Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं. a नोकरी कशी आहे, असं विचारलं असता नाखूश दिसलेला तो म्हणाला की, ‘खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री-रात्रीपर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाइफ असं वाटतंच नाही काही. शनिवारीसुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.’ मी न राहवून प्रश्न केला, ‘तू फॉरेनमधेच राहतोस ना?’ ‘हो अर्थात!’ तो म्हणाला. ‘कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!’ मी म्हणालो. ‘एके काळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो की परदेश, घरोघरी मातीच्या चुली’. ‘कमाल आहे!’ असं म्हणत असतानाच मी भारतात राहणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा, त्यांचे किस्से आठवायला लागलो. ‘आनेका टाइम फिक्स है जानेका नही’, ‘गद्दी-चद्दर लेकेही ऑफिस जाते है’, ‘ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है’, ‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’ अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता. स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली आणि एकेक माणूस दोघा-तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा, असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलता काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील, या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अध्र्याहून जास्त वेळ नोकरीला देऊ लागली आणि हळूहळू ही संस्कृती बनत गेली. कुणी तरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की, ‘मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की, ‘हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करने का है तेरे को?’ असं विचारतो माझा बॉस.’ मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको, मुलं, मित्र, नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोक हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या ‘घर जा के क्या करने का है’वाल्यांची. हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत, ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ, नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वत:साठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये होतं. कुठे तरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वाची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकवर आणि व्हॉट्सॅप्पवर ‘गेले ते दिवस’ आणि ‘बेस्ट डेज ऑफ लाइफ’ सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित राहायचं काही कारण नाही. ‘दमलेला बाबा’ आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा ‘कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही’ असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली ‘नाइन टू फाइव्ह’ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल. माझा हा लेख प्रहार वृत्तपत्रात २९-६-१४ रोजी प्रकाशित झाला त्याचा हा दुवा. http://prahaar.in/collag/225913
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

यावर उपाय म्हणून मी मला चांगलं रेटिंग हवं ही इच्छा (वयाच्या २६व्या वर्षापासून) करणे सोडून दिलेय. अतिशय छान आयुष्य जगतोय. तसंही माझ्यापेक्षा कितीतरी वेळ अधिक काम करणार्‍याला माझ्याहून थोडाच अधिक पगार मिळतोय हे बघुन आसूरी की म्हंटात तो आनंद होतो. त्यापटीत न वाढणार्‍या पैशातून त्याहून कितीतरी मोलाचा वेळ मला विकत मिळतो

वाढत्या पगाराचा आणि रेटींगचा संबंध असतोच असंही नाही आणि नसतोच असंही नाही. हे मिपावरच्या एका फ्यामस वाक्याचा आधार घेऊन सुचवावंसं वाटतं. (श्रेयाव्हेरः चौरा? मुवि? नक्की आठवत नाही.)

वरती डॉ. खरे, मृत्युंजय आणि समीरसूर यांचे प्रतिसाद आवडले. पैसा स्मूथ जगण्यासाठी आवश्यक असला तरी नोकरी करणार्‍याला त्यासाठी वेळ ठरवण्याचे स्वातंत्र्य नसते. निदान भारतात तरी. आपल्याइथे नोकरी अन गुलामी यात फारसा फरक नाही. आपले काम आपल्या सोयीने संपवणे अन मी अमुक इतकाच वेळ काम करेन असे सांगणे म्हणजे 'नवाबी'च समजली जाते इथे. यासंदर्भात माझ्या अमेरिकास्थित मित्राने सांगितलेली गोष्ट आठवते. त्याचा बॉस हजारो डॉलर्स पगारवाला होता. पण एक दिवशी त्याने नोकरी सोडली. का, तर त्याला म्हणे मधमाशीच्या पोळ्यांमधला मध गोळा करण्याचे काम आवडत होते. तेच करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. असली नवाबी भारतात तरी निदान परवडणार नाही...!

