Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०१४-१५) - यावेळी तरी लाज राखणार का?

श
श्रीगुरुजी
Mon, 12/08/2014 - 08:24
🗣 138 प्रतिसाद
_________________________________________________________________________________ मंगळवार २५ नोव्हेंबर २०१४ या दिवशी ऑस्ट्रेलियाचा तरूण व भरवशाचा फलंदाज फिल ह्यूज स्थानिक सामना खेळताना एक उसळता चेंडू हेल्मेटच्या खाली कानाच्या मागे लागून मैदानावरच कोसळला व दोनच दिवसांनी गुरूवार २७ नोव्हेंबर २०१४ या दिवशी कोमातच वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याचे दु:खद निधन झाले. :sad:

फिल ह्यूजला भावपूर्ण श्रद्धांजली! :sorry: _________________________________________________________________________________ भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात २४ नोव्हेंबर २०१४ ते १० जानेवारी २०१५ या दरम्यान कसोटी क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली आहे. कसोटी मालिका संपल्यावर १६ जानेवारी २०१५ ते ३० जानेवारी २०१५ या दरम्यान भारत-इंग्लंड्-ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलियात एकदिवसीय तिरंगी मालिकेत खेळतील. फिल ह्यूजच्या दु:खद अपघाती निधनामुळे मालिकेच्या वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात आला आहे. या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा आहे. (त्यानंतर १४ फेब्रुवारी २०१५ पासून ११ वी मर्यादित षटकांची एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मध्ये होणार आहे. भारताचा पहिलाच सामना १५ फेब्रुवारीला पाकड्यांबरोबर आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी नंतर स्वतंत्र धागा उघडता येईल.) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरूद्ध ४ कसोटी सामने सामने खेळेल. तत्पूर्वी भारत २ सराव सामने खेळेल. कसोटी मालिका संपल्यावर भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकेत एकमेकांबरोबर २-२ सामने खेळतील. ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारताचा कसोटी संघ असा आहे. धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहीत शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, नमन ओझा, रविचंद्रन अश्विन, कर्ण शर्मा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरूण एरॉन - लोकेश राहुल, नमन ओझा व कर्ण शर्मा यांना भारतीय संघात प्रथमच संधी मिळाली आहे. - २०११ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात रहाणेला फक्त २ स्थानिक सामन्यात खेळविले होते. प्रत्यक्षात एकही कसोटी व एकदिवसीय सामन्यात त्याला खेळविले नव्हते. यावेळी तो दोन्ही प्रकारच्या सामन्यात नक्की खेळेल. - सध्या सुरू असलेल्या श्रीलंका विरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करत असलेल्या फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला न घेतल्याचे आश्चर्य वाटत आहे. तो फलंदाजी देखील बर्‍यापैकी करतो. कर्ण शर्माऐवजी तो उपयुक्त ठरला असता. - भारताची वेगवान गोलंदाजी भक्कम वाटते (भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरूण एरॉन ). त्या तुलनेत फलंदाजी तितकीशी भक्कम वाटत नाही. भारतीय खेळपट्ट्यांवर भीमपराक्रम करणारे फलंदाज ऑस्ट्रेलियातील जलद खेळपट्ट्यांवर कसे टिकतात ते बघायचं. - भारताने धोनी, साहा व ओझा असे ३ यष्टीरक्षक घेतलेले आहेत. - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन तुफान फॉर्मात आहे. तो अत्यंत वेगवान व शरीरवेधी गोलंदाजी टाकतो. त्याच्या जोडीला पीटर सिड्ल, पॅटीन्सन, स्टार्क, बॉलिंजर, रायन हॅरीस इ. गोलंदाज असतीलच. जॉश हॅझलवूड हा नवा वेगवान गोलंदाज नुकत्याच संपलेल्या द. आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगलाच चमकला होता. तो देखील संघात असण्याची शक्यता आहे. या वेगवान मार्‍यासमोर ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खेळणे अवघड आहे. - या दौर्‍यात पर्थच्या अत्यंत वेगवान खेळपट्टीवर कसोटी सामना आयोजित केलेला नाही. हे भारतासाठी सुचिन्ह आहे. पर्थवर भारत इतिहासात एकच सामना जिंकलेला आहे. - उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे धोनी अ‍ॅडलेडमधील पहिल्या कसोटीत कदाचित खेळणार नाही. त्याच्याऐवजी कोहली कर्णधार असेल. धोनीऐवजी बहुतेक वृद्धीमान साहा यष्टीरक्षक असेल. भुवनेश्वर कुमार देखील दुखापतीमुळे पहिले दोन कसोटी सामने खेळणार नाही. - भारत १९८६ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात सचिनशिवाय खेळणार आहे. सचिन यापूर्वी ऑस्ट्रेलियातील १९९२, १९९९, २००३, २००८ व २०११ या सर्व मालिकेत खेळला होता. - २०११-१२ च्या दौर्‍यातील बहुसंख्य खेळाडू आता भारतीय संघात नाहीत. सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, झहीर, हरभजन, विनयकुमार असे अनेक खेळाडू या संघात नाहीत. _________________________________________________________________________________ दौर्‍याचे सुधारीत वेळापत्रक सराव सामने २४ नोव्हेंबर - २५ नोव्हेंबर वि. क्रिकेट ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनल इलेव्हन (स्थळ - अ‍ॅडलेड) ०४ डिसेंबर - ०५ डिसेंबर वि. क्रिकेट ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनल इलेव्हन (स्थळ - अ‍ॅडलेड) कसोटी सामने (पहिले २ कसोटी सामने भा.प्र.