Welcome to misalpav.com
लेखक: संदीप डांगे | प्रसिद्ध:
एका प्रश्नाचे उत्तरः प्रसंग एकः बांद्र्याचे जे जे होस्टेल. रात्रीचे २ वाजलेत. अगदी पाप्याचे पितर असलेला एक मुलगा लघुशंकेला गेला असता चक्कर येऊन तिथेच पडला. बेशुद्ध झाला नाही. पण अंगात उठण्याचे त्राण बिल्कुल नाही. त्याला उचलून रेक्टरच्या गाडीत घालून जवळच्या एकमेव उपलब्ध असलेल्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटल मधे नेले. निवासी डॉकने छातीला स्टेथो लावून तपासले. काही प्रश्न विचारले. ताबडतोब रक्त/लघवी तपासणी, छातीचा एक्स-रे वैगेरे काढायला लावला. आम्ही जाम टेंशनमधे. च्यायला, हे पोरगं आई-बापापासून हजार किमी दूर. ह्याला काय झालं अन काय नाही. डॉकने गोळी दिली. सकाळी परत बोलावले. रात्रभर आम्ही चिंतेत. तो चिंतेत. सकाळी पेशंट आणि मी मस्त चालत हॉस्पीटलला गेलो. सगळे रीपोर्ट्स नॉर्मल. डॉक म्हणतो. अरे बीअर भरपूर प्यायला, जेवला नाही. अ‍ॅसिडीटी झाली होती. बाकी काळजीचं काही कारण नाही. सर्व खर्चः २,५०० रुपये. सन २००४. प्रश्नः अ‍ॅसिडीटी होती हे कळायला एक्स-रे लागतो? काय खायला प्यायला हे रात्रीच सांगितले मग एवढ्या टेस्ट्स का? उत्तरः डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. ते बरोबर आपल्याला कापतात. प्रसंग दुसरा: आयपीएलमधे असतांना रात्रंदिवस बसून काम केल्याने उष्णता वाढून 'योग्य ठिकाणी' चांगले ७-८ गळू झाले. भयंकर वेदना. उठण्या-बसण्याची बोंब. काहीच उपाय सुचेना. जवळच्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटलमधे गेलो. बायकोची आजी तिथली कायमची पेशंट असल्याने बरीच ओळख वैगेरे. प्रथितयश सर्जन डॉकने तपासले. निदान: ऑपरेशन करावे लागेल. खर्च १५ ते २० हजार वैगेरे. लगेच करून घ्या किंवा परिस्थिती हाताबाहेर जाईल. थोडे संशयास्पद वाटले. बायको म्हणाली, आमच्या जुन्या फॅमिली डॉकचे मत घेऊया. ते योग्य काय ते सांगतील. हे ठाण्यातलेच एक वयोवृद्ध डॉक्टर, मोठं पण जुनं हॉस्पीटल. काही गुणवान, नावाजलेल्या, चांगल्या डॉक्टरांपैकी एक. त्यांच्याकडे गेलो. तपासले. म्हणाले, "अरे काय नाही, साधं गळू आहे. ४ दिवसांत ठीक होईल. गरम पाण्यात डेटॉल टाकून बस. चांगला तासभर शेक घे. गळू दाबून पू व रक्त काढून टाक. ह्या अँटीबायोटीक घे. बास. आराम कर आठ दिवस." सर्व खर्चः ३०० रुपये. सन २००९. प्रश्नः एकाच पेशंटच्या एकाच रोगाचे एकाच अवस्थेबद्दल एकसारखे शिक्षण घेतलेल्या दोन डॉक्टरांचे निदान एकच पण उपचार पद्धती वेगळ्या का? दुसर्‍या डॉकनी खर्चिक उपाय का सांगितला? त्याला खर्चिक उपायच शिकवला होता का? उत्तरः काही डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. ते बरोबर आपल्याला कापतात. काही डॉक्टर आपल्याला खरंच वाचवतात, खर्च आणि रोग दोघांपासून. प्रसंग तीसरा: ठाण्यातले प्रसिद्ध असे नर्सिंगहोम. बापाने सुरू केलेले, आता आई, मुलगा, सून सांभाळते. खुप लोकांकडे चौकशी करून इकडे नाव नोंदवले. सातव्या महिन्यात रेगुलर चेक-अप ला गेलो असता. डॉक-आईनी नेहमीप्रमाणे तपासले. तपासून झाल्यावर नेहमीच्या डिस्कशन-क्वेरीज ला बसलो. बायको म्हणाली, की तीला दोन-तीन दिवसांपासून बाळाची हालचाल, ठोके, खालच्या दिशेला जाणवतायत, खुप दुखतंय. कपाळावर काळजीच्या आठ्या आणत डॉक म्हणाल्या, जरा परत एकदा तपासू. मग हात घालून नीट तपासले. बायकोचे म्हणणे खरे निघाले. बाळ गर्भ-पिशवीच्या तोंडावर धडक मारायच्या तयारीत होते. ताबडतोब बेड-रेस्ट सांगितली. आणीबाणीची परिस्थिती असल्याने तिथेच लगेच अ‍ॅडमिट केले. ३-४ दिवस निरिक्षणाखाली होती. बाळ परत पुर्ववत झाले. आम्ही घरी आलो. सर्व खर्चः दोनदा टेबलवर घेतले म्हणून दुप्पट तपासणी फी, (हॉस्पीटलायझेशनचा खर्च वेगळा) सन २०१०. प्रश्नः पहिल्यांदाच चेक-अप ला टेबलवर घेतल्यावर ही आणीबाणीची परिस्थिती एवढ्या अनुभवी डॉकला का जाणवली नाही? मग नक्की रेगुलर-टेबल-चेक-अप काय असतो? गर्भवती 'डॉकला कळतं, तेच सांगतील काय असेल ते' असे म्हणून घरी गेली असती आणि काही कमी-जास्त झाले असते तर जबाबदारी कुणाची? उत्तरः काही डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. पण त्यांना पेशंटशी काही घेणे-देणे नसते. ठाण्यात पहिल्या बाळाच्या वेळेस ९ सोनोग्राफी झाल्यात एकूण खर्चः११,३००. नाशिकमधे दुसर्‍या बाळाच्या वेळी एकूण काळात ४ सोनोग्राफी झाल्यात. एकूण खर्चः२४००. असे का? तुम्ही कुठल्या गावात आहात यावर किती सोनोज ठरतात का? प्रसंग चौथा: नऊ महीने पुर्ण झाले. आता बाळ योग्य पद्धतीने वाढतंय. ठोके व्यवस्थित आहेत. डोके खाली आहे. आगमनाची वेळ जवळ आली आहे. कुठल्याही क्षणी कळा सुरु होतील. होणारी माता-पिता वेगवेगळ्या भावनांच्या सागरलहरींमधे हिंदकळतायत. मातेची प्रकृती उत्तम आहे. बाळाची प्रकृती उत्तम आहे. सर्व चिन्हे उत्कृष्ट बाळंतपण होईल अशीच आहेत. नववा संपल्यावर रेगुलर चेक-अप ला गेलो. डॉक-आईच्या डॉक-मुलाने तपासणी केली. पहिल्यांदाच क्लिनिकमधले सोनोग्राफी मशिन पोटावर फिरवून तपासणी केली. शांतपणे आम्ही डॉकसमोर बसलोय. आता काय काळजी घ्यावी आणि कळा सुरु झाल्यावर काय करावे याचे मार्गदर्शनाची वाट पाहू लागलो. तेव्हाच त्या थंड डॉकच्या थंड आवाजाने आमची मनं चिरली. "सिझर करावं लागेल, बाळ पायाळु आहे." त्याचे वाक्य संपायच्या आत मातेचे अश्रू सुरु. मी