उशिरा थांबायची काही अजून कारणे आहेत. मुंबई मध्ये बाहेरून जी तरुण मुले/मुली आयटी मध्ये येतात ती कुठेतरी घर भाड्याने घेवून राहतात. ५ ला घरी गेल्यावर त्यांना घर खायला उठते कारण घरी कोणी नसते. परत घरी गेल्या गेल्या कोणी खायला देत नाही ते वेगळेच. त्यापेक्षा ऑफिस मध्ये बसल्यावर बरेच फायदे मिळतात. १. बॉस ला वाटते कि मुलगा/मुलगी खूप काम करतोय २. फुकटच्या एसी मध्ये बसून फुकट चे इंटरनेट वापरायला मिळते ३. ५ नंतर ऑफिस मध्ये बसल्यावर फुकट चा नाश्ता हादडायला मिळतो ४. फुकटच्या फोन वरून घरी फोन करता येतात ५. ऑफिस मधली मैत्रीण/मित्र असेल तर मग आनंदी आनंद आसतो. तिकडेच डेटिंग चालू होते ६. उशिरा थांबल्याबद्दल ऑफिस ची गाडी थेट घरापर्यंत सोडायला येते ७. स्वत:चे काही झेरोक्स, प्रिंट ओउट काढायचे असल्यास ते होतात. थोडक्यात काय ५ नंतर नुसती मज्जा करता येते. यात खरेच ऑफिस चे काम करणारेहि असतात पण नगण्य. जे बाकीच्यांचे चेष्टेचे विषय ठरतात.

माझे एक वरिष्ठ होते त्यांचे त्यांच्या बायकोशी अजिबात पटत नसे. यास्तव त्याना जास्तीत जास्त उशीरा घरी जायची संवय लागली होती. अनावश्यकपणे त्यानी आमच्या सेक्शनमधे या वैयक्तिक कारणास्तव पोस्ट साडेपाच क्लब स्थापन केला. जो थांबणार नाही तो कंडम माणूस कंपनीचा हितशत्रू असे चित्र निर्माण केले. आपले उद्योग पति काय अमोरिकन उदद्योगपति काय पेनी वाईज आणि पाउंड फुलीश नवरत्ने आहेत असे माझे ठाम मत आहे. जसपाल भट्टी यानी या बाबीचा मागोवा त्यांच्या कार्यक्रमातून काही वेळेला घेतलेला दिसतो.

आयटीमधल्या कामाचा फारच बागुलबुवा झाला आहे. यापूर्वी इतरत्र व्यक्त केलेले मत येथे पुन्हा लिहितो आयटी कंपन्यांमध्ये फारशी पिळवणूक वगैरे होत नाही. जे लोक आयटीमधल्या कामाला पिळवणूक म्हणतात त्यांनी खऱ्या पिळवणुकीचा सामना केलेला दिसत नाही. कोणत्याही गंभीर स्वरुपाचे प्रोफेशनल हॅजार्ड्स नसणारी, प्रदूषणमुक्त वातावरणात, गारगार एसीमध्ये गुबगुबीत खुर्चीवर बसून काम करायला मिळणारी ही नोकरी आहे. लोक पैशासाठी खाणींमध्ये कामे करतात. शिपिंग कंपन्यांच्या जहाजावर कुटुंबापासून दूर सहासहा महिने राबतात, देशाचे सैनिक रात्रंदिवस जिवाची भीती बाळगून नोकरी करतात त्या स्वरुपाचा जिवाचा धोका या नोकरीत नाही. अत्यंत lowest stakes किंवा skillsets असूनही तुलनेने अधिक अर्थप्राप्ती करवून देणारी ही नोकरी आहे. आयटीपेक्षा अनेक क्षेत्रांमध्ये परतावा कमी असूनही अधिक धोके असतात नोकऱ्या जाण्याचे धोके फक्त आयटीमध्ये आहेत हाही गैरसमज आहेत. सरकारी नोकरी सोडले तर सगळ्यांच्याच डोक्यावर कायमची टांगती तलवार असते. चारचार वेळा कँटीनला जाणे, दिवसभर सोशल साईट्सवर गप्पा मारणे आणि संध्याकाळी पाच वाजले की काहीही काम झाले नाही हे लक्षात आले की मग उगीच थोडे हातपाय हलवल्यासारखे करणे हे बहुतेकांच्या साधारण कामाचे स्वरुप असते. त्यामुळे वर्षानुवर्षे 'सकाळी दहा ते रात्री दहा' ऑफिसात असणारे पण फक्त तासाभराचेच काम करणारे बहुसंख्येने आयटीक्षेत्रातच सापडतील. इतर क्षेत्रांमध्ये तुमचे आऊटपुट मोजण्याच्या ऑब्जेक्टिव पद्धती असल्याने असा उडाणटप्पूपणा करता येत नाही. प्रामाणिकपणे भरपूर कष्ट करण्याची मानसिक तयारी असेल तर आयटी क्षेत्रात पिळवणूक वगैरे जाणवणार नाही असे वाटते. आणि हे तत्त्व आयटीपुरतेच मर्यादित नाही.

