Welcome to misalpav.com
लेखक: ग्रेटगणेश | प्रसिद्ध:
१३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का? पुढारलेला असो वा मागास, जगातील प्रत्येक समाजात काही न काही अंधश्रद्धा असतातच! अंधश्रद्धा काही प्रमाणात 'जगणं' सुसह्य करतात असंही म्हणता येईल. युरोप-अमेरीकेतील वैज्ञानीक दृष्ट्या पुढारलेला देश असो वा भारतासारखा आध्यात्मीक भगव्या प्रकृतीचा देश असो, अंधश्रद्धा ह्या असायच्याच..! याच अंधश्रद्धांपैकी एक म्हणजे '१३' या आकड्याला अशुभ मानणं..या आकड्याला अशुभ का मानतात याची उत्तरं त्या त्या संस्कृती देतातच पण आपल्या भारतातही त्याला समर्पक उत्तर सापडतं..! फरक केवळ इतकांच की '१३' या संख्येने भारतात लघुरूप धारण करून '४' हे रूप घेतलंय..आणि या '४' चे जे प्रताप रोजच्या आयुष्यात अनुभवायला ते खरोखर मनोरंजक आहेत.. पाश्चात्य देशात १३ या संख्येला अतिशय घाबरतात. हि संख्या सैतानाशी निगडीत आहे असे त्या अति पुढारलेल्या देशांचे म्हणणे आहे. लंडन मध्ये थेटरात ‘M’ हे अक्षर तेरावे म्हणून तो ‘रो’ नसतो तर अमेरिकेत १३ व मजलाच नसतो..या पूर्णपणे वैज्ञानिक विचार करणाऱ्या देशात घडते. भारतात १३ हा जरी अशुभ मनाला गेलेला नाहीय तरी भारतीय ज्योतिष शास्त्रात १३ ची बेरीज ४ ही ‘लग्नाच्या’ बाबतीत अशुभ मानतात. ज्योतिषश्रद्धेनुसार ४ हा आकडा ‘हर्शल’ या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. ‘हर्शल’ ग्रहाचा शोध हा तुलनेने अगदी अलीकडे लागलेला असल्यामुळे त्याची प्रकृती आणि प्रवृत्ती वैज्ञानिक आहे असे मानले गेलेय. या संख्येच्या प्रभावाचा अनुभव आपल्यालाही घेता येईल. ज्या व्यक्तींच्या जन्म तारखेची बेरीज (dd-mm-yyyy) ४ येते किंवा ज्यांच्या जन्म तारखेत ४ ही संख्या एकापेक्षा अधिक वेळा आहे त्यांच्या बाबतीत हा प्रभाव जाणवतो. ‘४’ चा स्वामी ‘हर्शल’ हा विज्ञान वादी असल्याने तर्कशुद्ध विचार करणारा आहे. स्वामी विवेकानंद हे उदाहरण म्हणून घेण्यास हरकत नाही (१२.०१.१८६३ = ४). कोणीतरी सांगतो, किंवा पोथीत असे लिहिलेय वा अशी प्रथा-परंपरा आहे म्हणून तो कोणतीही गोष्ट करणार नाही. धर्म, प्रथा, परंपरा याचा नीट विचार करून जर त्याच्या बुद्धीला ते पटले तरच ‘हर्शल’ करणार अन्यथा जमाना कितीही बोंब मरूदे तो ऐकणार नाही..एकाच गोष्टीची नव्याने मांडणी करण्यात हे लोक आघाडीवर असतात..लक्षात घ्या, तुम्ही-आम्ही मळलेल्या वाटेवरून चालणारी नव्हे तर अशीच माणसे इतिहास घडवतात..!! हर्शल प्रचंड बुद्धिमान आहे. कधी कधी ही बुद्धिमत्ता आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या दृष्टीने विक्षिप्तपणाकडे झुकलेली वाटते. हे जे विचार करतात ते आपल्या कल्पनेतही येऊ शकणार नाहीत. म्हणून यांना समाजात ‘लहरी’ whimsical ठरवले जाते. हे काळाच्या खूप पुढे असतात. बुद्धीच्या कसोटीवर न टिकणारी कोणतीही गोष्ट हे करणार नाहीत. या संख्यची प्रचीती आपल्याकडे मुख्यतः विवाहाच्या बाबतीत अनुभवायला येते. विवाह हा आपल्या संस्कृतीत एक संस्कार आहे, एका प्रथा-परंपरेचा भाग आहे. ज्यांच्या जन्मतारखेत ‘४’ चा प्रभाव असतो यांची वैवाहिक आयुष्ये खरोखर अभ्यासण्यासारखी असतात. काय काय घडू शकते यांच्या बाबतीत? तर, यांचा मळलेल्या वाटेवर चालण्यास विरोध असतो. समाजातील प्रस्थापित प्रथा-परंपरा पाळण्याला यांचा विरोध असतो. एक - यांचा प्रेमविवाह झालेला असू शकतो. आता हे मी माझ्या वयाच्या किंवा ज्यांचा जन्म ६० ते ७० च्या दशकात झालेला आहे अशा व्यक्तींबद्दल बोलतोय. त्या वेळेस प्रेमविवाह हि क्वचित घडणारी किंवा एकदम अपवादात्मक व समाजाला मान्य नसणारी घटना होती. खूप पडसाद उठायचे अशा घटनांचे तेंव्हा. आताच्या काळात हा निकष लावायचा झाला तर ज्यांचे ‘अर्रेंज मॅरेज’ होईल त्यांना हा निकष लावावा लागेल. आता प्रेम विवाह, आंतर जातीय – धर्मीय वा आंतर प्रांतीय विवाह हे आम झालेले असून अर्रेंज लग्न ही दुर्मिळ घटना झालेली आहे. थोडक्यात समाजात जे रूढ असेल त्या विरुद्ध वागायचे असा यांचा खाक्या असतो. दुसरा अनुभव यांच्या बाबतीत येऊ शकतो तो म्हणजे हे लोक लग्नच करत नाहीत. लग्न हि एक प्रथा असल्यामुळे त्यांना ती आंधळेपणाने करणे मान्य नाही. जो पर्यंत त्यांच्या विचाराची दुसरी व्यक्ती सापडत नाही, तो पर्यंत ते लग्नाला हो म्हणत नाहीत आणि समजा तशी व्यक्ती भेटलीच तरी ती त्याच्यासारखीच असल्याने त्यांचे जमणे कठीण..! म्हणतात ना ‘बुद्धिमान किंवा विद्वानामध्येच मतभेद जास्त असतात’ तसा हा प्रकार..! तीन म्हणजे, हे लग्न न करता एकत्र राहत असतात. सध्या ज्याला Live in Relationship म्हणतात ना तस्स ! अनेकांबरोबर संबंध असणे, घटस्फोट होणं , एकापेक्षा अधिक वेळा लग्न होणं , नवरा बायको पेक्षा वयाने / उंचीने लहान असणे किंवा उलट असणे (उदा. सचिन तेंडूलकर २४.०४.१९७३, पहा ४ ची एका पेक्षा अधिक वेळ उपस्थिती ) असे अनेक प्रकार यांच्या बाबतीत घडू शकतात. ज्यांच्या जीवनावर ‘४’चा प्रभाव असतो त्यांचे आयुष्य विस्मयकारी घटनांनी भरलेलं असू शकते. आयुष्यात खूप तीव्र चढ-उतार, यु-टर्नस आलेले असू शकतात. एका अर्थाने यांचे आयुष्य ‘अपघाती’ असू शकते. अपघाती म्हणजे कोणतीही चांगली किंवा वाईट घटना कोणताही हास-भास नसताना घडणे. यावर कडी म्हणजे या सर्वाना पुरून ते आपले पाय ठाम पणे रोवून उभेच असतात. कोणी बरोबर असो वा नसो, हे आपल्या तत्वांना तिलांजली देत नाहीत. अर्थात ‘४ ’ या आकड्याबरोबर जन्मतारखेत दुसरे कोणते आकडे आहेत, त्यांचे आपापसात मित्रत्व आहे की शत्रुत्व याचा सारासार विचार करून वरील अनुमाने काढावी लागतात. हे सूत्र घर, वाहन, बँक खाते क्रमांक या सर्वाना सर्वसाधारणपणे लागू होवू शकते. भयंकर विध्वंस, मोठ्या प्रमाणावर प्राणहानी, सामुदायीक मृत्यू हे या ‘४’ किंवा ‘हर्शल’च्या प्रभावाखाली येतात. म्हणून पाश्चात्य देशात ‘१३’ हा आकडा अशुभ मानतात. १४.०४.१९४४ साली मुंबईतील व्हिक्टोरिया गोदीत झालेला स्फोट आजही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा स्फोट समजला जातो. या स्फोटात जवळपास २००० माणसे दगावली गेली व जखमी किती झाली याचा नक्की आकडा उपलब्ध नाही. अर्थात वर केलेलं वर्णन सर्वच ‘४’ वाल्यांना १०० % लागू असेल असे नाही, मात्र स्थूल मानाने असे अनुभव येतात. आपणही आपल्या परिचितांची जन्म तारीख पाहून यावरून खात्री करून घेऊ शकता. साधारणतः १० मधील ७ व्यक्तींना वरील अनुभव येईल याची खात्री आहे. आपली किंवा आपल्या पत्नीची वा अन्य कोणाचीही जन्मतारीख केवट ४,१३ किंवा ३१ आहे याचा अर्थ हे आपल्याला लागू आहे असा कृपया समाज करून घेऊ नये. -गणेश साळुंखे ९३२१८ ११०९१
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

