Welcome to misalpav.com
लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:
नमस्कार, ही माहिती कशी मिळवावी हा विचार करत होतो. सुलेखा.कॉमवर चौकशी टाकून झाली. काही विशेष हाती लागले नाही. आणि अचानक मिपा आठवले. आजकाल काही दुखलं-खुपलं तरी तोंडून 'आई गं' ऐवजी 'मिपा रे!' निघेल की काय असे वाटायला लागले आहे. :-) मिपावर माहिती आणि मदत नक्की मिळते हा अनुभव आहे. अमेरिकावारीच्या वेळी हा अनुभव घेतलाच आहे. मदतीची किंवा माहितीची अगदीच अडनिड 'नीड' असेल तरी मुबलक प्रमाणात हुरूप नक्कीच मिळतो. आणि हुरूप असेल तर ठरवलेले पार पाडणे खूप सोपे होते. :-) म्हणून हा पत्रप्रपंच! वडिलांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये एक छोटेखानी हॉल शोधतो आहे. कार्यक्रम साधारणपणे सप्टेंबरमध्ये करायचे ठरत आहे. वाढदिवसाच्या तारखेवर कार्यक्रम न ठेवता आप्तेष्टांच्या सोयीनुसार ठेवण्याचे ठरल्याने तारखेबाबत पुरेशी लवचिकता असणार आहे. कार्यक्रम शक्यतो हडपसरच्या किंवा कोथरुड (चांदणी चौक भाग) परिसरांच्या आस-पास घेण्याचे ठरत आहे. दोन्ही भागात घरे असल्याने कार्यक्रम घेणे सोपे जाईल म्हणून या भागांची निवड केली आहे. खूप महागडा हॉल नको आहे. चांगली सेवा देऊ शकणारा साधा हॉल चालेल. - साधारण १०० पाहुणे येण्याचा अंदाज आहे. - संध्याकाळी जेवणे झाल्यानंतर हॉलवर जाऊन तिथे गप्पा, गाणी असा कार्यक्रम करण्याचे योजत आहे. - दुसर्‍या दिवशीची न्याहारी, चहा, कॉफी आटोपल्यानंतर एखादी छोटीशी पूजा करावयाची आहे. - नंतर जुन्या छायाचित्रांवर आधारित एखादा स्लाईड शो करण्याचा मानस आहे आणि मग नंतर काही पाहुणे मनोगत व्यक्त करतील. - दुपारचे जेवण (साधेच पण रुचकर) होईल. - साधारण दुपारी ३:०० च्या आसपास हॉल सोडता येईल. म्हणजे या ढोबळ रुपरेषेनुसार खालील गोष्टी आवश्यक आहेतः - १०० माणसांची बसण्याची, एक रात्र झोपण्याची व्यवस्था - सकाळची न्याहारी, चहा, कॉफी - दुपारचे जेवण - गरजेनुसार चहा, कॉफी - ऑडिओ सिस्टम (माईक वगैरे) - म्युझिक सिस्टम (गाणी, सनई, वगैरे) - प्रोजेक्टर (स्लाईड शो साठी) - पूजेसाठी जागा - चांगली सेवा मी शोध घेतोच आहे. पण काही खरोखर चांगली ठिकाणे शोधून सापडत नाहीत. आपणापैकी कुणाला काही माहिती असल्यास कृपया माहिती द्यावी. ज्यांनी असे कार्यक्रम आधी आयोजित केलेले असतील त्यांनी कृपया माहिती द्यावी आणि अनुभव देखील सांगावेत ही विनंती. धन्यवाद, समीर
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

"उत्सव मंगल कार्यालय" ( वनाज जवळ ) : श्री डींगणकर यांचे केटरींग आहे....जेवण छान असते. एम आय टी कॉलेज जवळ "स्वप्नपूर्ती" म्हणुन एक आहे....ते पण छान आहे.... अजुन कोथरुड मद्दे बरेच कार्यालय व हॉल आहेत....सगळ्यांचे दर कमी अधिक प्रमणात सारखेच आहेत.... काही नावे: १. अंबर हॉल , स्वामीकॄपा सभागॄह ( दोन्ही देसाई बंधु जवळ ) २. राजलक्ष्मी सभागॄह ३. दिगंबर हॉल व लॉन्स... बाकी ह्डपसर चे काही माहिती नाही :-)

