Welcome to misalpav.com
लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:
आज आम्हाला (म्हणजे मला आणि माझ्या बायकोला) अमेरिकेत राहून जवळपास सहा महिने होत आलेत. अजून साधारण १५-२० दिवसांनी आमची भारताभूमीकडे परत जाण्याची वेळ येऊन ठेपणार आहे. २००८ मध्ये मी शिकागोमध्ये काही काळ राहिलो होतो; तेव्हा मला माझ्या तिथल्या वास्तव्यात फक्त एकच मराठी व्यक्ती भेटली होती आणि कालांतराने आम्ही चांगले मित्र झालो. नाही म्हणायला आमच्याच पुण्याच्या कार्यालयात काम करणारा आणि थोडीशी ओळख असलेला एक मर्द मावळा मराठी माणूस मला पहिल्याच दिवशी दिसला. मी आश्चर्याने हसून त्याला अभिवादन केले. त्याने नाक उडवून माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि अर्नोल्ड शिवाजीनगरकर हातात गन घेऊन शिवाजीनगर बस स्टँडकडे झेपावा तसा तो झेपावत पुढे निघून गेला. तो मर्द मराठी माणूस मला नंतर बर्‍याचदा दिसला. माझ्या इमारतीमध्येच रहायचा. पण त्याने माझ्याकडे कधीच पाहिले नाही. मी समोरून आलो की तो मान वळवून निघून जायचा. असो. आपण नुसतेच नावाचे "मर्द मराठे, राकट आणि कणखर देशातले, मावळे-बिवळे, वगैरे वगैरे". ही सगळी विशेषणे मला कधी-कधी फार पोकळ आणि फिल्मी वाटतात. मराठी माणूस (अगदी माझ्यासकट) या गाण्यांमध्ये जसे मराठी माणसाचे वर्णन असते तसा अजिबात नाहीये. किंवा आताच्या जमान्यात हे वर्णन आपल्याला लागू पडत नसावे. किंवा म्या पामराची वयोमानापरत्वे दृष्टी (आणि मती) अधू झाली असावी. काहीतरी असेल किंवा नसेल पण हे नाटकीय वर्णन आणि वास्तव यामध्ये कुठेतरी काहीतरी गोची आहे हे नक्की. बाकी काहीही असले तरी आपले कवी खूप प्रतिभावान होते हे मात्र मान्य करायलाच हवे. असो. हा मुद्दा निराळाच आहे. यावेळी मी मूर्सव्हीलमध्ये (नॉर्थ कॅरोलायना) मध्ये राहिलो आणि मला बरीच मराठी मंडळी भेटली. अर्थात या गावात तेलुगू लोकांच्या तुलनेत मराठी लोकांची संख्या अगदी नगण्य आहे. मला वाटते तमाम अमेरिकेत तेलुगू लोकांची संख्या लक्षणीय आहे. आणि त्याखालोखाल तमिळ! मी ज्या कम्युनिटीमध्ये राहतो तिथे जवळपास २५०-३०० अपार्ट्मेंट्स आणि १५०-२०० टाऊनहाऊसेस आहेत. साधारण १००-१२० एकरांच्या विस्तीर्ण क्षेत्रात वसलेली ही कम्युनिटी म्हणजे आमच्या गावातल्या ५ ते ६ मोठ्या कम्युनिटीजपैकी एक आहे. आणि सगळ्या कम्युनिटीजमधे तेलुगू लोकांची संख्या मोठी आहे. आमच्या कम्युनिटीमध्ये ५०% पेक्षाही जास्त तेलुगू लोकं आहेत. त्यांची संख्या इतकी जास्त का यामागचं कारण मला अजूनही कळालेलं नाही. आमच्या कम्युनिटीमध्ये फिरतांना क्षणभर आपण हैदराबादमध्ये तर नाही ना अशी शंका यावी इतके तेलुगू लोकं आहेत. मी एकाला यामागचं कारण विचारलं तर तो म्हणाला अमेरिकेत यायला मिळावं म्हणून तेलुगू लोकं काही खास तांत्रिक (आयटी) कौशल्ये आत्मसात करतात. तेलुगू जनता मुख्यत्वेकरून तंत्रज्ञान क्षेत्रात जास्त आढळते. तंत्रज्ञानाशी फारसा संबंध नसणारी क्षेत्रे (उदा. मार्केटींग, सेल्स, पब्लिक रिलेशन्स, बिझनेस अॅनॅलिसिस, मनुष्यबळ, इत्यादी) त्यांना खुणावत नाहीत. पण मुळात त्यांना अमेरिकेचं इतकं वेड का असतं हे कोडं मला अजून सुटलेलं नाही. परवा आमच्या प्रोजेक्टमधली एक (तेलुगू) मुलगी भारतात परत जायला निघाली. तिने हजार प्रकारे प्रयत्न करून अमेरिकेत राहण्याचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. शेवटी तिला तिकीट काढावंच लागलं. इथपर्यंत ठीक आहे. राहण्यासाठी प्रयत्न करणं, पैसे वाचवणं, इथल्या कंफर्टेबल आयुष्याची सवय होणं वगैरे मी अगदीच समजू शकतो. पण ही मुलगी इतकी हताश झाली की शेवटच्या २-३ दिवसात ती कुणाशीच धड बोलत नव्हती. तिचं अगदी तुसडेपणाने बोलणं आणि वारंवार सगळ्या गोष्टींना विनाकारण नावं ठेवणं मला (आणि अजून बर्‍याच लोकांना) अनाकलनीय वाटलं. असं का? आमची इथल्या ७-८ मराठी कुटुंबांशी ओळख झाली. आणि बहुतेक सगळे इथे २-३ वर्षांपासून राहत आहेत. मराठी म्हणून ओळख-परिचय तेवढा असतो पण त्यापुढे जास्त काही नसतं. तेलुगू लोकं मात्र अगदी गळ्यात गळे घालून राहतात. प्रत्येक सणाला, प्रसंगाला ते एकमेकांच्या घरी जातात. सुटीच्या दिवशी देखील एकमेकांच्या घरी अंगत-पंगत वगैरे करून एकत्र वेळ घालवतात. त्यांच्यापैकी कुणी नवीन आलंय किंवा परत निघालंय तर मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. जवळच्या