हजार प्रश्न विचारतोय, त्याचे एकच उत्तर. सोनोग्राफीत बाळ पायाळु दिसतंय, आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. नाळ गळ्यात अडकेल, मुल डिस्ट्रेस होईल. डेट ठरवा. सिझर उत्तम राहील. आम्ही नखशिखांत हादरलो. बायकोने नॉर्मल डीलीवरीसाठी सर्व काळजी घेतली होती. तीला पोट कापून घ्यायचेच नव्हते. पण नशिबापुढे काय चालते म्हणून आम्ही सिझर साठी तयार झालो. दुसर्‍या मतासाठी कुणाला विचारावे अशी परिस्थितीच नव्हती, बायको विचार करते आहेच की मला ठोके खाली जाणवतायत. बाळाच्या ठोके मोजायचं मशीनही खालच्या बाजूलाच फायनेस्ट रिस्पॉन्स देतंय. मग बाळ पायाळू कसं? सर्व खर्चः १ लाख २५ हजार रुपये. (नॉर्मल डीलीवरी: ६५ हजार) सन २०१० प्रश्नः ५० हजारासाठी गळे कापणारे आणि ५० हजारासाठी पोट कापणारे यांच्यात फरक काय? तो आपण ठरवणारे कोण? उत्तरः काही डॉक्टर... जाऊ दे. प्रसंग पाचवा: डीलीवरीनंतर काही महिन्यांत बायकोच्या दोन्ही तळव्यांवर सूज यायला लागली, भयंकर कळा यायच्या. तिच्या खांद्याजवळ जन्मापासूनची एक बोराएवढी छोटी गाठ होती. तीही अचानक मोठी होऊ लागली. आता आम्ही अगदी ओळखीच्या व २५-३० वर्ष अनुभवी सर्जनला दाखवले. मनगटांमधे सिस्ट आहेत, ते काढल्यावर सूज यायची थांबेल असे त्याने निदान केले. खांद्याजवळच्या गाठीला ताबडतोब काढून टाकायचे ठरवले. कॉम्प्लीकेशन्स बद्दल विचारले असता काही होणार नाही असे सांगितले. दोन्ही हात व खांदा इथली ऑप्स एकाच वेळेस केली. गाठ काढल्यावर लॅबटेस्ट नुसार कॅन्सरवाली नाही असे निदान झाले. ऑप्स नंतर सूज कमी झालीच नाही. त्याबद्दल विचारले असता होईल ३-४ आठवड्यात कमी असे सांगितले. ३-४ आठवड्यांनीही कमी झाली नाही. मूळ त्रास तसाच आहे. फक्त थोडा कमी झाला, की बायकोने त्याची सवय करून घेतली माहित नाही. खांद्याजवळचे काही मज्जातंतूंना डॅमेज झालाय. थोड्या भागात नम्बनेस आहे. तोही सहा महिन्यात निघून जाईल असे सांगितले. तीन वर्षे झाली. सगळ्या समस्या तशाच आहेत. आता कुणाकडेही काहीही दाखवायची हिंमत राहीली नाही. नवा सर्जन पैसे उकळायला परत चिरफाड करेल, आराम मिळणार नाहीच अशी भीती खोलवर रुजून बसलीये. सर्व खर्चः ३५ हजार रुपये. सन २०१२. प्रश्नः आपली फसवणूक झाली हे सिद्ध कसे करायचे? कुठे? न्याय काय मिळेल? न्यायदानात शरीर ठीक होईल, एकदम ठणठणीत? उत्तरः????? प्रसंग सहावा: बहीणीला मूल नाही. लग्नाला सहा वर्षे झाली. अ‍ॅलोपॅथी डॉक्स फक्त प्रयोग करतायत असे कालांतराने लक्षात आले. त्याचे पुर्ण डीटेल्स माहित नाहीत. मी एका नामांकित सर्वोपचार डॉकला ओळखतो. प्रजननविषयक त्याचे फार कार्यक्रम टीव्हीवर येत असतात. महाराष्ट्रात किमान ३० शाखा आहेत. बहिणीला म्हटले बघ प्रयत्न करून. योग्य उपचार होतील अशी आशा आहे. त्यात त्यांनी एक अ‍ॅलोपॅथी इंजेक्शन वापरले. अजून काय काय न काय काय? जवळपास एक लाख रुपये घालवून काहीच उपयोग होत नाही म्हटल्यावर मी त्या डॉकला फैलावर घ्यायचे ठरवले. तर तो बहिणीला म्हणाला, तुम्ही सांगितलेली योगासने केलीत का? योगासने करा, फायदा होईल. लाखभर रुपयाची निरर्थक पंचकर्म ट्रीटमेंट, औषधी पचवून जर हा सांगतोय योगसनं करा, फायदा होईल. तर त्याचे डोके का फोडू नये असा विचार तिथेच आला. पण आपण त्याला कुठल्याही प्रकारे कायद्याच्या कचाट्यात पकडू शकत नाही हे ध्यानात आले. मुकाट घरी आलो. ती विशिष्ट इंजेक्शने विशिष्ट कालावधीत घ्यायची असल्याने बहिण परत सासरी निघून गेली. या आयुर्वेदिक डॉक्सनी लिहून दिलेल्या प्रीस्कवर तीचा अ‍ॅलोपॅथी डॉक तेच अ‍ॅलोपॅथी इंजेक्शन देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला मी माझी प्रोसीजर वापरणार आणि नंतर ठरवणार हे कधी द्यायचे ते. इतर बर्‍याच जिवघेण्या गमती-जमती कळल्या या प्रवासात. आपलं गिर्हाईक दुसरीकडे उपाय शोधतंय म्हटल्यावर तीच्या सासरकडच्या डॉकला नवे प्रयोग करायचा उमाळा आला. दोन-तीन सर्जरी करून टाकल्या त्या भरात त्याने. एक वर्ष झाल्ंय या सगळ्या गोष्टींना. कुणीही काहीच खरं सांगत नाही आहे. कसलीही हमी देत नाही आहे. सर्वांचे उत्तर आम्ही प्रयत्न करतो, होईलच काहीतरी (तुम्ही फक्त पैसे मोजत राहा) सर्व खर्चः ५ लाख रुपये आतापर्यंत. उपयोग शून्य. प्रश्नः अशा धादांत क्वॅक्सना अशी अडलेल्या लोकांना फसवणारे धंदे करण्याची मोकळीक कशी मिळते? आम्ही अमुक इतक्या हजार घरांमधे हास्य फुलवलं अशी पेजपेजभर नियमबाह्य जाहिरात सरकारी व्यवस्था कशी खपवून घेते? अ‍ॅलोपॅथी वा आयुर्वेद किंवा अजून कोणी, यांना अशा सर्फ एक्सेलछाप जाहिराती करण्याची अजिबात लाज वाटत नाही? उत्तरः????? प्रसंग सातवा: दोघांच्याही डोळ्यात कसले तरी इन्फेक्शन झालेले. ओळखीच्या एक फॅमिली फिजीशियन बाईंचा मुलगा नुकताच आय-स्पेशालिस्ट एम.डी झालेला त्याच्या कडे गेलो. त्याने डोळे तपासून सांगितले तुम्हाला चश्मा आहे. आपण जरा व्यवस्थित टेस्ट करून योग्य नंबर काढू. पुढचे तीन दिवस त्याने रोज संध्याकाळी डोळ्यात वेगवेगळे ड्रॉप्स टाकून नंबराची ट्रायल घेतली. प्रत्येक वेळेस नंबर वेगवेगळा येत होता. प्रत्येक विझिटची फी ५०० रुपये. १५०० घालवल्यावर अक्कल आली. त्याच्याच बाजूच्या मेडीकलवरून ओटीसी आय-ड्रॉप घेतलं, दुसर्‍या दिवशी सकाळी डोळे ठीक एकदम. मग स्वच्छ दिसू लागले. तीन दिवस आम्ही दोघे आणि एक २०-२२ वर्षिय मुलगी जिला रांजणवडी झालेली अशा तिघांवर साहेबांचे मनसोक्त प्रयोग सुरु होते. फक्त १५ दिवसांआधी मी डोळे तपासून घेतले होते कंपनी आय-चेक-अप कँपमधे. कुठलाही नंबर नव्हता. आणि हा मला -१.