Welcome to misalpav.com
लेखक: स्पा | प्रसिद्ध:
Guess what? शेवटच्या ट्रेन मध्ये आहे, कर्जत.१२.४० करी रोड वरुन बसलेलो, आत्ता जेमतेम कुर्ल्यापर्यंत गाडी आलीये.अ.... आत्ता वाजलेत १.३०. तासभर होत आलाय.गाडी हलायची चिन्ह नाहीत.डब्यात जेमतेम चार डोकी.बाहेर मजबुत पाऊस पडतोय.डोळे मिटुन बसलोय.बाकी काहीच करू शकत नाही.पाउस निवांत एकतोय.आज सकाळी पण भिजलो, आत्ता येताना पण भिजलो,छत्री असुन नसल्यासारखी अख्ख्या मुंबइला वाकडा तिकडा कसाही धुतोय.डबा मस्त गार पडलाय.बाहेरुन पाउस आत गळतोय, मला काकडायला होतयं.डोंबोली अजुन लय लांब , त्यात ही शेवटची ट्रेन.कधी सुटेल पत्ता नाही.डोळे पेंगायला लागलेत.. पाऊस डोक्यात भिनलाय, जुन्या आठवणी दाटायला लागतात अशा दमट वातावरणात बुरशीसारख्या.. मग आपोआप आत अडकायला होतं ठाकुर्लीची शाळा आठवते,सातवीपर्यंत तिथेच होतो.गावच्या एकदम कडेला उतारावर एकमजली.मस्त मोठं मॆदान.एक मोहाचं आणी एक कडुनांबाचं झाड.खाली अजुन उतार मग आगर्यांची भाताची शेतं नजर जाइल तिथवर, मग एक डोंगर दिसायचा, त्यापलिकडे कल्याण.दणाणा पाउस पडायचा. वीजा चमकायच्या. आजी मला तिसरीपर्यंत शाळेत सोडायला यायची.काय काय प्रसंग कायम मनावर कोरले जातात,त्यातलाच एक.सकाळपासुन पाऊस पडत होता.. तेव्हाचं ठाकुरली म्हणजे खेड्च. त्यात शाळा पार टोकाला.मी ओरडत भिजत, बोंबा मारत धावत होतो, आजी ओरडत होती अरे नको भिजुस, ताप भरेल.. तेवढा मी जास्त चेकाळत होतो. रस्त्याच्या बाजुने मस्त पाण्याचे ओहोळ वाहायचे,मी मुद्दामुन त्यातुन उड्या मारत जात होतो.अचानक एक मोठठा खड्डा असावा, जेमतेम अडिज तीन फुट उंची असेल माझी , मी पार गळ्यापर्यंत गाळात गेलो, आजी ने जो काय हंबरडा फोडलाय. एक कोणतरी माणुस चाललेला त्याने घपकन दोन्ही खांद्यांना पकडुन बाहेर काढलं, आणी आजीवर आवाज चढवत निघुन गेला, आजीने सटासटा माझ्या थोबाडीत मारल्या.. आणी चिखलाने बरबरटलेल्या मला तशीच उचलून त्या मुसळधार पावसात त्या मोकळ्या मेदानात ती आणि मी कितीतरी वेळ रडत होतो. शाळा म्हणजे सर्वस्व होतं माझं तेव्हा.पावसातले ते इतिहास,भुगोल,मराठीचे तास अजुनही आठवतात. मी खिडकीजवळ बसायचो. शाळा अख्खी गळायची तेव्हा. बेंच ओले व्हायचे,खाली पण पाणी भरायचं. वेगवेगळे, लिबलिबीत किडे बाहेरच्या रानातुन वर्गात यायचे.तरीसुद्धा लय भारी वाटायचं.त्या गुढ पावसात इतिहासातले हड्डपा संस्क्रुति, मानवाची उत्क्रांती असले विषय सुरु झाले की भान हरपुन जायचं. ते combination च भन्नाट होतं.चित्रकलेच्या तासाला सर पाउस हाच विषय द्यायचे,मग बघायलाच नको,माझ्या कल्पनाशक्तीला अजुनच धुमारे फुटायचे.