Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
मागिल भाग.. आणि मी रिक्षाच्या मागच्या खिडकितून..कवाडीच्या दारातून आमच्या रिक्षाकडे पहात असलेल्या काकूचं स्तब्ध मनानी दर्शन घेत राहिलो...रिक्षा पुढे निघाली..पण घर येइस्तोवर,माझी मान खाली होती..आणि डोळे ओलेचिंब. पुढे चालू... ========================== घरी येऊन दोन दिवस झाले,तरीहि माझ्या मनावरून पाठशाळेच्या आठवणी काहि केल्या सरत नव्हत्या. गोठ्यात गेलो,तर आमच्या गायीच्या ऐवजी तिथली तांबू आठवायची. वाडित तर जाऊच शकत नव्हतो..तिकडे मला किश्या ,जयराम , आणि सगळ्यांच्या आधी तो हलकट सुर्‍या छळायला यायचा. यामुळे रडायला आलं,तर काकुच आठवायची. शेवटी हा सगळा प्रकार सखराम काकाच्या निसर्गदत्त चाणाक्षपणाला नजरेस आला नसता..तर तो माझा काका कसला? मग संध्याकाळी मला त्यानी गाठलं..आणि आमच्या गावातल्या त्या येश्टीश्टॉपवरच्या ,त्या श्टॉप इतक्याच प्राचीन चहा चिवड्याच्या हाटेलात घेऊन गेला...आणि शिस्तित माझी शाळा घ्यायला सुरवात केलिन. काका:- "आत्मू...आता काय करायचं मनात आहे रे तुझ्या...? नै म्हंजे शाळा तर संपली ना आता?" मी:- "आता मी भटजीगिरी करणार..पण तुझ्यासारखी पार्ट टैम नै कै...फुल टाइम." काका:- "ह्हा.. ह्हा.. ह्हा.. ह्हा.. ह्हा...., ते कळलं हो महानुभव! पण कुठे? आपल्या कडे काहि गावं-नाहियेत..कारण आपण परंपरागत भट नव्हे.." मी:- "पण तुझ्या ओळखि आहेत ना!?" काका:-"हम्म्म..पण त्या माझ्यासाठी आहेत. आपले काय?" मी:- "............." काका:- "आपले आपण कमवून खायचे असते हो आत्मारामपंत....आता वय काय आपलं? आपणास वाटणारं? सांगा?" मी:- "ऊं...........काका???? वाटणारं काय रे? असणारं म्हण!" काका:- "ह्या ह्या ह्या... म्हणजे तुला वय आहे का?????" मी:- "आंsssssss ( :-/ ) मी नाय ज्जा!!!" काका:- "अरे आत्म्या...उद्या तुझ्या उखडेल बापसानी "कमव काहितरी नाय तर हो बाहेर घराच्या"-म्हटलन...तर काय करशील? काहि विचार केलायस का?" मी:- "क्ल!!!!!" काका:- "मग आता तुझी रवानगी त्या सदाशिवाच्याच हताखाली..दोन तीन वर्षं कर हमाली त्याच्याकडे. मग पुढे सरकशील आपोआप...मी आज रात्री फोन लावताय हो त्याला.मग पर्वापासून तो बोलवेल तिकडे जायचं...आणि सांगेल ते काम निमूटपणे करायचं. काय?" मी:- "चालेल...चालेल..!" काका:- "हम्म्म्म...पण तो बोलावेल-तिकडे जायचं...पाठशाळेकडे फिरकलास तर बघ हो...माझ्याशी गाठ आहे." मी:- "........." काका:- "हम्म्म..चला ,तो चिवडा संपवा आणि उठा आता.." मग ठरल्याप्रमाणे, पुढे मी सदाशिवदादा बरोबर भिक्षुकिस जायला लागलो. त्याच्याबरोबर कामाला इतकी मज्जा यायची की तो पैसे किती देणार वगैरे प्रश्न त्यावेळी (सुरवातीला..) माझ्या मनाला पडले देखिल नाहीत. एकतर त्याच्या हाताखाली काम शिकणं ही माझी दुसरी पाठशाळाच होती.शिवाय त्याचा स्वभावंही हळूवार वगैरे नव्हता.एकदम पाण्यात मधेच फेकून द्यायचा मला तो.