Welcome to misalpav.com
लेखक: खेडूत | प्रसिद्ध:
आज धाव्वीचा निकाल लागला. श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले . मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून ! ''स्मिता गजानन यादव'' दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता . पन मी झाली. माजीच चूक जनु ! आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं . नाव ठ्येवलं फशीबाई ! समद्या पोरी हासायच्या शाळंत. * * * धाव्वी सुरु झाली, तशी गेली हेडसरांकडं ! म्हनलं, ''सर नाव बदलायचंय माजं - पन घरला सांगायचं नाय ! धाव्वीच्या निकालावर स्मिता नाव यायला पायजेल'' . मास्तर द्येवमानुस. त्येनला पटलं - बदलूया म्हणालं ! लगीच कुटंकुटं फोन क्येले आन अर्जावर सही घ्येतली. दिला पाट्वून. - धाव्वीचा फॉर्म भरायच्या आदुगर दाखल्यावर नाव बदलूनबी आलं ! आईच्या मनाजोगतं नाव - स्मिता !
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सहीये! पालकांच्या परवानगीशिवाय कायद्याने सज्ञान नसलेली मुलं नाव बदलू शकतात का?

काय करावे लागते ते माहित नाही(अगदी सहज होणारी प्रक्रिया असावी) पण एक किस्सा सांगतो, माझे मामा असेच काहितरी कामासाठी मुलाच्या शाळेत खुप दिवसानंतर गेले(शाळा zp ची असल्याने पालकान्ना शाळेत जायची गरज पडत नाही कधी). विशालला भेटायच आहे, चौथीत आहे तो.. शिक्षक लोकान्नी सांगितल की विशाल नावाच मुल आमच्या कडे चौथीत मुळीच नाही. त्यावेळी खुप सारी investigation केल्यावर समजल की त्यान नाव बदललय. शिक्ष्कान्नी दिलेल्या माहितीनुसार 2 वर्षांपुर्वीच त्याने का कारभार केलाय असे समजले.

पूर्वी अनेक मुलांची जन्मतारखेची प्रमाणपत्रेच नसत. सक्तीचे झाल्यानंतर आता २५ वर्षांनी जागरूकता येत आहे. शहरात आपल्याला शक्यतो अशा केसेस दिसत नाहीत पण गावात शेकडो आहेत. नाव वगैरे बदलणे पूर्वी सोप्पे होते. माझे स्वतःचे जन्मदाखला वगैरे काही नाहीय. जन्म घरीच झाला आणि त्याकाळी पालक सांगतील ती जन्मतारीख लिहिली जात असे. कधी पालक मास्तरांना सांगत - पाच होतीलच आता गणपतीत ! मग मास्तर नियमात बसवायला २५ मे किंवा १ जून टाकून मोकळे होत . त्यामुळे आत्ता चाळीशी उलटलेल्या अनेकांची जन्मतारीख मे-जून मधे असते. आणि ते सांगतात की खरी वेगळीच आहे! :)

सुधा कांकरिया या समाजसेविका या क्षेत्रात काम करतात. ग्रामीण भागात नकुशा , फशिबाई, अशी विकृत नावे बदलण्यासाठी त्या राज्यात सर्वत्र फिरत असतात . शासकीय पातळीवर पाठपुरावा करून अशा मुलींना चांगले नाव देतात . स्त्रीभ्रूण हत्या , बालिकांचे कुपोषण वगैरे विरोधात जागृती करत असतात . अलीकडेच त्यांनी आणखी एक उपक्रम सुरु केला आहे : सप्तपदीला आठवे पाउल जोडले आहे ते म्हणजे वधूवरांनी मुलीच्या जन्माचं स्वागत करू अशी लग्नात शपथ घ्यायची ! हे यशस्वी होत असून सात हजार जोडप्यांनी अशी अष्टपदी केली आहे. त्याना सलाम! सदर घटना २०१० मधली आहे. कथेसाठी तपशिलात काहीसा बदल केला आहे इतकेच!

