Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:
आमच्या विवाहाची कहाणी ता क -- यात कोणतीही अतिशयोक्ती नाही किंवा सनसनाटी घटना, उत्कंठावर्धक असे काव्य असे काहीच नाही. म्हणजे झाले असे कि मी लष्करात( नौदलात) डॉक्टर म्हणून विक्रांत या जहाजावर तैनात होतो. वय वर्षे २५(१९९० ची गोष्ट). मुळात आमच्या आईचे म्हणणे असे होते कि घरापासून लांब राहणार तेंव्हा वेळेत लग्न झालेले बरे. पण मला एक, एक वर्षाने मोठा भाऊ( इंजनेर) आहे. आणी त्याचे नुकतेच लग्न झाले होते म्हणजे पाच वर्षे नोकरी करून झाल्यावर धंदा चालू केलेला होता आणि नोकरी सोडण्या अगोदर लग्न केलेले बरे अशा विचाराने त्याचे २६ व्या वर्षी लग्न केले. ( मराठी माणसात धंदा करणाऱ्या मुलास तेंव्हा जास्त कठीण होते) म्हणजे आता आमचा मार्ग मोकळा होता असे सर्व नातेवाईकांचे म्हणणे होते आईच्या भाषेत एकदा का तुला तुझ्या बायकोच्या पदरात टाकले कि आम्ही जबाबदारीतून मोकळे. आई वडिलांचे अगोदरच विचारून झालेलं होते कि तुझी कोणी "तशी"मैत्रीण आहे काय? दुर्दैवाने तशी कोणी मैत्रीण मला सापडलेली नव्हती. म्हणजे असे झाले कि कॉलेजात एखादी सुंदर मुलगी दिसावी आणि लगेच कळावे कि ती अगोदरच बुक आहे. म्हणजे मग पुढे काही करायलाच नको. काही मुलीनी माझ्यात थोडाफार "रस" दाखवला होता. पण त्यात मला "रस" वाटला नव्हताऽ अशी साडेपाच वर्षे ( एम बी बी एस ची) कोरडीच गेली. (म्हणजे ज्या चांगल्या मुली होत्या त्याना आपल्या मित्रांबरोबर फिरताना पाहून नुसतेच सुस्कारे सोडण्यात) पण अजून लग्नाची माझी मानसिक तयारी नव्हती. आणि नौदलाच्या गोदीत हिरवळ असायचा संबंधच नव्हता. सगळीकडे फक्त जय हनुमान. म्हणजे मी नुसताच उंडारत होतो असे नाही परंतु पुढच्या वर्षी होणार्या (मे १९९१ मध्ये) पदव्युत्तर परीक्षेच्या प्रवेश परीक्षेची तयारी करीत होतो. तेंव्हा त्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मी उगाच मुली पाहणे इ च्या व्यापात पडण्याच्या विरुद्ध होतो. तशा मधून मधून आईकडे मुली सांगून येत होत्या. मी विक्रांतवर राहत होतो आणि जेंव्हा घरी यायचो तेंव्हा त्याबद्दल बोलणे होत असे. मी ते कानाआड टाकत होतो. वडिलांना एकदा सांगितले होते कि हि परीक्षा झाल्याशिवाय मी तो विचार करणार नाही. त्यामुळे त्यांनी तो विषय काढला नव्हता. होता होता माझी परीक्षा झाली आणि दुसर्या दिवशी वडिलांनी विचारले कि आता मुली पहायच्या का? मी त्यांना म्हटले कि अहो अजून निकाल तरी येउद्या. ७५० पैकी फक्त ६० लोकांना एम डी/ एम एस ला प्रवेश मिळत असे. आणि आता तुमच्या स्पर्धेत सगळे डॉक्टरच होते. त्यामुळे चुरस खूप होती. चार महिन्यानी निकाल आला आणि सुदैवाने माझे नाव गुणवत्ता यादीत बरेच वर होते. त्यामुळे आता एम डी ला प्रवेश नक्की होता. हा निकाल ऐकल्यावर अभिनंदन झाल्यावर परत वडिलांनी लगेच विचारले कि आता पाहायला सुरुवात करायची का? आता मी त्यांना सांगितले अहो जरा माझा अभ्याक्रम