Welcome to misalpav.com
लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... असे ऐकली कथा अकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... लवंगी मिर्चीने रंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

तर मग ऐक परि, कथन करीन गद्यातूनि, ...

कथा ही एका लाल मिरचीची...

चार एक वर्षापुर्वीची गोष्ट... असाच एकदा एका किराणा मालाच्या दुकानात सामान आणायला गेलो होतो. गर्दी होती म्हणून बाहेर उभा असता नजर पडली एका सुक्या मिर्चांच्या पोत्याकडे. त्या तकतकीत मिर्च्यांच्या लाल चुटूक रंगाची मोहिनी मला पडली अन त्यातली एक सहज चाळा म्हणून मी खुळखुळ्यासारखी वाजवून पाहिली. मजा वाटली म्हणून वाण्याला माझ्या मालात त्या एका मिर्चीचा हिशोबही चुकता केला. घरी आलो. वाटले जरा नातीला खुळखुळ्यासारखे वाजवून खुष करेन. रात्री जेवणानंतर त्या मिर्चीला मी सर्वांना दाखवत म्हटले, ‘चला आता आपण एक खेळ केळू या. या मिर्चीत किती बिया असतील याचा अंदाज बांधायचा. दहा टक्के इकडे तिकडे चालेल. ज्याचा अंदाज अचुक येईल त्याला एक कॅडबरी बक्षीस.’ कागदावर जो तो लिहायला लागला. प्रत्येकानी डोके लढवले. कोणी 20 तर कोणी 30, कोणी 40, जास्तीत जास्त 50 पर्यंत अंदाज वर्तवले. नंतर ती मिर्ची फोडून बिया मोजता आम्हाला थक्क व्हायला झाले. त्यात तब्बल 80 बिया निघाल्या! अंदाज कोणाचाच बरोबर आला नाही पण यापेक्षा त्यातील बियांच्या संख्येने आम्हाला विचारात पाडले. मला वाटले या बिया आपण रुजवल्या तर? मग दुसऱ्या दिवशी मी एक गादी वाफा तयार केला. एका तरटाच्या पोत्यावर माती पसरली. थोडे शेणखत मिसळले. पाणी देऊन त्यात मन लाऊन सर्व 80 बिया पेरल्या. त्यांना रोज वेळेवर पाणी द्यायला लागलो. कधी सावली तर कधी उन्हं दाखवून रोपटी उगवायला लागली. पाहिले तर 80 पैका 40 बियांनी तग धरला होता. म्हणजे 50 टक्के मॉर्टॅलिटी रेट होता. होता होता त्या 40 रोपांनी तरारी दाखवली. आता रोजची निगा केल्याने ती दहा एक इंचांची झाली. वाटले आता या रोपांना असे न ठेवता कुडयात ट्रान्सप्लांट करू या. दहा कुंड्या आणल्या. त्यात खाली दगडावाळूवर एक थर नंतर त्यावर पालापाचोळा मग लाकडाचा भुस्सा व भाताची तुसे वर शेणखताचा थर व नंतर काळ्यामातीने कुंड्यांना तयार केले. प्रत्येकात 4 रोपांची लागवड केली आणि रोजच्या रोज पाणी, उन दाखवत ती रोपे आमच्या गच्चीत वाढायला लागली. काही वाचीव तर काही ऐकीव माहितीनुसार कीटकनाशकाची फवारणी, खते, नियमित पाणी व देखभाल यामुळे रोपांची वाढ यथायोग्य होत होती. असे दहा महिने गेले. एके दिवशी रोपांना फुलोरा आला. पांढऱ्या रंगाच्या फुलांनी रोपे डवरली. पुढे काही दिवसांनी त्या फुलातून इवल्या इवल्या मिर्च्यांची फूट दिसायला लागली अन पाहता पाहता मिर्च्यांनी झाडे डवरली. पहिल्या तोडीत सव्वा दोन किलोच्या मिर्च्यांचे पीक आले! पुढे आणखी तीन तोडीत एकूण दहा किलो पर्यंत तोड गेली! मजा म्हणून सहज लावलेल्या एका मिर्चीतून दहा किलो मिर्च्या निर्माण झाल्याचे पाहून निसर्गाच्या अदभूत लीलेपुढे नतमस्तक होत... वंदन केले... अशी ही एका लाल मिर्चीची गोष्ट... बंधो, शशी, तुझ्या उत्साही प्रोत्साहनामुळे पुन्हा कथन करायला मला हुरूप आला. तू कथन मोबाईलवर टेप करून असे सादर करशील असे वाटले नव्हते !...

संकलनः – शशिकांत ओक... कथनकार :- चुलत बंधू प्रकाश ओक.

प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

प्रयोग आवडला. ज्या भाज्या गॅलरीत कुंड्या ठेवून तयार करता येतील त्या करण्याची हौस आणि इच्छा मलाही आहे. अजून प्रयत्न नाही केला पण जरूर करणार आहे. लवंगी मिरच्या, भोपळी मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पाती कांदा, पाती चहा, वांगी, फरसबी इ.इ.इ. भाज्या पिकविण्याचा प्रयत्न करायचा आहे.

एका चे शंभर करुन देणारा तो जगात एकच वेडा आहे, व सगळे शहाणे (निम, दिड व पुर्ण) तोंडात सिगारेटचा धुर काढत विचारतात की देव कुठे आहे?

[सदर धाग्याशी थेट संबंध नसलेला प्रश्न विचारयचा मोह होत आहे. काहीसे विषयांतर असल्याने क्षमस्व] मी मध्यंतरी ebay वरुन चंदनाच्या बिया विकत घेतल्या, काही बिया पेरुन रोपटे बनविण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. मग काही बिया शेती करणार्‍या एका नातेवाईकास दिल्या. त्यांनी त्या स्वीकारल्या मात्र ते म्हणाले की "चंदनाची रोपे अशी येत नाहीत, या बिया पक्षांनी खावून नंतर त्यांच्या विष्ठेवाटे जमिनीत मिसळल्या गेल्या तरच त्यांची रोपे येतात" हे खरे आहे काय ? असल्यास याला काही पर्याय देखील आहे का ? म्हणजे पक्ष्यांच्या पोटात जावून विष्ठेतून बाहेर येताना त्या बियांवर जी काही रासायनिक/जैविक प्रक्रिया होत असेल ती कृत्रिमरीत्या घडवून आणणे शक्य आहे काय ?

तुम्हाला एवढा उत्साह आहे तर मग बाकी पण अनेक लहान लहान रोपं लावता येतील.. कोथिंबिर, गवती चहा, कढीपत्ता वगैरे.. फुलझाडं तर किती तरी लावता येतील.. नक्की करा आणि आम्हाला सांगा माहिती...

प्रशंसनिय उपक्रम. यात मुलांना खूप मजा आली असणारच पण त्या बरोबर त्यांचे खर्‍या अर्थाने जीवनशिक्षण पण झाले ! अशीच खिडकीत ठेवलेल्या वाळूच्या ट्रेमध्ये मेथी उगवून छोट्या कुटुंबासाठी ताजी भाजी पिकवता येते. आमची खिडकीतली भाजीपाला शेती... आणि हे अंतिम उत्पादन ...

१. सुपरमार्केटमध्ये मिळणार्‍या फळांचे (किंवा इतर प्रकारचे) छिद्रे नसणारे प्लास्टीकचे ट्रे वापरावे. २. बारीक रेती थोडीशी घुवून स्वच्छ करून त्यात भरा. ३. मेथीचे दाणे वाळूत पसरून त्यांना वाळूने वरवर झाकून टाका. ४. वाळू नीट ओली होईल पण ट्रेच्या तळाशी पाणी साचणार नाही इतपत पाणी टाका. ५. वरच्या इतकेच पाणी सतत राहील असे पाणी देत रहा. उन्हाळ्यात रोज तर हिवाळ्यात (किंवा एसी असल्यास) दोन दिवसातून एकदा पाणी घालावे लागेल. मात्र तळाशी पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या, नाहीतर दाणे / रुजलेल्या दाण्यांची मुळे कुजतात. ६. हवामानाप्रमाणे ७ ते १० दिवसात फोटोत दाखविल्याइतकी मोठी मेथी वाढते... मला अश्या कोवळ्या मेथीची भाजी जास्त आवडते. मेथी पाण्यात साफ घुवून कोरडी करून प्लास्टीकच्या पिशवीत अर्ध-हवाबंद करून फ्रिजमध्ये ठेवल्यास पाच-सहा दिवस छान राहते. स्वतंत्र भाजी तर करता येतेच पण थोडीशी ताजी मेथी इतर भाज्यांत कुस्करून टाकल्यास मस्त युम्म स्वाद येतो.

असेच म्हणतो. मेथी मस्तच दिसतेय.

अहाहाहा...!!! नक्की करुन पाहीन आणि तुम्हाला कळवेन.. गुरुदक्षिणा म्हणुन हवं तर पहिली मेथीची जुडी तुम्हाला कुरिअर करेन!!!

शुण्याचा भागाकर करत बसण्यापेक्षा एखादी छानशी फुलबाग लावावी... काय सहज पण अफाट तत्वज्ञान होतं पु.लं.च त्याचीच आठवण आली.

ते सगळं ठीक आहे हो, पण त्या लाल मिरचीच्या बिया रुजवून आलेल्या झाडांना हिरव्या मिरच्या लागल्या की लाल ते नाही सांगितलंत.

मिरच्यांच्या पण 'पट्ट्या' असतात का? असल्यास त्यात पाहून बिया किती हे सांगता आलं नसतं का.

आम्ही खूप जुने जरीहि नसलो, नाही तरीही नवे | अज्ञाचे परि सांगणे नच लगे, हे तो कळाया हवे ||

मृगनयनी जी, काहींना नाडीच्या मिरचीचा झटका बसला आहे. ते फोटो बद्दल नाव काढत नाहीत. काहींना नाडीच्या विषयाचा खाट नाकाच जाऊन सारखा उबळ आणतो असे दिसते आहे. काही हरकत नाही. निदान पुर्व लेखनाचा प्रभाव किती प्रखर आहे याची अशी सहज प्रचिती येते