Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:
राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं आहे ! राजसाहेब ठाकरे यांचे राजकारणात उतरण्याचे ध्येय काय ! त्यांना खरच महाराष्ट्रातील वजनदार नेत्याचा आशीर्वाद आहे का... राज यांच्या नवनिर्माणाच्या नेमक्या कल्पना काय आहेत. शिवसेनेपेक्षा काही वेगळेपण मनसेमधे आहे का ! माझ्या शिवाय सरकार बनू शकणार नाही असे ते का म्हणतात. ज्या महानगरपालिका, नगरपालिकेमधे त्यांची सत्ता आहे तिथे कारभार कसा चालतो... गुंडाना, खंडणीस्वारांना किंवा त्यांच्या पत्नीला ते उमेदवारी देतात का ? तशी दिल्यास सुशासन आणण्यावर त्यांचा विश्वास आहे असे मानायचे का.... ते मोदींना सपोर्ट करण्याची भाषा करतात मग मोदींच्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार का उभा करतात. इतके दिवस त्यांनी एकही निवडणूक का लढवली नाही. हिंदूत्त्वाचं त्यांना वावडं आहे का ?.... त्यांना जिंकण्यात इंटरेस्ट असतो की हारण्यातच स्वारस्य असते... त्यांच्या निवडणुक सहभागामुळे कुणाला फायदा होतो... त्याच्यामुळे हिंदूत्त्ववादी मतात फाटाफूट होत नाही का... दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा काँग्रेसचा लाभ होत नाही का !
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मोदी सरकार कडून थपडा व टपला खात राहण्यापेक्षा शिवसेना व म. न. सेनायांनी आपले पक्ष गुंडाळून मोदींच्या समावेत पुढील राज्यातील निवडणुकीत सहभागी व्हावे. अन्यथा ठाकरे एकमेकांशी टकरा मारून नामशेष होतील. शिवसेना समर्थकांनो आपल्या नेत्यांना वेळीच जागे करा....

अहो ओककाका तुम्ही एकदा नव्हे चारदा ठणकावून लिहिलेत तरी त्या राज आणि उद्धवांच्या डोक्यात प्रकाश पडेल असे वाटत नाही. ;)

काहींना एकदा सांगून समजत नसेल तर शाब्दिक हातोड्याने काही गोष्टी सांगावयाचा लागतात हे आपल्याला माहिती आहे.

उद्धव साहेबांना वाटते कि विजय त्यांच्यामुळेच मिळाला आहे. किंवा ते तसे भासवत तरी आहेत. महाराष्ट्रात भाजप आता शिवसेनेच्या पुढे गेला आहे हे शिवसेना मान्य करायला तयार नाही. राज साहेबांना वाटते कि आपण सदा सर्वकाळ काही तरी नवीन मुद्दा काढून जनतेला वेडे बनवू शकतो. शिवसेनेला मान खाली घालायला लावायची हा एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. राज ठाकरे महाराष्ट्रात शिवसेनेची जागा घेवू बघत आहेत. दोघांनी जर वास्तवाचे भान ठेवून पावले टाकली नाहीत तर येणाऱ्या काळात हे दोन्ही पक्ष नामशेष होवू शकतात. आजचा तरुण मतदार रिजल्ट ओरिएण्टेड होवू पाहतोय. नुसते भावनिक आवाहन करून प्रचार करण्याचे दिवस आता गेले. बाप दाखव नाहीत तर श्राद्ध कर अशी म्हणणारी पिढी आता आली आहे.

ओककाकांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आपापल्या पक्षांचे अवतारकार्य संपले आहे असे ते का मानत नाहीत. ३ पिढ्या ४ पिढ्या पक्षाचे दुकान चालवलेच पाहीजे ही सक्ती नाही... आणि भाषणाला गर्दी जमवली आणि कुणा चॅनेलला हाताशी धरून संपूर्ण भाषणाचे प्रक्षेपण करता आले... म्हणजे आपल्याला फार मोठा जनाधार आहे अशा भ्रमात राहण्यात अर्थ नाही...

कार्यकर्त्यांना फार काळ अ‍ॅनस्थेशियामधे ठेवता येत नाही

पुण्यातील कुविख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला उमेदवारी देऊन वरुन त्याचे समर्थन केले तेव्हाच राज ठाकरे मनातुन उतरले. २००९-१०-११ मध्ये मनसे / राज बद्दल जेवढे चांगले वाटायचे तेवढे आता वाटत नाही.

त्यांच्या मिस्टरांवर चार्जेस आहेत, त्यांच्यावर तर नाहीत ना ? असा निरागस प्रश्न विचारला होता त्याने

बाळ ठाकरेंच्या सानिध्यात वाढलेले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण शिकलेले, त्यांच्या सारखेच दिसणारे, बोलणारे वगैरे वगैरे गुणविशेषांमुळे राज ठाकरेंकडून जनतेच्या भव्य-दिव्य आशा होत्या. परंतु दुर्दैवाने राज ठाकरे त्या पुर्‍या करू शकलेले नाहीत. परिणामतः ते जनाधार गमावत आहेत. पण अजूनही वेळ गेलेली नाही. कांही भरीव कार्य केले, भावनिक आवाहनं आणि नकलांचा बाजार बंद करून कांही परिपक्व राजकारण - समाजकारण ह्याची चुणूक जरी दाखवली तरी अजून राज ठाकरेंना चांगेल दिवस येतील. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडले, नविन पक्ष काढून त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याचा विश्वासघातकी नतद्रष्टेपणा केला आहे अशा आरोपांनी व्यथित होऊन ते सतत स्वतःची स्वच्छ बाजू जनतेसमोर मांडायचा प्रयत्न करीत असतात. उद्धव ठाकरेंवरील आरोप, शाब्दीक हल्ले त्यातूनच उद्भवत असतात. उद्धव ठाकरेही, आजही, वरील घटनांचे भांडवल करून राज ठाकरेंची प्रतिमा डागाळण्याचे कार्य करीत असतात. शिवसेनेने भाजपचा हात सोडून मनसेशी टक्कर घ्यावी. आपण मनसेपेक्षा सरस आहोत हे सिद्ध करावं. राज ठाकरेंनी साकल्याने विचार करून राजकारण आणि समाजकारणावर भर दिला, त्यांच्या आमदारांकडून कांही विधायक कार्य करून घेतलं, मिळालेल्या प्रत्येक संधीचा समाजकारणासाठी फायदा उचलला, स्वतः जनेतेत फिरून त्यांची गार्‍हाणी ऐकून त्यावर उपाय केले तर मनसेला अजूनही चांगले दिवस येतील असे वाटते. बाकी उद्धव आणि आदित्य मध्ये विशेष दम नाही हे अनेकदा जाणवते. कदाचित त्यामागे राज ठाकरेंबद्दलचे आंधळे प्रेम हेही कारण असू शकते.

आम्हीच महाराष्ट्राचे बाप आहोत असा सुर आवळणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेच मतदारांनी तेरावं घातल्.तर आम्ही महाराष्ट्राची आई आहोत असे म्हणणार्‍या राष्ट्रवादीचा कॉग्रेस { सोनियांच्या परदेशीपणाला प्रश्न केला म्हणुन राष्ट्रवादी आणि मूळ विचारसरणी काँग्रेसची म्हणून:- राष्ट्रवादी काँग्रेस!} देखील दारुण पराभव झाला ! शिवसेनेचे म्हणाला तर त्यांना मोदी मटक्यात एक्का लागला ! आणि पक्षाला त्राण मिळाला. आता बघुया या नव्या अंकाची सुरुवात विजयाने समाप्त होइल का ते... जाता जाता :- या वेळी निवडणुकीच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, शिवाय इत्पादने विकणार्‍या कंपन्यांनीही या संधीचा फायदा घेतला. उदा. फेव्हिकॉलची जाहिरात. पण सगळ्यात फुसकी जाहिरात राष्ट्रवादी पक्षाची होती,आणि त्यांच्या त्या जाहिरातींचा वापर व्हॉट्सअपवर विनोद निर्मीती करण्यासाठी झाला. ;)

त्यातलाच व्हॉट्सअपवर आलेला एक विनोद आज आमच्या बकरीला ... ३ पिल्लं झाली .. आणि हे सगळ शक्य झाल ते फक्त …. …. …. …. …. …. …. …. …. आमच्या बोकडामुळे ……. तुम्हाला काय वाटलं पवार साहेबांमुळे *stop* मग आमचा बोकड काय ** उपटायला ठेवला आहे का?? बाकी राज साहेबांच्या मनसेकडून नवनिर्माणाच्या आशा होत्या पण त्यांनी भ्रमनिरास केला.

हॅ.हॅ.हॅ... ;) पोर्न फिल्म मधुन बॉलिवूड मधे काम करायची संधी मिळाली ती केवळ *** साहेबांच्या महिला धोरणामुळेच ! :- सौ.सनी लिओनी

मनसेने लोकसभानिवडणुकीत मोदींना पाठिंबा व्यक्त केला होता.त्यांनी भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केली नव्हते. शिवसेनेविरुद्ध मात्र केले होते. भाजपला शिवसेनेचे बळ खच्ची व्हावे (आणि आपले वाढावे) असे वाटतेय असे जाणवत होते. आता 'शतप्रतिशत' आणि 'स्वबळावर' अशा शब्दांची चलती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जागा कमीत कमी संख्येने निवडून येऊ देणे हा एक कार्यक्रम असू शकतो. शिवसेनेचे महत्त्व उरले नाही की खुशाल युती तोडता येईल. मग मनसेला झटकून टाकणे हे अगदीच सोपे काम.

राज आता केजुच्या मार्गावर चालले आहेत ! त्यांना शुभेच्छा ! तुमच्या सभांना गर्दी केली म्हणजे तुम्हाला निवडून देऊ असे समजण्याचे दिवस संपले ! लोक ही ४ घटकांची करमणूक करुन घेतात झाले ! ते ही आता हुषार झाले आहेत. नपेक्षा आता त्यांनी राष्ट्रवादीला विचारावे, ते ही आता पार्ट्नर शोधत असतील, कॉन्ग्रेससाठीही चांगली गोष्ट ठरेल. सुंठेवाचून खोक्ला गेला. कोण्ग्रेसचा इतका खराब निकाल रावा मुळे लागला असे अनेकांना वाटते आहे .. मला ही तसेच वाटते आहे. त्याच बरोबर सेना- भाजपने मुख्यमंत्री पदावरुन सुंदोपसुंदी केली तर मराठी जनता त्यांचीही वाजवेल...जरा सबुरीने वागले पाहीजे. जन्ता शहाणी होऊ लागली आहे....

मनसेने लोकसभानिवडणुकीत मोदींना पाठिंबा व्यक्त केला होता.त्यांनी भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केली नव्हते. शिवसेनेविरुद्ध मात्र केले होते
पुण्यात मनसेचा तगडा उमेदवार होता. दोनदा आमदार असलेला आणि सेनेला अपशकुन केल्याने मोदी खुश होणे शक्य नाही. त्यामुळे एन डी ए खच्ची होते..

भाजप समर्थक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका …. आधी मोदींचा performance दिसू द्या. शत प्रतिशत व स्वबळावर लढण्याच्या घोषणा २०१९ च्या निवडणुकी च्या वेळी ठरवू …। युती महाराष्ट्रात १९८७ सालापासून अबाधित आहे . जशी शिवसेनेला भाजपची गरज आहे तितकीच भाजपला शिवसेनेची…. भाजप हा वेगळा विदर्भाचा समर्थक आहे परंतु केवळ शिवसेनेमुळे भाजपला त्यांचा प्रस्ताव वगळावा लागला आहे… आणि तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे ….

