Welcome to misalpav.com
लेखक: मित्रहो | प्रसिद्ध:
हा काही लय भारी किंवा टाइमपासचा रिव्ह्यू नाही. तसेही या शिर्षकाचा आणि खालील लेखाचा काही संबंध नाही. मागे एकदा बहुदा महेश माजरेकरांनीच म्हटल्याचे आठवते मराठी सिनेमा हा कंटेन्टवर चालतो. मराठी सिनेमात कंटेन्ट फार महत्वाचे असते. हे खरेच होते. श्वास नंतर मराठी सिनेमाचा प्रवास बघितला तर हेच दिसते. श्वास कधी कोणी अरुण नलावडे किंवा अमृता सुभाष साठी बघायला गेले नाही तर एक वेगळा विषय आणि त्याची वेगळी मांडणी हे त्याचे मुख्य आकर्षण होते. ऑस्कवारी हे जरी एक कारण असले तर त्याचा विषय आणि त्याची सामान्य प्रेक्षकांना पचेल अशी मांडणी हे प्रमुख कारण होते. त्यानंतर अग बाइ अरेच्चा, वळू, देउळ, शाळा, काकस्पर्श, नटरंग, बालगंधर्व, बीपी या साऱ्या चित्रपटात तेच दिसून आले. त्यात कधी आम्ही शिवाजी राजे भोसले बोलतोय किंवा दुनियादारी पण येउन गेले. त्यात पण काही प्रमाणात का असेना विषयाचे किंवा मांडणीचे नावीन्य होते. मराठी चित्रपट आवडायचे दुसरे कारण होते ते त्याचे बॉलीववूडच्या चित्रपटापेक्षा असनारे वेगळेपण. विषयाची संवेदनशील हाताळणी. एकच विषय पण बॉलीवूड आणि मराठीत वेगळ्या प्रकार हाताळला गेला. उदाहरणच द्यायचे झाले झाले तर तू तिथे मी चे देता येइल. त्याच विषयावर बागबाण हिंदीत आला होता. कुण्याही मराठी माणसाला बागबान पेक्षा तू तिथे मीच जवळचा वाटला कारण विषयाची संवेदनशील हाताळणी. बॉलीवूड मधे शंभर करोड, दोनशे करोडच्या नावखाली जो तमाशा चालला आहे त्यात मराठी माणसासाठी मराठी सिनेमा हे एक आशास्थान आहे. आता मात्र हे चित्र बदलनार असे दिसते. टाइमपास मधे काय होते, किशोरवयीन मुलांची प्रेमकथा आणि चटपटीत संवाद. मी लय भारी बघितला नाही पण त्याचे कथानक वाचून आणि त्याचे प्रमोज बघून एक गोष्ट नक्की हा म्हणजे अगदी कट टू कट कमर्शियल चित्रपटाचीच कथा आहे हे जाणवते. चित्रपटाच्या टीमचे याबाबतीत कौतुक की ते हे पूर्णपणे कबूल करतात की हा कट टू कट कमर्शियल सिनेमा आहे. निरर्थक कहानी आणि त्याला जबरदस्त मार्केटींगची जोड. झी टीव्हीने चित्रपटाच्या मार्केटींगमधे कोणतीच कसूर ठेवली नाही. दर मिनिटाला लय भारी कानावर पडत असते. मॅनेजमेंटमधे असे म्हणतात की जेंव्हा दोन प्रॉडक्टच्या गुणवत्तेत फारसा फरक असत नाही अशा वेळेला मार्केटींगवरचा खर्च जास्त असतो. उदा. कोका कोला किंवा पेप्सी. दिवसेंदिवस जर असा मार्केटींगवरचा खर्च वाढत गेला तर गुणवत्तेत घट होत जाणार हे नक्की. खरेच मराठी प्रेक्षकाला हे हवे आहे का? व्यावसायिक दृष्टीतून विचार केला तर असे दिसते की मराठी चित्रपटाचा टॅम(Total Addressable Market) हा हिंदीपेक्षा एक चतुर्थांश किंवा त्याहीपेक्षा कमी आहे. तेंव्हा मराठी चित्रपटाचे बजेट सुद्दा हे त्याप्रमाणेच असायला हवे. त्यात वाइट वाटण्यासारखे काही नाही हिंदीचा पण हॉलीवूडबाबत हाच प्रॉब्लेम आहे. त्याचमुळे आपल्याकडे सध्यातरी ग्रॅव्हीटी बनवता येत नाही. एक ते तीन करोडचे बजेट आणि दहा ते बारा करोडचे कलेक्शन हे माझ्या दृष्टीने मराठी चित्रपटांना चपखल बसनारे गणित आहे. (हा आपला एक प्रेक्षक म्हणून अंदाज, माझा तसा काही संबंध नाही.) कधी लॉटरी लागली तर पंचवीस ते तीस करोड. धंद्यातला साधा नियम बजेट जर कमी असेल तर ते नेहमी उत्पादनाच्या गुणवत्तेवर खर्च करायला हवे मार्केटींगवर नाही. महत्वाचा प्रश्न असा आहे मराठी प्रेक्षकांना खरेच संपूर्ण कमर्शियल सिनेमा हवा आहे का? दोनचार वर्षातून एखादा असा चित्रपट ठीक पण उद्या हाच जरा ट्रेंड बनला तर मग मराठी चित्रपट का पाहावे? जे बॉलीवूडमधे दिसते तेच जर का मराठीत दिसनार असेल तर मराठी चित्रपट का पहावा. मराठी माणसाला हिंदी समजण्यात फारशी अडचण येत नाही. मराठी चित्रपटांनी पैसे कमवू नये किंवा मार्केटींग करु नये असे नाही उलट दर वेळेला ते मल्टीप्लेक्स सोबतची भांडणे बघितले की वाटते परिस्थिती अशी हवी की मल्टीप्लेक्स वाल्यांनी स्वतःहूनच हिंदीएवजी मराठी सिनेमे लावेत. असे दिवस नक्की येतील. आज प्रश्न असा आहे की शेवटी मराठी चित्रपटांसठी काय योग्य आहे? थ्री इडीयट, रंग दे बसंती? की चेन्नै एक्सप्रेस? मित्रहो http://mitraho.wordpress.com/
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अगदी योग्य मुद्दा मांडला आहात.
जे बॉलीवूडमधे दिसते तेच जर का मराठीत दिसनार असेल तर मराठी चित्रपट का पहावा?
अगदी बरोबर. मराठी चित्रपटाकडून तशी अपेक्षा नाहीच!
एक ते तीन करोडचे बजेट आणि दहा ते बारा करोडचे कलेक्शन हे माझ्या दृष्टीने मराठी चित्रपटांना चपखल बसनारे गणित आहे. (हा आपला एक प्रेक्षक म्हणून अंदाज, माझा तसा काही संबंध नाही.) कधी लॉटरी लागली तर पंचवीस ते तीस करोड. धंद्यातला साधा नियम बजेट जर कमी असेल तर ते नेहमी उत्पादनाच्या गुणवत्तेवर खर्च करायला हवे मार्केटींगवर नाही.
अगदी सहमत . उगाच मोठमोठ्या आकड्याना भुलून डबडा कमर्शियल बॉलिवुड स्टायिल सिनेमे अजिबात नकोत!

सहमत!.. पिक्चरमध्ये "तन्टा नाय तर घन्टा नाय" (लेखक- सन्तोष पवार) .. या वारंवार म्हटल्या जाणार्या सुविचाराचा अर्थ अजून समजत नाही... की उगीचच??? प्राची'ला गच्ची जोडून यमक जुळवण्याचा क्षीण प्रयत्न!!!! :)

>>> (लेखक- सन्तोष पवार) हा एवढा कसा खालावला? टायमिंगवाले डायलॉग तर यु एस पी होता त्याचा. यदाकदाचित, जाणून बुजून आणि बरीच नाटकं होती की. त्याबरोबर नवरा माझा नवसाचा चे डायलॉग्ज नि अशोक सराफचं टायमिंग भारीच्च.

तन्टा नाय तर घन्टा नाय जर (स्वताच्या हक्कांसाठी) भांडला नाहीत तर घंटा तुम्हाला काही मिळणार नाही. "नडाल तर घडाल, नाहीतर आहे तिथेच पडाल" हे माझे वर्जन हा :)

वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट यावेत ही अपेक्षा चूक नाही. पण काही चित्रपट चित्रपटाच्या कॅनव्हासला विषय लायक नसतानाही उगीच वेगळी वाट म्हणून निवडण्यात काही अर्थ नाही. वेगळा विषय व व्यावसायिक चित्रपट यांचे मिश्रण असलेले बिनधास्त व कायद्याचं बोला असे चित्रपट पुन्हा पहावेसे वाटतात.

वेगळा विषय हवाच हा आग्रह नाही. निदान माडणी तरी वेगळी हवीय. थोडक्यात काय चित्रपट फक्त गल्लाभरु नको निदान मराठी तरी. गल्लाभरुची लाट आली की तोच फार्मुला सतत वापरला जातो. मराठी सिनेमाचा इतिहास तेच सांगताे.मग कोणी दुसर नवीन करायला धजत नाही. बिनधास्त आणि कायद्याच बोला बद्दल पूर्णपणे सहमत. बऱ्याचदा चांगला दिग्दर्शक चित्रपटाच्या कॅनव्हासच्या न वाटनाऱ्या विषयावरही सुंदर चित्रपट बनवतो. वळू, एका वळूवर चित्रपट तोही यशस्वी. लगानच्या आधीचे क्रिकेटवरचे चित्रपट बघा, बघावसे वाटत नाही. मला सुरवातीला लगानचा विषय हा चित्रपटाच्या योग्य नाही असेच वाटले. चित्रपट बघितल्यावर मत बदलले.

लय भारी सिनेमाची कथा काय आहे? अभिनय कसा केलाय वगैरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही इतका नकोसा वाटला. लेखकाशी काहीशी सहमत.

हा एका चित्रपटाविषयी नाही आहे. असा एखादा चित्रपट कधीतरी येतो पण उद्या जर का यालाच योग्य मानून चित्रपट बनू लागले तर काय? मराठी सिनेमात नवीन असे काय?

दोनचार वर्षातून एखादा असा चित्रपट ठीक
काळजी करु नका. हेच होईल... असा सिनेमा दोन चार वर्षातुन एखादाच येईल. मी लई भारी पाहीला. किंबहूना भरलेल्या थिएटर सोबत एंजॉय केला. "लई भारी" चा विषय, कथा किंवा पटकथा फार खास नाहितच. 'कट-टू-कट कमर्शियल' सिनेमाची मराठीला गरज होतीच. हे मराठी सिनेमाचे शक्तीप्रदर्शन आहे. सलमानच्या सिनेमाला मिळतो तसा प्रतिसाद, तशा शिट्या , टाळ्या मराठीतही कुणाला मिळत आहेत तर ते चांगलेच आहे. आणि मुख्या म्हणजे हे 'कट-टू-कट कमर्शियल' गणित अगदी मराठमोळे आहे आणि फार छान जमलेले आहे.

दोनचार वर्षातून एखादा असा चित्रपट ठीक
काळजी करु नका. हेच होईल... असा सिनेमा दोन चार वर्षातुन एखादाच येईल. मी लई भारी पाहीला. किंबहूना भरलेल्या थिएटर सोबत एंजॉय केला. "लई भारी" चा विषय, कथा किंवा पटकथा फार खास नाहितच. 'कट-टू-कट कमर्शियल' सिनेमाची मराठीला गरज होतीच. हे मराठी सिनेमाचे शक्तीप्रदर्शन आहे. सलमानच्या सिनेमाला मिळतो तसा प्रतिसाद, तशा शिट्या , टाळ्या मराठीतही कुणाला मिळत आहेत तर ते चांगलेच आहे. आणि मुख्या म्हणजे हे 'कट-टू-कट कमर्शियल' गणित अगदी मराठमोळे आहे आणि फार छान जमलेले आहे.