सुरु तर होऊ दे. म्हणजे काय माझी अजून लग्नासाठी मानसिक तयारी झालेली नव्हती. पुढे तीन महिन्यांनी (डिसेंबर ९१) मी पुण्याच्या ए एफ एम सी मध्ये एम डी (रेडियॉलॉजि) साठी रुजू झालो. तेथे दोन महिन्यांनी पहिली परीक्षा झाली त्यात मी व्यवस्थित पास झालो. ( आमच्या वेळेस या परीक्षेत नापास झाल्यास हा उमेदवार एम डी करण्यास लायक नाही असे विद्यापीठास कळवून त्याचे रजिस्ट्रेशन रद्दबातल करीत असत). त्यानंतर मी मानसिक दृष्ट्या थोडा विश्राम झालो. दुर्दैवाने एम डी/एम एस साठी आलेल्या मुलींपैकी एकही मला "तशी" वाटली नाही आणि वडिलांना कळवले कि आता मुली पाहायला हरकत नाही. मग आता आमच्या घरी मुलगी कशी पाहिजे यावर सविस्तर चर्चा झाली. मला एकतर उच्च शिक्षित मुलगी हवी होती. म्हणजे शाळा आणि लग्न यामध्ये वेळ घालवण्यासाठी कॉलेजला जाणार्या मुलींपैकी नको होती. याचे कारण मी एम डी होणार माझा भाऊ विद्युत अभियंता, वहिनी संगणक अभियंती, आई आणि वडील त्रिपदवीधर मग मुलगी कमी शिकलेली असती तर तिला न्यूनगंड येण्याची शक्यता म्हणून तसे नको. आयुर्वेदिक किंवा होमिओपथि ची डॉक्टर नको कारण मी बदलीच्या नोकरी मुले इकडून तिकडे फिरणार मग तिला तिथे नोकरी मिळणे कठीण आणि व्यवसाय सुरु करून तीन वर्षात हलवणे पण अशक्य. माझ्या स्वतःच्या अपेक्षा मुलगी सुंदर असावी आणि केस लांब असावेत. ( मी स्वतः तसा दिसायला "बरा" आहे हे माझ्या मैत्रिणींकडून "समजलेले" होतेच) शिवाय माझे एक म्हणणे होते कि वयाच्या २५ व्या वर्षी जर तुम्ही दिसायला चांगले नसाल तर ते तुमचे दुर्दैव आहे पण तुमची बायको/नवरा दिसायला चांगला नसेल तर तो तुमचा बावळटपणा आहे. त्यातून आई वडील दोघे उच्च शिक्षित, भाऊ आणि वहिनी इंजिनियर भावाला चांगली नोकरी होती वडिलांनी वाशीला एक दुसरे छोटेसे घर घेऊन ठेवलेले होते. माझ्यावर जबाबदारी काहीच नव्हती. सरकारी नोकरी ५८ व्या वर्षापर्यंत नक्की. शिवाय लष्करात असल्यामुळे मोठ्या घरात नोकर चाकर राजाराणीचा संसार (सासू रोज रोज डोक्याशी कटकट करायला नाही). या सगळ्या गोष्टी कागदांवर लिहून मी त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. आईने मोठ्या उत्साहाने हि माहिती दोन तीन वधुवर सुचक मंडळात लिहिली आणि तिच्या महिला मंडळात जाहीर केली. त्यावेळेस भ्रमणध्वनी नव्हते. आणि संपर्कासाठी क्रमांक आमच्या घरचा होता. वरील माहिती घेऊन मी पुण्याच्या रोहिणी या मासिकाकडे गेलो. आणि मला अशी बायको पाहिजे असे लिहून दिलेले होते. पण प्रत्यक्षात जेंव्हा छापून आले तेंव्हा मुलाचे वडील असे म्हणतात कि मुलाला स्वतंत्र संसार करण्याची हिम्मत असलेली बायको पाहिजे इ इ. मी त्या मासिकाच्या संपादिका होत्या त्यांना धारेवर धरले आणि सांगितले माझ्या ताजमहालाला तुमची वीट लावायला कुणी सांगितले होते. त्या म्हणाल्या अहो अशी पद्धत असते. मी म्हटले पद्धत गेली खड्ड्यात, पैसे मी दिले कि माझ्या वडिलांनी. तुम्हाला असा दीड शहाणपणा करायला