कोथरूडातले ईशदान सभागृह अशा कार्यक्रमासाठी छान आहे. दिगंबर हॉलवाले श्री स्वप्नील मराठे यांचं केटरिंग आहे. एक नंबर जेवण! एक आगाव सल्ला:
संध्याकाळी जेवणे झाल्यानंतर हॉलवर जाऊन तिथे गप्पा, गाणी असा कार्यक्रम करण्याचे योजत आहे.
दहानंतर आजूबाजूचे रहिवाशी उखडण्याची शक्यता आहे.

हडपसर, जर कोथरूड आणि चांदणीचौकाच्या आसपास येत असेल तर...आणि ते पण पुण्यांत... तर... जिथपर्यंत लोकल, तिथपर्यंत मुंबई का नको?

हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला मनासारखा हॉल मिळो आणि योजलेला कार्यक्रम सुखरुप/काहि विघ्न न येता पार पडो हिच सदिच्छा.

मोरेश्वर सभाग्रुह - संगम प्रेस लेन कोथरुड. शैलेश सभाग्रुह - अलंकार पोलीस चौकीच्या समोर. प्रतिज्ञा मंगल - त्यांच्याकडे एक छोटा हॉल पण आहे. सगळीकडे जेवण भारी मिळतं

कन्यादान मंगल कार्यालय हमरस्त्यावर आहे. पार्किंग सोयः अंदाजे २०-३० मोटारी हॉलमधील बैठकीची सोयः अंदाजे २००-२५० (प्लॅस्टिक खुर्च्या)

काही वर्षांपूर्वी सातारा रस्त्यावरील श्रेयस सिद्धी (आपटे रस्त्यावरील श्रेयसची शाखा) येथे वरच्या मजल्यावर असे छोटेखानी समारंभ होताना पाहिले आहेत. श्रेयसचे जेवण ज्यांना आवडते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हडपसर व कोथरुड या दोन्ही उपनगरांतून जवळजवळ समान अंतरावर हे ठिकाण आहे. बाहेरगावहून येणारे काही आमंत्रित पुण्यात फारसे फिरले नसतील तर पुण्यातील अनेक पर्यटन स्थळे पर्वती, पेशवे उद्यान, केळकर संग्रहालय, शनिवारवाडा, लालमहाल इत्यादी जवळच आहेत. टीपः हा पर्याय आजही उपलब्ध आहे का याबाबत १००% खात्री नाही.

श्रेयस सिद्धी आणि डिंगणकर दोन्ही पर्याय उत्तम. मागील वर्षापर्यंत पंचमीजवळील श्रेयस सिद्धी चालू होते. डिंगणकरांचे जेवण फारच छान असते.
लेखक: Maharani वेळ: गुरुवार, 05/15/2014 - 16:37 Permalink

Swamikrupa hall - karve putalyajaval...amchya gharatali/natevaikanchi barich karya zali ithe....hall Chan aahet..catering khupach Chan aahe..aajun loka athavan kadhatat...desai bandhu ambevalyancha hall ahe ha..rates pan reasonable aahet....agadi chandani chaukat hava aasel tar Jaika gardens aahe...mi gele nahiye pan catering changala aasata ASA aikala aahe....

पुतणीचं लग्न तिथे झालं होतं, नानिवडेकरांचं व्यवस्थापन आणि जेवण होतं, पार्किंगसह इतर बर्‍याच सोयी चांगल्या वाटल्या. पण १०० लोकांच्या झोपण्याची सोय कितपत चांगली होईल कल्पना नाही, वधू-वरांच्या कुटुंबासाठी चार खोल्यांखेरीज हॉलमध्ये पथार्‍या पसरायची तयारी असेल तर हरकत नसावी. पण गायन-वादनाच्या कार्यक्रमाला पोलिस परवानगी लागते, आणि रात्री दहानंतर (आम्हाला तरी) परवानगी मिळाली नाही.

