धर्माच्या नावाचे ब्रॆन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...
जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रॆंड आहे. होय हा ब्रॆंड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॊटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत. पण राजीव जैन, राकेश जैन, महावीर जैन, अशोक जैन असे अनेक जैन बांधव माझ्या परिचयाचे आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या उद्योगांना नाव देतेवेळी जैन शब्दाचा प्रकर्षाने वापर केला गेला आहे - जसे की, जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. हिंदू ह्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता मला जैनेतर कुठल्याही धर्माचा कुठल्या ही उद्योगाकरिता फारसा वापर केल्याचे आढळलेले नाही.
जैनांनी आपल्या धर्माला (म्हणजे फक्त जैन या शब्दाला) अशा प्रकारे आपल्या रोजच्या व्यवहारातील पदार्थांना, स्वत:च्या नावाला, उद्योगाच्या नावाला जोडून त्याचा उच्चार जास्तीत जास्त वेळा कानावर पडेल अशी व्यवस्था करून ठेवलीय. डिसेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००० दरम्यान मी बिहार मधील एका अतिशय प्रसिद्ध अशा जैन धर्मीयांच्या सामाजिक संस्थेत दोन महिने काम केले होते, त्यावेळी माझ्या पाहण्यात असे आले की तिथल्या जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॆमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डीजीटल कॆमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डीजीटल कॆमेरा अतिशय महाग - साधारणत: रू.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते.
अशा प्रकारे आपल्या धर्मातील तत्वांचे अनुसरण करण्यात हा धर्म अतिशय काटेकोर असल्याचे इतरही अनेक प्रसंगी दिसून येते. उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तिंना आपल्या वसाहतीत जागा न देणे, महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे, तसेच हा अथवा इतर कोणताही जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्याच्या आहूतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. (खरे तर हे सायकल ने ट्रक ला "मला वाट देण्याकरिता बाजूला हो" असे सांगितल्या सारखे वाटते. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.)
आता या सगळ्या गोष्टींमुळे जैन धर्माची तत्त्वे या समाजात अगदी खोलवर रुजली आहेत असा भास होतो. पण यातला फोलपणा जाणवून देणार्या काही गोष्टी मला इथे मांडाव्याशा वाटतात.
१. परवाच वीसीडीवर २०१० चा अतियशस्वी चित्रपट राजनीती पाहत होतो. चित्रपट जास्त कंटाळवाणा होता की त्यात ठराविक अंतराने सतत त्रस्त करणार्या अल कबीर च्या जाहिराती जास्त कंटाळवाण्या होत्या हे काही मी ठरवू शकलो नाही. या अल कबीर ला इतके वर्ष जाहिरातीची फारशी गरज कधी पडली नव्हती आणि तरी देखील हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याच्या भागीदारांपैकी सर्वात मोठा भागीदार हा जैन धर्मीय आहे. (संदर्भ: http://visfot.com/index.php/jan_jeevan/477.html). म्हणजे जैनांच्या नेहमीच्या सवयीनुसार या कत्तलखान्याच्या नावात जैन शब्द असायला हवा होता पण ते गैरसोयीचे असल्याने तसे केले गेलेले नाही.
२. पुण्यातील आकुर्डी येथे एक जैन स्थानक (जैन धर्मीयांचे प्रार्थना स्थळ) आहे. या स्थानकाच्या १०० मीटर परिसरात एक परमीट रूम उघडण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मद्य विकण्यास कायद्याने परवानगी नाही तरीही असे राजरोसपणे चालु आहे कारण या स्थानकाच्या विश्वस्तांपैकीच एक जण हा त्या परमीट रूमचा देखील भागीदार आहे. यावर कडी म्हणजे या परमीट रूमला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा स्थानिक नगरसेवक मुस्लिम धर्मीय आहे.
या दोन अतिशय प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. माझा मुख्य आक्षेप असा आहे की, जैन बांधव आपल्या धार्मिक तत्त्वांचे जिथे तिथे गोडवे गात फिरत असतात. इतरांनाही अहिंसा, सदाचार व शाकाहाराचा संदेश देतात (ज्याविषयी माझी काहीच हरकत नाही), पण मग त्यांनी वरील दोन घटनांचा तीव्र विरोध व जाहीर निषेध का केला नाहीय? जैन लोकांचे प्रसारमाध्यमात व समाजाच्या इतर क्षेत्रांमध्येही लक्षणीय प्राबल्य आहे; त्याचा उपयोग करून ते मनात आणले तर आपल्या बांधवांकडून घडणार्या अशा गोष्टी निश्चितच थांबवू शकतात.
मला हे ठाऊक आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांपैकी काही जण अशा प्रकारे चूकीचे आचरण करत असतील पण जेव्हा आपण परधर्मीयांच्या अशा आचरणाचा निषेध करतो तेव्हा प्रथम स्वधर्माच्या लोकांकडून असे काही घडत नाहीयना याची खात्री करून घ्यायला हवी आणि तसे घडत असेल तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वत: एक जैन धर्मीय या नात्याने या लेखनाद्वारे करीत आहे.
http://beftiac.blogspot.com/2010/10/blog-post_08.html
प्रतिसादांना उत्तरे देण्याकरिता पुरवणी लेखन
या लेखाच्या प्रतिसादात अनेकांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या प्रतिसादांना तिथल्या तिथे उत्तरे देण्याचा मी कमाल प्रयत्न केला आहे. अर्थात अनेक वाचकांच्या प्रतिसादात काही मुद्दे पुन्हा पुन्हा आले आहेत. त्या सर्वांना त्या त्या ठिकाणी एकसारखी प्रत्युत्तरे देण्यापेक्षा अशा मुद्यांना या लेखातच उत्तरे द्यावी या उद्देशाने हे पुरवणी लेखन करीत आहे. या पुरवणी मजकूराच्या वर असणार्या मूळ लेखात कोणतेही संपादन केलेले नाहीय.
१. अनेकांनी जैन धर्मीयांच्या कट्टरपणाचा, विखारीपणाचा, तसेच त्यांच्या आचरण व शिकवणूकीतील विसंगतींचा मुद्दा मांडला आहेत. याबद्दल एक उदाहरण द्यावेसे वाटते. काही वर्षांपुर्वी हिंसक प्रचार करणार्या एका धार्मिक नेत्याला जैन धर्मीयांच्या दादावाडी (पुणे) मंदिरात आमंत्रण दिले गेले होते व ते जैन मंदिरात आले देखील होते. http://articles.timesofindia.indiatimes.com/keyword/jain-temple/featured/4 अशा लोकांना बोलवायचे असेल तर एरवी अहिंसेचे गोडवे गाण्यात तरी काय अर्थ आहे?