५ ते ३.५ असे भन्नाट आकडे रोज देत होता. देवकृपेने रोज १२ ते १४ तास कॉम्पवर काम करूनही गेल्या दहा वर्षात चश्मा नाही लागला. (आठ दिवसांनी ती रांजणवडी वाली तरुणी दिसली. तीची अवस्था भयंकर झाली होती. साध्या गरम शेकाने आणि थंड मातीच्या लेपाने दोन दिवसात बरी होणारी रांजणवडी डोळाभर झाली होती.) सर्व खर्चः १५५० रुपये. प्रश्नः जीवंत माणसांना, आपल्याकडे आलेल्या रुग्णांना गिनीपिग म्हणून वापरतांना अशा डॉक्टरांना लाज लज्जा शरम काहीच वाटत नसेल काय? तेही धादांत खोटे बोलून? उत्तरः????? हे फक्त माझे अनुभव आहेत. प्रातिनिधिक आहेत. यांचे डिसेक्शन करायची काहीच गरज नाही. समाजात फिरलात तर हजारोंनी सापडतील. सुर्य उगवतोच. कोंबडं झाकून उपयोग नाही. हे सगळे रुग्णांचे गैरसमज आहेत असे म्हणाल तर यापेक्षा निर्लज्ज प्रतिसाद नसेल. इतर अनेक धाग्यांवर अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. तीच परत परत इथे मांडून माझ्याच दिमागचं दही करून घेत नाही. बर्‍याच धाग्यांवर मी डॉक्टरांच्या समर्थनार्थ लिहिलंय कारण चांगले डॉक्स बघितले आहेत. सगळे बेड रिकामे पडले असून, गरज नसल्याने मुलाला अ‍ॅडमिट न करता धीर देऊन घरी परत पाठवणारा डॉक बघितलाय, एका झटक्यात तापातून उठवणारा डॉक बघितलाय, महिना दहा-वीस हजार रुपयेच मिळवणारा डॉ़क बघितलाय. कुठलाही मानसन्मान न घेता गरिबांसाठी फुकट औषधपाणी देणारा डॉक बघितलाय. पण 'डॉक्टर लोक फसवतात' हे आता 'सरकारी कर्मचारी भ्रष्ट असतो' इतके सामान्य झालेलं आहे. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने डोके ठेवावे त्यानेच गळा कापावा अशी वेळ आली आहे. यात काही डॉ़क्स चांगले काही वाईट अशी सफाई नकोय. जर सगळे एकच शिक्षण घेतात, एकच प्रतिज्ञा घेतात तर हे चांगले-वाईट कुठून येतात? चांगला की वाईट, मला नेमका कुठला डॉक्टर वाट्याला येईल हे कसे सांगता येईल? माझं निदान, उपचार खात्रीपुर्वक योग्यच झाले आहेत याची कोण हमी देईल? नाही देता येत तर मग पैसे कसे खणखणीत वाजवून घेतले जातात? तुमचा रुग्ण मेला/ रोग बरा नाही झाला म्हणून आम्ही पैसे घेणार नाही असे कुणी डॉक्टर म्हणेल काय? सगळे मुसलमान अतिरेकी नसतात पण सगळे अतिरेकी मुसलमान असतात याच धर्तीवर वैद्यकक्षेत्रातले सगळे डॉक्स वाईट नसतात पण सगळे वाईट डॉक्स वैद्यकक्षेत्रातच असतात हे भयानक सत्य आहे. मला कुणा ईंशुरन्स वाल्याने कापले, माझे कुणी पाकिट मारले, कुणी घरात चोरी केली, अगदी पद्धतशीर उल्लू बनवून लुबाडले तर मला जेवढे दु:ख होणार नाही त्यापेक्षा हजारो पटीने असले डॉक्स नशिबात आले की होतं. पैसे जातात त्याचं दु:ख नाही. चुकीच्या निदान/उपचारांनी जीव जातो, माणूस आयुष्यभर कुणा दुसर्‍याच्या हलगर्जीपणा, अर्धवट ज्ञान, पैशाची लालुच याचे फळ भोगत राहतो. याचं दु:ख मोठं आहे. डॉक्टर लोकांच्या अनीती व्यवहारांवर कुणी काहीही बोलले की अंगावर धावून जाणार्‍या, मुजोरीची भाषा करणार्‍या, असल्या डॉक्टरांचे सगळे व्यवहार चुकीचे असले तरी योग्यच आहेत असे भासवणार्‍या तथाकथित उच्चशिक्षित उच्चभ्रू डॉक्टरांना माझा साधा प्रश्न. रुग्णांचे रक्त पिणारे हरामखोर डॉक्टर खरंच अस्तित्वात नाहीत असा तुमचा दावा आहे काय? ते आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही व्यवसायाला कलंक ठरणार्‍या व्यवसायबंधूंच्या विरूद्ध प्रत्यक्ष मैदानात षड्डू ठोकण्याऐवजी नागवल्या गेलेल्या रुग्णांच्या/नातेवाईकांच्या विरूद्ध मिपावर युद्ध पुकारून तुम्हाला काय मिळतं? १ ट्क्का असो वा ९९ टक्के, अशा हरामखोर डॉक्टरांना हाकलून लावणं चांगल्या डॉक्टरांचं कर्तव्य नाही काय? आपापल्या व्यवसायात नाव कमवण्यासाठी फक्त डॉक्टरच नाही, यच्चयावत सगळ्यांनाच ढोरमेहनत करावी लागते. डॉक्टर जी मेहनत करतात ती रुग्णांचे प्राण वाचावे त्यांचे रोग बरे व्हावे म्हणून. त्यांच्या मेहनतीचं, खर्चाचं, घालवलेल्या वर्षांचं, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाचं, हल्ल्यांचं भांडवल करून कुणाही नडलेल्या, अज्ञानी रुग्णाला लुबाडण्याचा परवाना मिळतो काय? तुमच्या ज्ञानाला कुणी आव्हान देऊ शकत नाही म्हणून वाट्टेल तसे वागण्याचा परवाना मिळतो काय? मग कुणी काळजीने अथवा कशानेही तुम्हाला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर इगो दुखावतो का? पैसे कितीही घ्या, पैशाचा आणि उपचाराच्या खात्रीचा काय संबंध? उपचार, निदान यांची खात्री वादातीत असावी. तरच ते शास्त्र म्हणवून घेण्याच्या लायकीचं ठरतं. अन्यथा 'आम्ही तुमच्या वर फक्त प्रयोग करतो' असं मान्य करून मोकळं व्हावे सगळ्या डॉक्टर्सनी. मग आमचे तेच शास्त्रीय, बाकीच्या भाकडकथा असं तुणंतुणं वाजवत फिरू नये. वैद्यकक्षेत्रात शं भ र टक्के पारदर्शकता पाहिजेच पाहिजे. देअर इज नो अदर वे अराउंड. (मी आजारी पडल्यावर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांकडे जाऊ नये असे सुचवणार्‍यांना एक निरोप. कृपया वैद्यकक्षेत्रातले सगळे वाईट डॉक्टर हटवण्याची हिंमत आधी दाखवावी नंतर लोकांना सल्ले देत फिरावे.)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

