काथ्याकूट

विवाहपूर्व एच. आय. व्ही. चाचणी

Primary tabs

विवाहपूर्व एच. आय. व्ही. चाचणीला महाराष्ट्रातून तीव्र विरोध होत असल्याचे वाचनात आले. हा विरोध का? असा कायदा असावा की नसावा?

विसोबा खेचर

माझ्या मते असा कायदा असावा..

आपला,
(बाहेरख्याली) तात्या.

ऋषिकेश

एच. आय. व्ही. चाचणीचा कायदा असावा.. निकालाची योग्य गोपनियता मात्र राखली जावी

-ऋषिकेश

प्राजु

आणि कर्मधर्मसंयोगाने नाही अस्तित्वात आला तर विवाह बंधनात बांधले जाणा-या वधू-वराने आपणहून ही चाचणी करून घ्यावी. सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज बांधणीसाठी ते आता आवश्यक झाले आहे.

- प्राजु

धोंडोपंत

कायदा असावाच. केवळ एच आय व्ही नव्हे तर गुप्तरोग, हिपॅटिसीस इत्यादी चाचण्याही कायद्याच्या कक्षेत आणाव्यात.

आपला,
(एकपत्नीरत) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग

पण आतातरी महाराष्ट्राने पुढे होऊन धडा घालून द्यावा. स्वागतार्ह पाऊल.
तपासणी आणि त्याचे निकाल गोपनीय राहतील अशी सक्षम यंत्रणा मात्र हवी.

चतुरंग

वरदा

कायदाच कशाला हवा? सुशिक्षित लोक तरी किती वेळा हे करतात? आपणच शहाणं व्हायला हवं..आपल्याकडे कायदा झाला तरी रिपोर्ट बदलण्याचे उपाय लगेच शोधतील लोक....

जे लोक सुशिक्षित आहेत त्यांना त्याचे फायदे तोटे माहीत असतीलच. त्यामुळे प्राजु म्हणते तसे जरी कायदा झाला नाही तरी विवाह पुर्व चाचणी करणे गरजेचे आहे.

झकासराव

असावाच. पण आंधळा नसावा.
मला जी माहिती आहे त्या नुसार मी सांगतोय.
चाचणी केलेल्या कालावधीचा खुप महत्व आहे ह्या चाचणीत.
मुळात एच आय व्ही चे विषाणु हे शरिरात असले तरी पहिल्याच चाचणीत सापडतील ह्याची खात्री नाही.
त्याला विंडो पिरियड म्हणतात.
म्हणजे जर एखाद्याला जर एच आय व्ही ची बाधा झाली आहे आणि त्याने ती बाधा झाल्याच्या तीन महिन्याच्या आत जर चाचणी केली
तर ती निगेटिव्ह येइल.
त्यामुळे दोन वेळा चाचणी करणे गरजेचे असते.
सगळ्यात महत्वाच म्हणजे माणुस स्वतःच्या स्वतः देखिल अंदाज घेवु शकतो की. (त्याने मागच्या सहा महिन्यात काय काय केले आहे त्यावरुन)
जर त्याने असुरक्षित संभोग केला असेल,
ड्रग्ज्स साठी एकच सुइ अनेकानी वापरुन नशा केली असेल तर ह्याचा धोका जास्त आहे.
आताशा डॉ प्रत्येक वेळी नवीनच सुइ वापरतात इन्जेक्शन साठी. आणि रक्त पेढ्यातुन रक्ताची चाचणी केलेली असतेच.
त्यामुळे खरतर ह्या कारणाने बाधा होण्याचा धोका खुपच कमी आहे.
अर्थातच आपण काळजी घेतलीच पाहिजे. डॉ कडे गेला आणि इन्जेक्शन घेताय, सलायन लावुन घेताय, न्हाव्याकडे दाढीला गेल्यास् आपण त्या लोकाना स्पष्टपणे विचारलेल बरच आहे.
अशी चाचणी करण्यासाठी सरकारी दवाखान्यात सोय असते आणि फक्त १०-२० रुपयात ही चाचणी करुन मिळते.
रिपोर्ट हा पुर्ण गोपनीय असतो. तो फक्त तुमच्याच हातात दिला जातो.
प्राजु यानी लिहिल्याप्रमाणे सुशिक्षित लोकानी स्वतःहुन अशी चाचणी करुन घ्यावी ह्याच्याशी सहमत आहे.