२. जैन ब्रॅन्डींगची मी बरीच उदाहरणे दिली होती पण त्यातील प्रामुख्य़ाने खाण्याच्याच बाबींची चर्चा झाली. अनेकांनी अशा प्रकारे जैन धर्मीयांना साजेसे अन्नपदार्थ हॉटेला त उपलब्ध करून देण्यात काहीच गैर नसल्याचे म्हंटले आहे. मलाही यात काही गैर आहे असे म्हणायचे नव्हतेच. मला स्वत:ला देखील माझ्या आवडीप्रमाणे हॉटेलात अन्न उपलब्ध असावे असे वाटतेच. आक्षेप आहे तो अशा पदार्थांच्या नावामागे जैन हा शब्द लावण्यास. कारण यातून बरेच गैर समज निर्माण होतात. उदाहरणार्थ - जैन पावभाजी - आता या पावभाजीत कांदा, लसूण, बटाटा आदी पदार्थ नसतात हे खरे. परंतू तरीही तिला जैन पावभाजी संबोधणे चूकीचेच आहे. जैन धर्मीयांच्या अन्नग्रहणाच्या काटेकोर नियमानुसार पाव देखील जैन आहारात समाविष्ट होऊ शकत नाही. तो किण्वन प्रक्रियेने बनतो व त्यात जंतुंची वाढ होत असते. याप्रमाणेच जैन पिझ्झा हा देखील खर्या अर्थाने जैन आहार होऊ शकत नाही. पण गंमतीचा भाग असा की बाजारात मिळणारे बहुतेक सर्व पदार्थ खाण्याची इच्छा तर असतेच, त्याचवेळी आपण धर्म पाळतो असेही दाखवायचे असते मग त्या पदार्थात थातुर मातुर बदल करून त्याच्यामागे जैन उपाधी चिकटवून हादडणे चालु होते. आता इतके जैन पदार्थ बाजारात मिळत आहेत की जैन मांस व जैन अंडी देखील मेन्यूकार्ड मध्ये विराजमान होतात की काय अशी शंका वाटू लागली आहे.
याबाबत मॅगी टोमॅटो सॉस उत्पादकांकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी त्यांच्या सॉसमध्ये कांदा व लसुणाशिवायचा देखील एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे, परंतू त्यावर जैन सॉस असे न लिहीता सॉस विदाऊट ओनिअन ऍन्ड गार्लिक असे लिहीले आहे.
३. मी लेखात निवडलेल्या बाबी फारशा त्रासदायक नाहीत असाही काहींचा आक्षेप होता. हे मलाही मान्य आहे. परंतु एक लक्षात घ्या की एक जैन धर्मीय म्हणून जगताना मी आमच्या धर्माच्या साधु साध्वींचे अतिशय कडक नियम पाहिले आहेत. हे लोक किती क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करतात हे कदाचित आपणास ठाऊक नसेल म्हणून त्याबद्दलची ही उदाहरणे इथे मांडू इच्छितो - स्थानक या प्रार्थना स्थलात ध्यान करतेवेळि इलेक्ट्रॉनिक घड्याळ वापरू नये कारण त्यातील विद्युत प्रभावा मुळे सुक्ष्म जीवांची हत्या होते, नळाचे वाहते पाणी वापरू नये कारण या प्रवाहामुळे सुक्ष्म जीवांची हत्या होते, इत्यादी. असे अजब तर्कशास्त्र रोजच्या व्यवहारातील गोष्टींना लावले जाते. इतकेच नव्हे तर जैन धर्मीयांच्या धार्मिक / सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे इतर धर्मीय झाडुवाले, वाहनचालक आदी आर्थिक दृष्ट्या निम्नस्तरावर असलेल्यांना गोड बोलुन मांसाहार वर्ज्य करण्याच्या शपथा घ्यायला लावल्या जातात. अशा प्रकारे इतरांच्या गळी आपले धार्मिक आचरण उतरवून त्यांना बाटविणारे आमचे हे समाजधुरीण आमचाच एखादा बांधव कत्तलखाना / मद्यालय अशा व्यवसायांमध्ये सक्रिय असतो तेव्हा त्याला खडसावून जाब का विचारीत नाहीत याचा मला राग येतो. तीन वर्षांपूर्वी शिरूर स्थित एका गुटखा व्यापार्याच्या कन्येने नऊ दिवस उपवास केले होते त्याचा मोठा समारंभ पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या समारंभात जैन साध्वींनी सदर कन्यारत्नाचे कौतुक केलेच परंतू तिच्या गुटखा किंग पित्याची देखील सामाजिक बांधिलकी जपणारे व्यावसायिक असे म्हणत तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. देणगी मिळते म्हणून असे मिंधे आचरण करणार्या साधु साध्वींचा मला जराही आदर वाटत नाही.
💬 प्रतिसाद
(120)
न
नगरीनिरंजन
Wed, 09/14/2011 - 11:14
नवीन
तुम्ही स्वप्रज्ञेने, कोणतीही बचावात्मक प्रतिक्रिया म्हणून न लिहीता विसंगतीवर नेमके बोट ठेवले याबद्दल तुमचे मन:पूर्वक अभिनंदन.
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 11:39
नवीन
अभिनंदनाबद्दल धन्यवाद पण लेख मी स्वप्रज्ञेने लिहीला असला तरीही इथे प्रकाशित करण्यामागची प्रेरणा श्री. सागर बोरकर (वल्ली) यांनी दिली, अन्यथा मी तर मिसळपाव वरून स्वेच्छानिवृत्तीच पत्करली होती. तेव्हा तेच या अभिनंदनाचे वाटेकरी आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 09/14/2011 - 18:34
नवीन
श्री. चेतन गुगळे यांचे आभार की त्यांनी माझ्या विनंतीला मान देउन आणि मागचे सर्व मतभेद विसरून लेख इथे लिहिला. लेखांवर टीका इथे होतच राहतात पण चांगल्या लेखांचे कौतुकही इथे तितकेच होते.
तेव्हा तुम्ही इथे लिहीत राहाच. आम्हालाही तुमचे विचार वाचायला नक्कीच आवडतील.
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
गुरुवार, 04/02/2020 - 18:17
नवीन
चे सु गु तुम्ही हल्ली लिहीत का नाही हा परत प्रश्न पडला आहे
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Wed, 09/14/2011 - 11:20
नवीन
चेगु लेखाबद्दल अभिनंदन.
माझा एक जावई सुद्धा जैन आहे.
त्याला वरील लेखातील काही प्रश्न विचारल्यावर त्याने विषय बदलला.
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 11:30
नवीन
मी स्वतः जन्माने जैन असलो तरी सर्वच धर्मांकडे अतिशय तटस्थपणे पाहतो, त्यामुळेच हा लेख लिहू शकलो.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/14/2011 - 11:30
नवीन
लेख आवडला. अभिनंदन.
सहसा धार्मिक कट्टरपणाबद्दल अथवा धार्मिक विखारीपणाबद्दल पटकन मुस्लिम धर्मियांचे नाव मनात येते. पण जैन धर्मियांचा धार्मिक कट्टरपणा, धर्मासाठी तामसी वागणे, कोणत्याही थराला जाणे... अगदी निष्पाप कोवळ्या जीवांचे खून करण्यापर्यंतही मजल जाणे वगैरे प्रकार या एका धर्मियांबाबत अगदी नियमितपणे कानावर येतात. अहिंसेचे स्तोम माजवून, अवडंबर माजवून सगळ्यात जास्त वाचिक, मानसिक, कायिक हिंसा करणारे लोक हेच हा केवढा मोठा विरोधाभास!
