Welcome to misalpav.com
लेखक: शिव कन्या | प्रसिद्ध:
'स्वामी दया करा. आता या वयात हे करायला सांगू नकात. कळत नव्हतं, तेव्हापासून तुमच्या पंखाखाली घेतलंत मला! चार चांगल्या गोष्टी शिकवल्या! ब्राह्मण नव्हतो तरी, संध्या शिकावलीत. येत नव्हतं तरी, घासून पुसून संस्कृत शिकवलेत. चार घरी अनवाणी पायांनी भिक्षा मागायला शिकवलीत. प्रसंगी, स्वतः रांधून एकटच जेवायला शिकवलंत. स्वामी, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंत, पण आता हे करायला सांगू नकात! तुम्ही युगांडात म्हणालात, मी युगांडात गेलो. तुम्ही रवांडात म्हणालात, मी रवांडात गेलो. तुम्ही टांझानियात म्हणालात, मी तिथेही गेलो. तुम्ही पोरांना शिकव म्हणालात, मी शिकवलं. तुम्ही आजार्यांची सेवा कर म्हणालात, मी केली. तुम्ही 'जगन्मिथ्या' म्हणालात, सभोवती जग दिसत असूनही, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही 'ब्रह्म सत्य' म्हणालात, मला कधीही अनुभव आला नाही, परंतु तुमच्या चरणांकडे पाहून, विश्वास ठेवला. स्वामी, आत्ताही, तुमच्या मागे अरण्यात धावायला तयार आहे. काट्यांवरून चालायला तयार आहे. निखारे गिळायला तयार आहे. पण, आधीसारखाच तुमच्या वळचणीला पडू द्या. स्वामी, द्या करा. हे एवढं करायला सांगू नकात. स्वामी, तुम्हीच शिकवलंत , 'स्त्री नरकाचे द्वार आहे, मोक्षप्राप्तीतील धोंड आहे!' आईच्या आठवणीने डोळ्यात पाणी यायचे, तरीही तुमची शिकवण प्रमाण मानली. हरेक स्त्रीला माताच मानले. विनम्रपणे तिच्या चरणांवर लोटांगण घातले. तुम्ही सांगितलेत, काम आवर! आवरत नसताना , आवरला स्वामी! आता, हे असलं काही करायला सांगू नकात स्वामी! या शाळकरी पोरीबरोबर लग्न करायला सांगू नकात. ऐका स्वामी, ऐका. मला प्रेम माहित नाही, संसार माहित नाही. माझ्या जवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही. मला बाहेरची दुनिया माहित नाही. तुमच्या शिवाय मला दुसरे जग ठावूक नाही. मी काय काम करू? मी धन कसे मेळवू? मी कुटुंब कसे सांभाळू? हे प्रश्न आहेतच! पण स्वामी, आता मला कशातच रुची वाटत नाही! तुमच्याच कृपेने निम्मा भवसागर तरून आलोय. मध्यावरती गरगरणाऱ्या भोवऱ्यात असं लोटू नकात. दया स्वामी दया! ती मुलगी अनाथ आहे, मान्य आहे. तुमचे इतके श्रीमंत भक्त आहेत, तिचा सांभाळ कुणीही करील. तिचं सुयोग्य वराशी लग्न लावून देतील, तुमच्या शब्दाबाहेर कुणीही नाही!' गुहेतून गंभीर शब्द उमटले, 'दिगंबरा, तूच का मग आमचा शब्द ओलांडतोयस? संसारही तपश्चर्याच आहे! जा. ईश्वर तुला मार्ग दाखवेल. कल्याणमस्तु!' इकडे अंधारी गुहा, तिकडे न बांधलेले घर! करड्या दाढीचा दिगंबर कमरेची लंगोट उद्वेगाने भिरकावत ओरडला, 'का मला असे जन्मास घातले देवा! का मला असे नागवे करून मोडीत काढले देवा!?'
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नमनाला घडाभर तेल घेतलेत. थोडक्यात लिहिले असते तर जास्त चांगले झाले असते.

विषय वेगळा आहे, मांडणी सुंदर, आणि मंथनही चांगले केलेत. पण सुरवातीचा 'द्या करा' खूप वेळ कळलाच नाही, नंतर कळले कि तो शब्द 'दया करा' असा आहे. 'शाळकरी पोर' म्हणजे वयाने लहान असणार आणि तुम्ही निदान तीशिकडे झुकलेले (असं गृहीत धरतो) असं असता गुरूने असे लग्न करायला भाग पाडणे चुकीचेच.

होय... ते दया करा असे हवे होते, प्रकाशित झाल्यावर लक्षात आले. दुरुस्तीची सोय असेल तर करून घेते. इतक्या बारकाईने वाचून प्रतिसाद दिलात, धन्यवाद! माझा तिशीकडे झुकण्याचा आणि यातल्या गुरूचा काही संबंध नाही. इथला गुरु साहित्यातले पात्र आहे. हा गुरु किवा यातला दिगंबर माझे व्यक्तिगत प्रतिनिधित्व करीत नाही. कृपया, हि त्रयस्थपणे केलेली निर्मिती आहे, हे लक्षात घ्यावे.

हे एक रूपक आहे हे वाचल्यावर लगेच कळले होते. त्यातील सन्यासी म्हणजे व्यक्तिगत तुम्ही नाही हे देखील कळले होते, फक्त एखाद्या गुरूने आपल्या शिष्याला असा सल्ला देणे चुकीचे आहे असे मला वाटले इतकेच.

दयाका दरवाजा तोड दो !!! अखिल शीआय्डी प्रेक्षक संघ

ब्राह्मण नव्हतो तरी, संध्या शिकावलीत. येत नव्हतं तरी, घासून पुसून संस्कृत शिकवलेत.--कोन्ता च स्वामि असे करित नाहि

सख्या गटणे .... बोळा अडकलेला दिसतोय.

'कोन्ता च स्वामि असे करित नाहि'----- असं मुळीच नाही. स्वामी लोकांनी मांडलेला बाजार पाहिला तर आपल्या चेल्यांवर याहून खोलवर कृपा करणारे दिसतील.

'थकलेला संसारी कवितेत दिसलेला नाही.'...... संसाराच्या नुसत्या विचारानेही तो गलितगात्र झालाय. अजून काय त्याची थकलेली मन:स्थिती दिसावी!

देवाधर्माच्या दलालांनी सामान्य माणसाची जी मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक भ्रांत केलेली आहे, त्याचे हे चित्रण आहे. जे आहे, त्याला नकार, जे नाही त्याचा स्वीकार करायला लावायचा. ऐहिक सुख म्हणजे अपराध वाटायला लावायचे. असे बुद्धी भेद झालेले चेले हाकायला सोप्पे पडतात. वेळ पडलीच, तर याच शिकवणुकीचे शस्त्र उलट वापरून, आपल्याला हवे तसे वागायला भाग पाडायचे. वरवर अत्यंत अध्यात्मिक वाटणारी हि सारी प्रक्रिया, प्रचंड मानसिक गुलामगिरी कडे घेऊन जाणारी असते, हे एखादा टोकाचा प्रसंग अल्याशिवाय कळतहि नाही. आणि जेव्हा कळू लागते, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. हे रूपक आहे, काढू तितके अर्थांचे पदर उलगडत जातील. पण आपण सगळे हे वाचून प्रतिक्रिया नोंदवत आहात, नवीन लिहिण्यास tonic मिळत आहे. धन्यावाद.

संन्यास वाचलं आणि मिपावरुन सद्ध्या टेंपररी गायब असणार्‍या तीन थोर्र थोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र आयडींची आठवण झाली. टवाळकीच्या जंगलामधुन मुक्तपणे विहार करायचं सोडुन जेपीनी संन्यास का बरं घेतला असावा? :(