जनातलं, मनातलं

गडकर्‍यांचे किस्से.

Primary tabs

नाटककार राम गणेश गडकरी हे एक हजरजबाबी व्यक्तिमत्व होते त्यांचे काही किस्से.

अत्रे गडकर्‍यांना गुरुस्थानी मानत.
आपला पहिला काव्यसंग्रह 'फुलबाग' लिहून झाल्यावर, त्याची वही घेऊन अत्रे राम गणेशांकडे अभिप्रायासाठी गेले.
काही दिवसांनी अत्रे वही आणायला गेले. त्यांनी विचारलं "कशी काय वाटली फुलबाग?"
वहीच्या फाटलेल्या आवरणाकडे बोट दाखवत गडकरी म्हणाले "फुलबाग चांगली आहे, कुंपण तेवढं नीट घाला!"
----------------------------------------------------------
नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी गडकर्‍यांच्या घरी नाट्यवाचनाचे प्रयोग होत. ते रात्र रात्र चालत.
अशाच एका प्रयोगानंतर त्यांची काही मित्रमंडळी त्यांच्याकडेच झोपली.
सकाळी उठल्यावर अंथरुणे आवरताना एकाच्या उशीखाली मोठा विंचू निघाला तेंव्हा तो मोठ्याने ओरडला.
गडकरी म्हणाले "ओरडतोस कशाला? अरे, दगडाखाली विंचू निघणारच!"
----------------------------------------------------------
गडकर्‍यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे तथाकथित साहित्यिकांशी त्यांचे फार जमत नसे.
असेच एकदा गडकरी पुण्यातल्या लकडी पुलावरुन (आत्ताचा संभाजी पूल) चाललेले असताना समोरुन एक साहित्यिक आले.
गडकरी म्हणाले "नमस्कार, काय कसे आहे?"
साहित्यिक "मी मूर्खांशी बोलत नाही."
गडकरी "पण मी बोलतो!"
----------------------------------------------------------
गडकर्‍यांच्या सर्व नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत -
"एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?)
----------------------------------------------------------
त्यांच्या नाटकांचे अजून एक वैशिष्ठ्य असे की सर्व गद्य गडकर्‍यांचे असले तरी सगळी पदे ही विठ्ठल सीताराम गुर्जर यांची आहेत!
त्यांचे शब्द एवढे चपखल आहेत की कुठेही आपल्याला अशी शंकासुध्दा येत नाही की ही पदे गडकर्‍यांची नाहीत.
आणि त्यातली बरीचशी बालगंधर्वांनी आपल्या स्वर्गीय आवाजाने अजरामर केली आहेत!
----------------------------------------------------------
गडकर्‍यांच्या असाधारण प्रतिभेचा आणखी एक किस्सा - त्यांचे एक नाटक त्यांनी संपूर्णपणे उलटीकडून लिहिले होते.
म्हणजे शेवटचा पाचवा अंक आधी, मग चौथा, त्यानंतर तिसरा, असे!

असो, तूर्तास एवढेच.

मुक्तसुनीत

गडकर्‍यांच्या सर्व नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत -
"एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?)

------------------

अजून काही:

भावबंधन
राजसंन्यास

सुनील

"एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?)

काही आठवतात ती -

संयस्त खड्ग
राजसंन्यास (बहुधा हे अपूर्ण राहिले)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील

गडबड झाली वाटत!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अहो व्हती गडबड कदि कदि. त्ये "जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पहाते " ह्ये गानं बी सावरकरांचे म्हनून वाटतय. आता "ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला" ह्या सावरकरांच्या गान्याने तो घोटाळा व्हतोय.
प्रकाश घाटपांडे

चतुरंग

मुक्तसुनीत व सुनील.

हो, राजसंन्यास अपूर्ण राहिले.

चतुरंग

"वेड्यांचा बाजार" नावाचे सुद्धा अपूर्ण राहिले बहुतेक.... त्या अपूर्ण नाटकाचे स्क्रिप्ट मी वाचले आहे फार पूर्वी...त्यात एक कोट्या करणारे पात्र असते, एवढेच आठव्तेय.......

नंदन

राम गणेश गडकर्‍यांचे समग्र साहित्य इ-पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध असल्याची बातमी मागे वाचली होती. [दुवा - येथे]
कुणाला याबाबत अधिक माहिती आहे का?

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर

चतुरंगराव,

गडकरी मास्तरांचे छोटेखानी किस्से वाचायला मजा आली. कृपया येऊ द्यात अजूनही...

तात्या.

मुक्तसुनीत

मला वाटते, गडकर्‍यांच्या स्मृतिंची ज्योत पिढ्यानुपिढ्यांकरता तेवत ठेवण्याचे सारे श्रेय अत्र्यांना द्यायला हवे. चतुरंगरावानी लिहिलेले बहुतेक किस्से अत्र्यांच्या लेखांतून, भाषणांच्या संग्रहातून आलेले असावेत असा माझा अंदाज आहे. अत्र्यांची लोकप्रियता , आणि मुख्य म्हणजे एखाद्या व्यक्तिची योग्यता जाणून ती आपल्या ओघवत्या शैलीत लिहिण्या-सांगण्याची त्यांची हातोटी याचा सर्वात सुंदर मिलाफ झाला , तो गडकर्‍यांच्या गुणवर्णनात. केवळ गडकर्‍यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यानी शेकडो भाषणे केली, डझनावारी लेख लिहिले. सुदैवाने , हे सारे परचुर्‍यांसारख्या अत्रेभक्तामुळे मुद्रितस्वरूपात उपलब्ध आहे ....

चतुरंग

ह्यातले बहुतेक किस्से मी माझ्या वडिलांशी बोलताना त्यांच्याकडून ऐकले आहेत. काही माझ्या वाचनात आलेत.
आपण उल्लेख केलेले परचुर्‍यांचे पुस्तक कोणते ते सांगू शकाल का? ते मिळवून मी जरुर वाचेन.

अवांतर - वाचनाची गोडी ही आयुष्य संपन्न करते. माझ्या आजोबांचा पुस्तकांचा संग्रह जवळपास २००० पुस्तकांचा होता. त्यांच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि ती वडिलांमुळे टिकून राहिली.

चतुरंग

मुक्तसुनीत

अत्र्यांची अनेक पुस्तके आहेत, आणि गडकर्‍यांचे संदर्भ बर्‍याच लेख आणि भाषणसंग्रहातून मिळतात. मला चटकन आठवणारी २ नावे :

"क‍र्‍हेचे पाणी" या अत्र्यांच्या आत्मचरित्रामधे गडकरी, त्याकाळातले पुणे आदिंची रसाळ वर्णने आहेत.
"आषाढस्य प्रथम दिवसे" नावाच्या लेखसंग्रहात गडकर्‍यांवर एक सोडून दोन-तीन लेख आहेत असे मला आठवते ...
(परचुरे हे लेखक नव्हेत. ते अत्र्यांचे प्रकाशक. सावरकर आणि अत्र्यांचे खूपसे लिखाण "परचुरे प्रकाशन मंदिर" यांनी छापले आहे. या दोन लेखकांशिवाय परचुर्‍यांची मोठी कामगिरी म्हणजे जी एंच्या शेवटच्या वर्षातली (आणि त्यांच्या मृत्यूनंतरची त्यांची) पुस्तके या प्रकाशनाने काढली ...

सुनील

सहजच मनात विचार आला -

गडकर्‍यांचे सर्वात गाजलेले नाटक - एकच प्याला.
त्यांचे नाव, राम - दोन अक्षरी.
वडिलांचे नाव, गणेश - तीन अक्षरी.
आडनाव, गडकरी - चार अक्षरी.
कवी म्हणून टोपणनाव, गोविंदाग्रज - पाच अक्षरी.

(आकडेबहाद्दर) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग

अजून एक दुर्दैवी योगायोग - गडकर्‍यांचा जन्म गुजरातेतल्या 'नवसारी' चा (१८८५) आणि मृत्यू विदर्भातल्या 'सावनेर' चा (१९१९)!
अवघं ३४ वर्षांचं आयुष्य! ही 'मोठी' माणसं लहान वयात का जातात??

चतुरंग

सुनील

बालकवीही असेच तरुण वयातच गेले!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

जादू आहे. वाचून मजा आली. वरील सर्वांना धन्यवाद. मूकनायक कोणाचे होते बरे?

समग्र गडकरी नामक पुस्तकात त्या॑चे सर्व साहित्य आहे. कर्‍हेचे पाणीमध्येसुद्धा गडकर्‍या॑चे पुष्कळ किस्से दिले आहेत. पर॑तु त्यातील सत्या-असत्त्याबद्दल प्रवाद आहेत. काही तत्कालीन टीकाकारा॑च्या मते गडकरी आणि अत्रे या॑ची कधी भेटच झाली नव्हती. अर्थात ह्या वादात आता पडण्याचे काही कारण नाही..