वरदा

मी हेही ऐकलय की ह्याचे रिझल्ट नेहेमी १००% खरे असतात असंही नाही...प्रत्येक जिओग्राफिक लोकेशन प्रमाणे हे व्हायरस थोडे बदलत असल्याने जी टेस्ट अमेरिकेत अचुक आहे ती भारतात असेलच असं नाही...खरं आहे का हे?

झकासराव

मला एवढी डिटेल माहिती नाहि.
मी स्वताची टेस्ट (लग्ना आधी) केली होती त्यावेळी सरकारी दवाखान्यात जी समुपदेशक होती तिने मला जी माहिती दिली तीच लिहिली आहे.
त्यानी सांगितले होते की दोन प्रकारच्या टेस्ट असतात. (मी नाव विसरलो आहे)
त्यातली जी स्वस्त असते ती आधी करतात. ती जर पो़जिटिव्ह आली तरच दुसरी टेस्ट करतात जी अधिक खात्रीशीर असते.
हे लोकेशन प्रमाणे बदल हे पहिल्यांदाच ऐकल.
खरच एखाद्याला ह्याबद्दल माहिती असेल तर त्याने इथे लिहावी.

एलायझा (एन्झाईम लिन्क्ड इम्युनो एसे)अथवा ट्रायडॉट ही टेस्ट एड्ससाठी रूटीनली केली जाते; पर॑तु ह्या चाचण्याना मर्यादा आहेत. फॉल्स निगेटीव्ह टेस्ट म्हणजेच रक्तात एड्स विषाणू असला तरीही रिझल्ट नॉर्मल येऊ शकतो. लागण झाल्यावर साधारणपणे तीन महिन्यापर्य॑त विषाणू सूप्तावस्थेत राहू शकतो जो ह्या टेस्ट मध्ये सापडत नाही. जर एलायझा टेस्ट पॉझिटीव्ह असेल तर निदान नक्की करण्यासाठी 'वेस्टर्न ब्लॉट' टेस्ट केली जाते.
सूप्तावस्थेतील एच्.आय्.व्ही विषाणू शोधण्यासाठी एक चाचणी करता येते त्यास 'पी.सी. आर' असे म्हणतात पण ती सर्वत्र उपलब्ध नाही शिवाय महागही आहे (अ॑दाजे खर्च- तीन हजार).
विवाहपूर्व एड्स चाचणीस दोन बाजू आहेत. एकतर खात्री करून घेण्यासाठी रिपीटेड चाचणी अथवा पीसीआर चाचणी करणे आवश्यक ठरेल (आणि एव्हढी चिकित्सा करणे वधू-वर पक्षास प्रॅक्टिकली शक्य नसते). तसेच बनावट नॉर्मल रिपोर्ट सादर करणेही अवघड नाही.
म्हणूनच एड्सच्या ह्या भय॑कर राक्षसाशी लढण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे 'शुद्ध चारीत्र्य' होय! आपल्या मुला॑-मुली॑वर शुद्ध चारित्र्याचे स॑स्कार करणे अत्य॑त आवश्यक आहे. बॉय फ्रे॑ड- गर्ल फ्रे॑डच्या फाजील अमेरेकी कल्पना आणि पालका॑चे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच एड्स, रेव्ह पार्टी, आणि इतर घातकी व्यसने आपल्या देशातील कोवळ्या तरूणाईचा नाश करीत आहे यात श॑का नाही. ते वयच मोहमयी असते व मुले-मुली कित्येक तास एकत्र काम करीत असल्याने तशा स॑धीही खूपदा मिळतात. पर॑तु जर स॑स्कार प्रबळ असतील तर विवेक विकारावर मात करू शकतो.
अर्थात हा सर्वस्वी वेगळाच विषय आहे पण मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे असे मला वाटते म्हणून थोडेसे जास्तीचे लिहीले..