तुम्हाला एवढं टाईप करायला वेळ सापडतो आणि मला एवढंच टाईप करायला मिळतो यावरून कळायला हवं. यापूर्वी इतरत्र व्यक्त केलेले मत येथे पुन्हा लिहिण्याची गरज नव्हती. लिंक दिली असती तरी चाललं असतं.

तुम्हाला एवढं टाईप करायला वेळ सापडतो आणि मला एवढंच टाईप करायला मिळतो यावरून कळायला हवं.
किंवा तुम्हाला ते काम करण्यासाठी माझ्यापेक्षा बराच जास्त वेळ लागतो व मी ते कमी वेळात करु शकतो. शिवाय त्यामुळे मला आयटीमध्ये खूप काम अशी बोंबाबोंबही करावी लागत नाही. थोडा सराव केल्यास तुमचाही Comprehension व टंकलेखनाचा वेग वाढू शकतो. आशा सोडू नका. प्रयत्नांती परमेश्वर!
यापूर्वी इतरत्र व्यक्त केलेले मत येथे पुन्हा लिहिण्याची गरज नव्हती. लिंक दिली असती तरी चाललं असतं.
तुम्ही प्रतिसाद देण्याचीही विशेष गरज उत्पन्न झाली होती असे वाटत नाही.

किंवा तुम्हाला ते काम करण्यासाठी माझ्यापेक्षा बराच जास्त वेळ लागतो व मी ते कमी वेळात करु शकतो. शिवाय त्यामुळे मला आयटीमध्ये खूप काम अशी बोंबाबोंबही करावी लागत नाही. थोडा सराव केल्यास तुमचाही Comprehension व टंकलेखनाचा वेग वाढू शकतो. आशा सोडू नका. प्रयत्नांती परमेश्वर!
आ.क.साहेब, माझा मराठी टंकलेखनाचा वेग वाढवण्याची मला गरज वाटत नाही. माझ्या कामात इंग्लिश वापरलं जातं आणि तो वेग (मी टायपिंग चा कोर्स पूर्वी केल्यामुळे) बराच जास्त आहे. खरं तर असं आहे, की तुम्ही काही लिहिण्यामुळे लोकांची मतं बदलू शकत नाही आणि ज्या कामात पैसे मिळत नाहीत त्या कामात मला अशा प्रकारे वेळ घालवायला फारसं आवडत नाही. तुम्हाला कोण असे लोक भेटलेयत त्यांच्याकडे जाऊन त्यांना बोंबाबोंब करू नका असं तुम्ही सांगू शकता. मी आयटी मध्येच काम करतो आणि जास्त काम करतोच. कमी काम करणारे, टाईम्पास करणारे आणि जातीय आणि प्रादेशिक कंपूबाजी करणार्‍यांना मी माझ्या टीम मध्ये घेत नाही. मला दोन्ही प्रकारचे बरेच लोक माहीती आहेत आणि टाईम्पास करणार्‍यांची वकीली करावी असं मला मुळीच वाटत नाही. तरीही आयटी मधले लोक काम करत नाहीत असं ब्लँकेट विधान करणार्‍यांची मला कीव येते. शुभरात्री.
तुम्ही प्रतिसाद देण्याचीही विशेष गरज उत्पन्न झाली होती असे वाटत नाही.
तुम्ही मिपा विकत घेतलं असल्यास तसं सांगावं. देणार नाही मी प्रतिसाद. नसल्यास निदान माझ्या बाबतीत गटार बंद ठेवत चला, काय?