असे लोक, मग ते कोणत्याही धर्मातले असोत, शिक्षेसच केवळ पात्र आहेत.
- Log in or register to post comments
र
राही
Wed, 09/14/2011 - 12:20
नवीन
जैन धर्माच्या कट्टर शिकवणुकीत आणि त्यांच्या आचरणात त्रयस्थाला विसंगती जाणवते हे खरेच. दवाबाजार,किराणा बाजार येथे जैन धर्मीयांचे वर्चस्व आहे आणि इथे प्रचंड भेसळ, भ्रष्टाचार होत असतो हे उघड गुपित आहे. त्यात आयातनिर्यात,हवाला,इ. मधले घोटाळे मिळवून पहा. आताशी तर या धर्मामध्ये छुपी आणि मूक आक्रमता येऊ लागली आहे अशी शंका येते. मुंबईतल्या लालबाग-परळ मधल्या जुन्या इमारती जाऊन तेथे उत्तुंग टॉवर्स आले आहेत आणि त्यांमधील रहिवाश्यांमधे जैनांची संख्या मोठी आहे हे सर्वांना माहीत आहे. पण मध्यंतरी यांनी चिवडागल्लीत पाठवायच्या पत्रव्यवहारावर जैन गल्ली असा पत्ता लिहिणे सुरू केले होते. असेही कानावर आले आहे की(याला पुरावे किंवा लिंक्स नाहीत त्यामुळे लिहावे की नाही असा प्रश्न पडला होता.)महाराष्ट्रात जसे दलितांचे बौद्धधर्मीयांत परिवर्तन झाले तसे गुजराती समाजातील निम्नस्तरीय जातींचे जैन धर्मीयांत होते आहे. अर्थात हा गुन्हा नाही पण द्रव्यलाभ किंवा आमिष हे छुपे कारण आहेच. आणखीही काही ऐकून आहे पण लिहावे की नाही अशी साशंकता आहे.
विमानप्रवासात जैन भोजन हा ठळक पर्याय असतो, तसाच हिंदू भोजन, हिंदू सामिष भोजन हाही असतोच. हे सर्व त्या त्या समाजाला आपल्या ग्राहकपरिघामध्ये खेचण्यासाठी केले जाते. ज्याची आर्थिक शक्ती अथवा क्रयशक्ती अधिक,त्याचा अनुनयही अधिक हा सार्वत्रिक न्याय आहे.
- Log in or register to post comments
प
प्रास
Wed, 09/14/2011 - 12:42
नवीन
यातला पूर्वार्ध समजू शकतोय पण उत्तरार्धाच्या बाबतीत शंका आहे. अशा परिवर्तनाची पद्धत, त्याचे फायदे, परिवर्तितांची मनोगते वगैरे वगैरे काही सोदाहरण सांगू शकलात तर आभारी राहीन. ही एक नम्र विनंती मानावी.
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 12:51
नवीन
सरकारी फायदे मिळत नसले तरी सामाजिक प्रतिष्ठा मिळत असल्याने असं घडतं. मी स्वत: असे प्रकार पाहिलेत. नोकरीत फायदा नसला तरी व्यापारात निश्चित फायदा होतो.
- Log in or register to post comments
र
राही
Wed, 09/14/2011 - 14:09
नवीन
परिवर्तितांना मिसळपाव वर आणून त्यांना बोलके करणे असे तर तुम्हाला अपेक्षित नाही ना? हे परिवर्तित म्हणजे कोणी सुप्रसिद्ध व्यक्ती नसतात, ज्यांची नावे उद्धृत केल्यास लगेच त्यांची ओळख पटेल.गुजरातच्या डांग जिल्ह्यातल्या आदिवासींबाबत हे घडते आहे.पटेल-कोळी या जातीत पुष्कळ धर्मांतरे झाली आहेत.जैनांच्या चॅरिटीज खूप असतात त्याचा फायदा परिवर्तितांना मिळतो. अर्थात यात गैरकानूनी काहीही नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट व्हावे.या चॅरिटीज किती असतात? आपल्याला कल्पनाही येणार नाही. (इथे मुंबईत तरी) त्यांना आवश्यक अन्नधान्ये शिधा स्वरूपात दर कुटुंबामागे अगदी स्वस्तात दिली जातात. धान्यबाजारातले व्यापारी यासाठी मदत करतात. जीवनावश्यक औषधे कमी दरात मिळतात.(पुन्हा दवाबाजार इ.) रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली तर त्यांच्यासाठी या चॅरिटीजनी पुरस्कृत केलेल्या स्वस्त दरातल्या खाटा राखीव असतात अथवा मेडिक्लेम प्रमाणे त्या खर्चाची रीइंबर्समेंट दिली जाते. शाळाकॉलेजांच्या फीज्,पुस्तके,ही तर असतातच.गणवेश वगैरेसुद्धा दिले जातात. शिवाय उत्तमोत्तम शिक्षणसंस्थांचे संस्थापक-प्रवर्तकही जैन असतात. मुंबईसारख्या ठिकाणी ते भाषिक अल्पसंख्य असल्याने सिंधी-गुजराती-तमिळ्-हिंदी-ख्रिस्टिअन्स-मुस्लिम वगैरे इतर भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांप्रमाणेच त्यांनाही प्रवेशाच्या बाबतीत कायद्यानेच खास सवलती असतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये जमिनीच्या किंमती मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर असल्याने मराठी आस्थापने उभी राहू शकत नाहीत. हा जरी जैन धर्मीयांचा दोष नसला तरी आहे हे असे आहे.
- Log in or register to post comments
ज
जाई.
Wed, 09/14/2011 - 13:24
नवीन
नुकत्याच एका corporate conferance मध्ये जैन भोजन हा वेगळा प्रकार होता.
अगदी खरय. गोरेगाव वेस्टला नेमक हेच झालय.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 09/14/2011 - 18:44
नवीन
जैन भोजन म्हणजे मुख्यत्वे कांदा लसूण विरहीत पदार्थ. बहुसंख्य जैन धर्मीय कांदा लसूण खात नसल्याने त्यास जैन भोजन म्हणण्याची प्रथा पडली असावी. अर्थात काही कट्टर ब्राह्मणही कांदा लसूण खात अजिबात खात नाहीत पण त्यांचे प्रमाण जैनाच्या मानाने अल्पच म्हणावे.
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Sat, 09/24/2011 - 18:12
नवीन
एका मूक-वाचकाने ही लिंक पाठविली आहे.
http://mahavir-sanglikar.blogspot.com/2010/06/what-is-jain-food.html
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 09/14/2011 - 13:57
नवीन
मुंबईतल्या लालबाग-परळ मधल्या जुन्या इमारती जाऊन तेथे उत्तुंग टॉवर्स आले आहेत आणि त्यांमधील रहिवाश्यांमधे जैनांची संख्या मोठी आहे हे सर्वांना माहीत आहे
इथे मांसाहार न करणार्यानाच घर घेता येईल अशी काहीशी अट होती असे वाचल्याचे आठवते, ह्यावर प्रमोद नवलकरांनी एख लेख सुध्दा लिहीला होता. त्यात मांसाहार वाईट कींवा चांगला हा उहापोह नसुन कोणी आपल्या घरात काय खावे हे दुसरा कोणी कसा काय ठरवु शकतो हा मुद्द होता.