कुणी सांगितले होते. जर माझे माझ्या वडिलांशी पटत नसते तर काय करणार होतात. आता मला पैसे परत करा. त्यानी पहिल्यांदा पुणेरी शहाणपणा करायचा प्रयत्न केला परंतु मी पण पुण्यात ६ वर्षे काढलेली होती त्यामुळे त्यांना मुळीच भिक घातली नाही. त्यांना स्पष्ट सुनावले हा असा आगाउपणा दुसर्या माणसाच्या बाबतीत करू नका. एक (आईची) मैत्रीण आईच्या मागे लागली होती माझी म्हणून नव्हे पण मुलगी खरच सुंदर आहे तुम्ही बघून तर घ्या. मुलगी बी ए झालेली.आईने त्यांना मुलगा नाही म्हणतो कारण त्याला डॉक्टर बायको हवी आहे असे सांगून नकार दिला. असे करता करता. एका मुलीचे स्थळ आले ती डॉक्टरच होती आणि औरंगाबादला एम डी करत होती. तिचा चुलत भाऊ माझ्या भावाच्या वर्गात होता आणि काकू आमच्या आईची मैत्रीण. पारंपारिक पद्धतीने मुली पाहणे इ गोष्टीना माझा विरोध होता. त्यामुळे बर्याच चर्चे नंतर पुणे येथे सारसबाग स्थळी गणपती मंदिरात एका रविवारी संध्याकाळी एकमेकांना(आई बापासकट) भेटण्याचा कार्यक्रम ठरला. ठरल्याप्रमाणे मी आणि आमचे आईवडील तेथे गेलो. लष्करी वेळेप्रमाणे मी सहाला पाच मिनिटे कमी असताना तेथे हजर झालो. आणि आम्ही तेथे वाट पाहू लागलो. पंधरा वीस मिनिटांनी एक मध्यम वयीन गृहस्थ त्यांची पत्नी आणि पत्नीची लहान दिसणारी बहिण तेथे आले. नमस्कार चमत्कार झाले आणि मला कळले कि ती त्या बाईंची बहिण नसून लग्नाची मुलगी आहे. मुलगी जरा सुदृढ होती त्यातून जरीची साडी नेसल्याने अजूनच आडवी दिसत होती. हे दिसल्यावर आम्ही अवाक झालो. अर्धा तास तुम्ही काय करता आम्ही काय करतो मुलगा काय करणार मग मुलीला काय करता येईल असे बरेच वायफळ बोलणे झाल्यावर आम्ही कळवू असे सांगून निरोप घेतला. यात मी एक गोष्ट शिकलो. आपल्याला मुलगी( किंवा मुलगा) पसंत नाही, त्याच्याशी (तिच्याशी) जमणे नाही हे पटकन समजते. मुलगी( मुलगा) पसंत आहे हे ठरवणे बरेच कठीण आहे ते पुढे येईलच. मुलगी पाहणे हा कार्यक्रम पहिले काही अनुभव येईपर्यंत उगाच रंजक असेल असे वाटते पण नंतर त्याचा फार कंटाळा येतो. एक तर आलेल्या मुलीला "तशा" नजरेने पहायचे आहे हे डोक्यात ठेवावे लागते आणि त्यामुळे वागण्या बोलण्यात एक विचित्र अवघडपणा येतो.तरी बरं कि मेडिकल कॉलेजपासून मुलींशी बोलण्याबाबत कोणतीही अढी नसते त्यामुळे मुलीशी कसं बोलायचं हा अवघडलेपणा(AWKWARD)नव्हता. शिवाय हि मुलगी(किंवा मुलगा) "पसंत" नाही हे पहिल्या दोन मिनिटात स्वच्छपणे डोक्यात उमटते. त्यानंतर पुढचा सर्व कार्यक्रम हा एखाद्या मड्रासी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला मारून मुटकून बसवल्यावर कशी गोची होईल तसे होते. मुलगी मारे लाजण्याचे नाटक करत असते किंवा शालीनतेचा आव आणत असते( बर्याच वेळेस चेहऱ्यावरील अगतिकता सुद्धा दिसत असते). परंतु मी काय करतो आहे, पुढे काय करणार आहे त्यात माझ्याशी लग्न केल्यावर मुलीच्या भवितव्या बाबतचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे देणे हे फार एकसुरी आणि कंटाळवाणे असते. मुळात मुलगी(किंवा मुलगा) पसंत नाही हे समजल्याने पुढच्या कार्यक्रमातील रस संपलेला असतो. यानंतर मी एक धडा शिकलो. उगाच उठून वेळात वेळ काढून अजिबात माहित नसलेले स्थळ पाहण्यास आपला अमुल्य वेळ फुकट घालवण्यात अर्थ नाही. मी आई वडिलांना याबाबत संपूर्ण हक्क दिले. तुम्हाला बरी वाटेल ती मुलगी पहा आणि पसंत असेल तर मला सांगा. नसेल तर बाहेरच्या बाहेरच मामला मिटवून टाका.गम्मत म्हणजे पुढच्या दोन महिन्यात( माझे लग्न ठरेपर्यंत) त्यांच्याकडे ७५ स्थळे आली त्यातील बहुसंख्य मुली डॉक्टर होत्या. आमच्या वडिलांना(दोन्ही मुलगे असल्याने) मुलीच्या वडिलांबद्दल फार सहानुभूती होती त्यामुळे त्यांनी प्रत्येक माणसाला अत्यंत नम्र भाषेत पत्र लिहून आपले योग का जुळणार नाहीत याची पत्रे लिहिली होती. असो. यानंतर मी जेंव्हा घरी फोन करायचो तेंव्हा नवीन कहाण्या आई सांगत असे. एक डॉक्टर मुलगी पेडर रोडला राहणारी होती. त्यांच्या आग्रहाखातर आईवडील त्यांच्या घरी जाऊन बघून आले. तिला लष्करातील नवरा हवा होता अन्यथा ते आमच्या पेक्षा आर्थिक स्तरात खूपच वरचे ( वडील विक्रीकर आयुक्त) होते आणि हुच्चभ्रू पण तेंव्हा आम्हाला झेपणारे नव्हते. वरील कार्यक्रमानंतर एक महिनाभर आई वडिलांबरोबर चर्चा झाली आणि शेवटी असे त्रयस्थ स्थळी मुली पाहण्यापेक्षा आपल्या घरी त्यांना बोलवावे असा मार्ग निघाला. निदान उठून कपडे करून एखाद्या घरी मिरवत जायचे आणि हात हलवत परत यायचे हा त्रास तरी नको. त्यातून माझे एम डी चे पहिले वर्ष असल्याने पूर्ण वर्षात मला फक्त १० दिवस सुट्टी मिळणार होती. त्यात हे सर्व कार्यक्रम पार पडायचे म्हणून आम्ही शनिवार रविवारी हे "कार्यक्रम" करायचे ठरविले. माझ्या वर्गातील ६० जण एम डी करायला आलेले होते त्यातील २३ जण लग्न झालेले होते ( यातील बरेचसे प्रेम विवाह असल्याने लवकर लग्न करून मोकळे झालेले होते.) उरलेल्या ३७ जणांमध्ये मी मुली पाहायला लागलेला पहिला "उपवधू" होतो आणि मी मित्राना स्पष्टपणे सांगत असे कि मुलगी पाहायला मुंबईला चाललो आहे तेंव्हा त्यांना पण या प्रकाराचे कुतूहल होते. म्हणून मी परत आलो रात्री ९ ला ठाण्याला महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडून १२. ३० ला पुण्यात पोहोचत असे तेंव्हा माझ्या खोलीत कोंडाळे जमत असे कि "काय झाले " पहिला कार्यक्रम झाल्यावर मी १० जुलै १९९२ हा शुक्रवार होता आणि माझा वाढदिवस होता त्यासाठी डेक्कन एक्स्प्रेसने मी मुंबईत दाखल झालो. दुसर्या दिवशी एक दिवस रजा टाकली. आमच्या सरांना पण सांगून टाकले कि मुली पाहायला जातो आहे त्यामुळे रजा मिळण्यास कोणतीही आडकाठी झाली नाही. दुसर्या दिवशी संध्याकाळी )११ तारखेला) एक आणि १२ जुलै ला सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा तीन मुली दोन दिवसात पहायच्या होत्या. क्रमशः
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

जरा वेगळा विषय, पण सर्वांच्या आयुष्यात येणारा. 'क्रमशः' वाचून बरे वाटले, पुढील भागाच्या प्रतीक्षेत. बाकी या धाग्याची चिरफाड झाली तरी ती खुसखुषीत असेल याची खात्री

पारंपारीक दाखवण्याचा कार्यक्रम करून केलेले विवाहाचीही एक कहाणी-(आणि अनेक उपकथा) अस्तेच असते. हा धागा चारजणांसारखाच तर विवाह केला अशी संभावना करण्यापे़क्षा आपल्या अपे़क्षा काय आहेत आणि आपण त्या अपेक्षा करण्यास लायक्/पात्र आहोत का हे आत्मपरीक्षण झाले तर मी खरी फलश्रुती समजेल. अपेक्षांबाबत भावी वधू-वर दोहोंनाही समानतत्वाने (आ-रक्षणाचा जमाना आहे) *mosking* *yes3* आ-रक्षणा=पले पण रक्षण

स्पा विचार करून ठेव बायको कशी पाहिजे ते. नाही तर झक्क पैकी स्वतःच जुळवून टाक म्हणजे हि कटकटच नको

तुम्ही जुनाट झालात हो आता बायका विचार करतात नवरा कसा हवा ते

खरे साहेब, असे व्यक्तिगत अनुभवाचे ललित लेखन मिपावर फार कमी होते. लग्न हा एक महत्वाचा टप्पा आहे सर्वांच्याच आयुष्यातील. तेंव्हा लग्नावर बोलू काही ची सुरूवात माहिती देणारी व मिश्किल पणे लिहलेली आहे. बाकी आपल्याला आवडलेली साडी आपल्या बजेटच्या बाहेरची असते हा अनुभव उमेदवार असताना तुम्हालाही आला याची गंमत वाटली. कारण आजची लग्नाच्या बाजारात तुम्ही सहज खपाल असे आहात ! ( भौ म्येनटेण्ड हाय ) . इथे संगीतकार नौशाद यानी त्यांच्या आत्मकथनात सांगितलेला एक किस्सा आठवतोय. मुंबईस बरीच उमेदवारी केल्यावर नौशादना सिनेमात संगीतकाराचे काम मिळू लागले. रतन या चित्रपटातील गीते गाजू लागली. तेंव्हा नौशादचे वालिद यांचा आग्रह झाला ही आता तू लग्न कर. नौशाद च्या काळी मुलाने मुलगी पाहणे ही पद्धतच नव्हती. वडीलानी मुलगी ठरवली गावाकडे लग्न करायचेव ठरले. लग्नात नौशाद घोड्यावर बसले होते. वरातीपुढे रतन मधली गाणी बॅन्ड्वर वाजत होती. घोड्याशेजारून नौशाद यांचे सासरे चालले होते. नौशाद खाली वाकून त्याना म्हणाले बघा माझी गाणी वाजताहेत समोर. तर सासरे म्हणाले." कशाला उगीच मस्करी करताय ? अहो ते नौशाद कुठे व तुम्ही कुठे ? " नौशाद ना आपल्या थोरवीचा हा अजब नमुना अनुभवायला मिळाला. मुलगा मुंबईस काही तरी मिलमधे वगैरे काम करतो या अंदाजाने नौशाद याना मुलगी दिली होती त्यांच्या सासर्‍याने !

पसंत पडती है तब घंटी बजती है ।डॉक्टर लोक पुढच्या पेशंटला आत बोलावतांना (नेऽऽकस्ट)पूर्वी एक घंटी वाजवत ती नव्हे, क्रमश: अपनेपर क्या बितती है सांगने के लिए डेअरिंग लगती है ।सल्युट डॉक्टर .

छान लिहीलय.. आणि काका.. बिनधास्त लिहा हो .."मी हॅन्डसम असल्याने मला सुंदर मुलगी हवी होती".. उगाच कशाला "मी "बरा" दिसतो.. " वगैरे प्रस्तावना!! ह.घ्या बर का!!

एकदम क्रमवार आणि डिटेल माहिती !!! थोडे अवांतर : बेंगलोर च्या एका मुलीने लग्नाचे प्रोफाईल बनवले आहे ज्याची सोशल मेडिया मध्ये बरीच चर्चा चालू आहे प्रोफाईल http://marry.indhuja.com/ हिंदुस्तान टाइम्स मधली बातमी

अशा बर्‍याच मुली आसपास सापडतील मला त्यात काही जगावेगळे वाटले नाही. आपल्याला काय पाहिजे हे तिला चांगले माहिती आहे आणि ती प्रामाणिक आहे एवढे म्हणू शकेन.

आपल्याला काय पाहिजे हे तिला चांगले माहिती आहे. ही एक फार अभावाने दिसणारी गोष्ट आहे. त्यातही आपल्याला काय पाहिजे हे उघडपणे... आणि येथे तर जालावर नाव-फोटो सकट... सांगण्यास असामान्य धैर्य लागते ! नाहीतर, "मला काय पाहिजे ते मला माहीत आहे. पण पालक/समाज/ इ इ इ मुळे हवे ते बोलता/करता येत नाही." असे खरे/खोटे बोलणारे असंख्य आहेत.

एक्का साहेब आपला समाज आता लिव्ह इन किंवा कंत्राटी लग्नाला तेवढा विरोधी राहिला नाही. या मुलीला तिच्या आईवडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे अन्यथा flexible with his parents, also means, it's better if he is NOT a family guy. Extra points to the one who hates kids.हे लिहिण्याची हिम्मत कोणी करू शकेल असे वाटत नाही. अर्थात या मुलीला स्वतःला मुले नकोत असे वाटते.यामुळे आणि tomboyish असल्याने बरेच मुलगे तिकडे वळणार नाहीत हे सत्य. आमच्या वर्गातील एक मुलगी तिला मूल नको होते पण हे होणार्या नवर्याला किंवा आई वडिलांना सांगण्याचे धारिष्ट्य ती करू शकली नाही कारण १९९० च्या दशकात मुलीना स्वतःच्या पायावर उभे राहणे आज इतके सोपे नक्कीच नव्हते. या कारणाने तिचा घटस्फोट झाला. आता ती पंजाब मध्ये एकटी राहते. उच्च विद्या विभूषित आणि डॉक्टर असल्याने गोष्टी थोड्या सुकर होत्या इतकेच. आज मुलगी एकटी स्वतःच्या पायावर उभी राहते किंवा लिव्ह इन मध्ये राहते या गोष्टी समाजाने मान्य केलेल्या असल्यामुळेच हे शक्य आहे हीही वस्तुस्थिती आहे. अशा बर्याच मुली काही वर्षांनी हिंडून फिरून झाल्यावर उशीर झाल्याने (लग्न करून) वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आलेल्या पाहिल्या आहेत/ पाहतो आहे. शेवटी निसर्गावर सहजासहजी मात करता येत नाही. मला त्या मुलीबद्दल जेवढा उदोउदो होतो आहे तेवढे कौतुक वाटत नाही. ( मी एक कुटुंबवत्सल माणूस आहे हि वस्तुस्थिती).याहून जास्त धैर्य सनी लियोन किंवा राखी सावंत यांनी दाखविलेले आहे.

