Welcome to misalpav.com
लेखक: चौथा कोनाडा | प्रसिद्ध:
एकोणीसशे नव्वदच्या सुमाराची गोष्ट आहे. नविन लुथरा आणि त्यांचे मित्र दीपक मोहन लोणावळयाच्या डोंगराळ घनदाट वनपरिसरातून लुथरा यांच्या मारुती जिप्सी मधून मुळशीकडे निघाले होते. नविन लुथरा म्हणजे कस्टम क्लियरन्स मधले एक उभरते यशस्वी व्यावसायिक. वय जेमतेम तिशीच्या आसपास. अन दीपक मोहन म्हणजे एका तेल-जहाजाचे मालक. धनाढ्य असामी ! Green_One नविन लुथरा स्वत:ची कहाणी सांगत होते. “हा प्रवास माझ्या साठी बहुधा अतिशय महत्वाचा ठरायचा होता “ कॅप्टन दीपक मोहन यांनी तेल-वाहतुकीच्या धंद्यात बक्कळ पैसा कमावला होता अन तो पैसा त्यांना इथे भारतामध्ये जमीनीत गुंतवायचा होता. मुळशीला पोहोचल्यावर दोघांनी जमीन खरेदी साठी जमीनमालक शेतकरयांशी बोलणी सुरु केली. कॅप्टन साहेबांना जमीन खूपच महाग वाटली. खरेदीचा विचार सोडून देवून ते परत त्यांच्या तेल-वाहतुक धंद्यात व्यग्र झाले. दुर्दैवाने दोनच वर्षात त्यांचे निधन झाले. मला मात्र त्या जमीन खरेदीचा विचार स्वस्थ बसु देईना. मला जागाही छान वाटली होती. रिटायरमेंट नंतर स्थायिक व्हायला बरी म्हणुन मग मी ती १०० एकर जागा विकत घेवून टाकली. 1 नंतर पाच-सात वर्षांनी लुथरांनी एका पावसाळ्यात परत मुळशीला चक्कर मारली अन तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडून पुढील काही वर्षात आणखी जमीन विकत घेण्याचा सपाटा लावला. “ सध्या माझ्या मालकीची १५०० एकर पेक्षाही जास्त जमीन आहे. सुरुवातीला रू. ५०० एकर या दराने मी जागा घेतली. नंतर या आणखी खरेदीच्या काळात त्याचा सरसरी दर रू. १०००० (दहा हजार) प्रति एकर इतका होता. त्यावेळच्या मानाने महागच की ! इथे आता पर्यटन व्यवसायतले काही तरी करावे ही कल्पना माझ्या डोक्यात मूळ धरु लागली अन मी भन्नाट असा "केव्ह हॉटेल" प्रकल्प करायला घेतला. स्वतःसाठी बंगलाही बांधायला घेतला. आता या साठी पाणी कुठून आणायचं याचा काही विचारच मी केला नव्हता. मला जाणवलं की याला, विशेषतः हॉटेल प्रकल्पाला भरपूर पाणी लागणार. मी पाण्यासाठी धावाधाव सुरू केली. अगदी टाटांकडे सुद्धा गेलो. टाटा ग्रुप त्यावेळी मुळशी धरण-जलाशय लीझ वर चालवत होते व पाण्याचे वितरण-व्यवस्थापन करत होते. त्यांनी माझ्या पाणी-विनंतीला नकार दिला ! बोअर खणणं माझ्यासाठी आतबट्ट्याचा व्यवहार ठरला असता कारण मला रोज तीन लाख लिटर पाण्याची गरज होती. अश्या किती बोअर-विहरी खणणार होतो मी ? खुप अस्वथ झालो होतो मी ! 