अर्थातच त्यात काही "आर्थीक गणीत" असल्या मुळे त्यांच्या पक्षाने पुढे रेटला नसावा
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 17:22
नवीन
मी कधी आंतरराष्ट्रीय (आणि देशांतर्गत देखील) विमानप्रवास केलाच नाही. राजधानी एक्स्प्रेस पेक्षा उच्च दर्जाच्या प्रवासाचा अजून तरी योग आला नाही. त्यामूळे विमानात उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांच्या पर्यायाबाबत मला काहीच माहिती नाहीय. राजधानीत व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन मुख्य पर्याय आणि त्यातील व्हेज मध्ये पुन्हा इंडियन आणि कॉंटिनेंटल असे दोन उपपर्याय उपलब्ध असतात. जैन पर्याय मला तरी सापडला नाही.
आणि आता बरेचसे अवांतर :-
माझा अनुभव असा आहे की व्यक्तीला दाबले जाते आणि समुहाला चूचकारले जाते. मी स्वत: जैन धर्मीय आहे आणि मला कांद्याचे पदार्थ आवडत नाहीत हा एक केवळ योगायोग आहे. मी धार्मिक कारणाने कांदा टाळत नाही. मला शिजवलेला कांदा खाल्ला तर प्रचंड त्रास होतो. कच्चा कांदा (त्यातही पातीचा असल्यास) मी आवडीने खातो. शिवाय मी व्हेगन (दूध, मध, इत्यादी प्राणिज पदार्थ न खाणारा) असल्याने मला भाजीत पनीर, लोणी, मलई असे काही अजिबात चालत नाही. भाजीत काजूची ग्रेव्ही किंवा इतर काही गोडवा याचा मला अतिशय तिटकारा आहे. मी जेव्हा हॉटेलात जेवणाची ऑर्डर देतो तेव्हा भाजीत कांदा नको असे म्हंटल्यावर वेटर आपल्या मनानेच भाजीच्या नावापुढे जैन असे लिहीतो. या जैन भाजीची मला धास्तीच वाटते कारण जैन म्हंटले ही लोक भाजीत भरपूर तूप / लोणी, काजूची ग्रेव्ही, पनीर / मलाई यांचा मारा करतात. यामुळे भाजी गोSSSड लागते आणि मला अजिबात आवडत नाही (अर्थात जैन पावभाजी हा पदार्थ मात्र बर्यापैकी तिखट असतो आणि मलई वगळून बनविल्यास मी आवडीने खातो) तेव्हा या गोष्टी भाजीतून वर्ज्य करा अशी विशेष सूचना करावी लागते. ते ऐकून वेटर चक्रावतो. शेवटी त्याच्या आश्चर्याचा कडेलोट होतो जेव्हा मी तोंडी लावायला त्याने आणलेल्या लिंबू आणि लोणच्या सोबत कांदा नाहीय हे पाहून कच्चा कांदा मागवतो तेव्हा. जैन भाजीसोबत कांदा कसा काय खाल्ला जाऊ शकतो हे भाव त्याच्या नजरेत दिसत असतात. अर्थात रात्रीच्या जेवणात मी कच्चा कांदादेखील खात नाही त्यामुळे असा गोंधळाचा प्रसंग तेव्हा घडत नाही.
लोक प्रत्येकाला एखाद्या समूहात / गटात कोंबण्याचा प्रयत्न करतात. नुसते खाण्याच्याच नव्हे तर इतर सवयींवरून देखील. आता हेच पाहाना काही विशिष्ट धर्माचे लोक दाढी वाढवितात तेव्हा त्यांना तुम्ही असे का करता हे कोणी विचारत नाही. मी मात्र कधी चार आठ दिवस दाढी केली नाही तर माझ्या परिचयातील आणि नव्याने भेटणारे लोक देखील मी असे का करतोय हे आवर्जून विचारतात. अर्थात यामागे अजुनही एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुम्ही किती सोशिक आहात? कारण माझा धाकटा भाऊ देखील अधून मधून असे दाढी वाढविण्याचे प्रयोग करीत असतो पण त्याच्या शरीरयष्टीकडे आणि चेहर्यावरील आवेश पाहून त्याला इतके खासगी प्रश्न विचारण्याची नव्याने भेटणार्या लोकांची तर सोडाच पण पूर्वपरिचितांची देखील हिंमत होत नाही. तूलनेने मी जास्त सहनशील आणि गरीब स्वभावाचा वाटत असल्याने (निदान चेहर्यावरून तरी) मला असे सर्रास (अगदी नवख्य़ा मंडळींकडूनही) विचारले जाते.
तेव्हा एकतर बलवान व्हा किंवा एखाद्या समूहाचा भाग व्हा असाच संदेश आपला समाज आपल्याला देतो. या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहायचा माझा मानस आहे.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 09/14/2011 - 19:21
नवीन
तुम्ही हॉटेलात जाऊन जी ऑर्डर देता त्याची स्पेसिफिकेशन्स पाहून मी हसून हसून लोळत आहे. :)
- Log in or register to post comments
स
साती
Wed, 09/14/2011 - 19:53
नवीन
अर्थात रात्रीच्या जेवणात मी कच्चा कांदादेखील खात नाही
मी हसून हसून लोळत आहे. :)
- Log in or register to post comments
क
कुंदन
Wed, 09/14/2011 - 20:03
नवीन
साती , तु पण ?
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 20:17
नवीन
@ साती आणि अप्पा जोगळेकर,
यात हसण्यासारखे काय आहे? एखाद्याची वैयक्तिक आवडनिवड समूहापेक्षा भिन्न असू शकत नाही का? तरी मी माझ्या खाण्याच्या इतर आवडीनिवडींविषयी काहीच लिहीले नाहीय. माझ्या आवडी निवडींसोबतच विविध लेख व चर्चा या मधून मी आहारात अनेक बंधने व मर्यादा घालून घेतल्या आहेत. या सगळ्या तून filter होऊन माझ्या पोटात जाऊ शकतील असे फारच थोडे पदार्थ उपाहारगृहात उपलब्ध असतात. तरीही मी बिहार, डोंबिवली, अहमदनगर, दिल्ली, चंडीगड, बेळगाव अशा अनेक ठिकाणी बराच काळ वास्तव्य केले आहे आणि कुठेही मला उपास घडला नाही. इतक्या मर्यादांमधुनही मला हवे असलेले पदार्थ बनवून देणारे कुशल आचारी मला भेटले आहेत. मला स्वत:ला तर खाण्याचा एकही जिन्नस बनविता येत नाही.