वे. नुसार पहाटे ५:३० वाजता सुरू होतील व उर्वरीत २ कसोटी सामने पहाटे ५:०० वाजता सुरू होतील) पहिला कसोटी सामना : मंगळवार ९ डिसेंबर - शनिवार १३ डिसेंबर (स्थळ - अ‍ॅडलेड ओव्हल) दुसरा कसोटी सामना : बुधवार १७ डिसेंबर - रविवार २१ डिसेंबर (स्थळ - ब्रिस्बेन) तिसरा कसोटी सामना (खोकेदिन कसोटी सामना): शुक्रवार २६ डिसेंबर - मंगळवार ३० डिसेंबर (स्थळ - मेलबर्न) चौथा कसोटी सामना : मंगळवार ०६ जानेवारी - शनिवार १० जानेवारी (स्थळ - सिडने) ५० षटकांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार सकाळी ८:५० वाजता सुरू होतील) (१) शुक्रवार १६ जानेवारी इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया (सिडने) (२) रविवार १८ जानेवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया (मेलबोर्न) (३) मंगळवार २० जानेवारी भारत वि. इंग्लंड (ब्रिस्बेन) (४) शुक्रवार २३ जानेवारी इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया (टास्मेनिया) (५) सोमवार २६ जानेवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया(सिडने) (६) शुक्रवार ३० जानेवारी भारत वि. इंग्लंड (पर्थ) (७) रविवार ०१ फेब्रुवारी - अंतिम सामना (पर्थ) _________________________________________________________________________________ भारताच्या ऑस्ट्रेलियातील २०११-१२ मधील मालिकेतील कटू आठवणी अजून ताज्या आहेत. या मालिकेत भारत सर्व ४ कसोटी सामने हरला होता. भारताचे बहुतेक सर्व स्टार खेळाडू (सेहवाग, गंभीर, लक्ष्मण, द्रविड, सचिन, कोहली, धोनी इ.) अपयशी ठरले होते. सचिनने पहिल्या दोन कसोटीत चांगली फलंदाजी केल्यावर उर्वरीत दोन कसोटीत तो अपयशी होता, तर कोहली पहिल्या दोन कसोटीत अपयशी व शेवटच्या दोन कसोटीच चांगला खेळला होता. उर्वरीत फलंदा़ज बहुतेक सर्व सामन्यात अपयशी होते. त्यामुळेच भारताचा सपाटून पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्क (१ द्विशतक व १ त्रिशतक), पाँटिंग (१ शतक व ४ अर्धशतके), मायकेल हसी, डेव्हीड वॉर्नर यांनी फलंदाजीत चंगळ केली होती. गोलंदाजीत पॅटिन्सनने भारतीय फलंदाजांची हवा केली होती. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत देखील भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळविता आला नव्हता. त्या मालिकेतील श्रीलंकेविरूद्ध शेवटचा सामना भारताच्या विशेषतः विराट कोहलीच्या तुफान फलंदाजीमुळे गाजला होता. अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला बोनस गुण आवश्यक होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून ५० षटकात तब्बल ३२० धावा केल्यावर बोनस गुणासाठी भारताला ते आव्हान ४० षटकात पार करणे आवश्यक होते. भारताने ते आव्हान फक्त ३६.४ षटकात पूर्ण करून इतिहास घडविला होता. सेहवाग (२० चेंडूत ३०), सचिन (३० चेंडूत ३९), गंभीर (६१) आणि कोहली (१२० चेंडूत १४०) यांच्या तुफान फलंदाजीमुळे भारताने तो सामना बोनस गुणासह जिंकला. त्या सामन्यात मलिंगाचे पृथ्थकरण ७.२-०-९६-० इतके वाईट होते. त्या संघातील फारच थोडे खेळाडू आताच्या संघात आहेत. त्या दु:खद मालिकेनंतर गतवर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला मायदेशात ४-० अशी जबरदस्त मात दिली होती. अश्विन (२९ बळी) व जडेजा (२२ बळी) यांनी ती मालिका गाजविली होती. आताचा भारतीय संघ तरूण आहे. कोहली, रहाणे, पुजारा इ. कडून खूप आशा आहेत. लोकेश राहुलला देखील संधी मिळावी. रोहीत शर्माने भारतातला फॉर्म तिथे टिकवून धरावा ही सदिच्छा. मुरली विजय, शिखर धवन आणि स्वतः धोनी ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर कसे खेळतात ते बघणे मनोरंजक ठरेल. कोहली ६ महिन्यांपूर्वी झालेल्या इंग्लंडमधील मालिकेत संपूर्ण अपयशी ठरला होता. हे अपयश धुवून टाकण्याची संधी त्याला आहे. भुवनेश्वर कुमार, शमी, उमेश यादव, वरूण एरॉन इ. वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर नक्की खूष होतील. उमेश यादवने मागील दौर्‍यात पर्थच्या खेळपट्टीवर ५ बळी मिळवून आपला दर्जा दाखवून दिला होता. या दौर्‍यानंतर लगेचच १४ फेब्रुवारीपासून विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या दौर्‍यातील कामगिरीवरच विश्वचषक संघातील खेळाडू निवडले जातील. त्याचेही दडपण खेळाडूंवर असेल. फिल ह्यूजच्या धक्कादायक मृत्युमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील चांगल्या मन:स्थितीत नाहीत. जेव्हा फिल ह्यूज मैदानावर कोसळला तेव्हा शेन वॉटसन, ब्रॅड हॅडिन, शॉन मार्श हे प्रत्यक्ष मैदानात क्षेत्ररक्षण करीत होते व त्यांच्या डोळ्यादेखत त्यांनी फिल ह्यूजला कोसळताना बघितल्यामुळे त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे. फिल ह्यूजचा जवळचा मित्र व मार्गदर्शक असलेल्या मायकेल क्लार्कला अश्रू अनावर झाले होते. अशा परिस्थितीत काहीशा दडपणाखालीच ऑस्ट्रेलियन्स पहिले १-२ कसोटी सामने खेळतील. परंतु कांगारू अत्यंत लढवय्ये आहेत व या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर येऊन आपली नैसर्गिक लढवय्यी वृत्ती दाखवतील हे निश्चित. ऑस्ट्रेलियन भूमीवर गेल्या ३०-४० वर्षातील भारताविरूद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकांचा इतिहास भारताच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. - १९७७-७८ मधील दुय्यम ऑस्ट्रेलियन संघाविरूद्ध खेळलेली ५ सामन्यांची मालिका भारत २-३ असा हरला होता. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व ५ सामने निर्णायक ठरले व ऑस्ट्रेलियाने निवृत्तीनंतर ९ वर्षांनंतर परत बोलावून कर्णधारपद सोपविलेल्या बॉबी सिम्प्सनने दुय्यम संघ हाताशी घेऊन ही मालिका ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली. - १९८०-८१ मधील ३ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतील ६ डावांपैकी पहिल्या ५ डावात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजविले होते. या मालिकेत संदीप पाटीलची तुफान फटकेबाजी पहायला मिळाली. ३ र्‍या कसोटीतील शेवटच्या डावात खोटा बाद दिल्याने संतापून कर्णधार गावसकर मैदान व सामना सोडून निघाल्यामुळे खळबळ माजली होती. याच डावात कपिलने अंगात ताप असताना जबरदस्त गोलंदाजी करून ५ बळी मिळवून कांगारूंना केवळ ८३ धावात गुंडाळून सामना जिंकून दिला होता. - १९८५-८६ मधील ३ सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत ३ र्‍या सामन्यात सामना जिंकून ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकण्याची भारताला उत्कृष्ट संधी होती. ५ व्या दिवशी विजयासाठी केवळ १२६ धावा करायच्या होत्या. भारताकडे श्रीकांत, शास्त्री, वेंगसरकर, अझरूद्दीन, मोहिंदर, गावसकर, कपिल, मोरे असे अनेक फलंदाज होते. त्या दिवशी शेवटच्या सत्रात पाऊस येईल असा देखील अंदाज होता. पावसाची शक्यत गृहीत धरून भारताने वेगात फलंदाजी करून १२६ धावा करून सामना जिंकायला पाहिजे होता. प्रत्यक्षात भारताच्या फलंदाजांनी अत्यंत संथ फलंदाजी केली. पाऊस अपेक्षेपेक्षा थोडा लवकर आल्यामुळे सामना थांबून अनिर्णित राहिला. पाऊस सुरू झाला तेव्हा भारताने २५ षटकात फक्त २ बाद ५८ धावा केल्या होत्या. खरं तर २५ षटकात १२६ धावा सहज झाल्या असत्या. अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे भारताने सामना व मालिका जिंकण्याची दुर्मिळ संधी घालविली. भारताने आजतगायत ऑस्ट्रेलियात कधीही मालिका जिंकलेली नाही हे लक्षात घेता भारताने ही सुवर्णसंधी अक्षरशः वाया घालविली. - १९९१-९२ ची ५ सामन्यांची मालिका अत्यंत एकतर्फी झाली. भारताने ही मालिका ०-४ अशी गमाविली. ही मालिका वेंगसरकरच्या जीवनातील शेवटची मालिका ठरली. या मालिकेनंतर लगेचच होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत संघात निवड न झाल्यामुळे वेंगसरकर क्रिकेटमधून निवृत्त झाला. या मालिकेतील ३ रा सामना अनिर्णित राहिला. त्यात शास्त्रीने द्विशतक व ४ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. - १९९९-२००० ची ३ सामन्यांची मालिका हे एक दु:खद स्वप्न आहे. सचिनच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका ०-३ अशी गमाविली. या मालिकेसाठी भारताचा निवडलेला संघ हा भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट संघ होता. सचिन, द्रविड व लक्ष्मण वगळता उरलेले जवळपास सर्व खेळाडू अत्यंत सुमार होते. द्रविड व लक्ष्मण सुद्धा मालिकेत अपयशी होते. आगरकर या मालिकेत लागोपाठ ७ डावात शून्यावर बाद झाला होता. या मालिकेनंतर सचिनने कर्णधारपद कायमचे सोडले. - २००३-०४ ची ४ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसरा सामना भारताने जिंकून आघाडी घेतली होती. परंतु तिसरा सामना हरल्यामुळे व चौथा अनिर्णित राहिल्यामुळे मालिका बरोबरीत सुटली. या मालिकेनंतर स्टीव्ह वॉ निवृत्त झाला. दुसर्‍या कसोटीत द्रविडने २४८ व नाबाद ७० अशी जबरद्स्त कामगिरी केली होती. आगरकरने देखील दुसर्‍या डावात ६ बळी मिळवून ऑसीजना २०० धावांच्या आत रोखून विजयाचे दार उघडले होते. - २००७-०८ ची मालिका पंच स्टीव्ह बकनर यांच्या अत्यंत खराब कामगिरीमुळे व सायमंड्स व हरभजन यांच्यातील वादावादीने गाजली. भारताने ही मालिका १-२ अशी गमाविली. दुसर्‍या कसोटीत बकनर यांनी अनेक चुकीचे निर्णय दिले व ते सर्व निर्णय भारताविरूद्ध गेले. त्याच सामन्यात सामन्याची केवळ २ षटके राहिली असताना भारताचे ७ गडी बाद होते व केवळ २ षटके खेळून काढायची होती. परंतु मायकेल क्लार्कने शेवटून दुसरे षटक टाकताना त्या षटकात ३ बळी मिळवून ऑस्ट्रेलियाला विजय प्राप्त करून दिला होता. या मालिकेतील पर्थमधील तिसर्‍या सामन्यात इशांत शर्माने एक जबरदस्त स्पेल टाकून पॉंटिंगला अक्षरशः घाम फोडला होता. या मालिकेत कुंबळे अत्यंत सभ्य व प्रगल्भ कर्णधार या स्वरूपात दिसला होता. - २०११-१२ ची मालिका अत्यंत वाईट गेली. भारत या मालिकेतील सर्व ४ सामने हरला. सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण असे दिग्गज फलंदाज असूनही भारत अत्यंत वाईट पद्धतीने हरला. या मालिकेनंतर त्याच वर्षात द्रविड व लक्ष्मण निवृत्त झाले. गंभीर, द्रविड, लक्ष्मण व सेहवागची कामगिरी पूर्णपणे ढासळली. सचिन पहिल्या दोन सामन्यात तर कोहली शेवटच्या दोन सामन्यात चांगला खेळला. परंतु संघ म्हणून भारताची पूर्ण वाट लागली. सचिनशिवाय खेळली जाणारी गेल्या २३ वर्षातील ही पहिलीच मालिका. सचिनची उणीव अजून भासते आहे. सचिन निवृत्त झाल्यावर देव्हारा अजून रिकामाच आहे. आता नवीन देव शोधायचा. या सर्व कटूगोड आठवणींच्या पार्श्वभूमीवर २०१४-१५ मधील या दौर्‍यात भारत विजयी व्हावा हीच अपेक्षा आणि सदिच्छा!

प्रतिक्रिया द्या
27577 वाचन

💬 प्रतिसाद (138)
श
श्रीगुरुजी Mon, 12/08/2014 - 08:39 नवीन
उद्यापासून पहिला कसोटी सामना पहाटे ५:३० वाजता सुरू होणार आहे. ही मालिका संपल्यावर लगेचच १४ फेब्रूवारी पासून जवळपास मार्च अखेरीपर्यंत विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँडमध्ये खेळविली जाणार आहे. पुढील जवळपास पावणेचार महिने क्रिकेटप्रेमींना पर्वणी आहे. रोज पहाटे उठावे लागणार.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 12/08/2014 - 08:42 नवीन
सचिनची उणीव अजून भासते आहे. सचिन निवृत्त झाल्यावर देव्हारा अजून रिकामाच आहे. आता नवीन देव शोधायचा.
तो देव्हारा रिकामाच राहूदे...ती जागा फक्त खेळाडूच्या कौशल्यावर नसते मिळत त्यासाठी खरेपणा आणि सचोटीची तपश्चर्यासुध्धा लागते...पुढच्या सगळ्या पिढ्यातील खेळाडूंना तो देव्हारा रिकामा दिसला तरच त्या देव्हार्याचे महत्व त्यांना कळेल
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/08/2014 - 15:34 नवीन
१९८७ पर्यंत देव्हार्‍यात सुनील गावकरची प्रतिष्ठापना केलेली होती. त्याच्या निवृत्तीनंतर २ वर्षे देव्हारा रिकामा होता. १९८९ पासून २०१३ पर्यंत सचिन देव्हार्‍यात होता. आता गेले वर्षभर देव्हारा रिकामा आहे. आगामी काळात सचिन/सुनील सारखा एखादा झपाटून टाकणारा खेळाडू निर्माण व्हावा हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सौंदाळा Mon, 12/08/2014 - 08:56 नवीन
भुवनेश्वरकुमार पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधुन बाहेर (घोट्याच्या दुखापतीमुळे) :(
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 12/08/2014 - 11:46 नवीन
रवी शास्त्री या संघाबरोबर आहे का?
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 12/08/2014 - 14:17 नवीन
१९९१-९२ मधील दौर्‍याच्या काही विस्कळीत आठवणी १.
- १९९१-९२ ची ५ सामन्यांची मालिका अत्यंत एकतर्फी झाली.
