Welcome to misalpav.com
लेखक: नूतन सावंत | प्रसिद्ध:
  • काही नवे करावे म्हणून - भाग २
  • काही नवे करावे म्हणून - भाग ३
  • काही नवे करावे म्हणून - भाग ४
  • काही नवे करावे म्हणून - भाग ५
  • काही नवे करावे म्हणून - भाग ६
  • काही नवे करावे म्हणून - भाग ७
  • काही नवे करावे म्हणून - भाग ८
  • काही नवे करावे म्हणून – भाग ९
  • /ul> तिथून सुरेखाच्या घरी पोचलो तर आजी तांब्या भरून दूध घेऊन आलेली. मस्त ताज्या दुधाची कॉफी पिऊन दुसऱ्या दिवशी येते असे सांगून मी निघाले. आज बसस्टॉपवर उभे असलेले लोक आम्हाला ओळख दाखवून नमस्कार करत होते.चमत्काराशिवाय नमस्कार नाही हेच खरे. (क्रमशः) ************************************************************************************************************************** बसमधून उतरून घरी जाताना मी मयुला म्हटलं,”मयू ,तो भाई ना सापाच्या अवलादीचा आहे.त्याच्यावर नीट नजर ठेवली पाहिजे.तो आपल्याला त्रास देणार.” दुसऱ्या दिवशी सकाळीसाडेआठ वाजता मी आमच्या वाडीतली मुले बरोबर घेऊन पातेरे मामांच्या घरी आले तो बाळूसकट लक्षामामा आणि त्यांची टीमही हजर होती.थर्मासमध्ये कॉफी घेऊन सुरेखाचे यजमानही हजार झाले. बाळूने माझी माफी पुन्हा पुन्हा मागितली. लगेच सगळ्यांनी सामान उचलून बागेचा रस्ता धरला.शेवंतीही चहा आणि बटाटेपोहे घेऊन हजर होती.सगळे चहा-नाश्ता करायला बसले.बाळू अजूनही विचारातच गढला होता. मी त्याला विचारलं ,”काय रे आज का माफी मागतोस?” “नाय,ते कालचाच.”तो म्हणाला. “काय कालचंच?”असं विचारल्यावर तो विचारमग्न अवस्थेत म्हणाला,”नाय.भाईनी लय मला संगितलेन्,पण माज अक्कल नुको काय?मी होऊन आपल्याच पायावर धोंडो पाडून घेतलंय.” “आणि तो पण कशासाठी? तर २०० मिलि. साठी. हो ना?”असे मी म्हणताच तो कसनुसा हसला आणि म्हणाला,”वैनी, आज मी तुमच्या पायावर हात मारून शप्पत घेतंय शेवन्त्यासमोर आणि ह्यासगळ्यांसमोर ,की,मी आजपासून दारू सोडली. दारू खाल्ली तर तुमी सगळे माज्या तोंडात शेन घाला.”त्याची घोषणा ऐकून शेवन्तीही गोड लाजली. मयूने विचारले, “काय रे,नक्की पिऊन नाय ना आलास?” “नाय वो दादा.माज लाजवू नका. मी काल बघलंय,राजान् कशी शिमटी काडून दिल्यान् ती. त्या शिमटीचोच मार लय भारी होतो. आजपर्यंत दारवा खावन लय मार खाल्लंय.पन दारू उतरवन् कोनी नाय मारलान्, मी खरा ताच सांगतंय. शेवंतीपण कशी आत निंगून गेली तापन मी बघलंय. काय मी माणूस माजी बायको नि माजा मुलगा मला कोणी मारलानच तर बरा असा वाटण्याच्य परस्थितीला आलेली माज दिसली. एवडी शरम माज कदीच झाली नाही.”