‘४’ चा स्वामी ‘हर्शल’ हा विज्ञान वादी असल्याने तर्कशुद्ध विचार करणारा आहे. स्वामी विवेकानंद हे उदाहरण म्हणून घेण्यास हरकत नाही
अररर... हे स्वामीजींना आगोदरच समजायला पाहिजे होतं नै...

त्यात माझी जन्म तारीख १३ असल्याने ‘४’ चा स्वामी ‘हर्शल’ हे नामकरण बघता आजुनच हादरलो होतो, किती भयंकर लिहलयं. परंतु कोणाचीही जन्मतारीख केवट ४,१३ किंवा ३१ आहे याचा अर्थ हे आपल्याला लागू आहे असा कृपया समाज करून घेऊ नये. हे वाचुन जिव भांड्यात पडला.

..या धाग्यावर वाचकांनी १२ नंतर थेट १४वा प्रतिसाद द्यावा.तेरावा प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येईल. .किंबहुना देवकीच्या आठव्या पुत्राप्रमाणे इथेही तेरावा प्रथमच आला तर?अशा शंकेने मन ग्रासले.

तुम्ही भारतीय आणि हिंदु ना? धागा वाचला ना? मग ४थी प्रतिक्रियाच अप्रकाशित होणार. ती नेमकी तुमची आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अप्रकाशित करायला हवी (खरे म्हणजे चोथा प्रतिसाद देणार्‍या आयडीलाच बॅन करण्यात यायला हवे). तुमचा प्रतिसाद अप्रकाशित केल्यावर माझा प्रतिसाद चौथा येइल. मग माझाही अप्रकाशित करायला लागेल. असे चालुच राहिल.

.होय की..!! ..कसा सोडवायचा हा यक्षप्रश्न? ..कसा थांबवायचा हा दैवदुर्विलास?

