Welcome to misalpav.com
लेखक: चिनार | प्रसिद्ध:
पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते. एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा." समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?" ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने" आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ? काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या. त्यावेळी तोच मित्र त्यांना म्हणाला," बाई, जरा लवकर येत जा." हे ऐकून त्या तावातावाने म्हणाल्या," मी बाई दिसते होय रे तुला ?" मित्र परत तितक्याच निरागसतेने म्हणाला," तुम्ही बाईचं तर दिसताय. एव्हढं काय झालं?” बाईंचा राग काही शांत होईना. त्या म्हणाल्या," मावशी म्हणायचं. उद्यापासून येणार नाही बाई म्हणणार असशील तर!" मित्र तेंव्हा शांत बसला पण ती घराबाहेर जाताच माझ्यावर उखडला," त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे? प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ नव्हतं. पण मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो," अबे पुण्यात बाईले 'बाई' नसते म्हणत. मावशी म्हना लागते. बाईचा अर्थ वेगळा होते इथं!" त्यानंतर तो जे बोलला ते इथे सांगण्यासारखं नाही ! ही गोष्ट अधूनमधून मला आठवतंच असते. कारण पुण्यात आल्यापासून आमच्या भाषेचा आणि प्रांताचा उद्धार झाल्याशिवाय एकही दिवस जात नाही. पुढच्या लिखाणात "आम्ही" / "आमचं" वैगेरे शब्द जास्त आढळले तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे दोन शब्द पुण्यात "मी" / माझं" च्या ऐवजी सर्वनाम म्हणून वापरण्यात येतात. इथेच खरी गम्मत आहे. एरवी चहासुद्धा कोणी शेयर करणार नाही पण "आमचं" वैगेरे शब्द हमखास वापरतील. असो. तर या उद्धार वैगेरे प्रकाराला आता आम्ही चांगलेच सरावलो आहोत. समोरच्याचा उद्धार करायला सुद्धा आता आम्ही मागेपुढे पाहत नाही. तसं वाद घालणं आम्हाला फारसं आवडत नाही. पण परप्रांतात गेल्यावर तिथली भाषा, चालीरीती शिकून घेतल्या पाहिजेत असं म्हणतात. या उद्देशाने पुण्यात आल्यावर आम्ही वाद घालणं शिकून घेतलं. आता वाद कोणत्याही विषयावर होऊ शकतो. आता हेच बघा ना, इथल्या लोकांना आमच्या प्रांताची ओळख म्हणजे "शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रांत" अशी आहे. आणि त्यांच्यासाठी तो चेष्टेचा विषय आहे. "आत्महत्या का करतात रे तुमच्या इथले शेतकरी?", कंपनीतल्या एका बाईंनी( मावशींनी असं वाचा!) मला विचारलं. मला वाटलं त्या गांभीर्याने विचारत असतील. मी म्हणालो," सतत दुष्काळ असतो तिकडे. पीक फारसं येत नाही. पिकलं तर भाव मिळत नाही. कर्जबाजारी होतात बिचारे. दुसरा काही पर्याय दिसत नाही त्यांना. मग करतात आत्महत्या" यावर त्या म्हणाल्या," पुण्यातही घर घेताना कर्जबाजारी व्हावे लागते. म्हणून काय सगळे आत्महत्या करतात का ? मूर्ख आहात तुम्ही लोकं! कधी बाहेरचं जग बघितलेलं नसते." उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला. आणि त्यांना म्हणालो, " तुम्ही खूप जग बघितलेलं दिसतंय. या नकाशावर पुणं सोडून इतर किमान दहा जिल्हे तरी दाखवा !" थोडा विचार केल्यावर त्यांनी मुंबई दाखवलं. बाकी वाद अजूनही सुरूच आहे. ह्यात त्यांची काहीच चूक नव्हती. कारण पुण्यातल्या लोकांना कधी नकाशा बघण्याची गरजच पडत नाही. त्यांच्या लेखी येरवड्याच्या पलीकडे मराठवाडा आणि हडपसरच्या पलीकडे दक्षिण भारत सुरु होतो ! त्यामुळे नकाशात कशाला पाहायचं? एका सदाशिवपेठी पुणेकराने तर मला सांगितले होते की , अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे ३ शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मी त्यांना म्हटलं," काका ,या हिशोबानी तर पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना!" त्यादिवसापासून ते मला भेटलेच नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल की पुण्यातले लोकं मुळातच संकुचित विचारांचे आहेत वगैरे वगैरे . पण म्हणतात ना , दिसतं तसं नसतं. संकुचित तर सोडाच पुण्यासारखी खुल्या दिलाची लोकं पृथ्वीच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. समोरच्याचा अपमान सुद्धा ते खुल्या दिलाने करतात. अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आता हेच बघा ना,समजा एखाद्या पुणेकराच्या घरासमोर तुम्ही गाडी पार्क केलीये. तर फक्त चाकातली हवा सोडून तो शांत बसणार नाही. गाडीवर एखादी चिट्ठी लिहून ठेवेल. " पुढल्यावेळी गाडी घरासमोर नव्हे तर समोरील मोकळ्या जागेत पार्क करा अन्यथा चाकातील हवा सोडून जागा मोकळी करण्यात येईल" पुण्यात आल्यावर आणखी काही गोष्टी शिकायला मिळाल्या. एक म्हणजे, विषय कोणताही असो त्याचा शेवट नेहमी "आम्ही" / "आमचं" असं करून स्वत:च कौतुक करून घेणे! जागतिक विषयसुद्धा हे लोकं वैयत्तीक पातळीवर आणू शकतात. उदा. काश्मीर सीमाप्रश्नावर जर चर्चा सुरु असेल तर शेवटी," म्हणूनच घर भाड्यानी देताना आम्ही लेखी करार करून घेतो. उद्या उठून भाडेकरयाने घरावर हक्क सांगायला नको." असं ऐकू येतं. दुसरी म्हणजे , स्वाभिमान या शब्दाच्या अर्थावर पुणेकरांच एकमत आहे. 'दुसर्याशी भांडताना कामात येतो तो स्वाभिमान'. याविषयी एका पुणेरी मित्राने मला सांगितलं होतं,"आम्हाला अन्याय सहन होत नाही रे. आणि तुम्हाला वाटतं आम्ही भांडतोय. जी गोष्ट आमची आहे त्यावर तुम्ही हक्क सांगू नका". आता ही चर्चा कंपनीत मी त्याच्या खुर्चीवर बसलो होतो यावरून सुरु होती. अन्यायाची इतकी व्यापक परिभाषा टिळकांना पण उमगली नसेल!! पुणेकरांच खाद्यप्रेम तर सर्वश्रुत आहेच. पण त्यातही स्वाभिमान डोकावू शकतो. उदा. आम्ही आणलेला आंबा हाच अस्सल हापूस आहे हे सिद्ध केल्याशिवाय त्यांना हापूस गोड लागतंच नाही. कुछ भी करनेका लेकिन इगो हर्ट नही करनेका हा संवाद पुणेरी पगडीतल्या सुपीक डोक्यातुनच आला असेल. काहीही असो. पण आमच्या दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे. आता आम्ही राहतो तो भाग पुण्यात येतो की नाही किंवा भाकरी फक्त पुण्यातच कशी चांगली मिळते हे वादाचे विषय होऊ शकतात. पण त्यासाठी पुणेकर आहेतंच. तूर्तास भाकरी गोड मानून घेणे एवढेच आमच्या हातात आहे!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

व्वा ! सुंदर लिखाण. शब्दाशब्दाशी सहमत. पुणेकराना संकुचित म्हणताना डिक्षनरी सुद्धा संकोचेल. रच्याकने तुम्ही ज्ञानप्रबोधनी समोरच्या त्रिवार " जिवाला खा " म्हणणार्‍या अनरसेंचे सामोसे खाल्लेत का कधी? एखाद्याला तीन तीन वेळा खा म्हणणारे पुणेकर संकुचित कसे हो? शंका : सामोसेवाले अनरसे "अनरसे" का बनवत नाहीत हो?

पुण्यातल्या कारकिर्दीत य वेळा या दुकानावरून जाऊन पण कधी खाणं जमलं नाही… प्रत्येक वेळी दुकानवाले जिवाच्या आकांतानी 'जिवाला खा' असं आग्रहानी ओरडायचे आणि गंमत वाटायची. पुढच्यावेळी पुण्याला गेल्यावर जिवाला खाण्यात येईल :) लेख सुन्दर. बाकी पुणेकर नसूनही पुण्यनगरी मला फार फार आवडते.

त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे? चिनार भाऊ , मले मायावाले ८ वर्ष आठोले पुण्यातले!!!! बापा काय काय नमूने भेटत एक एक!!! सादा मेस वाला बी सायचा उपकार केल्यावानी जेऊ घालत असे!!! मींन पैल्याच् दिवशी मेस मंदी भेंडी ची रस्सा भाजी खाऊन चिल्लवलो होतो थ्याच्यावरी म्हनले "सायचा शेमडात शिजोली का हे भाशी!!!!" बाकी थुमी कुकल्ड्ले हात?? म्या बी "तुमच्याच् एरियातला" हाव बहुतेक!!!