हो या मालिकेतले ५ पैकी ४ कसोटी सामने आपण मोठ्या फरकाने गमावले होते. तिसरा सामना अनिर्णित राहिला होता. खरे म्हणजे आपण सिडनीमधला हा सामना जिंकणारच होतो. चांगली १७० धावांची आघाडी होती आपल्याकडे. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळलाच जाऊन आपण चक्क ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्येच डावाने मात देणार होतो. पण ऑस्ट्रेलियाने अ‍ॅलन बॉर्डरच्या ९१ धावांच्या मदतीने पाचवा दिवस रेटला आणि दिवसाच्या शेवटी ८ बाद १७३ अशी धावसंख्या आणत सामना बचावला. शेवटी पंचांनी अपुर्‍या प्रकाशामुळे शेवटची पाचेक षटके बाकी असतानाच खेळ थांबविला आणि या निर्णयावरून थोडा वादही झाला होता हे पण आठवले.या सामन्यानंतर 'आम्ही थोडक्यात वाचलो' अशी प्रतिक्रिया अ‍ॅलन बॉर्डरने दिली होती. २. याच दौर्‍यात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाबरोबर तिरंगी सामनेही झाले होते.त्यावेळी रवी शास्त्री अगदी प्रचंड डोक्यात जायचा राव.टुकू टुकू करून इतके चेंडू खायचा की काही विचारू नका.या एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीला यायचे शास्त्री आणि श्रीकांत. श्रीकांत फटकेबाजी करायच्या नादात बाद व्हायचा. त्यानंतर संजय मांजरेकर हा कागदावर सर्वात तंत्रशुध्द पण तितकाच प्रचंड डोक्यात जाणारा दुसरा मनुष्य यायचा.शास्त्री आणि मांजरेकर ही जोडगोळी इतके चेंडू खायची की त्यानंतर विजय मिळणे बरेच कठिण होऊन बसायचे.त्याकाळी सचिन तीन विकेट झाल्यानंतर यायचा. १९९२ च्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरूध्दच्याच सामन्यात रवी शास्त्रीने ६७ चेंडूंमध्ये २५ धावा काढल्या आणि तो सामना आपण एका धावेने गमावला होता.त्यानंतर रवी शास्त्रीविरूध्द संतापाची लाट उसळली होती आम्हा मित्रमंडळींमध्ये :) आणि त्यानंतरच्या पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात रवी शास्त्रीला वगळले होते याचाही आनंद वाटला होता :) ३. याच तिरंगी लढतीतला पहिला वेस्ट इंडिजविरूध्दचा सामना टाय झाला होता.आपण १२६ धावांमध्ये गुंडाळले गेल्यानंतर उपाहारानंतर दुपारी सामना बराच वेळ लावलाच नव्हता.पण नंतर वेस्ट इंडिजच्या ५०-६० धावांमध्ये ५ विकेट गेल्या हे कळल्यानंतर अगदी शेवटपर्यंत सामना बघितला होता हे पण आठवते. खूप मजा आली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/08/2014 - 16:01 नवीन
ही मालिका व नंतरचा विश्वचषक अजून आठवतो. या तिरंगी मालिकेतच लारा या महान फलंदाजाचा उदय झाला होता. विश्वचषक स्पर्धेत एक अत्यंत विचित्र व अन्यायकारक नियम केला होता. जर प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाचा डाव संपल्यावर पावसामुळे वा इतर कोणत्याही कारणामुळे नंतर फलंदाजी करणार्‍या संघासाठी सामन्याची षटके कमी केली तर जितकी षटके कमी झाली आहेत तर प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाच्या धावातून कमीत कमी धावा केलेली तितकी षटके वगळण्यात येऊन उर्वरीत षटकात केलेल्या धावा गृहीत धरल्या जात असत. हा नियम शेवटी फलंदाजी करणार्‍या संघासाठी अत्यंत अन्यायकारक होता. भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून २४० धावा केल्या होत्या. नंतर पावसामुळे ३ षटके कमी होऊन भारताला फक्त ४७ षटके खेळायला मिळाली. या नियमानुसार ऑस्ट्रेलियाने आपल्या डावात कमीत कमी धावा केलेल्या ३ षटकातल्या धावा वगळून उरलेल्या ४७ षटकात केलेल्या धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावा केलेया ४७ षटकात २३८ धावा केल्या होत्या व सर्वात कमी धावा केलेल्या ३ षटकात फक्त २ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या २४० धावातून फक्त २ धावा कमी होऊन २३८ धावा धरल्या गेल्या व भारतासाठी २३९ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. परंतु भारताची तब्बल ३ षटके कमी झाली. त्यामुळे ५० षटकात २४१ धावांऐवजी भारताला ४७ षटकांत २३९ चे लक्ष्य दिले गेले. भारताचा डाव २३७ धावांत शेवटच्या चेंडूवर संपून फक्त १ धावेने भारत पराभूत झाला. रवी शास्त्रीने अत्यंत कूर्मगती फलंदाजी करून ६७ चेंडूत फक्त २५ धावा करून भारताच्या पराभवात सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यानंतर भारतात शास्त्रीविरूद्ध संतापाची लाट उसळून त्याच्या घरावर दगडफेक झाल्याने पुढील सर्व सामन्यात त्याला वगळले होते. याच नियमाचा सर्वात जबरदस्त फटका द. आफ्रिकेला बसला होता. इंग्लंडविरूद्ध उपांत्य फेरीत धावांचा पाठलाग करताना शेवटच्या १३ चेंडूत २१ धावा करायच्या असताना पाऊस आला व सामना थांबला. सामना परत सुरू झाल्यावर २ षटके कमी झाल्याने आफ्रिकेला फक्त एकच चेंडू खेळायला मिळाला व लक्ष्य फक्त १ धावेने कमी झाल्याने १ चेंडूत २० धावा असे अशक्य समीकरण निर्माण होऊन आफ्रिका सामना हरले. या स्पर्धेत भारत पावसामुळे षटके कमी झालेल्या झिंबाब्वेविरूद्धच्या सामन्यात कसाबसा जिंकला. नंतर पाकड्यांविरूद्ध दणदणीत विजय मिळविला. परंतु उर्वरीत सर्व ६ सामने भारत हरल्यामुळे कामगिरी एकंदरीत निराशाजनक ठरली. ही स्पर्धा पाकिस्तानने केवळ नशीबाच्या जोरावर जिंकली. ८ पैकी पहिल्या ५ सामन्यात पाकडे ४ सामने हरले होते व एक सामना अनिर्णित राहून केवळ १ गुण मिळाला होता. परंतु उर्वरीत ३ सामने जिंकून ते उपांत्य फेरीत पोहोचून नंतर विश्वविजेते झाले. त्यांचा इंग्लंडविरूद्धचा सामना केवळ नशिबाने अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना पाकड्यांची धावसंख्या सर्वबाद ८३ होती. परंतु नंतर पावसामुळे खेळच न झाल्यामुळे सामना अनिर्णित राहून पाकड्यांना १ गुण मिळाला. हा गुण मिळाला नसता तर पाकडे उपांत्य फेरीत गेलेच नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 12/08/2014 - 14:23 नवीन
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहीत शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, नमन ओझा, रविचंद्रन अश्विन, कर्ण शर्मा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरूण एरॉन
बापरे यापैकी एखाद-दोघांचा अपवाद वगळता इतर कोणालाही ओळखताही येणार नाही. कर्ण शर्मा, वृध्दिमान साहा, वरूण एरॉन, लोकेश राहुल ही नावे आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये काय चालू आहे याविषयी प्रतिसादांमधून काही कळले तर गेल्या ७-८ वर्षात २०११ च्या विश्वचषकातील उपांत्य आणि अंतिम सामने हे दोन सामने सोडून इतर एकही सामना न बघितलेल्या माझ्यासारख्याला काहीतरी कळेल :) एकेकाळी क्रिकेट आणि राजकारण हे दोन पॅशन्स होते.आता एकच राहिले आहे :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/08/2014 - 16:09 नवीन