पुढच्या कट्ट्याला पक्षीतीर्थी वारूणीचे दान ४ सत्पात्री मिपाकरांस करावे. ४ पक्षांची आहुती देउन त्याचे भोजन करावे, समस्त मिपाकरास बोलवावे म्हणजे या पापातून मुक्ती मिळेल

जेव्हा हर्शल अस्तित्त्वात होता पण ज्योतिषांना माहीत नव्हता तेव्हा त्याचा परिणाम होत होता का नाही?

त्यांच कस हाय- ज्योतिष कोरीलेशन स्टडी आहे. त्यांमुळे एक व्हेरियेबल कमी जास्त झालं तर चूक अचूकची परिणामकारकता थोड्या टक्केवारीने बदलनार. हेच जीवशास्त्र, फायनान्स, जनुकशास्त्र आणि वैद्यकशास्त्र ह्या सर्व ठिकाणी लागू आहे. जसजशी नवी माहिती मिळते तसतशी प्रगती होत जाणार. आता ज्योतिष शास्त्राने cause effect analysis द्यायचा प्रयत्न केला नाही किंवा कुणी केले असल्यास त्यात यश मिळाले नाही हा वेगळा विषय होऊ शकतो.

समजा एक गोष्ट घडेल की नाही याची शक्यता ५०-५० असेल तर एजून एक घटक वाढल्यावर ती एकदम ३३.३३ वर येणार ना! मुद्दा तो नाही. जुने ज्योतिषी या हर्शलला विचारात घेत नव्हते. तेव्हा त्यांचं आणि लोकांचं अडत नव्हतं. आताही आपल्या माणसांच्या रोजच्या आयुष्यात ग्रह एक आहे का ९ आहेत का ९०० याने तसा काही फरक नाही. मग एका ग्रहाचा शोध लागल्यावर हे अचानक असे परिणाम कसे व्हायला लागतील? लग्नाच्या बाबतीत मंगळाचं प्रस्थही गेल्या १०० वर्षातलं असं वाचलंय. शिक्षणाने लोक विचार करायला लागले पाहिजेत अशी साधारण अपेक्षा. मात्र हा विचार भलत्याच दिशेने का करायला लागतात?

समजा एक गोष्ट घडेल की नाही याची शक्यता ५०-५० असेल तर एजून एक घटक वाढल्यावर ती एकदम ३३.३३ वर येणार ना! तेव्हा त्यांचं आणि लोकांचं अडत नव्हतं.
एकदम बरोबर. हेच बाकीकडे देखील लावता येत. म्हणजे जनुकशास्त्राचा शोध लागण्याआधी औषध बनवणर्या कंपन्या आणि डॉक्टर लोक आपापलं काम करत होतेचकी. अजूनही त्यांच फारसं अडत नाही. पण मिळेल ती सर्व माहिती वापरावी अस सर्वांनाच वाटत, मग त्याचा परिणाम लक्षणीय असो किंवा फार छोटा असो.
आताही आपल्या माणसांच्या रोजच्या आयुष्यात ग्रह एक आहे का ९ आहेत का ९०० याने तसा काही फरक नाही. मग एका ग्रहाचा शोध लागल्यावर हे अचानक असे परिणाम कसे व्हायला लागतील?
परिणाम अचानक व्हायला लागतील अस बहुदा त्यांना म्हणायचं नसेल. काही परिणामांच त्यांच्या दृष्टीने त्यांना (अजून) एक स्पष्टीकरण देता येउ लागले असं ते म्हणत असावेत. आणि त्यांनी वर म्हंटल्याप्रमाणे हे सरासरी स्पष्टीकरण आहे. त्यामुळे व्हेरियंन्स तिथेही येणारच!
लग्नाच्या बाबतीत मंगळाचं प्रस्थही गेल्या १०० वर्षातलं असं वाचलंय. शिक्षणाने लोक विचार करायला लागले पाहिजेत अशी साधारण अपेक्षा. मात्र हा विचार भलत्याच दिशेने का करायला लागतात?
शिक्षणान लोक विचार करायला लागतात हा गोड गैरसमज फार वर्षापूर्वी दूर झाला. आणि मंगळाचं प्रस्थ म्हणाल तर ते कदाचित एखाद्या गोष्टीचं व्यवसायिकरण झालं की होणारा काळा बाजार असू शकेल. ज्योतिष शास्त्राचा काहीच अभ्यास नसल्यामुळे ह्याचं व्यवस्थित उत्तर देण्यास मी असर्थ आहे. पण हे बाकी सर्व ठिकाणि दिसून येत. वैदयकिय पेशात बर्याच ठिकाणी गरज नसलेल्या टेस्ट करायला लावण, किंवा पुरेसा पुरावा नसताना एक दोन व्यक्तींवर काही तरी प्रयोग यशस्वी झाले की त्यांच पोष्टर बॉईज बनवून कॅन्सरवर आता उपाय सापडला असे घोषित करण ह्या सगळ्या गोष्टी सगळीकडेच होतात. असो कशावर विश्वास ठेवायचा, कशाचा विरोध करायचा आणि कशाच्या बाबतीत साशंक रहायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे.

आताच एका आकडेशात्रींना विचारले. त्यांनी सांगितले की शब्दाच्या सुरुवातीला एक अनुच्चारीत 'P' टाका (सायकॉलॉजीसारखा). पुढील १३ पिढ्यांपर्यंतचे सगळे आकडेदोष निघून जातील! यापुढे माझ्या नावाचे स्पेलिंग Psuneiel !!!

येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवायच्या आधल्या रात्री जे जेवण झाले होते त्यात येशू आणि इतर १२ असे एकूण १३ जण होते.लिओनार्डो दा विन्सीच्या 'लास्ट सपर' या चित्रातही ते बघता येईल. तेव्हापासून १३ हा आकडा अशुभ मानला जातो असे वाचल्याचे आठवते.

मी स्वतः ४ आहे, बायको ४ आहे, बहिण ४ आहे, मित्रांमधे ४ वाले दोन-तीन आहेत. एकूण ४ वाल्यांचा स्वभाव सांगितलाय तसा आहे असा अनुभव आहे. नुमरॉलॉजीचा अभ्यास गेले १० वर्ष करतोय. नास्तिकतेतूनच संशोधन सुरु केले होते. १००+ व्यक्तींचा गेल्या दहा वर्षात अभ्यास केला आहे. त्यात वरील लेखात सांगितलेल्या काही गोष्टी अनुभवास आल्या आहेत. ४ आकडा जन्मतारखेत येतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात भयंकर चढ-उतार असतात. कायम दोलायमान स्थिती असते. एकाच वेळी दोन महत्त्वाची कामे करायची असतात. धर्मसंकट उभे राहतेच. एकीकडे गेले तरी तेवढा उपयोग नसतो, गेले नाहीतर फार त्रास होतो. एकाच वेळी एका डोळ्यात हसू दुसर्‍यात आसू अशी परिस्थिती असते. "सांप्रत मान्यता धुडकावून लावण्याकडे कल असतो". वेगळे आणि तर्कशुद्ध विचार मांडण्याची सवय असते. लग्न समविचारी अथवा आवडीच्या व्यक्तीशी करण्याची जबरदस्त इच्छा असते. पार्टनर्शीपच्या प्रकारात यश येत नाही. कारण स्वतंत्र स्वभाव. आता खरी गंमत अशी आहे की हे सगळे ४ वाल्यांसोबतच होते का? तर मी खात्रीपुर्वक सांगू शकत नाही. हे सगळ्या समस्या कुणाही व्यक्तीच्या आयुष्यात असतात. हमखास यश देणारे अंक असणारे सतत पराभूत होत असतात. हमखास अपयशाची खात्री असणारे अंक उत्तुंग शिखरे चढतात. नुमरॉलॉजीवर आंधळा विश्वास ठेऊ नये असा निष्कर्ष प्रदिर्घ अभ्यासातून काढला आहे. तरीही स्वभावाचे ढोबळमान वर्णन कित्येकदा खरे असते. नुमरॉलॉजी भविष्य वर्तवू शकत नाही. माझे तर स्पष्ट मत आहे जे होणार ते टळू शकत नाही. पण स्वभाव माहिती झाल्याने बर्‍याच गोष्टींची आगावू कल्पना येऊ शकते. स्वभाव जसा असेल तसे अनुभव येतात. स्वभावाला औषध नसल्याने अनुभवांचा एक पॅटर्न तयार होतो. त्याद्वारे अमुक व्यक्ती अमुक परिस्थितीत कशी वागू शकते याचा अंदाज वर्तवता येतो. लग्न आणि नोकरी/व्यवसाय यात मदत होऊ शकते. पण १००% खात्री देऊ शकत नाही. पुर्णपणे विसंबून राहणे मुर्खपणा आहे. धागाकर्त्याने लेखात उल्लेखलेल्या सर्वच गोष्टी सत्य नाहीत. सबब फार मनाला लावून घेऊ नये.

आपल्या सगळ्यांची लाडकी करनजीत कौर व्होरा (सनी लिओनी) हिचा जन्म पण १३ ला झालाय (१३ मे १९८१). कदाचित १३ या आकड्यामुळेच तिच्या आयूष्यात भयंकर चढ-उतार असावेत.

रच्याकने तिच्या आयुश्यात तिला बरेच धक्के सुध्धा सहन करायला लागले आहेत ;) _/\_

आहेतच की. पण अंकशास्त्रानुसार तिच्यावर १ चा जास्त प्रभाव आहे. करीअरमधे सक्सेस यश प्राप्त झाले. तरी काही अनाकलनीय कारणाने हिंदीसारख्या टीनपाट इंडस्ट्रीत यायला लागले. ती स्वभावानुसार वागत आहे. आता 'उतार'वयात गोंधळली आहे. हेच 'चार' अंकाचे गंडांतर. बाकी १ आणि ४ अंकाचे एक उत्तम उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. १ आणि ८, १ आणि ४ असे भन्नाट कॉंबीनेशन असणारे फार कमी माहित आहेत. दोन टोकाचे ग्रह एकत्र कसे फळ देतात हे पाहणे कुतुहलाचे असते. मनोरंजनासाठी माहिती: १+२ = यश, प्रसिद्धी, धनलाभ, नेतृत्व २+३ = लोभी, हळवे, यश. ३+४ = यश यथातथा, शत्रु होण्याची शक्यता जास्त, ४+५ = धाडसी, कलाकार, यश यथातथा, अडचणींचे डोंगर, मनकवडे, बोलघेवडे, बोलण्यात पटाईत. ५+६ = सुंदर व्यक्तीत्व, वक्तृत्व चांगले, व्यवसायात प्रगती, कलेत प्रगती. २ + ८ = व्यवसायात उत्तुंग यश, प्रसिद्धी, मानमरातब, उच्च वर्तुळात वावर. चढ-उतारमय आयुष्य.

मित्रा, तुझे योगी 900 नाव वाचून मला योग शब्दाचा मीच एक असावा असा जो भाव उत्पन्न झाला होता तो संपला... तरीही आपली म्हणजे तुमची 'सलोनी' सनी... 13 आकड्याच्या उत्पातातून तिच्या शारीरिक चढ-उतारांमुळे बरीच नाव कमवून आहे असे दिसते... मेक कमाई इन इंडिया या तंत्राचा अवलंब करून ती इथल्या निर्मात्यांचे 3 -13 वाजवणार कि काय न कळे...

अहो अत्र्यांचा जन्म देखील १३ तारखेचाच. त्या मुळे कितीजणांना ती अशूभ तारीख वाटली असेल नाही! ;)

पुण्याला रुबी हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये बेड १२ नंतर १२A आणि नंतर सरळ १४ आहे. म्हणजे लोक्स त्यांच्या पेशंट ला १३ नंबर बेड ला admit करू देत नाहीत का?