आणि काठावरून शिव्याही घालायचा. पण मला त्यामुळे अतिशय भराभर तयार व्हायला मिळत असल्यानी मी (काकाच्या सल्ल्यानुसार..) त्याकडे दुर्लक्षच करित होतो. शिवाय कामांच्यावेळी मिळणारा मान आणि माझ्या मंत्र ठणकावायच्या पद्धतीमुळे..आवाजामुळे..स्तोत्र गायनामुळे होणारं कौतुकंही मला एखाद्या इंधन संप्रेरकासारखं मदत करत होतं. पहिलं वर्ष दिडवर्ष तर अगदी नकळत आणि झर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्कन निघून गेलं. मला झालेल्या प्राप्तीतून सखारामकाकानी..घरच्यांना पटवून मला एक सेकंडहँड गाडीहि घेऊन दिली..ति ही माझ्या अगदी आवडिची. त्यामुळे कामातही वेग आला. शिवाय मी कधिकधी आमच्या पंचक्रोशीत जमलेल्या व्यवसायातल्या नव्या भटजी मित्रांसह बाहेरगावी कामांना त्याच गाडिवर जाऊ लागलो. आणि एक दिवस.... मु.पो. पांजुरपे... या गावी मी आठवड्याभराच्या एका कामाला गेलो. कार्यक्रम होता महारुद्रःस्वाहाकार! मायला...अत्यंत घाम काढणारं काम. पण तरिही सदाशिवदादाच्या नियोजनामुळे त्यातंही मजा यायला लागली होती. साधारण चवथा दिवस होता.आणि त्या दिवशी त्या यजमानाचे मुंबईचे कोणी आध्यात्मिक गुरुमहाराज तिकडे येणार होते. सदाशिवदादानी माला आदले दिवशीच सांगितलं होतं.. "आत्मू...उद्या नागेंद्रहाराय त्रिलोचनाय..आणि नृत्यत्यद्भुत तांडवनृत्यं... हे शेवटाला अगदी ठणकाऊन झालं पाहिजे हां..! ते महाराज प्रसन्न व्हायला पाहिजेत अगदी..काय???". यातलं पहिलं वाक्य मला कळलं,पण दुसर्‍याचा अर्थ काहि लागे ना. मग आमच्या मधल्याच एकानी मला त्याचा अर्थ नीट समजावला रात्री ...मी ही तयार अवस्थेतच झोपलो मग. तो दिवस उजाडला आणि सकाळी ७ ते १२ आमचा नित्य स्वाहाकार(यज्ञ..) अगदी जोसात पार पडला. शेवटी मुख्य देवतांसमोर (यज्ञासमोर मांडलेल्या देवदेवता..) आरती..मंत्रपुष्प झाला,आणि मी शेवटच्या प्रार्थनांमधे (माझ्या फेवरीट) मध्यमस्वरातून...सुरु-झालो. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय..भस्मांङगरागाय महेश्वराय.. पण पहिले दोन श्लोक झाले,तरी माझी गाडी का कोण जाणे? लयंच घेइ ना! माझी एक ओळंही अचानक-पडायच्या बेताला आलि होती..पण तेव्हढ्यात गर्दीतून एका मंजूळ स्त्रीस्वरानी मला अगदी अलगद उचललं. आणि मी.., 'हे कोण?' वगैरे काहि कळण्याच्याही आधी इतका पटकन त्यात समरसून गेलो,की मी ते स्तोत्र आणि पुढील (वीरंरसातलं..) नृत्यत्यद्भुत ताण्डवनृत्यं...सदाशिवो नटराजोSयम्.. असं काहि दणकावलं म्हणता की ते महाराज आणि बाकि जमलेली मंडळी त्यात न्हाऊन निघाली. मलाही स्वतःला हा चमत्कार कसा झाला..?,ते काहि केल्या कळे ना! पण त्याचा छडा लागला..तो आमच्या त्यादिवशीच्या दुपारच्या जेवणानंतर..पानाबरोबर रंगणार्‍या गप्पांमधे. एक तर मला त्यादिवशी ते स्तोत्रगायन झाल्यापासून आमच्यातलीच एक/दोन जण अशी माझ्यावर जळून लाल का झाली आहेत?- हे कळत नव्हतं.