Welcome to misalpav.com
लेखक: बाबा पाटील | प्रसिद्ध:
गर्भसंस्कार “ संस्कारो हि गुणान्तराधानम् ॥ ” जन्मजात प्रकृतिनुसार आलेल्या गुणांमध्ये चिकित्सेद्वारे केलेल्या संस्कारामुळे अधिक चांगले गुण निर्माण करता येतात. संस्कार प्रकृतिस्थित गुणांमध्ये बदल घडवून आणतात. संस्कार म्हणजे तो बदल जो गुणांमध्ये अधिक उत्तम गुणांचे वर्धन किंवा परिवर्तन करतो. दैनंदिन आयुष्य अगदी व्यस्त असते. बहुतेक सर्व दांपत्यांना एक किंवा दोन अपत्येच असतात. आपण त्यांना त्यांच्या अपत्यांमध्ये उत्तमोत्तम गुण येण्यासाठी प्रत्यत्न करु शकतो. जर आपण मुलांना जन्मानंतर वाढ होताना चांगले संस्कार करुन उत्तम व्यक्तिमत्व बनवू शकतो; तर गर्भावस्थेतही असे संस्कार का केले जाऊ नयेत ?? नक्कीच करता येतात… ह्यास गर्भसंस्कार असे म्हणतात.. त्यांचे महत्व आयुर्वेदाने सध्याच्या धावपळीच्या युगात अधोरेखित केले आहे. हजारो दांपत्यांनी गर्भसंस्काराद्वारे सुदृढ निरोगी व गुणी संतती अनुभवली आहे… अश्या वेळी आपण का बरे ह्याचा फायद घेऊ नये ? आयुर्वेदानुसार गर्भ संस्काराद्वारे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, स्वास्थ्य व गुणवर्धन केले जाते. गर्भसंस्काराचे टप्पे १. बीज संस्कार ( गर्भधारणेपुर्व माता-पित्याची बीजशुद्धी करुन बीजांना शुद्धीकरुन गुणवर्धन करणे ) २. गर्भ संस्कार ( गर्भ धारणा झाल्यावर प्रत्येक महीन्यात गर्भवाढीनुसार गुणवर्धन चिकित्सा करणे ) ३. शिशू संस्कार ( जन्मोत्तर बालकाच्या शारीरिक,बौद्धिक विकासाच्या दृष्टीकोणातून संस्कार करणे ) १. गर्भधारणपुर्व बीज संस्कार १. अ ] गर्भधारणोत्सुक स्री-पुरुषांची पुर्वतयारी १. प्रजननसंस्थेची व प्रजनन विधीची पुर्ण माहीती देणे. २. प्रकृतिपरिक्षण करणे. ३. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी ४. पंचकर्मोत्तर रसायन वाजीकरण औषधींचा वापर. ५. योग ( प्राणायाम व आसन ) ह्याद्वारे मनाचा शरीरव्यापाराशी समतोल राखणे. ६. गरजेनुसार औषधी चिकित्सा ( जसे अम्लपित्त , मलावष्टम्भ , शिरःशूल , इ. ) ७. आहार मार्गदर्शन ( प्रकृति व पुर्व व्याधीनुसार , प्रत्येक ऋतुनुसार आहार पथ्य-अपथ्य मार्गदर्शन ) ८. दिनचर्या मार्गदर्शन ( प्रकृती व व्याधीनुसार व व्यवसाय विचारात घेऊन दिनचर्येचे मार्गदर्शन ) १. ब ] गर्भधारण संस्कार १. गर्भधारणार्थे नैष्ठिकी ब्रम्हचर्य व मैथुन विधी ( गर्भधारणापुर्वी पाळावयाचे १ मासिक ब्रम्हचर्य व गर्भधारणार्थ करावयाचा मैथुन विधी – ऋतुनुसार काळ , वेळ , मासिक पाळीनुसार दिवस ,इ.) २. गर्भधारण पुर्व स्री पुरुषांची गर्भासाठी मानस-शारीर-बौद्धिक गुणांचे आवाहन करणे. २. गर्भधारणाकालीन संस्कार ( गर्भसंस्कार ) गर्भधारणेपासून प्रसवापर्यंत म्हणजे जन्मापर्यंत साधारण ९ महिन्यांचे नवमास परिचर्या + संस्कार १. नवमास गर्भिणी परिचर्या ( सगर्भ मातेची काळजी ) २. गर्भवाढीच्या दृष्टीकोनातून मातेसाठी मासानुमासिक आहार ३. दिनचर्या ( पथ्य-अपथ्य ) ४. मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यकर स्तोत्र मंत्र आदि चिकित्सा ५. योग ( प्राणायाम + आसने ) व ध्यान-धारणा ६. रंग चिकित्सा व गंध चिकित्सा ७. सौंदर्यचिकित्सा ह्यात काय काय केले जाते ? १. प्रत्येक महिन्यातील गर्भाची तपासणी बाळाची वाढ / परिक्षण / औषधी २. प्रत्येक महिन्यातील मातेची तपासणी व्याधी चिकित्सा ३. माता/पिता-गर्भ संवाद विधी ४. संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ) ५. प्रसव प्रक्रियेची माहीती. प्राकृत प्रसव व प्रसवकालीन व्याधी व चिकित्सा ६. प्रसवासाठी मानसिक व शारीरिक तयारी करणे. ७. प्रसव कालीन परिचर्या. ३. प्रसवोत्तर संस्कार ( माता व शिशू संस्कार ) १. शिशू संगोपन ( अभ्यंग – स्नान – धूपन - वस्र – क्रिडा – इ. ) २. शिशू षडमास परिचर्या ( स्तन्यपान विधी , निद्रा , बाळगुटी इ. ) ३. षडमासोत्तर बाल-आहार विधी ( क्षीरान्नाद व अन्नाद अवस्था ) ४. मातेस षडमास सूतिका परिचर्या (अभ्यंग धूपन स्नान पट्टबंधन औषधी आहार इ.) ५. शिशू संस्कार ( नालकर्तन स्वर्णप्राशन कर्णवेधन नामकरण इ. डॉ.प्रशांत व डॉ.प्रिया दौंडकर-पाटील. http://garbhasanskarpune.com/ & http://ayurvedandpanchakarma.com/
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