बाळू खरं बोलत होता का पाहायला मी शेवन्तीकडे पाहिलं तर तिने अश्रुभरल्या डोळ्यांनी मान हलवून होकार दिला आणि हळूच म्हणाली,” माजे नवतीचे चार दिवस सरल्यापासून काल मी मार न खाता झोपलंय.” अल्कोहोलिक अनिनिमसच्या कार्यपद्धतीनुसार त्यांच्या सभांमध्ये, लोकांच्या समोर जो आपल्या वागण्याची कबुली देऊ शकतो, तोच दारू सोडू शकतो. कारण त्याची चूक त्याने स्वीकालेली असल्यामुळे त्यला खरा पच्शात्ताप झालेला असतो. इथेही तेच घडतं होतं का?लक्ष्मीकेशवच जाणे. मलाही बरं वाटलं.कायदा हातात घ्यायला मला सहसा आवडत नाही. पण काल मला दुसरा काही इलाजच नव्हता.त्या गावात ना पोलीस;न पोलीसपाटील.तक्रार करायची तरी कोणाकडे?भाई जरी पडद्याआडून सूत्र हलवत असला तरी माझा प्रत्यक्ष गुन्हेगार बाळूच होता.आणि आता आमच्या मारामुळे नाही तरी स्वतःच्या बायकोमुलांच्या लाजेने का होईना?त्याची दारू सुटली असती तर बरंच होतं. “चला,कामाला लागुयात,”असे म्हणत मी धोडू आणि बंड्याकडे पहिले. तर दोघांनी नकारार्थी मान हलवली.धोंडूने सांगितलं,” नाय,नाय,आज आमीपण सोवळे आसव.आमासपण नाय देवक तो.तो सांगत व्हतो,”नाय रे बाबानू,तुमी माज्याहारी येऊ नुका,एवड्या मानसांच्या समोर तिना माज धमकी दिल्यान,दारू वतून जालून टाकीन म्हनून.नि वर सांगता जा पोलीसात म्हनून.” त्यवर लक्षामामांनी उभी मान हलवत म्हटलं,”या दोघांची पण सुटतली हां आता.चला,रे लागा कामाक” दोघेही ओशाळून हसले.सुरेखाचे यजमानही चकित होऊन ऐकत होते.थोड्या वेळाने मला म्हणाले,”ताई सांभाळा हं, हा भाई म्हणजे एक नंबरचा पोचलेला माणूस आहे.त्याचा एवढा मोठा अपमान केलाय तुम्ही गावासमोर.त्यात हे तिघे त्याच्या हातातून सुटले तर त्यात पण त्याचे नुकसान आहे.तो गप्प बसणारा माणूस नाहीये.” “तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.मी कालच मयुला हे सांगितलंय. पण तुम्हाला त्रास नाही ना देणार?”असं मी त्यांना विचारलं.कारण ते उघड माझ्या बाजूचे होते.माझ्याविरुद्ध काही हालचाल इतक्यात तरी करणार नाही.कारण पहिला संशय त्याच्यावरच घेतला जाईल हे तो ओळखून होता.ते नाही म्हणाले.. आज उघडीप असल्याने माती खणण्याचे काम भराभर होत होते;तसेच झाडे वाळलेली असल्याने कवळ तोडायचे म्हणजे शेंड्यावारचा पाला काढण्याचे कामही जोरात होते.कारण पावसामुळे ओल्या झाडावर शेंड्यापर्यंत चढणे कठीण असते. माझ्याबरोबर आलेली मुलेही ‘अंगारा’ म्हणजे वडाखालची माती खणून काढायला मदत करीत होती.वडाची फळे खायला येणारे पक्षी तिथे बसूनच शिटतात,त्यामुळे ती माती खतासाठी उत्तम असते.सारण अर्धा फूट खणून तेवढ्या भागातली माती वापरायची.दुपारपर्यंत वीस झाडे अमृतपाण्याचा शिडकावा झेलण्यासाठी तयार झाली होती. एक वाजता शेवंती जेवण घेऊन आली.