त्यातल्या त्यात माझी चित्रकला बरी असल्याने वर्गात माझा भाव जास्त असायचा.चायला विद्याविहारला पाणी ट्रॅकवर आलय सांगतायेत, बोंबला जे होइल ते होइल मी काही आता हलणार नाही , दोन माणसं उतरुन चालत गेली पुढे.अता मोजुन तीन उरलीत,कसातरीच दिसतोय अख्खा रिकामा डबा.भकास.शिळा. हा तर मी कुठे होतो? शाळेत येस. पावसाळ्यातली मधली सुट्टी हा भन्नाट विषय असायचा.धरण बांधणे हा आमचा आवडता खेळ. शाळा तशी उतारावर असल्याने पाण्याचे लोटच्या लोट वाहत असायचे. एखादा वहाळ आम्ही पकडायचो आणी दगड टाकायला सुरवात करायचो. दगड रचुन झाले की साइडला मस्त माती कालवायचो, आणी धरण पॅक करुन टाकायचो अख्खा वर्ग धरण कामाला डेडीकेटेत असायचा ,मग प्रोजेक्टपण तसच असायचं ना मोठं. तोवर मधली सुट्टी व्हायची, आम्ही परत शाळेत धुम ठोकायचो.खरी गम्मत शाळा सुटली की धावत जाऊन धरणाचं इन्सपेक्शन व्हायचं.तोवर धरणाने टिकाव धरला असेल तर आजुबाजुला धरणक्षेत्र साॅलिड वाढलेलं असायचं. मग दणादण सगळे मिळुन माथा मारुन ते पाडुन टाकायचो. एवढं साचलेलं पाणी भस्क्कन वाहुन गेलं की आम्हाला कोण आनंद व्हायचा. एकदा अशाच एका धरणात लाल पाणसाप अडकलेला , हातभर फाटलेली सर्वांची. पुढे सातवीनंतर जोशी हायसकुल ला आलो,आणी हा,खास पावसाळा संपला. शेतात फिरायला जाणे हा अजुन एक कार्येक्रम असायचा. तासंतास आम्ही शेतातुन गुढघाभर पाण्यातुन खेकडे पकडत हिंडत असु.कधीकधी आगरी मित्र खाडिवर धेउन जात.खाडीच्या काळ्या पाण्यावर बेभान होउन बरसणारा पाऊस बघताना आमचही भान हरत असे. हळुहळु शहरीकरण झाले, आगर्यांनी जमिनी विकल्या त्यात शेतही गेली.आणि आमचा विरंगुळाही. काॅलेज मध्ये असताना पावसासारखा दुसरा मित्र नसायचा. त्यावर सगळ्यांचेच एकमत असेल आणी अनुभवपण.त्यातच २६ जुलॆ २००५ चा दिवस आहे,मित्र मित्र म्हणणारा पाऊस सॆतानाने पछाडल्यासारखा पिसाटला होता.मी fybcom ला होतो त्यावेळी आणी ठाण्याला टॅक्सेशन चा डिप्लोमा करत होतो.२५ला दुपारपासुनच लक्षण ठीक दिसत नव्हती .भयंकर पाउस पडत होता.माझ्यासमोर दिव्याच्या खाडीत,प्रचंड आवाज करत वीज कोसळली.पण तरी मी मुर्खासारखा ठाण्याला गेलोच. संध्याकाळी परीस्थिती बिकट झाली , ट्रेन पुर्ण बंद झाल्या ठाण्याचे प्लॅटफ्राॅम पाण्यात होते. तेव्हा माझ्याकडे मोबाइल नव्हता आणी घरचा फोन पण लागत नव्हता.घरी कसं कळवणार, मग खालच्या फर्नांनडीस ना फोन करुन मी सुखरुप असल्याचं कळवलं. एक मित्र ठाण्याला कोळिवाड्यात राहणारा होता,तो म्हणाला की आज माझ्याकडे झोप उद्या जा घरी. म्हटलं ठीके,त्याचे कुटुंब मोठे होते.रात्री चायनीस खायला म्हणुन बाहेर पडलो, ते ठाणे मी विसरु शकत नाही सगळीकडे पाणिच पाणी, पाउस थांबायचं नाव नाही.दुकान,हाॅटेल सगळी बंद, तसेच आलो, झोपलो, रात्री मध्येच त्याच्या काकांनी आम्हाला जोरजोरात उठवलं, कारण ठाणे स्टेशनलगतचा जो तलाव आहे तो फुटलेला आणी अख्ख्या कोळीवाड्यात पाणी शिरलेले. आम्हा पोरांना त्याच्या घरच्यांनी वर पोटमाळ्यावर पाठवले.अख्खी रात्र कशीतरीच गेली, बिचार्याच्या घराची चिखल, गाळाने वाट लावली , तरी देखिल मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले लागतील म्हणुन.पाउस तर आता पुर्णच पेटलेला होता. आता घरी कसं जायच हा प्रश्न होताच. मग मध्येच बस,रिक्शा मग म्हापे ते डोंबोली चालत असं करत ठाकुरलिला संध्याकाळि पोचलो. घरी तोंड दाखवल्यावर आइने देवाला साखरच ठेवली. मग परत बाहेर पडलो,माझी जुनी शाळा आणी पुढे पार कल्याणपर्यंत सगळा लाल पाण्याचा समुद्र दिसत होता, खाडिचे पाणी आत शिरलेले होते.त्या दिवशी किती नुकसान आणि,काय,काय झालं हे सर्वांना माहीत आहेच.आयुष्य पुढे जातच राहीलं तरी पावसावरचं प्रेम काही कमी झालं नाही. योगायोगाने एके वर्षी चक्क फेब्रुवारीत पाउस पडला. त्याच संध्याकाळी नेमका तिने होकार दिला.त्यानेही मुहुर्त साधुन हजेरी लावली. कलिना कॅम्पस मध्ये भिजत किती वेळ गप्पा मारल्या असतील. साला टायमिंग हवं तर असं त्याने दोस्ती निभावली पण,तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले. त्यानंतर मात्र मी त्याला मानायला लागलो.कित्ती ट्रेक केले असतील. त्याच्या साथीने एकटाही रानोमाळ भटकलो.मिपाकरांसोबत केलेला कोरीगड, लोहगड, प्रबळगड.. केवळ अविस्मरणीय.. पाऊस तोच पण अनुभुती दर वेळेला नविन या वर्षी रुसलाय खुप. लोकांनी शेवटी देव पाण्यात बुडवले.आत्ता कुठे वेशिवर आलाय..असो २.३० वाजुन गेलेत..गाडी जेमतेम हलतेय.टॅबची बॅटरी संपत आलीये. खुप रॅडम आहे, लिहावसं वाटलं लिहिलं. पाउस काही थांबत नाहीये, आणी आठवणींचे उमाळे पण -11/07/2014
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

ट्रेनच्या त्याच डब्यात बसून तुमच्याच तोंडून या आठवणी ऐकत असल्यासारखं वाटत राहिलं... खूप सहज सुंदर आणि उत्स्फूर्त... खूप आवडलं...

अतिशय सुंदर, हळवं करणारं लिखाण. उफाळलेल्या दर्यासारखा कोसळणारा पाउस देखील मनाचा ठाव घेतो. तुम्ही ते सर्व फार छान मांडलत.

पाऊस आवडत नाही, पण लेख अतिशय आवडला. मलाही २६ जुलैच्या पावसात भायखळा ते दादर चालत यावं लागलं होतं. तीवाठवण परत जागी झाली.

मस्त लेख, आवडला. पाऊस सुरू झाला की आपोआप मन जुन्या आठवणीत हरवत जात. एका मागून एक आठवणी डोळ्यासमोर तरळून जातात.