Welcome to misalpav.com
लेखक: वटवट | प्रसिद्ध:
खरं तर कोणीही जन्माला येताना त्याचा असा स्वतःचा पिंड घेऊन येतो तर काहीजणांचा पिंड घडला जातो. हे घासून घासून गुळगुळीत झालेलं वाक्य घासून घासून गुळगुळीत होऊ पहाणार्या आयुष्याच्या प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक कोपर्यावर, हमरस्त्यावर आणि आडवाटेवर तर हमखास भेटतंच भेटतं. कधी कधी हे असंच भेटतं तर कधी कधी अगदी कडकडून भेटतं…. आता भेटतं त्याला मी काय करणार?? भेटतं तर भेटतं. आणि मला तर खूपदा भेटलंय. पण काहीजणांच्या बाबतीत प्रचंड संभ्रम पडतो कि ह्यांचा पिंड हा जन्मतःच असा कि नंतर घडला… आणि ह्या प्रश्नाला उत्तर त्या व्यक्तीकडे असेलच ह्याची खात्री नाही. आणि मिळालंच तरी ते खरं असेलच ह्याचीही खात्री नाही…. हे असलंच कसलंतरी विचित्र रसायन म्हणजे "भाग्यश्री जोशी…."…. ……………. "बहोत नसीबवालोंको ये मौका मिलता है बॉस…" बंटी. "कसला??" "पहिलाच जॉब आणि जॉइन व्हायची डेट १४ फेब्रुवारी... बहोत बढीया.. " "ह्ह... " "बीपीओ मध्ये आईटम बॉम्ब असतील ना रे.. " "काय माहित?? माझा हा पहिलाच जॉब… बघुयात.." "आता काय नुसतं बघतच रहायचं रे बाबा…" ""कोणी?" "आम्ही बघायचं आणि तुम्ही करायचं... " "लाळ जरा कमी गाळा… आम्ही निघतो आता... कॅब येईल थोड्याच वेळात… चल बाय" तेंव्हा मी सदाशिव पेठेत रहायचो. एस. पी. कॉलेज च्या तिथे माझा पिक अप असायचा. पहिल्यांदाच कॅब मधून पहिल्याच जॉब वर जाताना प्रचंड दडपण पण आलं होतं आणि कुतुहूल पण वाटत होतं.. कसं असेल ऑफिस?? बीपीओ बद्दल ऐकलं होतं… रात्रीपर्यंत काम करावं लागतं.. मुली फार हायफाय असतात.. मुलांसोबत सिगारेट ओढतात. पार्ट्यांमधून दारू पण पितात वगैरे वगैरे... काळाची आणि वेळेची गरज म्हणून आणि पर्याय नाही म्हणून मी जॉईन होत होतो. ह्या सगळ्या विचारात असतानाच टॉवर नंबर १२ समोर कॅब येउन थांबली. चकाचक १२ टॉवर्स.. प्रचंड स्वच्छता.. गुळगुळीत फरश्या... चालताना तर मी दोनदा घसरलो सुद्धा होतो. कार्ड स्वाइप करून आणि सगळ्या फोर्मॅलिटीज पूर्ण करून मी ट्रेनिंग हॉल मध्ये पाउल टाकलं.... 'अरे बापरे... निम्म्याच्यावर तर बाहेरचेच दिसताहेत... काही चेहरे महाराष्ट्रीयन आहेत खरं . पण काहीच…' कसं जमायचं.. किती दिवस टिकू आपण इथे.. ह्या विचारात असतानाच ट्रेनिंग सुरु झालं. आणि जेंव्हा कळालं कि सगळ्या प्रोसेसचं एकत्रच इंडक्शन आहे आणि दोनच दिवसात वेगळे होणार आहेत सगळे तेंव्हा कुठे जीव भांड्यात पडला... "दोज हू आर लेट टुडे... दे नीड टू परफॉर्म ऑन दि स्टेज अ‍ॅज ए पेनल्टी... " "ओह नो... " जे कोणी लेट आले होते त्यांचा कोरस घुमला. पण काय करणार यावं तर लागेलच… एक एक करत सगळे आले स्टेजवर.. आणि सगळ्यात शेवटी प्रॉपर झीरो फिगर ची एक मुलगी चढली. कोणी डान्स केला. कोणी गाणं म्हटलं. कोणी कविता सादर केली. असं होत होत शेवटी त्या मुलीचा नंबर आला. आता ही