असं नाही, जरा सविस्तर खंडन करा हो! नुसते मत देणे सोपे आहे, चिकित्सा करणे अवघड.

कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर बालाजी तांबेचं "गर्भसंस्कार" नावाचं पुस्तक हमखास दिसतं. त्यामुळे या विषयाबद्दल कुतुहल होतं. या लेखाने ते कुतुहल शमण्यास मदत झाली. गर्भसंस्कारातील तीनही टप्प्यांचे पॅकेज मिळत असणार ना? कितीवर जातं पॅकेज साधारण?

गर्भसंस्कार थोतांड आहे की नाही ते काही वेळ बाजूला ठेवू या. गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल. उत्तम व्यक्तिमत्त्व आणि उदात्त विचार घेऊन आपल्या संततीने निरंतर धनसंपादन आणि उपभोगाव्यतिरिक्त काय करणे अपेक्षित आहे? किंवा त्याव्यतिरिक्त काही करणे अपेक्षित तरी आहे का? गर्भसंस्कार झालेले मूल पुढे बुद्धासारखे वगैरे "भलतेसलते" विचार ़करु लागले तर आईवडिलांना आनंद होईल की दु:ख? की असे भलतेसलते विचार येऊ नयेत म्हणूनच गर्भसंस्कार असतात?

