Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:
दहा जुलै ला घरी यायचे होते त्या अगोदर दोन आठवडे एक मध्यम वयीन सदगृहस्थ संध्याकाळी माझा पत्ता शोधत आमच्या मेस मध्ये आले. ते सांगली जवळच्या एका शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या शाळेतील एक शिक्षिका त्यांचे यजमान दारू च्या आहारी गेल्यामुळे विभक्त झाल्या होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी लग्नाची होती. रोहिणी या मासिकातील जाहिरात वाचून त्या बाईंच्या विनंती वरून ते आले होते. मुलगी उत्तम शैक्षणिक करीयरची आणि सांगलीहून डॉक्टर झालेली होती. आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे या कारणास्तव मुलीला नंतर नकार देतात आणि तिची परिस्थिती वाईट होते या कारणास्तव ते अगोदर त्याची चाचपणी करण्यासाठी आले होते. माझ्या दृष्टीने यात मुलीचा काहीच दोष नसल्याने पुढे जाण्यात मला कोणतीही अडचण नव्हती. मी त्यांना सांगितले तुम्ही माझ्या आईवडिलांशी बोला. बाकी इतर बोलणे चालणे झाले आणि ते गेले. हो गोष्ट माझ्या स्मृतीतून गेली होती. दहा जुलै ला घरी आलो. घरी वाढदिवस असल्याने छान वातावरण होते. आई वडील भाऊ आणि वहिनी. त्यातून वहिनीला सुद्धा मुलगी "पाहणे" याचा वरपक्षाकडूनचा अनुभव कसा असतो याचा अनुभव घ्यायचा होता. त्यातून माझा भाऊ एक वर्षाने मोठा आणि वाहिनी एक वर्षाने लहान यामुळे आमच्यात अतिशय छान सामंजस्य होते. दुसर्या दिवशी (शनिवारी) संध्याकाळी पहिली मुलगी सात वाजता येणार होती. आमच्या वडिलांनी आमच्या धाकट्या काका काकुनासुद्धा "कार्यक्रमा"ला बोलावले होते. जितकी जास्त माणसे असतील तितके वेगळे दृष्टीकोन मिळतात आणि काही न पाहिलेल्या गोष्टी लक्षात येतात असे त्यांचे म्हणणे होते. मला काहीच फरक पडत नव्हता. त्यातून हे काका आणि काकू आमच्याच घरी मी सहा वर्षाचा होईपर्यंत राहत होते त्यामुळे त्यांच्याशी आमचे छान जमत असे. संध्याकाळी उत्सवाचे वातावरण होते. त्यातून आमच्या वडिलांसारखे काकांना पण दोन मुलगेच होते त्यामुळे मुलगी आणि मुलीचा बाप यांच्या बद्दल जरा जास्तच सहानुभूती होती. मी आपला मित्रांबरोबर संध्याकाळी फिरून आलो. वडिलांनी साडे सहापर्यंत घरी या अशी तंबी दिलेली होती. घरी येउन पाच मिनिटात शर्ट बदलून तयार झालो. सात वाजता ती मुलगी तिचे आई आणि वडील आले. मुलगी छान साडी नेसून आली होती.दिसायला चांगली होती. तिचे केस छान लांब होते आणि त्यांची तिने एक जाड वेणी घातलेली होती. ( मला आता एवढेच आठवते आहे) ती पण डॉक्टरच होती. (मी पाहिलेल्या चारही मुली डॉक्टरच होत्या आणि सांगून आलेल्या ७५ पैकी जवळ जवळ ४० डॉक्टर होत्या) नमस्कार चमत्कार झाले. आम्ही काय करतो तुम्ही काय करता याचे चर्वित चर्वण करून झाले. मी काय करतो पुढे काय करणार मुलीला पुढे काय वाव आहे या सर्वाबद्दल एक माफक चर्चा झाली. त्यानंतर वडील म्हणाले कि तुम्हाला एकमेकांबरोबर काही बोलायचे असेल तर आत जा. आता आम्ही दोघे भावाच्या बेडरूम मध्ये आत गेलो. एक गोष्ट चांगली असते कि येथे तुम्हाला मुलीकडे न लाजता सरळ पाहता येते. आणि तुम्ही पाहत नाही हे बघून मुलगी पण तुम्हाला चोरून वर पासून खालपर्यंत पूर्ण न्याहाळत असते. ते पाहून मला हसू आले. आम्ही एकंदर मी काय करतो? तू काय करतेस? भविष्यात काय करायचे आहे? छंद काय? याबद्दल चर्चा करीत होतो. मध्ये मध्ये वहिनी साबुदाण्याची खिचडी देण्यासाठी मग त्या ताटल्या परत नेण्यासाठी जा ये करत होती आणि माझ्या चेहऱ्याकडे मोठ्या आतुरतेने बघत होती कि याच्या चेहऱ्यावर काय दिसते, याला मुलगी पसंत पडते आहे का? दहा पंधरा मिनिटे बोलणे झाल्यावर खिचडी खाऊन आम्ही बाहेर आलो. बाहेरचे वातावरण बर्यापैकी मोकळे हसत खेळत असे होते. मग चहा झाला. काय निर्णय आहे ते लवकरच कळवतो असे वडील म्हणाले आणि ते सर्व आमचा निरोप घेऊन निघाले. हे सर्व झाल्यावर आता आम्ही सर्व जण तेथेच चर्चा करत बसलो. आमच्या काका आणि काकुना ती मुलगी फारच आवडली होती. मुलगी दिसायला चांगली होती. बोलताना ती सालस आणि सरळ आहे हेही जाणवले. आता उद्या काय होते ते पाहू असे वडील मला म्हणाले. त्यांनी काकांना सांगितले कि उद्या पण दोन मुली येत आहेत तेंव्हा तू पण थांब. पण काकांना सकाळी कुणाच्या तरी लग्नाला जायचे होते म्हणून ते म्हणाले मला जमणार नाही. यावर मी वडिलांना विचारले कि माझ्या मित्राच्या वडिलांना बोलावू का? हा माझा अत्यंत जवळचा मित्र ठाण्याला अस्थिरोग तज्ञ आहे त्याचे वडील स्वतः सुद्धा डॉक्टर आहेत आणि त्यांना लग्न जुळवणे या विषयात भयंकर रस होता. दुर्दैवाने त्यांच्या एकुलत्या एक मुलाने आपले लग्न डॉक्टरी करीत असतानाच जुळवले होते आणि ते लग्न झालेही होते. त्याच्या वडिलांचा त्याला विरोध नव्हताच पण वधू संशोधनाचे चहा पोहे मिळाले नाहीत याचे त्यांना फारच वैषम्य वाटत असे. त्यावेळेस मी त्यांना वचन दिले होते कि माझ्या दाखवण्याच्या कार्यक्रमाला मी तुम्हाला बोलावीन. हे मी वडिलांना सांगितले तर ते म्हणाले कि त्यांना जरूर बोलाव. दुसर्या दिवशी सकाळी मी त्या मित्राबरोबर मामलेदाराची मिसळ खायला गेलो तेंव्हा त्याला विचारले कि बाबा( त्याचे) मुलगी पाहायला येतील का? त्यावर तो म्हणाला ते जेवत असतील तर हात न धुता सुद्धा येतील.