काय करणार? अश्या विचारात असतानाच तिनं बॉम्ब फोडला... "मी किनई हसणार..." आता हे काय मधूनच... परफ़ोर्मन्स चा हा प्रकार सगळ्यांनाच नवा होता. "मला फक्त हसताच येतं.. " असं ती म्हणताच सगळे हसू लागले.. आणि सगळ्यांचं हसणं संपेपर्यंत ती तिच्या जागेवर कधी जाउन बसली कोणालाच कळलं नाही. तर मला फक्त हसताच येतं म्हणणारी ही पोरगी आणि मी योगायोगाने एकाच प्रोसेसवर आलो. आणि आमची स्वाभाविकच ओळख झाली… ओळखंच झाली... "मी भाग्यश्री जोशी…" "मी चेतन…. चेतन.. " "आडनाव??" "त्यात काय ठेवलंय... " "मी नाही का सांगितलं??" "सांगेन ना.... " "कधी??" "कळेलच गं.. " तेव्हढ्यात ट्रेनर नं हाक मारली... "व्हेअर इज चेतन दीक्षित...? " "हिअर.. " मी आणि पटकन जीभ चावली. "हम्म दीक्षितांचा काय तू??" "…" "त्यात काय लपवायचं?" "दरवेळेस लपवायच्याच गोष्टी लपवाव्यात असं थोडच्चे.. आम्हाला वाटलं आम्ही लपवलं... " ती फ़स्स्कन हसली… "लक्षात ठेवीन हे वाक्यं... मस्तंय....!" तर माझी आणि भाग्यश्रीची ही पहिली ओळख. भाग्यश्री जोशी. आधीच सांगितल्याप्रमाणे झीरो फिगर. कुरळे केस. उंची सणसणीत. मला फक्त हसताच येतं म्हणणार्या ह्या मुलीचं हसणंच असं होतं ना... बघतच रहावं… डोळे जुलमी बिलमी वगैरे काही नव्हते पण बोलके मात्र होते. म्हणजे डोळ्यातून मन वगैरे वाचता येतं म्हणतात ना तसे. एव्हढं जरी असलं तरी जे काही भाव असतील ते लगेच पुसलेही जायचे. कुठल्या कंपनीचा बोळा वापरत होती… देव जाणे. बारा नंबर टॉवर मध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही दोन नंबर टॉवर मध्ये लाइव्ह गेलो. ट्रेनिंगमध्येच अंदाज आला होता. पण लाइव्ह गेल्यावर हिची जी काही गाडी सुसाट पळायची ना.. आमची तिला गाठता गाठता पुरती दमछाक व्हायची… "च्यायला ही काय खाती रे... " सबा... एक्सेल नं मला जर कोणी आयुष्यभर पुरणारं दिलं असेल तर ह्या दोन मैत्रिणी… सबा आणि भाग्यश्री... "हवाच.. उगाच नाही हवेशी स्पर्धा करत... कारण अन्न जर खाल्लं असतं तर जरा तरी सुधरली असती… " "असेल असेल... " एव्हढं भयंकर प्रोडक्शन देऊन एरर मात्र अगदी अपवादात... जुन्या लोकांच्या डोळ्यावर यायला किती वेळ लागतंय. ही दोन महिन्याआधी जॉईन झालेली पोरगी दोन दोन वर्ष झालेल्यांच्या सोबत स्पर्धा करू लागली. आणि आम्हाला टोमणे सुरु झाले… "बघा तुमच्यासोबतची पोरगी तुमच्यापुढे चाललीये... " "अररररर …. लई घाण वास सुटलाय बाबा... " "कुठे रे…?" "काहीतरी लई कुजट, सडलेलं जळायलंय..." "अरे पण काय??" "..... " "चेत्याSSSSS... " "बास करा..... जळणं.... " कोणी काही म्हणो वा ना म्हणो… बाई साहेब आपल्या जोरात.... आणि तिच्या शेजारी माझंच वर्कस्टेशन असायचं… "भागे..." "बोल" "ए भागे.. " "हम्म... बोल" "भागडे... " "बोल ना... " "ए भागुबाई.. " "बोलतोस??" "भागू भागु... " "चेतन... " "बोल" "तू बोलावलं होतंस ना" "मी नाही तूच लावलयंस मगापासुन... " "काय मगापासून??" ".... " "ए भागे.... " "आता गपतो …. " "काय करायचं ते कर.. " "पाया पडते करू दे ना काम.... प्लीज... " "माफ कर .... " "केलं बाबा... " "बर... " "नशीब... " "तुला माझा खूप त्रास होतो का गं??" "आता होतो त्याला काय करणार??" "सबा... " सबा आमच्या शेजारीच बसलेली असायची… "बोल रे.. " "ऐकलंस??" "काय?" "हिला माझा खूप त्रास होतो... " "बरं मग... " "त्यामुळे मी ठरवलंय ... हिच्याशी नाही बोलायचं... " "काय बोलतोस????" लगेच भाग्यश्री सिरियस… "अरे मी तर असंच म्हणाले होते.. " "नाही मी ठरवलंय पण आता… खूप दिवस झाले हे ऐकतोय… आता बास... " "सॉरी बाबा" "मी ठरवलंय ... हिच्याशी नाही बोलायचं… फक्त दोन मिनटं " "हट.... इरीटेटर... " आधिपेक्षा दुप्पट वैताग उतू जाऊ लागला…. एके दिवशी असंच ती मला म्हणाली... "ए ऐक ना... " हिची एक खासियत... कुठल्याही संभाषणाची सुरुवात जर हिच्याकडून होत असेल तर सुरुवात ए नं च व्हायची. म्हणजे "ए ऐक ना.. ", "ए चल ना.. ", "ए बोर होतंय ना... ", किंवा काही नुसतंच ए... मग अशा वेळेस आपण समजून घायचं कि काही तरी मागणं आहे... मुळात ते मागणं नसायचंच.. सांगणं असायचं.... "ए ऐक ना.. " "बोला... " "ह्या वीकेंड ला काय करतोयेस??" "काम बोल.. " "आपण सगळे मिळून आमच्या गावी जाऊया ना.. " "काही विशेष??" "अरे आमचं केळीचं रान बघितलं असतं... " "रान.... आणि केळीचं... " "हो... का??" अगदी सरसावून मी तिच्या जवळ गेलो. "भागू... " "काय?" "ज्वारी, गहू... माहिती का काय असतं ते??" "हो" "काय असतं??" "धान्य.. " "तर रान हे धान्याचं असतं आणि बाग ही फळाची असते.. केळ हे धान्य आहे का??" "नाही" "मग काय आहे?" "फळ... अरे पण आमच्याकडे सगळे केळाचं रानंच म्हणतात... " "अकलूज चीच ना गं तू??" "हो " "तरीच अक्कल लूज आहे " "गप्प्प्पSSSS" हिच्या मनात कधी काय कसं येईल हे ती स्वतः सुद्धा कितपत सांगू शकेल शंकाच आहे. कधीतरी असंच शनिवारी सकाळी सकाळी फोन आला संध्याकाळी संदीप खरे च्या कार्यक्रमाला जायचं म्हणून... एकदा काय लहर आली कि आज बाईक वर जायचं… आता आपण नाईट शिफ्ट मध्ये काम करतो... मध्यरात्री... तर कधी पहाटेपर्यंत थांबावं लागतं. येताना कसं काय … हा असला विचार ह्या बाईसाहेब कधी करतील तर शप्पथ. वीकेंडला ठीके पण वीकडेज ला कुणी सिंहगडावर जातं का? आम्ही जायचो. एकदा तर दीड ची शिफ्ट संपवून आम्ही आता टीटी मध्ये बसणार एवढ्यात हिच्या मनात आलं नी मला म्हणाली कि आज नको इतक्या लवकर जायला... टॉवर २ च्या टेरेस वर जाउया… ऑब्जेक्शन घ्यायचंच नसतं... मुळात मला माहित होतं आपण जास्तीत जास्त सहा महिने आहोत इथे.. कशाला कुणाला नाही म्हणायचं... आणि मुळात मलापण आवडायचं ते. . . माझ्या शेवटच्या दिवशी अगदी डबडबून मला म्हणाली होती… "ए चेतन... ऐक ना.. " "हम्म... " "ए माझं ऐकशील" "बोलशील??" "जेव्हढं मला इरिटेट करायचास ना... तेव्हढं तिकडे कोणाला नकोस करू…. . . . . मी नसणारे तिथे... मी निघते.. " आणि ती पटकन निघून गेली. नंतर कधीतरी मी कामात असताना तिचा मला फोन आला… "काय इरिटेटर साहेब... ऑफिस सोडून तीन महिने होऊन गेले एक साधा फोन नाहीत केला...??" "मला संगीत फोन करायचा होता..." "मला साधाही चालला असता... " "पण मला नसता ना चालला" "बाय द वे… निदान ह्या वीकेंड ला तरी भेटा… सगळे ठरवतोय एकत्र यायचं... आणि मला पण बोलायचंय तुझ्याशी... " मी गेलो नाहीच. नंतर फोन पण केला नाही … का?? माहीत नाही. पण नाही केला. यथावकाश तिचं नंतर लग्नही झालं, सॉफ्टवेअर वाल्याशी.. लग्नाला पण गेलो नाही… नंतर कळालं खूप छान सासर आहे. अशात ती बेंगलोर ला शिफ्ट झालीये. . . . गेल्या रविवारी मला सबाचा फोन आला… "सकाळ झाली का रे... " "होतीये... बोल" "आपली भागु गेली रे... " "कधी आली होती... " "अरे... चेतन गेली म्हणजे... शी कमिटेड सुसाईड..."घण्णण्ण…. "क्क्काय??" "हो रे …. गेल…गेल्याच... र वि वा री... " सबा रडतंच बोलत होती. "…………" "काहीच... नाही.... रे …. कळलं..... " ".............. " "तिचे सासरचे सगळे आत आहेत … आणि नवरा तर म्हणतोय कि हे सगळं माझ्यामुळे झालंय... पण आता .... आपली... भागुबाई…. नाही… रे राहिली... " मी काहीही नं बोलता फोन ठेवला... तिचं केळीचं रान, तिला करायचा राहिलेला शेवटचा फोन, शेवटची भेट…. सगळंच्या सगळं अश्रूंमध्ये वाहत चाललं होतं… तिची अनपेक्षित एक्झिट पूर्णपणे अनपेक्षित होती. काहीतरी खूप लपवलं गेलं होतं… कसं काय ती कोणालाच काही बोलली नाही??… आणि तेंव्हाच... अगदी तेंव्हाच.... माझंच तिला उद्देशून केलेलं वाक्य आठवलं… . . . . . . "दरवेळेस लपवायच्याच गोष्टी लपवाव्यात असं थोडच्चे.. आम्हाला वाटलं आम्ही लपवलं... "
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुम्हि हे असलं अति भावनिक नका हो लिहित जाउ. ईतकं जिवंत लिहिता कि शेवट फार चुटपुट लागुन राहते.

पण दरवेळेस लपवायच्याच गोष्टी लपवाव्यात असं थोडच्चे.. आम्हाला वाटलं आम्ही लपवलं... हे वाक्य छान गुम्फलय.

पण या निमित्तानं, कमींग टू द पॉजिटीव पार्ट, का करत असावेत लोक सुईसाइड? कारण उलगडलं की हादसे कमी.

खूपदा आपण आपले मिञ आणि जवळचे लोक कामात असल्याने विसरून जातो आणि ज्यावेळी ते आपल्या पासून दूर जातात त्यावेळी त्यांच्या किमत कळते

मला माहीत नाही की ही सत्यघटना आहे किंवा कसे, पण लिहण्याच्या शैलीवरुन तसेच वाटत आहे. राग नका मानू पण...कथा वाचून तरी असे वाटते की भाग्यश्री अनप्रेडिक्टेबल नव्हती, तिची मैत्री अनप्रेडिक्टेबल नव्हती, तिचं मित्रावरचं निर्व्याज प्रेम अनप्रेडिक्टेबल नव्हतं... तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल होत्या..तिला मिळालेलं सासर अनप्रेडिक्टेबल होतं... आणि झालंच तर ...जिवलग मित्राचं 'साधा' फोन न करणं, भेटायला न येणं हे ही तिच्याकरिता अनप्रेडिक्टेबल होतं