इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४)
नमस्कार.
ह्या पूर्वीचे भागः-
भाग ३ http://www.misalpav.com/node/17365
भाग २ http://www.misalpav.com/node/17324
भाग् १ http://www.misalpav.com/node/17293 .
सर्व प्रथम श्री प्रसन्न केसकर ह्यांचे आभार. ह्या आणि पुढच्या काही भागात जे मला मांडायचं होतं, त्यातला बराचसा भाग त्यांच्याकडे आधीच उपलब्ध होता, प्रचलित ज्यू- ख्रिश्चन मान्यतांशी अगदी जुळणारा असा तो आहे. मी तो पुन्हा एकदा इथे मांडतोय. त्यांच्याकडून घेतलेलं लिखाण हे इटॅलिक्स मध्य असेल. मला त्यात काही भर घालावीशी वाटली तर ती मी घालेन.
आज दोन लोक कथा, दोन गोष्टी बघुयात.
७. अच्छा. सृष्टी निर्मितीबद्दल असं मानतात होय ह्या श्रद्धा. पण ह्या सृष्टित माणुस कुठुन आला?
ख्रिश्चन्-ज्यू श्रद्धा आहे ती अशी:-
देवाने मनुष्य (आदम) व स्त्री (ईव्ह) ला निर्माण केले त्यानंतर त्यांच्या विहारासाठी एडेनमधे बाग निर्मिली आणि त्यात तर्हेतर्हेचे वृक्ष वगैरे लावले आणि त्याच बागेच्या मधोमध बर्यावाईटाचे ज्ञान देणारा वृक्ष लावला तसेच तेथे विविध प्रकारचे प्राणी पक्षीपण ठेवले, असे बायबल समजते. बायबलनुसार देवाने मनुष्य व स्त्रीचे अबोधपण जपण्यासाठी त्यांना बर्यावाईटाचे ज्ञान देणार्या वॄक्षाचे फळ खाण्यास मज्जाव केला.
परंतु, मनुष्याने व स्त्रीने सर्पाच्या फुस लावण्यावरुन आपल्या आज्ञेचे उल्लंघन करुन बरे-वाईट कळणारे फळ खाल्ले. हे समजल्यावर देव क्रोधित झाला आणि त्याने शाप दिले. सर्पास दिलेला श्याप असा: 'तु पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. तुझ्या आणि स्त्रीच्या संततीत कायम वैर राहील. तिचे संतान तुझे मस्तक ठेचेल आणि तु त्याची टाच जखमी करशील.' स्त्रीचा शाप असा, 'प्रसुतीकाळात तुला क्लेश आणि दु:ख होईल. वेदना सहन करुन तु मुलांना जन्म देशील पण त्यांचा ओढा तुझ्या पतीकडे राहील. तुझा पती तुझ्यावर सत्ता गाजवेल.' आदामला शाप दिला की, 'आयुष्यभर कष्टाने भूमीची मशागत तुला करावी लागेल पण तिथे काटे व कुसळेच उगवतील. तु रानटी वनस्पतीच खाशील. मातीला जाऊन मिळेपर्यंत तुला घाम गाळावा लागेल.' त्यानंतर देवाने आदाम आणि ईव्हला चर्मवस्त्रे घातली आणि त्यांना एडन बागेतुन हाकलले.
इथुन पुढे बायबलच्या जुन्या करारातले एकसंध समाजनिर्मितीचे प्रयत्न सुरु होतात आणि त्यासाठी आदामची वंशावळ येते. (रक्ताच्या नात्याने बांधले जाणे हे सर्वात घट्ट बंधन आहे.) विस्तारभयाचा धोका पत्करुन दिलीच तर
ती अशी:
आदाम व हव्वाची मुले काईन , हाबेल आणि शेथ. काईलचा पुत्र हनोख. शेथचा मुलगा अनोश. हनोखचा मुलगा इराद. इरादचा मुलगा महुयाएल. महुलाएलचा मुलगा लामेखा. लामेखाची मुले याबाल, युबेल, तुबल काईन. अनोशचा मुलगा केनान. केनानचा मुलगा महललेल. महललेलचा मुलगा यारेद. यारेदचा मुलगा हनोख. हनोदचा मुलगा मथुशलह. मथुशलह्चा मुलगा लामेख तर लामेखचा मुलगा नोहा. नोहाची मुले शेम, हाम आणि याफेथ. नोहाला व त्याच्या मुलांना देवानेपुष्कळ मुलांना जन्म द्या व पृथ्वीवर लोकसंख्या वाढवा असा आशीर्वाद दिला होता. हा अभयाचा करारच होता.