देशात बहुमत मिळाल्यामुळे आता भाजपा स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी प्रसंगी सेनेची साथ सोडून मनसे बरोबर घरोबा करण्याचीही शक्यता वाटते. परंतु महाराष्ट्रात शिवसेना नि मनसे हे प्रादेशिक पक्ष टिकलेच पाहिजेत हेच मराठी माणसाच्या भल्याचे आहे. भाजपा महाराष्ट्रात विश्वासार्ह वाटत नाही.

भाजप आता जास्त पर्याय हाताशी धरुन आहे पण अचानक गोपीनाथ साहेबांच्या एग्जिटने समिकरणे बदलली आहेत. मनसे मुंबई आणी परिसरात प्रभाव दाखवेल पण....

जस जशा विधानसभा निवडणुका जवळ येतील तस तसा भाजपा नि मनसे मधील घरोबा वाढत जाईल. याचा अर्थ भाजपा युती तोडण्याचा आततायीपणा करणार नाही मात्र सेनेवर एक दबावतंत्राचा वापर होईल. जर तुम्ही नाही तर मनसे हि आमचा साथीदार होवू शकतो ह्यातून जागा वाटपात भाजपचाच फायदा होईल.खरे तर भाजपा शिवसेनेच्याच खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात मोठी झाली आज केंद्रात बहुमत आलेय तर ती बंदूक सेनेकडेच वळू शकते.

भाजपा शिवसेनेच्याच खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात मोठी झाली
कृपया आपले म्हणणे अधिक स्पष्ट करावे... आपले म्हणणे असत्य आहे

असत्य आहे असे वाटत नाही.अगदी २० वर्षापूर्वीपर्‍यंत भाजपा म्हणजे शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जायचा.शिवसेनेच्या मदतीने भाजपावाले सामान्य मराठी माणसापर्‍यंत पोचू शकले.ठाकरेंनी राम मंदिर प्रकरणात तथ्य नाही असे जाहिर केले असते तर ? किंवा जयवतीबेन मेहता,किरीट सोमैय्या अशा अमराठी लोकांना निवडून देऊ नका असे म्हंटले असते तर?

सहमत आहे, मोदी हे नाव नसते तर आजही हे लागू असते. वर्तमान बदलले म्हणून इतिहास बदलत नाही. तसेच मोदी हे नाव विधानसभेत नसल्याने आणि आता महाराष्ट्राशी नाळ असलेले लोकनेते मुंडेही आपल्यात नसल्याने भाजपा-सेना युतीत सेनेचेच पारडे जड राहावे अशी भावना असणारा फार मोठा वर्ग आहे.

खर तर आता राज साहेबांनि पक्षाच्या नावाप्रमाणे महाराष्ट्राच्या नवनिर्मानाचा म्हणजे विकासाचा मुद्दा घेउन मैदानात उतरले पाहिजे. कारण लोकाना आता विकास हवा आहे. भावाभावांच्या भांडनामधे आता लोकना आजिबात रस नाही राहिला आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे... विकास होइल का ? मला रोजीरोटी मिळेल का ? मला घर मिळेल का ? या प्रश्नांचं फारसं कुणाला काही पडलेलं नाही. या देशात माझा देव, देश, धर्म टिकेल ही प्रत्येकाची चिंता आहे. बा द वे हिंदूत्त्व आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मानणे ही चूक आहे...

(((विकास होइल का ? मला रोजीरोटी मिळेल का ? मला घर मिळेल का ? या प्रश्नांचं फारसं कुणाला काही पडलेलं नाही. या देशात माझा देव, देश, धर्म टिकेल ही प्रत्येकाची चिंता आहे.))))--- हेच तर ह्या देशाचं दुर्दैव आहे. देवाची चिंता माणसाला करावी लागते.