बदलणार्‍या समाजिक-आर्थिक परिस्थितीने असे करू शकणार्‍यांची संख्या वाढत आहे हे नि:संशय. पण उघडपणे करण्याचे धैर्य दाखवणार्‍यांची संख्या हाताच्या बोटावर मोजावी इतकीच आहे हे पण तितकेच नि:संशय ! माझ्या मते, मनातले विचार उघडपणे व्यवहारात आणण्याचा प्रामाणिकपणा जेवढा जास्त दाखवला जाईल तेवढा समाज जास्त प्रगल्भ होईल. सद्या तसे करणार्‍यांपेक्षा "तथाकथित समाजिक मानदडांविरुद्ध" समजल्या जाणार्‍या गोष्टी (नाईलाजाने का होईना) मन मारून टाळल्या जातात अथवा चोरी-छुपे केल्या जातात... कदाचित् दांभीकपणा यालाच म्हणत असावेत :)

याहून जास्त धैर्य सनी लियोन किंवा राखी सावंत यांनी दाखविलेले आहे. ही उदाहरणे आपण बोलत असलेल्या मुलीच्या संदर्भात अत्यंत विसंगत आहेत असे मला वाटते. या दोन उदाहरणात स्वतःबद्दलच्या मत अथवा प्रामाणिकपणापेक्षा व्यावसायीक व आर्थिक फायद्यासाठी विचारपूर्वक केलेली जाहिरात आहे... मग (घटं भिंद्यात, पटं छिंद्यात... या न्यायाने) ती जेवढी जास्त विवादास्पद तेवढी अधिक चांगलीच नाही का ?

"या दोन उदाहरणात स्वतःबद्दलच्या मत अथवा प्रामाणिकपणापेक्षा व्यावसायीक व आर्थिक फायद्यासाठी विचारपूर्वक केलेली जाहिरात आहे" हे मान्य आहे पण तसाच त्या मुलीचा हा प्रयत्न पण एक स्टंटबाजी असू शकेल.त्या मुलीचा निर्णय हा दूरगामी विचार न करता केलेला असावा आणि impulsive किंवा तात्पुरता असावा असे वाटते. जीवन आज आहे उद्याचा विचार न करता घेतलेला असावा.( जर पूर्ण विचारांती घेतलेला असेल तर कौतुकास्पद आहे) अन्यथा तिच्यात आणि राखी सावंत मध्ये काय फरक?

मनोरंजक धागा. मी २२ मुली पाहिल्या आणि २३ वी शी लग्न केले. त्यामुळे हे वाचताना बर्याच गंमती आठवत आहेत. एक तर आलेल्या मुलीला "तशा" नजरेने पहायचे आहे हे डोक्यात ठेवावे लागते मी यावर असा उपाय शोधला होता. 'क्ष' हॉटेलपाशी भेटू असे ठरले असेल तर मी त्या हॉटेलच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर दिसणार नाही अशा बेताने पाच मिनिटे आधीच जाउन उभा राहात असे. मुलगी आली की इथे तिथे पाहते, अस्वस्थ पणे फोनशी चाळा वगैरे करेल, वाट बघेल आणि मग फोन करेल. एवढ्या वेळात हवे तसे न्याहाळून झालेले असतेच. दिसण्याच्या बाबतीत पसंत की नापसंत हा निर्णय मनाशी झालेला असतोच. मग भेटलो की थेट मुद्द्यावर येउन बोलायचे. उगाच नंतर मनात शंका राहायला नको.

अप्पासाहेब तुमच्या धैर्याची वाखाणणी करावी तेवढी थोडी आहे. मी चार मुली पाहूनच कंटाळलो. त्यातील तिसरीशी लग्न केले. २३ मुली म्हणजे फारच झालं तुम्ही आजच्या काळातील दिसता. आमच्या काळात(१९९२) घरात एक फोन असला तरी खूप झालं. हातात फोन असणे हे तर तेंव्हा स्वप्नातही नव्हतं

५-६ मुलींनी मला नाकारले. ज्यांनी नकार दिला त्यांच्याबद्दल मनात कटुता नाही. प्रत्येक व्यक्तीला नकार देण्याचा अधिकार असतोच. पण निवडीचा अधिकार असल्यावर माणूस अति चोखंदळपणा करत वेळ वाया घालवतो असे मत बनले आहे. 'पूर्वीच्या काळी बर्‍याच मुलामुलींना आई-वडिल सांगतील तेंव्हा आणि सांगतील त्या मुलीशी/मुलाशी लग्न करावे लागायचे'. तरीदेखील संसार चालतच होते ना.

अप्पासाहेब जसा मुलाला निवडीचा अधिकार असतो तसा मुलीलाही असतो हे बरेच लोक विसरतात. एखाद्याचा ( किंवा एखादीचा) चेहरा आवडत नाही का आवडत नाही याचे कारण देता येत नाही. हि गोष्ट आपल्याला मान्य करणे आवश्यक असते. हे मी मुळात गृहीत धरले होते त्यामुळे कदाचित मनात भरलेल्या मुलीने नाकारले असते तर वाईट वाटलेच असते पण अहंकार दुखावला गेला नसता हे नक्की. असे मुलीने नकार दिल्यावर अहंकार दुखावलेले माझे काही मित्र आहेत त्यांना तुझा चेहरा तिला आवडला नाही हे मान्यच होत नाही याला काय करणार. पण निवडीचा अधिकार असल्यावर माणूस अति चोखंदळपणा करत वेळ वाया घालवतो असे मत बनले आहे. हे काही लोकांचे होत असते म्हणून निवडीचा अधिकार नसावा हे मात्र मान्य नाही. "तरीदेखील संसार चालतच होते ना." हेहि मान्य नाही. बैलगाडी सारखे रखडत कितीतरी संसार चालत होते. स्त्री स्वातंत्र्याचा संकोच असल्याने कित्येक स्त्रिया चुलीतील लाकडांसारख्या जळत राहत. आता ती अप्रीस्थिती राहिली नाही आणी जे झाले ते भल्यासाठीच असे माझे ठाम मत आहे. कुणा एकाच्या त्यागावर संसार रडत खडत चालण्यापेक्षा तो संपवलेला बरा.

इथे पण :) ज्या शिस्तीने, दिनांक, वेळ वगैरे तपशीलासह तुम्ही वैद्यकीय पेशातली अनुभव सांगता त्याच निगुतीने हि लग्नकथा देखील :) कमाल आहे डॉ. तुमची.

या अवघडवणार्‍या विषयावरचं प्रांजळ आत्मकथन खूप आवडलं. या प्रकारचा वैयक्तिक अनुभव शुन्य असल्याने अधिकच रोचक वाटलं. लेखाच्या शीर्षकावरून पुढील किंवा त्यापुढील भागात तुमच्या सौंचेही अनुभवकथन असेल असा अंदाज आहे :-) . यावरून आठवले - ही श्री ची इच्छा या पुस्तकात लिहिलेले श्रीनिवास ठाणेदार यांचे त्यांच्या वधुसंशोधनाचे अनुभव.

जोशी बुवा आमच्या सौना हा लेख कालच वाचायला दिला. हे संपूर्ण सत्य कथन आहे . सारसबागेत पाहिलेली मुलगी तिची वर्गमैत्रीण होती आणि तिच्या बद्दल संयत/ सभ्य शब्दात वर्णन केल्याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली. आमच्या सौ नि तर २०-२२ मुलगे पाहीले होते. तिचे अनुभव शब्दात पकडता आले तर पाहतो. ती कोन्व्हेण्ट शिक्षित असल्याने मराठीवर प्रभुत्व कमी आहे तेंव्हा लखन मलाच करावे लागेल. त्यात बरीच आत्मस्तुती असण्याची शक्यता असल्याने तो विषय मागे पडलेला आहे.

मस्त डॉक. साडेतीन वर्षांपुर्वीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. चिक्कार मुली पाहिल्या. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे २-५ मिनिटात कळते की नकार द्यायचा आहे. होकार देण्यासाठी विचार करायला लागतो. जिला मनापासून होकार दिला तिच्याबद्दल २ मिनिटांच्या आत निर्णय झाला होता. सुदैवाने तिच्याशीच लग्न झाले. पण माझ्या सुदैवाने मला कुठलीही भयाण मुलगी पहायला लागली नाही. भयाण म्हणजे दिसण्याने नाही तर जिचे विचार अगदीच भयाण आहेत अशी. माझ्या मित्रांचे काही अनुभव रोचक आहेत.