(कॅथॉलिक)ख्रिश्चनांनुसार मनुष्य असा जन्माला आला तेच मुळी पापातुन. तो शापग्रस्त आहे. त्याला दैवी करुणेची गरज आहे.तो त्याशिवाय काहिसा असहाय्य आहे. एखादा प्रेषितच आता तुम्हाला त्या करुणेस पात्र बनवु शकतो. ह्यातुन सुटण्यासाठी आणि ईश्वराची मर्जी संपादन त्याने सतत/नियमित ईश्वराचा धावा करावा.
इस्लाम मध्येही कथा बरिचशी अशी आहे. पण मुख्य फरक हा की आदम्/अॅडम हा प्रथम प्रेषित होता असं ते मानतात. तो निर्माण झाला तोच मुळी ईश्वराचा जयघोष करत. जगात एकच एक्मेव ईश्वर आहे असं म्हणत. इस्लामनुसार आदम्-हव्वा ह्यांनी माफी मागितल्यावर ईश्वरानं त्यांना क्षमा केलं. आपण निर्माण केलेल्या पृथ्वीवर आपला प्रतिनिधी म्हणुन पाठवलं, शाप म्हणुन नाही. मनुष्य जात काही सर्वस्वी पापी वगैरे नाही. कट्टर ज्यू/मुस्लिम भाविक आजही यार्देनच्या बागेचा रस्ता दाखवतात. स्वर्गातून तैग्रिस आणि युफ्र्रेटिस उगम पावल्या एकाच ठिकाणी आणि त्यांच्या उगमापाशीच हे ईडन गार्डन आहे असं मानतात. आमची गंगा/भागिरथी नाही का स्वर्गातुन धो धो करत उतरली आणि शिवाच्या जटांत जाउन विसावली, तसच काहिसं.
८. बरं मग पुढं काय झालं ह्या नोहाचं?
तर अशा ह्या आदमाच्या वंशातल्या नोहाच्या काळात एक समाज बनला होता. अनेक लोक वसले होते. अनेक जमाती बनल्या होत्या. विविध संस्कृती नांदत होत्या.पण जसा जसा काळ जाउ लागला तसं तसं आपल्या गेलेल्या पूर्वजांची लोकांना आठ्वण येइ. काहीजण ह्या आठवणीतूनच त्यांचे पुतळे /मूर्तीउभारु लागले. उभारणं एकवेळ ठीक होतं. पण महत्पाप म्हणजे त्यांनी मूळ उद्देशाचा विसर पडुन ह्या मूर्तींचीच पूजा-अर्चा सुरु केली. ह्यामुळं सर्वशक्तिमान पण ईर्षापूर्ण असा परमेश्वर क्रुद्ध झाला. समाजात इतरही अनेक अनाचारांनी टोक गाठल्याचं बायबल म्हणतं.(अनाचारः- मूर्तीपूजा, निषिद्ध/महापापी संबंध, ईश्वरास नाकारणे,अस्थिर समाज,विव्ध गुन्ह्यांना आलेला ऊत. ) ईश्वरानं मग हे सगळच एकदम संपवायचं ठरवलं. पण त्याला आढळला एक सत्शिल, ईश्वरभक्त माणुस्-नोहा. सगळ्यांसोबत उगाच ह्याला का शासन द्यायचं ? असा विचार आल्यानं त्यानं नोहाला स्वतःचा साक्षात्कार घडवला आणि सांगितलः- "सर्व दुराचार संपवण्यासाठी मी एक महाप्रलय आणतोय- जलप्रलय. सगळि पृथ्वी जलमय होइल. पापे धुतली जातिल्.पापी बुडतिल्.विनाशोत्तर पुनृप्रारंभाची शेवटची आशा म्हणुन तु आतापासुनच एक नौका बांधायला लाग. सहा दिवसात प्रलय येइल. त्यावेळी नौकेवर प्रत्येक प्रकारचं एक एक प्राण्याचं जोडपं घेउन तु नौकेवर जा. इतर काही सत्शिल व्यक्ती सापडल्यास त्यांनाही सोबत घे आणि पूर ओसरल्यावर सर्वांना सुखरुप घेउन खाली ये."
नोहानं आज्ञेचं पालन केलं. नौका बांधली.(ही आजच्या जॉर्डन देशाच्या राजधानी अम्मन पासुन केवळ १२० किमी जवळ असणार्या एका जंगलात जाउन बांधली असं मानतात.) प्राणी ,पक्षी, कीटकांशी संवाद साधुन त्यांना आपल्यासोबत घेतलं. पण हाय रे दैवा. जे ह्या पशु पक्ष्यांना समजलं ते इतर माणसांना नाही. त्यांनी नौकेचं निमंत्रण द्यायला आलेल्या नोहाची थट्टा केली. कुणी त्याला हातचलाखी करणारा क्षुल्लक जादुगार म्हटलं. कुणी त्याला नुसत्या भविष्याबद्दल गप्पा ठोकणारा कर्मशून्य भविष्यवेत्ता म्हटलं तर कुणी थापाड्या! पण फक्त सहाच दिवस.
सहा दिवसात मुसळधार पाउस सुरु झाला. नोहा आपल्या नौकेसह सुरक्षित होता. इकडं धरणी हादरली. आसमंत फाटले.वीज कडाडली. सतत सर्वत्र न भूतो न भविष्यति असा पाउस सुर झाला.चाळिसेक दिवस आणि चाळिसेक रात्र पाउस थांबलाच नाही. नौकेबाहेर कुणी प्रमुख पशु प़क्षी मानव वाचलेच नाहित. खुद्द नोहाचा एक पुत्र बुडाला. त्याची अश्रद्ध बायको बुडाली. इकडे जलपातळी वाढत वाढत जाउन तत्कालिन ज्ञात सर्वात उंच पर्वताच्या माथ्यापर्यंत पोचली. (हा पर्वत म्हणजे विद्यमान तुर्कस्थानातील माउंट आरात आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.)पाउस थांबल्यावर नोहानं पाणी किती उतरलय हे बघायला एक पक्षी सोडला. तो आलाच नाहे. मग दुसरा सोडला. तो काही झाडाची पाने घेउन आला. म्हणजे, झाडाच्य शेंड्यापर्यंत तरी पाणी उतरलय असा अंदाज नोहाला आला. त्यानी हळुहळु सर्व पशु पक्षी मानव व कीटकांना बाहेर काढलं.
पुनश्च एका नव्या जगाची सुरुवात होणार होती. पुन्हा ईश्वरी साक्षात्कार होउन हे सांगण्यात आलं की असा प्रलय पुनश्च होणार नाही. अत्यल्प मानव शिल्लक होते. प्रलय आला तेव्हा नोहाचं वय होतं ६००!
त्याचं आयुष्य होतं ९०० वर्षांचं. त्याची मुलं तीन शेम ,हाम आणि जपेथ (Shem, Ham, and Japheth. ) जपेथ प्रगल्भ,प्रगत,नेक आणि बलाढ्य होता. शेम सामान्य आणि हाम पापी व नीच निघाला. हामच्या वंशजांना पुढे शाप मिळाला.
(ह्याच लोक कथेचा आधार घेउन युरोपिअन वर्णवाद्यांनी मध्ययुगात मांडाणी केली ती अशी:- जपेथ ची मुले युरोपिअन्/गौरवर्णीय, शेम म्हणजे आशियायी जनता आणि हामची शापित मुले म्हणजे आफ्रिकन्स. त्यांचा जन्म दास्यासाठिच झालाय आणि त्यांना दास/गुलाम करुन आणि पशुतर जगवुन आपण एक दैवी कार्यच करतोय. )
तर ही कथा होती ख्रिश्चन आणि ज्यूच्या मतानुसार.
(ज्यू म्हणतात आता काही पुन्हा तसा प्रलय येत नाही. ख्रिश्चन आणि इस्लाम मध्ये मात्र DAy Of Judgement किंवा कयामत का दिन ही कल्पना आहे. अगदि तसाच प्रलय नाही, पण महा विनाश.)
इस्लामी कथे मध्ये नोहाला नुसतं सदाचरणी म्हटलेलं नाही, तर एक थोर प्रेषित म्हटलय. ईश्वराला शरण जाणारा आणि ईश्वरी एकत्वावर डळमळित काळातही ठाम श्रद्धा ठेवणारा एक थोराहून थोर , सहृदयी म्हटलय. त्याची इतकी स्तुती आधीच्या दोन धर्मात दिसत नाही. शिवाय इस्लामी कथेत नोहाच्या नेमक्या मुलांची संख्या सांगितलेली नाही. ती कदाचित जास्त किंवा कमी असेल असंही मानलय. आणि हो, आजचे शिया मानतात त्याप्रमाणे नोहा मुख्यतः राहिला तो इराकच्या आसपासच्या भागात्.,मेसापोटेमियामध्ये. पहिले शिया इमाम अलि ह्यांना इराक मध्ये जिथं दफन करण्यात आलं अगदि त्याच्या बाजुला नोहाचही दफन झालं असं ते मानतात.
एक सत्शिल मनुष्य.जलप्रलय् होतो. होडी घेउन मानव जातो. पाणी उतरल्यावर पुनश्च प्रारंभ करतो. अरेच्चा. ह्या कथासूत्रात फक्त एक मासा , नौकेचं रक्षण कराणारा, भलामोठा मासा-मीन्-मत्स्य ,एक दैवी अवतार टाकला तर कथा जशीच्या तशी ऐकलिये की मी आजीकडुन, विष्णुचा प्रथम अवतार मत्स्य आणि नौकेवाला माणुस मनु म्हणुन!
प्रतिक्रिया