Welcome to misalpav.com
लेखक: विनीत संखे | प्रसिद्ध:
ही पुस्तकं एक अजब गोष्ट आहे. मानवाच्या सर्व संभाषिक प्रकारांमधला सर्वात जास्त "हेकेखोर" प्रकार आहे हा … खरंच !!! माझे विचार, माझ्या संवेदना, माझा न्याय आणि माझाच निवाडा… माझ्या भिंगांमधूनच जग पहा … नाही आवडलं तर वेळीच प्रतिक्रिया द्यायची सोय नाही … पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय तर शक्यच नाही … लेखकाला सगळं छापून आल्यावर मग प्रतिक्रियांची पत्र , इमेल पाठवून काय उपयोग? … शेवटी कुठल्या न कुठल्या तरी "बिन" मध्येच रिसायकल होणार ते… पुस्तक तर आधीच छापलं गेलंय … ते बदलणार नाही… कधीच नाही … विचारांची एक नश्वर गुंडाळी … लेखकाने आपल्या मनाप्रमाणे गाठी मारलेल्या … मनाप्रमाणे उसवलेल्या … अशी गुंडाळी जी एकरेषीय कथाकथनात गुंतलीय … ह्या पुस्तकांचा लेखक एका पक्षपाती हुकुमशाहा सारखा वागतो … त्याने वाचकांच्या विचारांच्या सहभागाची, संभाषणाच्या देवाणघेवाणीची काही सोयच ठेवलेली नाही ! हे विचार आहेत "एव्हरिथिंग बॅड इज गुड फॉर यु" ह्या स्टीव जोन्सन ह्या लेकाकाने लिहिलेल्या पुस्तकातले. त्यात लेखक म्हणतो की विचार करा जर पुस्तकं इंटरनेट चा शोध लावल्यानंतर शोधली गेली असती तर लोकांना त्यांच्याविषयी काय वाटलं असतं… जगातल्या सर्व साक्षर इण्टरनॉट्सची (इण्टरनेट सर्फ करणाऱ्यांची) गाळण उडाली असती … पुस्तकांना आतंकवादी हत्यार मानलं गेलं असतं … मन-विचार-व्यक्ती-संभाषण-स्वातंत्र्याची गळपेची करणारी एक पद्धत मानलं गेलं असतं … पण इथे लेखकाने काहीही नव्याला नऊ दिवसांपश्चात वाईट ठरवून देण्याच्या मानवी वृत्तीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. केवळ एखादी गोष्ट नवीन आहे, वेगळी आहे म्हणून ती वाईट का? हो नक्कीच वाईट … गॅलिलीयो ह्याच प्रवृत्तीचा बळी ठरला … नाही का? १९७० मध्ये कॉंप्युटरला विरोध करणारे जनरल मोटर्सचे कामगार (आणि जगापेक्षा १० वर्ष मागे चालणार्या भारतात १९८० मध्ये हेच किंचाळणारी भाज़प) ह्याच वृत्तीचे पाईक. विज्ञान म्हणते की प्रत्येक पदार्थात जडत्त्व (इनर्शिया) असते जे पदार्थाच्या कुठल्याही ऊर्ध्व (वाढणा-या) किंवा अध (थांबणा-या) गतीला किंवा विरोध करते. जर निसर्गानेच ही व्यवस्था केलीय तर पदार्थात न मोडणारे मन ह्यातून कसे वेगळे असेल? शाळेत वेगळा/ळी दिसणारे/वागणारे आपले टवाळकी पात्र विद्यार्थी बंधु/भगिनी, मंदिरात जीन्स घातलेली बया, पिवळ्यांतला तो एक हिरवा आंबा, सफेत मेढ्यांमधली काळी मेंढी, आईन्स्टाईनच्या थियरी ऑफ रिलेटिविटीला बाद ठरवणारा आईन्स्टाईन-भक्त-ऑंक्स्फर्डियन्समधला तो कोवळ्या वयाचा स्टीफन हॉकिंग … प्रत्येक वेगळ्याचं वेगळं नशीब … वेगळा कसा ठरतो … उत्तर आहे … कसाही ! एका एटीएनटी ने एक ऑनलाईन शोध निबंध प्रस्तुत केला. त्यात त्यानी कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेली एक प्रश्न मंजुषा बनवली ज्यात त्यांनी १०० लोकांना असंबद्ध अनुक्रमांमधली वेगळी बाब (ऑड मॅन आऊट) शोधून तो क्रम सुसंबद्ध करायला सांगितला. त्यात एक क्रम होता असा … १. A , २. B, ३. C आणि ४. P ९२ लोकांनी P वेगळा ठरवला. का? तो क्रमात नाही म्हणून. पण ह्या उत्तराला वैज्ञानिक आधार असा काहीच नाही. ज्या ८ लोकांनी वेगळी उत्तरं दिली त्यात तिघांनी C ला वेगळं ठरवलं … का? कारण त्याच्या आकारात पाश (लूप) नाही. C चे दोनही हात कुठेच जोडत नाहीत. आता हे जास्त शास्त्रीय उत्तर म्हणता येईल. म्हणजे जसा जसा घोळका वाढतो तशी समानबद्धता वाढते आणि असंबद्ध बाबी आपल्यातून बाद करण्याची वृत्तीही. वेगळ्याला वागवायला त्याच्यासारखं वेगळं होणं गरजेचं नाही… फक्त वेगळ्याचं वेगळेपण डोळसपणे बघण्याची गरज आहे. निसर्ग वेगळ्याला बाहेर नाही काढत … तो अक्षम आहे त्यालाच बाहेर काढतो… जेव्हा पूर्ण घोळका अक्षम होतो तेव्हा संपूर्ण घोळका नष्ट करतो. त्यात जो वेगळा बनतो त्याला क्षमा केली जाते…. कारण त्या वेगळ्याने निसर्गाचा एक अहं नियम पाळलेला असतो … उत्क्रांतीचा …. शेवटी उत्क्रांती म्हणजे वेगळं बनण्याची स्पर्धा … नाही का? निसर्गाचा सर्वात आवडता खेळ … नसता तर एकमेकांची लाल तोंडे बघत आणि अंगावरच्या बिया आणि लिखा खात वेगळं होण्याची वाट बघावी लागली असती…. … … माकडवेगळे झालोत म्हणून आनंद आहे .
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

A वेगळा आहे, कारण B,C,P यांचा उच्चार इकारांत आहे, फक्त A चा एकारांत आहे. हे उत्तर " जास्त शास्त्रीय" का म्हणू नये ? मुळात जास्त शास्त्रीय म्हणजे काय ?

चित्रगुप्त साहेब त्या प्रश्नमंजुषेमागे एकच हेतू होता तो म्हणजे लोकं वेगळ्याचं वेगळेपण कसं ओळखतात. तुमची पद्द्धत सुद्धा शास्त्रीय आहे. A वेगळा ठरतो तो श्राव्य पातळीवर आणि लेखात सांगितल्याप्रमाणे C वेगळा ठरतो दृक पातळीवर. P ला वेगळं ठरवणे केवळ तो क्रमात बसत नाही म्हणून हे वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर नाही. पण तेच ९२ टक्के लोकं मानतात.

वेगळेपणातही वेगवेगळेपण असू शकते. प्रस्तुत उदाहरणाचेच बघा ना. एकच सेट किती वेगवेगळ्या घटकांवर माणूस क्लासिफाय करु शकतो ते. फक्त सुरुवात आणि शेवट यातला संबंध नीट न कळल्यामुळे हेतू स्पष्ट होत नाहीये.

अन्याभाऊ सुरुवात स्पष्ट करते ते एका कल्पित इंटरनेट्च्या जमन्यातलं पुस्तकांचं असलेलं वेगळेपण आणि म्हणून त्यांना वाईट मानून चालणे. पण वेगळं असणं हे किती गरजेचं हा आहे शेवटचा मुद्दा … माकडातून वेगळ्या झालेल्या मनुष्याचा.

वेगळ्या विषयावरचं एक वेगळं लेखन आवडलं. फार कळलं असं मात्र वाटत नाही. अर्थात दोष माझ्या मर्यादित आकलनक्षमतेचा. असं अजुन वाचायला आवडेल.

काही प्रमाणात मला माझ्या 'आजचा भारत आणि चित्रपट: 'वर्ल्ड वॉर झी' या लेखात असेंच काही लिहायाचे होते, परवाच वर्षपूर्ती झाली माझ्या या लेखाची पण …..

खरेच विचार करायला लावणारे.. नाही .. वेगळाअ विचार करायला लावणारे लिखान.. मस्त आहे एकदम.. तुमची ती कादंबरी आवडली होती मला खुप.. प्रकाशित केलीत का ?