गुंडांना संधी दिली तरी ते गुंडच रहातात. टी. राजू ह्यांना बरेचदा संधी दिलेली आहे. आणि त्यांनी त्याचं मस्तपैकी वाटोळं केलंय. तेव्हा आता त्यांना अजून भाव न देता गपचूप बसवलेलं बरं. उद्दाम भाषा, नाटकी आवेश आणि बोलाचाच भात - हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण लोकांनी आता ओळखलंय. नाटक चित्रपटात त्याना चांगला वाव आहे *dirol* उद्धव ठाकरे ह्याना आपला पक्ष कालानुरूप बदलायला हवा. ते त्यांना चांगले ठावूक आहेच. पक्षाचा नवा USP काय असावा हे त्यांनी लवकर माहिती केलेले बरे. नाहीतरी "ह्याला मारा-त्याला ठोका-दुकानं जाळा" असली जुनी शिवसेनागिरी फार काळ तग धरणार नाहीच.

राज ठाकरेचे खालील गोष्टी बद्दलची भूमिका योग्य वाटते : १. सरकारकडून केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींना सरसकट विरोध न करता महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी असतील तर त्याला पाठींबा देणे. उदा. जैतापूर प्रकल्प, एलबीटी इ. शिवसेना किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी असं कधी केल्याच आठवत नाही . २. २०१२ साली रझा अकादमीच्या लोकांकडून दंगल घडवून आणून सुद्धा मुस्लिम मतावर डोळा ठेवून कोणताही पक्ष याविरोधात 'ब्र ' काढायला तयार नव्हता. अशा वेळी मतपेटीचा कोणताही विचार न करता शांततेने मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवणे. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना/भाजपने देखील यावेळेस तोंडदेखला विरोध करून शांत बसणे पसंत केले. ३. "टोल मध्ये पारदर्शकता नाही म्हणून टोल पूर्णपणे बंद करा" अशी कोणतीही अवाजवी मागणी न करता पारदर्शकतेचा आग्रह धरणे व त्यासाठी आंदोलन करणे. शिवसेना-भाजपने लोकानुयायी "टोलमुक्त महाराष्ट्र करू" अशी घोषणा दिली आहे पण आर्थिक गणित कस जुळवणार याबद्दल काही स्पष्टीकरण नाही. ४. "अमुक जातीच्या मतांवर डोळा ठेवून अमुक जातीसाठी आरक्षण द्या" अशी मागणी न करता जातीवर आधारित आरक्षणाला विरोध करून आर्थिक आरक्षणला समर्थन देणे. ५. उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा नेतृत्व व वक्तृत्व चांगले असणे. बर्याच वेळा उद्धव ठाकरेचे वक्तृत्व पाहून ते महाराष्ट्राचे "राहुल गांधी" होतात का काय असे वाटते. पण खालील गोष्टी राज ठाकरेच्या विरोधात दिसतात, त्यात त्यांनी सुधारणा घडवून आणल्यास जनतेला एक चांगला पर्याय मिळू शकतो. १. नाशिक मध्ये सत्तेत येउन देखील काही ठोस विकासकामे घडून न येणे. २. विधानसभेतील आमदारांची कामगिरी फारशी दाखल घेण्यासारखी नसणे. ३. मुंबई-नाशिक-पुणे वगळता महाराष्ट्रात इतरत्र सर्व ठिकाणी पक्ष व चांगले नेतृत्वफळी नसणे. ४. महाष्ट्राच्या विकासाची ब्लु-प्रिंट न मांडणे.

शिवसेना हा महाराष्टात भाजपपेक्षा जास्त जनाधार असलेला पक्ष आहे. भाजपने शिवसेनेशी युती केली नसती तर भाजपा हा महाराष्ट्रात २० ते २५ जागा मिळवणारा पक्ष म्हणून राहिला असता.भाजपा हि महाराष्ट्रात शिवसेनेच्याच आधाराने वाढली.

युती आता महायुती झाली आहे आणि त्यामुळे तेथे मनसेला स्थान मिळणे मुश्किल झाले आहे. याउलट शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून महत्व्वाची खाती आपल्या ताब्यात ठेवणे भाजपच्या जास्ती हिताचे आहे.