चिनार भाऊ माया लायन्या काकाचे घर हाय न बापा उमरोती ले , आमचा बुडा बी एचव्हीपीएम् अन ताऊ चा पट्टशिष्य वह्य!!! लै पैले नमुन्यात घर होते इकले ते आमच्या आबाजीनं

अहो स्पा अन्नाला नावे ठेऊ नये ह्या कायद्यात आचारी अन वाढप्यांस शिव्या देता येतील असली कायदेशीर पळवाट असते तीच वापरली !!! ते प्रकरण म्हणजे ओबड़धोबड़ चिरलेली भेंडी नावापुरती हिरवी मिर्ची अन चाळीस पन्नास मुठी साखर घालुन शिजवलेले गरगाट होते!!! आता काय सांगा अजुन!!! जौद्या एक लेखच लिहितो पुण्यातल्या मेस ह्या मामल्यावर

जौद्या एक लेखच लिहितो पुण्यातल्या मेस ह्या मामल्यावर
बाकी मेस हा स्वतंत्र PHD करण्याजोगा विषय आहे, पुण्याची असो व मुंबईची लिहा लौकर

अहो खायच्या गोष्टी त्या … त्यात कसला प्रांत… प्रत्येकाची आपापली खासियत … बर एकतर ती मेस पुणेरी माणसाची कशावरून … म्हणजे तुम्ही म्हणाला तसे जे बाहेरून पुण्यात येउन पुणेरी झाले त्याचीही असू शकते … आणि दुसरे म्हणजे हल्ली पुण्याच्या चौका-चौकात दिसणाऱ्या खानदेशी खानावळीत पण असे संवाद ऐकू येतातच कि …. पुरणपोळी च्या नावाखाली फक्त पुरणच द्यायचे होते तर गोल थापायचा उपद्व्याव कशाला म्हणून

अहं ! अहो कहर मालक स्वतः पुण्याचे होते ! म्हणुन सांगितले ! भेंडी ची (जुन झालेल्या भेंडीच्या दाण्याची) आमटी मलाही माहिती आहेच पण ते निगुतीने करायचे प्रकरण झाले मेस मधल्या भुकेल्या पोरांवर करायचे प्रयोग नाही!! म्हणुन जास्त फील झालेले इतकेच

उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला.. ह्याहिले अकोला म्हंजे धुळे जिल्ह्यात वाट्टे. अन सारा वर्हाड आन विदर्भ म्हन्जे फक्त नक्षल्याइचा भाग वाटते. (ते पानिपत म्ह्णतात ते पुण्यात कुठेशी आल हो :)) बाकि ते भयकान्याच्या ऐवजी भयताड जरा सुट होते ते पाह्यता काय ?

तसही हल्ली पुण्यामध्ये राहताना अस्सल पुणेकर लोकांशी संबंध कमीच येत असेल. बाहेरील लोकांचे प्रदूषण वाढले आहे ना :-) . पूर्वीच्या काळी ( २०-३० वर्षापूर्वी) असेल असे काही तरी पुणेरी स्वाभिमान वगैरे . सध्या लोक पोटापाण्यासाठी पुण्यामध्ये येतात ( जसे भैय्ये मुंबई मध्ये येतात ). दिवस भर काम करतात , मोल मध्ये शॉपिंग करतात ( हो सर्व स्तराममधले) , मल्टीप्लेक्स मध्ये पिक्चर बघतात . आणि इथे कुठेही अस्सल पुणेकर येत नाही :-)

अहो पेठे बाहेर पडायची तयारी नसलेले लोक आहेत म्हणुन कंपन्या आम्हाला ऑफर लेटरे आमच्या (विदर्भातल्या बारेका) कैंपस मधे येऊ येऊ देऊन जातात!!! अन तसेही आम्हाला आदर अन प्रेम उपनगरीय पुण्याचेच जास्त!!! कारण आम्हाला आसरा संधी अन यश इथेच घावले!!! भाषेचे म्हणाल तर बोली भाषेला नाके मुरडून इंग्रज लोकांनी प्रमाणित केलेली भाषा हातच्या अनुस्वारांची खैरात करत शुद्ध शुद्ध म्हणुन नाके उडवत वरतुन "आजकाल मराठी चे दिवस गेले" असे आप्पा बळवंतात उसासे सोडणे असले प्रकार करणाऱ्यांस आम्ही सीरियसली घेत नाही, उरता उरला जागेचा प्रश्न तर मार्केट रेट ने घ्या आधी पूर्ण पुणे विकत!!! मग बघु जागा खाली करायचे!!! ताक :- हीच विचित्र भाषा असलेल्या प्रांतातुन आलेल्या वसंतराव देशपांडे, सुरेश भट, आनंद मोडक, महेश एलकुंचवार अन असल्याच किती तरी दिग्गज लोकांनी गाड्या वेड्यावाकड्या चालवत तथाकथित शुद्ध भाषा वापरत जागेचे भाव वाढवत पुण्याचे नाव रोशन केले!!!

कंपन्या आम्हाला ऑफर लेटरे आमच्या (विदर्भातल्या बारेका) कैंपस मधे येऊ येऊ देऊन जातात!!!
एवढंच आहे तर तिकडे (विदर्भातल्या बरंका) एखाद्या कंपनीत ऑफर लेटरे घेवून चिटकायचं ना! यवढ्या लांब यायचा कशाला त्रास घेतला बरे? त्या दिग्गज लोकांना सांगायचं इथंपण एखादी कंपनी टाका म्हणून.

फुकाचे सल्ले देत "ह्या पुढे अनुयुद्ध टाळायाचा एकच उपाय" वगैरे आम्ही करत नसतो तो पुणेरी बाणा(?) आहे!! मिळेल तिथे भाकरी कमवणे हे सुलभ आहे त्यापेक्षा!! दुर जायला आम्ही घाबरत नाही ! असोच!!

सोन्याबापू , अहो थंड घ्या राजेहो. कायले पालथ्या घड्यावर पाणी ओतू राहिले ? बाकी मिळेल तिथे भाकरी कमवणे हे सुलभ आहे त्यापेक्षा!! दुर जायला आम्ही घाबरत नाही या वाक्याला सलाम !

आपल्या इकळला उन्हाळा अन नसांतली तर्री "थंड" प्रकृती ची नाही रायते न भाऊ!! पर जाऊ द्या तुम्ही म्हनू राहिले त आपुन शांत राहु!!

चला काडी टाकायचा परिणाम झाला. :) मी पुण्यातला आहे हे तुम्ही गृहीत धरलंय तर! बाकी पुण्याच्या, मुंबईच्या, कोल्हापूरच्या, मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या नसातली तर्री एकच असते. उगीच छाती बाहेर काढून चालू नका. मोठमोठे "गरम" प्रकृतीचे लोक आम्ही असले आम्ही तसले म्हटलं की हसायला येतं. गेले हो ते दिवस तलवारबाजी करायचे.

अशी लेकरे स्वताच गाव भाकरी साठी सोडतील तर तिकडची परगती कोण करेल बे… मग "माया गावे शेतकरी मरते नि मी इथे ६०० km वर पश्चिम महराष्ट्रात भाकरी खात तयाचीच उनिधुनी काढते"

या कामात परप्रांतिय पुढे आहेत (हे मी पुण्याबाहेरच्यांना म्हणत नाही, महाराष्ट्राबाहेरच्यांना म्हणत आहे, उगा घोळ नको)

ओ काय शिस्त वैगरे आहे का नाही? आता कुठे वामकुक्षीतनं जागे होतायेत लोक!! जरा चहा वैगरे होऊ द्या आणि मग या ते "जागे व्हा, जागे व्हा" करत.

अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आं????? तुम्ही दगडुशेठ् गणपतीचे पुणेच म्हणताय ना किंवा शनिवारवाड्याचे पुणे? इथे किमान शब्दात कमाल अपमान करतात. शब्दांचा मुक्तहस्ताने वापर करणारे ते तुमचे पुणे कुठलेतरी वेगळे असावे.

छान आहे लेख. बादवे..
दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे.
भाजी भाकरी ? आम्ही तर ऐकलं होतं की शिक्रण, मटार उसळ वगैरे...

रोज दोन वेळ शिक्रण, मटार उसळ वगैरे????? काय कुबेराने खजिना वगैरे रीता केला की काय? श्रीमंती ओसंडुन वाहते आहे नुसती.

या यशस्वी टोमण्याबद्दल श्री. मृत्युन्जय यांचा प्राध्यापक येरकुंडकरांच्या हस्ते श्रीफळ आणि महावस्त्र देवून शनिवारवाड्यावर सत्कार करण्यात येत आहे.

प्रोफेसर मृत्युन्जयांचा सत्कार म्हणजे साक्षात विद्वत्तेच्या सूर्याचा सत्कार. आजचा दिवस पुणे महानगराच्या इतिहासात जस्ती अक्षरांनी तरी लिहिला पाहिजे.

आमच्यात श्रीफळ आणि महावस्त्र असे लिहितात. आजकाल पुणेरी पगडी पण असते सत्कारासाठी, ती तेवढ्यापुरतीच उरली आहे आता.

नवीन बंगलाच बांधलाय. "पश्चिमेकडचा वारा, पूर्वेचं ऊन, सगळं आटोम्याटीक" "वरवंटा पण डोक्यात पडायची सोय होतीय.. या बघायला एकदा.. मजा दाखवतो."

बदलाचा तपशील "संपादक मंडळ" या आयडीला किंवा संपादक मंडळापैकी कोणत्यातरी आयडीला / आयडींना व्यनि करा. किंवा बारीकसा बदल असेल तर इथेच सांगा.

बदल म्हणजे आख्ख्या लेखाएवजी टिंब करायला सांगतिल आता ते.