आणि त्यात बाकिचे उरलेले माझ्याकडे पाहून, कोणी खौटपणे तर कोणी गालातल्या गालात हसत का होते...? ( :-/ ) त्याचाही मला उलगडा होत नव्हता. शेवटी , हे सारं कळलं..ते माझ्या त्या दोन वर्षातल्या अगदी जिगरी यारी झालेल्या एका बिलंदर माणसाकडून..! (आशीssष..हे त्याचं, त्याच्याच उच्चारानुसार..नाव!) मला गप्पांमधून हळूच खोपच्यात घेत तो म्हणाला.. आशीषः- " आहो श्रीयूतं आत्मारामपंत..जरा हिकडे या" मी:-(उखडून..) " क्का..य? .,आणि श्रीयुत काय म्हणतोस? मी काय गुप्त विवाह केलाय का रे ?" आशीषः- ( ह्या ह्या हूक्क..) " केला नैस..पण आता होणार आहे!" मी:-" क्का.....................................य??????, आशीष महाराज...लवकर सांग हो..काय ते!" आशीषः- (पुन्हा..तेच विचित्र 'ह्या ह्या हूक्क..' हसून.. तो प्राणी बोलता जाहला) "आत्मु..तुला कळलं का तुझ्या साथिला कोण आलं होतं ते!?" मी:- "नाहि..असेल कोणीतरी! त्यात काय एव्हढं?" आशीषः- " कर्म माझं.. खरच आत्मू...आज पटलं मला, 'ज्याला नाही भूक,त्याच्याच पायाशी सुख!' ..हीच निसर्गाची खरी किमया आहे." मी:- "मारीन हं मी आता..लवकर सांग!" आशीषः- " अरे गाढवा..तुमच्या पलिकडल्या गावातली ती सत्छील यमुना माहित नाही का रे तुला?" मी:-"नाही." आशीषः- " हे दृष्टीहीन अंध माणसा!..खरच,कसं होणार रे तुझं?" मी:- "होइल कसंही...आता कोण ते सांग? नै तर निघून जाइन मी इथून.." आशीषः-(कपाळावर हात अपटत..) "अरे ती वैजयंती ..पडगावकरांची ..तुझी आईस तिला वैजू म्हणते ना...ती" मी:- " हो का?... बरं मग? त्याचं काय?" आशीषः- "आत्मू आता मी मारीन हं तुला.गाढवा.. सगळच समजवायला , तुझा काका लागतो काय रे तुला?" मी:- " आयला...असं काहितरी आहे होय ते...पण मी तर तसं काहिच केलं नाय रे सकाळी..उलट मला चांगला सूर सापडवून दिला..म्हणून मी खरतर एक नमस्कार त्या शंकरालाच केला..." आशीषः- " अरे आत्म्या...तो शंभूही उखडेल तुझ्यावर,की काय बुद्धी दिलीये माझ्या कार्ट्यानी याला...म्हणून! आत्म्या..अरे ती फिदा झालीये तुझ्यावर.आंम्ही पहिल्या दिवसापासून अंदाज घेतोय.तो आज प्रत्ययाला आलाय..आणि तू अजुन आपला ह्याच्यातच " मी:-???? आशीषः- "अरे ती मगाशी जाता जाता गाणं कोणतं गुणगुणली ठाऊक आहे का काहि...?" मी :- "नाय रे" आशीषः- "लाजर्‍या कळीला भ्रमर सांगतो काही..मी लाज लाजुनी लालस झाले बाई.., ह्यात काय ते समज...!" मी:- ".............. काय?.....समजू???" आशीषः- "राम..राम..राम. अरे.., 'लालंसं' - म्हणजे काय? काहि ठाऊक आहे का?" मी:- "पण गाण्यातलं सगळंच्या सगळं..जसंच्या तसच माणसाच्या मनात असतच..,असं कशावरून ???" आशीषः- "ते माहित्ये हो वादविवादपटू.पण भावना तर सारखी असतेच ना?" मी:- "हो!" आशीषः-"नशिब त्या पोरिचं..एव्हढं तरी कळतय तुला ते" मी:-"मग आता मी काय करू रे???" आशीषः- (वैतागून..) "त्या पेटलेल्या होमकुंडात उडी मार...ज्जा!" मी:- "खरच!???" आशीषः-"अरे बाळ आत्मू..इथुन जाइपर्यंत ती एकदा तरी तुझ्याशी कारण काढून बोलेल..