कर्ण शर्मा हा एक नवीन फिरकी गोलंदाज आहे. नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत तो खेळला होता. वृद्धिमान साहा हा यष्टीरक्षक गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात आतबाहेर आहे. त्याला फारशी संधी मिळालेली नाही. वरूण एरॉन व उमेश यादव हे भारतातील सध्याचे सर्वात वेगवान गोलंदाज आहेत. दोघेही १४७-१४८ किमी वेगाने गोलंदाजी टाकतात. वरूण एरॉन गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघात आतबाहेर आहे. दुखापतीमुळे त्याला फारशी संधी मिळालेली नाही. लोकेश राहुल हा कर्नाटकचा तंत्रशुद्ध सलामीचा फलंदाज आहे. मागील वर्षी रणजी करंडक स्पर्धेत त्याने धावांचा रतीब टाकला होता. काही दिवसांपूर्वीच दुलीप करंडकाच्या सामन्यात त्याने दोन्ही डावात शतके केली होती. नमन ओझा हा यष्टीरक्षक अनेक वर्षे राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. २ वर्षांपूर्वी त्याला भारतीय संघात काही एकदिवसीय सामन्यांसाठी घेतले होते, परंतु त्याला फारसे काही करता आले नव्हते. आता पुन्हा संधी मिळाली आहे. उर्वरीत खेळाडू गेल्या अनेक दिवसांपासून संघात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मुक्त विहारि Tue, 12/09/2014 - 02:20 नवीन
लेख एक नंबर... फक्त ते जरा " अक्षर पटेल"च्या जागी "अक्षय पटेल" असे हवे होते का? कुणातरी आमची शंका-निरसन नक्कीच करेल. सध्या आम्ही, सचिनच्या निव्रुत्तीनंतर क्रिकेट न बघण्याची "मिपा-प्रतिज्ञा" घेतली आहे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 12/09/2014 - 05:49 नवीन
नाही नाही म्हणता ऑस्ट्रेलीयाची दमदार सुरवात झाली आहे. क्लार्क तर असा खेळत होता की जर दुखापत झाली नसती तर त्याने शतक नक्की केले असते. सद्यातरी विराट्ची देहबोली भांबावलेली दिसतेय. बघुया काय होतेय.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 12/09/2014 - 06:00 नवीन
बाबौ ४.७६ ची धावगती आहे. ऑस्ट्रेलियाने ४०० चा आकडा पार केला तर आपल्याला सरळ सरळ कसोटी वाचवण्यासाठी खेळावे लागेल. इशांत सोडुन बाकी सगळे धावांचा रतीब घालतायत. धवनला परदेशातील कसोटींमधे अत्यंत सुमार कामगिरी करुन परत संधी मिळाली. माझे मतः धवन भारतीय खेळपट्ट्यांवरचा फलंदाज आहे आणि इशांत परदेशी खेळपट्ट्यांवरचा गोलंदाज आहे
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 12/09/2014 - 06:19 नवीन
झाला बाबा डेवीड वॉर्नर आउट १४५
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Tue, 12/09/2014 - 06:36 नवीन
@मुवि तो अक्षर पटेलच आहे अक्षय नव्हे!! @ सौंदाळा ते ४०० च्या वर गेल्यावर कसोटी वाचवायला खेळले तर पराजय नक्की.. पण त्यांनी ५५० करुनही आपण जिंकु शकतो (जे २००३ मधे घडलय) हा विश्वास ठेवल्यास ड्रॉ किंवा विजयाची शक्यता आहे!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 12/09/2014 - 06:54 नवीन
शंका निरसन केल्याबद्दल धन्यवाद.. सचिनने आणि मी क्रिकेट एकदमच सोडले... त्याने खेळणे आणि मला त्याला खेळतांना बघणे... हे एकूण तुमच्या आता लक्षांत आलेच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
श
श्रीगुरुजी Tue, 12/09/2014 - 09:25 नवीन
पहिला दिवस बरा गेला. शेवटच्या सत्रात भारताने चांगली कामगिरी केली (३९.२ षटकात ११६ धावा देऊन ४ बळी). पहिल्या दोन सत्रात कांगारूंनी वर्चस्व गाजविले. वॉर्नर पहिल्या चेंडूपासूनच सुटला होता. अर्थात त्याला सुरवातीला अनेक फुलपिच चेंडू ऑफस्टंपवर मिळाल्यावर त्याने ऑफसाईडला बदाबदा चौकार मारले. अजून स्टीव्हन स्मिथ नाबाद आहे आणि उद्या कारकून परत खेळायला येईल. सीड्ल् आणि मिचेल जॉन्सनही चांगली फलंदाजी करतात. खेळपट्टी बरीच ठणठणीत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ५०० च्या पुढे नक्की जाईल असं वाटतंय. कर्ण शर्माऐवजी अश्विन हवा होता. ईशांत शर्माचे क्षेत्ररक्षण खतरनाक आहे. तो सीमारेषेवर चेंडू अडवताना वाकतच नाही. चेंडूच्या पाठीमागेही खूप हळू पळतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/10/2014 - 08:35 नवीन
दुसर्‍या दिवशी पावसाने जवळपास ६० षटकांचा खेळ झाला नाही. आज दिवसाखेर ऑसीज ७ बाद ५१७ आहेत. उद्या सकाळी याच धावसंख्येवर डाव घोषित करून भारताला फलंदाजी करायला देतील. भारताला उर्वरीत ३ दिवसांपैकी दोन्ही डावात मिळून किमान अडीच दिवस (किमान २२५ षटके) तरी फलंदाजी केली पाहिजे. इंग्लंडमध्ये भारताचे शेवटचे ४ डाव एकूण १८० षटकात संपले होते. एक डाव अक्षरशः दिड सत्रात संपत होता. हे लक्षात घेता एकंदरीत परिस्थिती अवघड आहे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 12/11/2014 - 04:54 नवीन
गोलंदाजाच्या निराशाजनक (?)* कामगिरीनंतर भारतीय फलंदाजांनी पहिल्या दोन विकेट वगळता आतापर्यंत तरी चोख प्रत्युत्तर दिलेय. पहिल्या दोन विकेट कशा गेल्या ते पहायला मिळाले नाही. विराट तर चेतेश्वर पुजाराकडून धावा करून घेतोय असे वाटतेय. सचिन, सेहवाग, गंभीर, धोनी विना खेळणारा भारतीय संघ मार खाणार या टीकेला दोघांनी चोख प्रत्युत्तर दिलेय. दोन्ही संघांचे फलंदाज वर्चस्व गाजवतील असे सद्यातरी दिसतंय. एक मात्र दिसतंय कि भारतीय गोलान्दाजान्सारखी स्वैर गोलंदाजी ऑस्ट्रेलियन करत नाहीयेत. वोट्सन सुद्धा पूर्ण जोमात दिसत नाहीये. थोडक्यात हम भी कुछ कम नाही है. चेतेश्वर आणि विराट असेच खेळत राहिले तर गेलेला (?)" आत्मविश्वास बऱ्याच प्रमाणात परत येईल. * खेळपट्टी पाहता नवख्या भारतीय गोलंदाजांनी सुरवात तरी बरी केली होती म्हणायला जागा आहे. * नवख्या संघाने धीर नक्कीच सोडला नाहीये धवनने चेंडू शरीरापासून दूर खेळल्यामुळे यष्ट्यांवर ओढवून घेतला. (रिप्लाय मध्ये तरी असे दिसतेय) ऑस्ट्रेलियाने आक्रमक क्षेत्ररक्षण लावून फिरकीचा मारा सुरु केलाय. सामना अनिर्णीत राहील असे सद्यातरी दिसतेय
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 12/11/2014 - 05:02 नवीन
अरेरे चांगला सेट झालेला पुजारा गळाला लागला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/11/2014 - 10:27 नवीन
