Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धर्माच्या नावाचे ब्रॆन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...

च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/14/2011 - 11:06
💬 120 प्रतिसाद
जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रॆंड आहे. होय हा ब्रॆंड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॊटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत. पण राजीव जैन, राकेश जैन, महावीर जैन, अशोक जैन असे अनेक जैन बांधव माझ्या परिचयाचे आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या उद्योगांना नाव देतेवेळी जैन शब्दाचा प्रकर्षाने वापर केला गेला आहे - जसे की, जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. हिंदू ह्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता मला जैनेतर कुठल्याही धर्माचा कुठल्या ही उद्योगाकरिता फारसा वापर केल्याचे आढळलेले नाही. जैनांनी आपल्या धर्माला (म्हणजे फक्त जैन या शब्दाला) अशा प्रकारे आपल्या रोजच्या व्यवहारातील पदार्थांना, स्वत:च्या नावाला, उद्योगाच्या नावाला जोडून त्याचा उच्चार जास्तीत जास्त वेळा कानावर पडेल अशी व्यवस्था करून ठेवलीय. डिसेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००० दरम्यान मी बिहार मधील एका अतिशय प्रसिद्ध अशा जैन धर्मीयांच्या सामाजिक संस्थेत दोन महिने काम केले होते, त्यावेळी माझ्या पाहण्यात असे आले की तिथल्या जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॆमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डीजीटल कॆमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डीजीटल कॆमेरा अतिशय महाग - साधारणत: रू.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते. अशा प्रकारे आपल्या धर्मातील तत्वांचे अनुसरण करण्यात हा धर्म अतिशय काटेकोर असल्याचे इतरही अनेक प्रसंगी दिसून येते. उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तिंना आपल्या वसाहतीत जागा न देणे, महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे, तसेच हा अथवा इतर कोणताही जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्‍याच्या आहूतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. (खरे तर हे सायकल ने ट्रक ला "मला वाट देण्याकरिता बाजूला हो" असे सांगितल्या सारखे वाटते. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.) आता या सगळ्या गोष्टींमुळे जैन धर्माची तत्त्वे या समाजात अगदी खोलवर रुजली आहेत असा भास होतो. पण यातला फोलपणा जाणवून देणार्‍या काही गोष्टी मला इथे मांडाव्याशा वाटतात. १. परवाच वीसीडीवर २०१० चा अतियशस्वी चित्रपट राजनीती पाहत होतो. चित्रपट जास्त कंटाळवाणा होता की त्यात ठराविक अंतराने सतत त्रस्त करणार्‍या अल कबीर च्या जाहिराती जास्त कंटाळवाण्या होत्या हे काही मी ठरवू शकलो नाही. या अल कबीर ला इतके वर्ष जाहिरातीची फारशी गरज कधी पडली नव्हती आणि तरी देखील हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याच्या भागीदारांपैकी सर्वात मोठा भागीदार हा जैन धर्मीय आहे. (संदर्भ: http://visfot.com/index.php/jan_jeevan/477.html). म्हणजे जैनांच्या नेहमीच्या सवयीनुसार या कत्तलखान्याच्या नावात जैन शब्द असायला हवा होता पण ते गैरसोयीचे असल्याने तसे केले गेलेले नाही. २. पुण्यातील आकुर्डी येथे एक जैन स्थानक (जैन धर्मीयांचे प्रार्थना स्थळ) आहे. या स्थानकाच्या १०० मीटर परिसरात एक परमीट रूम उघडण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मद्य विकण्यास कायद्याने परवानगी नाही तरीही असे राजरोसपणे चालु आहे कारण या स्थानकाच्या विश्वस्तांपैकीच एक जण हा त्या परमीट रूमचा देखील भागीदार आहे. यावर कडी म्हणजे या परमीट रूमला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा स्थानिक नगरसेवक मुस्लिम धर्मीय आहे. या दोन अतिशय प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. माझा मुख्य आक्षेप असा आहे की, जैन बांधव आपल्या धार्मिक तत्त्वांचे जिथे तिथे गोडवे गात फिरत असतात. इतरांनाही अहिंसा, सदाचार व शाकाहाराचा संदेश देतात (ज्याविषयी माझी काहीच हरकत नाही), पण मग त्यांनी वरील दोन घटनांचा तीव्र विरोध व जाहीर निषेध का केला नाहीय? जैन लोकांचे प्रसारमाध्यमात व समाजाच्या इतर क्षेत्रांमध्येही लक्षणीय प्राबल्य आहे; त्याचा उपयोग करून ते मनात आणले तर आपल्या बांधवांकडून घडणार्‍या अशा गोष्टी निश्चितच थांबवू शकतात. मला हे ठाऊक आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांपैकी काही जण अशा प्रकारे चूकीचे आचरण करत असतील पण जेव्हा आपण परधर्मीयांच्या अशा आचरणाचा निषेध करतो तेव्हा प्रथम स्वधर्माच्या लोकांकडून असे काही घडत नाहीयना याची खात्री करून घ्यायला हवी आणि तसे घडत असेल तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वत: एक जैन धर्मीय या नात्याने या लेखनाद्वारे करीत आहे. http://beftiac.blogspot.com/2010/10/blog-post_08.html
प्रतिसादांना उत्तरे देण्याकरिता पुरवणी लेखन
या लेखाच्या प्रतिसादात अनेकांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या प्रतिसादांना तिथल्या तिथे उत्तरे देण्याचा मी कमाल प्रयत्न केला आहे. अर्थात अनेक वाचकांच्या प्रतिसादात काही मुद्दे पुन्हा पुन्हा आले आहेत. त्या सर्वांना त्या त्या ठिकाणी एकसारखी प्रत्युत्तरे देण्यापेक्षा अशा मुद्यांना या लेखातच उत्तरे द्यावी या उद्देशाने हे पुरवणी लेखन करीत आहे. या पुरवणी मजकूराच्या वर असणार्‍या मूळ लेखात कोणतेही संपादन केलेले नाहीय. १. अनेकांनी जैन धर्मीयांच्या कट्टरपणाचा, विखारीपणाचा, तसेच त्यांच्या आचरण व शिकवणूकीतील विसंगतींचा मुद्दा मांडला आहेत. याबद्दल एक उदाहरण द्यावेसे वाटते. काही वर्षांपुर्वी हिंसक प्रचार करणार्‍या एका धार्मिक नेत्याला जैन धर्मीयांच्या दादावाडी (पुणे) मंदिरात आमंत्रण दिले गेले होते व ते जैन मंदिरात आले देखील होते. http://articles.timesofindia.indiatimes.com/keyword/jain-temple/featured/4 अशा लोकांना बोलवायचे असेल तर एरवी अहिंसेचे गोडवे गाण्यात तरी काय अर्थ आहे? २. जैन ब्रॅन्डींगची मी बरीच उदाहरणे दिली होती पण त्यातील प्रामुख्य़ाने खाण्याच्याच बाबींची चर्चा झाली. अनेकांनी अशा प्रकारे जैन धर्मीयांना साजेसे अन्नपदार्थ हॉटेला त उपलब्ध करून देण्यात काहीच गैर नसल्याचे म्हंटले आहे. मलाही यात काही