- Log in or register to post comments
स
साती
Wed, 09/14/2011 - 20:29
नवीन
कुंदन, ते मी रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा खात नाही असे नसून
मी पण 'मी रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा खात नाही ' हे वाचून हसून हसून गडाबडा लोळले असे आहे. :)
(आमच्याकडे कामाला असलेले मुस्लिम कुटुंब रात्री कच्चा कांदा खात नाही - 'हमारी पूरखा जहन्नूम में जातींय जी' असं त्याचं कारण सांगतात ते लोक.)
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 20:41
नवीन
<<(आमच्याकडे कामाला असलेले मुस्लिम कुटुंब रात्री कच्चा कांदा खात नाही - 'हमारी पूरखा जहन्नूम में जातींय जी' असं त्याचं कारण सांगतात ते लोक.) >>
अच्छा, माझंही असंच काही कारण असावं असं वाटून तुम्हाला हसू आलंय की काय?
मी अंधश्रध्द नाहीय. माझं कारण म्हणजे रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा खाल्ला तर बर्याच उशिरापर्यंत झोप लागत नाही, म्हणून मी टाळतो इतकंच....
- Log in or register to post comments
स
साती
Wed, 09/14/2011 - 20:50
नवीन
वो तो जैसे जिसकी सोच. (तारक मेहता का उलटा चष्मा तून साभार)
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
गुरुवार, 09/15/2011 - 06:37
नवीन
चेतनराव,
तुमची बस चुकलीय.. साती का हसली ते तुम्हाला कळले नाही.. बरेच लोक रात्रीच्या जेवनात कच्चा कांदा खात नाही, कारण कच्चा कांदा खाल्ला की तोंडाला (उग्र) वास येतो, रात्री जवळीक साधताना हा वास अडथळा ठरतो, तुम्ही ही गोष्ट निरागसपणे इतकी स्पष्ट लिहीली त्याचे त्यांना हसु आले असावे.
बाकी डोंबिवलीत रहायचात? कुठे?
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 09/15/2011 - 07:33
नवीन
<< बरेच लोक रात्रीच्या जेवनात कच्चा कांदा खात नाही>>
आनंद आहे, मी सगळ्यांपेक्षा वेगळा वागलो तर लोकांना हसू आले तर ते समजण्यासारखे आहे, पण बर्याच लोकांसारखा वागुनही कुणाला हसू येत असेल तर काय समजायचे?
<< कारण कच्चा कांदा खाल्ला की तोंडाला (उग्र) वास येतो, रात्री जवळीक साधताना हा वास अडथळा ठरतो, तुम्ही ही गोष्ट निरागसपणे इतकी स्पष्ट लिहीली त्याचे त्यांना हसु आले असावे.>>
माझे ते कारण नाहीये (I am single). त्यामुळे यावर अधिक चर्चा करीत नाही. Mingle लोक यावर अधिक प्रकाश टाकतीलच.
<< बाकी डोंबिवलीत रहायचात? कुठे? >>
गणपतराव बोडस लॉज मध्ये फेब्रुवारी २००१ ते एप्रिल २००१ दरम्यान.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
गुरुवार, 09/15/2011 - 07:48
नवीन
"मी सगळ्यांपेक्षा वेगळा वागलो तर लोकांना हसू आले तर ते समजण्यासारखे आहे, पण बर्याच लोकांसारखा वागुनही कुणाला हसू येत असेल तर काय समजायचे?"
अहो, हसु आले ते निरागसपणे तुम्ही ते लिहील त्याबद्दल.. एवढ काय मनावर घेता?
"Mingle लोक यावर अधिक प्रकाश टाकतीलच."
रात्रीच्या गोष्टींवर कशाला प्रकाश टाकायचा?
- Log in or register to post comments
क
कुंदन
Wed, 09/14/2011 - 21:09
नवीन
>>रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा खात नाही
यापुर्वीचे काही संदर्भ आठवुन मला हसु आले , बाकी जाणकार उद्या दिवसा उजेडी प्रकाश टाकतीलच.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 09/15/2011 - 18:38
नवीन
अहो हसता काय ? कच्चा कांदा खाउन एक वेगळाच फायदाही होतो तिकडे कानाडोळा करु नका :)
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 09/15/2011 - 18:29
नवीन
यात हसण्यासारखे काय आहे?
तुमचे बरेचसे प्रतिसाद वाचून मला खूप हसायला येत आहे. कृपया एवढे स्वातंत्र्य तरी मला द्यावे.
एखाद्याची वैयक्तिक आवडनिवड समूहापेक्षा भिन्न असू शकत नाही का?
असू शकते.
तरी मी माझ्या खाण्याच्या इतर आवडीनिवडींविषयी काहीच लिहीले नाहीय.
आवर्जून लिहा. मी वाट बघत आहे.
- Log in or register to post comments
प
पांथस्थ
Wed, 09/14/2011 - 20:41
नवीन
+१
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 09/14/2011 - 11:45
नवीन
गुगळे साहेब पुन्हा लिहीते झाले ह्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांच्या वाचकांचे अभिनंदन.
अतिशय संयमित शब्दात मांडणी. विषयाचा असा आवाका हाताळायला एक वेगळ्याच ताकदीच्या लेखकाची गरज असते हे पुन्हा सिद्ध झाले.
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 12:13
नवीन
<< गुगळे साहेब पुन्हा लिहीते झाले ह्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांच्या वाचकांचे अभिनंदन. >>
धन्यवाद प्रसाद साहेब. खरं तर माझ्या लेखाचे वाचक अत्यल्पसंख्य आहेत. त्यातले सर्वात अभ्यासू आणि प्रोत्साहन पर प्रतिक्रिया देणारे म्हणून आपलंच नाव घ्यावं लागेल.
<< अतिशय संयमित शब्दात मांडणी. विषयाचा असा आवाका हाताळायला एक वेगळ्याच ताकदीच्या लेखकाची गरज असते हे पुन्हा सिद्ध झाले. >>
ह्या प्रशंसेबद्दल अतिशय आभार. आता मिपावरील स्वेच्छानिवृत्तीचा विचार रद्द. अजुनही बरंच काही लिहीन..
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 09/14/2011 - 13:01
नवीन
आता मिपावरील स्वेच्छानिवृत्तीचा विचार रद्द. अजुनही बरंच काही लिहीन
अगदी माझ्या मनातल बोलाल्त गुगळे तुम्ही
धर्मावरचा एवढा संयमित लेख .
आपण कुठून हा अभ्यास केलात तेवढ कळल तर नक्की आनंद होईल
बाकी मिपावरच्या टुकार लेखांच्या वावटाळीत आपला लेख चमकून दिसतोय
परत अभिनंदन
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 17:10
नवीन
आपटे,
तुमच्या
<<बाकी मिपावरच्या टुकार लेखांच्या वावटाळीत आपला लेख चमकून दिसतोय
परत अभिनंदन >>
या प्रशंसेचा साभार स्वीकार करतोय.
<< धर्मावरचा एवढा संयमित लेख .
आपण कुठून हा अभ्यास केलात तेवढ कळल तर नक्की आनंद होईल >>
तुमच्या या प्रश्नाचं संक्षिप्त स्वरूपात उत्तर देणं अवघड आहे. त्यासाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. तो मी नक्कीच लिहीणार आणि मिसळपाव वर प्रकाशित करणार, पण त्याकरिता थोडा वेळ लागेल.
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 09/14/2011 - 17:21
नवीन
त्यासाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. तो मी नक्कीच लिहीणार आणि मिसळपाव वर प्रकाशित करणार, पण त्याकरिता थोडा वेळ लागेल.
माफ करा गुगळे लहान तोंडी मोठा घास घेतोय
पण तुमच्या अभ्यासा बाबतचा , अथक मेहनतीचा, तुमच्या कष्टान्वरचा लेख आधी वाचायला आवडेल ...
जमल्यास तो आधी लिहून पूर्ण करावा...
hope u dont mind
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 17:29
नवीन
<< माफ करा गुगळे लहान तोंडी मोठा घास घेतोय
पण तुमच्या अभ्यासा बाबतचा , अथक मेहनतीचा, तुमच्या कष्टान्वरचा लेख आधी वाचायला आवडेल ...
जमल्यास तो आधी लिहून पूर्ण करावा...
hope u dont mind >>
माफी कशाला मागताय, उलट तुम्ही लेख वाचायला उत्सुक आहात म्हणजे माझ्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. पण त्याच काय आहे की... I don't mind, but other readers will mind. कारण पुन्हा पुढचा लेख म्हणजे अनेकांना जिलबीचीच आठवण येणार आणि काहींची तोंडं तर इतकी लहान असतात की त्यांना जिलबी तोंडात घालताच येत नाही. ती पचणं हा तर फार पुढचा भाग आहे.
तेव्हा तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार.
खोळंब्याबद्दल दिलगीर आहे.
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 09/14/2011 - 17:36
नवीन
तेव्हा तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार.
खोळंब्याबद्दल दिलगीर आहे.
नक्की तुम्हाला जेंव्हा जमेल तेंव्हा टाका हरकत नाही
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Wed, 09/14/2011 - 22:12
नवीन
चेतन गुगळे यांचे अभिनंदन. आपण ज्या धर्माचे आहोत त्या धर्मातल्या उणीवा स्पष्टपणे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Tue, 09/20/2011 - 06:57
नवीन
>>तुमच्या या प्रश्नाचं संक्षिप्त स्वरूपात उत्तर देणं अवघड आहे. त्यासाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. तो मी नक्कीच लिहीणार आणि मिसळपाव वर प्रकाशित करणार, पण त्याकरिता थोडा वेळ लागेल.
अच्छा, म्हणजे रिसर्च पेपर करताना लिटरेचर सर्वेवर सुद्धा जसा पेपर होऊ शकतो, तसे करणार आहात तर. व्वाव्वा आनंद आहे. आगे बढो
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 09/14/2011 - 11:51
नवीन
जैन धर्मियांच्या आस्थांबद्दल ते अत्यन्त आग्रही असतात. त्या बाबतीत ते इतरांचा जरादेखील विचार करीत नाहीत.
सोसायटीत एका जैन धर्मिय गृहस्थानी कबुतरांना धान्य खौ घालायला सुरवात केली. त्यामुळे सर्व सोसायटीत कबुतरांचा वावर सुरू झाला. अनेकाना कबुतरांच्या वावराची अॅलर्जी होती ( लहान मुले वृद्ध याना कबुतरांच्या विष्ठेमुळे तसेच पिसांमुळे खोकला/कातडीवर पुरळ वगैरे येणे इत्यादी) या शिवाय सोसायटी घाण होणे . कबुतरांची अंडी कुठेही सापडणे वगैरे प्रकार होतेच.
सदर गृहस्थाना वारंवार सांगूनदेखील त्या गृहस्थांनी त्यांचा कबुतराना धान्य खायला घालण्याचा धार्मिक अभ्यास सोडला नाही. शेवटी सोसायटीत आलेल्या काही इशान्य भारतीयानी कबुतरांचा खाण्यासाठी उपयोग सुरु केल्यानंतर त्याना तो नाद सोदावा लागला.
जैन धर्मीय त्यांच्या वसाहतीत ( सोसायटीत) कांदा लसुण खाणर्या लोकाना जागा देत नाहीत.
माझा एक जैन मित्र त्यांच्या उपास काळात( पर्युषण ) दात देखील घासत नसे. ( त्यामुळे अर्थातच त्याचे फावत असे........... कोणी त्याला काही विचारायच्या भानगडीत पडत नसे).
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 11:58
नवीन
माझ्या लेखात मी जैन बांधवांना अल्पसंख्य म्हंटलंय. अर्थात मिसळपाव वरीलच सुधीर काळे साहेबांच्या लेखावर नितीन थत्ते यांनी दिलेली ही लिंक पाहिली.
http://www.hyderabaddailynews.com/2011/02/05/swiss-bank-indian-account-holders-list-revealed-hyderabadnews-info/
यातली नावे वाचल्यावर इथे मात्र जैन बांधव बहुसंख्य असल्याचे दिसून आले. अर्थातच या बद्दल त्यांचा (म्हणजे यादीतील जैन बांधवांचा) निषेध.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Wed, 09/14/2011 - 12:03
नवीन
लेख आवडला.
- Log in or register to post comments
प
प्रास
Wed, 09/14/2011 - 12:38
नवीन
लेख चांगला लिहिला गेला आहे.
तुमचे असे वर्मावर योग्य भाषेत बोट ठेवणारे लेख वाचायला मिळोत अशी पार्श्वनाथाचरणी मागणी....
मिपातले वल्ली एकदम गुणग्राहीच बुवा...! त्यांचेही आभार....!
- Log in or register to post comments
म
मन१
Wed, 09/14/2011 - 13:25
नवीन
पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत.
खरच?? बोकड कापण्याच्या दोन पद्धती प्रामुख्याने भारतात आहेत. "झटके का" आणि "हलाल का". कट्टर शीखांना
"झटके का" हा प्रकारच लागतो. म्हणजे बोकड कापायची अशी पद्धत ज्यात एका झटक्यात बोकडाची मान कापली गेली आहे. ह्या उलट कट्ट्रर्/धार्मिक मुस्लिम हे फक्त "हलाल" असणारेच चिकन्-मटन तत्सम पदार्थ खातात. माझा लंडनमधील मुस्लिम रूममेट सहाच्या सहा महिने फक्त शाकाहारी खायचा. कारण? तिथे जवळपास त्याला "हलाल" शॉप सापडला नाही. पुरेशी मुस्लिम वस्ती आसलेल्या भागात "हलाल शॉप" ह्यानावाची चिक्कार दुकाने दिसतात. ती "मुस्लिम मांसाहार" ह्याच अर्थाची असतात. ब्रांड तिथेही आहेच. खास धार्मिक मुस्लिम मनाला न दुखावता ब्यांकिंग करता यावी म्हणुन जगभरात खास ब्यांकिंग मधील एक नवी शाखा जन्माला घालण्यात आली."Islamic Banking" ह्या नावाने. तत्वतः ह्यात व्याज घेतले जात नाही, इस्लामला मान्य नाही म्हणुन! धार्मिक भावना जो तो आपल्या परीने जपतो. त्यात काही गैरही नाही. ज्यु/यहुदी लोकांचेही फारच कडक नियम आहेत खाण्या-पिण्याचे. तेही अनेकदा बाहेर मांसाहार करणे टाळतात, त्यांच्या घरी/खाजगीत शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेले मात्र आवडीने खातात.
ह्या नियमांना बहुतेक ज्यू "कोशूर" म्हणतात.Orthodox christian का Trinitty Church followers ह्यांचेही खाण्यापिण्याचे नियम ज्यूंसारखेच आहेत. जैन आणि बौद्धेतर हिंदुबद्दल तर काय बोलावे? "Only Veg" आणि "pure Veg" हे शब्द काही उच्चवर्णीय हिंदुंमुळेच हॉटॅलांच्या पाट्यांवर झळकतात. भारताबाहेर restaurant हे restaurantच असते. त्यात pure veg वगैरे प्रकार नाही. थोडक्यात , हिंदु, शीख्,मुस्लिम्,ख्रिश्चन्,ज्यू हे सगळेच आपापल्या पद्धतीने मेन्यु ठेवायला लावतात. फक्त ते जैनांसारखे थेट नाव वापरत नसावेत.
त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत.
भरपूर आहेत. इस्लाम खान, शेख इस्लाम अशी कित्येक नावे सापडतील. ख्राइस्ट/christ हे अत्यंत सामान्य आडनाव आहे हो. हिंदुंमध्ये नुस्ता "हिंदु" असून कामाचा नाही. इथली आयडेंटिटि ठरते जात्/वर्ण्/व्यवसाय ह्यावरुन. ह्यामुळेच ठाकुर, माळी,सुतार अशी जातीवाचक नावे सापडतात.
जसे की, जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. हिंदू ह्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता मला जैनेतर कुठल्याही धर्माचा कुठल्या ही उद्योगाकरिता फारसा वापर केल्याचे आढळलेले नाही.
पुन्हा तेच. आहेत हो. इतरांचेही आहेत. आख्खा "इस्लामी बाँब" नावाचा एक ब्रांड आपल्या लाडक्या शेजार्याने बनवलाय.
जैनांनी आपल्या धर्माला (म्हणजे फक्त जैन या शब्दाला) अशा प्रकारे आपल्या रोजच्या व्यवहारातील पदार्थांना, स्वत:च्या नावाला, उद्योगाच्या नावाला जोडून त्याचा उच्चार जास्तीत जास्त वेळा कानावर पडेल अशी व्यवस्था करून ठेवलीय. डिसेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००० दरम्यान मी बिहार मधील एका अतिशय प्रसिद्ध अशा जैन धर्मीयांच्या सामाजिक संस्थेत दोन महिने काम केले होते, त्यावेळी माझ्या पाहण्यात असे आले की तिथल्या जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॆमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डीजीटल कॆमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डीजीटल कॆमेरा अतिशय महाग - साधारणत: रू.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते.
काही ठिकाणी डुकराची आणि गायीची कातडी वापरणे अपरिहार्य असायचे किंवा व्यवहार्य असायचे. पण काही जैनेतर धर्मीयांनी ती साधने बदलवायला लावली. आहेत तशी वापरायला नकार दिला.
अशा प्रकारे आपल्या धर्मातील तत्वांचे अनुसरण करण्यात हा धर्म अतिशय काटेकोर असल्याचे इतरही अनेक प्रसंगी दिसून येते. उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तिंना आपल्या वसाहतीत जागा न देणे,
काही जैनेतर हिंदु जातींमध्येही सोसायट्यांमध्ये मांसाहार चालत नाही. ह्यामुळेच एक केस झाली:- मुंबै मराठी माणसाची आहे, तिथल्या पारंपारिक रहिवाशी आगरी,कोळी,भंडारी,मच्छिमार ह्या समाजाची आहे असं त्याचं म्हणणं. पण ह्या समाजातल्या लोकांना काही शाकाहारी उच्चभू सोसायट्यात जागा दिली गेली नाही. हेडलाइन आली:-
"मुंबैतल्या गुजराती सोसायट्यात मराठी माणसाला मज्जाव!"
महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे, तसेच हा अथवा इतर कोणताही जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्याच्या आहूतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. (खरे तर हे सायकल ने ट्रक ला "मला वाट देण्याकरिता बाजूला हो" असे सांगितल्या सारखे वाटते. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.)
हे आजच समजले.
आता या सगळ्या गोष्टींमुळे जैन धर्माची तत्त्वे या समाजात अगदी खोलवर रुजली आहेत असा भास होतो. पण यातला फोलपणा जाणवून देणार्या काही गोष्टी मला इथे मांडाव्याशा वाटतात.
ही लाइन अशाच उदारहरणांसकट इतर सर्व धर्मांना लागु होते. टंकायचा कंटाळा आलाय आता.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 09/14/2011 - 15:57
नवीन
वुडहाऊसचं पुलंनी उद्धृत केलेलं वाक्य आठवतं.... 'मी असा घाऊक द्वेष कधीच करत नाही'.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/14/2011 - 19:09
नवीन
हिंदूराव हे नाव मराठी समाजात एकेकाळीतरी असायचं. हिंदू देवदेवतांची नावं ठेवण्याचीही पद्धत आहेच, माझं टोपणनाव, अदिती, हे त्याचंच एक उदाहरण.
जैन जेवण कधीमधी खायला आवडतं त्यामुळे त्याबद्दल काय तक्रार करायची? हृदरोग्यांसाठी, मधुमेहींसाठी वेगळं जेवण मिळतंच. अनेकदा विमानांमधे "भारतीय शाकाहारी" जेवण मिळत असल्यामुळे न आवडणारे खाद्यप्रकार नाईलाज म्हणून मला पोटात ढकलावे लागत नाहीत याचा आनंद होतो.
मुंबईतला देवनार कत्तलखाना कोणत्यातरी हिंदू सणाला बंद ठेवण्याची धमकीवजा विनंती असण्याची बातमी अलिकडे वाचली होती. त्याच दिवशी का दुसर्या दिवशी ईद होती.
दोन जैन बांधव माझे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. मित्र बर्यापैकी धार्मिक असून तो कांदा, लसूण, बटाटा इ खायचा नाही. पण आपण 'प्योर व्हेज' रेस्तराँमधेच जावं, इतरांनी आपल्याबरोबर बसून नळ्या ओरपू नयेत असा काही त्याचा आग्रह नसायचा. एक-दोनदा बटाटावडा वगैरे त्याने खाल्ले होते, पण मुद्दाम असं नाहीच. मैत्रीण धार्मिक म्हणता येणार नाही, पण सवयीमुळे तिला अनेक खाद्यपदार्थ आवडत नाहीत. मला तरी मटणातली गंमत कुठे समजते!
तुम्ही ज्या धर्मात जन्माला आला आहात त्यावरच टीका केलीत, इतर धर्मांवर नाही, याची थोडी मौज वाटली. हिंदू पालकांच्या पोटी आलेल्यांनी हिंदू धर्मातल्या न पटणार्या गोष्टींवर टीका केली तर अनेकदा त्यांच्यावर टीका होते ती काहीशी अशी असते, "त्या विशिष्ट धर्माततर आपल्यापेक्षा जास्त बुरसटलेपण आहे, त्यांच्याबद्दल बोला की!"
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 19:58
नवीन
तुमच्या प्रतिक्रियेत तुम्ही बरेच मुद्दे मांडलेत आणि काही किस्से ही लिहीलेत. त्याचा मतितार्थ मला जाणविला तो असा - की माझ्या लेखात मी जैन धर्मातल्या ज्या बाबींवर टीका केलीय त्या फारशा गंभीर नाहीत, त्याचप्रमाणे त्यांचा समाजाला फारसा त्रास होत नाहीय. हा एक प्रकारचा सौम्यसा उपद्रव आहे.
तुम्हाला अशाच प्रकारचं काहीसं मत मांडायचं असेल तर मी त्या बाबत सहमत आहे. तुमच्या प्रतिक्रियेतलं दुसरं विधान
<< तुम्ही ज्या धर्मात जन्माला आला आहात त्यावरच टीका केलीत, इतर धर्मांवर नाही, याची थोडी मौज वाटली. >>
याविषयी इतकंच सांगेन की ज्याला समाजातल्या नकारात्मक गोष्टींवर टीका करायची आहे त्याने प्रथम आपल्या घरातल्या नकारात्मक गोष्टींचाही निषेध करावा, म्हणजे त्याचा हेतू biased नसल्याची खात्री पटते व समाजातले इतर घटक त्याने त्यांच्यावर केलेल्या टीकेला देखील सकारात्मक पद्धतीने घेतात. (मला वाटतं माझ्या या वाक्यांवरून माझ्या मिपावर प्रकाशित होणार्या भावी लेखांची दिशाही तुम्हाला नक्कीच कळली असेल).
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/14/2011 - 20:34
नवीन
जैन धर्मातल्या उपद्रवी गोष्टींना विरोध करताना जैन लोकांना सरसकट विरोध करू नये असं माझं मत आहे. उपद्रवी गोष्टी आणि उपद्रवी माणसं सगळ्यांच धर्मांमधे थोड्याबहुत फरकाने आहेत.
१००% सहमत आहे. कधीमधी अशा प्रतिक्रिया दिसतात म्हणून मुद्दामच तुम्ही स्वतःच्या धर्मावर टीका केलीत याची कौतुकास्पद मौज वाटली.
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 21:15
नवीन
<< जैन धर्मातल्या उपद्रवी गोष्टींना विरोध करताना जैन लोकांना सरसकट विरोध करू नये असं माझं मत आहे. >>
नक्कीच. Don't hate in plurals हे तत्व मी ही जाणतो आणि मानतो. मी फक्त त्या धर्माच्या काही अनुयायांवर टीका केलीय. तेही असे अनुयायी की जे ही तत्त्वे इतर धर्मीयांनाही पाळायला लावतात पण स्वत: त्या तत्त्वांची पायमल्ली करतात किंवा एखादा स्वधर्मबांधव तशी पायमल्ली करीत असेल तर त्याला आवरत नाहीत.
तुम्ही ज्या अशा प्रकारच्या http://www.misalpav.com/node/17682#comment-307725 प्रतिक्रियांचा उल्लेख करीत आहात त्या प्रकारच्या प्रतिक्रिया या धाग्यावर दिसणे जवळपास अशक्य. कोणता जैन बांधव आता मिसळपाव वाचून त्यावरच्या लेखांना प्रतिक्रिया देत बसणार? एकतर आम्ही अत्यल्पसंख्य त्यातून बहूतेक सारे शेट नोटा मोजत बसले असणार. माझ्यासारखा एखादाच अपवाद. अशा प्रकारे संकेतस्थळावर अमुल्य वेळ वाया घालविणे (ज्या वेळेत पैसा कमविला जात नाही तो वेळ वाया ही त्यांची साधी सोपी सरळ व्याख्या) त्यांना जमणारच नाही. असल्या टीकेने जोपर्यंत त्यांचे आर्थिक नुकसान होत नाही तोपर्यंत ते ढुंकूनही बघणार नाहीत.
त्याशिवाय ही जैन धर्मा्च्या अनुयायांवरील एकत्रित टीका आहे त्यातल्या कुठल्या विशिष्ट पंथा / गटाविषयी नाही.
ज्या समाजात वर्णभेद आहेत तिथे त्या धर्माच्या एखाद्या सदस्याने धर्मावर टीका केली तर ती सरळ सरळ तळाच्या वर्णातील माणसाने शिखराच्या वर्णातील माणसावर केलेली टीका समजली जाते (कारण ह्या शिखरस्थानी असलेल्या वर्णाची मंडळीच धर्माची ध्येय धोरणे ठरवितात) आणि मग शिखरावरच्या माणूस त्या टीकेला व्यक्तिगत घेतो. बरे तो प्रत्युत्तरादाखल तळच्या वर्णातील लोकांवर टीका करू शकत नाही (कायदा आड येतो). अशा वेळी तो divert करतो सरळ सरळ दुसर्या धर्मावर. आणि बरेचदा तसे करणे हा त्या च्या आवडीचा भागही असू शकतो.
तुम्ही ज्या प्रतिक्रियेचा संदर्भ दिला आहे, तिथे त्या प्रतिक्रिया कर्त्याने सरळ सरळ पर धर्मातल्या बाबींचा उहापोह केला आहे. पुन्हा शेवटी लिहीलेय की हा माझा आवडीचा विषय आहे.
आता जरा कल्पना करा. माझ्या लेखात मी जैन धर्मावर टीका केलीय म्हणून चिडून जाऊन दुसरा एखादा जैन बांधव परधर्माला वादात खेचेल हे कसे शक्य आहे? कितीही केले तरी जैन हे अत्यल्पसंख्य आणि ते तसेच राहणार. त्यांना इतरांना वादात ओढण्यापुर्वी दहादा विचार करावा लागेल. दुसरे असे की या टीकेमुळे जैन बांधव समजा चिडलेच तरी तीव्र मार्ग अनुसरू शकत नाही (धर्मच परवानगी देत नाही, चिडून बोलणे - अपशब्द वापरणे हे देखील जैन धर्मात निषिद्ध आहे - काया वाचा इतकेच काय मनानेदेखील कुणाची हिंसा करु नये असे जैन धर्म सांगतो). मुख्य म्हणजे चिडणार कोण? जैन धर्मात वर्णभेद नाही. अमूक एक वर्ण मोठा अमूक एक लहान असा प्रकार नाही. आमच्यात अनौपचारिक रीत्या दोनच गट पडतात - एक धनवान आणि दुसरे गरीब (हा अत्यल्पसंख्य जैन समाजातला अपवादात्मक रीत्या आढळणारा अति अत्यल्पसंख्य गट आहे.) मी या दुसर्या गटात मोडतो. दुसर्या गटातले लोक अशी टीका होण्याकरिता जबाबदार नाहीत. पहिल्या गटातले लोक असलं काही वाचण्याच्या भानगडीतच पडत नाहीत.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/14/2011 - 21:27
नवीन
:-)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »