Welcome to misalpav.com
लेखक: पगला गजोधर | प्रसिद्ध:
अंदाजे अठराएक वर्षांपूर्वी आतल्या खोलीतून बायकांमधे 'बाय अडली कि काय ओ' अशी दबक्या आवाजातील काळजीयुक्त गलका उमटला, दाराच्या आडोश्याला उभ्या असलेल्या, मनुने हे ऐकले मात्र, त्याची नजर समोरच्या गाभार्यावर खिळून राहिली, तिकडे पाहून नमस्कार केला, मनात 'माझ्या बहिणीला व तिच्या बाळाला, माझ्या भाच्याला जीवनदान दे देवा, याच भाच्याच्या हाताने दरवर्षीच्या यळ्ळूर गडाच्या जत्रेत, बिशीबेळेहुळी अन्न शिरापुरी अस ११ लोकांना जेवू घालीन' असा नवस घातला.…. थोड्यावेळाने गावातल्या एका वयोवृद्ध सुईनीकडूनच बाळंतपणं सुखरूप झाल्याचं कळल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला. बाई बाळंत झाली की तिची वार उकिरड्यावर पुरली जायची प्रथा होती, त्याप्रमाणेच त्या सुईनीनं भाच्याच्या जन्मानंतर ती वार उकिरड्यावर नेऊन पुरली. दुसर्या सुईनीने बाळाला स्वच्छ करून दुपट्यात लपेटून मनूच्या हाती दिले, बाळाचे वडील राजधानीत अडकून पडल्याने, मामाम्हणून मनु उपस्थित होता, बाळाला काही व्यंग आहे का, म्हणून हळूच दुपटं बाजूला करून त्याने बाळाला बघितलं, दहा बोटे हाताला, दहा बोटे पायाला, सगळ कस व्यवस्थित होत…फक्त उजव्या जांघेत हुबेहूब पिंपळपानाच्या आकाराचा काळा डाग होता…… ------------------------------------ शेळीच्या कोकराला शोधून आमराई ओलांडून घाईघाईन घराकडे निघाले होते, अचानक कुणीतरी गप्पकन मागून येवून माझ्या तोंडावर हात गच्च आवळला, गावात यळ्ळूर गडाच्या जत्रेची चांगलीच धामधूम होती, लोक कालवा करत होती, मी त्याच्या हाताला चावले, तर त्याने करकचून माझ्या कानशिलात ठेवून दिले, पुढच्या क्षणी जाग आली तर तो बळजबरीने घुसलेला होता, तोंडावर त्याने फक्त डोळे उघडे राहतील, व बाकी डोक आणि उरलेला चेहेरा झाकला जाईल असे उपरणं बांधलं होतं, शरीरात कळा मागून कळा उठत होत्या, कमरेतून निघालेली वेदना अंगभर पसरत होत्या, शुद्ध हरपण्यापूर्वी माझ्या लक्षात राहीला तो त्याच्या उजव्या जांघेतला हुबेहूब पिंपळपानाच्या आकाराचा काळा डाग …… ------------------------------------ गावच्या चावडीसमोर ती अवघडून उभी होती, तिला धड उभंही राहता येत नव्हत की धड बसता येत नव्हत, तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या, अश्या पुरुषी नजरांसमोर तिचा, या धरणीने पोटात घ्याव आपल्याला, असा आकांत आतल्या आत चालू होता. मनु आता राजधानीतल्या कृपेमुळे ग्रामप्रमुख झाला होता, 'मुली कोणी केला तुझ्याबरोबर हा जुलूम, तू काही बोलली नाही तर आम्ही कसा तपास लावायचा ? ' ती आपल्या कापर्या किनकिनत्या आवाजात म्हणाली, 'नाव माहित नाही जी, पण त्याच्या उजव्या जांघेवर काळं पिंपळपान डाग हाये जी मालक ' तिचं एवढ ऐकल्यावर, एकदम फाडकन कानशिलात बसावी तशी मनुची अवस्था झाली पण त्याने लगेच सावरून घेत, आवाज चढवला… 'काय जिभेला हाड आहे का तुझ्या ? काय वाटल ते बोलतीस कशी ? आता मी काय सर्व गावच्या जांघा पाहत हिंन्डून, स्वतःची विटंबना करून घेऊ काय ?' थोड्यावेळाने सावरून तो उसासा टाकत म्हणाला, 'तूझ्या नशिबाचे भोग, दुसरं काय, मला तुझी करुणा येतेय, तुझ्यावर झालेल्या जुलुमाला उतारा म्हणून तुला साडीचोळी करू, तुझ्या भाकरीची व्यवस्था लावू, तुझा चावडीसमोरचा हा कज्जा मिटवून टाक', तिची मान खालीच होती … 'ठीक मग, सरलं न तुझं ?' अस मनुने कावून विचारले, डोळे मिटून ती तिथंच मटकन बसली… सगळेजन आता पांगायला लागले, जाताना प्रत्येकजन मनु च्या पायाला हात लावू लागले …. आपापसात म्हणत होते 'मनुबाबा किती द्ययाळू आहेत … '… अन मग पांगनार्या जमावाने मोठ्याने घोषणा केली...'बोला मनु बाबाकी ....जय …. '
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सतीश गावडे यांचा प्रगो च्या धाग्यावरचा प्रतिसाद आठवला. 'स्वार्थी गुणसूत्रांबद्दलचा'... अर्थात हा लेख वाचून संतापाची तिडिक मस्तकात गेली... खूप वाईट वाटले.

सर, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेत मला वावग काहीच वाटले नव्हते, त्यामुळे प्रतिक्रिया काढून टाकण्याची खरतरं गरज नव्हती, पण असो, तुमच्या निर्णयाचा आदर आहे. अवांतर: तुमच्या कुठल्याही प्रतिसादाकडे मी नकारात्मक दृष्टीने पहिले नव्हते. ( I may not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it......Voltaire)

किती लोक संधी असतानाही स्वतःच्या घरातल्या मुलाला शिक्षा करतील? जग स्वार्थी होतं, आहे आणि असेल. मूठभर लोकांना शक्ती देणार्‍या सिस्टीमवर लोक विश्वास कसा ठेवतात हा खरा प्रश्न आहे.