विचार करायलाच हवा. आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जाहिरातींचं तंत्र आता खूप सुधारलं आहे. आता नुसत्या मालाची/सेवेची जाहिरात न करता विशिष्ट मानसिकतेला टारगेट केलं जातं. आजच्या काळात मुलं आणि मुलांसंबंधीच्या भावना हे एक प्रमुख टारगेट झालं आहे. आपल्या मुलाना सर्वोत्तम तेच द्यायचं या भावनेला अतोनात महत्त्व देऊन त्याचा आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी इतका अतिरेक केला गेला आहे की आता गर्भात असलेल्या मुलालाही नैसर्गिक अनुभव मिळणे दुरापास्त झाले आहे. "कॅच देम यंग"च्या खेळात आईवडिलांनीही सहभागी होऊन त्या कोवळ्या जिवाच्या आयुष्याचा ताबा कुठवर घ्यावा यावरही प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? जर शक्य असतं तर लोकांनी आतापर्यंत एकसारखं पण डिझाईनर लाईफ असलेल्या ठोकळ्यांचा समाज बनवला असता. घरात पुस्तकं, आजीआजोबा, येणार्‍या जाणार्‍यांचा राबता, परसादारी बाग, कुत्री-मांजरं, शेजारपाजारचे सवंगडी आणि हुंदडायला भरपूर मोकळी जागा व वेळ. इतकं असलं की कसलेही संस्कार "करायची" वेळ येत नाही. अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे?

हेच तर शिकवायचय्,मुलांना नाही त्याच्या आई बापाला थोडी अक्कल आली की बाळ बरचस शहाण होत.गर्भ संस्कार हे बाळा साठी नाही तर त्याच्या पालकांकरिता आहेत आज्जी आजोबांसह.आपलीच पिढी संस्कार विसलीय हो,ते पुढच्या पिढीत कसे जाणार ?

इंडियाना जोन्स च्या एका भागात हॅरिसन फोर्ड आपल्या वडिलांना ( शाँ कॉनरी) विचारतो, की मी मोठा होत असताना तुम्ही मला कधीच काहिच का शिकवलं नाहीत? त्यावर शाँ कॉनरी उत्तर देतो की मी तुला एक वडील जी देऊ शकतात ती सर्वोत्तम भेट दिली? कुठली? "मी तुझ्या खाजगीपणाचा आदर केला, मी तुला स्वावलंबन शिकवलं.." - (I respected your privacy, I taught you self reliance)!! अगदी त्याची आठवण झाली आपला प्रतिसाद वाचून. आपण म्हणाला आहात ते सगळं फारच विचारात पाडणारं आहे...धन्यवाद!

मी गर्भसंस्कारांचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही ह्याची नोंद घेऊनच पुढील प्रतिसाद वाचावा ही विनंती. >>>>सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? असा अट्टाहास नसतोच. पण बदलत्या काळात, बदलत्या मानसिकता, मुलांचे बदलते भरकटणे आणि अनाकलनिय घटना ह्यांनी धास्तावलेल्या पालकांना वाटतं आपल्या अपत्यांनी ह्या पासून दूर राहावं, त्यांना ह्याचा वारा लागू नये, संसर्ग होऊ नये. त्यांनी कोणी 'ग्रेट' बनण्यासाठी नाही तर कमीतकमी आपल्यासारखे पापभिरू, सुसंस्कारी आणि सरळमार्गी व्हावं ह्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करावं. असे वाटण्यात गैर काय आहे? 'संस्कार' शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. तेव्हढ्या व्यापक दृष्टीकोनातून विचार न करता 'कर्मकांडा'वर लक्ष केंद्रित होतं त्यामुळे पालकांना मानसिक समाधाना व्यतिरिक्त काहीच हाती लागत नाही. मोठमोठे रोग होऊ नयेत, डॉक्टरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागू नयेत, आपल्याला शारीरिक, मानसिक झळ पोहोचू नये म्हणून आपण आधीच कांही उपाययोजना करतो. जसे, जेवणाच्या आधी हात धुणं, बाहेरून आलं की पाय धुणं, मच्छरांना घरात प्रवेश प्रतिबंधीत करणं, घरातला कचरा काढणं किंवा रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरणं. आपला प्रयत्न रोगराईला दूर ठेवणं हा असतो. पण म्हणून कोणी घरात कधी आजारी पडतच नाही का? पडतात. पण काळजी घेणं आवश्यक असतच नं? वेगवेगळ्या संस्कारांचा (गर्भसंस्कारांसहित) उद्देश 'प्राथमिक उपचार' ह्या पातळीवर सामाजिक रोगराईपासून आपल्या अपत्याला हानी पोहोचू नये हाच असतो. मूल जन्मल्यानंतर, घरी पालकांकडून, शाळेत शिक्षकांकडून, अतिरिक्त वाचनातून, आजूबाजूच्या समाजाकडून, प्रसारमाध्यमांकडून, संस्कार होतंच असतात. पण कुठे कांही कमी पडू नये ह्या काळजी पोटी सर्व उपलब्ध मार्ग वापरले जातात. गर्भसंस्कार त्यातीलच एक. >>>>अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे? सहमत. फक्त 'काय संस्कार होणार...' पेक्षा 'काय चांगले संस्कार होणार...' अशी सुधारणा सुचवितो.

'आपल्या दॄष्टीनी भलतेसलते' विचार करणार्‍या मुलांसाठी जगभरातले आईवडील एका विशिष्ट प्रकारे पाठीवर किंवा गालावर वेगानी स्पर्श करण्याचा विधी असतो, तोच वापरतात. मुले तो संस्कार बरोब्बर शिकतात, आणि पुढे चालू ठेवतात.

दुर्दैवाने काहींना हा विधी आजही संस्कारांचा अत्यावश्यक भाग वाटतो. किंबहूना एक आजच्या बालकांच्या आधीच्या दोन पीढया आपल्याबाबतीत हा विधी झाला होता आणि आजही तो कसा आवश्यक आहे हे अगदी कौतुकाने सांगत असतात.

>>गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल ह्या प्रश्नाचं माझ्या दृष्टीनं असलेलं आणि वैयक्तिक अनुभवातून आलेलं उत्तर देतो - १.जन्माला येणारी संतती निकोप, निरोगी असावी, २.जन्म देणार्‍या स्त्रीच्या प्रकृतीला अनुसरुन गर्भवती असण्याच्या काळातील औषधोपचार/ जीवनशैली सुखकर असावी, त्या स्त्रीला अपत्य जन्माला घातल्यानंतर पुढे होणारे शारीरिक त्रास विशेष जाणवू नयेत ह्यासाठीची काळजी घेणे. 'संस्कार' हा शब्द केवळ आलोकनाथ पध्दतीपुरता मर्यादित नसून त्याचा अर्थ बराच व्यापक आहे. आयुर्वेदाच्या परिभाषेतला त्याचा अर्थ जाणकार वैद्य सांगू शकतीलच. (आयुर्वेदात संस्कार हे केवळ बालकांवर करत नसून औषधांवरही केले जातात.) -- वरील उत्तर हे आमच्या अनुभवातून आलेलं आहे. मी आयुर्वेदातील तज्ज्ञ नाही.

'गर्भसंस्कार' या विषयाबद्दल (पुस्तकाबद्दल नव्हे) काही वर्षांपूर्वी थोडीशी उत्सुकता होती. ती नंतर डॉ तांबेंमुळे कमी झाली ('शमली' या अर्थाने नाही). मला व बायकोला नुकताच पहिल्या खेपेला "व्हाट टू एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग" या पुस्तकाचा चांगला फायदा झाला आहे. गर्भसंस्कार हे पुस्तक वाचलेले नाही, त्यामुळे त्या पुस्तकावर कमेंट करणे योग्य नाही. टीपः (धागा पुस्तकाबद्दल नसून त्या विषयाबद्दल आहे, त्यामुळे नक्कीच पुर्वग्रहरहित मनाने वाचतोय. डॉ. खरे व डॉ पाटील या दोन मिपाकर डॉ.विषयी नितांत आदर आहे.)

"व्हॉट टु एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग", "व्हॉट टु एक्स्पेक्ट - द फर्स्ट ईअर", - टॉडलर ही सीरीज अत्यंत लाभदायक ठरते याविषयी शतप्रतिशत सहमत. केवळ माहितीच नव्हे तर मोठा आधारच होतो. अगदी रोज संदर्भासाठी उपयोगी पडेल असं.