कामात पैसे मिळत नाहीत त्या कामात मला अशा प्रकारे वेळ घालवायला फारसं आवडत नाही.
वेळ घालवायला आवडत नसूनही वेळात वेळ काढून तुम्ही प्रतिसादाला उत्तर दिले त्याबाबत मनापासून आभारी आहे.
तुम्हाला कोण असे लोक भेटलेयत त्यांच्याकडे जाऊन त्यांना बोंबाबोंब करू नका असं तुम्ही सांगू शकता.
मला कोणाला काय सांगायचे आहे ह्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र आहे. तुम्हाला वैयक्तिक निरोप पाठवून प्रतिसाद वाचा असा आग्रह केला नव्हता. तो तुम्हाला वैयक्तिक उद्देशूनही नव्हता.
तरीही आयटी मधले लोक काम करत नाहीत असं ब्लँकेट विधान करणार्‍यांची मला कीव येते.
तुम्ही टंकलेखनाचा कोर्स केला असला तरी तुम्हाला Reading Comprehensionचा कोर्सही करण्याची माफक गरज येथे दिसून येत आहे. अन्यथा आयटीमधले लोक काम करत नाहीत असे मी न केलेले विधान तुम्ही लिहिलेच नसते. मात्र तरीही कीव केल्याबद्दल आभारी आहे.
नसल्यास निदान माझ्या बाबतीत गटार बंद ठेवत चला, काय?
तुमच्या पातळीवर उतरुन या वाक्यापुरता प्रतिसाद देण्याची माझी इच्छा नव्हती मात्र तुम्हाला समजेल असा प्रतिसाद देणे आवश्यक आहे. एक तर मूळ प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हता. त्यामुळे स्वतःहून गटारात तोंड बुचकळणे थांबवणे तुमच्याच हाती आहे. तुम्ही गटारजलप्राशन करु नये यासाठी मी काहीच करु शकत नाही. मी गटाराला घोड्या*पर्यंत नेऊ शकतो मात्र तो गटारात तोंड घालणारच नाही याची हमी देऊ शकत नाही. *येथे दुसरा प्राणी वापरता आला असता. पण ते एक असो.

एक साधा नियम आहे. जितकं तुमचं काम कॉमन, तितकी तुमची व्हॅल्यू कमी. प्रोग्रामर्स ढिगानं पडलेत. टेस्टर्स तर किलो ने विकले जातात. प्रॉजेक्ट मॅनेजर्सना सुद्धा वाईट दिवस आलेत. कारण ते फक्त मॅनेज करू शकतात. बाकीची स्किल्स विसरलेत. तेव्हा काय केल्यानं तुमची व्हॅल्यू टिकून राहील ते पहा. मग तुम्ही गाढवासारखं काम करायची गरज नाही आणि कोणी ते तुम्हाला करायला सांगायला धजावू शकणार नाही. बाकी हे सगळं करायला बराच अभ्यास करावा लागतो. नोकरी लागल्यावरही. त्यामुळे आयटी मधली नोकरी मिळवणे म्हणजे जीवनाची इति कर्त्यव्यता समजणार्‍यांनी सावध होण्याची गरज आहे.

काळा पहाड यांच्या मताशी सहमत ! यालाच इंग्रजीत employability असे काहीसे म्हंटले जाते ! माझे काही ज्ञानकण : माझे पहिल्यांदा प्रमोशन जेव्हा नाकारले तेव्हा बॉस ने समजूत काढताना सांगितले होते - १ तुला गणित किती येते / येते की नाही हे अजिबात महत्वाचे नाही , प्रश्नपत्रिकेत विचारलेली गणिते तुला सोडवता येतात का ? हे महत्वाचे ! तेव्हा बेटा मार्क कमावो...फिजूल टैम्पास छोड दो ! २. आपल्या कंपनीत कामासाठी सामान्य बुद्धीमत्तेचे अतिसमान्य लोक लागतात. तेच तेच काम पुन्हा- पुन्हा सांगितलेल्या पद्धतीने वर्षानुवर्षे करावी लागतात. तुझी हुषारी पाहीजे कुणाला ? आपण नासा मध्ये काम करत नाही .. आपल्याला कौशल्य नको , कामगार हवे आहेत ! ३. ४० वर्षाच्या करियर मध्ये प्रमोशन २-५ वर्षे पुढे -मागे झाल्याने काsssही फरक पडत नाही.. त्याचे ओझे घेऊन जगणे तर महामूर्खपणाचे आहे ! ४. तुलना नेहमी स्वतः शी करावी.तुलना करण्यासाठी ५ वर्षाचा स्प्यान वापरावा.आपण प्रगती केली आहे हे सहज ध्यानात येईल. आज २५ वर्षे नोकरी केल्यावर त्याचे फार चुकीचे नव्हते असे वाटते ! करियर वगैरे मृगजळ असते , तुम्ही पोहोचायचे तिथे आपसूक पोहोचताच ! अर्थात ज्याला सी ई ओ बनायचे आहे त्याला हे उपयोगाचे नाही !पण अर्थार्जनासाठी नोकरी करुन सुखाचे अन्य मार्ग हवे आहेत त्याने हा मूलमंत्र ध्यानी ठेवावा हा एक अगाऊ सल्ला !

@काळा पहाड - एकदम सहमत. हि गोष्ट केवळ आय टी मध्ये आहे असे नाही सर्व ठिकाणीच आहे. मी लोकांना नेहेमी सांगतो दर दहा वर्षांनी तुम्ही तुमचे कौशल्य वर नेले पाहिजे याचे कारण दहा वर्षात तुमचे स्पर्धक तुमच्या पातळीपर्यंत येतात आणि मग तुम्हाला केवळ स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी ढोर मेहनत करावी लागते.

जवळ जवळ सगळेच प्रतिसाद वाचनिय.. मिपावर इतकी अनुभवी मंडळी आहेत हे छानच.. आणि वेळ काढून तो अनुभव वाटतायत हे अजून छान.. असो, शेवटी इतकच म्हणेन की तुम्हाला तुमच्या वेळेवर हक्क हवा असेल तर तसे रिझल्ट देण्याची तयारी ठेवा. जसा आपल्याला आपला वेळ हवा असतो तसं आपल्याला हवं तसं (घरुन/ आपल्याला आवडत्या टॅक्नोलॉजीवर वगैरे) कामही हवं असतं, त्यासाठी थोडावेळ काढून स्वत:ला कायम अप्-टू-डेट आणि मार्केट मध्ये 'इन्-डिमांड' ठेवायला हवं. कॉंट्रेक्टींग आणि कन्सल्टींग ही दोन क्षेत्रे अशी आहेत की तुमचा स्वतःवर विश्व्वास असेल आणि तुम्ही खरंच अव्वल असाल तर पैसा, वेळ आणि कामाचं समाधान सगळं काही कमवू शकता. उदा. एक आयटी इंजिनिअर आठ महिने युस मधे कन्सल्टींग, चार महिने भारतात रिअल इस्टेट आणि मार्केट मध्ये गुंतवणूक, टेकिनकल अपडेट्स आणि ट्रेकिंग वगैरे छंद गेले काही वर्षे करत आहे. बॅचलर लाईफ मधे त्याने बरंच करुन ठेवलय आता सेटल झाल्यावर दोघेही विचारांनी ठरवतायत. थोडक्यात काय आपलं आयुष्य आपण मॅनेज करु शकतो, जर मनापासून ठरवलं तर नक्कीच! - उपास (पुण्यात स्थिरावतोय)

आत्ताच फोन आल्यानुसार भारतातला आमचा अजून एक मित्र गेला. सारखे प्रवास, दिवसरात्रीचा हिशोब नाही. फार वाईट वाटतय. गेली १० वर्षे भेटला नव्हता. आधी भेटला तेंव्हा त्याला नुकतेच बाळ झाले होते. तब्येतीकडे दुर्लक्ष केलेन् गेला! आम्ही हे इतकं अघोरी काम करत नसलो तरी नातेवाईक, मित्रमंडळींना त्रास होतो म्हटल्यावर आम्हालाही होतोच! त्याच्या बायकोला भेटल्यावर काय बोलावे हे समजत नाहीय. हळूहळू भारतवारी नकोशी वाटायला लागते.

मूळ धागा आणि प्रतिक्रिया फार छान आहेत. पूर्वी, कर्मचारी आपल्या पगाराबद्दल आणि एकंदरित कामाबद्दल सर्वसाधारण पणे समाधानी असायचे. कंपनी देखील स्टाफ कडून मिळणार्‍या कामाबद्दल समाधानी असायच्या. आता दोन्ही बाजूने अपेक्षा फार वाढल्या. पगारवाढ आणि बढती या बाबतीत कर्मचारी सदैव असंतुष्ट असतात. तर मल्टी टास्कींग च्या नावा खाली कंपन्या स्टाफचे सतत खच्चीकरण करत असतात. केलेल्या कामापेक्षा दिखाव्याला जास्त महत्व आले. दोन्ही बाजुने सामंजस्याची अपेक्षा आहे.