1 असाच एके दिवशी बसलो असताना, जवळच राहणारा एक परिचत गावकरी माझ्याकडे आला. बोलता बोलता म्हणाला" इथे या जमीनीत जिवंत झरे आहेत, तुमची पाण्याची चिंता मिटून जाईल" हे ऐकून उत्साहित झालेले लुथरा लगेचच कामाला लागले. साधारण किती पाणी मिळेल याचा अंदाज घेण्यासाठी दोन पंप बसवून घेतले. "तो मे महिना होता, अन या ऐन उन्हाळ्यात या झरयातून मुबलक, म्हणजे ३-४ लाख लिटर पाणी आम्ही उपसत होतो, पाण्याची पातळी खाली जायचे नाव घेइना. आमची पुरेपुर खात्री पटली की इथं भरपूर पाणी आहे. मग आम्ही हे पाणी पिण्यायोग्य आहे का याची चाचणी घेतली. एका कडून नाहीतर चार्-चार जणां कडून चाचणी करुन घेतली. हो पाणी नि:संशय पिण्यायोग्य होते. आम्ही खुष झालो. एका मित्राला या पाण्याचे रिपोर्ट दाखवले. हा मित्र पाणी-शुद्धिकरण क्षेत्रात काम करायचा. एक्सपर्ट होता तो त्यातला. म्हणाला " पाणी" बेस्ट आहे, उच्च दर्जाचं आहे. आणि विशेष म्हणजे हे पाणी पेस्टीसाईड-मुक्त होतं ! 1 म्हणजे लुथरांनी जिथं खणलं होतं तो "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” होता ! "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” म्हणजे "जैविक दृष्ट्या संपन्न अन अतिशय “दुर्मिळ” असं ठिकाण होतं ! ब्रिटीश पर्यावरण शास्त्रज्ञ नॉरमन मायर्स यांनी ही हॉटस्पॉटची संकल्पना रुजवली. त्यांच्या अभ्यासानुसार ज्या ठिकाणी ०.५ टक्के किंवा १५०० विविध प्रकारच्या व्हेस्कुलर वनस्पती आहेत व "पर्यावरण-स्त्रोत" च्या इतर अनेक चाचण्यांत जे ठिकाण उत्तिर्ण होते, तो बायो-हॉटस्पॉट ! भारतात अशी दोनच ठिकाणे आहेत, एक मुळशी व दुसरे गुजरातमधील आवा ! • * * * * * * लुथरांनी मग पुढील चार वर्षे हे अति-शुद्ध पाणी, त्याचा नैसर्गिकक दर्जा न बिघडवता जसंच्या-तसं बाटलीत कसं भरता येईल यावर बरेच प्रयोग केले अन यात पुर्णपणे यशस्वी झाल्यावर सन २००९ मध्ये "मुळशी स्प्रिंग वॉटर" या नावाने बाजारात आणलं. लगोलग हे पाणी लुथरा यांचे मित्र ओबेरॉय हॉटेल्सचे चेअरमन बिकी ओबेरॉय यांच्या कडे पोहोचवण्यात आले. हे पाणी त्यांच्या पसंतीस उतरले, जेंव्हा त्यांना समजले की याचा स्त्रोत बायो-हॉटस्पॉट आहे, ते आणखी चकित झाले. उत्सुकते पोटी मुळशीला येऊन बायो-हॉटस्पॉट व बॉटलिंग प्लान्ट बघून गेले. मग काही दिवसातच मुळशी स्प्रिंग वॉटरला ओबेरॉय हॉटेल अन ओ-क्वीला ट्रायडंट हॉटेलची मोठी ऑर्डर मिळाली. 1 सद्ध्या ओबेरॉय ग्रुप रोज १७,००० "मुळशी स्प्रिंग वॉटर" च्या बाटल्या विकत घेतो आहे. आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे पॅरीस इथे "कॉलेट" नावाच्या जगातल्या नामांकित "वॉटर बार" जो अति-दर्जेदार पिण्याच्या पाण्या साठी प्रसिद्ध आहे तिथेही "मुळशी स्प्रिंग वॉटर" विकले जाते. "आम्ही अतिशय जाणीवपुर्वक "कॉलेट वॉटर बार" कडे ऍप्रोच झालो कारण आम्हाला माहित होतं "कॉलेट"नं शिक्कामोर्तब केलं की "मुळशी” जागितक पातळीवर मान्यता पावणार होतं" लुथरा अभिमानाने सांगत होते. मग "कॉलेट" कडून ऑर्डर मिळायला फारसा प्रयास करावा लागला नाही. अर्ध्या तासातच बोलणी आटोपली, हे पाणी चक्क भारता मधलं आहे या वर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. हे पटवायलाच त्यातला निम्म्याच्या वर वेळ गेला, कारण भारतातल्या स्वच्छते बाबत जगात काय प्रतिमा आहे हे आपणा सर्वांना माहित आहे. आता हा भारतीय ब्रॅण्ड "कॉलेट" मेनू कार्ड वरचा एक नंबरचा आयटम आहे. • ओबेरॉय व्यतिरिक्त लीला ग्रुप हॉटेल व आयटीसीच्या हॉटेल्स मध्येही "मुळशी" उपलब्ध आहे. तुम्हाला जर मुंबईत मुळशी हवं असेल तर बिग सिनेमाज, "हक्कासन, याऊक्ताचा" या अंतरराष्ट्रीय रेस्टॉरंटस इथे ही उपलब्ध आहे. स्पेन्सर रीटेल हेच पाणी वेगळ्या नावने त्यांच्या स्टोअर्स मध्ये उपलब्ध करुन देणार आहे. आता लुथरा यांनी बॉटलिंग प्लान्ट ची क्षमता भरपूर वाढवलीय. ७५० मिली. ची "मुळशी स्प्रिंग वॉटर" ची बाटली महाराष्ट्रात रु. ५० ला व राज्याबाहेर रु. ५५ ला आहे. ५२ वर्षीय नविन लुथरा खुप खुष आहेत. रु. १०००० (दहा हजार) प्रति एकर दराने घेतलेली जागेत आज रोज रु. ३० लाख इतकी उलाढाल होतेय. इतक्या कमी पैश्यात इतकं भरघोस उत्पन्न, अजून काय पाहिजे ? ही आहे कहाणी एका पाण्याची, पाणीथेंबातुन खुळखुळणारया नाण्यांची ! * * * * * * * * * * * * * * * * * * * * * तीनचार वर्षांपुर्वी डी.एन.ए. हे इंग्रजी वृत्तपत्र वाचता वाचता आशिष तिवारी यांनी लिहिलेली एक मुलाखत कम रिपोर्ताज माझ्या वाचनात आला. ही “पाण्याची कहाणी” मला विलक्षण वाटली. आता ही असली सुरस कहाणी वाचल्यावर, मिपाकर मित्रांना सांगितल्या शिवाय थोडंच राहवेल ? मग या कहाणीचे मराठीत रुपांतर केले. कसा वाटला हा माझा हा अल्पसा प्रयत्न - चौथा कोनाडा
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

धन्यवाद, सा-स्व, सॉरी फॉर इन्कन्विनियन्स ! इतर फोटो टाकण्यासाठी सं. मंडळाला विनंती केलेली आहे. लवकरच टाकतील ते. (अर्थात लेखाच्या आशयासाठी फोटो खुप महत्वाचे आहेत असं नाहीय, जस्ट सपोर्टिव्ह! )

'कुरहाडीचा दांडा गोतास काळ' म्हणतात , त्याप्रमाणे आपण तो 'कुरहाडीचा दांडा' बनणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी . आणी अशा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक असणारया मिनरल पाणी , शीतपेये यांच्या प्रकल्पांना आपल्या गावापासुन , घरापासुन लांबच ठेवावे.

लेख आवडला.अगर पर्यावरणाच्या दृष्टीने इतका sensitive zone असेल तर तो तसा घोषित सरकारने केला पाहिजे. Bottling plant आणि spring water यात फरक आहे. दोघांना एका पारड्यात तोलू नका. Bottling plant ला सरसकट परवाने मिळणे ही सरकारची चूक आहे पण spring water हे दुर्मिळ असते व हे व्यावसयिक जाणून असतो म्हणून तो भरघोस उपसा करत नाही… ( सोन्याची कोंबडी उद्योजक स्वतः कधीच कापणार नाही ) लेखाचा आशय हा यशस्वी नि कल्पक उद्योजकता आहे , पर्यावरण ऱ्हास नव्हे.

सोन्याची कोंबडी उद्योजक स्वतः कधीच कापणार नाही )
उद्योजक म्हणजे आजच्या काळातले प्रतिपरमेश्वर झालेत. सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ति| त्यामुळे असे होणे स्वाभाविक आहे म्हणा; पण जगात इतरत्र घडणार्‍या घटना आपल्या समजाला फारसा आधार देत नाहीत. मुळात अशा ठिकाणचं पाणी उपसून बाहेर विकणे म्हणजेच सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीच्या मानेवर सुरी फिरवण्यासारखं आहे. प्लँटचा खर्च व इन्फ्लेशन धरुन लुथरा साहेबांना दरवर्षी गुंतवणुकीवरच्या परताव्यात दरवर्षी वाढ अपेक्षित असणार. गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणी न विकता ही वाढ कशी मिळणार हे सांगू शकाल काय? आणि जर दरवर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणी विकायचे टारगेट असेल तर त्यांच्या टारगेटसाठी वरुणदेव दरवर्षी तेवढा जास्त पाऊस पाडणार की काय? नसेल तर मग कधीना कधी हे पाणी संपेल की नाही?

जसे खनिज तेल संपणार तसे भूजल साठा हा कधी न कधी संपणारच !!!!! त्यासाठी त्यांनी replenishment वा remineralisation चे future प्लान केले असतीलच… एकदा ब्रांड विकसित झाला कि खरेच ते भूगर्भातून येतंय का remineralised केले जातंय हे सोयीस्कररीत्या लपविता येते.

स्वतःच हॉटेलचा व्यवसाय करायचे स्वप्न बाजूला ठेऊन एका कल्पनेवर विश्वास ठेऊन तो व्यवसाय यशस्वी करणे याला माझ्या दृष्टीने कल्पकताच म्हणतात... हे एक धाडसच होते , कारण हॉटेल व्यवसायासाठी केलेलेइ सर्व मेहेनत बाजूला ठेऊन पुन्हा नव्याने अभ्यास करणे सोपी गोष्ट नाही.

तुमची लिखाणाची शैली छान आहे. मात्र शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योगपतीने सपाट्याने विकत घेणे आणि झर्‍याच्या पाण्याचा असा उपसा करणे अत्यंत भयावह वाटले. १५०० एकर्सच्या वर जमीन सगळे शेतकरी सुखासुखी विकायला तयार जाले, तेही जमिनीत जिवंत झरे असल्याचे माहीत असताना हे वाचायला प्रचंड विचित्र वाटले. ताजा कलमः नवीन लुथ्रा हे टाईम्स ग्रुपशी तसेच रिडिफशी संबंधित आहेत. तसेच MagicBricks.com या प्रॉपर्टीच्या व्यवहारांशी संबंधित साईटचे प्रमुख आहेत असे शोध घेता समजले. हिंदी सिनेमाशीही संबंधित असावेत. आता गप्प बसते.

लुथरा साहेबांची नातवंडं पाण्याऐवजी ते अब्जावधी रुपयेच पिणार आहेत. :-) शेतकर्‍यांच्या नावाने ग्ळा काढणारे लोक धडाधड आपल्या जमिनी विकणार्‍यांबद्दलअवाक्षरही काढत नाहीत हे उदाहरणार्थ रोचक वगैरे आहे. बाकी कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची स्वप्नं पाहणार्‍यांनी येत्या पाच-दहा वर्षात कॅलिफोर्नियात काय होतेय ते पाहावे म्हणजे अजून पंचवीस वर्षांनी कोकणात काय होईल ते कळेल. http://www.wired.com/2015/03/californias-run-water-act-now/ विशेष म्हणजे नेसले कंपनी अजूनही तिथलं पाणी बाटल्यांमध्ये भरुन विकतेच आहे. द मोर थिंग्ज चेंज द मोर दे रिमेन द सेम या न्यायाने आपलं भविष्य काय आहे ते कळायला भविष्यवेत्त्यांची गरज नाही. http://www.takepart.com/article/2015/04/14/arrowhead-spring-water-expired-permit?cmpid=tpnews-eml-2015-04-18-arrowhead

शक्यता आहे. तसंही असेल. पण मग "काळी आई" वगैरे म्हणू नये कारण शेट्टीसारखे दिसणारे लाखो येऊन गळ्यात पडले तरी कोणी आई विकणार नाही. :-)

इंडिअन इजमेंट अ‍ॅक्ट नुसार जमिनीत मुरलेल्या पाण्यावर जमिनीच्या मालकाचा हक्क असतो. त्याच्या मालकीच्या जमिनीवरून वाहनार्‍या पाण्याचा वापर पिण्याकरता,शेतिकरता करू शकतो परंतू पाण्याचा नैसर्गिक मार्ग अडवू किंवा बदलू शकत नाही व त्या पाण्यावर संपुर्ण मालकी दाखवू शकत नाही. पाण्याच्या मार्गाच्या आजुबाजुला विहिर खोद्ल्यास झिरपलेल्या पाण्यावर त्याचा पुर्ण हक्क असतो जो वर हे झिरपलेले पाणी नैसर्गिक झर्‍याद्वारे विहिरित पडते तोवर , कृत्रिमरित्या (आडवे बोअर) मारून विहिरित झर्‍याचे पाणी ओढल्यास मालकावर कायदेशीर कारवाही होऊ शकते. म्हणजे लुथरांनी जिथं खणलं होतं तो "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” होता ! ह्याचा अर्थ लुथरांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीत विहिर खणली व नैसर्गीक झर्‍यांद्वारे विहिरीच्या पाण्याचा व्यावसाईक वापर करत आहेत जे पूर्णपणे कायदेशीर आहे. जर इंडिअन इजमेंट अ‍ॅक्टचे उल्लंघन होत असेल तर जरूर पर्यावरणप्रेमीं किंवा जागरूक नागरिकांनी आंदोलन करावे.

एक शंका आहे. असे वैयक्तीक पातळीवर १५०० एकर जमीन घेता येते का? कमाल जमीन धारणा कायदा आहे ना? की पैसेवाल्यांना हा प्रॉब्लेम कधी येत नाही ?

विकिपीडीयावर फार माहीती नाहिय. पण गूगल करून एक लेख हाती लागला. :-) http://zeenews.india.com/marathi/news/exclusive/divisional-commissioner-of-pune-how-much-land/166345 १९६१ च्या कायद्यानुसार एक व्यक्ती किंवा कुटुम्बाच्या मालकीची ५४ एकर पेक्षा जास्त जमीन असता कामा नये असे कायदा सांगतो असे त्या लेखात लिहीले आहे.

उत्त्त्म कथा. आणि अनुबव ! मराठी मनाल सम्पतीचे वावडॅ आहे. तसेच एखाध्याने सम्पती मिळवली की ती अवैध्पणे कशी मिळवली आणि असे मिळ॑वणे कसे गैर आहे हे सिद्ध करण्यात सारेजण गुन्तुन जातात. आपण का असा विचार करु शकलो नाहि हा विचारच त्याण्च्या मनात येत नाहि. असो

मराठी मनाल सम्पतीचे वावडॅ आहे.
हे चुकीचे आहे. त्यापेक्षा "मराठी मनाला अवैध संपत्तीचे वावडे आहे" म्हणणे हे ज्यास्त योग्य आहे आणि अभिमानास्पद सुध्दा.

कोटी आवडली. या पुढे असल्या विषयावर कमेंट करताना हे लक्षात ठेवावे लागणार. :-) आता वैध, अवैध यांच्या व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या असणार हे ओघाने आलेच. आता मुळशी स्प्रिंग वॉटरची निर्मिती ही अवैध मार्गाने झालीय का आ अजुन एक संशोधनाचा विषय !

कमाल जमिन धारना कायद्यानुसार शहरात जमीनीचे सिलिंग शहराच्या दर्जानुसार ठरवले जाते. सिंचनाच्या प्रकारानुसार शेतिचे सिलिंग ठरवले जाते. परंतू अधीकतम ५४ एकरची मर्यादा असते. एखादी व्यक्ती १५०० एकर जमिन कायदेशीरपणे कशी बाळगू शकतो असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. उद्योगाच्या नावाखाली अशी सवलत मिळते. ती कायद्याच्या चौकटित कशी बसवायची ह्यासाठी कायदे सल्लागारांची फौज असते. अशा गुंतागुंतिच्या विषयावर मिपावरील एखादा वकिल सदस्य अधिक प्रकाश टाकू शकेल (मोफत सल्ल्याची शक्यता कमीच). अशा व्यवहारांत कलेक्टरची भुमिका महत्वाची असते.

अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. RIP the biological hotspot.>>>>>++१००००००० याचीच पुढची पायरी कोण्क्रीट जंगल. लोणावळा आणि परीसर पाहून उलटी येते. गेल्याच महिन्यात मुळशी धरणाच्या शेजारी असलेल्या भांबर्डे गावात गेलेलो. शेजारी एव्हढे मोठे धरण असूनही यांना मात्र शेतीसाठी पाणी देत नाहीत.
लेखक: एस वेळ: गुरुवार, 04/23/2015 - 08:20 Permalink

सहमत. हे पाहून दया पवारांची 'बाई मी धरण बांधिते, माझं मरण कांडिते' ही कविता आठवते...!

हो, ना. मागच्याच आठवड्यात नाशिकमध्ये स्वतः मेधा पाटकरांना पुनरवसनासाठी उतरावे लागले ! सामान्य माणसांना सरकारी यंत्रणा वर्षानुवर्षे दादच देत नव्हती !

=)) आनंदी गोपाळबुवांच्या एक्सेलशीटमध्ये यांच्यासाठी नवीन क्लासिफिकेशन खोलायला लागेल बहुतेक.

धागालेखकाने मोठ्या कौतुकाने कल्पक उद्योजकाची कहाणी सांगितली अाहे. त्यावर RIP the biological hotspot अशी प्रतिक्रीयाही अाली अाहे. काही जण संपत्ती कमावणार्यांबाबत असूया वाटणे, हा कसा मराठी दुर्गुण अाहे, असे म्हणत अाहेत. सत्य मोठं व्यामिश्र अाहे. अशा कल्पक उद्योजकांबाबत कौतुक वाटणं, कधीच बंद झालंय. मानवाच्या क्षुद्र व्यावसायिक ध्येयापोटी निसर्गावर होणारे अत्याचार पाहून नीट प्रतिक्रीयाही सुचत नाहीए. पोटात गोळा अाला.

जसे की वाळू माफिया (नद्यांतून अमर्याद वाळु उपसणे), बिल्डर्स (डोंगर, टेकड्या फोडणे आणि त्यावर इमारती उठवणे), स्मगलर्स ( बेसुमार जंगलतोड, हस्तीदंतांसाठी हत्तींची शिकार, वाघांची, हरणांची शिकार) निसर्गाचा प्रचंड -हास झालाय पण पर्वा कोण करतो .

सर्कार पुरवत असलेले पाणी हे अगदीच वाईट आहे असे नाही याबाबत सहमत, मी सुध्धा शक्य असेल तेव्हा नळाचेच पाणी पितो (पण त्याच्बरोबर शक्य असेल तेव्हा उकळून व गाळूनसुध्धा घेतो)...पण सगळीकडे अशीच परिस्थिती आहे आणि ती भविष्यातही कमीतकमी वाईट नाही होणार असा सूर बघून ड्वाळे पाणावले :)

कारण सोसायटी मेंबरांची "मला काय त्याचे ..." ही व्रुत्ती ! सहा सहा म्हयने पाण्याच्या टाक्याच धुतल्या जात नाही वो. पुणे मनपा कीती का शुद्ध पाणी पुरवेना, आमच्या बिल्डींगच्या टाकीत काय काय असेल नेम नाही. मी सेक्रेटरी होतो तेंव्हा दर महीन्याला टाक्या धूउन घेत होतो. आता आनंद आहे. हाय फाय लोक बॉटल विकत आणतात !

सुदैवाने आमच्या सोसायटीच्या पाण्याच्या टा़क्यांची देखभाल व स्वच्छता वेळच्या वेळी होत असल्याने बिनदिक्कत नळाचे पाणी पितो, घरी वॉटर फिल्टर असुन सुद्धा ! हॉटेल अथवा बाहेरचे पाणी जास्त चिकित्सा न करता पितो. आता पर्यन्त कधीही समस्या उदभवलेली नाही. जे लोक सोसायटीच्या टाक्यांची वेळच्या वेळी स्वच्छता ठेवत नाहीत व विकतच्या बाटलीबंद पाण्याला पैसे बडवतात ते घरपोच किफायतशीर पिण्याच्या पाण्याला मुकत आहेत असेच म्हणावे लागेल.

चेरमन शेक्रेट्री, अन आमी ? नाही बुवा ! आम्ही आपले नियमित वर्गणी भरणारे निरुपद्रवी "सहकारी" सभासद ! आमचे विद्यामान चेरमन शेक्रेट्री लैच चांगले हैत. सगळ वेळच्या वेळी करतात. सभासदही त्याना उत्तम सहकार्य करतात.

थोडा अवांतर प्रश्ण आहे... पाण्याचे शुद्धीकरण होते, तेंव्हा नेमके काय होते? फील्ट्रॅशन ची ही प्रक्रीया ६ ते ७ तासांची असते आणि यात निरनिराळ्या ट्प्प्यांमधून शुद्धीकरणाची प्रक्रीया केली जाते. नदिच्या किंवा तलावाच्या पाण्याला एक विशीष्ट वास असतो, तो घालवण्यापासून ते पाण्यात असणार्‍या बॅक्टेरीया, वायरस ई.ई. मंडळींचा नायनाट आणी काही जिवनापयोगी मंडळींचे पुनर्वसन, असे बरेच काही बाही फिल्ट्रेशन प्लाण्ट मधे घडते. माझा प्रश्न असा आहे कि ईतक्या प्रक्रियांमधुन जाउनही पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी का येते? डोंबिवली, नागपुर, पुणे, नागोठणे ई.ई. सगळ्या ठीकाणी असच दिसलय. (सिंगापुर, लंडन ह्या ठीकाणी नाही दिसले. सिंगापुरला जवळजवळ रोजच पाऊस पडतो...पण फरगेट इट.. हल्ली परदेशांची नावे घेतली की उगिच राडा होतो म्हणून...:;) )

फिल्टरेशन प्लान्ट मधील अनागोंदी व भ्रष्टाचार, पाईपलाईन्स मधील बिघाड, वेळच्या-वेळी देखभाल करणे, स्पेअर पार्टसच्या चोर्‍यामार्‍या इ. दुसरी काय कारणे असणार ? याचा अनुभव असणार्‍यानी / जाणकारांनी प्रकाश टाकावा.