Welcome to misalpav.com
लेखक: अत्रन्गि पाउस | प्रसिद्ध:
शालेय जीवनातील काही शिक्षा आठवल्या ....इयत्ता ६ वी ... (शिकवलेला धडा)-अस्मादिकांची जाहीर शंका ?? ....नतीजा १. (गांधीजी देशाला वडिलांसारखे त्यामुळे त्यांना 'राष्ट्रपिता')-मग राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा नवरा ?? ...बाकावर उभा दिवसभर २. (सर्व मुलींना बहिणीचा मान द्या..त्या तुमच्या बहिणी आहेत) - मग मोठेपणी आम्ही लग्न कुणाशी करायचे ?? ... २ दिवस वर्गाबाहेर उभा ३. (पृथ्वी शिवाय कुठेही जीव सृष्टी नही असू शकत नाही, कारण बाकि कुठे ऑक्सिजन व पाणी नही) - ऑक्सिजन व पाणी हि पृथ्वीवरील सजीवांची गरज आहे अन्य कुठे सजीवांना अन्य काही लागतं असेल उदा मिथेन व अन्य काही द्रवपदार्थ .......घरी चिट्ठी, वर्गात कान उपटणे व इज्जत का फालुदा ..
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुमचा आयडी असा आहे! माझे वडील आमच्या शाळेत मुख्याध्यापक आणि आई आणि एक नात्यातले काका काकू आमच्या शाळेत शिकवत असल्याने गुणी बाळ होण्यापलिकडे मला काही पर्यायच नव्हता!

अगदी अगदी पैसातै.. आमचीपण तुमच्यासारखीच गत होती बघा.. पण अत्रन्गि पाऊस, तिसरा प्रश्न आमालापण पडला होता. आमच्या बाईंनी 'ते तू कॉलेजला गेल्यावर कळेल' म्हणून आमची बोळवण केली होती, ते आठवले. :)

वयाच्या मानाने शंका छानच...पण शंकाच्या मानाने शिक्षा जास्तच कठोर वाटतात... बाकी तिसरी शंका एकदम भारी...खरे म्हणजे मास्तरांनी कौतूक केले पाहिजे. कदाचित कुठलातरी वेगळा राग तुमच्यावर काढला असावा किंवा नावाप्रमाणेच तुमचा अत्रंगी असा खरोखर लौकीक असावा.. [ अशा अत्रंगी/दंगेखोर मुलांनी काही चांगले काम किंवा अभ्यास केला तरी मास्तर लोकांचा मारच खातात...नववीत असताना माझ्या वर्गातल्या एका दंगेखोर मुलाने ठरवून खुप अभ्यास केला आणि गणितात ४० पैकी ३६ मार्क्स काढले (पुर्वी याच्या निम्याच्या आसपास मिळायचे) तर आमच्या गणिताच्या कर्दनकाळाने त्याला तू कॉपी केली असशील या शंकेने झोडपले. बिचार्‍याने नंतर शाळेत कधीच असा प्रयत्न केला नाही. पण आज तो मर्चंट नेव्हीत आहे. कधी भेटलो तर हा विषय निघतोच].

शाळेतली शिक्षा म्हटल्यावर एकच आठवते. नववी ईयत्तेत गेल्यावर त्या मला बसायला मिळालेला बाक मोडका होता. मी तक्रार केल्यावर नवीन बाक मागवला गेला. शाळेच्या शिपायाने नवीन बाक आणल्यावर मी आणि माझा पार्टनर [ त्या बाकावरील भागीदार ] आम्ही दोघे मुक्त नाचलो... ते वर्गशिक्षकांनी बघितले आणि आम्हाला लाथा बुक्क्यांनी तुडवले. पाठीत गुद्दा घातला की आम्ही वाकायचो .. की हे जॉन रॅंबोसारखा अपरकट मारायचे हनुवटीच्या खाली.. मग आमी उभे राह्यलो की पुन्हा पाठीत गुद्दा. अक्षरश: सुजवले आम्हाला आणि मगच त्या नवीन बाकड्यावर बसायला मिळाले... ही मारहाण करणारे आमचे ते वर्गशिक्षक दुसरे तिसरे कुणी नसून विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे होते.... आता संतवाणी सांगताहेत.. त्यावेळेला स्वत:च मंबाजी झाले होते...

