पाककृती

सुक्या बोंबलाचे कालवण.

Primary tabs

पावसाळा सुरु झाला की, गरमागरम कांदाभजी,भाजलेले कणीस, मसाल्याचा चहा,कॉफी यांचे वास दरवळू लागतात. याच्यासोबतच अट्टल मासेखाऊंच्या मनात मात्र वेगळेच वास दरवळू लागतात.

त्यात एक महत्वाचा म्हणजे सुक्या माशांच्या कालवणाचा वास.सोडे-बटाटे,बोंबील –बटाटे,तव्यावरची काड,सुका कोलिम (जवळा)बांगड्याची किस्मोर(कोशिम्बिर), सुकवलेली तिसऱ्याची माष्टं, पावसाळा आला की,कांदाभजी ,कणीस,चहासोबत अट्टल मासेखाऊंच्या मनात सुक्या बाजाराच्या पदार्थांचे खारवलेले सुरमई,,दाढा(रावस),पापलेट,हलवा,वाकट्या,खाड्यायांची कालवणं आणि कांद्यावर परतलेली चटणी या गोष्टी अट्टल मासेखाऊंच्या जिवात, पावसाळा संपून ओले मासे मिळू लागेपर्यंतपर्यंत,धुगधुगी राखून ठेवतात.

ओल्या व सुक्या खोबऱ्याच्या;कच्च्या आणि भाजलेल्या अशा दोन्ही पद्धतीच्या वाटणात हे पदार्थ करता येतात.तव्यावर किंवा कढईत तर नुसत्या कांद्यावर,मिरचीपूड आणि लसूण ठेचून घालून,परतून करता येतात. हवी असेल तर कोथिंम्बीर,नसली तरी बिघडत नाहीच.बोंबील,सोडे, काड आणि कोलिम यांची भाजलेल्या वाटणात (तिसऱ्याचाच्या आमटीमध्ये याची कृती सापडेल.) तर बटाटेही आगळ्याच चवीचे लागतात.

इथे मी आता तुम्हाला ही पाककृती सांगणार आहे ती माझ्या सासूबाईंची आहे,त्यांचे माहेर डहाणू.त्याच्या माहेरची ही पाककृती.मी सासरी येईपर्यंत कच्च्या आणि त्याही सुक्या खोबऱ्याच्या वाटणातले सुके मासे कधी खाल्ले नव्हते.या प्रकारच्या वाटणात कोणताही मासा घालू शकता. ही चव मला तर आवडलीच पण आता माझ्या माहेरीही आवडू लागली आहे.

चला, आठवणीनीच तोंडाला पाणी सुटलेय. पटापट साहित्य गोळा करून कृतीकडेच जाऊ.
साहित्य:-
१. सहा/सात सुके बोंबील.

.
२. वाटीभर सुके खोबरे.

३ .दोन मिरच्या

४. बारा ते पंधरा लसूणपाकळ्या.

५. पेरभर आले.

.

६. अर्धी वाटी कोथिंबीर.

.

७. मीठ.

.

८. पाव वाटी,तेल.

.

९.. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.

.

१०. एक चहाचा चमचा संडे मसाला.

.

११.. १५/२० मेथीदाणे.

.

१२..तीन/चार कोकमे.

.

कृती:-
१. बोंबील साफ करून दोन तुकडे करून,तव्यावर थोडे गरम करून अर्धा तास कोमट पाण्यातभिजत घालावेत.

२. दो/तीन लसूणपाकळ्या वगळून खोबरे,मिरची,कोथिंबीर,आले यांचे वाटण करून घ्यावे.

.

३. बोंबील पाण्यातून निथळून घ्यावेत.निथळत घालताना बोंबील पाण्यातून वरच्य्यावर उचलावेत व पुन्हा एकदा वाहत्या पाण्याखाली धरावेत.(सुक्या बोंबलांना सहसा रेती असत नाही.पण असलीच तर ती तळाशी बसलेली असते.)

.

४. कढईत तेल गरमगरम करून त्यात मेथी दाणे आणि ठेचलेल्या लसूणपाकळ्या घालून फोडणी करावी.