अशा गोष्टीत तुला शंका तरी कशी येते? चल लगेच घरी, त्यांना तयार व्हायला वेळ तरी दे. मग त्याच्या वडिलांना घेण्यासाठी त्याच्या घरी गेलो आणि त्यांना विचारले तर ते पूजा करीत होते. त्यांनी अगदी यथासांग वेळ घेऊन पूजा केली. माझा मित्र शेवटी अस्वस्थ होऊन म्हणाला अहो बाबा मुलगी यायची वेळ झाली त्यावर ते म्हणाले मुलगी पाहण्यचा पहिला कार्यक्रम आहे नीट पूजा करायलाच पाहिजे आणि ते (आणि माझा मित्र) माझ्या बरोबर उत्साहाने आमच्या घरी आले. दुसर्या मुलीला सकाळी दहाची वेळ दिलेली होती. आम्ही जेमतेम पावणे दहाला घरी पोहोचलो. अर्थात मला तयार व्हायला पाच मिनिटेच लागतात. व्यवस्थित नवा शर्ट घालून तयार झालो. ( शेवटी चांगली मुलगी हातची जायला नको असा विचार मुलांच्यात पण असतोच). दहा एक मिनिटात (दहा वाजता) मुलगी तिचे आई वडील आणि मोठा भाऊ आले. मी माझे आई वडील आणि वहिनी बाहेरच्या खोलीतच बसलो होतो. वरील प्रमाणेच नमस्कार चमत्कार झाले.हि मुलगी पण साडी नेसून आली होती, दिसायला चांगली होती. हिचेही केस लांब होते. यावेळेस मित्राचे वडील एखाद्या सराईत माणसासारखे फटाफट मुलीकडच्याना प्रश्न विचारत होते. त्यामध्ये बर्याच गोष्टी स्वच्छ झाल्या. मुलीचे वडील काय करतात? मोठ्या मुलाचे लग्न झाले आहे तो इंजिनियर आहे आणि रिलायंसच्या पाताळगंगा प्रकल्पात कामाला आहे इ इ. त्यामुळे मला फारसे काही बोलायची गरज पडली नाही. मी माझ्या वहिनीच्या शेजारी बसून आपसात हळूच काही काही बोलत होतो. तेवढ्यात माझा भाऊ बाहेरून आला. त्याची ओळख सर्वांशी करून दिली. तो पण इंजनेर होता त्यामुळे त्याच्यात आणि मुलीच्या भावात तुम्ही कुठून( इंजनेर) झालात काय करता? मी कुठून झालो? मी काय करतो ?इ इ. मग वडिलांनी आम्हाला विचारले कि तुम्हाला आपसात काय बोलायचे आहे ते आतमध्ये बोलून घ्या. कालच्या प्रमाणेच आम्ही आत गेलो आणि तिने मला दोन दिवसापूर्वी झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कालच्यासारखीच एकंदर मी काय करतो? तू काय करतेस? भविष्यात काय करायचे आहे? छंद काय? याबद्दल चर्चा करीत होतो. परत वहिनीने उपमा आणून दिला तो झाल्यावर ताटल्या घेऊन जायला आली. एकंदर रागरंग काय आहे ते ती पण उत्सुकतेने पाहत होती. मुलीने पण प्रश्न विचारले मी पण तुझे छंद काय? पुढे काय करायचे आहे इ. प्रश्न विचारले. काही वेळाने आता पुढे काय बोलायचे असा प्रश्न पडल्यावर मी तिला घेऊन बाहेर आलो. बाहेर तोवर त्यांची चर्चा संपली होती. मग सर्वांचा चहा झाला. परत एकदा आम्ही तुम्हाला चार दिवसात कळवतो असे आमच्या वडिलांनी सांगितले आणि त्या सर्वांनी निरोप घेतला. ते गेल्यावर माझ्या मित्राने त्याच्या बाबांना फैलावर घेतले. अहो तुम्ही मुलाचे बाप नसून किती प्रश्न विचारता? त्यावर ते म्हणाले हे बघ सर्व कसे अगोदर विचारलेले बरे. मागाहून कटकट नको. तुला त्यातील काही कळत नाही. हि जुगलबंदी आम्हाला माहित होती त्यामुळे आम्ही हसत होतो. हे सर्व होईस्तोवर ११. ३० झाले होते. आमचे वडील त्यांना (मित्राच्या वडिलांना) म्हणाले बाबा दुपारी चार वाजता अजून एक मुलगी येणार आहे तिच्यासाठी पण थांबा. ते जरा चुळबुळ करत होते तेंव्हा आमचे वडील म्हणाले. अहो संकोच कसला करता? इथेच जेवा आता थोडा वेळ आराम करा आणि चार वाजता मुलगी बघूनच जा. अर्थात ते जेवणाबद्दल संकोच करत होते मुलगी पाहण्यात त्यांना रस होताच त्यामुळे ते तयार झाले. .माझ्या मित्राला सांगितले कि तुझ्या बायकोलाही इथेच जेवायला बोलाव. यथावकाश आमचे जेवण झाले दुपारी थोडी वामकुक्षी झाली म्हणजे आडवे झालो पण गप्पा मारण्यात झोप काही झाली नाही आणि चार वाजता परत आम्ही त्याच खेळास तयार झालो. मध्ये मध्ये आम्ही कालच्या आणि आजच्या मुलीबद्दल चर्चा करत असताना आई म्हणाली मित्राच्या बाबांनी कालची मुलगी पाहिलेली नाही तेंव्हा त्यांच्या समोर कालच्या मुलीची चर्चा नको म्हणून त्या चर्चेला पूर्ण विराम दिला. दुपारी चार वाजता परत तोच खेळ. मुलगी आणि तिचे आईवडील आले. नमस्कार चमत्कार झाले. मुलीचे वडील सरकारी खात्यात कारकून होते. मुलीचे वडील आपल्या मुलीचे करियर कसे उत्तम आहे दहावी बारावीला कसे उत्तम गुण मिळवले मेरिटवर तिने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश कसा मिळवला याचे वर्णन केले. कारकुनाच्या मुलीच्या मानाने त्या मुलीचे यश उत्तमच होते. मुलीच्या वडिलांना मुलीचा सार्थ अभिमान होता. परंतु तसेच यश मी किंवा माझ्या भावाने सुद्धा मिळवलेले होते म्हणून ते थोडेसे अनाठायी वाटले एवढेच. मुलगी चार चौघी सारखीच होती लहान चणीची बारीक बांध्याची अशी होती. केस ही बरे होते. या मुलीला पाहताच हि मुलगी पसंत होणार नाही असे जाणवले. त्यामुळे मी फारसे बोलत नव्हते. अशावेळेस मित्राच्या वडिलांनी संभाषणाची चावी आपल्या हातात घेतली हे फार बरे झाले. त्यातून ती मुलगी मित्राच्या बायकोच्याच मेडिकल कोलेजची निघाली आणि तिने मित्राच्या बायकोबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. म्हणजे पुढची दहा मिनिटे त्या दोघी आपल्या कॉलेजच्या गप्पा मारत होत्या. दहा मिनिटांनी वडिलांनी मला विचारले तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही आत जा. मी तशी काही गरज नाही असे सांगितले. पाच मिनिटांनी त्यांनी परत एकदा विचारले. आपण मी काही गरज नाही म्हणून आपला बाळबोध पणा दाखवला. परत मी काय करतो? मुलीला पुढे काय वाव? हि रेकॉर्ड वाजवण्यात मला आता फारसा रस नव्हता. इकडचे तिकडचे बरेच बोलणे झाले. कांदे पोहे, चहा वगैरे झाले. हि मंडळी साडेपाच वाजता गेली. मित्राच्या कुटुंबाबरोबर गप्पा चालू झाल्या मी त्यःच्या बाबांना म्हटले कि बघा तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला चहा पोहे खायला घातले कि नाही. ते म्हणाले चहा पोहे मिळाले पण ते मुलीच्या घरचे नाही. मी हसत म्हटले तुमच्या मुलाने दिले नाहीत त्याला काय करणार? मला जेवढे जमले तेवढे मी केले. सर्व जण हसले यानंतर त्यांनी निरोप घेतला. आता घरात आम्ही पाच जणच उरलो होतो.अजून तीन मुली पाहून झाल्या होत्या आणि आता निर्णय घ्यायचा होता. क्रमशः
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

खुसखुशीत लेखनशैलीमुळे वर्णन केलेले प्रसंग डोळ्यापुढे घडताहेत असे वाटले. तुमच्या मित्राच्या वडिलांचा कांदेपोहे प्रसंगातील उत्साह पाहून ओळखीतली काही माणसं आठवली.

Sorry,mobilewarun login aahe mhnun Marathi typu shakat nahi pan rahwale nahi mhnun''karkunachya mulichya manane tine milwalele yash tumhala anathayi ka watale? Ulat tine paristhiti pratikul asatanahi Dr banane nishichit kautakaspad ahe n tyacha abhiman tichya banana watane sahjikach ahe ulat tumchyakade alr Already sagle well settle n establish hhote n tumhalA fakt abhyasch kar Karaycha hota so tumche wichar nahi patesh

मुलीचे वडील आपल्या मुलीचे करियर कसे उत्तम आहे दहावी बारावीला कसे उत्तम गुण मिळवले मेरिटवर तिने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश कसा मिळवला याचे वर्णन केले.
मला वाटते अनाठायी हे विशेषण त्या उपवर तरुणीच्या वडलांनी केलेल्या वर्णनाबाबत आहे. तिच्या शैक्षणिक यशाबाबत नाही. त्याबाबत सुबोध यांनी कौतुकच केले आहे.

पियुषा ताई, त्या मुलीला काही चार घरची धुणी भांडी करायची नव्हती कि कोणती नोकरी करीत होती. आम्ही फक्त अभ्यासच केला आणि तिनेच काबाडकष्ट काढले असे झालेले नव्हते. राहिली गोष्ट कारकुनाची आमचे वडील वयाच्या १८ व्या वर्षी कोकणातून मुंबईत आले ते फक्त म्याट्रीक म्हणून. त्यांनी पहिली नोकरी केली ती रेल्वे कारखान्यात शिकाऊ कामगार( अप्रेंटीस) नंतर कामगार म्हणून. यानंतर ते टायपिंग आणि shorthand शिकले आणि कारकून म्हणून खाजगी कंपनीत लागले. त्यांचे लगण झाले तेंव्हा आमची आई पण म्याट्रिकच होती. पुढे वडीलानी दोन भावांची शिक्षणे केली दोन बहिणींची लग्ने केली. यानंतर त्यांनी आपले शिक्षण चालू केले. बी ए एल एल बी करून जमनालाल बजाज मध्ये म्यानेजमेंट केले. यानंतर वडील मोठ्या हुद्द्यावर पोहोचले यानंतर आमच्या आईने आपले शिक्षण सुरु केले. तिने एम ए बी एड केले.आणि शाळेत शिक्षिका म्हणून लागली आणि माझे एम बी बी एस चालू असताना शळेत मुख्याध्यापिका झाली. मी अकरावीत( आणि भाऊ बारावीत) असे पर्यंत आमच्या आई वडिलांचे शिक्षण चालू होते. तेंव्हा कारकून म्हणजे काय आणि किती कष्ट असतात याची आम्हाला माहिती नव्हती आणि म्हणूनच ulat tumchyakade already sagle well settle n establish hhote n tumhalA fakt abhyasch kar Karaycha hota so tumche wichar nahi patesh हे म्हणणे चूक आहे. जसा तिच्या वडिलांना तिच्या शैक्षणिक यशाचा अभिमान होता तसाच आमच्या वडिलांना असायला हरकत नाही. किंवा आम्हाला आमच्या वडिलांचा असायला हरकत नाही. पण तो अभिमान व्यक्त करायची ती जागा नव्हती म्हणून अना-- ठायी हा शब्द वापरला. मी एवढे सगळे लिहिले नसते परंतु आपण सहज सहजी निवडा करून मोकळ्या झालात म्हणून वरचे लिहावे लागले. पण आपुली आपण करी स्तुती तो एक मूर्ख असे समर्थच म्हणून गेले आहेत एवढे बोलून मी आपले भाषण संपवितो.

खरे काका , माझा आक्षेप कारकुनाच्या मुलीच्या मानाने त्या मुलीचे यश उत्तमच होते. या वाक्यावर होता. आइ बाप कुणीही असो " आपल्याला जे जे मिळाल नाही , ते ते आपल्या मुला बाळाना जरुर मिळाव हीच त्याची अपेक्षा न प्रयत्न असतात भले ते कारकुन असो वा मोठे हुद्देकरी :) न मी एवढे सगळे लिहिले नसते परंतु आपण सहज सहजी निवडा करून मोकळ्या झालात म्हणून वरचे लिहावे लागले. मी काही निवडा वैग्रे केलेला नाही फक्त खटकलेल्या वाक्यावर आक्षेप नोन्दवला इतकच :) इतका हक्क तर आहे ना एक वाचक म्हणुन मला ?

>>>>कारकुनाच्या मुलीच्या मानाने त्या मुलीचे यश उत्तमच होते. हे वाक्य वाचताक्षणी मलाही खटकले होते. वडिलांचा नोकरीतील हुद्दा आणि मुलांचे यश यांचा अर्थाअर्थी काय संबंध असतो. कारकुनांची मुले हुशार नसतात? ते सोडा, स्वतः कारकुन हुशार नसतात? एखाद्याची हुषारी त्याच्या हुद्द्यावरून ठरवायची, मुलांची हुषारी, यश वडिलांच्या हुद्यावरून ठरविण्याचा प्रकार खटकला. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. कलाम साहेबांचे 'ऑन द विंग्ज ऑफ फायर' हे आत्मचरीत्र, तसेच, 'एक होता कार्व्हर' वगैरे आत्मचरीत्र वाचली की असे गैरसमज होत नाहीत.

कारकुनाच्या मुलीच्या मानाने त्या मुलीचे यश उत्तमच होते
असो. (कारकुनाच्या मुलाच्या मानाने उत्तमच यश मिळवलेला) आजानुकर्ण

समाजात या सर्व घटना घडत असताना त्याबद्दल लिहणे आणि तेसुद्धा ऐकीव माहितीचा आधार न घेता (फस्ट हैंड )जसे झाले तसे याची नोंद ठेवणे याला फार महत्त्व आहे.+१

खरेसाहेब, तुमचं ह्या धाग्यावरचं लिखाण खरोखरीच वाचनीय आहे. आमच्यासारख्यांसाठी आणि नवोदित विवाहेच्छु मुलग्यांसाठी... माझा प्रेमविवाह झाला. माझ्या आई-वडिलांचा प्रेमविवाह होता. माझ्या आजोबांनी (त्या काळी प्रेमविवाह म्हणत नसत म्हणून) त्यांच्या परिचयात असलेल्या माझ्या आजीशी मागणी घालून लग्न केलं. आता आमच्या आजीने मागणी मान्य केली म्हणजे तो ही एक प्रेमविवाह असं मानायला हरकत नसावी.. माझा मुलगा एखाद्या भारतीय मुलीशी लग्न करेल अशी काही शक्यता वाटत नाही. तेंव्हा आमच्यासारख्या माणसाला तुमच्या ह्या कांदेपोहे-चहाचं भलतंच कौतुक आहे हो! आणि थोडासा हेवादेखील.... सांगायचा मुद्दा हा की हे लिखाण असंच येऊ द्या. तुमच्या लिखाणातल्या एखाद्या शब्दाला (नाकातला एकच केस उपटून काढल्याप्रमाणे) उपटून काढून त्यावर विरोध नोंदवणार्‍यांना खुशाल फाट्यावर मारा... ही विनंती.

पारंपारीक दाखवण्याचा कार्यक्रम करून केलेले विवाहाचीही एक कहाणी-(आणि अनेक उपकथा) अस्तेच असते. हा धागा चारजणांसारखाच तर विवाह केला अशी संभावना करण्यापे़क्षा आपल्या अपे़क्षा काय आहेत आणि आपण त्या अपेक्षा करण्यास लायक्/पात्र आहोत का हे आत्मपरीक्षण झाले तर मी खरी फलश्रुती समजेल.
तुमच्या लिखाणातल्या एखाद्या शब्दाला (नाकातला एकच केस उपटून काढल्याप्रमाणे) उपटून काढून त्यावर विरोध नोंदवणार्‍यांना खुशाल फाट्यावर मारा...
हा सल्ला ज्याम म्हणजे ज्याम आवडला __/\__

खरे साहेब, बाकी तुमचा वरील प्रतिसाद वाचून खरेच चांगले वाटले. मूळ लेखात असा काहीही संदर्भ नसल्याने गैरसमज होतातच. तुमचे इतर लेखन आवडत असल्याने हे स्पष्टीकरण देतोय. त्याचं काय आहे की खरे किंवा कुलकर्णी आडनावाच्या माणसाने एखाद्या कारकुनाच्या शिक्षण किंवा पात्रतेबाबत तुच्छतादर्शक वाटावी अशी टिप्पणी करणे किती अज्ञानमूलक आहे हे वेगळे सांगायला नको. भारतातल्या हिंदू समाजव्यवस्थेत विशिष्ट आडनावाच्या कुटुंबात जन्माला येणे ही किती मोठी अॅसेट आहे हे, अशा अनेक संधी केवळ चुकीच्या आडनावामुळे नाकारल्या गेलेल्या व्यक्तीला विचारा. आमच्या घराण्यात केवळ माझ्या आधीची पिढी नाममात्र म्हणावी अशी पदवीधर होती. त्यामुळे मेरिट लिस्टमध्ये येऊनही आमच्या मातोश्रींना - पूर्वांपार शिक्षण-संपत्तीचा अधिकार नाकारला गेल्यामुळे अगदी एखादी संधी आली तरी ती घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैसा-जमीन अशा साधनांचा तुटवडा असल्याने म्हणा किंवा प्रामुख्याने आजूबाजूला शिकलेल्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचा अभाव असल्याने म्हणा - कारकुनाचीच नोकरी करावी लागली. त्यामुळे उद्या कोणी मला 'कारकुनाच्या मुलाच्या मानाने शिक्षण बरे झालेले दिसते' असे म्हटले तर नक्कीच माझ्या शेपटावर पाय पडेल याची खात्री बाळगावी. राहिला मुद्दा कांद्यापोह्यांचा. तर माझ्या पाहण्यातील आणि नात्यातील माझ्यासकट सर्वांची लग्ने रीतसर कांदेपोहे प्रॉग्रॅम करुनच झाली आहेत त्यामुळे लेखातील अनुभवात फारसे नावीन्य वाटले नाही. (त्यामानाने सूड यांनी मागे त्यांचे आधुनिक अनुभव दिले होते ते जास्त मनोरंजक वाटले) माझ्या प्रतिसादामुळे काहींच्या नाकातले केस जळण्याची शक्यता आहे पण त्यांना गरज भासली तर मी स्वतःच एखाददोन केस उपटून देईन. तुम्ही लिहीत राहा.

कर्ण साहेब "खरे किंवा कुलकर्णी आडनावाच्या माणसाने एखाद्या कारकुनाच्या शिक्षण किंवा पात्रतेबाबत तुच्छतादर्शक वाटावी अशी टिप्पणी करणे किती अज्ञानमूलक आहे हे वेगळे सांगायला नको." कारकून हि एक पदवी किंवा जात नसून मनोवृत्ती आहे. तेंव्हा मी ती विशिष्ट जात किंवा बलुत्याला चिकटवत नाही. कोणत्याही जातीतून आलेला माणूस कारकुनी वृत्तीचा असेल तर तो कसा वागेल हे सर्वाना माहितच आहे. ( आपण काही करायचे नाही आणी आपल्याला संधी जातीमुळे गरिबीमुळे किंवा सामाजिक परिस्थितीमुळे कशी मिळाली नाही किंवा डावलली गेली याबद्दल जिथे तिथे पिचक्या टाकणे हा त्यातील एक भाग) त्यातून आपल्या मुलाने कर्तृत्व दाखवले कि जेथे तेथे तेच उगाळत राहायचे हा हि त्याच वृत्तीचा भाग. तेंव्हा हि एखाद्याच्या पात्रतेबद्दल टिप्पणी नव्हती तर वृत्ती बद्दल होती. लष्करात म्हणतात कि जाट हि जात नसून एक मनोवृत्ती आहे. म्हणून आपल्याला "दाक्षिणात्य जाट" सुद्धा दिसतात. मी सहसा कुणावर टीका करीत नाही.( दुसर्याची रेघ लहान करून आपली रेघ मोठी होत नाही जरी ती तशी झाल्याचे तात्पुरते भासले तरी)

प्रतिसाद द्यायची इच्छा नव्हती पण उगीच तुमचे म्हणणे मला मान्य आहे असा गैरअर्थ निघेल म्हणून नाईलाजाने लिहीत आहे. कारकून ही मनोवृत्ती आहे हे मला खरेच माहीत नव्हते. कारकून आईवडिलांनी केलेल्या संस्कारांमुळे माझीही वृत्ती कारकुनीच झालेली दिसते आहे. आमची आधीची पिढी मॅनेजमेंट, इंजिनियरिंग किंवा वैद्यकीय व्यवयासात नसल्याने हे झालेले दिसते. आता आमची प्रगती तुमच्या मानाने एका पिढीने उशीराच होणार हे उघड आहे. निदान आता आम्ही आमच्या पुढच्या पिढीतील मुलांवर इंजिनियर किंवा एमबीए मनोवृत्तीचे संस्कार करायचा प्रयत्न तरी करु शकतो. आर्थिकदृष्ट्या शक्य झाले तर डॉक्टरी मनोवृत्तीचेही संस्कार करायचा प्रयत्न केल्या जाईल. म्हणजे रुग्णाला गरज नसतानाही कापून पैसे उकळण्याचा व्यवसाय त्याला/तिला सुखाने करता येईल. नाही का? डॉक्टरी मनोवृत्ती यालाच म्हणत असावेत.
कोणत्याही जातीतून आलेला माणूस कारकुनी वृत्तीचा असेल तर तो कसा वागेल हे सर्वाना माहितच आहे.
खरंच माहीत नव्हते. अमुकतमुक व्यक्ती कारकुनी वृत्तीची असते हे तुमचा प्रतिसाद वाचून आजच कळले.
त्यातून आपल्या मुलाने कर्तृत्व दाखवले कि जेथे तेथे तेच उगाळत राहायचे हा हि त्याच वृत्तीचा भाग.
खरंय. बीकॉम होणे आणि कारकुनी करणे यात सांगण्यासारखे काहीच कर्तृत्त्व नाही. आमच्या आईवडिलांना त्यांचे स्वतःचे दाखवण्यासारखे काहीच कर्तृत्व नसल्याने चुकूनमाकून इंजिनियर-डॉक्टर झालेल्या मुलाबाळांचेच कर्तृत्त्व उगाळावे लागते त्याला ते तरी बिचारे काय करणार. (कारकून मनोवृत्तीच्या पालकांमुळे कारकुनी वृत्तीचा झालेला व कारकून वृत्तीच्या आईवडिलांचा अभिमान असलेला) आजानुकर्ण

संपूर्ण सहमत आहे. 'कारकून' ही वृत्ती असते हे मलाही आजच समजले. त्यातून...( आपण काही करायचे नाही आणी आपल्याला संधी जातीमुळे गरिबीमुळे किंवा सामाजिक परिस्थितीमुळे कशी मिळाली नाही किंवा डावलली गेली याबद्दल जिथे तिथे पिचक्या टाकणे हा त्यातील एक भाग) हा कारकूनांचा स्वभाव असतो हा निष्कर्षही धक्कादायकच.

खरे साहेबांचा युक्तिवाद पटलेला नाही... अवांतर :- यांचा पण स्पार्टा होतोय काय ? :)

व्वाव्वा.अतिशय माहितीपूर्ण धागा. पण मी द्विधा मनस्थितीत आहे। फ़क्त तुम्हीच मदत करू शकाल। कारकुनाच्या मुलीच्या मानाने त्या मुलीचे यश उत्तमच होते. माझ्या आधीच्या तिन पिढ्या कारकुनीत गेल्या असल्यास त्या मानाने मी स्वत:ला लै म्हणजे लैच भारी समजावे काय?

"कारकुनाच्या मुलीच्या मानाने त्या मुलीचे यश उत्तमच होते." ह्याचा सरळ अर्थ असा दिसतो की घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून, घरात उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी नसून सुद्धा त्या मुलीने डॉक्टर होणे हे कौतुकास्पद होते. हे खरे साहेबांनी मान्य केले आहेच. राहता राहिला "अनाठायी" ह्या शब्दाचा वापर. जर तेथे खरे साहेबांचे वडील स्वतःच्या, किंवा स्वतःच्या मुलांच्या प्रतिकूल परिस्थितीतील यशाचे वर्णन करीत नसतील, तर त्या वधूपित्याचे असे वर्णन अनाठायी वाटू शकते. अनाठायी म्हणजे खोटे किंवा चुकीचे असे नसून, त्या परिस्थितीत, त्या context मध्ये suitable नसलेले असा अर्थ ह्या लेखात अभिप्रेत दिसतो. ह्यात गहजब करण्यासारखे मला तरी काही वाटले नाही.

@ कर्ण साहेब कारकुनी वृत्ती बद्दल लोकांना अजून वाचायचे असेल तर श्री ज जोशी यांचे लेख आवर्जून वाचावे. जरासुद्धा धोका न पत्करणे, सरकारी नोकरीच करणे, त्यात बदलीची शक्यता असेल तर बढती नाकारणे. आणि मग आमची संधी कशी मारली गेली याबद्दल गळा काढून व्यव्स्थेलाच दोष देणे. लायकी नसताना आपली बढाई मारणे हि कारकुनी वृत्तीचि काही उदाहरणे आहेत. पुण्यात असाल तर पुण्यातच नोकरी पाहणे किंवा मुंबईचा असेल तर मुंबईच्या बाहेरची नोकरी न पाहणे. असे करून वर आपल्यापेक्षा कमी लायकीच्या आपल्या पुढे गेलेल्या माणसांचे उणे काढून बोलणे हीही कारकुनी वृत्तीचिच काही उदाहरणे आहेत . आपले आई वडील कारकून असल्याचा कुणाला जास्त अभिमान असल्याचा दिसतो तर कुणाला न्यूनगंड. त्याला मी काय करणार? मी परत एकच सांगतो कि हि एक मनोवृत्ती आहे. हे काही कुणाच्या हुद्द्याचे वर्णन किंवा परिस्थितीची टर उडवणे नाही. आपल्याला उच्च पदावर जायची संधी जातीमुळे गरिबीमुळे किंवा सामाजिक परिस्थितीमुळे कशी मिळाली नाही किंवा डावलली गेली याबद्दल रडारड करून कोणी आयुष्यभर कारकुनाचे कारकुनच राहणार असाल तर त्याला दुसरे लोक काय करणार. त्यातून जर कुणाला अशा वृत्ती बद्दल अभिमान वाटत असेल तर काय म्हणणार? एखाद्या पाळलेल्या पोपटाला आपल्या पिंजर्याचा अभिमान वाटत असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. बाकी तुम्ही अगोदर खरे आणि कुलकर्णी नावे घेऊन आपले मत व्यक्त केले आहेच. शिवाय मी डॉक्टर किंवा माझा भाऊ इंजिनियर आणि आमचे वडील म्यानेजर असल्याबद्दल वैयक्तिक रित्या टीका केलीत आणि आमची त्यनुसार असणारी मनोवृत्ती (म्हणजे रुग्णाला गरज नसतानाही कापून पैसे उकळण्याचा व्यवसाय त्याला/तिला सुखाने करता येईल. नाही का? डॉक्टरी मनोवृत्ती यालाच म्हणत असावेत इत्यादी दाखवून दिलीत याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आम्ही सर्व काय करतो याबद्दल आपण सविस्तर माहिती मिळवली असेलच तेंव्हा त्यावर वाद नको. कारण तो या धाग्याचा विषयच नाही. @ सर्व मित्रानसाठी मुलीच्या वडिलांबद्दल म्हणयचे तर पहिल्या अर्ध्या तासात जर पंचवीस मिनिटे तुम्ही फक्त आपल्याच मुलीचे कौतुकच करणार असाल तर तुमच्याशी संवाद साधणार तरी कसा? खर तर ते सर्व त्यांनी आम्हाला पाठविलेल्या टिपणात सविस्तर लिहिलेले होते. आणि आमच्या स्थळाचे (माझे) वर्णन रोहिणी मासिकातहि स्पष्ट लिहिलेले होते. ठायी ठायी म्हणजे जागोजागी या सारखेच अनाठायी म्हणजे चुकीच्या जागी इतका साधा सरळ मराठी शब्द मी लिहिला असताना त्याच चुकीचा अर्थ काढून काही लोकांनी राळ उडवली. ज्या घरात आपल्या मुलीचे लग्न जमवणार आहात त्या मुलाचे आयुष्याबद्दलचे दृष्टीकोन काय आहेत? आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या स्वतःच्या उन्नतीच्या काय संधी आहेत? त्या घराची विचारसरणी काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा फक्त आपलीच टिमकी वाजविणाऱ्या माणसाबद्दल काय बोलावे? मुलगा अतिशय चांगला असतानंही जर घरची माणसे बुरसटलेल्या मनोवृत्तीची असतील तर मुलीचे लग्न अशा घरात केल्यास मुलीला त्रासच होण्याची शक्यता आहे. किंवा घरात येणारी मुलगी जर मागासलेल्या मनोवृत्तीची असेल तर घरातील वातावरण बिघडून जाऊ शकते. मिसळपाव वर हा लेख लिहिण्याचे कारण असे मुद्दे मला चर्चेत आणायचे होते. आपले स्वतःचे किंवा आपल्या मुलांचे लग्न ठरवताना काय मुद्दे ध्यानात घ्यायला पाहिजेत याबद्दलची एक चर्चा आणि समाजाचे त्याबद्दलचे दृष्टीकोन काय आहेत याचा मागोवा घेणे हा या लेखाचा हेतू आहे. यात कोणत्याही सन सनाटी घटना नाहीत हे मी पहिल्या लेखाच्या सुरुवातीलाच लिहिले होते. असो

अहो खरे साहेब
शिवाय मी डॉक्टर किंवा माझा भाऊ इंजिनियर आणि आमचे वडील म्यानेजर असल्याबद्दल वैयक्तिक रित्या टीका केलीत आणि आमची त्यनुसार असणारी मनोवृत्ती (म्हणजे रुग्णाला गरज नसतानाही कापून पैसे उकळण्याचा व्यवसाय त्याला/तिला सुखाने करता येईल. नाही का? डॉक्टरी मनोवृत्ती यालाच म्हणत असावेत इत्यादी दाखवून दिलीत याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आम्ही सर्व काय करतो याबद्दल आपण सविस्तर माहिती मिळवली असेलच तेंव्हा त्यावर वाद नको.
मॅनेजमेंट, इंजिनियर, डॉक्टर वगैरे तुम्हाला उद्देशून नव्हते हो. मी स्वतः इंजिनियर आहे. माझे दोन भाऊ डॉक्टर आहेत. सुदैवाने आता इंजिनियर, डॉक्टर वगैरे शिक्षणावर विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. तुम्ही जशी कारकुनी मनोवृत्ती सांगितली तशी मी फक्त डॉक्टरी मनोवृत्ती सांगितली. या दोन्ही मनोवृत्ती व्यक्तींना उद्देशून नाही यावर आपले आधीच एकमत झालेले आहे.

>>>>कारकुनी वृत्ती बद्दल लोकांना अजून वाचायचे असेल तर श्री ज जोशी यांचे लेख आवर्जून वाचावे. जरासुद्धा धोका न पत्करणे, सरकारी नोकरीच करणे, त्यात बदलीची शक्यता असेल तर बढती नाकारणे. आणि मग आमची संधी कशी मारली गेली याबद्दल गळा काढून व्यव्स्थेलाच दोष देणे. लायकी नसताना आपली बढाई मारणे हि कारकुनी वृत्तीचि काही उदाहरणे आहेत. पुण्यात असाल तर पुण्यातच नोकरी पाहणे किंवा मुंबईचा असेल तर मुंबईच्या बाहेरची नोकरी न पाहणे. असे करून वर आपल्यापेक्षा कमी लायकीच्या आपल्या पुढे गेलेल्या माणसांचे उणे काढून बोलणे हीही कारकुनी वृत्तीचिच काही उदाहरणे आहेत . आपले आई वडील कारकून असल्याचा कुणाला जास्त अभिमान असल्याचा दिसतो तर कुणाला न्यूनगंड. श्री. ज. जोशी ह्यांनी कारकूनांविषयी समाजमनांत बरेच विष पेरण्याचे काम केलेले आहे असे दिसते. बरं झालं माझ्या वाचण्यात असे एकांगी पुस्तक कधी आले नाही. माझे वडीलही रेल्वेत कारकून होते, माझी मोठी बहिण महानगरपालिकेत आधी कारकूनच होती, मीही माझ्या इवल्याशा कारकिर्दीची सुरुवात एक कारकून म्हणूनच केली आहे. माझ्या वडिलांचे आणि माझे अनेक मित्र करकून होते/आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा असंख्य वेळा प्रसंग आला. विचारांचे आदानप्रदान झाले. सुदैवाने, श्री. ज. जोशी म्हणतात तसा अनुभव, तशी माणसे माझ्या तरी पाहण्यात आली नाहीत. डॉक्टर, इंजिनियर ह्यांच्या पेक्षा कारकूनांचा आर्थिक स्तर खालचा असतो त्यामुळे पैशांची सतत चणचण असते. पण कुढत जगणं नसतं. आहे त्यात समाधानी जीवन जगलो आहे. शिवाय, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही असेही नाही. कारकून असले तरी वडील रेल्वेत होते आणि रेल्वेकर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च रेल्वे करते. अगदी इंजिनियर, डॉक्टर होई पर्यंत. शिवाय माझ्या ताईने तर कारकूनाची मुलगी असून स्वहुशारीवर शिष्यवृत्या मिळविल्या आणि पदवी संपादन केली. मी सुद्धा स्वतःच्या हिकमतीवर पदवी संपादन केली. कारकून असून ही वडीलांनी बदलीची तमा न बाळगता आपल्या खात्यात काम बदलून बढतीचा प्रयत्न केला. मी स्वतः कारकून असून नुसती बदलीच नाही तर परदेशगमन करून धाडसी पाऊल टाकले. स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरु करून नावारुपाला आणला आणि आज चौपट वृद्धींगत केला आहे. त्यामुळे, तथाकथित 'कारकूनी वृत्ती' माझ्या आजोबांमध्येही नव्हती, माझ्या बहिणीतही नाही आणि माझ्यातही नाही. तसेच आज पर्यंत मी पाहिलेल्या कुणा कारकूनामध्ये, श्री. ज. जोशी म्हणतात तशी, कुठे दिसली नाही.

पेठकर साहेब मला अगदी हेच म्हणायचे होते. कि आपण आणि आपले सगे सोयरे कारकून असून कारकुनी वृत्तीचे नव्हता म्हणून आपण प्रगती करून आयुष्यात बरेच उच्च स्थानी पोहोचलात. आमचे वडील सुद्धा सुरुवातीचे १५ वर्षे कारकूनच होते.पण ते तेथेच अडकून न पडता आपली प्रगती करण्यात यशस्वी झाले.हाच कारकून आणि कारकुनी वृत्ती यातील फरक आहे. कदाचित मला जे म्हणायचे होते ते मी आपणासारख्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरलो हे माझे अपयश म्हणावे लागेल. मी मुळातच म्हटलेले आहे कि मी काही सिद्धहस्त लेखक नाहीतेंव्हा माझ्या भाषेच्या मर्यादा आपण सर्व लोक समजून घ्याल अशी माझी विनंती आहे. तरीही जर माझ्या लिखाणामुळे कुणाच्या भावना ( अनवधानाने) दुखावल्या गेल्या असतील तर त्या बद्दल मी बिनशर्त माफी मागतो.

खरे साहेब. आत्ता कसे बरोबर बोललात. तुमचे येथले यामागचे लिखाण वाचून तुमची एक चांगली व्यक्ती म्हणून प्रतिमा तयार झालेली आहे. (या लेखामुळे ती खराब झालीय असे नाही). कधी कधी माणसाच्या तोंडून चुकीचा शब्द बाहेर पडतो. चुका ह्या होतातच. भाषेच्या मर्यादा सिद्धहस्त लेखकांना देखील कधी कधी पडतातच. कधी कधी आपल्याला काय म्हणायचेय ते नीट मांडता येत नाही. पण समोरच्या बहुतांश जनांना ते वाक्य चुकीचे वाटत असेल तर तात्काळ माफी मागून टाकावी. ३०-३५ प्रतिसादानंतर तरी माफी मागावीच लागली ना ? मग हेच वाक्य अगोदरच लिहिले असते तर नंतर होणारे वाद टाळता आले असते. पण आपण आपल्याच चुकीला बरोबर म्हणत बसलो की मग समोरच्याला जास्त चीड येते. असो. काय की मी शेंगा खाल्या नसल्या तरी मला कधी कधी टरफले उचलावी लागतात. त्याबद्द्ल कमीपणा किंवा नाराज होण्याचे कारण नाही. नाराज न होता लिहित रहा. पुढील लेखनास शुभेच्छा !

सहमत. खरे यांचे लिखाण आवडते. झालेला वाद विसरुन जाऊन पुढील भाग येऊ द्या.

निदान मला तरी तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थच तुमचा लेख वाचल्यावर जाणवला. कुणाबद्दल तुच्छता तुमच्या लेखातून जाणवली नाही. त्यामुळे तुम्ही लिहिता तसेच छान लिहीत रहा.

धन्यवाद डॉक्टरसाहेब, खुपवेळा खुपजणांना जे म्हणायचे नसते तेच चुकून ध्वनीत होते आणि गोंधळ वाढत जातो. असो. माझ्या भावना वगैरे कांही दुखावल्या नाहीत पण 'कारकूनी वृत्ती' हा शब्द हिणकस आणि अनावश्यक वाटल्याने मी निषेध नोंदविला. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या वाईट वृत्तीची माणसे असातच. एखादा डॉक्टर गैरव्यावसायिक असेल तर लगेच ही 'डॉक्टरीवृत्ती' आहे असे म्हणणे जसे चुकीचे आहे तसेच 'कारकूनी वृत्ती' हा शब्द चुकीचा आहे. असो. माझ्या मनांत अजिबात किल्मिष नाही. आपण आपले अनुभव लिहीत राहा. वाचनिय असतात. धन्यवाद. हा विषय माझ्याकडून संपलेला आहे आणि तुमच्या पुढील लेखांना वाचायला मी सिद्ध झालो आहे.

आता पुढील लेखन जरा रोम्यांटिक प्रकारात मोडणारे आले म्हणजे सगळे वाद मिटतील अशी आशा करते. ;) आम्ही योग्य मुलगी मिळाल्यावेळेचे वर्णन वाचण्यास उत्सुक आहोत.