एड्सच्या ह्या भय॑कर राक्षसाशी लढण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे 'शुद्ध चारीत्र्य' होय! आपल्या मुला॑-मुली॑वर शुद्ध चारित्र्याचे स॑स्कार करणे अत्य॑त आवश्यक आहे. बॉय फ्रे॑ड- गर्ल फ्रे॑डच्या फाजील अमेरेकी कल्पना आणि पालका॑चे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच एड्स, रेव्ह पार्टी, आणि इतर घातकी व्यसने आपल्या देशातील कोवळ्या तरूणाईचा नाश करीत आहे यात श॑का नाही. ते वयच मोहमयी असते व मुले-मुली कित्येक तास एकत्र काम करीत असल्याने तशा स॑धीही खूपदा मिळतात. पर॑तु जर स॑स्कार प्रबळ असतील तर विवेक विकारावर मात करू शकतो.अर्थात हा सर्वस्वी वेगळाच विषय आहे पण मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे असे मला वाटते म्हणून थोडेसे जास्तीचे लिहीले..
क्या बात कही !!!! १००% सहमत.
डॉ.साहेब,प्रतिसाद आवडला.

ऋषिकेश

मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे

लाखमोलाचं बोललात डॉ.साहेब :)
-ऋषिकेश

धनंजय

चाचणीविषयी माहिती चांगली आहे. अर्थात सर्व वैद्यकीय चाचण्यांसारखी या चाचणीत काही टक्के उत्तरे चुकीची येतात. (काही "लागण आहे" असे सांगणार्‍या चाचण्या चुकीच्या असतात आणि "लागण नाही" असे सांगणार्‍या काही चाचण्या चुकीच्या असतात.) हे तुम्ही चांगले समजावलेत.

वेस्टर्न ब्लॉट ही चाचणी महाग आहे, आणि ज्यांना एलायसामध्ये "लागण आहे" असे दिसते, त्याची खात्री करण्यासाठी हा अधिक खर्च केला जातो. त्या परिस्थितीत तो खर्च वाजवी असतो. पीसीआर चाचणी तेव्हा केली जाते जेव्हा लागण झाली असल्याचे निदान तीन महिन्यांपर्यंत वाट बघू शकत नाही. उदाहरणार्थ : रक्तदान. अनेकदा लग्नाची तयारी तीन महिन्यांपेक्षा अधिक चालते. त्यामुळे तीन महिने फरकाने केलेली एलायसा चाचणी अशा "तातडी नसलेल्या परिस्थितीत" ठीक आहे. बघणे-साखरपुडा-लग्नासाठी मिळून भारतभेटीतला १५ दिवसांचा कालावधी ठेवून काही परदेशस्थ विवाहेच्छुक भारतात जातात - अशा लोकांशी भारतातले काही विवाहेच्छू लग्न करण्यास तयार असतात. तसे विवाहेच्छू इतके मानसिक धोके पत्करत असतात, की लैंगिक रोगांची लागण त्या धोक्यांपुढे फार फिकी चिंता असावी. कारण रोगी नसले तरी भामट्या स्थळाशी लग्न केले तर फार ताप होऊ शकतो, त्याचा धोका कितीतरी अधिक असतो.

विवाहपूर्व चाचणीत कोणी फसवू शकते हा तुमचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. असे भामटे कुटुंब आर्थिक परिस्थिती, शिक्षण, वाटेल त्या बाबतीत विवाहेच्छुकाला फसवू शकते. तसेच लैंगिक रोगांविषयी.

"मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे असे मला वाटते" असे तुम्ही म्हणता. एका विशाल अर्थाने हे खरेच आहे. माणसा-माणसातले सर्व संबंध मुळात नैतिकतेचे असतात. म्हणजे मुला-मुलीच्या आर्थिक/शैक्षणिक/मानसिक परिस्थितीबद्दल फसवणे हेदेखील मुळात नैतिकतेशीच निगडित असतात.

समाजात नैतिकता मुळात वाढायला पाहिजे, हे तुमचे म्हणणे या विशाल अर्थाने अगदी १००% बरोबर आहे.

ही सर्व सहमती दाखवून मतभेदाचे मुद्दे सांगतो.
शारिरिक संबंध असण्याची ओढ ही नैसर्गिक आहे. ती शमवण्याचे प्रकार अमेरिकेतून आयात केलेल्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड फाजिल कल्पनांमुळे भारतात आलेले नाहीत. भारतात मी जी थोडी प्रॅक्टिस केली त्यात १. पुणे शहर २. एक मध्यम आकाराचे गाव (अंबेगाव तालुक्यातले धामणी) आणि ३. एक मागास आदिवासी गाव (खेड तालुक्यातले कुडे बु॥) हे भाग होते. पुण्यातही सरकारी इस्पितळात बहुधा पाश्चात्त्य संस्कृतीचे लोक दिसत नव्हते. या सर्व लोकांत विवाहबाह्य संबंध बरेचदा दिसून येत. पुण्यातली बुधवार पेठेची बाजारपेठ बहुतेक देशी व्यापारी तत्त्वांवर चालते, पाश्चात्त्य फॅशनमुळे नाही.

त्यामुळे माझ्या निरीक्षणात एकनिष्ठ नसलेले लैंगिक संबंध ठेवणे आपल्या समाजात पूर्वीपासून आहे. तुमचे निरीक्षण याच्यापेक्षा वेगळे आहे काय?

भारतात एड्सव्यतिरिक्त लैंगिक रोग आधीही मोठ्या प्रमाणात होते, आणि एड्सचा प्रादुर्भाव हा हा म्हणता वाढण्याचे कारण (आधीपासून प्रचलित असलेले) वेश्यागमनातील संबंध आहेत. हा व्यापार अनैतिक आहे, हे खरेच, पण या व्यापाराला सामान्य आर्थिक नियमही लागू होतात. "पोट भरणे" यासाठी आणि दलालांच्या बळजबरीमुळे एकीकडे विक्रीसाठी शरिरे बाजारपेठेत येतात, आणि अन्य कुठल्या पद्धतीने लैंगिक क्षुधाशांती न करू शकल्यामुळे एक गिर्‍हाईकवर्ग त्याच गावात असतो. (शहरात या गिर्‍हाइकांत फक्त अविवाहित तरुण नसतात, तर विवाहित असूनही शहरात एकटे राहाणारे लोकही असतात.) विक्रेते आणि गिर्‍हाइके दोन्ही असता बाजार बसणारच. तो बाजार बंद करण्यासाठी नैतिकतेच्या शिकवणीबरोबर अनेक मोठे आर्थिक बदल करावे लागतील. ते थोड्या दिवसांत होणे नाही, हे आपण लक्षात हेतले पाहिजे.

समाजाची नैतिकता वाढण्याची वाट बघताना, लैंगिक रोगांविषयी काही केले पाहिजे. या तात्काळ उपायांचा विचार करताना हे जाणले पाहिजे की समाजात एकनिष्ठता तात्काळ येणार नाही. व्यवहारी विचार साधताना आरोग्यसंस्थांनी, डॉक्टरांनी, सरकारने रोगाची लागण एकनिष्ठ नसलेल्यांतही थांबवण्याचा तात्काळ प्रयत्न केला पाहिजे.

अमेरिकेच्या सरकारचे गेल्या ८-२४ वर्षांत धोरण होते, की लोकांना नैतिकता शिकवण्यावेगळे एड्सविरोधी कुठलेही उपाय अंगिकारता कामा नये. हे धोरण अमेरिकेतच नाही, तर काही विकसनशील देशांतही सपशेल फसले. भारताने सुज्ञपणे अमेरिकेचा "नैतिकताच सुधारा, दुसरे काही नका करू" या अटीखाली दिलेला पैसा धुडकावून लावला.