गैर आहे असे म्हणायचे नव्हतेच. मला स्वत:ला देखील माझ्या आवडीप्रमाणे हॉटेलात अन्न उपलब्ध असावे असे वाटतेच. आक्षेप आहे तो अशा पदार्थांच्या नावामागे जैन हा शब्द लावण्यास. कारण यातून बरेच गैर समज निर्माण होतात. उदाहरणार्थ - जैन पावभाजी - आता या पावभाजीत कांदा, लसूण, बटाटा आदी पदार्थ नसतात हे खरे. परंतू तरीही तिला जैन पावभाजी संबोधणे चूकीचेच आहे. जैन धर्मीयांच्या अन्नग्रहणाच्या काटेकोर नियमानुसार पाव देखील जैन आहारात समाविष्ट होऊ शकत नाही. तो किण्वन प्रक्रियेने बनतो व त्यात जंतुंची वाढ होत असते. याप्रमाणेच जैन पिझ्झा हा देखील खर्‍या अर्थाने जैन आहार होऊ शकत नाही. पण गंमतीचा भाग असा की बाजारात मिळणारे बहुतेक सर्व पदार्थ खाण्याची इच्छा तर असतेच, त्याचवेळी आपण धर्म पाळतो असेही दाखवायचे असते मग त्या पदार्थात थातुर मातुर बदल करून त्याच्यामागे जैन उपाधी चिकटवून हादडणे चालु होते. आता इतके जैन पदार्थ बाजारात मिळत आहेत की जैन मांस व जैन अंडी देखील मेन्यूकार्ड मध्ये विराजमान होतात की काय अशी शंका वाटू लागली आहे. याबाबत मॅगी टोमॅटो सॉस उत्पादकांकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी त्यांच्या सॉसमध्ये कांदा व लसुणाशिवायचा देखील एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे, परंतू त्यावर जैन सॉस असे न लिहीता सॉस विदाऊट ओनिअन ऍन्ड गार्लिक असे लिहीले आहे. ३. मी लेखात निवडलेल्या बाबी फारशा त्रासदायक नाहीत असाही काहींचा आक्षेप होता. हे मलाही मान्य आहे. परंतु एक लक्षात घ्या की एक जैन धर्मीय म्हणून जगताना मी आमच्या धर्माच्या साधु साध्वींचे अतिशय कडक नियम पाहिले आहेत. हे लोक किती क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करतात हे कदाचित आपणास ठाऊक नसेल म्हणून त्याबद्दलची ही उदाहरणे इथे मांडू इच्छितो - स्थानक या प्रार्थना स्थलात ध्यान करतेवेळि इलेक्ट्रॉनिक घड्याळ वापरू नये कारण त्यातील विद्युत प्रभावा मुळे सुक्ष्म जीवांची हत्या होते, नळाचे वाहते पाणी वापरू नये कारण या प्रवाहामुळे सुक्ष्म जीवांची हत्या होते, इत्यादी. असे अजब तर्कशास्त्र रोजच्या व्यवहारातील गोष्टींना लावले जाते. इतकेच नव्हे तर जैन धर्मीयांच्या धार्मिक / सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे इतर धर्मीय झाडुवाले, वाहनचालक आदी आर्थिक दृष्ट्या निम्नस्तरावर असलेल्यांना गोड बोलुन मांसाहार वर्ज्य करण्याच्या शपथा घ्यायला लावल्या जातात. अशा प्रकारे इतरांच्या गळी आपले धार्मिक आचरण उतरवून त्यांना बाटविणारे आमचे हे समाजधुरीण आमचाच एखादा बांधव कत्तलखाना / मद्यालय अशा व्यवसायांमध्ये सक्रिय असतो तेव्हा त्याला खडसावून जाब का विचारीत नाहीत याचा मला राग येतो. तीन वर्षांपूर्वी शिरूर स्थित एका गुटखा व्यापार्‍याच्या कन्येने नऊ दिवस उपवास केले होते त्याचा मोठा समारंभ पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या समारंभात जैन साध्वींनी सदर कन्यारत्नाचे कौतुक केलेच परंतू तिच्या गुटखा किंग पित्याची देखील सामाजिक बांधिलकी जपणारे व्यावसायिक असे म्हणत तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. देणगी मिळते म्हणून असे मिंधे आचरण करणार्‍या साधु साध्वींचा मला जराही आदर वाटत नाही.

प्रतिक्रिया द्या
29442 वाचन

💬 प्रतिसाद (120)
म
मन१ गुरुवार, 09/15/2011 - 06:12 नवीन
@राजेश:- जर्मनांबद्दल वुडहाउसनं ते वाक्य म्हटलं होतं; त्यांच्या नजरकैदेत राहिल्यानंतरसुद्धा. @अदितीबै :- हिंदुराव हा मराठी All Time Classic म्हणुन गणल्या जाणार्‍या सामना चित्रपटातला खलनायक आहे.(निळु फुले.) बाकी आमच्या रूम मेट्स पैकीही ६०% जैन आहेत. बाकी हे "जैन धर्मातल्या उपद्रवी गोष्टींना विरोध करताना जैन लोकांना सरसकट विरोध करू नये असं माझं मत आहे. " वाक्य वाचुन "विरोध ब्राह्मण्याला करा, बाह्मणांना नाही" ह्या बाबासाहेबांच्या वाक्याची आठवण झाली. @चेतन सुभाष गुगळे तुमची दुसर्‍या क्रमांकाची प्रतिक्रिया काही समजली नाही बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 09/15/2011 - 07:38 नवीन
वाक्ये copy paste करून टाकलीत तर मला स्पष्टीकरण देता येईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
न
नगरीनिरंजन गुरुवार, 09/15/2011 - 01:57 नवीन
>>तुम्ही ज्या धर्मात जन्माला आला आहात त्यावरच टीका केलीत, इतर धर्मांवर नाही, याची थोडी मौज वाटली. हिंदू पालकांच्या पोटी आलेल्यांनी हिंदू धर्मातल्या न पटणार्‍या गोष्टींवर टीका केली तर अनेकदा त्यांच्यावर टीका होते ती काहीशी अशी असते, "त्या विशिष्ट धर्माततर आपल्यापेक्षा जास्त बुरसटलेपण आहे, त्यांच्याबद्दल बोला की!" बर्‍याचदा दुसर्‍या धर्मातल्या घडामोडींवर काढलेल्या धाग्यावर "त्यांना काय नावं ठेवता? आपल्या धर्मात पाहा अमुकतमुक आहे" असा तुम्ही म्हणता त्याच्या उलट प्रकार पाहण्यात येतो. स्वधर्मावर टीका करायची तर आधीच स्वतंत्र धागा काढून का केली जात नाही हे अनाकलनीय आहे. कदाचित काही लोकांना प्रतिसाद हाच एक सर्वोत्तम लेखनप्रकार वाटत असेल किंवा प्रतिक्रियात्मक विचार करण्याची सवय असेल. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मन१ गुरुवार, 09/15/2011 - 06:16 नवीन
""त्यांना काय नावं ठेवता? आपल्या धर्मात पाहा अमुकतमुक आहे"" हे वाक्य मला उद्देशून नसावे. मी मुस्लिम, ख्रिश्चन,शीख्,ज्यू आणि हिंदु ह्या सगळ्यांचाच उल्लेख केलाय. "आप्ल्या धर्मात" म्हणजे मी ज्या धर्मात आहे त्या एकाच धर्माचा उल्लेख केलेला नाही. उच्च दर्जाचा लेख मला लिहिता येत नाही हे मान्य आहे. पण प्रतिक्रियात्मक विचार करण्यातही काही चूक वाटात नाही. शेवटी विचार करणं आणी मांडणं हेही महत्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन गुरुवार, 09/15/2011 - 06:59 नवीन
>>हे वाक्य मला उद्देशून नसावे तुम्हाला उद्देशून नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
य
योगप्रभू Mon, 09/19/2011 - 16:43 नवीन