इ. ६ गणिताच्या मास्तरान्ना, सर तुमच चुकलय अस भर वर्गात उभारुन सान्गितल. भर वर्गात बुकलुन काढण्यात आले ;) व नन्तर वर्गाबाहेर अन्गठे धरुन उभा राहिलो.... इ. ९ द्रव्याच्या अवस्था ४ असतात अस विज्ञान च्या सरान्ना सान्गितल होत. (त्या काळी बाळ फोन्डके,नारलिकर अती वाचल्याचा परिणाम.) पट्टीने मारहाण :crazy:

शाळेत कोणी कोणाचा आणि किती मार खाल्लाय याच्या आठवणी अजुन निघतात शाळा मित्र जमले की. मी ८ वी मध्ये असताना एकदा वर्गात खुप गोंधळ चालु होता आणि वर्गशिक्षिकांच्या हाताबाहेर गेला होता.तो थांबवायला आमचे एक प्रसिद्ध मारकुटे मास्तर आले आणि चुपचाप बाहेरुनच पहात राहीले. ३-४ सावजे हेरली आणि मग वर्गात येउन एकेकाला बदडले. वर्गात स्मशानशांतता पसरली आणि ते बाहेर जात असतानाच...मला कसे काय माहीत हसु आले. त्यानंतर मी जो अभूतपुर्व मार खाल्लाय त्याला तोड नाही :(

मी पाचवीत एकदाच मार खाल्ला पण त्याचा बदला, खतरनाक घेतला,गणितात कायम पैकीच्या पैकी मार्क मिळायचे,एकदा क्लास चालु असताना सरांनी, शेजारच्या मुलगा बोलला,पण मीच बोललो असे समजुन काहीही न विचारता पट्टीने छड्या दिल्या होत्या, त्या सरांना शिकवताना टेबलावर कडेला टेकुन बसायची सवय होती,दुसर्‍या दिवशी काही नाही फक्त मधल्या सुट्टीत त्या प्लॅस्टीक टेबलचा एक पाय त्याच्या खोबणीतुन काढुन फक्त आधाराकरिता टेकवुन ठेवला,बरोबर अपेक्षित परिणाम घडुन आला,सर मधल्या सुट्टीनंतर शिकवायला आले व नेहमी प्रमाणे टेबलावर टेकले त्याबरोबर धडामधुम,सरांचा हात गळ्यात २१ दिवसांकरिता. मात्र हे कुनाला कळले तर आपले काय होइल याची जाणिव होवुन वाईट फाटली होती.नशिबाने वाचलो.