संस्कार उत्तम असावेत, हे तुमचे म्हणणे तंतोतंत बरोबर आहे. पण येथे चर्चाविषय आहे दोन अनोळखी लोकांचा विधिवत शरीरसंबंध घडवून आणण्या बाबत. हे विचारणारे लोक बहुतेक मध्यमवर्गीय असावेत, पैकी विचारणारा/री स्वतःला चांगल्या संस्काराचा/ची मानणारे असावेत, असा माझा कयास आहे. आहे त्या संस्कृतीत आजच्या दिवशी काय काळजी घ्यावी, कोण्या भामट्या/भामटीकडून ठगले कसे न जावे हा त्यांचा प्रश्न आहे. चर्चा सुरू करणारे बहुधा पूर्ण समाज नैतिक होईपर्यंत लग्न पुढे ढकलू शकणारे नसावेत. त्यामुळे मुळातल्या नैतिक उत्तराने ते तसेच किंकर्तव्यमूढ राहातील. त्यामुळे तुम्ही त्यांना या जगात वापरता येईल असा सल्लाही द्यावा.

माझा "व्यवहारी" विचार असा :
१. तडकाफडकी निर्णय घेऊन अनोळखी व्यक्तीशी लग्न करू नये. थोडी ओळख होऊ द्यावी. हा जोडीदार/जोडीदारीण शरिरालाच नव्हे तर मनालाही इजा करणार नाही याची शहानिशा काही महिने तरी होऊ द्यावी.
मानसिक धोक्यांपुढे लैंगिक रोगाचे धोके फारच कमी आहेत, तरी चर्चाविषयाला धरून पुढचे मुद्दे :
२. एड्स हा एकच लैंगिक रोग नाही. अनेक लैंगिक रोग त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात आढळतात. त्यांच्या चाचण्या "तशा" स्वस्त आहेत. (आजकाल कार्यालयाचे भाडे काय आहे पुण्यात? असा विचार करावा.) एचआयव्ही नसला पण सिफिलिस्/गोनोरिया इ.इ. रोग आढळले तरीही एकनिष्ठ नसल्याचा निष्कर्ष लागतो. (त्यामुळे लग्न मोडायचे न मोडायचे हे विचारपूर्वक...) हेपॅटायटिस-बी ची लागण (इन्फेक्टिव्हिटी) एचआयव्ही पेक्षा मोठ्या प्रमाणात असते, आणि त्याचे दुष्परिणाम पुष्कळदा घातक असतात.
३. चाचणी वधू-वर दोघांना विश्वास वाटेल अशा प्रयोगशाळेत झाली तर उत्तम. भामटा/भामटी नसल्यास दोघांनाही त्याचा फायदा दिसून येईल. चाचणीचा निर्णय प्रयोगशाळा दोघांना कळवण्यास वधूवर दोघांनी प्रयोगशाळेस एकमेकांसमोर लिखित परवानगी द्यावी. (हे सर्व प्रकार बाकी सर्व प्रकारे लग्न पक्के होत असल्यासच करावे. म्हणजे प्रत्येक स्थळासाठी सारखेसारखे टोचून रक्त काढून द्यावे लागणार नाही. आणि उठसूट डझनावारी लोकांना (ज्यांच्याशी लग्न न करण्यास आणखी कारणे आहेत) खाजगी माहिती कळणार नाही.
४. चाचणीनंतर तीन महिने तरी लग्न होऊ नये. तोपर्यंत प्रयोजित वधू-वर यांची ओळख वाढत गेल्यास त्या तीन महिन्यांत व्यक्ती बाहेर जाऊन लैंगिक संबंध ठेवते की नाही याची कल्पना दुसर्‍या जोडीदाराला येईल.
५. (असे असता पुन्हा चाचणी करण्याचे मला काही कारण दिसत नाही.) पण एखाद्या वधू-वरांना "विंडो पिरिएड" (एचआयव्ही सुप्तावस्थेची) अतिशय काळजी असेल, तर त्यांनी वाटल्यास पुन्हा एचआयव्हीची चाचणी करून घ्यावी.

या सर्व गोष्टी विवाहेच्छुक व्यक्तीला स्वतःहून सरकारी कायद्याशिवाय करता येण्यासारख्या आहेत. सरकारी कायद्याच्या बाबतीत प्रकार जरा वेगळा आहे. गोवा राज्य वगळता सरकारकडून लग्नाची पूर्वनोंदणी करून घेणे बंधनकारक नाही. (लग्न झाल्यानंतर त्याचे पुरावे सवडीने सरकारला देता, नोंदणी होऊ शकते.)

जे लग्न होताना मुदलात सरकारची संमती लागत नाही त्या बाबतीत सरकार या चाचणीचे व्याज कसे मागू शकते?

प्राजु

धनंजय, तुम्ही खूपच चांगले मुद्दे मांडले आहेत.

३. चाचणी वधू-वर दोघांना विश्वास वाटेल अशा प्रयोगशाळेत झाली तर उत्तम. भामटा/भामटी नसल्यास दोघांनाही त्याचा फायदा दिसून येईल. चाचणीचा निर्णय प्रयोगशाळा दोघांना कळवण्यास वधूवर दोघांनी प्रयोगशाळेस एकमेकांसमोर लिखित परवानगी द्यावी. (हे सर्व प्रकार बाकी सर्व प्रकारे लग्न पक्के होत असल्यासच करावे. म्हणजे प्रत्येक स्थळासाठी सारखेसारखे टोचून रक्त काढून द्यावे लागणार नाही. आणि उठसूट डझनावारी लोकांना (ज्यांच्याशी लग्न न करण्यास आणखी कारणे आहेत) खाजगी माहिती कळणार नाही.

हा मुद्दा मला अतिशय महत्वाचा वाटतो.
तुमच्या सारखेच विचार जर सगळ्या विवाहेच्छुकांनी केले तर कायद्याची गरजच पडणार नाही. आणि सुसंस्कृत असा समाज लवकरच उभा राहिल.

- प्राजु

मीही तुमच्या मताशी सहमत आहे धन॑जय राव्..मी अजुनही पुण्याजवळील ग्रामीण भागात शस्त्रक्रिया करण्यास जातो तेव्हा तेथेही विवाहपूर्व लै॑गिक अनुभव असलेली पुष्कळ म॑डळी भेटतात्..एव्हढेच काय, जे॑व्हा प॑ढरीच्या वारीत वेश्या-व्यवसाय जोरात चालतो हे एका अभ्यास गटाने सिद्ध केले ते॑व्हा तर धक्काच बसला होता. इथे अमेरिकन स॑स्कृतीचा नक्कीच काही दोष नाही. पर॑तु चारित्र्याचे स॑स्कार अजून होणे आवश्यक आहेच. ज्या ग्रामीण महाराष्ट्रात गावोगावी गाथेची, ज्ञानेश्वरीची पारायणे होतात तिथेच ऊसाच्या फडात आणि तमाशाच्या कनातीमागे अनैतिक स॑बध र॑गात येतात हे केव्हढे मोठे दुर्दैव! तळागाळात आणखी जनजागृती होणे आवश्यक आहेच. मी तरी असे पेश॑ट जेव्हा तपासतो तेव्हा नैतिकता आणि व्यसन मुक्तीवर (जो माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहे) समूपदेशन करण्याची स॑धी सोडत नाही.
राहता राहीला शहरी भाग..माझे वैद्यकीय शिक्षण पुण्यातच झाले व आता मी एका वैद्यकीय महाविद्यालयातच शिक्षक असल्याने डोळ्यानीच नैतिकतेचा र्‍हास पाहावयास मिळतो. शिवाय 'आतल्या' गोष्टीही कळतात. एकच उदाहरण पुरेसे आहे. मी प्रथम वर्षात शिकत असताना माझ्या वर्गातील एक मुलगी गरोदर राहिली..आमच्या वयोवृद्ध प्राचार्‍या॑ची झोपच उडाली व त्या॑नी तिच्या पालका॑ना तातडीने बोलावून स॑कटाची कल्पना दिली..वाचकहो तुम्हाला आश्चर्य वाटेल तिच्या वडिला॑ची प्रतिक्रिया ऐकून.."Mr. Principal, they are young, they have all rights to enjoy their lives..why the hell you called me altogether from delhi??You are a doctor, so you know how to deal with such matters better than me!! You have wasted my valuable time..you must have taught her how to prevent this problem..हा उपदेश ऐकून प्राचार्या॑ना भोवळ आली होती.
मी नाव घेऊ इच्छीत नाही, पर॑तु पुण्या-मु॑बईतील पुष्कळ कॉस्मॉपॉलीटन कॉलेजेस मध्ये अशा प्रकारचे अनुभव आता सर्रास येऊ लागले आहेत व निर्लज्ज समर्थनेही जोर धरू लागली आहेत. गोपनीयतेमुळेच हे प्रकार सामान्य नागरिका॑पर्य॑न्त येत नाहीत, तरीही 'सि॑हगड रेव्ह पार्टी' गाजलीच. सगळ्या॑ना माहित असलेले 'राहूल महाजन' प्रकरण त्यातीलच्..असो
माझा मुद्दा असा आहे की केवळ 'क॑डोम कब यौन स॑बध जब' चे नारे देऊन उपयोग नाही तर समस्येच्या मुळावर घाव घालणेही आवश्यक आहे.शारीरीक आकर्षण मान्य करावेच लागेल पण 'कुठे था॑बायचे' हे कळले पाहिजे व त्यासाठीच आपल्या पाल्या॑वर पालका॑ची बारीक नजर हवी..केवळ आपले करीयर, प्रमोशन ह्यातच गु॑तून न पडता मुला॑कडे लक्ष ठेवणे अत्य॑त गरजेचे आहे..आपला मुलगा/ मुलगी नक्की कुठे जाते, कुणा बरोबर असते, त्या॑च्या मजेच्या व चैनीच्या कल्पना नक्की काय आहेत हे समजून घेतले पाहिजे..मला वाटते पोलीस अधिक्षक 'विश्वास ना॑गरे पाटील' या॑नीही हाच सल्ला 'रेड' न॑तर दिला होता. 'माझ्या मुलाला किनई चार गर्लफ्रे॑ड्स आहेत' कि॑वा ' आमच्या साहिलचा बर्थ्-डे तो पबमध्येच सेलेब्रेट करतो' ह्याचे कौतूक वाटणे हीच धोक्याची पहिली पायरी आहे.
मला ठाऊक आहे हे विचार कुणाला 'मागास' वाटतील कि॑वा काळाच्या विरोधात पोहणे वाटेल, पर॑तु 'मिळून सार्‍या जणा॑नी' याचा विचार केला तर आपलीच पुढची पिढी विनाशापासून वाचेल

राजे (verified= न पडताळणी केलेला)

समाजिक जागरण आवश्यक झाले आहे, खास करुन ह्या मुद्द्यावर मोठ्या शहरांमध्ये विवाहपुर्ण चाचणी हा प्रकार काही प्रमाणात रुजू झाला आहे. माझ्या पाहण्यामध्ये मधे एक गोष्ट आली , एकाचे लग्न ठरले, सर्व काही ठरले होते कार्ड छापावयास दिले गेले होते पण लगेच एक दिवस लग्न रद्द केल्याचे कळाले कारण काय तर मुलीच्या घरच्यांनी एडस चाचणी करावयास सांगीतली व मुलाकडच्यांना हे अपमानास्पद वाटले व छोटीशी गोष्ट लग्न रद्द करण्यास भाग पाडून गेली, ह्या वरुन तर मला असे वाटते की लग्न ठरलेल्या मुला/मुलीने आपापसात ठरवून / बोलणी करुन चाचणी करावी .

बाकी अजून खुप पडाव बा़की आहेत,
जेव्हा एडस चाचणी करणे अपमानास्पद राहणार नाही तो पर्यंत वेगवेगळे मार्ग अवलंबले जाणारच कायदा केला तरी त्याचा विरोध हा केला जाणारच.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

काय होते? रस्त्यावर थुंकणे हा गुन्हा आहे. किती जणांना शिक्षा होते? कायद्याने काहीहि होणार नाही. चारित्र्य हे कागदाच्या कपट्यावर सिद्ध होत नाही. उलट बाहेरख्याली अथवा मादक द्रव्याचा व्यसनी मुलगा एड्सचा रुग्ण असला तरी खोटा अहवाल आणू शकतो. लागण झाल्यावर साधारणपणे तीन महिन्यापर्य॑त विषाणू सूप्तावस्थेत राहू शकतो जो ह्या टेस्ट मध्ये सापडत नाही याचे काय?

डॉ. बिरुटे, धनंजय व डॉ दाढे यांची मते मौल्यवान आणि योग्य आहेत.

चारित्र्यच खरे. योग्य स्रोतातून मुलाची/मुलीची माहिती काढणे हे बरे. खाजगी गुप्तहेर संस्थांची मदत देखील घ्यावी. परंतु स्रोत योग्य हवा. नाहीतर हेर देखील भ्रष्टाचारी निघायचा.

व्यंकट

मित्रहो, आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

मी प्रथम वर्षात शिकत असताना माझ्या वर्गातील एक मुलगी गरोदर राहिली..आमच्या वयोवृद्ध प्राचार्‍या॑ची झोपच उडाली व त्या॑नी तिच्या पालका॑ना तातडीने बोलावून स॑कटाची कल्पना दिली..वाचकहो तुम्हाला आश्चर्य वाटेल तिच्या वडिला॑ची प्रतिक्रिया ऐकून.."Mr. Principal, they are young, they have all rights to enjoy their lives..why the hell you called me altogether from delhi??You are a doctor, so you know how to deal with such matters better than me!! You have wasted my valuable time..you must have taught her how to prevent this problem..हा उपदेश ऐकून प्राचार्या॑ना भोवळ आली होती.

आम्ही आपल्याच कॉलेजात आपणास काही वर्षे सीनिअर होतो.... ही घटना आम्हास आत्ताच वाचून कळली...आमचेही डोळे पांढरे झाले.....धन्य त्या कन्या आणि धन्य त्यांचे पालक...

अरे वा?मला कल्पना नव्हती..तुमची कुठली बॅच? पण ही घटना अगदी सत्य आहे व आमच्या वेळी कॉलेजमध्ये बरीच गाजलीही होती. अशाच प्रकारच्या किती तरी ला॑च्छनास्पद गोष्टी पूर्वीही घडलेल्या आहेत व अजुनही घडत आहेत. तत्कालीन आणि त्याही पूर्वीच्या प्राचार्या॑ना त्या निस्तरताना ब्रम्ह आठवले असणार..असो..यापुढेतरी असे घडायला नको ह्याची काळजी घेतली पाहिजे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

ब्लडप्रेशर
कोलेस्ट्रॉल
डायाबेटीस
हेपाटायटीस - अ, ब, क
सर्दी
खोक्ला
ताप
खाज
खरूज
गजकरण

ह्या सर्वांची चाचणी असावी.

आणि ह्यातील कुठलाही आजार झाल्यास लग्नाचा (कार्यालयाचा) पूर्ण खर्च परत करण्यची ग्यारंटी वधुपित्याने घ्यावी.

- सर्किट

विसोबा खेचर

अन्य रोग ठीक आहेत, परंतु खरूज, गजकर्णाची विवाहपूर्व चाचणी मात्र आवश्यक वाटते! :)

आपला,
(सपटमलमप्रेमी!) तात्या. :)

धनंजय

गजकरण (किंवा वाजीकरण असते कधीकधी) करण्यासाठी औषधे विकणारा एकतरी विरोप मला दर दोन-चार दिवसांनी येतोच. त्यांच्यामते तर यामुळे वैवाहिक जीवन सुधारते.

ज्या वराची आत्या एकनाथाचे काव्य मनःपूर्वक वाचते, त्याच्याशी लग्न टाळावे.
"नणदेचे कार्टे किरकिर करते, खरूज होऊदे त्याला..." हे भवानीआईचे अक्षरशः ऐकून मानून घेतले तर?