तेंव्हा तू ही बोल पुढे जरा.. बावीसं वर्षीय तरूण माणसा सारखा!..नायतर तत्वज्ञ जागा होइल तुझ्यातला..तिथेही!" मी:-"बरं!....पण आशिष..तू अत्ता जाऊ नकोस रे कुठे.मला- कसंतरि कसंतरि..व्हायला लागलय." आशीषः- " ह्या ह्या ह्या ह्या...अगदी शेवटाला सुरु झालास रे आत्मू...तुझ्या सवयीप्रमाणे! आता मी नाहि.आता तुझ्या साथिला आलाच,तर तोच येइल.. शिवंशंकर!" हा हलकट आश्श्या...मला एकट्याला सोडून तिकडे गेला खरा.पण मला नंतर खरच सारखा त्या शंकर-सांब-सदा-शिवाचा चेहेराच त्याच्या जागी दिसायला लागला. एकतर त्या घटनेचा अर्थ मनात प्रतीत होत होताहि,आणि नव्हताही. अंतर्मनाला कसलातरी भयंकर थरकाप सुटत होता.आणि तश्यातच ती बया ओढणी खोचून,जेवलेल्या केळीच्या पानांचा भारा तिकडे मागे गाईंसमोर टाकायला आली. आणि माझ्या थरकापाचं एका अनामिक भयात रुपांतर झालं. पाय तिथेच जमिनीला घट्ट चिकटून बसले. आणि येता येता परत ती माझ्या दिशेने येत आहे हे पाहिल्यावर तर धरणीमायनी मला गिळलन तरी चालेल अशी भावना मनात यायला लागली. माझ्या अगदी समीप येऊन तिनी मला... ती:-" आवाज छान आहे हं तुमचा..अत्तिशय प्रसन्न वाटलं सकाळी ते सगळं ऐकताना!" मी:- "....................................................................... हो का?" ती:-(मनातल्या मनात हसत..)" हो!!!" मी:-" मग परत म्हणू का आता!?" ती:-" (पुन्हा जोरात हसत..) "नको..आता फक्त 'धन्यवाद!' म्हणून दाखवा." मी:"धन्यवाद!" ती:-"...(हसत हसत तशीच अदृष्य...) .........." त्या मागच्या अंगणापलिकडून वाडीतून (आशीषनी काडी लाऊन जमविलेली..) माझी दोस्त मंडळी बेफाम म्हणजे बेफाम हसत होती. मी मात्र सदर प्रसंगानी मनातून सुखाऊ लागलो होतो. आणि एकिकडे, हे सगळं ह्या आश्श्या'चं कारस्थान असेल्,म्हणून शंकाहि घेऊ लागलो होतो. तिथून मग मी जो निघालो..तो एकटाच गुमसूम होऊन. त्या वाडीतून मागे गेल्यावर लागलेलं जे केवड्याचं वन होतं...तिकडनं थेट गेलो..,ते त्या वनामागे डोंगरपायथ्याला असलेल्या असुरेश्वराच्या देवळात. जाईपर्यंत संपूर्ण आयुष्य बदलत असल्याचा भास होत होता..आणि आता डोळ्यांसमोर त्या शंकरा ऐवजी वैजयंतीचा चेहेरा येत होता. मन.. तिनी गुणगुणलेलं गाणं संपूर्ण आठवून..आपोआप म्हणायला लागलेलं होतं. शरीरामधे आलेल्या अनामिक भयाची आणि थरकापिची जागा, एका निश्चित शाश्वत आशेनी घेतली होती. आणि समोर ते शुभ्र देवालय कधी आलं याचा पत्ता देखिल लागला नाही त्या चालंण्यात!. खरच त्या देवालयाचं रूप ,म्हणजे त्या असुरेश्वराच्या अस्तित्वाची सहभागिताच होती जणू..दाट झाडीमधे आणि काहिसं खोलात मधोमध होतं ते देवालय...समोर एक छोटा नंदी...त्या समोर त्या संगमरवरी देवालयाच्या काहि मोडलेल्या परंतू त्या लालमातीतंही आपलं शुभ्रत्व दाखविणार्‍या पायर्‍या..आणि आत तो खोल विस्तीर्ण गाभारा...त्या देवळामागे त्याच डोंगरातून वहाणार्‍या एका निर्झराचा झुळकणारा मंद आवाज..तो ही तेथल्या शांततेचा सहभागी'च! हे मंदिर पेशवेकाळातल्या कोण्या एका सरदाराने काहि नवस बोलल्यामुळे बांधलेलं होतं. अशी आख्याइका होती. तसे आंम्ही रुद्रस्वाहाकाराच्या पहिल्या दिवशी यजमानाकडून संकल्पा'ला-याच देवळात आलेलो होतो. तेंव्हापासूनच माझ्या मनाला या वास्तूनी मोहुन टाकलं होतं. घरी जाण्यापूर्वी,इथे निश्चित पुन्हा एकदातरी यायचच., असा संकल्प मि ही करून बसलेलो होतो. आणि तो मनःसंकल्प, आज हा असा सकारण सहज सिद्ध होत होता. मी त्या असुरेश्वरासमोर जाऊन ध्यानस्थ बसलो खरा.परंतू ध्यानात-जे मनात होतं -तेच दृष्टीला येत होतं. तो शंकर समोर असूनंही माझ्याकडे पाठ फिरवत होता. यावेळी मात्र मी मनाशी असा ठाम निश्चय केला,की काहिही झालं,तरी काकाश्रींना -हाक मारायची नाही. आणि खरच तसं झालं. पुढचे काहि क्षण सरताच त्या झर्‍याची ती पार्श्वलय मनाशी रुंजी घालू लागली..आणि प्रकटपणे माझ्या मुखातून, "ओंम...नमस्तेअस्तु भगवन विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवायः श्रीमन् महादेवाय नमः।" - हे आलं. त्या खोल आणि विस्तीर्ण गाभार्‍यात हा मंत्रघोष असा काहि दुमदुमला की मनातल्या सगळ्या शंका,मळभ,अडचणी काहि क्षणांसाठी माझ्यापासून दूर पळून गेल्या. काहि क्षण त्याच मंत्राचे प्रतिध्वनी अंतरमनाच्या पटलावर उमटत राहिले. आणि मागून घुंगरांचा आवाज यायला लागला...मी मनात म्हटलं. "अत्ता ह्या निर्जन स्थळी हे कोण आलं असावं? की.., हा आशिषचा तर काहि मागोव्याचा खेळ नसावा ना? " झर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्कन वळून पहातो..तर खांद्यावर घोंगडी टाकलेला..,अस्सल घाटी धोतर नेसलेला, आणि ती घुंगराची काठी टेकवत आलेला एक धनगर... माझ्या मागे हात जोडत उभा होता. प्रथम मी काहिसा दचकलोच! पण सावध होऊन मी काहि बोलणार्,एव्हढ्यात तोच म्हणाला... धनगरः- "पोरा...काय निर्मळ मनानी हाका मारतोस रे द्येवाला..अश्यानं खरच यील कि र्‍ये त्यो!" मी :-"येऊ दे की मग..! त्याचंसाठी आळवलंय ना त्याला?" धनगरः-"हम्म्म..खरं बोलतुयास.पन येव्हढी हाक द्यायचं कारन काय?" मी:- "काहि तसं विशेष नाही. आलो होतो..जरा समाधी लागली,आणि गेली हाक न कळत." धनगरः- "ह्हाह्हाह्हा... न कळत??? , लबाड न्हाई बोलायचं हां-द्येवात आल्यावं.अर्‍ये मानसाच्या नकळत या जगात काईतरी व्हयत असतय का? हा...आता तुलाच नाय कळलं-काय त्ये!...म्हनशिला तं मं ठीक हाय." मी:-" बरोबर बोल्लात बाबा..पण तुम्ही इकडे कसे?" धनगर:-"आरं पोरा..,आम्ही मंजी - ह्ये रान असतय कुनाचं आनखि?.. आ???. अर्‍ये आम्मी म्येंढपाळ..रानातच असतो.मेंढ्या चराया.कधी या देशी तर कदी त्या देशी..जिकडं चारा भ्येटल तिकडं जायाचं...पन तू खरं न्हाय सांगितलं अज्जून...का न्हाय सांगायचं आम्म्माला???" मी:- "तसं नाहि हो.