहत महाराष्ट्राची संस्कृती तशी नाही. ढोल ताशे वाजवून मिरवणुका काढणे हा संस्कृतीचा एक भाग असावा पूर्ण संस्कृती नव्हे. उत्सव संपल्यावर दुप्पट जोमाने कामाला लागणे हे बृहन्महाराष्ट्रात( मुंबई सोडून) अभावानेच दिसते.अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी सकाळी मुंबई आणि इतर शहरे यात फिरून पहा माझ्या म्हणण्याचा प्रत्यय येईल. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसर्याची रेषा लहान आहे हे सांगणे मुंबईच्या कार्य संस्कृतीत बसत नाही.

आता मात्र सहमत रे सुबोधा. ह्यांचे मित्र पोस्टात होते. अखिल भारतात दर ३/४ वर्षानी बदली होत असे.जोरदार पावूस असो वा प्रचंड उकाडा,मुंबईचा पोस्टमन पत्र टाकायला जाणारच वेळेवर. ह्या उलट केरळ्,मध्यप्रदेश व ईतर भारत. जरा एक पावसाची सर चालु झाली की पाऊस थांबेपर्यण्त ऑफिसात थांबणार. बॅन्कांमध्येही हाच अनुभव आलाय आम्हाला.

डॉक्टर.. माझा हा प्रतिसाद वाचलात तर माझं म्हणणं काय आहे कळेल तुम्हाला. तुम्ही मुंबई तुमच्या दृष्टीकोनातून बघत आहात मी माझ्या!! एक व्यावसायिक म्हणून तुम्ही मुंबईचं कौतुक करत असाल तर खुशाल करु शकता. माझ्या आधीच्या प्रतिसादात मी हेच म्हटलंय की खुद्द मुंबईत राहत असाल तर त्यासारखं सुख नाही. पण आमच्या सारखी अंबरनाथ बदलापूरला राहणारी माणसं अडीच तास एकमार्गी प्रवास करुन हापिसात पोचतात आणि परतीसाठीही तेवढाच प्रवास असतो तेव्हा पुणं उजवं वाटलं तर नवल वाटू नये. बाकी जिथली खावी पोळी तिथली वाजवावी टाळी!! पुण्यात नोकरी करणं हा मी घेतलेलं निर्णय आहे, कोणी मला आवतंण देण्यासाठी आलं नव्हतं. अशा वेळी ते आहे तसं स्वीकारायचं आणि त्यातल्या आपल्याला उपयोगी गोष्टी निवडून सुखकर कसं होईल ते बघायचं की वाईट गोष्टी निवडून त्यांच्या नावाने शिमगा करायचा हा आपापला प्रश्न आहे. पुण्यात राहायचं, तिथलंच खायचं, तिथेच कमवायचं आणि वर त्याच्याच नावाने खडे फोडायचे असं केलं तर मुंबईत ज्यांच्या तीन पिढ्या गेल्या तरी मराठी समजत नाही असं म्हणणार्‍यांच्यात आणि आपल्यात (पक्षी: माझ्यात) फरक तो काय??

सुडुकशी ऑन द होल सहमत आहे- यद्यपि पोळी-टाळीबद्दल अंशतः असहमत.

सुड साहेब हा प्रश्न फक्त मुंबईत आहे असे नाही. हडपसरला राहून रोज हिंजवाडी(कि हिंजवडी) ला आपल्या दुचाकीवर किंवा कंपनीच्या बसने प्रवास करणारे लोक पुण्यातही आहेतच. (किंवा पुण्यात राहून रांजणगावला जाणारे इ इ ) यात पुणे चांगले कि मुंबई चांगली हा मुद्दा नाही. मी मुद्दा "वृत्ती' बद्दल उपस्थित केला होता. कोण कुठे राहतो म्हणून त्याला कमी लेखणे हे मुळात चुकीचेच आहे. ज्याच्यात्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती प्रमाणे तो राहत असतो. मग या न्यायाने विलायतेत राहणारे हे आपल्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू शकतील. बाकी जिथली खावी पोळी तिथली वाजवावी टाळी!! हे मात्र मान्य आहे. ज्या घरचे खायचे तिथले वांसे मोजायचे हे चूकच आहे

हा प्रश्न फक्त मुंबईत आहे असे नाही. हडपसरला राहून रोज हिंजवाडी(कि हिंजवडी) ला आपल्या दुचाकीवर किंवा कंपनीच्या बसने प्रवास करणारे लोक पुण्यातही आहेतच. सहमत आहे, म्हणजे पुण्याचे मला माहीत नाही पण हे कोणत्याही शहराला लागू होतेच. आता बदलापूर-विरारला राहून जर ट्रेनचा तासदोनतासांचा प्रवास करावा लागतो म्हणून मुंबई वाईट म्हटले तर हे का लक्षात घेत नाही की मुंबई हे शहर लाखो लोकांना रोजगार मिळवून देते. कुछ तो बात है यार मुंबईमध्ये म्हणून ती एवढ्या वर्षांमध्ये पसरतच चालली आहे. जागांचे भाव गगनाला भिडत चाललेत ते का उगाचच म्हणून. तीस हजार रुपये तोळा किंमत सोन्यालाच असते चांदीला तो भाव येत नाही. त्यामुळे या निकषावर तर मुंबई सर्वश्रेष्ट आहेच.... तसेच सुबोध खरे यांच्या वर्क कल्चरच्या पोस्टला तर +७८६^+७८६ मुंबई याच साठी ओळखली जाते. वरच्या पोस्टमध्ये हेच चुकीच्या आणि नकारात्मक अँगलने बघितले जातेय बस्स.

दादा, मुंबैचं किंवा पुण्याचं जे काही महत्त्व असेल ते चार लोकांनी मिपावर कमेंटी खरडून कमीजास्त होणार नाहीय. पण पुणेमुंबै सोडून महाराष्ट्रात बघण्यासारखं काय आहे असा सवाल कुणी करत असेल तर मग बॅकलॅश येणार हे का समजून घेत नैत लोक हे कै कळत नै. त्या मूळ मुद्यापासून गाडी पुन्हा पुणे विरुद्ध मुंबै अशी आली नेहमीप्रमाणेच. उर्वरित महाराष्ट्राबद्दल असे तुच्छतादर्शक उद्गार कुणी काढले तर तिकडे सरळ दुर्लक्ष केले गेले अन मुंबैला काय जरा बोलले तर सगळे धावून आले हे रोचक आहे खरे.

चिंता नसावी, मला दुसर्‍याची रेष छोटी दाखवून आपली मोठी करायची सवय नाही. पण आपली मुळातच जेवढी मोठी आहे तेवढे दाखवायला लाजायचेही नाही. आता लेखच मुंबई-पुणे-मुंबई आहे म्हणून मुंबईची बाजू घ्यायला, कोणाचे गैरसमज असतील ते दूर करायला, आणि मुंबईच्या तारीफमध्ये चार शब्द टंकायला यावे लागणारच .. बाकी " पुणेमुंबै सोडून महाराष्ट्रात बघण्यासारखं काय आहे.. " हि काडी माझी नाही :)

कारण मुंबईची कार्य संस्कृती दुसर्या कोणत्याही शहरात मिळत नाही हे तुमचे वैयक्तिक मत आहे असे समजतो बाकी मुंबैकर इतके कष्टाळू असते तर परप्रांतीयांचा प्रश्न आलाच नसता. नाशिक मध्ये कष्टाळू लोक खुप पाहीलेत आणि मुंबई हून येउन बढाया मारणारे ही खुप आहेत

मुंबई च्या बाहेर देखील अन्यत्र महाराष्ट्रात अनेक व्यवसाय छोट्या मोठ्या पातळ्यांवर आहेत आणि या सगळ्यांमध्ये सगळेच कामगार हे आळशी नाहीत. केवळ नाशिक चे नाव आले म्हणून, तिथलेच उदाहरण. माझ्या नात्यातले आणि अगदी जवळच्या अशा पाच लोकांचे सद्यस्थितीत नाशिक मध्ये स्वतःचे उद्योग आहेत. यापैकी कुणा कडूनही आजतागायत अशा तक्रारी ऐकल्या नाहीयेत. त्यांच्याकडचे उत्पादन देखील परदेशात निर्यात होणारे आहे. हाताची पाचही बोटे सारखी नाही तसे चांगले वाईट अनुभव आहेतच. पण म्हणून मुंबई सोडून इतर सगळ्या जगातले लोक आळशी किंवा त्यांची काम करण्याची संस्कृती नाही हे पटले नाही. याशिवाय काही अगदी छोट्या गावातल्या लोकांना पण ओळखते ज्यांना तर वाहतूक, पाणी वगैरे इतरही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि तरीही त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरु आहेत ते केवळ कष्टामुळे. मुंबईत कामाची संस्कृती आहे, असेल पण मुंबईतच आहे असे नाही. इतरत्र देखील आहे. मुंबईतले रात्री घरातले उपकरण बिघडले तर कुणीतरी ते दुरुस्तीला येतो हे उदाहरण देखील फक्त मुंबईत घडत नाही. मुंबईत व्यावसायिकता म्हणून असेल, अनेक लहान गावांमध्ये केवळ ओळखीच्या आणि मित्रत्वाच्या संबंधावर देखील ही कामे होतील. आणि कधी व्यावसायिक म्हणूनही होतील. मुंबई आणि पुणे याशिवाय उर्वरित महाराष्ट्रात हे अनुभवले आहे. आणि अशा प्रकारची मदत मला पुण्यात सुद्धा मिळाली आहे.

लहान गावात किंवा शहरात ओळखीमुळे कामे होतात हि वस्तुस्थिती आहे पण आमच्या सारखे लष्करातून निवृत्त झालेले लोक ज्यांच्या स्वतःच्या जन्मगावात ओळखी राहिलेल्या नाहीत त्यांनी काय करायचे? माझा स्वतःचा नाशिक ला एक प्लॉट आहे औरंगाबादला सासुरवाडी आहे परभणीला सासर्यांचे जन्मगाव आहे. सोलापूरला त्यांचे भावंडे आहेत.कोल्हापूरला माझे मेहुणे आहेत. पण एकूण तेथील परिस्थिती पहिली तर तेथे नव्या माणसाने व्यवसाय करणे कठीण जाते हि वस्तुस्थिती आहे. बाकी दुकाने म्हणाल तर नउ वाजता बंद होतातच.आणि त्यानंतर वीज गेली असेल तर एम एस इ बी वाले आता उद्याच येतो असे म्हणतात. हा स्वानुभव आहे. धुलाई यंत्र बंद पडले तर दुरुस्तीचा माणूस नउ ते पाच मध्येच येतो मग नवरा बायको दोघेही नोकरीवाले असतील एकाला अर्धा दिवस रजा घ्यावी लागते. मुंबईत लोड शेडींग नाही किंवा व्होल्टेज स्टेबिलायझरची गरज पडत नाही. गणेशोत्सवात/ नवरात्रात आठ दिवस दुकाने बंद ठेवली जात नाहीत. एम टी एन एलचे इंटरनेट ३६४. ५ दिवस २ एम बी पी एस वेगाने चालू असते आणि बंद पडल्यास ६ तासात चालू होते. हे मी गेल्या ५ वर्षाच्या अनुभवाने सांगतो आहे. इतर शहरे ( यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर भारतातील शहरे सुद्धा) वाईट आहेत किंवा टाकाऊ आहेत असे मी कधीच म्हटलेले नाही त्यांचे आपआपले काही खास गुण आहेतच. पण त्यांच्यात हि कार्य संस्कृती अजून आलेली नाही हे खेदाने म्हणावे लागते

यशो +१
थे नव्या माणसाने व्यवसाय करणे कठीण जाते हि वस्तुस्थिती आहे.
सहमत. पण यासाठी करणे आळशी कामगार हे नाही. अपुऱ्या सोयी सुविधा, पाण्याचा दुष्काळ, लोड शेडींग, कच्चे रस्ते, आणि अजून कित्येक कारणे आहेत. उलट याही परिस्थितीत ज्यांनी उद्योग सुरु ठेवलेत, त्यांचे कष्ट कदाचित मुंबईत सोयी सुविधा मिळून तयार झालेल्या एखाद्या उद्योगापेक्षा जास्त आहेत असेही म्हणता येईल. माझा आक्षेप मुख्य हाच की मुंबई बाहेरही कष्टकरी लोक आहेत. मुंबई या शहराचा आवाका बघता तिथे ही गोष्ट ठळक पणे दिसून येते. मुलभूत सोयी सुविधा मिळाल्या तर या अनेक गावांचाही विकास होऊन यांचीही कार्य संस्कृती काम करणाऱ्यांची म्हणून उदयास येऊ शकते. (शिवाय अशा संधी उपलब्ध झाल्या तर मुंबईत काय आणि पुण्यात काय, बाहेरून आलेले लोक हा प्रकार कमी होईल) अगदीच कार्य संस्कृती सोडून देऊ, उत्तम शेती संस्कृती म्हणून नावारूपास येण्यासही या सोयी सुविधा पूरकच ठरतील. २४ तास इंटरनेट मुंबईत सुरु राहते तसे इतर ठिकाणीही असते. नाशिक आणि पुण्यात जिथे गेल्या काही वर्षात राहिलेय, हे तिथले अनुभव आणि त्यापूर्वी मी ज्या गावात अनेक वर्षे राहिले, त्या ठिकाणी २४ तास इंटर नेट मिळावे असे अनेकांना वाटते, व्यावसायिक असो किंवा नोकरदार किंवा गृहिणी. पण यांच्यापैकी बर्याच जणांना किमत मोजण्याची तयारी असूनही मिळत नाही. आणि याला जबाबदार ते लोक स्वतः नकीच नाहीत. एवढेच म्हणणे आहे.

वरच्या कमेंट्स बघता नावडतीचं मीठ अळणीच* असतं असं दिसतंय. त्यामुळे वाद घालणं व्यर्थ आहे. *पूर्ण म्हण लिहायचा मोह कसाबसा आवरला. ;)

लोड शेडींग हे त्यात्या भागातून होणार्या बिलाच्या वसुलीच्या प्रमाणात आहे. जेथे विजेच्या चोरीचे प्रमाण जास्त तेथे तितके लोड शेडींग. त्यामुळे मराठवाड्यात सर्वात जास्त लोड शेडींग आहे. मुंबईत औद्योगिक विजेचा दर ८ रुपये युनिटला असून वीज "गळती"चे प्रमाण सर्वात कमी आहे. भिवंडीत एम एस इ बी कडून वीज वितरण टोरांट कंपनीला दिल्यावर तेथील वीज"गळती"चे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झाले आणि तेथील लोड शेडींग बंद झाले. मला यावर अधिक भाष्य करायचे नाही ( नालीत हात टाकण्याची इच्छा नाही)

यशोधरा ताई, आपण जर गुगलून पहिले तर आपल्याला लक्षात येईल कि मुंबई ठाणे या परिसराला लोड शेडींग का नाही? कारण येथून मिळणारे पैसे उर्वरित महाराष्ट्राला स्वस्त वीज देण्यात वापरले जातात ( क्रॉस सबसिडी) म्हणजे इतर भागानी वीज चोरी करायची आणि मुंबई ठाणे भागाने त्यांचे पैसे भरायचे. मला उगाच इतरांवर आरोप करण्याची सवय नाही म्हणून या घाणीत हात घालायची इच्छा नाही असे म्हटले. असो आपण वैयक्तिक पातळीवर उतरून आम्हाला हुच्च (भ्रू) म्हणताय हेही ठीक आहे. आपली मर्जी.

अहो दादा, वैयक्तिक पातळीवर कमेंट घेतली नाही, गैरसमज नसावा. ते हुच्च्भ्रू म्हणजे, इथले आपले २-३ प्रतिसाद ज्याप्रकारे आहेत त्यावरुन म्हटले. असो. ते - त्याचा टोन इत्यादि फारसे पटले नाही. असो. पण, तुम्ही वीजचोरीबद्दल म्हणताय ते १००% पटत नाहीये. मुंबईत वीज चोरी होतच नाही ह्यावर विश्वास बसत नाहीये. साधे गुगलून पाहिले तर मुंबई, नवी मुंबई येथील वीज चोरीच्या बातम्या, अगदी फोटोंसकट पहायला मिळतील. आत्ता माझ्यासमोरही अश्या बातम्या आहेत गूगलवर. तेह्वा तुमचे हे म्हणणे मला भाबडेपणाचे वाटते.

हे क्रॉस-सबसिडी प्रकरण काही पटलेलं नाही सुबोधजी. समजा, एका युनिटमागे २०% फायदा वसूल होतो असं धरून चालू. (तत्त्वतः वीज महामंडळाने फायदा घ्यायचा नस्तो, पण तरीही.) असे २०-२०% गोळा करून एक युनिट वीज बनवायची झाली, तर पैसे वसूल झालेली ४ युनिटस लागतील. म्हणजे मुंबई-ठाणे परिसराची विजेची डिमांड उर्वरित महाराष्ट्राच्या चौपट आहे असा त्याचा अर्थ होईल. हे पटत नाही.