कथा/अनुभव निरीक्षण मस्तच! पण त्याहून ही... सप्तपदीला आठवे पाउल जोडले आहे ते म्हणजे वधूवरांनी मुलीच्या जन्माचं स्वागत करू अशी लग्नात शपथ घ्यायची ! खूपच चांगला उपक्रम!

सत्यघटनेवर आधारीत असलेली ही कथा खूप आवडली. अवांतर - स्त्री मिपाकरांना सरसकट अनाहिता असे संबोधणे या प्रकाराबद्दल कुणी शतशब्दकथा लिहिल्यास समाधान वाटेल.

अनाहिता ह्या शब्दाचा अर्थ अजिबात वाईट नाही. त्याचा संबंध नकुशी, फशिबाई अशा नावांशी जोडलाही जाऊ शकत नाही. फार काही नाही तर, गूगल करा अनाहिता चा अर्थ.

माझ्या वरील विधानाचा रोख सरसकटीकरणाकडे होता. अनाहिताच्या अर्थाचा अजिबात संबंध नाही. दोन वर्षांपूर्वी अनाहिता विभागाची स्थापना झाली तेव्हा अनाहिताचा अर्थ नेमकेपणाने कळला होता. मी हाच विचार या प्रतिसादात अन खफवर मांडला असल्याने पुन्हा तपशीलवार लिहिले नाही. पुन्हा एकदा स्पष्ट करतो
  • मिपावरील सर्व स्त्री सदस्य अनाहिता विभागाच्या सदस्य असतीलच असे नाही.
  • अनाहिता विभागाच्या सदस्य असणार्‍यांचा अनाहिता विभाग वगळता मिपावरील वावर मिपाकर म्हणून असतो. हाच मुद्दा मिपा (केवळ अनाहिता सदस्यांसाठी नसलेल्या) कट्ट्यांनाही लागू होतो.
थोडक्यात मिपाकर व अनाहिता कट्ट्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते हे वाक्य परदेशतील एखाद्या कार्यक्रमाला भारतीय व मराठी माणसे मोठ्या संख्येने उपस्थित होती. अशा प्रकारचे वाटते.

फारच छान. सुधा कांकरिया या समाजसेविका या क्षेत्रात काम करतात. स्त्रीयांच्या समस्यांना अंतच नाही असे वाटते.

केवळ मुलगी आहे म्हणून जन्मल्यापासून अपमान सहन सहन करणारे ते जीव किती बोथट होत असतील याची कल्पनाच करवत नाही. (अशी कोणी नकुशा किंवा फशीबाई पहाण्यात नसलेला) पैजारबुवा,

हे असली नावे ठेवणे मला माहीत होते. पण अशा कोणत्याच व्यक्तीबरोबर प्रत्यक्ष संबंध आलेला नसल्यामूळे, जन्मल्यापासून या असल्या अपमानाला त्या कशा सामोर्‍या जात असतील याची कल्पनाच करवत नाही. असे रोज तिला मारण्या पेक्षा मुलगी आहे असे समजल्यावर तिला गर्भातच मारणारे बरे म्हणायचे का? पैजारबुवा,

मी आहे ना पैजारबुवा!! सहा महिन्यापेक्षा जास्त काळ (रांगायला लागेपर्यंत) कुणीही न उचलेलं बाळ अशी ख्याती आहे माझी. कारण? दुसरीपण मुलगीच. रअंगायला लागल्यावर मी पायात वगैरे येउन, अन नको ते ओढुन हा पायंडा मोडला. तरीही भयानक गोवर, वारफोड्या, माकडखोकला या सगळ्यातुन मी बीनदवाखान्याची वाचले याच सुद्धा आश्चर्य वाटत लोकांना. :)) आपून चिकट है॥ ;)

काळीज हललं हे वाचून... तुमच्या खंबीरपणाला सलाम!

वरील सर्वांशी सहमत. दादापेक्षा काकण्भर जास्त लाडक्या ताईचा बापूस नाखु

वाचल्यावर सुध्दा कसेतरी झाले. स्वत:च्याच रक्तामांसाच्या गोळ्या बरोबर..... जाउ दे.... या सगळ्याचा परिणाम तुमच्या एकंदरीत लिखाणावर कुठेही दिसत नाही. तुमच्या विचारसरणीला आणि संयमाला दाद द्यावीशी वाटते. तुम्हाला आणि विपरीत परिस्थीतीतही तुम्हाला घडवणार्‍या सर्वांना साष्टांग दंडवत. पैजारबुवा,

माज्या अजोळी हे चित्र अजुन ही आहे. माज्या आई चे एक गावकडचे काक्का ..त्याना 8 मुली आणि 9वा कृष्ण पण मुलींची नवे अशीच काहीही अहेत.पन मग लागनात मुलाकडच्याना मात्र ही नाव न आवडल्याने त्याना नवीन चांगली नाव मिळाली आणि तीच त्यांची ओळख बनली.

खूप छान लिहिलंय! मुलींचं प्रमाण कमी झालंय, लग्नाला मुली मिळत नाहीत हे एकीकडे ऐकू येतंय आणि तरीही अशा फशीबाई आणि नकुशा गावातून असतातच. दोन्ही प्रकारांच्या मुळाशी कारण मुलगी नको असणं हेच. मेरा भारत महान!

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार. सुदैवाने परिस्थिती पूर्वीपेक्षा बरी होते आहे. आपल्या परीने आपण मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा विचार तर पसरवत राहू शकतो!

"फशिवलं नाही की हशीवलं नाही" पण आवडली. कन्येचा जन्म घरातील जेष्ठ स्त्रीयांनाच का नको असतो हे न उमगणारे कोडे आहे? वास्तववादी नाखु

कथा आवडली. सुप्रसिंद्ध लेखिका योगिनी जोगळेकर याच्या गुलबक्षी या कादंबरीत नायिकेचे नाव नकोशी असते आणि ते बदलून गुलबक्षी केले जाते हे आठवले.ही कादंबरी सत्तरच्य दशकातली होते हे विशेष.

कथा अावडली आणि श्रीरंग जोशींचा प्रतिसाददेखिल. माझ्या घराजवळच एक चार मुलींवर मुलगा असलेलं माझं पेशंट कुटुंब आहे.या सर्वांची आई लागोपाठच्या बाळंतपणाने कुपोषित असल्याने सर्व मुलांचे दात खराब आहेत.त्यांच्या सतत काही ना काही दाताच्या तक्रारी सुरु असतात.यातल्या सर्व मुलींच्या ट्रिटमेंटला या लोकांकडॆ पैसा नसतो.तशा कळवळत ठेवतात मुली किंवा फार तर दात उपटा हिचे असं सांगत येतात आणि पोरगा नवसाचा किडमिडा, लाडका.त्याचे दात काढले तर तो कसा खाईल? म्हणून त्याच्यासाठी सर्व ट्रिटमेंट करायला हे लोक तयार असतात.फार संताप येतो.पण हे अजूनही नेहमी दिसणारं दृश्य आहे.

कथा चांगली आहे पण दहावीची मुलगी आणि खूप अशुध्द भाषा म्हणून ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा असा रोख आहे कि काय असे वाटले

आवडली कथा.. 'फशीबाई'वरुन आठवलेला एक किस्सा.. माझ्या 'चिन्मय' ह्या नावात इतकं कठीण काय आहे माहीत नाही, पण माझ्या लहानपणी गावातल्या ७०% लोकांना तरी माझं नाव बरोबर बोलता किंवा लिहीता येत नसे. एका सरकारी कागदावर (लसीकरण का असाच कुठलातरी) माझं नाव "चिंधबाई (मुलगी)' असं आहे.. ;-) अवांतरः माझ्या जन्माच्यावेळी माझ्या आई-वडीलांना मुलगी हवी होती.. त्या अर्थाने मी "अधिक्या" आहे.. होय, मुलांसाठी पण हिणवणारी नावे असतात.. ;-) :D