सगळ्यांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद! :-) बरीच माहिती मिळाली. आता एक-एक करून चौकशी केली पाहिजे. अजूनही कुणाला काही माहिती असल्यास अवश्य द्यावी ही विनंती. पुनश्च धन्यवाद! --समीर

आंबेवाल्या देसायांचा स्वामीकृपा हॉल - मृत्युंजय मंदिरासमोर. पूर्ण प्लॅन सांगितल्यास त्याप्रमाणे सोय करून देतील. जेवण पूर्वी उत्तम होते. इतक्यात कल्पना नाही. एरंडवण्यात गोखले सभागृह हॉल आणि लॉन छान आहे. फक्त नऊ वाजेपर्यंतच जेवण मिळेल वगैरे पद्धत चालणार असेल तरच पुढे चौकशी करा. त्याच्या समोरच अश्वमेध हॉल आणि जोडून टेरेस आहे. स्वप्नपूर्ती कदाचित इतक्या कार्यक्रमासाठी महाग पडेल. नवी पेठेत शास्त्री रस्त्यावर काका हलवाईच्या गल्ली मध्ये एल आय सी कॉलनीचे प्रशांत सभागृह आहे. तिथे दोन वर्षांपूर्वी याच धर्तीवर, भेटी गाठी, जेवण, गाण्याचा कार्यक्रम असा समारंभ केला होता. उत्तम सोय आहे. फक्त इतक्या लोकांची राहण्याची सोय होणार नाही. बाकी बहुतेक गोष्टी शोधता येतील आणि अलिकडे चांगली नवी सभागृहे झाली आहेत. पण १०० लोकांची झोपण्याची सोय हा अडचणीचा मुद्दा होऊ शकतो. त्याला काही पर्याय शोधता आला तर पहा.

अनेक शुभेच्छा. कार्यक्रम सुखरुप पार पडो हिच सदिच्छा. माझ्याकडे विशेष माहीती नाही, रेवतीसारखेच मीही म्हणते, कि इथे माझ्यासारख्यांना माहीती मिळेल. काही प्रश्न होते (समीरसुर होपफुली हे प्रश्न अवांतर होणार नाहीत). ७५ व्या वाढदिवसांनतर ८०-८१ वा वाढदिवस करायचीपण पद्धत आहे का? विशेष कारण काय असेल कोणाला माहीती आहे का? अशा वाढ्दिवसांना काही विधी असतात का? मागे कोणीतरी पुस्तकांची तुला करुन ती कोणत्यातरी ग्रंथालयाला दिली होती. आणि बरेच लोक म्हणतात रहायची सोय अवघड आहे, मग आजकाल लग्नाच्या आदल्या दिवशी कार्यालयात जवळचे नातेवाईक लोक जात नाहीत का? काही वर्षांपूर्वी आदल्या दिवशीच दोन्ही बाजुची मंडळी कार्यालयात सीमांतपुजन वगैरे कार्यक्रमासाठी तिथेच मुक्कामाला असायची नाही, दोन्हीकडची मिळुन १०० लोक तरी होत असतील. हे हॉलपण मी छोटे कार्यालय असल्यासारखे समजुन चाललीय.

पंचाहत्तरीपर्यंत अमूक एका व्यक्तीस देवाने आरोग्यपूर्ण आयुष्य बहाल केले आहे त्याचा आनंद व्यक्त करणे, नातेवाईकांस बोलावून पुढील आयुरोग्यासाठी शुभेच्छा देणे/घेणे. समवयस्कांच्या भेटी गाठी होतात म्हणून हा प्रसंग असतो. तसेच ८०व्या व ८१व्या वादीच्यामध्ये एकदा ८१ दिव्यांनी ओवाळण्याचा कार्यक्रम असतो असे ऐकले आहे. त्यानिमित्ताने काहीजण धान्य तूला, पुस्तक तूला, देणगी देणे वगैरे करतात. आजकाल नातेवाईकांची सोय कार्यालयात राहण्यासाठी केली तरी गावात राहणारे बहुतेकजण आपापल्या घरी झोपायला जातात हा अनुभव आहे. इतर नातेवाईकही कोणी या घरी, तर कोणी त्या घरी असे जातात. काहीजण कार्य असले म्हणजे तिथल्या इतर नातेवाईकांना भेटणे होईल अस दुहेरी प्ल्यान करतात. उदा. मुंबैतील लग्न्/कार्य असले म्हणजे (तिथे १ दिवसाचा कार्यक्रम असल्याने) आदल्या दिवशी मुलांना समुद्र दाखवून आणणे व चौपाटीवर भेळ खाणे, पुण्यात गेले म्हणजे सकाळचे लग्न लावून मध्ये मावशीच्या जावेच्या बहिणीला भेटून जेवणाच्या वेळेपर्यंत परत येणे. कोल्हापुरात लग्न अस्ल्यास जेवणे करून अंबाबाईचे दर्शन व तेथून सव्वाचार किमीवर राहणार्‍या मैत्रिणीच्या बहिणीस भेटून येणे. पैठणला गेल्यास तिथला साखरपुडा उरकून पैठणी खरेदीला जाणे (असेच चन्नैतही गेल्यावरही होते, फक्त पैठणीऐवजी कांजिवरम घेतली जाते). असो. पूर्वी सगळे लोक्स कार्यालयातच रहात त्यावेळी सकाळी उठून सगळ्या गोष्टींना नंबर लावावे लागत. त्याची सवय नसल्यास पंचाईत होते. घरी प्रत्येकाच्या नावे एक बाथरूम असते. पथ्यपाणी असल्यास घरी ब्रेफा करून औषधे, गोळ्या घेऊन, साडी व्यवस्थित नेसून जाता येते. कार्यालयात रहायचे म्हणजे दागिने सांभाळणे हा उद्योग असतो व साडीही कशीबशी गुंडाळावी लागते. शिवाय आपल्या साडीच्या पदरास पीन लावण्यास कोणी मिळते का बघत फिरावे लागते. घरीच आवरून गेल्यास शेजारणीकडून मदत मागता येते, त्याचवेळी तिला आपली साडी व दागिनेही दाखवता येतात. ;)

८० की ८१व्या वाढदिवसाला 'सहस्त्रचंद्रदर्शन' सोहळा पण म्हणतात म्हणे. लॉजिक असं की १२ *८०= ९६० म्हणजे जवळपास एक हजार (सहस्त्र) पूर्णचंद्र त्या व्यक्तिने पाहिले असतात.

समजूत हो माणसांची! उत्सवप्रियता आपली. थोडं कटू नि अस्थानी: वाढदिवस साजरे करण्यासाठीचा एकमेव क्रायटेरिया असतो. तो फुलफिल केला की जमतं. बर्‍याच जणांना ते(च) जमत नाही. ;)

मस्त लॉजिक आहे की, धन्यवाद. सहस्त्रचंद्रदर्शन ऐकलं होतं पण असा अर्थ कळला नव्हता. कदाचित ८१ व्या वाढदिवसाला हे जास्त जवळचे वाटतयं का १२*८१= ९७२+२०=९९२. रेवाक्का अगं आता रोज काय तुझा फोटु लावुन नमस्कार करायचा का गं? मावशीच्या जावेच्या बहिणीला भेटून काय त्याचवेळी तिला आपली साडी व दागिनेही दाखवता येतात काय :))

अधिक मास राहिले. ८१ वर्षात २७ अधिक मास असतात. ८१*१२ = ९७२ ९७२+२७=९९९ सो ८१वर्षांच झाल्यावर पहिल्या पौर्णिमेला सहस्रचंद्रदर्शन करतात बहुदा.

वरचे गणित चुकले आहे. सौर कालगणने नुसार १२ x ८० असे धरले आहेत. ते हिन्दु कालगणतिनुसार धरलेत तर १००० वर जातात. धाग्यात विचारलेली माहिती नसल्यामुळे पास.

The Moon completes its orbit around the Earth in approximately 27.32 days आणि म्हणुन सहस्त्रचन्द्रदर्शन हा ७५व्या वाढदिवसाच्या आधि येतो. १०००*२७.३२ = २७३२०दिवस =२७३२०/३६५ =७४.८४वर्षे