तेलुगू मित्रांसाठी शेवटच्या क्षणाची सामानाची ने-आण, कचराकुंडीत नको असलेले सामान टाकणे वगैरे कामे ते आनंदाने करतात. हे लोकं आपल्या कंपूमध्ये सहसा इतर कुणाला प्रवेश देत नाहीत. त्यांना तशी गरजच पडत नाही. त्यांची संख्या इथे एक चांगली सपोर्ट सिस्टीम उभारण्याइतकी नक्कीच असते त्यामुळे त्यांना इतर कुणाचीच गरज पडत नाही. मराठी लोकांचं मात्र जरा वेगळं असतं. मी इकडे येण्याआधी पुण्यात असतांना एका मराठी व्यक्तीला फोन केला. ती व्यक्ती मूर्सव्हीलमध्येच राहणारी होती आणि काही दिवसांसाठी पुण्यात आमच्या कार्यालयात आली होती. मी स्वच्छ मराठी मध्ये बोलायला सुरुवात केली. "हॅलो, क्ष बोलताय का?" (हा क्ष मराठी, आडनावात शेवटी 'कर') "येस्स्स" (का फोन करतात घाटी लोकं कुणास ठाऊक!) "हॅलो, मी समीर बोलतोय" "येस्स" "मी क्ष युनिटचा आहे आणि य बिल्डिंगमध्ये बसतो. पुढच्या आठवड्यात मी मूर्सव्हीलला फॅमिलीसहित येणार आहे. मला असं कळलं की आपण तिथे राहता म्हणून फोन केला...म्हटलं तुम्ही काही माहिती देऊ शकाल...तिथलं राहणं कसं आहे, कुठे राहता येईल वगैरे..." मी थोडं अनौपचारिक होण्याचा प्रयत्न केला. "वेल, आय वुईल बी गोईंग बॅक धिस वीक. व्हॉट डू यू वाँट टू नो?" (धादांत खोटा आणि हास्यास्पद अ‍ॅक्सेंट! असा खोटा अ‍ॅक्सेंट मारण्यात लोकांना काय आनंद मिळतो कुणास ठाऊक. लठ्ठ माणसाने अतिसैल कपडे घालून सडपातळ झाल्याचा आनंद मानण्यासारखं आहे हे!) "आपली जनरल माहिती...अपार्टमेंट कुठे कसं मिळवता येईल वगैरे..." "वेल, आय डोंट नो...आय स्टे अलोन...आय वुईल बी गोईंग विथ माय फॅमिली नाऊ...देअर आर हॉटेल्स अल्सो...यू कॅन चेक ऑनलाईन...यू वुईल गेट इन्फर्मेशन..." (शांतता. त्याने त्याचं बोलणं संपवलं होतं आणि मला कळतच नव्हतं की आता काय बोलावं.) "ओके क्ष, थँक यू" आणखी काही बोलण्याचा स्कोपच नव्हता. मला असं झालं की कुठून आपल्याला दुर्बुद्धी झाली आणि क्ष ला फोन केला. नंतर मिपावरच्या सगळ्या मित्रांनी खूप चांगली माहिती पुरवली आणि इथे पोहोचल्यावर मदत करण्याची तयारी देखील दर्शवली. बर्‍याच मिपाकरांनी फोन नंबर्स, ईमेल आयडीज देखील दिले. काहींशी मी बोललो पण सगळ्यांशी संपर्क साधणं शक्य झालं नाही. त्याबद्दल अर्थातच क्षमस्व! मिपाकरांचे मनोमन धन्यवाद मानून मी मोर्चा तिथे प्रोजेक्टवर असणार्‍या आमच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांकडे वळवला. त्यातल्या १-२ लोकांनी खूप मदत केली. माझं अपार्टमेंट बुक करून टाकलं, त्यासाठी एकूण $२०० भरून टाकले, माझ्यासाठी इस्त्री, फिल्टर, डिनर सेट वगैरे अशा किरकोळ वस्तू घेऊन ठेवल्या. मला ही मदत खूप उपकारक ठरली. हे मदत करणारे उत्तर भारतीय आणि तेलुगू होते. इथे पोहोचल्यानंतर बँकेत घेऊन जाणं, सुरुवातीच्या खरेदीसाठी नेणं, इन्शुरन्ससाठी कार्ड वापरू देणं, डिपॉजिटसाठी कार्ड वापरू देणं वगैरे मदत खूप महत्वाची होती. काही दिवसांनंतर क्ष महाशय मला कार्यालयात भेटले. माझी टीममध्ये ओळख करून दिल्यावर क्ष ने मला आपण आधी पुण्यात बोललो असल्याची ओळखच दाखवली नाही. अजिबात नाही! मग मीच जो ओळख करून देत होता त्यास म्हटलो "आय गेस आय स्पोक विथ हिम इन पुणे." असं म्हणून मी प्रश्नार्थक मुद्रेने क्ष कडे पाहिलं. क्ष ने कसेबसे हो म्हटले. आजपर्यंत क्ष माझ्याशी इंग्रजीमध्येच बोलतो. एकदा असाच तो त्याच्या कुटुंबकबिल्यासोबत फिरत होता आणि आम्हाला (म्हणजे मला आणि माझ्या बायकोला) भेटला. त्याने इंग्रजी पाजाळायला सुरुवात केली पण दोघांच्याही बायका मराठीमध्ये सुरु झाल्या; मग मी मराठी बोलल्यानंतर नाईलाजाने तो ही मराठी बोलायला लागला. मला एकदम हुश्श झालं; म्हटलं चला बोळा निघाला. पण कसचं काय, नंतर तो प्रत्येक ठिकाणी माझ्याशी पुन्हा इंग्रजीमध्येच बोलायला लागला. आता बोला! अजूनही तो माझ्याशी इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये बोलतो. माझ्यामुळे काही त्रास होईल म्हणून त्याने मला पुण्यात भीक घातलीच नाही. त्यामुळे मूर्सव्हीलमध्ये भीक घालायचा प्रश्नच उद्भवणारच नाही असे त्याला वाटले असावे. अर्थातच मला त्याच्याकडून काही मदतीची अपेक्षा नव्हतीच. त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे आमची फक्त ओळखच राहिली; मैत्री नाही होऊ शकली. बाकी ५-६ मराठी लोकांशी ओळख झाली आणि त्यापैकी एका कुटुंबाशी खूप चांगली मैत्री झाली. पण बाकीचे मराठी लोकं मात्र अंतर ठेवूनच संपर्क ठेवत असल्याचे लक्षात आले. आमच्या प्रोजेक्टमध्ये एक हैदराबादचा मराठी मुलगा आहे. त्याच्याशी प्रयत्न करूनही मला मराठीत बोलता आले नाही. तो माझ्याशी एकही शब्द मराठीत बोललेला नाही. आता काय करावे? अजून एक मराठी कुटुंब अमेरिकेत ११ वर्षापासून राहते आहे पण आम्ही अमेरिकन आहोत हे ठसवण्यातच त्यांचा बराचसा वेळ खर्ची पडतो. आम्ही काही मराठी कुटुंबांना घरी बोलावले. आमचे वास्तव्य कमी काळाचे असल्याने सगळ्यांना एकत्र बोलवण्याइतपत सामग्री आमच्याकडे नाही. आश्चर्य म्हणजे इथे वर्षानुवर्षे राहणार्‍या मराठी लोकांनीदेखील तसा विचार कधीच केलेला नाही. पण ही मंडळी नेहमी धास्तावलेली असतात. यांच्याकडे गेलं म्हणजे यांनाही बोलवावं लागेल; मग ती लफडी करावीच कशाला? म्हणून मग मराठी लोकं एकमेकांकडे क्वचित जातात किंवा भेटतात. तेलुगू लोकं एकत्र येऊन दणक्यात सण-समारंभ साजरे करतात. बिनधास्त अमेरिकन क्लायंटसमोरदेखील धाडधाड तेलुगूमध्ये बोलतात. कुणाच्या बापाला भीत नाहीत आणि लाजत तर अजिबात नाहीत. तेलुगू माणूस आहे म्हटल्यावर दिलखुलासपणे तेलुगूमध्येच बोलतात. चुकूनही इंग्रजीमध्ये बोलत नाहीत. हिंदीचा तर संबधच नाही. आमच्या इथे मॅनेजरने फतवा काढला होता की अ‍ॅट लिस्ट गोरा समोर असतांना तेलुगू बोलू नका. दोन दिवसांनंतर या फतव्याचं फदंफदं झालं. आम्ही जिथे बसतो तिथे सतत तेलुगू कानावर आदळतं. असं वाटतच नाही की आपण अमेरिकेत आहोत. आजकाल दोन गुज्जू आमच्यासोबत कार्यालयात येतात (मी पण कुणासोबतच जातो; माझ्याकडे कार नाही). ते दोघे गुजरातीमध्येच बोलतात. अगदी एकमेकांना नवीन होते तेव्हादेखील नावे कळल्यावर ते सरळ गुजरातीमध्ये सुरु झाले. तसे ते त्यांच्या चेहर्‍यावरून पक्के गुज्जू वाटतातच. त्यांच्या डोळ्यातच ढोकळा, डॉलर, आणि दांडियाचं अजब मिश्रण असतं. या पार्श्वभूमीवर मराठी लोकांच्या धास्तावलेल्या आणि बुजर्‍या वागण्याचे मला कुतुहल वाटते. इथे आपला मर्द मावळा स्वभाव कुठे जातो कुणास ठाऊक. तेलुगू लोकांच्या इथल्या राहण्याची काही ठळक वैशिष्ट्ये जाणवली. ते बिनधास्त कुठेही असतात आणि जातात. दिवसातले जवळ-जवळ २४ तास त्यांच्या मेंदूमध्ये डॉलर - रुपया कन्वर्टर कार्यान्वित असतो. जिथे डील्स असतात तिथे तेलुगू लोकं नाहीत असं शक्यच नाही. कुठे किती कसं खर्च केल्यावर किती डॉलर्स परत मिळणार आहेत आणि काय आणि कसं घेतल्याने किती डॉलर्स वाचणार आहेत याची खडानखडा माहिती हवी असल्यास तेलुगू लोकांकडे बिनधास्त जाऊन विचारावे. ते सांगतीलच असं नाही पण विचारायला हरकत नाही. एकाने तर थँक्सगिवींगच्या वेळेस त्याचा चालू फोन नंबर बदलून टाकला कारण की नवीन सिमकार्ड अर्ध्या किमतीत मिळत होते. एक-दोन डॉलर्सच्या फायद्यासाठी ही मंडळी नाना तर्‍हेच्या क्लृप्त्या योजत असतात आणि अमलांत आणत असतात. राहणं तसं यांचं गचाळच असतं. ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी बहुतेक सगळेच तेलुगू धडपडत असतात. मला एकाने खूप सल्ले दिले; अमुक एक क्रेडिट कार्ड घे, त्यावर १०% कॅशबॅक आहे; भारतात फोन करण्यासाठी अमुक एक सेवा वापर, ४० मिनिट्स जास्त मिळतात...वगैरे वगैरे. मी त्याला सरळ विचारले की तुला माझी एवढी काळजी कशासाठी. तो चक्क दात काढत म्हणाला "आय वुईल गेट रेफरल बेनेफिट"! मी हात जोडले. इथे बहुतेक डॉलर-रुपया या तोलकाट्याच्या मध्यावर लोकं जगतात. सोशल लाईफ खर्चिक प्रकरण आहे. मी पाहिलं आमच्या इथे लोकं दुसर्‍यांच्या घरी जायला आसुसलेले असतात. आढेवेढे न घेता येतात. अर्थात मराठी लोकं फारसे येत नाहीत. फुकट काही मिळत असल्यास भारतीय लोकं अग्रक्रमाने पळतात. आमच्या कम्युनिटीच्या कार्यालयात स्नॅक्स ठेवतात कळल्यावर आपले महान भारतीय रोजच्या रोज घरी स्नॅक्स घेऊन जायला लागले. दोन-दोन पाकिटं चिप्सची, प्रेट्झेल्सची पाकिटं...येऊ द्या...घरी न्यायची आणि ठेवून द्यायची. शेवटी कार्यालयातल्या लोकांनी स्नॅक्स ठेवणं बंद केलं. कुणाला कार्यालयात काही काम असेल तर त्यावेळेस वेळ काढण्यासाठी म्हणून थोडे स्नॅक्स ठेवलेले असत. आता बंद! बसा बोंबलत. आणखी एक महान भारतीय तत्व म्हणजे वस्तू विकत घेऊन, वापरून, साळसूदपणे परत करून टाकायची. थोडे दिवस काम असेल तर भारतीय लोकं चक्क विकत घेऊन येतात आणि वापरून परत करून टाकतात. माझ्या एका तेलुगू मित्राने मला कंफर्टर विकत न घेण्याचा सल्ला दिला होता. पहिले तीन महिने घेऊन परत करायचा आणि पुन्हा घेऊन तीन महिन्यांनी परत करून पैसे घेऊन घ्यायचे. खल्लास! म्हणजे पैसे खर्च करायची गरजच नाही. अर्थातच हे मी करणं शक्यच नव्हतं आणि आमच्या इथल्या वास्तव्यात मी एकही वस्तू परत केली नाही. याचं इथल्या लोकांना खूप आश्चर्य वाटतं. मला या प्रकारच्या चोरी-मारी मध्ये खरोखर रस नव्हता आणि नाही. वस्तू सगळ्या हव्यात पण त्यासाठी आम्ही शक्यतो पैसे खर्च करणार नाही आणि वाट्टेल ते उलट-सुलट मार्ग बिनधास्तपणे चोखाळू हा आपला भारतीयांचा खाक्या असतो. अशा देशात 'आप' सत्तेत आलं काय किंवा देवाचा 'बाप' आला काय, काहीही फरक पडणं शक्य नाही. आपण सगळेच मुळात एक नंबरचे चालू, भ्रष्ट, अप्रामाणिक, मुजोर, आणि आळशी आहोत. असो. मी थोडी अजून चौकशी केली असता अजून बरीच मराठी मंडळी असल्याचे कळले; पण अर्थात कुणाचाच कुणाशी संबंध नाही. एकत्र गणेशोत्सव नाही; एकत्र दिवाळी नाही; गुढी पाडवा नाही, काहीच नाही. सगळे आपापल्या कोषात मग्न. याउलट हिंदी भाषक आणि दाक्षिणात्य एकत्र येऊन त्यांचे त्यांचे सण साजरे करतात. कडवाचौथ काय, सरस्वतीपूजन काय, पोंगल काय...सगळं एकत्र. तेलुगू लोकांचा अंगत-पंगतवर जास्त भर. उगीच जास्त डॉलर्स खर्च करत बसायचे म्हणजे त्यांचं डोकं दुखायला लागतं. त्यापेक्षा दोन-तीन प्रकारचे भात बनवायचे, त्यात दही-बिही टाकायचं, लिंबू-बिंबू पिळायचं आणि लेमन राईस, टॅमॅरिंड राईस सारखी नावे देऊन सगळ्यांनी खात बसायचं. फार झालं तर अतांक्षरी-बिंताक्षरी खेळायची. संपलं सेलिब्रेशन! नो कॉम्प्लिकेशन्स! याउलट हिंदी भाषक! शक्य तेवढा फिल्मी माहोल केल्याशिवाय त्यांना सेलिब्रेशनची मजाच वाटत नाही. महागड्या गोष्टी खरेदी करायच्या, साध्या साध्या वाढदिवसाला महाग कपडे, गालिचे, भरपूर पदार्थ, भडक मेकप करवून घ्यायचा, त्यासाठी भरमसाठ डॉलर्स खर्च करायचे, भरपूर नट्टापट्टा करून मिरवायचं आणि साधारण ६०% वेळ चहाटळकी करायची असं यांच्या सेलिब्रेशनचं स्वरूप. भडकपणा ठासून भरलेला. पण मराठी लोकांचं मला असं काहीच दिसलं नाही. अहो निदान चहा आणि दोघात एक बिस्कीट देऊन तर सेलिब्रेशन करा! पण नाही, कौन झंझट मे पडेगा यार!! जान देव! मराठी बोलायचं तरी यांची बोबडी वळते; एवढं सेलिब्रेट वगैरे कोण करत बसेल...आम्ही गरीब असलो म्हणून काय जाहले, आमुच्या मनाची श्रीमंती अपरंपार, चला हवा येऊ द्या.... शनि-रवि मॉल्समध्ये फिरायला किंवा शॉपिंगला जायचा हा ट्रेंड एक अनाकलनीय आहे. दूध, दही, अंडी, पाव आणणं हेच माझ्यादृष्टीने शॉपिंग असतं. पण नाही, काहीतरी छान-छान (बहुधा बिनकामाचं) विकत घेतल्याशिवाय शॉपिंग पूर्ण होत नसते. मॉलमध्ये का फिरायचं असतं हे मला अजून कळलेलं नाही. एखाद्या वेळेस गेले तर ठीक आहे पण महिन्यातून दोन-तीनदा मॉलमध्ये फिरायला जाण्याने काय साधतं हे मला अजून कळालेलं नाहीये. माझ्या एका सहकार्‍याची अर्धांगिनी (हिंदी) खूप उत्साही आहे. ती कोण भारताला परत जातंय आणि कोण नवीन येतंय याची सगळी माहिती ठेवते. जे भारतात परत जाणार असतात त्यांच्याशी ती ओळख वाढवते. शेवटच्या काही दिवसात तिचं भारतात परत जाणार्‍या कुटुंबाविषयीचं प्रेम अक्षरशः उतू जातं. खायला घेऊन जाणं, चहा घेऊन जाणं वगैरे युक्त्या करून ती त्या कुटुंबाविषयी आपल्याला किती काळजी आहे असं दाखवते. आणि मग त्यांना नको असलेल्या सगळ्या वस्तू पदरात पाडून घेते. काही विकत तर काही फुकट! मग त्यात कुकर, भांडी, इस्त्री, कपबशा, ब्लँकेट्स, खुर्च्या अशा वस्तू असतात. मग जे भारतातून येतात त्यांना ती त्या वस्तू किफायतशीर भावात विकते. तिचा वेळ मजेत जातो आणि चार डॉलर्स गाठीशी येतात ते निराळे. आहे की नाही गंमत? साहजिकच तिला सगळे दचकून असतात. एक मराठी कुटुंब आम्हाला अचानक भेटलं. त्यांच्या घराजवळच भेट झाल्याने त्यांनी खूप वेळ दारातच गप्पा मारून आम्हाला घरात बोलावलं आणि सरबत दिलं. त्यांचं ४-५ बेडरूम्स असलेलं मोठं घर आहे. आम्हाला मराठी कुणी भेटल्याचा आनंद झाला. नंतर काही दिवसांनी आम्ही त्यांना चहा आणि न्याहारीसाठी बोलावलं. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क ठेवला नाही. आम्ही सुरुवातीला फोन केले परंतु प्रतिसाद उत्साहवर्धक नसल्याने आम्ही फोन करणे बंद केले. एक दिवस अचानक त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं. मग काही दिवसांनी आम्ही देखील त्यांना बोलावलं. आमच्या सामग्रीच्या मानाने जसं जमलं तसं केलं. नंतर पुन्हा त्यांनी संपर्क तोडला. फोन केला तर जुजबी काहीतरी बोलून बंद केला. त्यांना शेवटचा फोन करून आता जवळपास दोन ते अडीच महिने झालेत. आता पुन्हा तरी काही संपर्क होण्याची शक्यता दिसत नाही. असे का? कसली ही भीती? कुणी घरात येऊन ठाण मांडून बसेल याची? पैसे मागेल याची? सतत बाहेर घेऊन जाण्याची विनंती करेल याची? कुणी आजारी पडलं तर उगीच मदत-बिदत करत बसावी लागेल याची? अनाकलनीय. अजून एक मराठी कुटुंब आहे. त्यांची फिलॉसॉफी वेगळीच आहे. ज्यांना भारतात परत जाण्यासाठी काहीच दिवस राहतात त्यांच्याशी ते हळूहळू संबंध कमी कमी करत पूर्णपणे तोडून टाकतात. कारण काय, तर उगीच इमोशनल अ‍ॅटॅचमेंटचा नंतर त्रास होतो म्हणून!! खूप छान एकत्र वेळ घालवल्यानंतर शेवटी शेवटी हे कुटुंब भेटायला देखील येत नाही किंवा फोनही करत नाही. त्यांचे मित्र भारतात परत गेल्याचं मग त्यांना दुसर्‍या कुणाकडून कळतं. सोयीस्कररीत्या ते त्यांच्या मित्र कुटुंबाची भारतात जाण्याची तारीख विसरून जातात आणि ते कुटुंब कधी संपर्कातच नव्हते असे मानून त्यांना त्यांच्या आयुष्यातून हद्दपार करतात. आता बोला! काय म्हणावे या तर्‍हेवाईक वागण्याला? पण असे खरेच आहे आणि आम्ही आता सध्या त्याचा अनुभव घेत आहोत. तर असे आहेत काही कडू-गोड अनुभव आणि काही निरीक्षणे. माझी निरीक्षणे चुकीची देखील असू शकतील. कुठ्ल्याच भाषेला, जातीला, भाषिक समुदायाला नावे ठेवण्याचा किंवा त्यांची उणी-दुणी काढण्याचा माझा प्रयत्न नाही आणि अधिकारही नाही. नकळत तसे घडले असल्यास क्षमस्व...अजून काही अनुभव मिळाल्यास नक्कीच सांगतो...
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हा चांगला पर्याय आहे. :-) माझा बुद्ध्यांक कमी असेल म्हणा किंवा मी व्यवहारचतुर नसेल पण या गोष्टी माझ्या कधीच लक्षात आल्या नाहीत. :-) मी कधी केल्या नाहीत आणि कधी लक्ष दिले नाही. मानसिक त्रास वाढवून ठेवतात अशा गोष्टी; त्यामुळे तिकडे लक्षच जात नाही हे उत्तम! वॉलमार्टपेक्षा फूड लायन मध्ये भाज्या स्वस्त असतात; किंवा अल्डीजमध्ये स्वस्त असतात; किंवा दूध अमुक एका ठिकाणी ५० सेंट्सने कमी असतं अशा गोष्टींकडे मी अजिबात लक्ष दिले नाही. या सगळ्या गोष्टींचा ट्रॅक ठेवायचा म्हणजे मला न झेपणारे काम! :-) त्यापेक्षा जी खरेदी लवकर आणि सोयिस्कररीत्या होईल ती करायची आणि विषय संपवायचा असा खाक्या ठेवल्याने माझा वेळ, ऊर्जा, आणि मनःस्ताप वाचले. तो वेळ मी अजून दुसर्‍या बर्‍या कामांत वापरल्याने सत्कारणी लागला असे म्हणता येईल. अर्थात, हे एक स्कील आहे आणि त्यात चांगली बचत होऊ शकते. आणि ज्यांना हे जमतं त्यांच्याविषयी मला आदर वाटतो. पैसे वाचवण्याचे मार्ग शोधून, त्यांचा अभ्यास करून पैसे वाचवणं ही माझ्यालेखी खूप महत्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे.

असे काही बरेवाईट अनुभव येतच असतात. मराठी लोकांबाबत मात्र तुमच्या निरीक्षणाशी मी बराचसा सहमत आहे. याला मी मराठी-सिंह वृत्ती म्हणतो...... म्हणजे एक सिंहाने आपल्या एरियात दुसर्‍या सिंहाला बघितल्यावर दिलेला लूक. ;) . :) .. ("अरे मी सोडून इतर मराठी सुद्धा आहेत(या जगात)? माझ्या एरियात हा काय करतोय?") गेल्या काही वर्षात बरेच चांगले आणि काही न-चांगले लोक भेटले. माझ्या लक्षात बर्‍याचदा चांगलेच राहतात म्हणून काही विचित्र वागणुकींचे विशेष वाटले नाही.

उडदामाजी काळे गोरे... उडदाच्याऐवजी मूग, मटकी, मसूर, डाळ असं काहीही चालेल. अमराठी लोकांच्या सहवासात भरपूर राहिलो आहे आणि सगळ्यांच्यात सगळं असतं!!

समीरसूर यांच्या http://www.misalpav.com/comment/556399#comment-556399 प्रतिसादात असे लिहीले आहे की... मिपावरच्या धमाल मुलगा, श्रीरंग जोशी, हेमांगीके आणि अजून बर्‍याच मिपाकरांनी मार्गदर्शन केले होतेच आणि कुणी मिपाकर इथे असता तर त्याने मदत नक्कीच केली असती यात शंका नाही. या वाक्यामुळे मिपाकर असल्याचा अभिमान वाटला. याचा अर्थ असाही की जे मराठी लोकं असं विचित्र वागतात त्यांना लवकरात लवकर मिपाकर करून घ्यावे.... आपला वाण नाही तरी गुण लवकरच लागेल..

