Welcome to misalpav.com
लेखक: आकाश खोत | प्रसिद्ध:
आधिचे भाग : (भाग १)(भाग २) काही दिवस असेच गेले. तिने आता ऑफिसला जायला सुरुवात केली होती. जाताना येताना, ऑफिसमध्ये सगळ्यांच्या बदललेल्या नजरा तिच्या लक्षात येत होत्या. काहीजण सहानुभूतीने वागत होते. काही जण तुच्छता दाखवत होते. त्यात काही स्त्रियापण होत्या. अगदी मोजके काहीजण काही झालं नाही असं दाखवून तिच्याशी आधीसारखं वागायचा प्रयत्न करत होते. ती तो, तिचे घरचे यापैकी कोणीही बाहेरच्यांना खरं काहीही सांगितलेलं नसलं तरी सगळ्यांनाच सर्व काही कळलेलं होतं. कसं काय कोणास ठाऊक. तिलाच काय, तिच्या बाबांना आणि त्याला ऑफिसमध्ये, तिच्या आईला सोसायटीमध्ये असाच अनुभव येत होता. सगळ्यांचीच वागणूक बदललेली होती. काहीजण त्यांना उघडपणे टाळत होते. एक दिवस तिच्या बॉस, आणि एच.आर. मधला एकजण, यांनी तिला मिटिंग रूम मध्ये बोलवून थोडा वेळ चर्चा केली. त्यांनी तिला सांगितलं कि, तुझ्यासोबत काय झालं याची आम्हाला कल्पना आहे. पण आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुझी नोकरी पूर्णपणे सुरक्षित आहे. आपली कंपनी पुढारलेल्या विचारांची आहे. तू बिनदिक्कत इथे काम कर, आणि काही अडचण असेल तर आम्हाला येउन सांग. तिला मनात वाटत होतं, नोकरी सुरक्षित आहे म्हणजे काय? अशा मुलींना नोकरीवरून काढण्याचा पर्याय असतो कि काय कंपनीकडे? उपकार थोडीच करत आहेत हे माझ्यावर? आणि असे पुढारलेले विचार असतील तर ते असे स्वतःचीच पाठ थोपटून दाखवायचे कशाला? पण ती हे उघडपणे बोलली नाही. उलट नंतर तिला त्यांनी पाठींबा दिल्याचं बरंच वाटलं. कारण ऑफिस मधले काही लोक तिच्याशी नीट वागत नव्हते. ती त्यांच्या टीममधून निघून जावी, असंच त्यांचं वर्तन होतं. पण ती अशा दबावाला बळी पडणार नव्हती. आणि त्यांच्या पाठींब्याने तिचा धीर वाढला होता. नाईलाजाने त्यांनी हळूहळू याची सवय करून घेतली. हा नशिबाचाच भाग अशी त्यांनी स्वतःची समजूत काढली. तिने खूप धीर आणि हिम्मत दाखवली होती. ते तिला एका मानसोपचारतज्ञाकडे न्यायचे. त्याने सुद्धा तिचं कौतुक केलं. खूप कमी मुली यातून इतक्या लवकर बाहेर पडतात, आणि नव्याने जगायला सुरु करतात. खूपजणी आत्महत्या करतात. पण तुमची मुलगी खूप धीराची आहे, असं सांगून त्याने तिची पाठ थोपटली. खरं सांगायचं तर आत्महत्येचा विचार तिच्या मनात सुद्धा येउन गेला होता. पण आईबाबा आणि तो, त्यांच्याकडे बघून तिने तो दूर केला होता. सावकाश गाडी रुळावर येत होती. आणि एक दिवस तिच्या आईबाबांनी लग्नाचा विषय काढला. त्यांना आता लवकर सगळं उरकलेलं बरं असं वाटत होतं. त्याने काहीतरी थातूरमातुर उत्तरं दिली. हे तिच्या लक्षात आलं आणि तिने त्याला वरच्या खोलीत नेलं आणि विचारलं. "काय चाललाय तुझ्या मनात?" "काही नाही." "खोटं बोलू नकोस. समजतं मला. आई बाबांनी आत्ता विषय काढला, तर नीट काही बोलला का नाहीस?" "अगं तसं काही नाही." "मग कसं?" "अरे म्हणजे घाई काय आहे? आपण विचार करूयात ना." "विचार कसला? आपण दोन्ही आई बाबांना सांगितलेलं आहे. आणि ठरलं होतं न आपलं. अजून काय विचार करायचाय?" तो शांत राहिला. "अरे आई बाबांना आता लवकर सगळं मार्गी लागावं असं वाटतंय. काही प्रोब्लेम आहे का? काय झालंय?" "आईबाबा म्हणत होते कि पुन्हा विचार कर म्हणून." ती आता चिडली होती. तिला मनोमन याची अपेक्षा होतीच. "त्यांना मी सून म्हणून नकोय का? मग तुझा काय विचार आहे?" "माहित नाही. मला वेळ लागेल विचार करायला." "माहित नाही? आणि वेळ लागेल काय वेळ लागेल. तुलापण उष्टावलेली मुलगी बायको म्हणून चालणार नाही वाटतं." "असं नको बोलूस यार." "असंच आहे ते. असं काही आहे तर उघड उघड सांगत का नाहीस?" "अवघड आहे हे सगळं. आई बाबा एक म्हणतायत. मला माझं काही कळत नाहीये." "या सगळ्यात माझ्यापेक्षा अवघड आहे का तुला काही?" तो पुन्हा शांत राहिला. "माझ्याशी लग्न केलंस तर तुला बायको म्हणून लाज वाटेल का माझी?" "असं अपमानास्पद नको बोलूस ना." "अपमान तू करतोयस माझा." "आपण मित्र म्हणून तर आहोतच ना, एकमेकांच्या सोबत." ती आता खूप संतापली होती. "तुझ्या सारखा मुलगा मला मित्र आणि काहीही म्हणून नकोय आयुष्यात." त्यांचा आवाज ऐकून आईबाबापण वर आले होते. "निघ इथून. आणि परत येऊ नकोस कधी." "अगं ऐक तर. समजून घे ना जरा. मला विचार तरी करू दे." "काही विचार करू नकोस. माझा विचार झाला आहे, तू नको आहेस मला. माझ्यावर बलात्कार करणाऱ्या त्या हरामखोरांपेक्षा तूच जास्त दुखावलं आहेस मला. बाबा याला जायला सांगा इथून. आमचं लग्न होणार नाही." त्यांनी बोलून दाखवलेलं नसलं तरी हि भीती कधीची त्यांच्या मनात होतीच. तो मान खाली घालून निघून गेला.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया