Welcome to misalpav.com
लेखक: मितान | प्रसिद्ध:
मागचा कट्टा होऊन तीन चार महिने होऊन गेले. सर्व अनाहितांना पुन्हा भेटण्याचे वेध लागले. मग प्रस्ताव आला. निमंत्रक मुंबईकर अनाहिता. चर्चा झाल्या. ठिकाणं चाळली गेली. तारखांसाठी पानं फडफडवून झाली. कुठून कोण कोण येणार याची यादी झाली. आणि शेवटी कट्टा ठरला. बहारीनहून विशाखाताई आणि जर्मनीहून स्वातीताई याच काळात पुणे मुंबईत येणार होत्या. त्या दोघींनीही यायचं नक्की केलं. उत्साह अजून वाढला. ठिकाणाच्या बाबतीत अजून गोंधळ होते. त्या चर्चांचा कंटाळा येऊन अजयाने तिचं घर हे ठिकाण फायनल केलं ! आणि काउंटडाऊन सुरू झाला. तेवढ्यात ते मेलं अनाहिता बंद पडलं. मग कसंकाय वर भागवलं. तिथल्या ग्रुपवर, व्यनि तून संपर्कात राहिलो. पहिली यादी २० जणींची होती. प्रत्यक्षात काही ना काही अडचणी येऊन १६ जणी भेटलो. हा आमचा पुणेकर अनाहितांचा वृत्तांत... तर पुण्यातून मी, त्रिवेणी, मीता, सुचेता, मोनू आणि विशाखाताई असं जायचं ठरलं. शाळांच्या सुट्या असल्याने यष्टीला गर्दी होती. उगाच घोळ नको म्हणून निघताना आपापल्या ठिकाणाहून न निघता एकत्रच निघायचे ठरले. स्वारगेटाहून जुन्या हायवेने जाणारी बस घेऊन दांड फाट्याला उतरून रिक्शा करून रसायनीत अजयाच्या घरी एवढा साधा मार्ग होता ! अती उत्साहात मी आदल्यादिवशीच त्रिवेणीकडे मुक्कामी गेले. तिच्या हातचे मसाल्यातले मोदक खाऊन तृप्त झाले. कसंकाय वर दुसर्‍या दिवशीसाठी उत्साह फसफसत होता. खरडफळ्यावर सगळं उतू जात होतं. पहाटेच्या गाडीनं जायचं असल्याने आम्हा पुणेकरणींना भल्या पहाटे उठवण्याचा चंग परदेशस्थ अनाहितांनी बांधला होता. कॅनडातून स्रुजा, यु के तून प्रश्नलंका,सानिका,हाहा, जर्मनीतून मधुरा, स्लोव्हाकियातून मृणालिनी आणि ऑस्ट्रेलियातून स्पंदना स्काइपवर हजर असणार होत्या. त्याची जुळवाजुळव खरडी व्यनि तून सुरू होती. हे सगळं बघत त्रिवेणीशी गप्पा मारत झोपायला २ वाजले. ४ वाजता उठून आवरून मीताला पिकप करून ५:४५ ला स्वारगेटला पोहोचायचं ही उजळणी करत झोपच येइना ! कसाबसा डोळा लागला तर ३:४५ ला युकेतून प्र्श्नलंकीचा फोन... उठा तयार व्हा! कट्ट्यला जायचंय !!!!!! कट्ट्याला जाणार आम्ही आणि जीव खातेय ही! फोन बंद करून झोपले तर ४ ला त्रि ने लावलेला गजर ठणाणा करायला लागला. त्रि हे फार वाईट मुलगी आहे. मी अजयाकडे जाऊन आंघोळणार होते. पण ही बाई आंघोळ केल्याशिवाय चहाच देईना :)) चहा पिऊन निघालो एकदाचे. विशाखा न मोनुला फोन झाले. बसस्टँडवर बरोब्बर ५:५० ला भेटलो. गळाभेटी झाल्या. बस आली नि बसलो. आता जुन्या हायवेने जाऊ म्हटलं तर बस नव्या रस्त्याला लागलेली ! या रस्त्याने दांड फाटा येतो की नाई माहीतच नाही! चालक वाहक म्हणाले तुम्ही सांगाल तिथं उतरवतो ! मला दांड फाटा माहीत नाही ! आता काय या काळजीत पडण्याआधीच अचानक मीताला एक शोध लागला. फॉरेनची पाटलीण या अद्वितीय सिनेमाचा विश्वविख्यात हीरो शेजारच्या आसनावर बसलाय !!!! मांजराच्या कुतुहलानं दांड फाटा चिंता मागे टाकून निरीक्षण करण्यात आले! त्याचं नाव काही आठवेना! कसंकाय वर रिपोर्टिंग झालं. नाव कोणालाच आठवेना. "बिचार्‍याला नंतर कामच मिळालं नसेल " असा प्रकट सुस्कारा सोडला गेला. त्या हीरोने आम्हाला ऐकू येईल असं " कालच्या शिवनेरीचं तिकिटच नाही मिळालं म्हणून पांढर्‍या डब्यात जावं लागतंय.." असं शेजारच्या काकूंना सांगून टाकलं. आणि घरून आणलेला डबा खायला सुरुवात केली. इकडे विशाखाताई साहित्यविश्वातचे तिचे अनुभव सांगत होती. ते संपलं की मिपावरच्या गप्पा सुरू झाल्या. नव्या खरेदीची वर्णनं सुरू झाली. बडबड वाढली. ८ वाजता दांडफाटा येणार असं नेट वर वाचलं होतं. पुन्हा चालकदादाला साकडं घालायला मीता गेली तर ते येडपट पूर्ण मागे बघत मीताशी बोलायला लागलं. बरोबरच्या ४० प्रवाशांच्या जिवाच्या काळजीनं मीता पळतच जागेवर आली :)) तेवढ्यात रसायनीला रस्ता जातो तिथे आम्हाला सोडायचं हे चालकाला कळलं असं आम्हाला वाटलं ! पुन्हा गप्पा. हास्याचे फवारे ! अचानक बस थांबली आणि आम्हाला उतरवले गेले !!!!! :)) उत्साहात लगेच उतरलो. बस चटकन निघून गेली. आणि बघतो तर काय ??? आगे भी.......जाने न आ तू.....पीछे भी.....जाने ना तू....जो भी है ..... बस यही एक पुल है !!!! नजरेच्या टप्प्यात रिक्षा सोडा पण हायवे सोडून आत जाण्यासाठी रस्ताही नव्हता. वर एक पुल होता. एक कसल्याशा कारखान्याची चिमणी होती !! त्या बसवाल्याचा राग यायचा सोडून सगळ्या एकमेकींकडे बघत खोखो हसायलाच लागलो !!! :)) अजयाचा फोन...कुठे उतरलात?? तर सांगायला त्या चिमणीशिवाय एकही खूण नाही ! तिच्याशी बोलतानाही खोखोखोखो सुरूच ! कोणाला रस्ता विचारायचा ! आजुबाजूला एकही माणूस नाही! वर पुलावर एक गुराखी दिसला. पण ते लैच्च लांब होतं. शिवाय तिथे चढायला जी टेकडी होती तिच्यावर जायला रस्ताच नव्हता ! एक दो एक दो करत रस्ता शोधत निघालो. तेवढ्यात एक बाईकवाला येताना दिसला ! पाचही जणींनी १० हात दाखवत त्याला थांबवलं. तो पोलीस निघाला. आता आम्हाला मदत करणे त्याचे कर्तव्यच होते ;) त्याला रस्ता शोधायला पिटाळले. तोवर हायवे ओलांडून कुंपणावरून उड्या मारून एका गोठ्यात उतरून तिथून टेकडीवर जाणार्‍या पायवाटेला लागू असा प्रस्ताव मी मांडला. हायवे अशा पद्धतीने क्रॉस करायचा या कल्पनेनेही त्रि सोडून इतरांचे डोळे मोठे झाले :)) तोवर तो पोलीस दादा आला. म्हणला रस्ताच नाही ! हायवे क्रॉस करा ! :)) विशाखाताई म्हणे पण ते नियमाविरुद्ध आहे नं?? त्यावर कसनुसं हसत...चलतंय अशा वेळेला ! असं पुटपुटत तो निघून गेला. आता चौघीजणी माझ्याकडे बघू लागल्या ! मग समोर रस्त्यावर रोडरॅश खेळल्यासारख्या बुंगाट गाड्या चाललेल्या असताना आम्ही सगळ्या दुडक्या चालीने डिवायडरवर पोहोचलो ;) कोणी वरून तर कोणी खालून सरपटत मधले कुंपण ओलांडले. फोटो काढले :) पुन्हा दुडक्या चालीने उरलेला रस्ता, पुन्हा कुंपणाच्या कठड्याचा घोडा घोडा खेळत पलीकडे थेट काट्याकुट्यात !!!! ;)) बिचारी अजया एवढ्या जंगलात राहत असेल असे वाटत नाही हो... असं म्हणत निघालो. पलीकडे एक गोठा न त्याच्या पलीकडे पायवाट. टेकडी न पुलावर जाणारी. अजून एक मोठं कुंपण साहस करत एकमेकींना हात देत चढलो. एकदम प्रहार सिनेमातल्या " मैने डिसाइड किया है सर..." या पाण्यात उड्या मारण्याच्या प्रसंगाची आठवण यावी अशा गमती झाल्या. एकजण भिंतीवर चढायला तयार नाही. दुसरी त्यावरून पलीकडे उडी मारायला तयार नाही :)) शेवटी मी वर चढून ढकलून देईन अशी धमकी दिल्यावर ती खरी वाटून तिने टुणकन उडी मारली :)) कोण ते मी नै सांगणार ! मार बसेल ! शेवटी पायवाटेला लागलो. कारखान्याला पोहोचलो आणि रिक्षा दिसल्या !!! नाचत नाचत रिक्षात बसलो. त्याला अजयामॅडमचा वाडा माहीत होता ;) आम्ही कसं चुकीच्या ठिकाणी उतरलो यावर एक शिकवणी घेऊन त्याने अल्प पैशात घरासमोर सोडले. आता कुठे विशाखाताईच्या जिवात जीव आला. मनातल्या मनात तिने जन्मात कधी आमच्यासोबत कट्ट्याला येणार नाही असं ठरवूनही टाकलं असेल ;) बसमध्ये पोर्णिमा ट्रेकला येण्याच्या गप्पा मारणार्‍या 'त्या' दोघींना मी डिसक्वालिफाय असं सर्टिफिकेट दिलं ! अजयाताईंच्या वाड्याचं काय वर्णन करावं ! दारात झोपाळा. मधुमालती नि बहावा फुललेला. समोरच्या व्हरांड्यात एका झुंबरावर बुलबुलने संसार थाटलेला. घरात गेल्यावर गारेगार वाटलं. घामाच्या धारांनी हैराण झालो होतो. सर्वांना स्नान करायचे होते. पण पोह्यांचा वास आला नि घोटाळत राहिलो :) पोहे आले. सरबत आलं. आमच्या पिशव्यांम्धून आंब्याचे चिरोटे, बाकरवड्या, खोबर्‍याच्या वड्या, चकल्या निघाल्या आणि मनसोक्त पहिली खादाडी झाली. आम्ही सुस्नात होऊन बडबडत असताना मुंबैचा पहिला जत्था आला. स्वातीताई, कविता, उमा, मीच मधुरा,सौ मुवि, मनिमाऊ आणि हेमा यांचे आगमन झाले. गळाभेटी, चेष्टामस्करी आणि सोबत आलेल्या पिलांच्या किलबिलाटाने आणि आमच्या कलकलाटाने घर भरून गेलं. अजयाचा लेक संकोचून्,वैतागून आत गडप झाला :)) ( इथले डिटेल्स स्पे वृत्तांतात तिकडे देण्यात येतील. मुद्दे - सासू सून भेट....कविता....दीक्षा....पातेलं....हंडे इत्यादी ;)) ) पुन्हा खादाडी झाली. अखंड गप्पा चालल्या होत्या. मग सुर तिच्या दोन्ही कन्यांसह आली. आता एकूण ४ बालवानरे बागडू लागली. अजयाने सुंदर बाग केली आहे. ती फिरून बघितली. आणि वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये कविता वाचूया असं म्हणत गेलो. याविषयी स्वतंत्र लेख होईल. इथे थोडक्यात सांगते. वर मस्त बैठक तयार केली होती. तिथे आम्ही आधीपासून निवडलेल्या कविता वाचू लागलो. मनिमाऊने 'कणा' म्हटली. मग सुचेताने तिच्या काही कविता वाचल्या. त्यातली खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्री ची कविता विशेष दाद घेऊन गेली. उमा, अजया, मोनू, विशाखा, स्वातीताई, मी कविता वाचत होतो. कविता आणि उमा रेकॉर्डिंग करत होत्या. करंदीकर, इंदिरा, कुसुमाग्रज्,ग्रेस्,पाडगावकर, बोरकर, शाळेतल्या कविता, नलेश पाटलांच्या पावसाच्या कविता अशी मैफल रंगत असताना अजयासुत स्काइप वर सानिका वाट बघतेय असं सांगत वर आला. वरच्या मजल्यावर रेंज येत नसल्याने सगळ्याजणी उठून खाली गेलो. आता खरा इंटरनॅशनल कट्टा सुरू झाला. सानिकाचा दीर्घ कॉल झाला की स्पंदनाताई आली. तिला सगळ्यांचं मुखदर्शन घडवलं आणि आनंदाच्या भरात अतिशय फालतू बडबड केली :)) जर्मनीतून मधुरा कनेक्ट व्हायला धडपडत होती पण मेलं नेट नीट काम करत नव्हतं. थोड्यावेळानी मृणालिनी स्लोवाकियातून फोनवर आली. तिच्याशी सगळ्यांच्या गप्पा झाल्या. पावभाजी आली. खमंग वासाने आणि सकाळचे पोहे जिरल्याने पुन्हा भूक लागली. मग फटाफट पाव कापले. लोणी लावून खरपूस भाजले आणि खायला बसलो. तोंडी लावायला दोनाच्या तिनाच्या गटात 'स्पेशल' गॉसिप सुरू झाले. त्याचे सगळेच मुद्दे इथे देऊ शकत नाही ;) विशाखाताईच्या प्रकाशित दोन आणि येऊ घातलेल्या पुस्तकाबद्दल कुतुहलाने चर्चा झाली. स्वातीताइशी माझ्या तिच्या घरच्या हुकलेल्या दोन चार कट्ट्यांविषयी हळहळ झाली. पण आज शेवटी आम्ही भेटलो याचा फार आनंद होत होता. स्वातीताई उत्साहाचा झरा आहे. तिच्यासाठी तशा बर्‍याच जणी नवीन होत्या पण ती अगदी सहज सर्वांमध्ये मिसळून गेली होती. जेवणं झाली. अजयाने सर्वांना पोटभर ताक पाजले. सगळ्याजणी पहाटेपासूनच्या दगदगीने आणि पोटात गेलेल्या सुग्रास जेवणाने सुस्तावल्या. जागा मिळेल तिथे पसरल्या. चिल्लीपिल्ली त्या बुलबुलाच्या मागे नि त्यांच्या आई त्यांच्या मागे अशी पळापळ सुरू होती एवढ्यात आरोही आली. खरं तर पाहुण्यांमुळे तिला जमेलसं वाटत नव्हतं पण काहीतरी जुगाड करून एवढ्या दूर आली पठ्ठी ! अनाहितांची ओढच अशी :) घड्याळाने ३:३० वाजलेले दाखवले. अजयाने सगळ्या सुस्तावलेल्या अनाहितांना भरपेट आइस्क्रीम खाऊ घालून ताजेतवाने केले. एक सून एका सासूच्या पायाशी लोटांगण घालतेय आणि सासू खुनशी नजरेने तिला झिअडकारतेय असा विशेष फोटू एका महत्वाच्या रेकॉर्ड साठी काढला गेला ;) :)) आता जायचे वेध ! कोण कुठे जाणार, कोणती बस, कोणती ट्रेन.... सगळ्यांच्या गाड्या पनवेलहून होत्या. त्यासाठी टमटम सांगून ठेवल्या होत्या. हे बोलत असताना ढाराढुर झोपलेली हेमा दिसली. असं देखवतंय व्हय ! तिला उठवलं. आणि गप्पा सोडून झोप काढण्याची शिक्षा म्हणून राजस्थानी डान्स ची शिक्षा फर्मावली ! तिनेही आनंदाने ती मान्य केली. आणि तिच्या सुरेख नृत्याने कट्ट्याची सांगता झाली. कधी नव्हं ते टमटमवाले भाऊ पण वेळेवर आले ! निरोपाच्या गळाभेटी झाल्या. पुढच्या पुणे कट्ट्याची बोलणी झाली आणि मुंबैकरणींना आम्ही निरोप दिला. पाठोपाठ आम्ही पुणेकरणीही निघालो. कोणत्याही स्नेहमिलनानंतर येणारा उदास रिकामपणा आला होता. पनवेलला पोहोचून मिळेल त्या बसमध्ये बसलो. येतानाही कट्ट्याबद्दल, मैत्रिणिंबद्दल, येऊ न शकलेल्या अनाहितांबद्दल भरभरून बोलत होतो. सगळ्यांची खूप आठवण येत होती. पुणं आलं. सर्वात आधी वाकडला मी आणि मोनू उतरलो. त्रि आणि मीता चांदणी चौकात. घरी येऊन बघते तर सर्वांनी कसंकाय कट्टा पुन्हा सुरू केला होता ! ३४० मेसेजेस आणि फोटू आणि रेकॉर्डिंग शेअर झाले होते. त्यावर गप्पा झडत होत्या. मनात म्हटलं..अभी तो पार्टी शुरू हुयी है :)) मी गप्पा आणि कविता आणि खादाडीत लैच्च व्यस्त असल्याने फोटूबिटू काही नाही. ज्यांनी काढले त्यांनी इथे टाका !!!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मितान छान लिहिले आहेस... सर्व अनाहिताचे हसरे,प्रफुल्ल्तीत चेहरे पाहुनच ...कट्टा कित्ती किती छान झाला असेल याची कल्पना येते... :)

एक महत्त्वाची गोष्ट सगळे जण विसरतं आहेत ;) १६ अनाहिता दिवसभर एकमेकांशी हसत खेळत एंजॉय करत एकत्र राहिल्या (थोडक्यात नं भांडता असं म्हणायचयं). गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या सोन्याने छापलेल्या आवृत्तीमधे प्लॅटिनमने लिहुन ठेवावा असा रेकॉर्ड. ;) ;) (३०० फक्त ची काडी) ;) ;) ;) ;) ;)

खुपच छान झाला कट्टा, दोन महीन्या आधी पासुन अजया ने तिच्या घरी कट्टा करुयात असे सांगितले होते नंतर जागा बदलली व शेवटी अजयाच्या घरीच कट्टा करुयात असे ठरले. रसायनी म्हणजे माझ्यासाठी खुप लांबचा पल्ला जवळ जवळ ४ तास जायला आणि ४ तास यायला पण सर्व अनाहीता भेटणार यासाठी माझी जायला तयार. कट्ट्याच्या दिवशी सकाळी ५.३० लाच घरातुन निघाले, ५.५० च्या ट्रेन मधे बसले, साधारण एका तासाने भावना कल्लोळ चढली आणि आमचा कट्टा सुरु झाला. पुन्हा एका तासाने मनिमाउ , तिचं पिल्लु आणि सौ. मु.वि. चढल्या. मग तर कट्ट्याला उधाणच आले, ९ वाजता पनवेल स्टेशनवर उतरलो तर तिथे उमा , तिचं पिल्लु अणि स्वाती भेटल्या. स्वातीला आणि सौ. मु.वि. ना पहिल्यांदाच भेटले पण त्या इतक्या छान बोलत होत्या कि पहिल्यांदाच भेटलो असे वाटलेच नाही. अजयाने टमटम ची अरेंजमेंट केली होतीच, टमटमवाले भाउ अगदी वेळेतच स्टेशनवर पोहोचले होते. टमटम निघाली रसायनीला, गप्पा मारता मारता कधी अजयाचं घर आलं कळलच नाही. गेलो तो पुणेकर्स अनाहीता स्वागतासाठी हजरच होत्या. सर्वांशी ठाणे कट्ट्यालाच ओळख झाली असल्याने गळाभेटी झाल्या. मग पुणेकर्स अनाहीतांची साहसी जंगल सफर ऐकली त्यानंतर अजयाच्या बंगल्याच्या आवारात बुलबुल त्यांचे घरटे आणि पिल्लांचे फोटोसेशन झाले, बुलबुलने आणलेला खाउ (मोठा पतंग) एका पिल्लाने अख्खाच्या अख्खा तोंडात घातला हे पाहुन सर्व अवाकच झाल्या. त्यानंतर पोहे आणि मितान, त्रि आणि विशाखा ने आणलेला खाउ खाउन सर्व अजयाची बाग पहायला गेल्या, छान छान बाग पाहुन झोपाळ्यावर फोटोसेशन झाले. तितक्यात अजयाने मला दीक्षा देण्याचा कार्यक्रम पार पाडला. सर्वजणी बंगल्याच्या वरच्या भागात गेलो तिथल्या बैठकीवर कविता वाचनाचा कार्यक्रम झाला, सर्वजणींनी खुप सुंदर कविता वाचन केले, मी आणी उमाने सर्वांचे व्हीडीयो रेकोर्डींग केले. थोड्या वेळाने भारताबाहेर असलेल्या अनाहीता एकेक करुन स्काईपवर येउ लागल्या. काही फोनवर बोलल्या. खुप छान वाटलं. तेव्ह्ढ्यात मीच मधुरा आणि सुर त्यांच्या पिल्लांबरोबर आल्या . सर्वांशी ओळख झाल्यावर जेवणाची वेळ झाली तसा सर्वांनी स्वादीष्ट पाव भाजीवर ताव मारला. जेउन बसलोच होतो की आरोही खुप लांबुन तिच्या पिल्लाला घेउन आली. ती जेवेपर्यंत सर्व गप्पा मारत होतो , स्वादीष्ट ताक पिउन अनाहीता पहुडल्या, थोड्या वेळाने आईसक्रीम खाल्ले आणि हेमाचा डांन्स पाहिला, मग सर्वांनी निघायची तयारी सुरु केली, निघायचे मन नव्हते पण जायचे तर होतेच , सकाळ्चे टमटम वाले भाउ वेळेवर संध्याकाळी ४.१५ ला पोहोचले आणि सर्वांचा निरोप घेउन निघालो, संध्याकाळी ६.३० ला पनवेल हुन ट्रेन पकडली , कोपरला मनिमाउ आणि सौ. मुवि उतरल्या, एका तासाने भावना कल्लोळ उतरली पुढे १.१५ तास मला एकटीने काढायला खुप कंटाळा आला, अगदी पोकळी जाणवायला लागली. कसेबसे उमा आणि अजयाने माझे स्टेशन येईपर्यंत व्हॉटसअ‍ॅप वर काही बाही गप्पा मारत निभाउन नेले. शेवटी एकदाची रात्री ९.४५ ला घरी पोहोचले. घरी गेल्यावर पाय खुप दुखत होते, बहीणीने विचारले की जातेस का इतक्या लांब कट्ट्याला मी म्हणाले हो पुढचा कटा आम्ही ठरवला सुद्धा हे ऐकुन ती अवाक झाली.

सविस्तर आणि बहारदार वर्णन मितान . मैत्रीची ओढ ही अशीच असते . आणि नवे जुने असे काहीही नाही इकडे . सर्वाना मस्त सामावून घेतात या मैत्रिणी .

मितान, मस्तच लिहीला आहेस वृत्तान्त...उगीच नाही कोण लिहीणार म्हटल्यावर आम्ही सगळ्यानीच तुझ्याकडे हात केला...तुझी इष्टाइल लैच्च भारी...सविस्तर वृत्तान्त वरती अनेक वेळा आलाच आहे...मग मी त्याच गोष्टींची उजळणी करत नाही...पण कट्टा एक्दम धमाल झाला...अनेक जणींना पहिल्यांदाच भेटले पण अजिबात तसे जाणवले नाही. अजया, तुझ्याबद्दल काय बोलू...पहिल्यांदाच तुझ्या घरी आले, आपली पहिलीच भेट...पण माहेरपणाचा अनुभव दिलास...इतकी अगत्यशीलता, आपुलकी जवळच्या नात्यात देखील दुर्मिळ असते आजकाल. तुझ्या घरात जरादेखील परकेपणा जाणवला नाही... सगळी पिल्ले पण मावशीच्या घरी आल्यासारखी घरभर बागडत होती... बाकी सर्व अनाहिता...तुम्हा सर्वाना पुन्हा पुन्हा भेटावेसे वाटतेय.

कट्टा झाल्यानंतर मिपावर येणे शक्य झाले नाही. आज वृत्तांत वाचून पुन्हा उजळणी झाली. मितानने बेष्टच लिहिलंय. साहसी मितान आमच्याबद्दल असं काहीतरी लिहिणार, हे आधीच लक्षात आले होते. कट्ट्यानंतरच्या अपेक्षा- १) अजया, मितान, स्वातीताई, श्री. आणि सौ. मूवि यांचं काव्यावरचं प्रेम कळलं. त्यांनी अधूनमधून कविता लिहाव्यात, कवितांचे रसग्रहण करावे. (विडंबन नव्हे. :) २) त्रिवेणी हलकंफुलकं, विनोदी लिखाण उत्तम करू शकेल, याची तिच्या सासूबैने दखल घ्यावी. ३) चिरोटे, बर्फी, बाकरवडी यांना स्मरून यापुढे कुणीही पुण्याला नावे ठेवू नये. ४) अजयाच्या आदरातिथ्याचा अनुभव माझ्यासाठी तसा नवा नाही. तिच्याकडून अजून अपेक्षा वाढल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचे, ५) कुणाही विश्वविख्यात कलाकाराला नावे ठेवू नये. अजयाच्या घरातले सर्व गणपतीबाप्पा एक्सप्रेस वे धावतपळत पार करण्याची शिक्षा करतात. :)

विशाखाताई, आम्ही भौगोलिक दृष्टीने का होईना पुणेरी असल्यामुळे नाव ठेवणे हे आमच्यासाठी श्वास घेण्याएवढंच सहज आहे. ते थांबवता येतच नाही. :)) गणपतीबाप्पाने हे समजून घ्यावे ;)

अनहिता एकेकाळी अनेक जेष्ठ व कनिष्ठ मिपाकर मंडळीनी ती अस्तित्वात येऊ नये म्हणून कितीतरी शाब्दिक राडे केले. निषेध व्यक्त केले पण तरीही विरोधाचे हलाहल पचवून सर्व मिपाकर महिलांनी ज्या तडफेने जिद्दीने आपुलकीने अनाहिता चे कार्य चालू ठेवले कट्टे केले त्याला तोड नाही दीपिकाच्या आधी त्यांनी इट्स माय चॉइस , आम्हाला एकत्र यायचे आहे कट्टे करायचे आहेत , हा आमचा निर्णय आहे असे ठरवून तो पूर्णत्वास नेला. त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

एकदाचा वाचला वॄत्तांत.. १९ तारखेला सारखी आठवण येत होती.. पण फोन बंद.. आता कसं, पोट भरल्यासारखं वाटलं.. :) अजयाताईसोबतचा खो-खो कधी संपणार काय माहीत माझा.. :(

मितान, वृत्तांत एक नंबर! परत कट्टा अनुभवला.. ह्या वेळी काही झालं तरी कट्ट्याला जायचंच असा निश्चयच केला होता.. खूप मजा केली ग मुलींनो आपण.. स्वाती