इयत्ता ७ वी मराठी चा तास चालू होता. नक्की आठवत नाही पण मारकुटे मास्तर कोणत्या तरी लेखकाचा विज्ञानप्रणीत धडा शिकवत होते. निबंधच होता तो. त्यात लिहिले होते कि अंधश्रद्धांवर विश्वास ठेऊ नका. मूर्तीपूजेचे कर्मकांड फार करू नका. आणि उदाहरणादाखल लिहिले कि देवापुढे दिवा लाऊ नका. त्यामुळे काही फायदा तर होत नाही पण तेल तर उगाच जळून जाते. हे ऐकल्यावर मात्र "आता माझी सटकली" चा फील आला. हात वर केला. सरांनी उठवले. "काय प्रश्न आहे?" असे विचारले. मी म्हणालो "सर, हा विज्ञानाधिष्ठित निबंध (धडा) चांगला आहे. यातील बर्याच गोष्टी पटतात सुद्धा. परंतु हे दिव्यात तेल न घालणे जर जास्तच झाले. मग आम्ही शुभंकरोती कशी म्हणणार?" सगळे एकदम चिडीचूप. आता मी बदडला जाणार हे नक्की होते. माझीही थरथर व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या तासाला कुणाला हुं की चू करायची कोणाची हिम्मत नव्हती आणि अस्मादिकांनी सरळ उठून प्रश्न विचारला होता. तो पण धड्याच्या विरुद्ध. पण आता बाण सुटला होता. परत मागे घेता येणे शक्य नव्हते. मी मनाची तयारी सुरु केली - मार खायची हो! सर मला तसेच उभे ठेऊन माझ्या बाकापाशी आले. एक वार मला नखशिखांत न्याहळले. तशी माझ्या बाजूचा बाक पार्टनर उठून म्हणाला "बरोबर आहे सर याचे" तसा त्याच्या पाठोपाठ बाकीच्या मुलांनी हि 'हो हो बरोबर आहे' चा सूर लावला. सरांनी एकवार सगळ्या वर्गाकडे बघितले, मला आणि माझ्या मित्राला खाली बसायला सांगितले आणि टेबल पाशी जाउन धडा पुढे शिकवायला सुरु केला. आम्ही दोघेही हुश्श म्हणत खाली बसलो. माझ्या मित्राने मला वाचवले होते. शाळा सुटल्यावर त्याला मी बोरकूट खाऊ घातली.

ईयत्ता पाचवी(बहुतेक) चाचा नेहरु यान्चा आराम हराम है धडा होता. गुर्जी शिकवत होते, "म्हणून नेहमी सर्वांनी काम करावे ......" नुकत्याच झालेल्या गीताई पठण स्पर्धेत अस्मादिकंना पहिला क्रमांक मिळाला होता . कुठून बुद्धी झाली आणि विचारल "पण गीतेत तर म्हटलय काम क्रोध तसा लोभ आत्मनाशास कारण" आयाइइइ असली पडली म्हणून सांगू .

काम - म्हणजे काम (work) तसेच तो विषय म्हणजे (subject) परंतु 'वैषयिक' वगैरे ऐकल्यावर हा नवीन शब्द निबंधात वापरायची कोण घाई झाली होती ...कसे कोण जाणे पण धोक्याची घंटा डोक्यात वाजली अचानक आणि ...नशीब ... पटकन कुणीतरी अर्थ सांगितला ..नाहीतर अनवस्था प्रसंग ओढवला असता ... ... आणखीन एक शब्द 'ऋतुमती' हि मला कोणा संस्कृत काव्यातली नायिकाच असावी असे सुरुवातीला वाटले होते ...पण मग ...वैषयिक शब्दाच्या अनुभवाने आलेले शहाणपण कामी आले आजही त्या आठवणींनी व आपण कसे वाचलो ह्यची जाणीव होऊन धस्स होते

आणखीन एक शब्द 'ऋतुमती' हि मला कोणा संस्कृत काव्यातली नायिकाच असावी असे सुरुवातीला वाटले होते ..
ठ्ठो =)) =)) =)) हसून हसून फुटल्या गेले आहे =)) आम्हांलाही अशा अनेक शंका यायच्या, पण ही शंका तेवढी येण्यापासून वाचली. भाग्यच आमचे, दुसरे काय =))

को-एड असल्याने या प्रकरणामुळे बर्‍याचवेळा मार खाल्ला आहे. पोरी लौकर शहाण्या होतात आणि पोरा तशीच ठोंबी रहातात . त्यात पोरांचा काय दोष !

ऋतुमतीवरून शाळेतला किस्सा आठवला. द्रौपदीवस्त्रहरणाच्या प्रसंगात द्रौपदीचं वर्णन "रजस्वला" असं केलं आहे. महाभारतामधल्या द्रौपदीवस्त्रहरणाच्या प्रसंगाच्या मिळमिळीत वर्णनापेक्षा टीव्हीवर लागणारं "टिप टिप बरसा पानी" जास्त हॉट होतं. त्यामुळे माझा समज झाला की द्रौपदीचं दुसरं नाव रजस्वला असावं (पांचाली सारखं). मग काय, दिलं एका निबंधात दणकावून - "रजस्वलेच्या सूडाग्नीमुळे महाभारत घडलं..." वगैरे. मास्तरांनी स्टाफरूममध्ये बोलावून हजामत केली.

तसा दुसरा शब्द "अनघा " पण याचा अर्थ एका गुरुजींकडून कळला . एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात कोहिनूरचे जोशी गुरुजी बोलत होते . पुस्तकात कुणा कुमारी अनघा हिचे कर्तुत्व वर्णन केले होते . ती मुलगी / स्त्री व्यासपीठावर हजार होती . आणि बोलता बोलता जोशी सर म्हणाले, " अनघा या शब्दाचा अर्थ अनाघ्रात , नावाप्रमाणेच ती कुमारी आहे . लवकरच तिला सुयोग्य नवरा मिळो आणि तिचे नाव बदलो अशी इच्छा करतो .' प्रेक्षकांमध्ये सन्नाटा पसरला त्या बिचाऱ्या मुलीचा चेहरा बघवत नव्हता.

एकदा नववीत शिकत असतांना , मी होमवर्क केलेले नव्हते. सरांनी विचारले, " कां केले नाहीस ? " मी उत्तरलो ' पण मी प्रामाणिकपणे सांगितले ना कि केले नाही म्हणुन " ! त्यावर सर म्हणाले , " वा ! वा ! उद्या तु विडी ओढशील आणि म्हणशील , मी प्रामाणिक पणे सांगितले ना ? , ते काही नाही , हात पुढे कर ' आणि हातावर सप्प्कन छडी बसली.

एकदा शाळेत मधल्या सुट्टीच्या आगोदरचा तास ऑफ होता. गोंगाट झाल्यावर बाजूच्या वर्गातल्या शिक्षकांनी येऊण सांगितलं की मागे क्रीडा संकुलात शैक्षणिक व अवांतर पुस्तकांचं प्रदर्शन लागलं आहे ते बघायला जा सर्वांनी. सगळे धावले. काही तिकडे न जाता डायरेक्ट क्रिकेट खेळायला लागले. काही तिकडे जाऊन रोचक पुस्तके वाचून खिदळत बसले. तास संपला. मधली सुट्टीही संपली. कुणाच्या गावीच नाही काही. पुढच्या तासाचे शिक्षक जेंव्हा आले तेंव्हा त्यांना कळलं की मुलं (काही तुरळक मुली वगळता, अर्थात त्याच मुलींंनी सांगितलं) प्रदर्शनात आहेत. शिपायाने निरोप दिला आम्हाला येऊन की बोलावलंय. पुढचं दृष्य काहीसं असं होतं. सगळी मुलं जी बाहेर होती, ती कॉरिडॉर मधे ओणवी उभी आहेत. मुख्याध्यापक आणि काही ज्येष्ठ शिक्षक/शिक्षिका आहेत. आणि एक एक करत हातावर पट्टी बसत होती. ती बसल्यावरही एखाद्याचा हसण्याचा 'खुईं....' असा आवाज येत होता. का आणि कसलं हसू येत होतं याला काहीही महत्व नव्हतं. पण सगळ्यांना झाडून एकत्र शिक्षा होते तेंव्हाची मजाच काही वेगळी असते. अशा अनेक शिक्षा आहेत सांगण्यासारख्या. काही व्यक्तिगत, काही दुस-यांच्या आणि काही अशा, सगळ्यांच्या. गेले ते दिवस.....