विधानसभेत जर महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हायला हवा ह्यातच मराठी माणसाचे हित आहे.मुंडे साहेब होते तोपर्यंत ठीक होते भाजपचा महाराष्ट्रातील तो एक लोकनेता होता आता भाजपकडे महाराष्ट्रात नेतृत्व नाही. फडणवीस, तावडे हे जर भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील तर भाजपचे कल्याणच आहे. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून सामोरे आले तर भाजपकडे त्या तोडीचा एकही नेता प्रोजेक्ट करायला नाही.महाराष्ट्रात मराठी माणसाला स्वाभिमानाने राहायचे असेल तर मुख्यमंत्री हा सेनेचाच हवा.

स्वाभिमान म्हणजे काय ? शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर सर्व मराठी माणसांचा स्वाभिमान जपला जातो काय ? स्वाभिमानाने जगून पोट भरते काय ?

हिंदुत्व नि विकास या वेगळ्याच गोष्टी आहेत आणि त्या वेगळ्याच असल्या पाहिजेत… याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०१४ निवडणूक…. यश हेय विकासाच्या आशेवर मिळाले आहे.

२०१४ चे मतदान हे बहुतांशी विकासाच्या मुद्द्यावर झालेले आहे ह्यात तथ्य आहे. कॉंग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली होती.त्यात भाजपने अतिशय उत्कृष्ठ अशी प्रचार यंत्रणा राबवली. जाहिराती ह्याही प्रभावी होत्या. जाहिरातींचाही भाजपच्या विजयात मोठा वाटा आहे. जाहिराती पाहून जनतेच्या मनात आशा निर्माण झाली कि आता "अच्छे दिन आनेवाले है" त्यामुळे मोदींना भरघोस मतदान झाले त्यात हिंदुत्वाचा वाट हा शून्य दिसतोय.

उदा राज्यातिल बहुतांश नद्यांना १२ महीने पाणी व राज्याला विकास हवा म्हणुन वर्षभर दुथडी भरुन वाहणार्‍या नदीवर धरण बांधणे त्यासाठी प्राचिन शिवमंदीर पाण्यात बुडवणे/ विस्थापीत करणे, वा ज्या नदीवर धरण बांधले आहे त्याचे जे धार्मीक महत्व आहे त्याला छेद देत नदीच्या पाण्याचे सगळीकडे वितरण करुन मोठ्या प्रमाणात लोकांच्या उपयोगी बनणे. पेहेले शौचालय फिर देवालय ही आपल्या प्रतिस्पर्ध्याची टिकेचा धनी बनलेली मुळ घोषणा तशीच उचलुन स्वतः ति वापरणे/समर्थन करणे या आणी इतर अनेक गोष्टी आहेत ज्या मोदींना कट्टर धर्मभिमानी ठरवतात पण कट्टर धार्मीक मात्र आजिबात नाही. नेमकी हीच गोष्ट आहे जी बहुसंख्य हिंदुना ९९.९९९% ++ लागु पडते, म्हणजे यांना कट्टर हिंदु धार्मीकता रुचत नाही पण त्यांचा धर्माभिमान मात्र कट्टर आहे. कट्टर हिंदुत्व की कट्ट्र धर्माभिमान याच्या द्वंद्वात सापडलेला मोठा समाज म्हणूनच आज मोदिंचा पाठीराखा आहे... विकास कोणाला नको ?

मोदींनी विकास हाच उद्देश ठेवला पाहिजे धार्मिक बाबतीत त्यांनी लक्ष देवू नये हि त्यांच्याकडून अपेक्षा . विवादास्पद गोष्टी ज्या असतील ते कोर्ट बघून घेईल त्यात त्यांनी आपली शक्ती वाया घालवू नये. आतापर्यंत जे धर्माचे राजकारण झाले ते बस झाले आता जनतेला फक्त विकासच हवाय.