<<हिंदू देवदेवतांची नावं ठेवण्याचीही पद्धत आहेच, माझं टोपणनाव, अदिती, हे त्याचंच एक उदाहरण.>> किंचित सुधारणा. अदिती हे वैदिक संस्कृतीतील देवतेचे नाव. वैदिक काळात भग, इंद्र, वरुण, उषा, दक्ष, मरुत, अर्यमा, सोम, अश्विनीकुमार अशा ज्या देवता होत्या त्यात अदिती ही पण होती. पुढे याच वैदिक धर्माचे रुपांतर/नामांतर हिंदू झाले आणि देवतांची संख्याही वाढली. अदिती या देवतेला 'देवमाता' म्हणूनही गौरवले आहे. अदिति र्द्यौ रदितिरन्तरिक्ष मदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वदेवा अदिति: पंचजना अदितिर्जात मदितिर्जनित्वम् (अदिती हाच द्युलोक, अदिती हेच अंतरीक्ष, अदिती हीच माता आणि तोच पिता. ते सर्व देव अदितीच आहे. पाची मानवसमूह अदितीच आहे. फार काय जन्मलेले सर्व व जन्मायचे सर्व काही अदितीच आहे) बघा म्हणजे ऋषीमुनी पण अदितीमातेला किती वचकून असत :) आता थोडेसे या धाग्याबद्दल. जैन पावभाजी किंवा जैन भोजन या नावाने अस्वस्थ होण्याचे कारण नाही. पूर्वी थेट जाती/धर्मावरुन उल्लेख होत असत. शंकर हिंदू हॉटेल, भंडारी खानावळ, मराठा खानावळ, उडपी खानावळ, पंजाबी ढाबा अशा पाट्या असत. सुरवातीच्या काही उपाहारगृहांवर 'ब्राह्मणी पदार्थ मिळणेचे आहारगृह' अशी पाटीही असे. चिंचगुळाच्या गोड्या आमटीला, तसेच त्याच्या काळ्या मसाल्याला 'ब्राह्मणी मसाला' म्हणून ओळखत होतेच. माझे एक आवडते लोणचे 'पारसी अचार (पारसी पिकल) आहे. आज ही स्टाईल थोडी मागे पडली आहे, पण विशिष्ट प्रांतांच्या नावाने पाककृती ओळखल्या जातातच. व्हेज कोल्हापुरी, फिश गोवन करी, मालवणी मसाला, कच्छी बिअर, काश्मिरी पुलाव, चिकन चेट्टीनाड, रशियन सलाड, फ्रेंच फ्राईज... यादी लांबवता येईल. पक्ष्यांनाही आम्ही हौसेने जातीवरुन नावे दिली आहेत. ब्राह्मणी मैना, शिंपी, सुतार, खाटिक, कधी कधी आडनावांत पण गंमत होते. ब्राह्मणकर आडनावाचा माणूस जातीने ब्राह्मण नसतो आणि मराठे आडनावाचा माणूस मात्र चित्पावन ब्राह्मण. :) धर्म, विचार, आहार अशा अनेक बाबींत कट्टरता ठेवल्यास माणूस अनेक आनंदांना पारखा होतो, हे माझे मत. दुटप्पी, ढोंगी आणि स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा घात करण्यास मागेपुढे न पाहाणारे लोक मला अगदी प्रत्येक धर्म/जातीत दिसले आहेत. जैन पंथाचाही अपवाद नाही, पण सर्वसाधारणपणे जैन समाजबांधव मला आवडतात. त्यांच्या उद्यमी वृत्तीचे कौतुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अप्पा जोगळेकर Wed, 09/14/2011 - 19:30 नवीन
सविस्तर प्रतिसाद आवडला. "Only Veg" आणि "pure Veg" हे शब्द काही उच्चवर्णीय हिंदुंमुळेच हॉटॅलांच्या पाट्यांवर झळकतात. भारताबाहेर restaurant हे restaurantच असते. त्यात pure veg वगैरे प्रकार नाही. आजवर हे कधी लक्षातच आलं नाही. एक वेगळाच मुद्दा मांडल्याबद्दल आभार. मांसाहार करणार्‍या जातीच्या लोकांनासुद्धा उपासाच्या दिवशी किंवा श्रावणामध्ये मिश्राहारी किचनमध्ये बनले शाकाहारी जेवण चालणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
च
चित्रगुप्त Wed, 09/14/2011 - 13:05 नवीन
जैन लोक मुके प्राणी व गरीब लोक यांचेविषयी अतिशय सहानुभूतीपर व्यवहार करत असतात, याचे एक वाचनात आलेले उदाहरणः कलकत्त्यातील धनाढ्य व्यापारी पूर्वी आपल्या प्रशस्त हवेल्यांच्या अंगणात शेकडो खाटा टाकून त्यावर पैसे देऊन गरीब लोकांना झोपायची व्यवस्था करत, ( हल्लीचे ठाऊक नाही) कारण त्यांना रात्रभर जितके डास चावतील, तितके मुक्या प्राण्यांना अन्नदान करण्याचे पुण्य हवेलीत मच्छरदाणीत झोपणार्‍या शेठजींना मिळत असे. शिवाय, एरव्ही सडकेवर झोपावे लागणार्‍यांना व्यवस्थित खाटेवर झोपायला देण्याचे, व आर्थिक मदत करण्याचे पुण्य वेगळेच. यातही स्पर्धा चालायची, म्हणजे सर्वात जास्त खाटा जो टाकवेल तो सर्वात मोठा, वगैरे.
  • Log in or register to post comments
ज
जाई. Wed, 09/14/2011 - 13:32 नवीन
चांगल लिहीलय. अजूनही काही मूद्दे हवे होते अस वाटतय. अर्थात हे माझे मत आहे. don't mind. :)
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 09/14/2011 - 16:05 नवीन
धन्यवाद. << अजूनही काही मूद्दे हवे होते अस वाटतय.>> हा लेख सर्वंकष व सर्वसमावेशक नाही हे मान्य... पण या विषयावर चर्चा सुरू करण्यापुरता प्राथमिक पातळीवरचा तरी आहे असे मानण्यास निदान काही हरकत नसावी. मला कळलेल्या इतरही काही मजेदार बाबींपैकी एक उदाहरण :- समान नागरी कायद्याचा व विशेषत: सर्वधर्मीयांकरिता द्विभार्याप्रतिबंधक कायद्याचा आग्रह जास्त करून एका विशिष्ट धर्माला मनात धरून केला जातो , पण एकाहून अधिक स्त्रियांशी विवाह करण्यात (आधीच्या पत्नी पासून फारकत न घेता) देखील जैन लोक आघाडीवर आहेत. म्हणजे जैन पुरूषांच्या एकुण लोकसंख्ये पैकी १६ टक्के पुरूष असे करतात तर त्या विशिष्ट धर्माच्या पुरूषांच्या एकुण लोकसंख्ये पैकी केवळ चार टक्के पुरूष असे करतात. अर्थात हा एका अभ्यास पाहणीचा निष्कर्ष असून त्याविषयीचे वृत्त मी लोकसत्ता मध्ये वाचले होते. त्याचा कुठलाही पुरावा सध्या माझ्याजवळ उपलब्ध नाही. त्यामुळे अशी माहिती ठाऊक असूनही लेखात प्रकाशित केली गेलेली नाहीय. असे अनेक मुद्दे या लेखात नाहीयेत, पण अनौपचारिक संवादात मी त्यांचा संदर्भ देतो / उल्लेख करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.
ज
जाई. Wed, 09/14/2011 - 16:21 नवीन
ही नवीनच माहिती कळली जैन साधुसाध्वी बनण्याऱ्‍या लहान मुलामुलीचे वाढते प्रमाण हा देखील चिँतनाचा विषय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 09/14/2011 - 16:28 नवीन
<< जैन साधुसाध्वी बनण्याऱ्‍या लहान मुलामुलीचे वाढते प्रमाण हा देखील चिँतनाचा विषय आहे >> नक्कीच. पण हे सक्तीने होत नसून अंधश्रद्धे मुळे होते. लहान पणापासून स्थानकात जास्त वेळ रममाण होणार्‍या या मुलामुलींना साधुसाध्वीच्या जीवनाचे आकर्षण निर्माण होते. ते एकप्रकारे संमोहित होऊन त्या साधु / साध्वींच्या नादी लागतात. आता ज्या प्रमाणे विवाह स्वत:च्या मर्जीने देखील १८ वर्षे वय झाल्याशिवाय करता येत नाही असा कायदा त्याच धर्तीवर संन्यास देखील १८ वर्षे वय झाल्याशिवाय घेता येणार नाही असा कायदा होऊ घातला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.
ज
जाई. Wed, 09/14/2011 - 17:25 नवीन
अंधश्रध्दा नाहीये ही जी मुले साध्वी बनतात त्याच्या आईवडीलांना जैन समाजात मोठा मान मिळतो त्यामुळे काही वेळेला जबरदस्तीने साध्वी बनण्याची उदा आहेत खाली वेताळ यांनी म्हटल्याप्रमाणे संमोहन अवस्थेतून बाहेर पडल्यावर या मुलांची अवस्था विचित्र होते एकतर साध्वीपणात कडक नियम पाळायचे असतात जे बऱ्‍याचजणाना जमत नाही त्यांची अवस्था ईकडे आड तिकडे विहीर अशी होते असो हे अवांतर होतेय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 09/14/2011 - 14:27 नवीन
जैन धर्म मला आवडतो..पटतो....व व्यवसायात असल्याने माझे बरेच ट्रेडर गुजराथेी जैन होते.....धर्म बदलायचा विचार मनात आला तर फक्त जैन धर्म मेी स्विकारेल.दुसरा नाहि.....
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 09/14/2011 - 16:23 नवीन
<< जैन धर्म मला आवडतो..पटतो....>> माझंही हेच मत आहे. त्याची जी तत्त्वे आहेत ती चांगलीच आहेत. मी फक्त त्या धर्माच्या काही अनुयायांवर टीका केलीय. तेही असे अनुयायी की जे ही अवघड तत्त्वे इतर धर्मीयांनाही सक्तीने पाळायला लावतात पण स्वत: त्या तत्त्वांची पायमल्ली करतात किंवा एखादा स्वधर्मबांधव तशी पायमल्ली करीत असेल तर त्याला आवरत नाहीत. << धर्म बदलायचा विचार मनात आला तर फक्त जैन धर्म मेी स्विकारेल.दुसरा नाहि.....>> निश्चितच. हेच तर या धर्माचं यश आहे. मी देखील जेव्हा समाजात माझा धर्म विचारला गेल्यावर जैन असल्याचं सांगतो (किंवा अनेकदा लोक आडनावावरूनच ओळखतात), तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियेत मला सामान्यत: आदरच दिसतो. काही मंडळी जैनांपाशी असलेल्या धनसंचयामुळे (खरं तर जैन धर्मानुसार अपरिग्रह म्हणजे संचय करायचा नसतो, आणि सगळेच जैन बांधव या तत्वाचे पालन करत नसले तरी अगदी झाडून सगळे त्याची पायमल्लीही करीत नाहीत) त्यांचा द्वेष करतात, पण जैन धर्मीयांना कोणी तुच्छ मानत नाही (निदान मला तरी असा अनुभव कधी आला नाही). काही धर्माच्या अनुयायांविषयी समाजात दहशत आढळते, तर काहींच्या बाबतीत अनादर. काही धर्माच्या विशिष्ट वर्णाच्या लोकांना समाजात प्रतिष्ठा मिळते तर इतर वर्णाच्या लोकांबद्दल उपेक्षा. जैन धर्मात वर्णभेद फारसा नाही. मुर्तिपूजक / प्रतिमापुजक, श्वेतांबर / दिगंबर, मंदिरमार्गी / स्थानकमार्गी असे काही भेद आहेत पण ते horizontal level वर. Vertical Level वर नाहीत. त्यामुळे जैन धर्मीयांच्यात सर्वांना सारखीच प्रतिष्ठा मिळते. परधर्मीय समाजाकडून जैनांना मिळणार्‍या प्रतिष्ठेत लेखात उल्लेख केलेल्या branding ह्या मुद्याचा मोठा प्रभाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
व
वेताळ Wed, 09/14/2011 - 16:42 नवीन
मागिल दोन वर्षापुर्वी कोल्हापुर जिल्ह्यातील एका प्रसिध्द जैन आश्रमात एका मध्यप्रदेश मधील मुलीला जबरदस्तीने आणुन तिला स्वाध्वी बनवले गेले होते. कारण काय तर ती तिच्या शेजारील मुस्लिम मुलावर प्रेम करत होती. तिला स्वाध्वी केल्यावर देखिल ती त्या मुलाशी तिचा संपर्क होता. नंतर तिला आश्रमात खुप त्रास दिला पण तिने त्या मुलाशी लग्न करण्याचे ठरवले होते. शेवटी त्याच गावातील दोनतीन जैन टग्याना तिचा खुन करण्याची सुपारी दिली व तिची हत्या करण्यात आली. पुढे पोलिसांनी निपक्षःपाती तपास करुन सर्व आरोपीना पकडले. तिच्या आईवडीलाना देखिल अटक केली.त्या आश्रमातील जैनमुनीला जेव्हा पोलिस अटक करायला गेले त्यावेळी पोलिसांवर खुपच मोठा राजकिय दबाव आला. पोलिस निरिक्षकाची बदली केली गेली. पंरतु वृत्तप्रत्रातुन टिका सुरु झाल्यावर त्या जैन मुनी ने अटक टाळण्यासाठी जवळजवळ एक ते दीड महिना कडक उपवास करुन आत्महत्या केली व मरणोत्तर तो आता जैनधर्मियामध्ये मोठा संत गणला जातो. ह्या प्रकरणामुळे माझा जैन धर्मियांकडे बघण्याचा माझा वैयक्तिक द्रुष्टीकोन बदलला आहे.पराकोटीची हिंसा करण्यात ह्या लोकाचा हात कोणीच धरु शकत नाही. मुक्याप्राण्यावर दया दाखवण्याचा दिखावा करणारे लोक गरीब लोकांवर अत्याचार करण्यात आघाडीवर असतात.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/14/2011 - 17:54 नवीन
लेख आवडला. विसंगती दाखवताना भावनेच्या आहारी न गेल्याबद्दल आपले अभिनंदन! अवांतर: माझ्या मैत्रिणीसाठी बीन कांद्या लसणाचा स्वयंपाक बाजूला काढताना तारांबळ व्हायची ते आठवले.;)
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 09/14/2011 - 19:27 नवीन
<< विसंगती दाखवताना भावनेच्या आहारी न गेल्याबद्दल आपले अभिनंदन! >> तुम्ही आणि इतर अनेकांनी हे मत व्यक्त केले आहे. त्याबद्दल तुमचे आभार. अवांतर:- तुमच्या मैत्रिणीचा किस्सा तुम्ही इथे मांडलात, त्यावरून एक सांगावसं वाटतं. जैन धर्मियांची संख्या देशाच्या लोकसंख्येच्या जेमतेम एक टक्का किंवा त्याहूनही कमी असावी. असे असूनही जैन माणसाच्या संपर्कात आला नाही किंवा त्याचा एकही किस्सा ठाऊक नाही असा भारतीय मला अजून तरी भेटला नाही. जेव्हा मी कुठल्याही इतरधर्मीय व्यक्तिला भेटतो, तेव्हा त्याला भेटलेला पहिला जैन धर्मीय मी नक्कीच नसतो. त्याला यापूर्वीही इतर काही जैन व्यक्ती भेटलेल्या असतात व त्यांच्यासंबंधाने त्याच्या काही आठवणीही नक्कीच असतात. इतके अत्यल्पसंख्य असूनही समाजाच्या बहुतेक व्यक्तिंपर्यंत त्यांचा संपर्क कसा काय होतो हे पण एक कोडेच आहे. (की या कोड्याचे उत्तर ही ब्रॅंडींगच आहे?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
आ
आत्मशून्य Wed, 09/14/2011 - 18:30 नवीन
. लेख रोचक वाटला.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 09/14/2011 - 20:30 नवीन
<< आपण पून्हा लिहते झालात हे बघून आनंद वाटला... >> तुम्ही आणि तुमच्यासारखेच इतरही काही सदस्य मधल्या काळात प्रोत्साहन देत होते, म्हणूनच इथे परतलो, अन्यथा... असो. जाऊ द्यात तो विषय. << . लेख रोचक वाटला. >> धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
५
५० फक्त Wed, 09/14/2011 - 19:57 नवीन
ब्रँडिंग कोणत्याही गोष्टीचं असलं तरी ते सोईचंच असतं, खरंतर एखादी गोष्ट खपवण्यासाठी किंवा पसरवण्यासाठीच ब्रँडिंग केलं जातं, धर्म हा पण एक कमोडिटिच आहे, त्यामुळे त्याचं ब्रॅंडिंग होणं यात वावगं ते काय ? या सगळ्या ब्रँडिगच्या मागे जैन धर्माच्या लोकांकडे असलेल्या आर्थिक ताकदीचा किती हात आहे, असणारच आणि समाजाच्या ज्या घटकाकडे आर्थक ताकद आहे त्यानं आपला ब्रँड तयार करावा आणि वाढवावा हे योग्यच आहे, तरि अजुन सुद्धा जैन समाज अल्पसंख्यांक आहे, हे या ब्रँडिगचं अपयश म्हणावं लागेल ना, का बहुसंख्य होणं हा या ब्रँडिगचा उद्देशच नाही किंवा नव्हता. बहुसंख्य होण्यापेक्षा बहु आर्थिक ताकद मिळवुन मोठं होणं हा या ब्रेंडिंगचा उद्देश होता असं वाटतं.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 09/14/2011 - 20:02 नवीन
<< ब्रँडिंग कोणत्याही गोष्टीचं असलं तरी ते सोईचंच असतं, खरंतर एखादी गोष्ट खपवण्यासाठी किंवा पसरवण्यासाठीच ब्रँडिंग केलं जातं, धर्म हा पण एक कमोडिटिच आहे, त्यामुळे त्याचं ब्रॅंडिंग होणं यात वावगं ते काय ?>> ब्रॅंडींग मुळे धर्माच्या मूळ तत्वांना हरताळ फासला जातोय. जैन धर्मावर टीका करणे हा या लेखाचा उद्देश नाहीचे. उलट काही लोकांच्या चूकांमुळे धर्माची चांगली मुल्ये लोप पावू नये या करताच हा लेखन प्रपंच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
५
५० फक्त Wed, 09/14/2011 - 20:35 नवीन
मी कुठंच असं म्हणत नाही की या लेखाचा उद्देश जैन धर्मावर टीका करणे असा आहे, आणि असला तरी काही हरकत नाही. पण जी मुळ तत्वं आहेत ज्यांना या ब्रँडिंग मुळं हरताळ फासला जातो आहे ती काय आहेत याचा उहापोह वाचायला आवडेल. एका संस्थापित ब्रँडसमोर दुस-या ब्रँड्ला उभं राहताना काही तत्वांना हरता़ळ फासावाच लागतो, विशेषत: दुसरा ब्रँड हा पहिल्याच्या विरोधात किंवा त्याला पर्याय म्हणुन उभा राहत असेल तर. आणि जर धर्माच्या चांगल्या मुल्याबद्दल म्हणाल तर ती खरंच चागली असतील तर ती त्याच धर्माच्या काही लोकांच्या चुकामुळं लोप पावणार नाहित. चर्चेतला धर्म जैन धर्म हा आधिच अल्पसंख्य धर्म, त्यात पण काही लोकांनी चुका केल्या तर त्या झाकुन घेणं किती अवघड आहे, तरि पण अशा चुका झाकुन घेतल्या जात असतील तर ते चुकिचंच आहे, वर एका उदाहरणात सांगितल्याप्रमाणे या देशाच्या कायद्यतुन सुटका करुन घेण्यासाठी धर्माच्या नावाने मरण पत्करणे आणि त्या भ्याड मरणाचं संतपण करणे हे चुकच आहे. अशा प्रकारच्या वर्तानाची तुलना केवळ निरर्थक जिहाद पुकारणा-या अतिरेक्यांबरोबरच होउ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
स
साती Wed, 09/14/2011 - 20:22 नवीन
चेतनजी,आपण ज्या समाजात प्रामुख्याने वावरतो त्या समाजातील वैगुण्ये आपल्याला प्रामुख्याने चटकन लक्षात येतात. काही ते मानण्याचा मोठेपणा दाखवतात तर काही आमचंच खरं असा शहाणपणा दाखवतात.तुम्ही पहिल्या प्रकारात आल्याने तुमचे अभिनंदन. १. नावांबद्दल... मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत मी महंमद दालदी(मुस्लिमातील एक जात्),मोहंमद बागवान(मुस्लिमांतील एक जात), रमेश भट, पूजा भट्ट, अशोक महार, अनिल लिंगायत असे कागदोपत्री नाव असणारे लोक पाहिलेत. कोंकणात लिंगायत समाज लिंगायत आडनाव कागदोपत्री धारण करतो. बहुदा इतर समाजात तुमची काय ओळख हे दाखवण्यासाठी हे आडनाव असते. मी स्थलांतरीत सिंधी समाजातील व्यक्तींचे नाव कागदोपत्री निर्वासे किंवा निर्वासित असे लागलेले पाहिलेय भले त्यांचे मूळ आडनाव काही का असेना. माझ्या माहितीतल्या बहुतांश जैन लोकांची खरी आडनावे ओसवाल्,गुंदेचा अशी वेगळी आहेत. पण कागदोपत्री आणि मेन स्ट्रीममध्ये फक्त जैन लिहितात. मराठ्यांतही पाटील देशमुख लोकांची अशी इंगळे, कोल्हे अशी आडनावे असतात पण बाहेर पाटील वापरतात. २.राहण्याच्या जागेबाबत.. मी कर्नाटक आणि महाराष्ट्र अश दोन्ही ठिकाणी जागा शोधल्यात. आपल्या एरियात एस सी,एस टी किंवा मुसलमान राहतात किंवा राहत नाहीत हा एखाद्या जागेचा प्लस -मायनस पॉइंट म्हणून सगळेच इस्टेट एजंट सांगतात. एखादा जागा मालक प्लॉटिंग केल्यावर एखाद्या विशिष्त जमातीला प्लॉट विकत नाही हे ही फारदा पाहिल्येय. आमच्या रत्नागिरीतच काही एक्स्क्लुजिवली ब्राह्मण वसाहतीत इतर जमातींना (माझी मावशी अगदी कट्टर शाकाहारी जैन असूनही) तिथे जागा देत नाहीत. सध्या मी ज्य गावात राहाते तिथे तर हिंदुनी आपली घरे गुलाबी आणि मुस्लिमांनी हिरवी रंगवावीत असा अलिखित नियमच आहे काही भागांत. ३. खाण्याबाबत.. जैन पावभाजी वैगेरे पंजाबी आणि उडुपी लोकांच्रे गिमिक्स आहेत धंदा वाढवायला. आणि खरंच काहो तुम्ही हिंदू खानावळ (रामभरोसे हिंदू हॉटेल :) ),मराठा खानावळ,लिंगायत खानावळ असे प्रकार पाहिले नाहीत. मी चिक्कार पाहिलेत. ४. धंद्याबद्दल.. पटलं. ५. धार्मिक आचरण या बाबतीतील विसंगती प्रत्येक धर्मात आहे. तुमच्या धर्माबद्दल तुम्हाला जास्त ठाऊक आणि माझ्या धर्माबद्दल मला. कदाचित मला जास्त धर्मांबद्दल माहित्येय कारण माझ्या आईचा,बाबांचा,नवर्‍याचा असे प्रत्येकाचे वेगवेगळे धर्म आहेत,:) तरिही स्वतःच्या धर्मातील त्रुटी स्वतः दाखवून खुलेपणाने मान्य केलेय म्हणून हा लेख मला आवडला. रच्याकने.. कुणीही काहीही म्हणु दे हो तुम्ही लिहित रहा इथे चान लिहिता,मागे त्या जननीहिताय मध्ये पण मी लिहिलं होतं,छान लिहिता तुम्ही.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/14/2011 - 23:18 नवीन
जैन पावभाजी वैगेरे पंजाबी आणि उडुपी लोकांच्रे गिमिक्स आहेत धंदा वाढवायला मेन्यूमध्ये फक्त जैनपदार्थांचीच वेगळी यादी नसते तर इतर पदार्थातही वर्गवारी केलेली असते. उदा. तिखट पदार्थांपुढे लाल मिर्चीचे चित्र असते, गोड पदार्थांसमोर 'स्वीट' असे लिहिलेले असते, मोठ्या उपहारगृहांमधून तर प्रत्येक पदार्थातील मुख्य पदार्थ आणि बनविण्याची पद्धत आणि रश्याचा रंग (लाल, तपकिरी, पांढरा) इत्यादी दिलेले असते. ह्याचा उद्देश कुठलेही ब्रँडीगचा नसून गिर्‍हाईकाला पदार्थ निवडताना माहित असावे कि तो काय पदार्थ मागवतो आहे. वेटर्सबरोबर चर्चा करीत वेळ घालवू नये, वेटरने एक सांगितले आणि आले दूसरेच असे वाद होऊ नयेत. असा असतो. जैन धर्मात जमिनी खाली वाढणार्‍या भाज्या खात नाहीत. जसे बटाटा, कांदा, लसूण इत्यादी. त्यामुळे त्या भाज्या वगळून पावभाजी किंवा इतर पदार्थ बनविले जातात. त्यातही 'प्युअर जैन' आणि 'कांदा-लसूण विरहित' असे दोन प्रकार आहेत. 'प्युअर जैन' मध्ये कांदा-लसूण्-बटाटा घालत नाहीत तर 'कांदा-लसूण विरहित' पदार्थात फक्त तेवढ्याच भाज्या वर्ज्य असतात. बटाटा 'चालतो'. सर्वसाधारण निरिक्षणात स्त्रिया 'प्युअर जैन' भाजी मागवतात तर पुरुष 'कांदा-लसूण विरहित॑' भा़जी मागवतात. सध्या आमच्याकडे फक्त जैन पावभाजी, जैन चाट वगैरे मिळतो. पण त्याच बरोबर 'जैन वडा-पाव', 'जैन मिसळ' मिळेल का अशी विचरणा वाढत आहे. माझे जैन गिर्‍हाईक वाढणार असेल तर काय हरकत आहे? मी त्यावर विचार करतो आहे. 'प्युअर जैन कॅफेटेरिआच' का सुरु करू नये???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
प
पाषाणभेद Wed, 09/14/2011 - 23:24 नवीन
तुमच्यावालं नाव मंग प्रभाकरलाल, प्रभाकरमल, प्रभाकरचंद असलं कायतरी ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
च
चेतन सुभाष गुगळे Mon, 09/19/2011 - 14:23 नवीन
सातीजी, सर्वप्रथम आपण इतकी मेहनत घेऊन व वेळ खर्चून इतका सविस्तर प्रतिसाद दिलात याबद्दल आपले आभार. आपल्या प्रतिसादातील काही बाबींवर इथे थोडक्यात स्पष्टीकरण देऊ इच्छितो. मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी या धर्मीयांचे राहणीमान पाहताच ते हिंदु धर्मीयांपेक्षा वेगळे असल्याचे दिसून येते. जैन धर्मीय हे असे काही वेगळे ओळखता येत नाहीत. परंतू आपले ही स्वतंत्र अस्तित्व दिसून यावे या उद्देशाने त्यांची ही ब्रॅंडींगची धडपड गेल्या काही वर्षांपासून चालु आहे. या धडपडीतील आक्रमकतेमुळे धर्मांचे अनेक मूळ उद्देश देखील बाजुला पडत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे या ब्रॅंडींगचा आमच्यातले काही लोक निर्लज्जपणे स्वत:च्या व्यवसायाकरिता उपयोग करून घेत आहेत. याच गोष्टीला मी आक्षेप घेतला आहे. या सर्व बाबींचा उहापोह मी आता मूळ लेखातच संपादन करून पुरवणीलेखनाद्वारे केला आहे. कृपया त्यावरही एक दृष्टीक्षेप टाकावा. बाकी आपल्या ह्या << आपण ज्या समाजात प्रामुख्याने वावरतो त्या समाजातील वैगुण्ये आपल्याला प्रामुख्याने चटकन लक्षात येतात. काही ते मानण्याचा मोठेपणा दाखवतात तर काही आमचंच खरं असा शहाणपणा दाखवतात.तुम्ही पहिल्या प्रकारात आल्याने तुमचे अभिनंदन. >> <<तरिही स्वतःच्या धर्मातील त्रुटी स्वतः दाखवून खुलेपणाने मान्य केलेय म्हणून हा लेख मला आवडला. >> << रच्याकने.. कुणीही काहीही म्हणु दे हो तुम्ही लिहित रहा इथे चान लिहिता,मागे त्या जननीहिताय मध्ये पण मी लिहिलं होतं,छान लिहिता तुम्ही. >> गौरवोद्गारांबद्दल पुनश्च धन्यवाद. जननीहितायचा विषय निघालाच आहे तर एक विचारतो - आपण ती सर्वच्या सर्व २५ प्रकरणे वाचलीत का? महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचा फायदा होईल असे आपणांस जाणवले का? काही त्रुटी असल्यास किंवा अजुनही कुठल्या विषयांची भर घालणे गरजेचे वाटत असल्यास जरूर सूचवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
आ
आशु जोग Wed, 09/14/2011 - 21:09 नवीन
>>मी जेव्हा हॉटेलात जेवणाची ऑर्डर देतो तेव्हा भाजीत कांदा नको असे म्हंटल्यावर वेटर आपल्या मनानेच भाजीच्या नावापुढे जैन असे लिहीतो. या जैन भाजीची मला धास्तीच वाटते कारण जैन म्हंटले ही लोक भाजीत भरपूर तूप / लोणी, काजूची ग्रेव्ही, पनीर / मलाई यांचा मारा करतात. यामुळे भाजी गोSSSड लागते आणि मला अजिबात आवडत नाही >> म्हणजे खाद्यपदार्थाची जैन एवढी कॅटेगरी पुरेशी नाही चेतन गुगळे कॅटेगरी करायला हवी. --- सहज मजा केली लेख चांगला आहे. विचाराला खाद्य पुरवणारा आहे
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 09/14/2011 - 21:29 नवीन
<< म्हणजे खाद्यपदार्थाची जैन एवढी कॅटेगरी पुरेशी नाही चेतन गुगळे कॅटेगरी करायला हवी. --- सहज मजा केली >> तुम्ही मजेने म्हंटलंत आणि तुमच्या हेतूविषयी मला शंका नाही. तरी तुम्हाला एक गंभीर प्रतिसाद देतोय. खरं तर कुठलीच कॅटेगरी बनवू नये. प्रत्येकाला त्याच्या गरजा, आवडीनिवडी प्रमाणे. म्हणजे फक्त जेवणच असं नव्हे तर इतर गोष्टी देखील. हल्ली हे दुर्मिळ होत चाललंय. माझ्या आवडीनिवडीचे कपडे, बुट, घड्याळ, चष्म्याची फ्रेम अशा अनेक वस्तु घ्यायला दुकानात गेलो की अडचण होतेय. "पंधरा वर्षापुर्वीची फॅशन विसरा आता. बाजारात नवीन काय ट्रेंड चाललाय त्याप्रमाणे बदला स्वत:ला" असंच जवळपास प्रत्येक दुकानात ऐकायला येतंय. (हे इतरांप्रमाणे स्वत:ला बदलावं लागणं मला पटत नाहीय.) बर्‍याच ठिकाणी शोधा शोध केल्यावर एखाद्या कडे जुना स्टॉक असला तर मिळून जाते मला हवी तशी वस्तु. कुठेतरी वाचलेलं एक वाक्य आठवलं - They laugh at me because I am different; I laught at them because they all are same. << लेख चांगला आहे. विचाराला खाद्य पुरवणारा आहे >> धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
श
शाहिर गुरुवार, 09/15/2011 - 13:05 नवीन
हलके घेत चला . सर्व च प्रति साद गंभेर नस्तात ..तुमच्याकडुन वि नो दी लेख यावा अशी अपेक्शा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चित्रगुप्त Fri, 09/16/2011 - 23:50 नवीन
लेख आवडला, आणि हेही खूप आवडले: "They laugh at me because I am different; I laught at them because they all are same".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
प
पान्डू हवालदार Wed, 09/14/2011 - 21:47 नवीन
माझ्या ओऴखीची मारवाडी देखील 'माहेश्वरी' अड्नाव लावतात
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 09/14/2011 - 21:56 नवीन
शिवाय मी धर्माचा्उल्लेख करण्याविषयी म्हंटले होते. जातीचा उल्लेख आडनावात अनेकदा होतोच. कारण तेच त्यांचे कर्म असते आणि कर्मावरुनच ते ओळखले जातात. जसे की सुतार, लोहार, गवंडी, इत्यादी. आमचे गुगळे हे आडनाव देखील पुर्वी गुगलिया असे होते, चारशे वर्षांपूर्वी जेव्हा आमचे पूर्वज राजस्थानातून इथे आले तेव्हा इतर बर्‍याच महाराष्ट्रीय लोकांप्रमाणेच आमचे आडनावही एकारांत झाले (जसे की शिंदे, रासने, गाडे, इत्यादी). याउलट माधवराव शिंदे मध्य प्रदेशात सिंदिया झाले. तर आमचे हे गुगळे / गुगलिया आडनाव पडले कारण आमचे पूर्वज गुग्गुळ ह्या औषधी वनस्पतीचा व्यापार करीत असत. ह्या सार्‍या पारंपारिक गोष्टी आहेत. ह्यांचा काही माझ्या लेखाशी संबंध नाही. माझ्या लेखात मी इतकाच उल्लेख केलाय की धर्माचे नावच चक्क आडनाव म्हणून वापरण्याची प्रथा जैन बांधवांनी सुरू केलीय जी तूलनेने बरीच नवी असून तो ब्रॅंडींगचा एक भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पान्डू हवालदार