मी अ‍ॅटलांटाच्या उपनगरात जवळपास ३ वर्षे राहत होतो. तिथे बरीच मराठी कुटुंबे आहेत. गणेशोत्सव व इतर काही कार्यक्रम दणक्यात साजरे होतात. माझ्या ओळखीतल्या आजूबाजूच्या व नव्याने ओळख झालेल्या एकूण ८-१० मराठी कुटुंबाचे अनेक एकत्र कार्यक्रम होत होते. एकंदरीत तिथली मराठी मंडळी एकमेकांना धरून होती. तुम्ही लिहिले तसा तेलगू मंडळींचा अनुभव मला देखील आला. इतरांचा विचार न करता ते कायम तेलगूतच बोलतात. त्यांच्या कार्यक्रमात इतर भाषिकांना फारसे सामावून घेत नाहीत.

१)मराठी लोक परदेशात गेल्यावर आप आपल्या "XXX" अभिमान फारच बाळगतात आणि दुसऱ्याने कितीही मदत केली तरी त्याची उपेक्षा करतात आणि त्यांच्याच माणसाने पिडलेतरी त्याचा उदोउदो करतात . २)गळयात पडून कामापुरता मामा आणि नंतर त्याला दुर्लक्षून तोंड वर करून चालू पडतात . ३)कोण काय होता आणि आता काय झाला किती पुढे गेला याचीच उजळणी चालू असते .मत्सर/हेवा . ४)कोणी भारतात सुटीला जात असेल तर त्याच्याकडे एखादी वस्तु पाठवतात .ती देण्यास गेल्यावर त्याचा नातेवाईक त्याला दारातूनच घालवतो . ५)वरील दाखले पाहून नवीन येणारेही तसेच वागतात . तेलगू आणि इतरांबद्दल नंतर .
लेखक: Pain वेळ: गुरुवार, 02/20/2014 - 10:34 Permalink

आणि सगळ्या कम्युनिटीजमधे तेलुगू लोकांची संख्या मोठी आहे. आमच्या कम्युनिटीमध्ये ५०% पेक्षाही जास्त तेलुगू लोकं आहेत. त्यांची संख्या इतकी जास्त का यामागचं कारण मला अजूनही कळालेलं नाही. आमच्या कम्युनिटीमध्ये फिरतांना क्षणभर आपण हैदराबादमध्ये तर नाही ना अशी शंका यावी इतके तेलुगू लोकं आहेत तुम्ही लेखात व्यक्त केलेल्या या शंकांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. जाणकार प्रकाश टाकतीलच. 1) आंध्र प्रदेशातील विद्यापीठे अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांवर 80% - 90% गुण उधळतात. त्यामुळे अमेरिकन विद्यापीठात प्रवेश मिळणे सोपे जाते. पुणे - मुंबई किंवा इतर ठिकाणी जेथे 60% मिळण्याची मारामार असते त्यातुलनेत हे लोक उजवे भासतात. 2) MS हे IT मध्येच करतात, consultancy जॉइन करतात, खोटा अनुभव दाखवून नोकर्‍या मिळवतात. मी पाहिलेल्या एका resume मध्ये BS/ BE ला 90% गुणांच्या जोडीला 4 वर्षे TA/RA केल्याचे लिहिले होते. (भारतात कुठेही TA/RA दिला जात नाही). तसेच अजिबात अनुभव नसताना 6 वर्षे अनुभव असल्याचेही ठोकून दिले होते साहजिकच त्याला नोकर्‍या भराभर मिळत गेल्या पण 2-4 महिन्यांच्यावर एकही टिकली नाही. नोकरी नाही जमली तरी परत गेल्यावर MS केलेल्या मुलाला 1 कोटी + हुंडा मिळतो. (मुलींचे पालक बहुदा काट्याने काटा काढावा तसा हुंडा द्यावा लागू नये म्हणून त्यांनाही MS करण्यास प्रोत्साहन देत असावेत. ;) ) बाकी 1 bhk अपार्टमेंटमध्ये 10-12 लोकांनी राहाणे, वर्षानुवर्षे sink / bathroom स्वच्छ न करणे, महिन्या - दीड महिन्यासाठी भारतात जाताना costco मधून handycam घेणे आणि आल्यावर तो परत करणे इ. लीला याची देही याची डोळा पाहिल्या आहेत. (याचा परिणाम म्हणजे apartment manager कडून सगळ्यांना हाकलून दिले जाणे, Costco ने electronics चा return period 15 दिवसांवर आणणे वगैरे वगैरे) भारताच्या बाकी कुठल्याच भागातून येणारे लोक इतके महान नसतात पण बाहेरच्यांना हा फरक माहीत नसल्याने त्यांच्या लेखी सरसकट सगळेच भारतीय तिरस्कृत होतात :( तुम्ही उदाहरणे दिल्याप्रमाणे केवळ 1 मराठी नमूना आजपर्यंत भेटला आहे. बाकीचे सगळे (इतर भाषिकसुद्धा) अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने वागवत असल्याचा अनुभव आहे. न्यूयॉर्कमध्ये आला असता तर फारच वेगळे चित्र दिसले असते. असो.

धन्यवाद! उपयुक्त माहिती मिळाली. पण मुळात अमेरिकेत येण्यासाठी आणि इथेच राहण्यासाठी इतका आटापिटा का करतात हे लोकं? काहीही करून अमेरिकेतच जायचे आणि सात पिढ्यांचा अधिकार असल्यासारखे गुर्मीत रहायचे हा अट्टाहास कशासाठी? अमेरिकेचे इतके पराकोटीचे आकर्षण का? यामागे काय कारण असू शकेल? आधी गुजराती होते आणि आता बहुधा तेलुगू आहेत. आमच्या प्रोजेक्टमधल्या एका तेलुगू माणसाने भारतात फोन करण्यासाठी म्हणून एक फोनचा प्लॅन घेतला. त्यात अमर्यादित भारत कॉल्स होते. या हीरोने एका महिन्यात २५०-३०० तास भारतात फोन केले. त्या कंपनीने त्याला फोन करून त्याची सेवा बंद केली. नंतर त्याने वॉनेज घेतले आणि तिथंही सगळ्या मर्यादा ओलांडल्या. त्यांनी पण त्याला फोन करून त्याची सेवा बंद केली. आणि मी खोटं सांगत नाहीये; खोटं बोललो तर स्वप्नात प्रीती झंगियानी येईल माझ्या. तो हीरो अक्षरश: रात्र-रात्रभर फोनवर बोलत असे. कार्यालयात जागेवरून तासनतास गायब राहत असे आणि कुठेतरी लपून फोनवर बोलत बसे. नंतर त्याला खूप शिक्षण मिळाले तेव्हा कुठे तो जरा ताळ्यावर आला. अजूनही त्याची मिसाल आमच्या इथे नवीन येणार्‍या लोकांना दिली जाते. त्याच्या एका मित्राने त्याला सहा महिन्यांपूर्वी $६० उधार दिले होते. काल तो त्याच्याजागेवर गेला आणि जोरात ओरडू लागला. "प्लीज टेल मी, वुईल यू एवर रिटर्न माय मनी? बी फ्रँक, इफ यू वोंट, दॅट्स ओके, बट टेल मी फ्रँकली. इट'स बीन मोअर दॅन सिक्स मन्थ्स नाऊ..." तो एवढ्या जोरात ओरडायला लागल्याने त्या हीरोला खूप ऑक्वर्ड वाटलं. सगळे शांतपणे बघायला लागले. शेवटी त्याने तिथे उभं राहून पैसे ट्रान्स्फर करायला लावले आणि मग तो गेला...अशी माणसं कुठल्याही समुदायात असू शकतात हे मान्य पण तेलुगू लोकांच्या बाबतीत मी असले प्रकार जास्त पाहिले. त्यांचे काही गुणधर्म खूप वेगळे आहेत हे नक्की. आणि माझ्या मते प्रत्येक विशिष्ट समुदायाचे विशिष्ट असे गुणधर्म असतातच. तमिळ मुली खूप साध्या राहणार्‍या असतात. गुजराती गोड बोलणारे असतात. उत्तर भारतीय खूप आक्रमक आणि भडक असतात. "जो होगा सो देखा जायेगा..." असा खाक्या उत्तर भारतीयांमध्ये जास्त आढळतो. माझा एक सहकारी त्याच्या अत्यंत सुपरअ‍ॅक्टीव्ह मुलासोबत माझ्या घरी आला. त्याचा मुलगा खूप जास्त दंगा करतो. सगळीच लहान मुलं करतात पण हा खूप जास्त करतो. त्यामुळे त्यांना कुणी घरी बोलवत नाही इतका तो जास्त मस्ती करतो. बाकीच्यांच्या लहान मुलांना धबड-धबड मारणे, वस्तू फेकून मारणे, भिंती खराब करणे असल्या गोष्टी तो किरकोळीत करतो. त्यामुळे इथे नुकसान होण्याची खूप शक्यता. तो येणारच असेल तर लॅपटॉप, फोन्स आणि इतर सगळ्या महत्वाच्या गोष्टी उंचावर ठेवाव्या लागतात. विशेष म्हणजे त्याचे आई-वडील त्याला एका शब्दानेही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे त्याच्या आई-वडीलांविषयी पण लोकांमध्ये नाराजी असते. तर ते एकदा (गेल्या शनिवारी) घरी आले. माझा लॅपटॉप खालीच होता. माझ्या छातीत धस्स झाले. खेळता-खेळता तो किचनमधल्या स्टीलच्या दोन डिशेस घेऊन आला. आणि आमच्याजवळ येऊन बसला. लॅपटॉप सुरु होता. माझ्या मनात भीती की याने जर त्या डिशेस भिरकावल्या आणि त्या जर माझ्या लॅपटॉपचा कपाळमोक्ष करून गेल्या तर काय करावे. आणि त्याचे वडील शांत बसलेले. मला कळेना की या माणसाला इतकी साधी गोष्ट कशी कळत नाहीये. त्याच्या मुलाचे प्रताप इथे प्रसिद्ध आहेत. मी शांत राहिलो आणि दुसर्‍याच मिनिटाला त्याने एक डीश भिरकावली. ती सूसूसू करत लॅपटॉपच्या पॉवरबटनजवळ आदळून दूर पडली. थोडक्यात स्क्रीन वाचलं. आणि ब्लूस्क्रीन नावाची काहीतरी एरर आली. ते काय मला अजूनही कळलं नाही. मी ताडकन उठून लॅपटॉप उचलून ठेवला. तो जर फुटला असता तर त्याचे आई-वडीलांनी त्याला अजिबात रागावले नसते पण माझं नुकसान झालं असतं. नंतर तो ब्लाईंड्सच्या पट्ट्यांना ओढू लागला. आमच्या इथे प्रत्येक डॅमेजचा हेवी चार्ज घेतात. माझा जीव खालीवर होत होता. त्याची दिव्य आई "खेलने दो, खेलने दो, कुछ नही होता, हमारे घर पे तो हम सब करने देते है" असं म्हणून माझा पारा वाढवत होती. तुमच्या घरी त्याने तुमचा खून करून घराला आग लावली तरी मी तोंडातून ब्र देखील काढणार नाही पण माझ्या घरी जरा त्याला थोडंतरी सांभाळा कारण माझे परत जायचे दिवस जवळ येत आहेत असं मी मनात म्हटलो. काय म्हणावे याला? कसं बरं कळत नसावं लोकांना? पण दुसर्‍याची वस्तू कशीही वापरा; चालतं ही आपली मनोवृत्ती. तो गेल्यावर मी देवाच्या आणि माझ्या लॅपटॉपच्या पाया पडलो. तेच एक अमराठी पण मराठी बोलणारे कुटुंब घरी आले होते, त्यांना जुळे मुले होती. त्यांनी जरा गडबड केली की बाप 'बाप'पणा दाखवत होता आणि आई मुलांचं लक्ष दुसरीकडे वळवत होती. काहीही नुकसान होऊ नये म्हणून ते सतत काळजी घेत होते. हा फरक असतोच असे मला वाटते. संस्कार, संस्कृती, जीन्स, इतिहास, वर्तमान, शिक्षण, समाजरचना इत्यादी सगळ्या गोष्टींमुळे समुदायाचे असे स्पेसिफिक गुणधर्म ठळक होत असावेत.