भाकऱ्या ,पडवळाची वालाचे बिरडे भाजी,ओल्या खोबऱ्याची चटणी आणि मडकं भरून ताक.तिच्यसोबत पातेरेमामीपण प्यायच्या पाण्याच्या दोन मोठ्या कळशा घेऊन आल्या.एका बाजूने सुरेखाही नवऱ्यासाठी,माझ्य्साठी,नि मयूसाठी जेवण घेऊन आली. “आग,आज कशाला आणलंस जेवण,आज आपली ऑर्डर शेवंतीच्या हॉटेलात आहे.तू विसरलीस की काय?”मी सुरेखाला विचारले. “नाही ग ताई,विसरले नाही.पण म्हटलं कमी नको पडायला.आणि त्यांचे जेवण तिखट असतं.म्हणून पण.”सुरेखा म्हणाली.” “बरं तर,काय आणलं आहेस.भाकरीच आणल्या आहेत ग आणि मेथीचं पिठलं.न् लसूण चटणी”.सुरेखा उत्तरली.इतक्यात पातेरेमामी,’येतंय हं इतक्यात’म्हणत कुठेतरी गेल्या. शेवंती आणि सुरेखाला म्हटलं,”चला आता गोपाळकाला करू.ठेव ग सगळं मध्ये आणि तुम्हीपण बसा आमच्यासोबत.आज वनभोजन.”धोंडू आणि बंड्यानीभराभर पळसाच्या पानांच्या पत्रावळ्या आणि द्रोण लावायला सुरुवात केली.या दोघी पहिलं वाढप करेपर्यंत पातेरेमामी हातात एक डबा घेऊन आल्या. मी भुवया उंचावल्या तसं हसून म्हणाल्या,”अलूवड्या.” त्याची दारातच वडीच्या अळूची उत्तम पाने असायची. ‘’छान,अर्धाच दिवस काम करायचं की काय आज.एवढं खाल्ल्यावर काम होईल का मला?बरं,असं काय काय आणलंय की कशालाच नाही म्हणता येत नाही.”मी हसरी तक्रार केली. “तुमी कशास काम करता वैनी,आमी एवडेजन असताना. तुमी नुसती आड्डर सोडा.”बाळूने मला समजावले. गप्पा मारत जेवण झाले.सुरेखा तर सुगरण होतीच पण,शेवंती आणि पातेरेमामीही कमी नव्हत्या.जेवताना मी विचारले,”अरे धोंडू.ही एवढी मोठी सागाची पानं नसती का चालली आपल्याला.पत्रावळ्या लावत बसलात ते.” तर लक्षामामा घाईने बोलले,”बाय,कधी चुकून पण ही पाना जेवायला नाय घ्यायची.इखार व्हतो त्यांनी.” “खरंच की,काय.” मी चाकित,कारण नेहमी मी,ही पाने पहिली की माझ्या मनात हाच विचार यायचा. “व्ह्य, पन त्यामुळेच ती अव्शद म्हनून वापरतात पित्तावर.” त्यांनी सांगितलं. “कसं काय वापरायचं?” मी अजूनच चकित,कारण मग इतक्या मोठ्या पानांच काय उपयोग?असा विचर माझ्या मनात डोकावलेला. “पित्ताच्या गांदी आलेल्या असताना हया पानाची आंगोल करायची.जशी तापाला कडुनिंबाचची, मुक्या माराला न् सुजेला,सांदेदुखीला निंगडीची तशी पित्ताला ह्याची.िन एकदा पित् अंगावर उट्ल्यावर याची आंगोल घातली की परत कंदीच तरास नाय व्हत.आणि सुकी पाना पण तितकीच गुनकारी.”पातेरेमामींनी सल्ला दिला. याचा उपयोग करून पहिला असता तो अगदी नामी उपाय आहे हे समजलं.माझ्या तीन वर्षांच्या लहान भाचीला एकदा पित्त उठल्यावर तिला मुद्दाम या पानाची आंघोळ घातली. आता ती २१ वर्षांची आहे पण त्यानंतर तिला कधी त्रास झाला नाही.हे विषयांतर झालं असलंतरी खात्रीचा उपाय असल्याने सविस्तर सांगितला. थोड्या गप्पा करून आम्ही पुन्हा कामाला लागलो.मधेच माझ्याबरोबर आलेल्या मुलांना समुद्राकाठी राहिल्याने डोंगरावरच्या बगयातीचा अनुभव नसल्याने माती खणताना किंवा मध्ये आलेला दगड कसा काढायचा ते शिकायला मिळाले,ते करताना लक्षामामा त्यांना जमिनीलगत हात न लावता दगड आधी कसा पलटी करायचा ते शिकवत होते.”दगडाला हात तर अल्लाद लावायचा पण मनगट आणि तळव्यात जोर आणून आपल्या बाजूला दगड ओढायचा.आणि चटकन् बाजूला व्हायचं.”असंच का करायचं या माझ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं”.थंडाव्याला काय काटा किरडू आसलं तर पलीकडे ऱ्हातंय.आपल्या अंगावर येत न्हाई.पलिकडच्यापलिकडे पळतंय.” काही दगडांखाली विंचू मिघाले,काही दगडांखाली अंगठ्याच्या नखाएवढे खेकडे निघाले.मी पण उत्साहाने एक दोन दगड पलटवले. तिसरा जरा मोठा दगड पलटवाला सुरुवात केली आणि ‘फुस्स’ असा स्पष्ट फुत्कार ऐकू आला.मयू आणि मामानी चटकन् दगडाला हात लावत मला आणि त्याबाजूला असलेल्या सगळ्यांना वाटेतून बाजूला जायला सांगितलं आणि त्वरेने दगड पलटवला.दगडाखाली एक खाली असलेल्या खड्ड्यात जवळजवळ दोन मीटर लांबीची सर्पिण गोलाकार आकारात पहुडलेली आणि मध्ये तिची सहा/सात इंचाची दहा/बारा पिले पहायला मिळाली.दगड पलटी होताच ती आणि तिच्यामागोमाग तिची पिल्ले बांधाच्या दिशेने निघून गेली.एका खाचेतून बाहेर गेली. मी तिच्यामागून जात बांधावरून पलीकडे पाहिले तर तर ती फणा उगारून मागे पाहत होती.तिची सगळी पिल्ले बाहेर आल्यावरच तिने पुढचा रस्ता धरला.अगदी अॅनिमल प्लॅनेट किंवा डिस्कवरी चॅनेल पाहतोय असे वाटले. माझ्या बाजूला उभ्या राहून बघणाऱ्या पातेरेमामी म्हणाल्या.”माणूस असुंदे नायतर जनावर,आईपण काय सुटतंय व्हय.” लगेच लक्षामामानी ती खाच मातीने बुजवून टाकली. आता मी पुन्हा अमृतपाण्याचे शिंपण चालू केले.अजून दहा झाडे कशी शिम्पायाची ते पाहिल्यावर सुरेखाचे यजमान सुरेखाला म्हणाले,”आपण पण असं करायचं का यंदा.?” “मला काय विचारता?ताईला विचारा.”या तिच्या उत्तरावर ते गप्प बसले.इतक्यातआमच्या अन्नपूर्णा बाई म्हणजे शेवंती चहा आणि टोस्ट घेऊन आली.माझी कॉफी सुरेखाने सकाळीच थर्मासमधून पाठवली होती.चहाच्या वेळी सुरेखाच्या यजमानांनी मला विचारलं,”आमच्या बागेत करता येईल का हे.?” “तुम्ही नेहमी काय वापरता?अशीच टाळमाती करता का?खाते कोणती वापरता?परदेशी खाते वापरत असाल तर नका करू,त्याहीपेक्षा नकाच करू.कारण याचा परिणाम काय होणार हे मला माहीत नाही.मी हे पहिल्यांदाच करतेय.कुठलाही प्रयोग पाच वर्षं केला आणि त्याने सारखे रिझल्ट दरवर्षी दिले तरच तो प्रयोग यशस्वी झाला असे म्हणता येईल.त्याटही झाडे मी पूर्वी पाहिलेली नाहीत त्यामुळे कुठचाही अंदाज मला नाही करता येत.मी दररोज निरीक्षणही नाही करू शकणार,त्यमुळे मला विचारलात तर मी तुम्हाला नका करू असेच सांगेन.”त्यांना ते कितपत पटले माहीत नाही.पण ते काही बोलले नाहीत. इतक्यात माझ्या आईच्या शेजारच्या वाडीत राहणारा अंकुश म्हणाला.”ताई,आमच्या दारात आंब्याचा झाड हाय, ता तू बघतलास का?ता पन कलंबाचा झाड हाय.”मला आठवलं.जवळजवळ १७/१८वर्षांपूर्वीचे झाड होते.आणले तेव्हा पाच वर्षांचे कलम होते.पहिल्याच वर्षी त्याला दोन आंबे आले होते.त्याचे खूप कौतुक झाले.पण एक दिवस कोणीतरी ते आंबे कच्चेच असताना खस्सदिशी ओरबाडून काढून म्हटले होते,”हिते कसले आंबे होतले?ही माड बागायतीची जागा.काल्वनात टाक गे वैनी.”आणि ते आंबे ओटीवर ठेऊन तो निघूनही गेला.यथावकाश त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार काकींच्या मुखाने झाला होता. पण झालं असं होतं की,नंतर त्याला कधी आंबे आलेच नाहीत.मोहोर आला तर येई,पण फळ मात्र धरत नसे. मग त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं,करेलाच्या दगडात ते वाढयचं म्हणून वाढलं.निगा काहीच नाही.लग्नकार्याला आणि सणासुदीला मांडवाला, दाराला लावायला टहाळे मात्र वापरले जात,थोडी सावली पडे,इतकाच काय तो फायदा. त्याच्याकडे पाहिल्यावर ते कधीकाळी कलमाचे झाड असेल असे वाटलेच नसते.कलमाची झाडे पसरट वाढतात पण हे मात्र रायवळ आंब्यासारखे उंच वाढले होते.म्हटले हे झाड आपल्याला टेस्ट केससारखे वापरता येईल. अंकुशला म्हटलं,”घरी जाताना आपण यातलं औषध घेऊन जाऊया.दादाने परवानगी दिली तर आपण त्या झाडावर हे वापरून पाहू.” चहा आटपून पुन्हा सगळे कामाला भिडले.अजून १५ झाडे अमृतपाण्याने शिंपून झाली.काम थांबवून निघताना लाक्षमामा म्हणाले,”बाय,उद्याच्याला काम पुरे होईल.”समान घेऊन पातेरेमामामांच्या घराकडे आलो. सामान त्यांच्याकडे ठेऊन घराकडे निघताना अमृतपाण्याचे बचकभर मिश्रण काढून घेतले. घरी आल्यवर शेजारी जाऊन अंकुशच्या दादाला विचारले,”आम्ही बागेत आब्याच्या झाडांना एक औषध घालतो आहोत,या झाडाला घालून पाहूयात का?’’ “काय पाहिजे कर ,ते म्येला तरी चालंल,मी नायतरी आता तोडूनच टाकणार हाय.” “अरे,मरणार नक्की नाही, पण औषध घाल्यावर निदान मी महिन्या तोडू नकोस हं,मी सांगेपर्यंत.”मी हमी दिली. “न्हाय,न्हाय,तू कर तुला काय करायचाय त्ये.”दादाने परवानगी दिली. सुरेशदादा खूप मोठा कलाकार आहे,चित्रकार तो आहेच.पण गणपती,देवी,नाग,हरताळका याच्या मूर्ती करण्यात एक नंबर. नागपंचमीला नाग,हरीतालीकेला हरताळका ,तसेच गणपतीत हजारभर गणपतीची ऑर्डर,नवरात्रात मोठ्या मंडळाच्या २५ मूर्तीची ऑर्डर,इतके काम तो करत असे.सांगायचा मुद्दा असा की,त्या झाडाच्या बुन्धात उरलेली शाडूमाती रंगाचे पाणी आणि काठ्या काय काय टाकले जाई ते एका त्या गणपतीलाच माहीत.अंकुशला सांगितले,”उद्या सकाळी उठलास की पाहिल्यांदा हा सगळा कचरा साफ कर. अति खणून घे. आपण टाकला तसा आजूबाजूच्या झाडांचे टाळटाकून वडाखालची माती आणून झाकून घे.मग मी औषध घालायला येते.इथे औषध घालून मग निघूया बागेत जायला.” दुसऱ्या दिवशी सकाळी औषध शिंपडले.झाडाला म्हटले,’’तुझ्यासाठी खरेच हे अमृत ठरो.तुझ्यावर होणारा परिणाम मला उत्साह द्यायला उपयोगी पडेल,’’ काकी कौतुकाने पाहत होत्या,काकांनी आणलेले झाड पुनरुज्जीवित होतंय याचा त्यांना झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. ’तुज्या हाताला येश येउदे ग बाय,’ म्हणत.त्यांनी माझी अलाबला घेत कानशिलावर बोटे कडाकडा मोडली. तिथून आम्ही फणसोपला आलो.सगळे हजर होते.लघेच सामान उचलून बागेची वाट धरली.आम्ही बागेत पोचतो तेवढ्यात शेवंती चहा आणि गुळाचा सांजा घेऊन आली.ती खूप खुश दिसत होती.सगळ्यांनी खाऊन घेऊन कामाला सुरुवात केली.मी तिला खुणेनेच विचारलं बाळूबद्दल तर ती हसून म्हणाली,’’वैनी मी तुमका कदीच नाय विसरुचंय.एवडी शांती असलेली संद्याकाल माझ्या घरान पहिल्यान्दाच बगितली.”मलाही बरे वाटले.”ती धोंडू नि बंड्याकडे हात दाखवत पुढे म्हणाली,’’हे दोघे पण सोवळेच आसत कालपासून,काल एक तर पैशे नाय गावले.नायतर गेले असते भाट्यापर्यंत पिवूक.’’ मला ऐकून बरं वाटलं,एक माणूस दारूतून सुटला तर बाळूच्या तिघेजण आनंदात राहणार होते.त्याच पैशातून त्याच्या घरच्या गरजा भागणार होत्या.पण ती पुढची बाब होती.आताच काय नि कसे सांगणार?तिचा आनंद आणि आशा लक्ष्मीकेशव कायम ठेवो. (क्रमशः) काही नवे करावे म्हणून- भाग ११
    प्रकार:
    विषय:


    प्रतिक्रिया

    सुरंगी, तुमच्या लिखाणाची मी पण पंखा आहे. हाही भाग खुप छान झाला आहे. पुढे त्या आंब्याला पण नक्की फळे लागली असतिल ह्याची मला खात्री आहे. लवकर पुढचा भाग टाका.

    असा खस्सकन फळ तोडून त्या झाडाचा विश्वासच तोडला त्या माणसाने. झाडं जीवंत असतात. त्यांना भावना असतात. एक मायेचा शब्द, एक मायेचा हात, लगेच झुलायला लागतात.

    जीत्या माणसांबद्दल आम्हाला काय वाटत नाही आणि तुम्ही झाडांचं धरून बसलात! बसा आता तुम्हाला बघाव्या लागतील भा-प्र.मालीका !!!!!(कृ.ह.घ्या) मूळ अवांतर : उत्तम मालीका फक्त फार खंड पडू देऊ नका. शेत नसलेला पण झाडे असलेला शहरी नाखुस

    मालिका छानच चाललीय. नेहमीच प्रतिसाद दिले गेले असे नाही, पण सर्व भाग आवडले. वेगळा अनुभव म्हणूनही आवडले आणि सुंदर लिह्लंय म्हणूनही.