आ
आशु जोग Wed, 09/14/2011 - 21:56 नवीन
एका साहित्य संमेलनात डॉक्टर अभय बंग यांनी 'माणिकचंद' च्या प्रयोजकत्वाबद्दल आक्षेप घेतला होता(दोघेही जैन असावेत) डॉक्टरांचा आग्रह मानावाच लागला. -- चेतन, आपण अनेक निरीक्षणे नोंदविली आहेत. एका बैठकीत हा लेख लिहिलात की अनेक दिवस लागले ?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 09/14/2011 - 21:58 नवीन
विचार अनेक महिने चालु होता पण लेख लिहायला बसल्यावर एकाच बैठकीत जमुन गेला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
ध
धनंजय Wed, 09/14/2011 - 21:57 नवीन
लेखनाची शैली लोकहितवादी (कदाचित फुले) यांच्या प्रकारची आहे. अशा प्रकारचे लेखन पुष्कळदा तपशीलवार तथ्यात्मक नसते, पण आत्मपरीक्षणाला उद्युक्त करणारे असते. (मन१, अदिती वगैरे यांनी तपशिलांत दाखलेल्या काही चुका मलाही जाणवल्या होत्या.) अशा प्रकारच्या लेखनात सरसकटीकरणाचा भाग क्षम्य असतो, असे माझे मत आहे. एखाद्या समूहातील काही रूढी (म्हणजे अनेक लोक - १००% नव्हे - पाळत असलेल्या रूढी) जर कालबाह्य अथवा तोट्याच्या वाटत असल्या, तर लेखकाने काय करावे? त्या समाजाला जर कुठले नाव असले (या उदाहरणात "जैन") तर त्या नावाचा उल्लेखही येणारच. अर्थातच जर त्या रूढीबाबत टीका आहे, तर ती रूढी न मानणारे जैन त्या टीकेतून आपोआपच वगळले जातात. वगैरे. (मात्र श्री. गुगळे यांनी टीकेसाठी निवडलेल्या रूढी मला फारशा त्रासदायक वाटल्या नाहीत. १. जैन धर्मीय लोकांच्या प्रत्येक कंपनीच्या नावात "जैन" शब्द नसतो. त्यामुळे कत्तलखान्याला तसे नाव नसले, तर मालकाला ते नाव लक्षातही आले नसेल, ही शक्यता अधिक आहे. २. आकुर्डीबाहेर राहाणार्‍या एखाद्या सदाचाराबाबत-गोडवे-गाणार्‍या जैन व्यक्तीला "देवळाजवळ-परमिट-रूम"विषयी विचारले, तर बहुधा विरोध करेल. आकुर्डीमधील जैन समाजाचा परमिटरूमला एकत्रित विरोध नसेल, तर कुठलेसे स्थानिक राजकारण असू शकेल, असे वाटते.)
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 09/15/2011 - 01:19 नवीन
आणि प्रतिसादांतून झालेली निकोप चर्चा आवडली.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 09/15/2011 - 01:50 नवीन
मी आजवर जैन हा हिंदु धर्माचाच एक संप्रदाय मानत होते, सेम अबाउट बौद्ध धर्म. या धर्म या संकल्पने बद्दल मला सर्वात आवडलेली मत मांडलेत ती दुर्गा भागवत यांनी. फार छान लिहुन गेल्या त्या. घाट्कोपर मध्ये एक पाच बिल्डिंगचा समुह फक्त जैन धर्मियांचा आहे. हे थोडस घातक वाटत मला, कारण समजा त्या घरामध्ये काही हिंसाचार , जो बर्‍याचदा धर्माच्या अतिरेकामुळे घडतो घडला तर कुठेही बाहेर समजुन नाही येणार, वर वेताळांनी उल्लेख केलेला प्रकार तर अतिशय निच म्हणावा लागेल. . पण तुम्ही जे लिहिण्याच सामर्थ्य दाखवलय त्या बद्दल तुमच अभिनंदन, एरवी धर्म म्हंटल की बरच्स अतिरेकी लेखन येउ शकत.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/15/2011 - 02:16 नवीन
मी आजवर जैन हा हिंदु धर्माचाच एक संप्रदाय मानत होते, सेम अबाउट बौद्ध धर्म.
संपत्ती, वारसा हक्क इ. संदर्भात हिंदू कायदाच जैन, बौद्ध समाजास लागू असल्यामुळे असा गैरसमज होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना गुरुवार, 09/15/2011 - 09:13 नवीन
नाही. हा गैरसमज नाही. ही वस्तुस्थिती आहे. बौद्ध धर्म हा आपल्याच धर्माचा एक भाग आहे कारण बुद्ध स्वतःला क्षत्रिय अस अभिमानाने म्हणत असे. त्याला फकत लोकांच्या वागण्या बोलण्याच परिवर्तन करायच होत, पण झाल काय, त्याचे आचार विचार राहिले बाजुला लोकांनी त्याचा देव करुन टाकला, अन त्याचे अनुयायी स्वतःला वेगळे समजु लागले. एकुण बुद्धाची शिकवण तरी आपल्या धर्मापेक्षा फारशी वेगळी अशी आहे का? श्रीलंकन बौद्ध गणेश पुजन मस्ट मानतात. बुद्ध स्वतः आपले सारे देव मानत होता, पण त्याचा देव करुन आपण काही वेगळे आहोत हे त्याच्या पश्च्यात आलेल वा घडलेल. तेच महावीरांच, हा ही एक राजपुत्रच, अर्थात या सार्‍याचे पुरावे त्या काळच्या वाञ्मयामध्ये मिळतात. तपश्चर्येची अन साधनेची एक वेगळी पद्धत वा पुनर्रुजीवन केलेल्या, लोकांच प्रबोधन करणार्‍यालाच देव बनवण ही एक मोठ्ठी शोकांतिका म्हणावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 09/15/2011 - 09:37 नवीन
<<तेच महावीरांच, हा ही एक राजपुत्रच, अर्थात या सार्‍याचे पुरावे त्या काळच्या वाञ्मयामध्ये मिळतात.>> या वाक्यातून तुम्हाला हिंदु धर्मातूनच जैन धर्माचा उगम झाला असं म्हणायचं असेल तर ते चूक आहे. जैन धर्म बराच जुना आहे. महावीर हे देव नाहीत. ते तीर्थंकर आहेत. जैन धर्मात देवाची प्रतिमा / मूर्ती नसते कारण ते कोणीच पाहिलेले नाहीत. तीर्थंकर हे मानव होते. सर्वांनी पाहिलेत. त्यांच्या मूर्त्या / प्रतिमा असतात. महावीर हे चोविसावे तीर्थंकर आहेत. पहिले तीर्थंकर कोण? त्यांचा जन्म केव्हा झाला? आदि माहिती इथे मिळू शकेल http://en.wikipedia.org/wiki/Tirthankara जैन धर्म आणि हिंदु धर्म यांची तूलना केल्यास हिंदु धर्म हा एक मोठा प्रवाह आहे तर जैन धर्म हा एक त्यापुढे लहानसा ओघळ. दोघांचा प्रवास समांतरच आहे. जैन धर्म हिंदु धर्मातून उगम पावलेला नाहीये. पण काही कारणांनी (जसे आचरणास अवघड अशी तत्वे) ह्या धर्माचे अनुयायी कायमच अत्यल्पसंख्य होते. तरीही हा नष्ट झाला नाही कारण पुढील काळात काही जण हिंदु धर्मातून या धर्मात प्रवेश करू लागले (हे प्रमाणही फारच कमी असले तरी धर्माचे नाव टिकून राहण्यास पुरेसे होते). त्यामुळे पुढे लोकांचा असा गैरसमज झाला की जैन ही हिंदुंचीच शाखा आहे. खरं तर लोकांच्या समजामुळेच काही जैन चिडले आणि आम्ही वेगळे आहोत हे ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला (ही या शंभर एक वर्षातील बाब आहे). या आक्रमकतेतुनच जे काही विसंगत आणि विपरीत घडत आहे त्यालाच मी जैन धर्माचं ब्रॅंडींग असं संबोधून त्यावर हा लेख लिहीलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