तिसर्‍या दिवसाखेर पहिल्या डावात भारत ५ बाद ३६९. तिघांची अर्धशतके व कोहलीचे शतक. खूप दिवसांनी परदेशात इतकी मोठी धावसंख्या आणि इतकी चांगली फलंदाजी बघायला मिळाली. ४ महिन्यांपूर्वीच इंग्लंडविरूद्ध इंग्लंडमध्ये भारत शेवटच्या दोन कसोटीतल्या ४ डावात मिळून एकूण १८० षटके खेळला होता. प्रत्येक डाव सरासरी ४५ षटके म्हणजे जेमतेम ३ तास टिकला होता. आज भारतीय फलंदाज परदेशात एकाच डावात चक्क ९७ षटके खेळले आणि अजून निम्मा संघ बाद व्हायचा आहे!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 12/11/2014 - 11:25 नवीन
तरीही भीती कायम आहे. उद्या किमान ५० षटके खेळुन धावा समान किंवा आघाडी मिळवायला हवी. साहाकडुन खुप अपेक्षा आहेत. उद्या २०/३० षटकात डाव आटोपुन कांगारुंना ८०-१०० धावांची आघाडी मिळाली तर पारडे त्यांच्या बाजुने झुकेल. अ‍ॅडलेड्चा पहिल्या दोन डावांच्या धावांची सरासरी ५०० तर शेवटच्या दोन डावांच्या धावांची सरासरी दोनशे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/11/2014 - 15:56 नवीन
बरोबर आहे. आपला डाव केव्हाही कोसळू शकतो. अजून भारत १४८ धावांनी मागे आहे. उर्वरीत १२ तासांपैकी भारताने दोन्ही डावात मिळून (दुसर्‍या डावात फलंदाजी करायला मिळाली तर) किमान ८ तास फलंदाजी केली पाहिजे. अन्यथा अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/11/2014 - 15:58 नवीन
घोटा दुखविलेल्या भुवनेश्वरकुमार ऐवजी भारतातून मुंबईच्या धवल कुलकर्णीला बोलाविण्यात आले आहे. उमेश यादवदेखील तंदुरूस्त नाही.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Fri, 12/12/2014 - 01:22 नवीन
कोहलीचे शतक दमदार ,रोहित शर्मा आताच ४३ वर कॅच देउन बाद झाला... ड्रॉ होणार .... कोहलीचे कर्णधार म्हणून पदार्पणात शतक आणि सन्मानजनक ड्रॉ ... दौर्याची सुरुवात चांगली झालेय असे वाटते
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 12/12/2014 - 04:01 नवीन
ऑस्ट्रेलियाची पहीली विकेट गेली. ऑस्ट्रेलियाला सामना निकाली काढायचा असेल तर झट्पट धावा जमवून शक्य वाटेल असे टार्गेट भातासमोर ठेवतील. झटपट धावा जमवण्याच्या नादात ऑस्ट्रेलिया विकेट गमावू शकतो. संध्याकाळ्पर्यंत जर अजुन ३/४ विकेट गेल्या तर सामना रंगतदार अवस्थेत असेल.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 12/12/2014 - 06:13 नवीन
अख्ख्या सामन्यातला परफेक्ट इनस्विंगर वर मोहमद शामी ने वॉट्सन चा त्रिफाळा उडवला !! सामन्यातला सर्वोत्तम चेंडू !! अरे महमदा कुठे लपवून ठेवला होतास हा स्वप्नवत इनस्वींगर
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/12/2014 - 09:34 नवीन
४ थ्या दिवसाखेर कांगारूंना ५ गडी गमावून ३६३ धावांचे आधिक्य मिळालेले आहे. आजची गोलंदाजी बरीचशी स्वैर होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने वेगवान खेळ केला. वॉर्नर, मार्श, स्टिव्हन स्मिथ असे सर्वजण लाँगऑफ, लॉंगऑन ला उचलून मारत होते, तरी बराच वेळ त्या भागात कोहलीने क्षेत्ररक्षक का लावला नव्हता कोणास ठाऊक? उद्या ७ तासांचा खेळ होईल. बहुतेक पुढे न खेळता ऑस्ट्रेलिया याच धावसंख्येवर डाव घोषित करतील. विजयाची आशा ठेवली तर फार मोठा अपेक्षाभंग होण्याची भीति वाटते. ५ व्या दिवशी पूर्ण दिवस खेळून पराभव वाचविणे हीच अपेक्षा आहे. अर्थात खेळपट्टी बरीचशी निर्जीव असल्याने ७ तासात ३६४ धावा करणे फारसे अवघड नाही. परंतु परदेशातील गेल्या काही कसोटीतील भारताची कामगिरी वाईट असल्याने हे आव्हान अशक्य वाटते. उद्या कोहलीने एक प्रयोग करून पहावा. धवनच्या जागी सलामीला रहाणेला पाठवावे व धवनला ५ व्या/६ व्या क्रमांकावर खेळवून पहावे.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 12/12/2014 - 11:03 नवीन
धवनच्या जागी सलामीला रहाणेला पाठवावे
सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सौंदाळा Fri, 12/12/2014 - 09:56 नवीन
ज्याची भिती होती तेच झाले. अवघड आहे. कसोटी अनिर्णयित राहिली तरी खुप बरं वाटेल भारताचे फलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर चौथ्या डावात नांगी टाकतात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/12/2014 - 15:44 नवीन
उद्या भा.प्र.वे. नुसार पहाटे ५ वा. सामना सुरू होईल व १ वाजेपर्यंत चालेल. अंदाजे ९७ षटकांचा खेळ होईल. उद्या पावणेपाचला उठायला लागणार.
  • Log in or register to post comments
अ
असंका Sat, 12/13/2014 - 05:34 नवीन
मॅच भलतीच रंगात आलीये....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 12/13/2014 - 10:19 नवीन
अखेर सामना हरलो. पण पराभवाचे फारसे दु:ख नाही. सामना खूपच रंगतदार झाला. भारताने, विशेषतः कोहली व विजयने खूपच सकारात्मक फलंदाजी करून भारताला विजयाच्या दिशेने नेले होते. चहापानाला भारत २ बाद २०५ असताना विजयाची चाहूल लागली होती. चहापानानंतर भारताला अंदाजे ३७ षटके मिळणार होती व विजयासाठी अंदाजे ४.३० प्रतिषटके या वेगाने १५९ धावा करायच्या होत्या व ८ गडी बाद व्हायचे होते. चहापानानंतर सुद्धा कोहली व विजयने सावध परंतु निश्चितपणे विजयाच्या दिशेने नेणारा खेळ केला. २ बाद २४२ पर्यंत पोहोचल्यावर कांगारूंच्या गटात चिंतेचे वातावरण पसरायला लागले होते. शतक करण्याच्या दबाबात विजय दुर्दैवीरित्या ९९ धावांवर पायचित झाला व तोच सामन्याला निर्णायक देणारा क्षण ठरला. त्याच षटकात रहाणेला चुकीचे बाद देण्यात आले. आधी धवनलाही असेच चुकीचे बाद देण्यात आले होते. याउलट विजय २४ धावांवर खेळत असताना लायनच्या गोलंदाजी अगदी व्यवस्थित पायचित झालेला असताना पंचांनी त्याला बाद दिले नव्हते. एकंदरीत भारताच्या दुसर्‍या डावात पंचांची कामगिरी सदोष ठरली. नंतर रोहीत शर्माही फार काळ टिकला नाही. रोहीत शर्मा हा कसोटीत खेळण्याच्या दर्जाचा खेळाडू नाही असे माझे पूर्वीपासूनच मत आहे. इंग्लंडमधील १ कसोटीत आणि या कसोटीत त्याला फारसे काही करता आलेले नाही. भारताचे ५ गडी बाद होऊन सुद्धा भारताने व कोहलीने आपले प्रयत्न सोडले नव्हते. १९ षटके शिल्लक असताना भारताला विजयासाठी ८० धावा हव्या होत्या. कांगारूंनी वेळकाढूपणा करून ४-५ षटके कमी टाकली असती तरी १४-१५ षटकात ८० धावा करणे शक्य होते. आणि इथेच घात झाला. लायनच्या षटकात कोहलीने पहिल्या २ चेंडूंवर ५ धावा केल्यावर पुढील ३ चेंडूंवर साहाने १ षटकार व १ चौकार मारून १० धावा घेतल्या व आवश्यक धावा १८.