डांगेसाहेब, तुमच्याकडे काहीही कागदपत्रे नाहीत काय?हॉस्पिटलच्या फाईल्स ,बिले भरल्याच्या पावत्या ई.ई.तसे असेल तर तुम्ही डॉक्टरांना ग्राहक पंचायतीच्या कक्षेत आणू शकता.आणि नावनिशीवार दिले असते तर इतरानी त्यातून हवा असेल तर बोध घेतला असता.

एक सारख्याच दोन घटनांमधुन मला दोन वेगवेगळे अनुभव आले. बेंगलोरात असताना पत्नीचा पाय एका खड्यात पडल्याने मुरगाळला. (रस्त्यावरचाच साधारण खड्डा होता पण अर्धांगाच्या नेहेमी मी रॅम्पवरच चालते ह्या तोर्याने दगा दिला.) त्यामुळे तिथल्याच एका जवळच्या हॉस्पिटलात घेऊन गेलो. डॉक्टरचा पहिला प्रश्न होता कि तुमचा मेडिकल इंशुरन्स आहे का? पत्नीला होणारा त्रास पाहुन जास्त काही किंतु परंतु न करता खरी उत्तरे देत गेलो. क्ष तपासणी वगैरे झाल्यावर डॉक्टरचे मत असे पडले कि हेअर लाईन क्रॅक आहे अ‍ॅडमिट व्हावे लागेल. त्यावेळी माझ्याकडे पैसेही नव्हते. टोकन अमाऊंट आता काढुन आणतो असे सांगुन मी बाहेर ए.टी.एम शोधायला गेलो. परत आलो तेव्हा ऑपरेशन चालु झले होते. पत्नीने नंतर सांगितले कि डॉक्टरने तीन चारदा मला विचारले कि तुझा पती पैसे घेऊन येईल ना? वगैरे. त्याला धाकधूक वाटत होती कि सेकंड ओपिनियन घ्यायला गेलो तर नाही ना? पत्नीला दुसर्या दिवशीच तिच्या कंपनीच्या कामानिमित्त विमानाने दिल्लीला जायचे होते. ते सगळे कॅन्सल करावे लागले. + पत्नीच्या माहेर हुन तिच्या आईला देखभालीसाठी बोलवावे लागले. इंन्शुरन्सचे पैसे भले मिळाले असतील पण ऑपरेशन व्यतिरिक्त झालेला हा इतर खर्च पुष्क्ळ होता. नंतर तो एक्स रे जेव्हा ओळखीच्या डॉक्टरला दाखवला तेव्हा त्याचे मत पडले कि प्लास्टर वगैरेची काही गरज नव्हती. साधी क्रॅप बँडेजने ही काम झाले असते. ( पण इथेही तो हे ही म्हणायला विसरला नाही कि अश्या केसेस नेहेमी बाऊंड्रीवर असतात व निर्णय सर्वस्वी त्या वेळेवर व डॉक्टरवर सोडावा लागतो वगैरे.) इथे माझे मत असे झाले कि भले पैसे जास्त गेले असले तरी हरकत नव्हती पण डायग्नोसिस व्यवस्थित करायला हवे होते. दुसर्या प्र्संगात वायनाड ला गेलो असताना पत्नीच्या त्याच त्या मी नेह्मी रॅम्पवरच चालते ह्या तोर्याने पुन्हा एकदा दगा दिला व फुटपाथ पुढे संपतोय व पुढचा रस्ता हातभर खाली आहे हि तिला दिसले नाहे व पुन्हा एकदा पाय मुरगाळला . अनोळखी प्रदेश. मल्याळम व्यतिरिक्त दुसर्या भाषेत बोलणारे कुणी नाही ह्या परिस्थितीत तिथल्याच एका रिक्षावाल्याला धरुन जवळच्या इस्पितळात गेलो. पहील्या इस्पितळात कुणी डॉक्टर नाही आहेत हे समजल्याने दुसर्या इस्पितळात गेलो. तिथे एक ट्रेनी डॉक्टर व बाकीच्या नर्सेस होत्या. स्गळे काही झटपट झाले. सेवा उत्तम व क्रॅप बँडेज लावुन विश्रांती घ्य असा सल्ला घेऊन जुजबी रकमेत काम झाले. इथे रिक्षावाल्याबाबतचा अनुभवही चांगला होता. रात्रीची वेळ असल्याने मला रिक्षा मिळेल न मिळेल हा विचार करुन तो एक तास अतिरिक्त थांबला. व नंतरही अडचणीत आहे हे दिसत असुनही त्याने त्या रात्रीच्या वेळीतही जो काही नाईट चार्ज असेल त्या व्यतिरिक्त एक पैसा जास्त घेतला नाही. दोन्ही प्रसंगात बेंगलोर व वायनाड ह्या ठिकाणी होत असलेला व्यावसियिकिकरणाचा भाग ही लक्षात घेतला पाहीजे. तसेच वायनाड च्या केसमध्ये जिथे गेलो होतो ते एक सेवाभावी संस्थेचे हॉस्पिटल होते व रात्रीची वेळ असल्याने नाईटला केवळ एक ट्रेनी डॉक्टर उपलब्ध होता. करिअरचय सुरवातीच्या काळात असल्याने कदाचित त्याने फक्त वैद्यकिय इंस्टिंक्ट विचारात घेऊन काम केले. तिथुन जाताना त्याला व त्याला मदत करणार्या नर्सेसना अनेकानेक धन्यवाद दिले. दोन्ही केसेस मध्ये तुलना करता दुसर्या केसेस मध्ये पाय ज्या अंतरावरुन खाली आल ते अंतर जास्त होते. व पत्नीला होत असलेला त्रास ही जास्तच होता. ह्यावेळी मला खात्रीन असे वाटत होते कि पुन्हा प्लास्टर लावावे लागेल वगैरे. पण इथे तसे झाले नाही. बेंगलोरला गेल्यावर मागच्या वेळेला आलेल्या अनुभवाला अनुसरुन दोन वेगवेगळ्या डॉक्टर्सना दाखवले. सिवियर लिगामेंट इंजुरी आहे प्लास्टर चढवावे लागेल पण हॉस्पिटलायजेशन ची गरज नाही असा सल्ला मिळाला. (इंशुरन्स बद्दल अजिबात विचारले गेले नाही) व मग पुढची ट्रीटमेंट घेतली. मुळात पहिल्या प्रकारात ही हे सर्व केले होते पण ज्या पध्दतीने त्या डॉक्टरने ही केस हाताळली त्यात पेशंटचय सोयीपेक्षा त्याच्याकडुन मिळणारा पैसाच ह्याला दिले जात असलेले महत्व अधोरेखित झाले.

माझ्यातर्फे मी धाग्यावरील चर्चेतून रजा घेत आहे. ह्या धाग्याचा उद्देश निव्वळ जनजागृती होता. माझ्यासारखे अनुभव हजारोंना येतात. त्याचे अस्तित्व मान्य करावे ही अपेक्षा आहे. ते जर मान्य केले तर अशा अनुभवांना पुढे जाण्याआधी कुणीही क्षणभर विचार करेल. डॉक्टरही माणूस आहे, सर्वगुणदोष त्यालाही लागू आहेतच. त्यामुळेच रुग्ण आणि डॉक्टर यांच्या परस्पर सहकार्याची आज गरज आहे. कुणीही कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवून नुकसान करून घेऊ नये. कुणावरही चिखलफेक करणे, विशिष्ट व्यवसायाचा उपमर्द करणे अथवा त्यातल्या व्यावसायिकांना सरसकट एका मापात धरणे हा उद्देश नाही. जिथे अतिशय विश्वासाने आपण व्यवहार करायचो तिथेही बनियागिरी घुसल्याने आता बनियाच्या दुकानात कराव्या लागणार्‍या सगळ्या करामती आपल्या या दुकानात पण कराव्या लागतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे चांगल्या दरात योग्य वस्तू पदरात पाडून घेणे हेच रुग्णांच्या हातात आहे. तेही तेव्हा, जेव्हा ते खरेदीच्या कुठल्याच मनःस्थितीत नसतात. त्यामुळेच व्यवसायिकांनीही ग्राहकांच्या चुका रंगवून सांगून उपयोग नाही. डॉक्टरांना मार-हाण होणे, जाब विचारणे हाही या व्यवसायाचा एक भाग आहे असे मान्य करावे आणि पुढे चालावे. ज्या परिस्थितीत आज ही वैद्यकव्यवस्था आहे तिच्या पूर्ण धंदेवाईकपणाचे समर्थन करतांना मग रुग्णांनीही सहिष्णुपद्धतीने, समजुतीने वागावे ही एकतर्फी अपेक्षा अतिशयोक्तीच समजायला हवी. व्यवसायावर आलेल्या कलंकाचे व्यावसायिकांनीच पुढाकार घेऊन निर्दालन करायचे आहे. रुग्ण हा अपघाताने तयार झालेला घटक असतो. व्यवसायिक पुर्णपणे समजून उमजून यात उतरलेले असतात. त्यामुळे त्यांच्यावरची जबाबदारी जास्त मोठी आहेच. बाबा पाटील यांनी पोलिस महिला रुग्णाला ज्या पद्धतीने सर्व उपचार, त्याचे फायदे-तोटे, परिणाम-दुष्परिणाम, पथ्ये यांचे तपशिलवार विश्लेषण दिले ते एक मार्गदर्शक उदाहरण आहे. असे प्रत्येक डॉक्टरने करणे आवश्यक व क्रमप्राप्त आहेच. दुर्दैवाने बरेच ठिकाणी व विशेषतः माझ्या प्रकरणांमधे हे झालेले दिसत नाही. याचा आग्रह डॉक्टर आणि रुग्ण दोघांनीही धरला पाहिजे. यात वेळ, पैसा, स्वभाव वैगेरे बाबी आणून कुचराई करणे रुग्णाच्या जीवावर उठू शकते. प्रत्येक रुग्णानेही डॉक्टर म्हणजे देव नाही (इथे देव म्हणजे 'सर्वशक्तीमान' या अर्थाने, 'भला माणूस' या अर्थाने नव्हे) हे मनाशी बजावून ठेवले पाहिजे. डॉक्टरांना किमान रुग्णाच्या चुका काढण्याचा तरी मोका देऊ नये असे मला वाटते. सर्व प्रतिसादकर्त्यांच्या मतांबद्दल, त्यांच्या शुभेच्छा आणि सहानुभूतीच्या भावनेबद्दल अनंत आभार! धन्यवाद!

तथापि आपण इन गुड फेथ जी अपेक्षा करतो आहोत तसे डॉक्टर्स आजही भरपूर आहेत आणि पुढेही येत राहतील ते देखील निष्णात, हाताला गुण असलेले आणि मुख्य म्हणजे नीट बोलायला शिकलेले असतील ... आपल्या वाट्याला उद्धट ऊर्मटाचार्य येऊ नये हि अपेक्षा आणि प्रार्थना

हलकट पेशंट्सचे डॉक्टरांना येणारे अनुभव असा धागा मी काढणार नाही, अन काढला, तर रजा घेण्याचा पळपुटेपणाही करणार नाही. इथे दररोज येण्याइतका वेळ नसतो, पण पाठीमागे केलेली धुळवड पाहून संताप येतोच.

पण आपली प्रत्येक धाग्यावर जाउन प्रत्येक वाईट गोष्ट स्वतः साठीच लिहीली आहे असा समज करुन घेउन प्रतिसादकर्यांवर चिखलफेक करायच्या वृत्ती मागचे कारण समजले नाही. (संपादित)

तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर जाउन एका क्वालिफाईड व्यक्तीवर आरोप करत आहात असं खेदानी म्हणायला लागतं आहे. ह्या वादात पडणार नव्हतो आणि संदिपभाऊंना जो अनुभव आलाय तो नक्कीचं खेदजनक आहे. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला वाटेल त्या पातळीवर जाउन इथल्या जेष्ठ आणि अनुभवी सभासदांवर वाटेल तशी राळ उडवावी. प्रत्येक क्रिटीकल गोष्टीची एक स्टँडर्ट ऑपरेटिंग प्रोसिजर असते. तुम्हाला स्वतःला साधा ताप आणि स्वाईन फ्लु मधला फरक कळेल का? त्यासाठी काही चाचण्या करायलाचं हव्यात ना? का डॉक्टरांनी पोपटवाला ज्योतिषी ठेवायचा दवाखान्यात हात बघुन उपचार करायला? आपल्याला ज्यातलं काही कळत नाही त्यामधे बोलु नये. डॉक्टरला शिव्या घालायच्या आधी काही बाबींचा नक्की विचार करा, जसं की आपणं वेळेत दवाखान्यात गेलोय का आजार जाणवल्यावर? गेलो असु तर डॉक्टरांनी सांगीतलेलं पथ्यपाणी पाळतोय का? (काही चु* लोक्स गोळ्या औषधांचा दिलेला कालावधी पुर्ण करत नाहीत. पथ्य-पाणी करत नाहीत आणि डॉक्टरला शिव्या द्यायला आणि मारायला पुढं). आपणं डॉक्टरशी किती वेळा झालेल्या आजाराबद्दल नीट चर्चा करता?
कदाचित तुम्हाला रुग्णंच्या नातेवाईकांकडुन खुप मार खावा लागत असेल आणी ईथल्या प्रतिसादक र्त्यांना शाब्दीक मार देउन सुड घेतल्याचे समाधान लाभत असेल.
स्वसंपादन केलतं तर बरं होईल. तुम्हाला मालप्रॅक्टीस बद्दल बोलायचं असेल तर इथल्या कुठल्याही सभासदांवर वैयक्तीक पातळीवर नं घसरता बोलता येउ शकेल एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.

प्रतिसाद संपादित झाले असतील तर माहित नाही रे. :/ दोन्ही बाजुंनी वैयक्तीक पातळीवर उतरुन टीका करणं चुकीचचं आहे पण.

कॅप्टनसाहेब, पातळी कुणी सोडली आहे ते नीट बघा. त्यांनी या धाग्यावरच्या प्रतीसादात कीती चिखलफेक आणी वैय्यक्तीक पातळीवर कॉमेंटस केल्या आहेत त्या जरा वाचा. तोच संदर्भ ईथे घेउन त्यांनी चिखलफेक परत चालु केली आहे. त्यांच्या या ओरीजनल प्रतिसादातले त्यांनी मला संबोधुन केलेले वाक्य / आरोप आता संपादन करुन काढुन टाकले आहे, म्हणुन माझा प्रतिसाद कदाचित अस्थाई / असंबद्ध वाटेल. तरीही तुम्हाला माझी चुक वाटत असेल तर केवळ तुमच्या भावना जपण्यासाठी मी माझे सर्व प्रतिसाद संपादीत करायला तयार आहे. फक्त वरची माझी कॉमेंट सोडुन मी कोणत्या डॉक्टरवर काय आरोप केले आहेत ते सांगा. ईथल्या कुणाही जेष्ठ आणि अनुभवी सभासदांवर कोणतीही राळ उडवलेली नाही. पण जर कुणी सतत वैयक्तीक पातळीवर कॉमेंट करत असेल तर त्याचे कारण काय असावे याचा तर्क केला आहे.

हाय आनंदीगोपाळ, हलकट पेशंट्सचा एवढा त्रास असेल, संताप येत असेल तर डॉक्टरकी सोडून का देत नाही? 'नळावरची भांडणे' इज बेटर प्रोफेशन फॉर डॉक्टर्स लाईक यु. बाय आनंदीगोपाळ.

माझेही दोन पैसे. सर्वप्रथम मी डॉक्टर नाही. (आणि सुदैवाने खूप कमी वेळा पेशंट झालो आहे) आत्मस्तुतीचा किंवा ढोल पिटण्याचा उद्देश नाहीये परंतु... डॉ. K B ग्रँट, डॉ. P S रामाणी, डॉ K H संचेती, डॉ हिम्मतराव बावस्कर, डॉ रवी बापट, डॉ अभय बंग या व अशा अनेक आपापल्या क्षेत्रातल्या 'ऑथॉरिटी' लोकांनी लिहिलेली पुस्तके वाचून, त्यांचे अनुभव, मुलाखती, भाषणे, केस स्टडीज (कळेल तितक्या) फॉलो करून आणि अंतर्जालावर लिहिणार्‍या डॉ सुरेश शिंदे (मायबोली), आपले डॉ खरे आणि डॉ पाटील यांचे अनुभव वाचून.. आणि.. ट्रॉपीकल मलेरिया, G B सिंड्रोम, एपिलेप्सी, वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या ग्रेडचे कॅन्सर, अनेक असाध्य, दुर्मीळ किंवा सहज बरे न होणारे रोग ज्यांनी प्रत्यक्ष सहन केले त्या रूग्णांचे अनुभव वाचून.. १) मानवी शरिर ही अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे. २) एखाद्या वेळी शरिरात एखादा बदल का होतो व नक्की कशामुळे होतो याचा काहीही ठोकताळा नाही. ३) एकाच रोगाचे एकाच शरिरावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे परिणाम दिसू शकतात. ४) एकाच परिस्थितीमध्ये एकाच शरिरातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिसाद जावू शकतात. (या वाक्याचा खेळाडूंच्या दृष्टीकोनातून विचार करावा) आजच्या काळात डॉक्टरसमोर एखादी केस जाते त्यावेळी त्यांना अगदी सुरूवातीपासून सगळे उपचार सुरू करावे लागतात कारण मानवी जीवनाचा प्रश्न असल्याने यापूर्वी काढलेला रिपोर्ट आणि आत्ताचा रिपोर्ट यांमध्ये जर चुकून फरक असेल तर पूर्वीच्या रिपोर्टनुसार औषधोपचार करून एक प्रकारची जोखीम पत्करावी लागते ज्याला डॉक्टर्स तयार नसतात. मी पेशंट झालो तर मीही तयार नसेन. आपले शरिर इतके गुंतागुंतीचे आहे की एखाद्या ठिकाणी लागलेला मार आणि त्याच ठिकाणी पण दोन / तीन इंच दुसरीकडे लागलेला मार यांमुळे पाठीचा कणा / मेंदू / सेंट्रल नर्व्हज सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देवू शकतात. त्यामुळे नक्की कुठे काय झाले आहे हे उपचार करणार्‍या डॉक्टरांना जितके नेमके आणि जितक्या जलद रितीने कळेल तितक्या लवकर योग्य उपचारांना सुरूवात होवू शकते. डॉक्टरांना योग्य भाषेत आणि योग्य प्रकारे प्रश्न विचारले तर आपले संपूर्ण शंकासमाधान होते आणि अनेकदा आपल्याला नसलेलीही माहिती सहज मिळते. हा माझा वैयक्तीक अनुभव. (प्रश्न विचारताना "आपण डॉक्टरांची परिक्षा घेत आहोत" अशा थाटात प्रश्न विचारले तर साहजिकच तुमचे रिलेशन बिघडणार!) सर्वात महत्वाचे - डॉक्टरही माणूस असतो. आपल्याला लागणारे सर्व नियम त्याही मर्त्य मानवाला लागू होतात. कांही डॉक्टर रूग्णाला अक्षरश: लुटतात. यांमध्ये कोणताही संदेह नाही. मात्र त्याच बरोबर रूग्णावर मनापासून उपचार करणारे डॉक्टर कमी प्रमाणात असतील तरी अस्तित्वात आहेत. (सहज जाता जाता... हाफिसात कॉम्प्लीमेंट्री चेक साठी येवून डोळे / दात तपासणार्‍या एकदम भारी दिसणार्‍या साखळीदवाखान्यामध्ये मित्राच्या बायकोने जॉबसाठी अर्ज दिला, यथावकाश मुलाखतीला निमंत्रण आले. तर मुलाखत मध्येच सोडून ती परत आली. का? तर तिला त्यांनी महिन्याचे टारगेट्स दिले आणि तिने अधिक माहिती विचारल्यावर "ज्याला काही झाले नाही अशाही पेशंटला रोग देवून टारगेट्स पूर्ण करण्याची जबाबदारी टाकली" - असेही असू शकते.) अशा परिस्थितीमध्ये आपल्याला असलेली माहिती आणि आपण त्यावेळी घेतलेला निर्णय या गोष्टी खूप महत्वाची भूमीका बजावतात. संदीप डांगे - Sun, 19/04/2015 - 02:29 मला रोजच्या कामांसाठी, वस्तूंसाठी, सेवांसाठी आंजावर माहिती शोधण्याची भयंकर सवय आहे. पण वैद्यकिय बाबतीत कानाला खडा. अगदी अमुक एखाद्या आजारासाठी कुठलं हॉस्पीटल आहे हे सुद्धा नाही. त्याबाबतीत फक्त जनरल प्रॅक्टीशनर जे सांगणार तेच ऐकायचं असा नियम करून ठेवला आहे. बाकी सद्सद्विवेकबुद्धी असतेच. समोरचा डॉक्टर सांगेल ते ऐकून आणि बाकी कोणताही विचार न करता तेच अनुसरून तुम्ही वैद्यकीय उपचार घेत असाल तर त्यामध्ये फसवणुकीची शक्यता खूप वाढते. अशा परिस्थितीमध्ये तुमची १००% फसवणूक होवू नये अशी तुमची अपेक्षा असेल तर तुम्हालाच हालचाल करावी लागेल. भरपूर माहिती मिळवा.. सेकंड / थर्ड ओपीनीयन घ्या.. मित्र / नातेवाईकांमध्ये असाच आजार झालेले लोक असतात त्यांना भेटा.. आणि मग जो असेल तो योग्य निर्णय घ्या. इतके करूनही तो निर्णय चुकलाच तर सर्व डॉक्टर जमातीला दोष देण्यापेक्षा त्या डॉक्टरकडे जाणे टाळा, गावभर त्याची खुशाल बदनामी करा आणि त्यालाही तुम्ही बदनामी करत आहात ते कळूद्या. (हा अत्यंत गंभीरपणे पण कदाचित अत्यंत चुकीचा सल्ला देत आहे.) आता तुमच्या मूळ धाग्यातील प्रसंग... प्रसंग १ - अचानक शरिरावरचे नियंत्रण जाणे, चक्कर येणे आणि पडणे म्हणजे मेंदूला मार, पक्षघात, पाठीच्या कण्याला मार अशा अनेक शक्यता असू शकतात. ज्या डॉक्टरकडे तुम्ही गेलात त्याच्यासमोर असा पेशंट आला असताना X Ray काढायला लावणे अत्यंत साहजिक आहे. प्रसंग २ - जनरल प्रॅक्टीशनरचे न ऐकता सद्सद्विवेकबुद्धी वापरून सेकंड ओपीनीयन घेतल्याने फसवणूक झाली नाही. प्रसंग ३ व ४ - मला फारशी माहिती नाही. प्रसंग ५ व ६ - इतक्या वर्षात जर योग्य उपचार मिळत नसतील तर तुम्हीही आत्मपरिक्षण करावयाची गरज आहे असे वाटत नाही का..? उपचार होवून रूग्ण बरा होणे ही डॉक्टरची जबाबदारी असली तरी रूग्णाची आणि त्याच्या कुटुंबीयांची गरज असते. प्रसंग ७ - तुम्ही तो डॉक्टर ओळखीचा असून आणि नवीन प्रॅक्टीस असूनही काहीही केले नाहीत..?? त्याला भेटा. सगळी परिस्थिती समजावून सांगा, शक्य असेल तर "मी माझ्या ओळखीचा एकही पेशंट तुझ्याकडे येवू देणार नाही" असे सुनावा त्यालाही धडा मिळेल. (हा प्रकार मी एकदा याच शब्दात दंतवैद्यकाला सुनावून केला आहे. त्याच्यासोबत रिलेशन बिघडले पण त्यालाही धडा मिळाला असावा) ************************* हे चांगले-वाईट कुठून येतात? चांगला की वाईट, मला नेमका कुठला डॉक्टर वाट्याला येईल हे कसे सांगता येईल? माझं निदान, उपचार खात्रीपुर्वक योग्यच झाले आहेत याची कोण हमी देईल? या प्रश्नांच्या अनुषंगाने वरील सर्व लिहिले आहे. विस्कळीत आहे पण समजून घ्यावे. १) कमी देता येत नसेल तर मग पैसे कसे खणखणीत वाजवून घेतले जातात? २) तुमचा रुग्ण मेला/ रोग बरा नाही झाला म्हणून आम्ही पैसे घेणार नाही असे कुणी डॉक्टर म्हणेल काय? ३) १ ट्क्का असो वा ९९ टक्के, अशा हरामखोर डॉक्टरांना हाकलून लावणं चांगल्या डॉक्टरांचं कर्तव्य नाही काय? ४) वैद्यकक्षेत्रात शं भ र टक्के पारदर्शकता पाहिजेच पाहिजे. या गोष्टी प्रॅक्टीकली शक्य नाहीयेत. त्यामुळे "धाग्यात मांडलेल्या अपेक्षा अवास्तव आणि भाबड्या वाटत आहेत." असे पहिल्याच प्रतिसादात म्हणालो होतो. ***एका नॉन मेडीकल व्यक्तीचा प्रतिसाद असल्याने कोणत्याही बाजुने नसलेला "न्युट्रल" असा समजण्यास हरकत नाही.

अनुक्रमे डॉ भा नि पुरंदरे / डॉ वि ना श्रीखंडे हे हि मी जोडीन ... झालच तर दादर चे डॉक्टर करमरकर (पुस्तक माहित नाही पण अजोड कीर्ती) ...असो जागतिक कीर्ती मिळवून सुद्धा ...आदळआपट, उर्मटपणा आणि थयथयाट त्यांच्या संस्कृतीत बसत नव्हता ... आजही त्यांचे नाव आदरानेच घेतले जाते ... They commanded the respect, never demanded..

१) मानवी शरिर ही अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे. २) एखाद्या वेळी शरिरात एखादा बदल का होतो व नक्की कशामुळे होतो याचा काहीही ठोकताळा नाही. ३) एकाच रोगाचे एकाच शरिरावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे परिणाम दिसू शकतात. ४) एकाच परिस्थितीमध्ये एकाच शरिरातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिसाद जावू शकतात. (या वाक्याचा खेळाडूंच्या दृष्टीकोनातून विचार करावा)
या गोष्टींसाठी व एकंदर प्रतिसादासाठी वरील वाचनाचा रेफरन्स दिला होता. आदळआपट, उर्मटपणा आणि थयथयाट यांबद्दल सहमत आहे. असे प्रतिसाद सर्वांनीच टाळले पाहिजेत. तसेच एखादी व्यक्ती कोणत्या गोष्टीमुळे चिडत आहे हे लक्षात आले की त्या व्यक्तीला त्या त्या गोष्टीवरून मुद्दाम खिजवून थयथयाटाची मजा पाहिली जाते. असेही एक निरीक्षण आहे!

...आणखी एक.
जे.पी.मॉर्गन - Tue, 05/05/2015 - 20:13 असे अनुभव ओळखीच्या अनेकांच्या बाबतीत आलेले जवळून बघितले आहेत. कोथरूडमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ७ वर्षीय मुलीच्या हनुवटीला ५ टाके घालताना तिथल्या डॉक्टरने "कायमचा मार्क राहील... मुलगी आहे... पुढे (लग्नाला) वगैरे अडचण येऊ शकेल. तर प्लॅस्टिक सर्जरी करून टाका, २४ तासाच्या प्रोसीजरचे फक्त ५० हजार होतील" असं तिच्या आई-बापाला सांगितलं. तिच्या बापाने हट्टाने लावून धरून प्लॅस्टिक सर्जरी करू दिली नाही. पोरीची जखम १५ दिवसांत भरली न वर एक ओरखडा सुद्धा राहिला नाही.
चिगो - Tue, 05/05/2015 - 20:45 अरे देवा...
दोन्ही सन्माननीय सदस्य - कृपया वैयक्तीक घेवू नका. पण असे खरंच ठरवता येत नाही. ५ टाके म्हणजे किमान दोन इंचाची जखम असेल आणि किती खोल असेल हे आपल्याला माहिती नाही. अशाने गैरसमज वाढत जातात. त्या डॉक्टरांचा लुटण्याचा उद्देश असेल / नसेल हा मूळ प्रश्न आहेच. कदाचित अशा पेशंटनी डॉक्टरांना "तेंव्हाच का सांगीतले नाही??" अशा प्रकारचे प्रश्न नंतर कधीतरी विचारून हैराण करण्याचेही अनुभव त्यांना असतील त्यामुळे सेफर साईडला सल्ला दिला असेल - हे समर्थन नाही. फक्त एक शक्यता. (सहज जाता जाता - ५ टाके घालूनही व्रण राहिले नाहीत आणि निव्वळ खरचटल्यामुळे त्वचेवर कायमस्वरूपी व्रण तयार होवू शकतात - अशा परिस्थितीमध्ये पुढे काय होईल? व्रण राहतील की नाही?? ही माहिती मला आज आत्ता ताबडतोब हवी आहे. हे बरोबर आहे का..?)

सुन्न करणारा अनुभव घ्यायचा असेल इच्छुकांनी अंकुर अरोरा मर्डर केस हा सिनेमा बघावा असे सुचवितो. युट्युबरील हा दुवा.

लोकांची हृदये काय ह्या कंपन्यांनी बिघडवली ?? ५ स्टार हॉटेल मध्ये जायला पैसे आहेत आणि एक साधा स्तेंत टाकायला नाही .... परवडत नसेल तर जा कि त्या xxx बागेत ... नै तर ससून मध्ये जा मुंबईत असाल तर के ई म मध्ये जा पण खरे स्तेंत वाले जीवाच्या मानाने महाग नसतातच ....स्तेंत बनवणारे त्यांच्या अकलेचा आणि तुमच्या असहाय्यतेचा फायदा घेणारच ....रिक्षावाले नै घेत ?? थय थय थय थय थय थय थय थय थय थय थय थय थय थय थय थय थय थय थय थय

असे स्टेंट ३०० ते ७०० पट किंमत चढवून विकणारे डॉक्टर (किंवा डॉक्टरांच्या हातात काही नसतं असं आर्ग्युमेंट करायचं असेल, तर मग हॉस्पिटल) मग 'आनंदी' रहाणारच ना!

वडिलाच्या अँजिओप्लास्टी वेळेस माझ्या एम आर मित्राने आपण स्वतः स्टेंट आणून देउ असे सुचवले होते कारण ७५,००० रू. जी स्टेंट ची किंमत लावतात तो २०,०००- २५००० मधे त्याच कंपनीचा मिळतो असे सांगितले . या संबंधी डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांनी साफ नकार दिला . या हॉस्पीटलतर्फे पुरवलेले स्टेंट वापरावे लागतील अथवा ऑपरेशन करणार नाही. ४ ठिकाणी विचारून हाच अनुभव आला. शेवटी गरजवंताला अक्कल नसते या उक्तीनुसार मागतील तेवढे पैसे देउन ऑपरेशन केला. ही लुबाडणूक तेव्हच लक्षात आली होती.

कालच टीव्हीवर बातमी ऐकली की सरकार (एफ डी ए) या बाबतीत काही तरी करतंय. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Heartbreaking-Stents-imported-for-Rs-25000-sold-to-patients-for-Rs-1-55-lakh/articleshow/47349214.cms http://indiatoday.intoday.in/story/cardiac-stent-overpricing-scam-maharashtra-fda-pune-nashik/1/439059.html http://www.dnaindia.com/money/report-pharma-authority-probes-spike-in-price-of-cardiac-stents-2041986 बाकी या गोष्टीचं स्टिंग करून टीव्हीवाल्यांना पाठवू शकता.