पण तुम्ही दुसरीकडे कुठे बोल्लात तर???" धनगरः-"ह्या ह्या ह्या....,घ्या..! आता आमी कुटं बोलनार..?,आमच्या शेळ्यामेंढ्यांना???" मी:-(धीर एकवटून..) " आज सकाळी माझ्या आयुष्यात एक तरुणी आली!" धनगरः-"ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या....,आओ..कोन्या संस्थानचं राजपुत्र म्हनायचं वो तुम्मी???" मी:- "का हो? असं का म्हणता?" धनगरः-"मंग जरा मानसावानी म्हना की...येक प्वार आवाडली म्हनून!" मी:- (भरपूर आणि मनंमुराद हसत..) "हो!" धनगरः-"ह्हा ... आत्त्ता कसं हसू आलं..खरं भाईर आल्यावं!" मी:-"पण मला आता कळत नाहीये..मी काय करू ते! म्हणूनच देवाचा कौल घ्यायला आलो इथपर्यंत..पण तो मिळेल असं वाटताच तुंम्ही आलात." धनगरः-" आरं पोरा...बाई आपल्या मानसाच्या आयुष्यात नाय येन्हार..तर काय आमच्या शेळ्यामेंढ्यांच्या आयुष्यात येनारे व्हय???आगदी सादंसुदं असतया त्ये...इशेश न्है कै त्यात. आवाडलं..तर जमवायचं..आनी मायबापाला सांगून उडवायचा बार" मी:-"......खरच असं करतात?" धनगरः-"न्हाई तर काय मग? तुज्या पाटीमागाचा शंकर न्हाई सुटला त्येच्यातून..तर तू काय सुटनार?...आं?" मी:-"पण माणसं लग्न कशाला करतात हो?" धनगरः-" चारातले दोन पाय कमी जाले..हे शिद्द कराया!" मी:- "क्का......................य???" धनगरः-" हॅ हॅ हॅ हॅ हॅ...पोरा..,लै ल्हान हैस रे अजुन! आर्‍ये.., मानसाच्या जातीचा संसार आमच्या शेळ्यामेंढ्यांच्या येकदम उलटा करावा लागतुया. ह्यांना वाढतील तेव्हढ्या वाढू द्यायच्या,आनी आपुन मानसानी मातर नीट कुना येकाच्या संगतीनं र्‍हाऊन वाडायचं. कसं???" मी:-"......................" धनगरः-"अरे पोरा...जोपरेंत त्यो वरचा द्येव आपल्याला हाकित होता तो परेंत आपुन बी ह्या शेळ्यामेंढ्यांवानीच होतो. कळप करायचा आनी वाढत वाढत चरत जगायचं..ह्या जंगलातलं सपलं,की त्या जंगलात जायाचं.पन आता आपुन आपल्याला हाकतो...मंग ..ह्या शेळ्यामेंढ्यापरास येगळं वागाया हवं की नको?" मी:- "हवं हवं..!" धनगरः-"ह्हा....!!!!! म्हनुन म्हन्लो तुला...लै इचार करु नको..भ्येटल्यालं मानुस आपलं-वाटत असल..तर,तुज्या आनी तिच्या माईबापाला सांग,आनी कर मंग तुमचं त्ये...शुबमंगल..सावदान!" मी:- "हो...हो..करतो .,अगदी तसच करतो!" धनगरः-(उठून देवळा बाहेर जाता..जाता..) "चला ...ग्येल्या आमच्या मेंढ्या..फुडच्या रानाकड..,म्या बी जातो त्येंच्या मागं.....,नायतं उगा फिरतील-भलतिकडं!...त्यांचं आपल्या मानसा सारकं थोडच हाय!???" ................................... मी ही त्या धनगराच्या नंतर देवळा बाहेर आलो.. पहातो तर उन्हं कलायला आलेली होती. म्हटलं..पाच वाजत आले असतील..तिकडे हलकल्लोळ उडाला असेल माझ्या नावानी. काम जरी काहि नसलं,तरी कामगिरी वरचा एक माणूस, "इतका वेळ,न सांगता गेला कुठे???" हा प्रश्न तिकडे आला असेलच. मग मात्र मी त्याच केवड्याच्या बनातून झरझर वाट काढत परतायला लागलो. यावेळी मात्र मनात चेहेरा त्या धनगरबाबाचा होता.आणि शेवटाला त्या संवादातला, तो अखेरचा धागा मनात गुंफण घालत होता... "त्यांचं आपल्या मानसा सारकं थोडच हाय!?" ... बास्स! हीच ओळ मंत्रासारखी गुणगुणत मी इष्टस्थळी येऊन दाखल झालो. कुणाशी काहि फार बोललोहि नाही नंतर. आगदी आल्या आल्या हातपाय धुतो नाही..तर तो त्या वैजयंतिनीच चहा आणून दिला.तरीहि मी स्तब्धतेनी तो चहा घेऊन नंतर मित्रमंडळींच्यात मिसळलो देखिल. पण माझ्यात इतक्या झटक्यात आलेलं हे वेगळेपण आमच्या त्या महामुनीवरास आशिषास,लक्षात आलच. आणि मला परत खोपच्यात घेऊन तो माझी झाडाझडती करू लागला. आशीषः- " काय रे...कुठे गेला होतास?" मी:-"असुरेश्वरा कडे!" आशीषः-"अरे व्वा! भांग बिंग नै ना दिलिन कुणी तिकडे?" मी:- "आश्श्श्या...डोकं नको हां फिरवू उगाच. " आशीषः-" ह्हां...आमचा मैयतर लग्गेच चिडला...मंजे नैच्च दिली कुणी भांग.बरं.., काय झालं मग तिकडे?" मी:-" अरे होणार काय? सकाळ पासून तुम्ही माझी ही अशी सर्कस करून टाकलीत..मग म्हटलं शेवटचा झोक्यांचा-खेळ त्या भवानीशंकरा बरोबरच खेळावा..म्हणून गेलो तिकडे!" आशीषः-" अस्सं!... मग निकाल काय आला-खेळाचा???" मी:-" काहि नाही..पुढची सर्कस लगेच सुरु करा म्हणाले देवाधिदेव" आशीषः- " आयला ..सुम्माट्ट...मलाही गेलं पाहिजे तिकडे" मी:-"खोकलिच्या.., लग्न झालय ना तुझं?" आशीषः- " अरे हो..पण अजुन पुढे निकाल काहि लागतच नाहिये..,मग जायला नको?" मी:-"हम्म्म...जा जा..कदाचित होइल मदत तुलाही..फक्त दुपारी २ ते ४ या वेळातच जा" (मी नकळत बोलून गेलो..आणि मग जीभ चावली!) आशीषः-"हम्म्म्म्म...काय तरी गडबड आहे हं...आत्मारामा...नीट सांग काय ते!?" मी:-"कै नै रे..त्यावेळेस कोणी नसतं ना तिथे..मग देवाशी नीट एकांत साधला जातो..म्हणून म्हटलं" आशीषः- " अस्सं क्काय? बरच बारीक निरिक्षण झालय हां तुझं!... म्हणूनच मगाच पासून गप्प गप्प आहेस!" मी:-" ते त्यामुळे नाहि रे!!!!!!!!!!" (परत जीभ चावली.. ;) ) आशीषः-"मग कशामुळे कशामुळे??????" मी:-" नाहि रे ..मी तिनी... आशीषः-"कुणी?????" मी:-"तिनी..... आशीषः-"अं....अस्सं नै आता..आता नाव-घ्यायचं!" मी:-" अरे का छळतोस?" आशीषः-"छ ळ तो सं???...का? वैट वाटतय का काहि?" मी:-" __/\__ "मुनिवर...वैजयंतिनी जे गाणं म्हटलं..ते अत्यंत जुन्या सिनेमातलं होतं हो!..त्यामुळे , 'येव्हढं जुनं का निवडलन???'.. अश्या विचारात पडलो होतो मी!" आशीषः-" जुनं???...आणि निवडलन?????" मी:- " आश्श्श्याsssssssssssssssss!!!!!!!!!!!!!!!!" आशीषः-" असू दे .असू दे..कळलय आंम्हाला.तिनी काय निवडलयन ते!" मी:-" अरे राक्षसा... आता टळ कि इथून...झालं ना तुझ्या मनाचं समाधान?" आशीषः-" ह्या ह्या ह्या ह्या.... माझ्या मनाचं झालं काय समाधान???..." मी:- " #@$%^*&^%$....." आशीषः-"बरं बरं...टळतो...टळतो....रहा आता.....................एकांतात!" हा महाभयंकर माणूस तिथनं गेला..आणि मी मात्र रात्रिची जेवणं झाल्यानंतर..झोपताना काहि क्षण पुन्हा त्या देवळातल्या प्रसंगाच्या शेवटाला गेलो.
मला भेटलेला देव नक्की कोण???
असुरेश्वर? की तो धनगर???
============================= क्रमशः........................... मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल)
भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५ भाग- २६ भाग- २७ (यज्ञयाग विशेष!) भाग- २८ भाग- २९ भाग- ३० भाग- ३१
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

@तुमची लवष्टुरी! >>> माजी नाय हो! त्ये कथानायकाची वाचा :D ============================ समंसमांतरः- आमचा लव कदी ष्टुरी परेंत ग्येलाच नाय..म्येला! =)) करवंदिच्या जाली परेंत जाऊन करदा तोडायच्या टायमाला...कुनितरी म्हदेच याय्चा दरवेली! =))

मागचा भाग अतिशय हळवा करणारा टाकल्यामुळे माझ्याही डोळ्यांत टचकन पाणी आलं होतं. त्यावर उतारा म्हणून हा हलकाफुलका भाग टाकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अर्थातच हा भागही आवडलाच.

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र म्हण्जे गुर्जी लाजुन बिजुन चुर झाल्यामुळे असं कथानायकाचं नाव पुढे करताय होय.. =)) या वरुन मला आलिया 'भट' ( काय योगायोग =)) ) चं गाणं आठवलं. सुंथा वाला, यज्ञ वाला, स्वाहा वाला लव. होता है जो मंत्र म्हणता वैसे वाला लव.... गुर्जी वाला लव.. =))

पुस्तक व्हायलाच हवं यावर
अगदी अगदी. बुवा मनावर घ्या हे नक्की.. बादवे, इतक्या गोग्गोड प्रतिक्रिया पाहून बोलावे की नाही असा विचार करत होतो, पण तुमचे लेखन आहे (आणि व्यक्तिगत नाही) असे गृहित धरून तुम्ही मनावर घेणार नाही अशी अपेक्षा. हा भाग जर्रा चित्रपटीय बळण घेतो आहे असे वाटतेय, म्हणजे नाट्यमयता जास्त झालीय आणि तरीही कुठे तरी त्या मुलीची बाजू, कथानायक तिला आवडण्याचं कारण इत्यादि काही बाबी स्पष्ट होत नाहीत असं वाटतंय. म्हणजे चित्रपट कसा एका प्रसंगावरून दुसर्‍या प्रसंगाकडे जातो आणि कथानायक हा कथानायक असल्याने त्यास (विनासायास) कथानायिका भेटते (ते सर्वांसमोर गाणी/श्लोक पण गातात .. ;) ) हा भाग थोडा तसा वाटला. (त्याचे मित्र त्यांस आडपडद्याने हे सांगू पाहतात आणि कथानायक देखील लगेच लग्नाचा विचार करु लागतो हे तर थोडे पटले नाही पण कथेचा भाग म्हणून त्याला सोडून देता येईल.) अर्थात, पुढे काय येणार आहे ते माहित नसल्याने मी चूक असेन पण जे वाटलं ते बोललो. तो मंदिराचा प्रसंग सोडल्यास इतर भागांशी ज्या सहजपणे एक त्या प्रसंगांचा भाग म्हणून समरूप होता आलं. ते सहजपण या भागात थोडं अडखळलं इतकंच. :) पुढील भागांची वाट बघतोय हे ही ओघाने आलेच.

सर्वप्रथम विवेचक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :) चित्रपटाच्या अंगाने जातय,कारण प्रेम हा त्याच धर्ती चा विषय त्यात आलाय. तुमच्या बाकी प्रश्नांची उत्तरे पुढे येणार आहेतच. त्याचं इथे उत्तर दिलं तर,पुढल्या भागाची मजा जाइल. म्हणुन थांबतो. तरी एक स्पष्टीकरण देतो,जे याच भागाशी निगडित आहे. वैजयंतिला आत्मु ची आई वैजु अशी हाक मारते.. म्हणजे घर परिचयाचं आहे. आणि ती त्याला आधीपासून ओळखतेहि आहे. त्यात प्रांत कोकण आहे. जिकडे जातकुळांना कित्तिही दूरच्या गावात रहात असले,तरी एकामेकाची बित्तंबातमि ठाउक असते.