छान. यातल्या प्रत्येक पायरीतले सर्वच विधी कालसुसंगत असतील किंवा त्यांचा मूळ उद्देश अद्यापही लागू असेल असं नव्हे (कर्णवेधन, पंचकर्म आदि), पण एकूण जे काही मुद्दे मांडलेत त्यांनी झालाच तर गर्भधारणेला, गर्भावस्थेत आणि शिशुपालनात फायदाच होईल. आहाराची हेळसांड, आरोग्याकडे दुर्लक्ष हे नक्की टळेल. मुख्य बरं वाटलं ते असं की बहुतांश उपचार, - उदा. संगीत उपचार हे माता आणि गर्भाला शांतता आणि निद्राप्राप्तीसाठी, आहारयोजना उत्तम पोषणासाठी इत्यादि सरळ उद्देशाने केले जाणारे उपाय दिसतात. त्याला उगीच गूढ धूसर करण्यासाठी वैज्ञानिक डूब देऊन "वेव्ह्ज, मॅग्नेटिक, अल्ट्राव्हायोलेट, इलेक्ट्रिक एनर्जी, शरीरातली विद्युत मंडले, सिंपथेटिक्/पॅरासिंपथेटिक" इ इ लेपन करुन साध्या लाभदायक उपायांना उगीच तर्कापलीकडे नेलेलं नाही.

बालाजी तांबे आणि अन्य शहा वगैरे लेखकांच्या गर्भसंस्कारांच्या पुस्तकाबद्दल ऐकून होतो. तसेच आयुर्वेदात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वैद्य मित्रांकडून या विषयाबाबत ऐकून आहे. तुम्ही लिहीलेली माहिती सुध्दा उपयुक्त आहेच. गर्भसंस्कार हा अधिजनन शास्त्र नावाच्या मोठ्या विषयातील एक भाग आहे असे ऐकून आहे. अधिजनन शास्त्रात आई वडीलांच्या शारिरीक व मानसीक आरोग्यापासून सुरूवात होते तर मुलांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या संगोपणासाठीचे मार्गदर्शन यात केले जाते. वडोदर्‍याच्या श्रीमती इंदूमती काटदरे यांच्या अधिजननशास्त्र या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. मी हे पुस्तक वाचलंय मात्र त्यातील काही गोष्टी पटल्या व काहींशी अजिबात सहमत नाही. बाकी या विषयावर पुढे वाचायला आवडेल. - नीलकांत

हॅ हॅ हॅ. त्यांचे वैचारिक नैतर शारीरिक परिणाम अमुक एका प्रकारचे व्हावेत म्हणून विशिष्ट गोष्टी बिंबवू पाहणे म्हणजे संस्कार. यात लेखातल्यासारखे गर्भसंस्कारही आले आणि सो कॉल्ड लिबरल विचारांचे संस्कारही आले. ;)

संस्कार केले जात नाहीत, संस्कार होत असतात. माझा नऊ वर्षांचा भाचा गेल्या वर्षी माझ्यासोबत राहायला आला. त्याच्याकडून मी खुप काही शिकलो, शिकत आहे. आपण मोठी माणसे मुलांवर "संस्कार घडवण्यासाठी" हे कर, ते करु नको असे सारखे सांगत असतो. मात्र आपण स्वतः तसे वागतो का हा कळीचा मुद्दा असतो. लहान मुलं उदासीन (न्युट्रल) निरिक्षक असतात. आपलं सांगणं आणि आपली कृती यात तफावत आली तर ते लगेच त्यांच्या लगेच लक्षात येतं. काय बोलावं, काय बोलू नये असा "शिष्टाचार" अंगी बाणवलेला नसल्यामुळे मुले निरागसपणे "तू मला म्हणाला होता की लाल सिग्नल लागल्यावर थांबायचं असतं. आता मात्र तूच लाल सिग्नल लागलेला असूनही गाडी चालवत राहीलास." असं ऐकवतात. आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. मुलं आपलं अनुकरण करत आपोआप आपल्याला हवे त्याप्रमाणे घडत जातील.

आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे.
लाखमोलाची गोष्ट. किती बारीकसारीक गोष्टीत ती आपलं अनुकरण करतात हे पाहून एकीकडे कौतुक, अभिमान आणि दुसरीकडे जबाबदारीच्या जाणीवेने भीतीही वाटते.

आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. +१ उदासीन (न्युट्रल) याला तटस्थ योग्य होईल का?

गर्भसंस्कार केलेल्या आणि न केलेल्या मुलांमध्ये ढोबळमानाने काय फरक जाणवतात? गर्भसंस्कार केलेले मूल त्याच्या वागण्या-बोलण्यावरून कसे ओळखता येते? मी स्वतः या प्रक्रियेचा जवळून अनुभव घेतलेला आहे. आणि गर्भसंस्कार करण्याने फरक पडतो हे माझं निरीक्षण आहे. (बालाजी तांबेचं पुस्तक गाईडप्रमाणे वापरता येतं. अन्यथा ही प्रक्रिया आयुर्वेदात आहेच.) मात्र तसं शास्त्रीय विधान करण्याइतपत विदा माझ्याकडे नाही. त्यामुळे, बाबा किंवा इतर कुणीही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलात तर हे केल्याने नेमकं काय होतं हे कळायला मदत होईल.

मला अशा विशिष्ट गर्भसंस्काराबद्दल फारसं माहित नाही. पण घरातले अनुभव असे आहेत की गर्भारपणात ज्या विषयांचा अभ्यास केला जातो, ते विषय पुढे मुलांना खूपच सोपे जातात. त्यामुळे या काळात शरीरासोबतच मनाला आणि बुद्धीलाही उत्तम खुराक हवाच.

बालाजी तांबे ह्यांचा लहान मुलगा संजय तांबे हे म्युनिक मध्ये राहतात व माझा त्यांचा चांगला परिचय आहे , १९८० पासून त्यांच्या संतुलन केद्रांच्या जर्मनी मध्ये अनेक शहरात केंद्र आहेत. त्यांना मानणारा येथे जर्मन समाज बहुसंख्य असून ते वर्षातून किमान दोनदा युरोप दौरा करतात. त्यांचे गर्भ संस्कार व इतर अनेक उपक्रम स्तुत्य आहेत.

असं काही तरी करायला हवं ही मानसिकता घरात निर्माण होणे यातच सर्वकाही आले .राहिला प्रश्न परवडण्याचा .परवडेल तो करेल आणि त्यातून काही निष्पन्न झाले नाही तरी त्याला चिमटा थोडीच बसणार आहे .बाकी बघे लोक कावकाव का करतात ते त्यांचे तेच जाणे . डॉक्टरसाहेब तुम्ही लिहाच .

+१ परवडण्याचा फारसा प्रश्न नाही, कारण प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यात हे न करताही तपासण्या, टाॅनिक्स इत्यादीचा खर्च होतच असतो. गर्भसंस्कारासाठी होणारा खर्च हा त्या तुलनेत फारसा जास्त नाही.

परत एकदा तेच ... हे गर्भ संस्कार प्रकरण निव्वळ थोतांड आहे ... ह्यातली एकही गोष्ट सांख्यिकीय चिकित्सेच्या पट्टीवर खरी उतरणार नाही हे पैजेवर सांगु शकतो ! गर्भसंस्कार केलेक्या अन न केलेल्या मुलात असा काहीही सिग्निफिकन्ट फरक पडत नाही ... बर्‍याच वेळ्या हा संस्कार प्रकार तर निव्वळ ढोंगी पणा / दांभिकता असते ... आमच्या ओळखीतल्या एकांनी प्रेग्नन्सी च्या वेळेला अठंगुळ /अष्ट्मंगल हा संस्कार करुन घेतला... तेव्हा मी त्यांना विचारले "ह्या ज्या ६४ आहुती दिल्या गेल्या तेव्हा सगळ्यात जास्त वेळा कोणता मंत्र म्हणला गेला ? " तर ते म्हणाले "आमच्या लक्षात नाही " मी सांगितले की प्रत्येक वेळी आहुती देताना ते "विष्णवे: इदम् मम्" असे म्हणत होते म्हणजे हे हे विष्णुला अर्पण करतो , ह्यात माझे काही नाही , मग तुमचा तसा भाव आहे का ? तुम्ही ही अनासक्तीची अवस्था प्राप्त करुन घेतली आहे का ? त्यावर ते म्हणाले "आम्ही फक्त म्हणतो ... मानत नाही " आता बोला *ROFL* असले डोंबलाचे संकार काय कामाचे ? त्यापेक्षा मी कर्मकांडे करत नाही पण " "विष्णवे: इदम् मम्"" हे मानतो ... हे लाखपट चांगले !! ( असे माझेच वैयक्तिक मत आहे :) ) बाक्री : बालाजी तांबे हे बेस्ट सेल्स्मन आहे आणि त्याबाबत त्यांच्याविषयी अतिव आदरही आहे ...

तो इतिहास प्रतिक्रियांसकट पीडीएफ करून साठवलेला आहे नेफळेसाहेब. तूर्त इतकी पुणेकर जन्ता तांब्याला इतकी कशी काय भुलते हे जाणून घ्यावयाचे आहे. (पिचुफेम तांब्यांच्या मार्केटिंगचा फ्यान) बॅटम्यान.

>>>बाबा पाटील यांच्याकडे गर्भसंस्काराला गेल्या होत्या का तुम्हाला नसेल पटत तर मुद्दे मांडा , वैयक्तिक कशाला होत आहात ?

यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय? किती जणांचा स्वत:चा अनुभव आहे हा एक अत्यंत बेशिक प्रश्न पडला. तरी नशीब, आमच्या बाबा पाटलांनी स्वतः ह्या लेखात वर गर्भसंस्काराचे टप्पे - जे बहुतांश वैद्यकिय आहेत ते स्पष्ट लिहिलेले दिसताहेत. मुळात 'गर्भ' म्हणजे काय हे एकदा नीट समजावून सांगा हो बाबा आपल्या विद्वजनांना. मग पुढे त्याची वाढ होत असताना काय करावं न कळावं हे सांगण्यासाठी घ्या भरभक्कम फी. :)

यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय?
तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!!

>>तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. तांबे हे गृहस्थ आयुर्वेदातील सर्वोच्च अधिकारी व्यक्ती आहेत का? नसल्यास त्यांच्या लेखन/औषधे/इतर बाबी ह्यावरुन मूळ प्रकार काय आहे ह्यावर कसं बोलता येणार? जाता जाता: त्याच पुस्तकात गर्भवतीच्या आहाराबद्दल, प्रत्येक महिन्यातल्या व्यायाम, घेण्याच्या घरगुती औषधांबद्दल टिंगल करण्यासारखं निदान मलातरी काही वाटलं नाही बॉ. >>बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. नक्की? मला हे सापडलं - गर्भसंस्काराचे टप्पे १. बीज संस्कार ( गर्भधारणेपुर्व माता-पित्याची बीजशुद्धी करुन बीजांना शुद्धीकरुन गुणवर्धन करणे ) २. गर्भ संस्कार ( गर्भ धारणा झाल्यावर प्रत्येक महीन्यात गर्भवाढीनुसार गुणवर्धन चिकित्सा करणे ) ३. शिशू संस्कार ( जन्मोत्तर बालकाच्या शारीरिक,बौद्धिक विकासाच्या दृष्टीकोणातून संस्कार करणे ) १. गर्भधारणपुर्व बीज संस्कार १. अ ] गर्भधारणोत्सुक स्री-पुरुषांची पुर्वतयारी १. प्रजननसंस्थेची व प्रजनन विधीची पुर्ण माहीती देणे. २. प्रकृतिपरिक्षण करणे. ३. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी ४. पंचकर्मोत्तर रसायन वाजीकरण औषधींचा वापर. ५. योग ( प्राणायाम व आसन ) ह्याद्वारे मनाचा शरीरव्यापाराशी समतोल राखणे. ६. गरजेनुसार औषधी चिकित्सा ( जसे अम्लपित्त , मलावष्टम्भ , शिरःशूल , इ. ) ७. आहार मार्गदर्शन ( प्रकृति व पुर्व व्याधीनुसार , प्रत्येक ऋतुनुसार आहार पथ्य-अपथ्य मार्गदर्शन ) ८. दिनचर्या मार्गदर्शन ( प्रकृती व व्याधीनुसार व व्यवसाय विचारात घेऊन दिनचर्येचे मार्गदर्शन ) १. ब ] गर्भधारण संस्कार १. गर्भधारणार्थे नैष्ठिकी ब्रम्हचर्य व मैथुन विधी ( गर्भधारणापुर्वी पाळावयाचे १ मासिक ब्रम्हचर्य व गर्भधारणार्थ करावयाचा मैथुन विधी – ऋतुनुसार काळ , वेळ , मासिक पाळीनुसार दिवस ,इ.) २. गर्भधारण पुर्व स्री पुरुषांची गर्भासाठी मानस-शारीर-बौद्धिक गुणांचे आवाहन करणे. २. गर्भधारणाकालीन संस्कार ( गर्भसंस्कार ) गर्भधारणेपासून प्रसवापर्यंत म्हणजे जन्मापर्यंत साधारण ९ महिन्यांचे नवमास परिचर्या + संस्कार १. नवमास गर्भिणी परिचर्या ( सगर्भ मातेची काळजी ) २. गर्भवाढीच्या दृष्टीकोनातून मातेसाठी मासानुमासिक आहार ३. दिनचर्या ( पथ्य-अपथ्य ) ४. मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यकर स्तोत्र मंत्र आदि चिकित्सा ५. योग ( प्राणायाम + आसने ) व ध्यान-धारणा ६. रंग चिकित्सा व गंध चिकित्सा ७. सौंदर्यचिकित्सा ह्यात काय काय केले जाते ? १. प्रत्येक महिन्यातील गर्भाची तपासणी बाळाची वाढ / परिक्षण / औषधी २. प्रत्येक महिन्यातील मातेची तपासणी व्याधी चिकित्सा ३. माता/पिता-गर्भ संवाद विधी ४. संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ) ५. प्रसव प्रक्रियेची माहीती. प्राकृत प्रसव व प्रसवकालीन व्याधी व चिकित्सा ६. प्रसवासाठी मानसिक व शारीरिक तयारी करणे. ७. प्रसव कालीन परिचर्या. ३. प्रसवोत्तर संस्कार ( माता व शिशू संस्कार ) १. शिशू संगोपन ( अभ्यंग – स्नान – धूपन - वस्र – क्रिडा – इ. ) २. शिशू षडमास परिचर्या ( स्तन्यपान विधी , निद्रा , बाळगुटी इ. ) ३. षडमासोत्तर बाल-आहार विधी ( क्षीरान्नाद व अन्नाद अवस्था ) ४. मातेस षडमास सूतिका परिचर्या (अभ्यंग धूपन स्नान पट्टबंधन औषधी आहार इ.) ५. शिशू संस्कार ( नालकर्तन स्वर्णप्राशन कर्णवेधन नामकरण इ. -------------------------------------------------------------------------------- आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास. >> आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!! करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो. देव/भक्ती ह्यावर विश्वास नाही म्हणून फाट्यावर मारणारे आत्ताचे! तेही किती? उर्वरित जनतेला त्याचा फायदाच होतो. भले मग तो प्लासिबो इफेक्ट म्हणून सिध्द केला जावो. उपयोग होणं महत्वाचं. त्यातही पुन्हा, ती बाब केलीच पाहिजे असा आग्रह नाही. ते टाळूनही बाकीच्या गोष्टी करुन उत्तम फायदे मिळतातच की. मला वाईट ह्याचं वाटलं, कोणी बोटानं चंद्र दाखवायला जातोय, तर लोक त्याच्या नखातली माती पाहून नाकं मुरडतात.