त्यात अमर्यादित भारत कॉल्स होते. या हीरोने एका महिन्यात २५०-३०० तास भारतात फोन केले. त्या कंपनीने त्याला फोन करून त्याची सेवा बंद केली. २५० तास म्हणजे दिवसाला ८ तास फोनवर? बापरे...इतके तर कॉल सेंटर वाले पण बोलत नाहीत. बाकी अमर्यादित भारत कॉल्स होते तर कंपनीने सेवा का बंद केली? विशेष म्हणजे त्याचे आई-वडील त्याला एका शब्दानेही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाहीत. परदेशात जनरली मुलांना बोलले जात नाही. मुलांवर वचक ठेवणे हा गुन्हा असू शकतो. नॉर्वेत मी हे अनुभवले आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर घरी जरी ओरडला आणि शेजार्‍याने ऐकले तर तो तुमच्या विरूद्ध तक्रार करू शकतो.

प्रीपेड कंपनीच्या प्लॅनमध्ये खाली लिहिलेले असते की "अनलिमिटेड कॉलिंग दज नॉट मीन अनरिझनेबल कॉलिंग". त्यांच्या अमर्यादित कॉल्सनादेखील एक वरची मर्यादा असते. इतके तास बोलल्यानंतर त्यांच्या सिस्टीममध्ये आणि फायद्यामध्ये काहीतरी समस्या होत असावी. साधारण सरासरी कमाल मर्यादा ओलांडल्यावर प्रीपेड कंपन्या अमर्यादित सेवेचा प्लॅन असला तरी सेवा बंद करतात. अगदी मारणे वगैरे अपेक्षित नाही पण मुलांना धाकात ठेवणे आणि त्यासाठी थोडे-फार रागावणे यात काही प्रॉब्लेम असावा असे वाटत नाही. बर्‍याच पालकांना मुले मस्ती करत असतांना जरबेने धाकात ठेवणे मी पाहिले आहे. आमच्याकडे आलेल्या दुसर्‍या कुटुंबातल्या बापाने त्याच्या जुळ्या मुलांना व्यवस्थित धाकात ठेवले होते आणि तो प्रसंगी ओरडत देखील होता. तेवढं करण्याने काही प्रॉब्लेम होत नसावा कारण एवढे ओरडणे सहसा घराच्या बाहेरही पडत नाही. अगदीच वाट्टेल तसा (दुसर्‍यांच्या घरी) धिंगाणा घालू देणे हे थोडं खटकण्यासारखं आहे.

आमच्याकडे एक उत्तर भारतीय लग्न करून दुसऱ्या /तिसऱ्या दिवशी हमेरिकेत आला होता (बायकोला भारतात ठेवून). मग काय नुसता कासावीस. रात्रभर वोनेज वर चिकटलेला. आणि दिवसा ऑफिस मध्ये झोपायचा. फोन कॉमन असल्यामुळे आम्हाला बोलायला मिळायचेच नाही… वर आमची झोप मोड व्हायची ती निराळीच.

पहिल्या मुद्द्याशी सहमत. या काही ठेराविक ठिकानच्या विद्यापीठांमध्येच भयानक प्रमाणात टक्के मिळण्याच्या भानगडीचा फटका भारतातही अनेक ठिकाणी बसला आहे.

वरच्या प्रतिसादामध्ये बिकांनी म्हटलं तसं, सगळ्यांमध्ये सगळं असतं. तेलगु, तामिळींचं निरीक्षण बरचसं बरोबर आहे. पण तरीही आता बर्‍याचं वर्षांच्या सहवासामुळे म्ह्णा किंवा सवय झाली म्हणुन असेल आता त्यांना कसं हँडल करायचं हळु हळु समजु लागतं. मराठी लो़कांचा अजुन तरी अनुभव आलाय. ऑफीस मध्ये आम्हीही दे ठोक मराठी गप्पा मारुन्,कामाच्या गोष्टीही मराठी मधुन समाजावुन सांगतो. तुम्ही म्हणता तशीही मराठी लो़कं भेटतं होती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत जाणं उत्तम्.मराठी बोलायला मिळेल ती संधी शोधण्यापेक्षा जिथे मराठी लोकं एक्मेकांशी मराठी बोलायचं टाळतात अश्या लोकांची खरचं कीव करावीशी वाट्ते. आता तर उलट विविध बोली भाषा शिकाव्याशा वाटतात. उदा. कोंकणी, मालवणी, वर्‍हाडी, कोळी,आगरी. असो. तुम्ही निराश होउ नका, अनुभवांची शिजोरी अशीच बांधुन मोठी करत न्या. लाँग वे टु गो. -- मयुरा.

लेख आणि अनेक प्रतिसाद आवडले. मराठी लोकांना असे फटकून राहण्याचा "मोडेन पण वाकणार नाही" वगैरे असल्याचा अभिमान असतो असा अनुभव आहे. इतर राज्यात गेले तरी तेलगू? कन्नडा? असे प्रश्न ते लोक (तेलगू आणि कानडी) हमखास विचारतात, पण मराठी माणसाशी संवाद साधणे अवघड असते असाच अनुभव साधारण येतो. इतरत्र गेले तर केरळी, उत्तर भारतीय लोक आपापले सण जोरात साजरे करतात पण मराठी लोक मात्र तिथले सण साजरे करायला लागतात हेही खूपदा पाहिले आहे. मराठी माणूस जातो तिथे अ‍ॅडॅप्ट व्हायला बघतो हे कदाचित याचं कारण असेल. पण तिथला होण्याच्या नादात आपण आपली मुळं विसरतोय का हे मात्र तो तपासून बघणार नाही. अर्थात बरं-वाईट, व्यक्ती तितक्या प्रकृती हे सगळीकडे लागू असतंच. पण मराठी माणूस, तेलगू माणूस, पंजाबी माणूस अशा ज्या काही प्रतिमा तयार झाल्या आहेत त्याप्रमाणेच नकळत वागणूक बदलत असावी.