श
शैलेन्द्र गुरुवार, 09/15/2011 - 11:24 नवीन
"जैन धर्म हिंदु धर्मातून उगम पावलेला नाहीये." हिंदु नसेल कदाचीत, पण सनातन किंवा वैदीक धर्मातीलच एक ज्ञानशाखा म्हणुन त्यांचे अस्तित्व कित्येक काळ होते. एकाच कुळात काही जैन, काही बौद्ध मत माननारे लोक नांदायचे.. पंजाबातील घरा घरात शिख धर्माबाबत हे दिसायच- दिसतं.. महाराष्ट्रातील महानुभव पंथही तसाच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
र
राही गुरुवार, 09/15/2011 - 12:42 नवीन
<<वेगळेपणा ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला>> साधारण १९६०-६१ आणि १९७०-७१ या दोन्ही शिरगणत्यांच्या काळात जैन समाजाने आपला धर्म 'जैन' असा नोंदवावा आणि आडनाव 'जैन'च लावावे असे खास प्रयत्न झाले.तोपर्यंत हिंदू धर्म आणि जैन जात किंवा पोटजात अशी नोंदणी तुरळक रीत्या होत असे. या कार्यात खासदार(?) प्रो. जगदीशचंद्र जैन (गांधीहत्या खटल्यातील एक महत्त्वाचे साक्षीदार) आघाडीवर होते. या कामी दिल्लीस्थित जैन लोकांनी पुढाकार घेतला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चित्रगुप्त Fri, 09/16/2011 - 23:55 नवीन
जैन धर्मग्रंथांमध्ये योगसाधनेवर आहे का काही? असल्यास कळवा. जालावर असेल तर फारच उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/15/2011 - 18:45 नवीन
त्या-त्या धर्माच्या आचरणकर्त्यांनी ठरवावं तो "धर्म" संप्रदाय आहे का धर्म ते! इंदिरा गांधींच्या मृत्युनंतर शीखांना वेगळे काढणारे काही हिंदूच होते. माझ्या ओळखीतल्या धर्म मानणार्‍या शीख, बौद्ध आणि जैनांना हिंदूमधला वेगळा संप्रदाय म्हटलेलं आवडत नाही ही माझ्याकडची माहिती आहे. डॉ. आंबेडकरांनी अनुयायांसोबत हिंदू धर्म त्यागून बौद्ध "धर्माचा" (किंवा धम्माचा, उच्चाराबद्दल मी आग्रही नाही) स्वीकार केला यास "धर्मांतर"(संप्रदायांतर नव्हे!) असं म्हटलं जातं. धर्म हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही त्यामुळे ऐकीव माहितीपुढे माझी मजल नाही.
तपश्चर्येची अन साधनेची एक वेगळी पद्धत वा पुनर्रुजीवन केलेल्या, लोकांच प्रबोधन करणार्‍यालाच देव बनवण ही एक मोठ्ठी शोकांतिका म्हणावी लागेल.
माझ्यासारख्या देव न मानणार्‍यांना, अर्थात निरीश्वरवाद्यांना कोणाचाही आणि कसलाही देव बनवताच येत नाही. ज्यांना या संकल्पनेची गरज वाटते त्यांनी कोणालाही आणि/किंवा कशालाही देव बनवला तरी माझी "नो कमेंट". मात्र माझा देव तोच खरा देव आणि दुसरा मानतो तो देवच नाही यात प्रचंड तार्किक विसंगती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
च
चेतन सुभाष गुगळे Mon, 09/19/2011 - 14:33 नवीन
<< माझ्यासारख्या देव न मानणार्‍यांना, अर्थात निरीश्वरवाद्यांना कोणाचाही आणि कसलाही देव बनवताच येत नाही. ज्यांना या संकल्पनेची गरज वाटते त्यांनी कोणालाही आणि/किंवा कशालाही देव बनवला तरी माझी "नो कमेंट". मात्र माझा देव तोच खरा देव आणि दुसरा मानतो तो देवच नाही यात प्रचंड तार्किक विसंगती आहे. >> या विधानांशी पूर्णत: सहमत आहे. मी देखील निरीश्वर वादीच आहे. फक्त एकच गोष्ट मला जाणवली ती अशी - देव ही संकल्पना आपण मानत नसल्याबद्दल जर लेख लिहीला तर सर्वच धर्मांतील ईश्वर कल्पनेचे समर्थक एकत्रित रीत्या लेखावर तुटून पडतात. त्यांच्या तुटून पडण्यात विचार, तर्क, समंजसपणा अशा बाबींना अजिबात स्थान नसते. ते निव्वळ भावनेच्या आहारी जातात. स्वत: तर भडकलेले असतातच पण इतरांनाही भडकविण्याचे प्रयत्न करतात. त्यापेक्षा एक एक धर्मातील चूकीच्या रूढी, आचरण, विसंगती यावर स्वतंत्र रीत्या विवेचन केले असता प्रतिसादांना हाताळणे तूलनेने सुलभ होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 09/15/2011 - 06:17 नवीन
भारतातील प्रत्येक जाती-धर्मात दिसणार्‍या विसंगतीपैकी जैन धर्मियांबाबतच्या विसंगतीवर बोट ठेवणारा लेख आवडला. तुमचा हा अभ्यासाचा विषय असेल तर असेच इतर धर्मियांच्या(पंथीयांच्या/जातीयांच्या)ही शिकवणी व प्रत्यक्ष आचरणातील विसंगती सहज दाखवता याव्यात. अश्या लेखाची प्रतिक्षा करायला आवडेल
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 09/15/2011 - 08:04 नवीन
<< भारतातील प्रत्येक जाती-धर्मात दिसणार्‍या विसंगतीपैकी जैन धर्मियांबाबतच्या विसंगतीवर बोट ठेवणारा लेख आवडला. >> धन्यवाद. << तुमचा हा अभ्यासाचा विषय असेल तर असेच इतर धर्मियांच्या(पंथीयांच्या/जातीयांच्या)ही शिकवणी व प्रत्यक्ष आचरणातील विसंगती सहज दाखवता याव्यात. >> मी हा काही माझ्या अभ्यासाचा विषय मुद्दाम ठरवून केलाय असे नव्हे, पण समाजात राहताना ज्या काही गोष्टी आपल्यावर लादल्या जातात त्यातली प्रामुख्याने त्रासदायक म्हणजे धर्म. अनेकदा आपल्याला परधर्मीयांच्या धार्मिक / पारंपारिक आचरणाचा त्रास होतो (त्याचप्रमाणे ज्या धार्मिक ग्रंथांचा आधार घेऊन ते असे वर्तन करतात त्या ग्रंथांचे मी स्वत: वाचन केले तर मला जाणवले की यातील काही विधाने एकमेकांशी जुळत नाहीयेत, तर काही विधाने तर्कदृष्ट्या अतिशय चूकीची आहेत). तेव्हा आपण उद्वेग व्यक्त करतो. त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी आपल्याही धर्मातील विसंगतींवर प्रकाश टाकावा असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
सुहास झेले गुरुवार, 09/15/2011 - 07:04 नवीन
लेख आणि प्रतिक्रिया वाचल्या....मुद्दा आवडला, अजुन वाचायला आवडेल...:) शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Mon, 09/19/2011 - 14:37 नवीन
धन्यवाद सुहास. याविषयी अजुनही मुद्दे मांडले आहेत. त्याकरिता संपादन करून मूळ लेखाच्या शेवटी पुरवणी लेखन जोडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा