Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एका दिवाळी अंकात या लेखिकेची कथा वाचली. यानंतर या लेखिकेचे लेखन शोधून वाचले पाहीजे असे वाटल्याने स्वतःविषयी हे पुस्तक मिळवले. पुस्तकाच्या निर्मितीसकट सर्व गोष्टी उच्च दर्जाच्या आहेत. अनेक लोकांनी इथे स्वतःविषयी लिहीले आहे. लेखन - नीलिमा बोरवणकर प्रत्येकाने जडण घडण, मैत्री, सहजीवन याविषयी लिहीले आहे.

शशिकांत पित्रे कुणी वाचलेत का चीन इ विषयावर बरे लिहितात असं ऐकलंय

न सांगण्याजोगी गोष्ट' हे शशिकांत पित्रेंच भारत चिन युद्धा वरच पुस्तक आहे. विस्तीर्ण आढावा घेतलाय. तसच सद्यस्थिती आणी भविष्यातील वाटचाल यावर ही भाष्य केलय. चांगल आहे पुस्तक.

वाचाल तर वाचाल- बाजीराव वर पुस्तक आहे छान

संजीव केळकर यांनी हे पुस्तक लिहीले आहे. बूकगंगाच्या मते "संघाला गोळवलकर यांच्या मार्गाने यश मिळणार नाही, तर देवरस यांच्या सर्वसमावेशक पद्धतीनेच उज्ज्वल काळ असेल, असे मत लेखक मांडतात. गोळवलकर यांनी संघाच्या कामाची दिशा बदलली. त्यामुळे संघटनेचे बरेच नुकसान झाले" _ वास्तविक पुस्तकामधे असंख्य संदर्भ आणि जोडाजोडी केलेले उतारे येतात. त्यामुळे सगळाच विस्कळीतपणा आहे. लेखकाला नेमके काय म्हणायचे हे कळत नाही. संपूर्ण पुस्तकभर निरनिराळ्या पुस्तकातले संदर्भ लेखक फेकत राहतो. पुस्तकाच्या नावापलिकडे उत्सुकता निर्माण करणारे यात काही नाही, हेच सिद्ध होते.

पानिपत वाचण्याचे एक टेक्निक आहे. पहिली ५० पाने पुन्हा पुन्हा वाचा

माझं वाचन अजून अल्प आहे , त्यामुळे पानिपत , स्वामी , छावा यांसारखी पुस्तकं या लीस्टमध्ये नाहीत कारण ना.सं .इनामदार यांची ४-५ पुस्तकं सोडली तर खालील सर्व पुस्तकं मी वाचलेली आणि मला आवडलेली अशी आहेत . . विनोदी , हलकीफुलकी आवडत असतील तर हि घ्या - द . मा . मिरासदार यांच्या कथासंग्रहांपैकी कोणतंही पुलंचं हसवणूक , व्यक्ती आणि वल्ली , गणगोत . शंकर पाटील यांची . फक्कड गोष्टी , ताजमहालमध्ये सरपंच , इल्लम , जुगलबंदी , खुळ्याची चावडी , खुश खरेदी , वावरी शेंग , धिंड . शरद वर्दे यांची राशा , फिरंगढंग आणि झुळूक अमेरिकन तोऱ्याची ही पुस्तकंही अतिशय सुरेख आहेत . . पौराणिक आवडत असतील तर सगळ्यात आधी मृत्युंजय , मग युगंधर ( शिवाजी सावंत ) . गो . नी . दांडेकरांचं कृष्णवेध अप्रतिम आहे . राधेय - रणजीत देसाई . . ऐतिहासिक - श्रीमान योगी - रणजीत देसाई . बाबासाहेब पुरंदरेंची राजा शिवछत्रपती आणि शेलार खिंड . शिवाय ना.सं .इनामदार यांची मंत्रावेगळा , शिकस्त , राजेश्री , शहेनशहा , झुंज हि पुस्तकही सुंदर असावीत , मी त्यांचं फक्त राऊ वाचलं आहे त्यावरून सांगते . . सामाजिक वाचायची तर विश्वास पाटील यांचं झाडाझडती , कविता महाजनांचं भिन्न . . विज्ञानकथा आवडत असतील तर जयंत नारळीकरांची अंतराळातील भस्मासुर , यक्षांची देणगी , वामन परत न आला , प्रेषित , अभयारण्य , टाईम मशीनची किमया , अरुण साधू यांची स्फोट , मंत्रजागर , डॉ . बाळ फोंडके यांचं सायबर कॅफे , सुबोध जावडेकर यांची आकाशभाकिते , कुरुक्षेत्र , पुढल्या हाका , गुगली , संगणकाची सावली हि पुस्तकं खरंच खूप छान आहेत . . भयकथा - नारायण धारप ( त्यांची सगळीच पुस्तकं मला अतिशय आवडतात ) गुढकथा - रत्नाकर मतकरी . . संतांच्या आयुष्यावर आधारित साहित्य वाचायचं असेल तर रवींद्र भट यांची इंद्रायणीकाठी , घास घेई पांडुरंगा , हेचि दान देगा देवा …. आणि गो . नी . दांडेकरांचं पाच संत चरित्रे हि पुस्तकं वाचावीत . ( पाच संत चरित्रे अधिक उत्तम …. टीका करण्याएवढी माझी अजिबातच योग्यता नाही पण वाचक म्हणून वाटलं ते सांगते , रवींद्र भटांना ज्यासाठी ३००-३५० पानांची कादंबरी लिहावी लागली ते दांडेकरांनी प्रत्येकी ४०-५० पानांत कितीतरी जास्त हृदयाला भिडेल असं मांडलं आहे ) . व्यंकटेश माडगूळकर यांचे सगळे कथासंग्रह अतिशय उत्कृष्ट लिखाणाची उदाहरणं आहेत. . आणि ग्रामीण पण माडगुळकर , शंकर पाटील , मिरासदार यांच्या ग्रामीण लेखनापेक्षा भिन्न अशी काही उत्तम पुस्तकं म्हणजे - गारंबीचा बापू , गारंबीची राधा , एक होती आजी - श्री.ना.पेंडसे . शितू , जैत रे जैत , पडघवली , पवनाकाठचा धोंडी - गो . नी . दांडेकर .

तुंबाडचे खोत , रक्तरेखा , मर्मभेद , या मराठीतील व The Second Lady इंग्रजीतील मला आवडलेल्या कादंबर्‍या आहेत. दी सेकंड लेडी मध्ये, अमेरिकेन प्रेसिडेंटच्या पत्नीसारखी, दुसरी,तशीच दिसणारी,पण रशियात असलेली एक स्त्री ,रशियन गुप्तहेर शोधुन काढतात, अमेरिकन फर्स्ट लेडी ला पळवुन, रशियात आणली जाते आणि तिच्या जागी , ही डमी स्त्री पाठवुन , अमेरिकन अध्यक्षाच्या मनातील , गुप्त विचार काढण्याचा , रशियन सरकारचा प्रयत्न असतो. पण एक जागरुक पत्रकार हा कट कसा उधळुन लावतो, याची वेधक कथा सुंदर रितीने गुंफली आहे .

वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना ! पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम.

जॉन ग्रिशॅम ची सर्व पुस्तके. 'द लास्ट ज्युरर', 'द असोसीएट' ई. बहुतांशी पुस्तके अमेरिकेतील लवादांवर आहेत. केसेसची पार्श्वभूमी वेगळी असल्याने वाचायला मजा येते. तसेच अमेरिकन कायदे पध्दतीचं छान चित्रण आहे. ही पुस्तके मराठीत मेहता पब्लिकेशन तर इंग्रजीत क्रॉसवर्ड मध्ये मिळतात.

अलीकडेच गिरीश कुबेर यांचे "एका तेलियाने" हे पुस्तक वाचले. सौदी अरेबिया व इतर तेल उत्पादक देशांमधील राजकारण व त्यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणाला कशी दिशा मिळाली याचे सुंदर वर्णन(इतिहास) या पुस्तकात आहे.

हा असा प्रतिसाद पाहीजे. नुसती पुस्तकांची यादी फेकण्याऐवजी हे पुस्तक का वाचावं हे कळलं तर बरं असतं अन्यथा पुस्तकांची यादी तर बुकगंगावर पण मिळते ना

not without my daughter (ईराण मधुन मुलिसह सुटका करण्यासठि एका आईने केलेलि धड्पड) मराठि अनुवाद, for here or to go अपर्ना वेलणकर , अनुवाद पण बरेच चांगले आहेत .

एक पुस्तक आहे.. "many lives many masters" यात ७०-८० च्या दरम्यान घडलेली गोष्ट अथवा आत्मचरित्र..डॉ. कडे त्यांच्याच हॉस्पिटल मधली नर्स म्हणुन काम करणारी एक मुलगी काही अगम्य त्रास (विचित्र स्वप्ने, काही गोष्टींची खु भिती) या कारणाने योगायोगाने येते.. तिच्य ट्रिट्मेंट दर्म्यान आलेले अनुभव लिहिले आहेत.. तिच्यावर बरेच उपाय करुन काही फरक पडत नाही म्हणुन डॉ. हिप्नॉटिझम चा पर्याय घेतात.. आणी मग हळु हळु कळत जाते की तिने ह्या आधी जवळ जवळ ८०-९० जन्म घेतले आहेत .. आणी बरिच भिती आधिच्या जन्मातल्या प्रसंगांशी सबंधित आहे.. त्यात ते डॉ. तिला हिप्नॉटिझम दरम्यान अगदी म्रुत्युच्या जवळचे आणी नंतर चे डिटेल्स पडताळतात.. असे बरेच म्रुत्यु शी निगडीत अनुभव ती सांगते .. त्यात सारांश असा की ती मरतान सांगते "मला खुप हलक वाटतय मी खुप उंच उंच जात आहे .. एक खुप मोठी शक्ती प्रकाश दिसत आहे .. जो खुप छान वाटत आहे .. इथे खुप जन आहेत आम्ही सगळे नव्या जन्माची प्रतिक्शा करत आहोत ई. " तो प्रकाश एक शक्ती आहे ज्याला ती मास्टर म्हणते आणी ती शक्ती त्यांच्याशी बोलतेही.. अजुन ही खुप छान आणी बर्याच प्रश्नांन उत्तर मिळेल अस पुस्तक आहे.. जरुर वाचा..

डेज ऑफ गोल्डन सेपिया यास्मिन प्रेमजी (विप्रो च्या अझीम प्रेमजींची पत्नी) यांनी लिहिलेलं पुस्तक. लालजी लाखा नावाच्या गुजरात मधील कच्छ च्या छोट्या गावातील मुलाने मुंबईत येऊन केवळ हुशारी, कष्टाळूपणा आणि प्रामाणिकपणा या आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर 'कॉटन किंग ' हे स्थान कसं निर्माण केलं त्याची कथा. स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे साधारण पणे १८५७ सालातल्या मुंबईचे वर्णन आहे.

पुरंदर्‍यांनी राजा शिवछत्रपती लिहीताना 'सह्याद्रीचा' आधार घेतला आहे. असं जाणवतं.

मनोज भाटवडेकरांच एका पुनर्जन्माची कथा! भाटवडेकर मुंबईकर मानसशास्त्रज्ञ. र्‍हुमॅटॉइड अर्थ्राय्टीस नावाच्या भयंकर आजाराशी त्यांनी दिलेल्या लढ्याची ही गोष्ट, अतिशय प्रामाणिकपणे मांडली आहे. अत्यंत वाचनीय. डॉ. अंजली जोशींनी लिहिलेलं मी अल्बर्ट एलिस देखील असंच जबरदस्त पुस्तक. एका मानसशास्त्रज्ञाची वैचारीक बैठक समजून घ्यायला मजा येते. बरोबरीला विवेकनिष्ठ विचारसरणीची तोंडओळखही होते.

तुम्ही छान प्रतिसाद दिलाय. अशाच प्रतिसादांची खरं म्हणजे अपेक्षा होती. अनेकांनी नुसती यादी दिलीये.

अहा, मला ही बर्^याच वाचायच्या राहिलेल्या पुस्तकांची यादी करता आली. इथे नंदा खरेंच्या पुस्तकांचा उल्लेख कसा नाही? असल्यास माझ्या नजरेतून सुटला. "अंताजीची बखर" भन्नाट पुस्तक आहे. सुरुवातीला पार जुन्या लहेज्यातल्या भाषेची सवय नसल्याने वेळ लागतो पण मग जे काही गुंगून जातो की बस्स. पेशवाईच्या उत्तरार्धातील भारतीय समाजाचे चित्र एका संधीसाधू, स्वतःला तोशीस न लागू देता महत्व मिळवण्याचे जमलेल्या एका भटाच्या भूमिकेतून रंगवल्रे आहे. प्रचंड आवडले होते. त्यांचंच "वारूळ" वाचायला घेतलय. "उद्या" हे नंदा खरेंचेच वेगळे पुस्तक. भारतातील तंत्रज्~जनातील अफाट प्रगती, त्याचा केवळ ठराविक वर्गाच्या तुंबड्या भरण्यासाठी होत असलेला कल्पक उपयोग. त्या प्रगतीबरोबर समाजातल्या न बदललेल्या परंपरा, समजूतींची घातली जात असलेली सांगड आणि त्यातून दिसणारे भावनाशून्य त्याहीपेक्षा मेक्~एनिकल भावभावनांचे जग याचे एक ओझरतं भयावह काल्पनिक दर्शन या पुस्तकातून होतं. जीएंची इतर पुस्तके तर आहेतच पण 'माणसं-अरभाट आणि चिल्लर' हे त्याचं वेगळ्या शैलीतलं एक छान पुस्तक. दुर्गा भागवतांच्या ऋतूचक्र, पैस आणि बहुधा भारतीय लोककथांचे काही भाग माझ्याकडे आहेत. तेही मधे मधे वाचायला मजा येते. मारूती चितमपल्लींचं चकवा-चांदण पुरं केलं नाही पण त्याची त्या निसर्गावरची पुस्तकं म्हणजे रातवा, निळावंतीचे दिवस (स्वतंत्र पुस्तक आहे की लेख नक्की आठवतनाहीय्_),नागझिरा ही अप्रतिम पुस्तकं तुम्हाला निसर्गाच्या जवळ, झाडे,प्राणीपक्ष्यांच्या दुनियेत अलगद घेऊन जातात. रा. चिं. मोरविंचीकरांचे 'शुष्क नद्यांचे आक्रोश' हे ही सगळ्यांनी वाचावंच असं म्हणेन. आपल्या खर्^या खुर्^या समृध्द वारश्याची, परंपरेची आपण कपाळकरंट्यांनी कशी वाट लावली आहे ते वाचून खिन्न व्हायला होतं. या लिखाणासाठी या साध्या शिक्षकाने घेतलेले श्रम खरंच वाखाणण्याजोगे आहेत पण त्याच्या उपयोग काय? मला पुस्तकांच्री नावं नक्की आठवत नाही आहेत , बहुधा गंगाजळी असावं. जोशी म्हणून कलकत्त्याच्या एका लायब्ररीत ग्रंथपाल असणार्^यांनी केलेल्या स्फुट लेखनाचे तीन भाग आहेत. ते लेखही फार सुरेख आहेत. मुखवटे हे आ वि जातेगावकरांचं पुस्तकही मला खुप आवडतं. आता मिळेल का माहिती नाही, पण़ वाचा मिळवून. देवी, सरत चाललेल्या परंपरांचं एक वेगळं विश्व आहे. अर्थात ते मला आवडतं कारण आजीच्या परंपरा जपण्याच्या कडक शिस्तीत माझी वाढ झाली, कोकणातले देवदेवतांच्या, अवचारांच्या गोष्टी ऐकत लहानपण गेलेय. त्यामुळे ह्या मराठवाड्यातील वातावरणातल्या गोष्टी असल्या तरी माझ्या विचाराने प्रागतिक पण संस्कारांने प्रतिगामी असलेल्या मनाला त्या भावतात.

२०१६ मधे अनुभवच्या दिवाळीत अंकात सुहास कुलकर्णी यांचा अरुण टिकेकर यांच्यावर प्रदीर्घ लेख आला त्यामधे सुहास कुलकर्णी यांनी येऊ घातलेल्या या पुस्तकाचा उल्लेख केला होता. कॉलेजातून नुकतीच बाहेर पडलेली काही मुले अगदी अनौपचारीकपणे एकत्र यायला लागतात, गप्पांचे अड्डे जमवतात. पुढे स्व-तंत्रपणे अनेक नियतकालिकांसाठी लेखन करणारी युनिक फीचर्स ही संस्था सुरु होते. मग उत्तम दर्जाचे चांगल्या खपाचे मासिक, प्रकाशन संस्थाही सुरु होते. दूरदर्शन मालिकांची निर्मितीही त्यांच्याकडून होते. या लोकांची कामे सगळ्यांना माहीत असतात पण या लोकांची नावे फारशी कुणाला माहीत नसतात. या पुस्तकाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी माहीत होतात.

लक्ष्मणझुला’ या लक्ष्मण लोंढेंच्या पुस्तकाबद्दल काही लिहावेसे वाटते. हे पुस्तक हा ३० लेखांचा संग्रह आहे. मूळ लेख पूर्वी ‘अंतर्नाद’ मासिकात सदर रूपाने प्रसिद्ध झाले होते. हे पुस्तक म्हणजे ललितगद्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. त्यातील लेख हे निसर्ग, विज्ञान आणि सौंदर्य या त्रिमूर्ती भोवती गुंफलेले आहेत. ‘प्रकृती कडून संस्कृतीकडे’ या लेखात हे स्पष्ट केले आहे की उपाशी पोटाने संस्कृतीच्या गप्पा मारता येत नाहीत पण, निदान पोट भरल्यावर तरी माणसाने संस्कृतीकडे वळले पाहिजे आणि तिचा मूलाधार आहे ती प्रेमभावना. माणसाने पर्यावरणाची जी नासधूस चालवली आहे त्यावरील मार्मिक टिपणी एका लेखात केली आहे. निसर्गाने माणसाला हवा, सूर्यप्रकाश, पाणी, जमीन यासारख्या गोष्टी अगदी फुकट दिल्या आहेत पण आपण त्यांची हवी तेवढी कदर केलेली नाही याची जाणीव त्यातून होते. स्थापत्यशास्त्रातल्या प्रगतीचा माणसाला केवढा गर्व असतो. पण जेव्हा आपण सफेद मुंग्यांनी तयार केलेल्या ५-६ मीटर्सच्या उंचीची वारूळे बघतो तेव्हा या नैसर्गिक चमत्कारापुढे आपल्याला नतमस्तक व्हावे वाटते याचे भान आपल्याला एका लेखातून येते. ‘कांचनमृगाच्या शोधात’ हा आपल्याला आत्मपरिक्षण करायला लावणारा लेख. ‘प्रगती’ कशाला म्हणायचे या मुद्द्याभोवती गुंफलेला हा लेख. प्रगतीचा आपण लावलेला ‘सतत वाढ’ हा निकष लेखकाच्या मते चुकीचा आहे. वाढ आणि विकास यातील फरक अगदी चांगल्या प्रकारे समजावून लेखक सुचवतो की प्रगतीची एकमेव फूटपट्टी पैसा हीच नसली पाहिजे. पुस्तकाच्या मध्यात असलेला ‘हृदया हृद्य येक जाले’ हा लेख तर खरोखरच कळसाध्याय म्हणावा लागेल. आता अतिप्रगत संगणक युगात माणूस माणसाशी ‘जोडला’ गेलेला आहे खरे पण तो केवळ मेंदूने. त्याबरोबर माणसे एकमेकांशी हृदयाने जोडली गेली आहेत का हा लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न आपल्याला अंतर्मुख करून जातो, नव्हे, सतावतो. ‘एक टक्क्याचा खेळ’ हाही एक विचारप्रवर्तक लेख. आपला समाज हा असंख्य गटातटात विभागला गेला आहे. अशा विविध गटांची टक्केवारी काढून मग अल्पसंख्य गटांना कमी लेखण्याचे वा हिणवण्याचे प्रकार सतत चालू असतात. या संदर्भात एका मूलभूत शास्त्रीय सत्याकडे लेखक आपले लक्ष वेधतो. ते म्हणजे मानव आणि चिपांझी माकड या दोघांच्या ‘डीएनए’ मध्ये फक्त १ टक्क्याचा फरक आहे. म्हणजे, अखिल मानवी संस्कृतीच फक्त १ टक्क्याची संस्कृती आहे. तेव्हा अजून माणसामाणसांत भेद वाढवणारी टक्केवारी आपण गाडून टाकायला हवी आहे की नाही? .. तर असे एकाहून एक सरस लेख असणारे हे पुस्तक. प्रत्येक लेख सरासरी ४ पानांचा. हेही एक आकर्षण. निसर्ग –विज्ञान- तत्त्वज्ञान यावरचे सोप्या भाषेतील सुरेख चिंतन. हे पुस्तक माझ्या संग्रही गेली १५ वर्षे आहे. साधारणपणे १०-१२ वर्षांनंतर आपल्या संग्रहातली काही पुस्तके ‘शिळी’ वाटू लागतात. पण हे पुस्तक त्याला नक्कीच अपवाद आहे. दर ३ महिन्यातून मी ते एकदा बाहेर काढतो, त्यातील एखाद्या लेखाचा मनापासून आस्वाद घेतो. आयुष्यभर जवळ बाळगावे असे हे पुस्तक आहे.