.

५. त्यात बोंबील परतून घ्यावेत.
.

६. त्यावर वाटण घालून परतावे.हळदपूड आणि संडे मसाला घालून परतावे.
.

८. चार वाट्या गरम पाणी घालावे.

९. मीठ,कोकमे घालावीत.

१०. उकळी आली की उतरावे.

.
कोसळणारा पाऊस आणि वाफाळणारा भात यांच्यासोबत हाणावे.

कविता१९७८

मस्तच,

आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतो, बोंबलाची तिखली म्हणतो त्याला, परवाच ओरपलं.

यशोधरा

मस्त! ताजी मासळी नसली की ह्या सुकटाचा किती आधार असतो की नाही! :D

Mrunalini

वा मस्तच आहे हि पण पद्धत. नक्किच करुन बघायला पाहिजे.

gogglya

ची पा कृ येउ द्या. मी वीकांता ला सुक्कट चटणी ची पा कृ देण्याचा प्रयत्न करतो. [म्हणजे आधी बनवतो मग देतो.]

कारण, सकाळीच मस्त तवा-फ्राय-पापलेट खाल्ले.

आमचा नियम : काय वाट्टेल ते पाळू, पण श्रावण अजिबात पाळणार नाही.

हाय हाय !!
सुक्या बोंबिलाचे कालवण बघून तोंपासू, आता करणे आले.
आमची साधारण हीच पद्धत पण ह्यात वांगे, बटाटा घालून थपथपीत कालवण ही करतो कधी.
कांद्यावर परतलेला बोंबिल आणि जवळा, किसमूर, जवळा भरुन वांगी सगळ्ळे आवडीचे पदार्थ :)

पदम

Mi nonveg khat nahi pan photo baghun khanyacha moh hotoy. ekdam mast.

वा काय मस्त दिसतय. असे फोटो श्रावणात नका हो टाकू ताई. फार हाल होतात.

स्पंदना

एकदा ट्राय केलं होतं बोंबील!!
काय जमल नाही, त्या साठी पिडां काकांच्या श्या पण खाल्ल्या, तरीसुद्धा जमला नाही.
बाकि सोड पण ते सुरवातीच नमन लय भारी!! धुगधुगी हा शब्द अतिशय खास!!

नंदन

चित्रगुप्ताच्या पट्टेवाल्याला राम राम घालून परतलो आहे. खल्लास पाकृ!

उमा @ मिपा

क्या बात है!
ही आणि आधीच्या रेसिपीज मस्त मस्त. तुमची लिहिण्याची स्टाईल खास आहे, अगदी तुम्हाला साजेशी.

१९७३च्या सालात, जेंव्हा मी 'L' बोर्ड लाऊन, नॉन-व्हेज खायला सुरुवात केली होती त्या काळात सुक्या बोंबलाचं कालवण एका आदिवासी कुटुंबात खाल्लं होतं. पाठीचं पार, जमीनीस टेकलेलं, धनुष्य झालेल्या म्हातारीने आम्हा ८-१० मित्रांसाठी केलं होतं. पण ते कालवण लाल भडक रंगात आणि त्याच प्रमाणात तिखट होतं. आजही 'ती' चव आठवली की त्या बरोबरच्या त्या कष्टाळू माऊलीच्या आठवणी जाग्या होतात.

ह्या पाककृतीच्या आधारे 'ते' कालवण जमतंय का ते पाहू.

नूतन सावंत

सगळ्यांचे आभार.
स्पंदना,अट्टल मासेखाऊंचा सुका बाजार म्हणजे व्हेंटिलेटरच.
पेठकर काका,आदिवासी लोक कोथिंबीर वापरत नाहीत.त्यामुळे ती वगळून लाल मिरच्या वाटणात
घेऊन केलात तर तुम्हाला हवा तसा रंग यावा बहुधा.

विशाखा राऊत

ताई ताई वाह वाह.. क्या बात है.. तुझ्या एक एक रेसेपी मस्तच. येवुदेत अजुन :)