१ षटकात ६५ इतक्या कमी झाल्या. षटकातला शेवटचा चेंडू साहाने नुसता खेळून काढणे आवश्यक होते. आपल्यानंतर खाली एकही फलंदा़ज शिल्लक नाही हे लक्षात घेऊन घाई करायला नको होती. परंतु आधीच्या २ चेंडूंवर ६ व ४ अशा धावा केल्यामुळे त्याच भरात तो लायनचा आखूड टप्प्याचा चेंडू पुढे जाउन मारायला गेला व त्रिफळाबाद झाला. भारत ६ बाद २९९. आता फक्त शेपूट शिल्लक होते. कर्ण शर्माने एका बाजूने साथ द्यायचा प्रयत्न केला. परंतु दुसर्‍या बाजूने खेळणार्‍या कोहलीचा पूलचा फटका फसला व बॅटच्या वरच्या बाजूला लागून मिडविकेटच्या मागे झेल उडाला व तो बाद झाला आणि तिथेच भारताच्या विजयाच्या आशा पूर्ण संपल्या. सामना अचानक फिरला. हरता हरता अचानक कांगारूंना विजयाची चाहूल लागली. पुढच्या खेळाडूंनी चक्क हाराकिरी केली. अजून १४-१५ षटके शिल्लक होती. सामन्याची अधिकृत वेळ संपेपर्यंत ८-९ षटकेच पडली असती. कोणताही बेजबाबदार फटका न मारता निव्वळ टिकून रहाने आवश्यक होते. अशा वेळी शमीने काही कारण नसताना उचलून फटका मारला व झेलबाद झाला. नंतर आलेल्या वरूण एरॉनसमोर कांगारूंनी नवीन चेंडू घेऊन मिचेल जॉन्सनने पहिल्याच चेंडूवर त्याला पायचित करून ९ वा गडी बाद केला. शेवटचा इशांत शर्मा आला तेव्हा अंदाजे सामना संपायला अंदाजे २२-२३ मिनिटे शिल्लक होती. अधिकृतरित्या १२-१३ षटके शिल्लक असली तरी उर्वरीत २२-२३ मिनिटात जास्तीत जास्त ६ षटकेच झाली असती. एका बाजूने कर्ण शर्मा किल्ला लढवत होता. अशा वेळी इशांत शर्माला लायनचा चेंडू काही कारण नसताना पुढे जाऊन खेळण्याची अवदसा आठवली. तो वळलेला चेंडू शर्माला खेळताच आला नाही व हॅडीनने कोणतीही चूक न करता त्याला यष्टीचित करून सामना जिंकला. भारताने चहापानानंतरच्या एकाच सत्रात अंदाजे २७ षटकांत व १३० मिनिटांच्या खेळात ८ गडी गमावून जिंकत आलेला सामना घालविला. भारताच्या दुसर्‍या डावात धवन व रहाणे चुकीच्या निर्णयाचे बळी ठरले तर विजयला पंचाच्या चुकीचा फायदा मिळाला. साहा, शमी व ईशांत शर्माने बेजबाबदार खेळाचे प्रदर्शन केले. पण भारत हरला असला तरी भारताने सकारात्मक खेळ करून न डगमगता सामना जिंकायचा प्रयत्न केला याचा आनंद आहे. यापूर्वी २०११ पासून किमान ३ वेळा धोनी कर्णधार असताना ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी धोनीच्या सूचनेनुसार टुकुटुकु खेळून भारताने सामना अनिर्णित ठेवण्यात धन्यता मानली होती (२०११ मध्ये द. आफ्रिकेत द. आफ्रिकेविरूद्ध, २०११ मध्येच वेस्टइंडिजमध्ये विंडीजविरूद्ध व २०१३ मध्ये भारतात विंडीजविरूद्ध). धोनी हा कसोटी सामन्यात अत्यंत बचावात्मक प्रकारचा कर्णधार आहे. त्या तुलनेत कोहलीने आपण नेतृत्व करीत असलेल्या पहिल्याच सामन्यात दोन्ही डावात शतक केले व त्याचवेळी सकारात्मक खेळ करून हातपाय न गाळता सहकार्‍यांना बरोबर घेऊन सामना जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे विशेष! खरं तर भारताने कसोटीसाठी कोहलीला कर्णधार करून धोनीला फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी कर्णधार करावे. दुसरा कसोटी सामना १७ डिसेंबरपासून ब्रिस्बेनला आहे. त्या सामन्यासाठी साहाच्या जागी धोनी येईल. त्या व्यतिरिक्त रोहीत शर्मा व ईशांत शर्माच्या जागी अश्विन/जडेजा व उमेश यादवची निवड करावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/13/2014 - 10:32 नवीन
पण हाराकिरीची सवय जात नाही. जिंकायला साठ धावा हव्या होत्या, विराट सेट झालेला होता. धावा येत होत्या. एक चौकार मारल्यानंतर दूसरा चेंडुवर हवेत चेंडू मारायची काय गरज नव्हती. मारला तर तब्यतीने चेंडू फटकावयाला पाहिजे होता. सरळ मैदानाच्या बाहेर. पण अतिशय सोपा झेल दिला. मिडऑनला एकच क्षेत्ररक्षक होता आणि ग्याप मधे खेळायाला जागाही होती पण थकलेला असतांना रिस्क फटक्याची गरज नव्हती तिथेच आपला सामना गेला. -दिलीप बिरुटे (दुःखी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीरंग_जोशी Sun, 12/14/2014 - 05:51 नवीन
मूळ लेख व हे विश्लेषण दोन्हीही खूप आवडले. कालच्या दिवशीची हाराकिरी तशी काही नवी नाही पण यावरून एक जुनी आठवणी वर आली. ९९ च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध सामना संपत आलेला असताना श्रीनाथ तारणहाराप्रमाणे फलंदाजी करत होता. तो आक्रमक (अति) आक्रमकणे फटके खेळू लागल्यावर माझ्या धाकट्या भावाने काकूळतीला येऊन म्हंटले, "श्रीनाथने काळजीपूर्वक खेळायला हवे, कारण नंतर सर्व सुरदासच आहेत". अन दुर्दैवाने हेन्री ओलोंगाच्या एका षटकातच आपला आपला खेळ खलास झाला. वर्षामागोन वर्षे गेली तरी सुरदासांची परंपरा दुर्दैवाने अबाधित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Sat, 12/13/2014 - 11:55 नवीन
१. सतत ग्लोव्हज बदलणे २. पाठीमध्ये क्रँपस येउन डॉ़क्टरची मदत मागणे ३. बॉल बद्दल ( शेप ,साईझ, साईझ) तक्रार करणे ४. भांडण उकरून काढणे ५. २ बॉलच्या मधे वेळ खाणे ६ बॅड लाईट अपील करणे अशा गोष्टी करून १० मिनिटे तर सहज खाता आली असती. कोहली बाद झाल्यावर असे टॅक्तीक वापरायला हवे होते. बादवे साहा ला आपण टेस्ट खेळत आहोत याची जाणीव करून द्यायला हवी होती . अत्यंत बेजबाबदार फटका !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 12/13/2014 - 16:03 नवीन
+ १ शमी आणि ईशांत शर्मा सुद्धा अत्यंत बेजबाबदारपणे खेळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सिरुसेरि Sat, 12/13/2014 - 13:35 नवीन
खरे तर भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळण्यात पटाइत आहेत . त्यांनी इथे असे फिरकी गोलंदाजी समोर गळायला नको होते .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 12/13/2014 - 15:56 नवीन
>>> खरे तर भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळण्यात पटाइत आहेत . त्यांनी इथे असे फिरकी गोलंदाजी समोर गळायला नको होते . भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळण्यात पटाईत आहेत हा एक भ्रम आहे. २०१२ मध्ये भारतात इंग्लंडविरूद्ध इंग्लंडच्या मधूसुदन पानसरे या फिरकी गोलंदाजाने भारताची हवा केली होती व भारत ती मालिका १-२ अशी हरला होता. याचवर्षी इंग्लंडमध्ये इंग्लंडचा दुय्यम फिरकी गोलंदाज मोईन अलीने ५ सामन्यात १९ बळी घेऊन भारताला १-३ असे हरविण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याच मालिकेत भारताचे फिरकी गोलंदाज अश्विन व जडेजा पूर्ण अपयशी होते. आजच्या सामन्यात सुद्धा भारताच्या २० बळींपैकी १२ बळी लायन या फिरकी गोलंदाजाने मिळविले आहेत. फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी फलंदाजीचे तंत्र निर्दोष असावे लागते. दुर्दैवाने झटपट क्रिकेट व आयपीएल सारख्या तमाशात कसेही करून धावा करणे आवश्यक असल्याने तंत्राकडे लक्ष द्यायला कोणाकडेही फारसा वेळ नाही. पूर्वी गावसकर दोनदोन दिवस फलंदाजी करून नाबाद रहात असे. आता पूर्ण दिवस फलंदाजी करणारे फलंदाज फार थोडे दिसतात. कालांतराने तेही दिसेनासे होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सिरुसेरि Sat, 12/13/2014 - 13:42 नवीन
"त्याच षटकात रहाणेला चुकीचे बाद देण्यात आले. आधी धवनलाही असेच चुकीचे बाद देण्यात आले होते. याउलट विजय २४ धावांवर खेळत असताना लायनच्या गोलंदाजी अगदी व्यवस्थित पायचित झालेला असताना पंचांनी त्याला बाद दिले नव्हते. एकंदरीत भारताच्या दुसर्‍या डावात पंचांची कामगिरी सदोष ठरली. " ----- UDRS ची गरज आहे .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 12/13/2014 - 16:00 नवीन
>>> UDRS ची गरज आहे . भारत या तंत्रज्ञानाला का विरोध करीत आहे हे अनाकलनीय आहे. दुर्दैवाने बीसीसीआय व सर्व क्रीडाक्षेत्रामध्ये निर्णयाचे अधिकार हे हातात कधीही बॅट न धरलेल्या राजकारणी व उद्योगपतींकडे असल्याने त्यांना याची आवश्यकता उमगत नाही. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरूध्दच्या मालिकेत देखील पंचांच्या अनेक चुकीच्या निर्णयांचा फटका भारताला बसला होता. ज्या दिवशी बीसीसीआय आणि भारतीय क्रीडाक्षेत्र राजकारणी व उद्योगपती यांच्या अभद्र युतीतून मुक्त होईल तेव्हाच भारताची क्रीडाक्षेत्रात प्रगती व्हायला सुरूवात होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
श
श्रीगुरुजी Sun, 12/14/2014 - 08:32 नवीन
धोनी हा एकदिवसीय व ट-२० सामन्यांसाठी जितका चांगला कर्णधार आहे, कसोटी सामन्यांसाठी तो तितकाच वाईट कर्णधार आहे. एकदिवसीय सामन्यात तो आक्रमक व कल्पक नेतृत्व करतो, परंतु कसोटी सामन्यात तो अत्यंत बचावात्मक व पराभूत मनोवृत्तीत नेतृत्व करतो. कालच्या सामन्यात तो कर्णधार असता तर सामना जिंकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याने आपल्या संघाला नांगर टाकायला सांगून सामना अनिर्णित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले असते. यापुढे कसोटी सामन्यांसाठी कोहली व इतर सामन्यांसाठी धोनी अशी कर्णधारपदाची वाटणी करावी.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/15/2014 - 08:26 नवीन
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. कदाचित त्याला क्रिकेटला कायमचा रामराम ठोकावा लागेल. त्याच्या जागी २५ वर्षीय अष्टपैलू स्टीव्हन स्मिथची कर्णधारपदी नेमणू़क झाली आहे. इतक्या लहान वयात ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद भूषविणारा स्टिव्हन स्मिथ हा किम व्ह्यूज नंतरचा पहिलाच कर्णधार. किम ह्यूज देखील वयाच्या २५ व्या वर्षी १९७९ मध्ये भारत दौर्‍यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होता. परंतु त्याची कारकीर्द फार लवकर संपली. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १९७७-८५ इतक्याच काळात होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 12/16/2014 - 16:13 नवीन
उद्यापासून ब्रिस्बेन गॅबा येथे दुसरा कसोटी सामना भा.प्र. वेळेनुसार पहाटे ५:३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात काही बदल आहेत. ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क व रायन हॅरीस दुखापतीमुळे खेळणार नाहीत व पीटर सीडल् ला बाहेर ठेवण्यात आले आहे. क्लार्कच्या जागी शॉन मार्श आत येईल व स्टीव्हन स्मिथ कर्णधार असेल. मिचेल स्टार्क व जॉश हॅझलवूड हे हॅरिस व सिडल् ची जागा घेतील. भारतीय संघात साहाची जागा धोनी घेईल. कर्ण शर्माच्या जागी अश्विन व कदाचित ईशांत/शमी/वरूण च्या जागी उमेश यादव यायची शक्यता आहे. अ‍ॅडलेडची खेळपट्टी संथ व फलंदाजीला अनुकूल होती. परंतु गॅबाच्या खेळपट्टीवर हिरवे गवत असून खेळपट्टी वेगवान आहे. त्यामुळे या कसोटीत भारतीय फलंदाजांचा नक्की कस लागेल. अ‍ॅडलेड कसोटीमुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास नक्की उंचावलेला असेल. बघू उद्यापासून काय होतंय ते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 12/17/2014 - 01:55 नवीन
धोनी शेट हेलीकॉप्टरवाले आलेले आहेत...
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 12/17/2014 - 06:28 नवीन
काय उगा घाबरवलत राव !! मला वाटलं ५ विकेट गेल्या की काय ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 12/17/2014 - 09:41 नवीन
ते कप्तान म्हणून लिहायचे राहीलेच की, रात्र-पाळी चढली आम्हाला.... असो, तुम्ही खेळी-मेळीत घेतलेत त्याबद्दल मंडळ आभारी आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
स
सौंदाळा Wed, 12/17/2014 - 06:18 नवीन
धवनचे लै बिल झाले राव. हाकला आता त्याला गाबा सारख्या खेळपट्टीवर भारताची आश्वासक सुरुवात. बाकी इरास्मस या कसोटीलापण कासोटा खोचुन पंच म्हणुन उभा आहे हे पाहुन धक्का बसला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 07:18 नवीन
आतापर्यंत चांगली फलंदाजी झालीये. धवन परदेशात फारसा टिकाव धरू शकत नाही. पुढील कसोटीत त्याच्याऐवजी लोकेश राहुलला संधी देऊन बघावी. आज पुजाराला पंचांनी ढापला. चेंडू हेल्मेटला लागून गेला होता तरी बाद दिला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 15:59 नवीन
आजचा दिवस चांगला गेला. मिचेल मार्श व हॅझलवूड हे दोघेही जायबंदी झाल्याने उद्या कांगारूंच्या गोलंदाजीवर कदाचित मर्यादा येतील. आजच्यासारखीच उद्या फलंदाजी झाली तर ५०० नक्की.
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 12/18/2014 - 08:22 नवीन
मानलं आपल्याला! भविष्यात काय होइल याचा थोडाफार अंदाज प्रत्येक जण बांधतोच. बहुतेकांचे बहुतेक अंदाज चुकतातच. कसेही असले तरी आपले अंदाज जाहिर करणारे मात्र अगदीच थोडे असतात. सातत्याने असे अंदाज बांधून ते आपण इथे मांडत आहात - आणि त्यातील बरेचसे खरेही ठरतात. त्याबद्दल आपले अभिनंदन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा