दुकानदाराकडून अपमान..
गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले..
प्रसंग एक :
हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले.
खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही.
प्रसंग दोन:
वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला).
वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय?
तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल.
यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.
राहीली गोष्ट ते फेसबूक, वॅट्सअॅप या माध्यमातून दुकानाची माहिती देण्याची किंवा इथे त्यांची नावे देण्याची.. अशामुळे काय होणार आहे?बरेच काही होते. आणि काही झाले नाही तरी "ग्राहक असे असे वागू शकतो" हे त्या दुकानाच्या (आणि जर फ्रँचाईसी असेल तर मुख्य कंपनीच्या) लक्षात आले तरी बस्स आहे. अवांतर - एकदा एअरटेलचे त्यांच्याच वेबसाईटवरून ऑनलाईन रिचार्ज केले. साधारण २०० रूपयांचे. मला हवा असलेला आणि वेबसाईटवर नोंदवलेला प्लॅन मिळण्याऐवजी भलताच (आणि नको असलेला) प्लॅन मिळाला. कस्टमर केअर सोबत बोलून वाद न घालता त्यांच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट, ट्रँन्झॅक्शन आयडी आणि माझे डिटेल्स इ-मेलने कस्टमर केअरला पाठवले. मी लिहिलेला मेल आणि त्यांचा आलेला रिप्लाय याचा दूर दूर तक संबंध नव्हता. त्यांच्या दुसर्या तिसर्या मेल रिप्लायला "मी लिहिले आहे ते तुम्हाला समजले असेल तर तुमच्या भाषेत तेच मला लिहून पाठवा" असाही एक खवचट प्रतिसाद दिला. या सगळ्यामध्ये दोन दिवस गेले. कस्टमर केअरकडून हे असेच लांबत जाणार अशी खात्री पटल्यावर शांतपणे हे सगळे उचलून फेसबुकवर टाकले - अर्थात मेल जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला नाही पण कुणाशी काय बोलणे झाले आहे ही साधारण माहिती टाकली. पुढच्या अर्ध्या तासात "इश्यू एस्कलेट" झाला. कस्टमर केअर आणि फेसबुकवरच्या त्यांच्या अकाऊंटचा माणूस फोन कर करून सगळे समजावून घेवू लागले. आणखी १५ मिनीटांनी मला हवा तो प्लॅन मिळणार नाही पण मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळाला. यामध्ये एक अनपेक्षीत गोष्ट झाली - कस्टमर केअर आणि फेसबुक वाले वेगवेगळ्या पातळ्यांवरून माझ्याशी बोलत होते आणि मला वाटत होते ते एकाच टीममधून आहेत. कारण दोघांनीही "मला हवा तो प्लॅन मिळणार नाही" आणि "मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळेल" हेच सांगीतले होते. मला एकूण ४०० रूपयांचा टॉकटाईम मिळाला. फेसबुकवाल्याला हे सांगीतले व २०० रू रिव्हर्स करून घे म्हणून सांगीतल्यावर त्याने त्या गोष्टीला नकार दिला (कारण माहिती नाही) व तुम्हाला आमच्यातर्फे कॉम्प्लीमेंट समजा असे सांगीतले. :)गायकवाड साहेबांनी त्या वेटर ची कडक शब्दात सर्वांसमोर हजेरी घेतलीया प्रकाराच्या अनुषंगाने माझा अनेकदा गोंधळ उडतो. वेटर, सेल्समन किंवा आपण ज्याची तक्रार करत असतो त्या व्यक्तीचे "या प्रसंगामुळे पुढे काय होणार..?" असा विचार केला तर.. १) त्यांना वॉर्नींग मिळेल किंवा जास्तीत जास्त आपण गेल्यानंतर आणखी एकदा मॅनेजर झाडेल.. असे.. किंवा २) त्यांच्या नोकरीवर गदा येईल अथवा आर्थिक दंड होईल (इन्सेंटीव्ह मधून कापून अथवा एखादे इन्क्रीमेंट कमी % ने झाल्याने...) पहिला मुद्दा असेल तर ठीक आहे.. पण जर या प्रकारामुळे जर आर्थिक दंड किंवा नोकरीवर गदा येत असेल तर विनाकारण वाईट वाटत राहते. उदा. - आमच्या कंपनीच्या कॅब ड्रायव्हर्सना AC कायम ऑन ठेवावा अशी सूचना असताना (आणि AC हा ३ किंवा ४ वरच असावा, २ वर असू नये इतक्या स्पष्ट सूचना असताना) एखादा ड्रायव्हर मुद्दाम २ वर AC चालवतो. त्यामुळे किती फरक पडतो हा वेगळा प्रश्न पण "कंपनीने आखून दिलेला नियम पाळला जात नाहीये हे उघड असते." (कंपनीचे सगळे नियम आपण पाळतो का हा एक मुद्दा आहेच!) याची तक्रार केली तर या ड्रायव्हरला पहिल्यावेळी ५००/- रू नंतर ७००/- रू असा दंड होतो. अनेकदा सांगूनही भरधाव वेगाने आणि धोकादायकरीत्या गाडी चालवणे हाही असाच एक प्रश्न. तक्रार केली तर त्याची कॅब काढून टाकतात तक्रार नाही केली तर आपण जीव मुठीत धरून प्रवास करत असतो.. व्यवस्थीत न वागणारा वेटर - जेवणाच्या कितीतरी आधी मागवलेला मसाला पापड जेवण सुरू झाल्यानंतर आणून देणे, कांदा लिंबू किंवा टिश्यू पेपर्स आणण्यास वेळ लावणे, चाट मसाला मागितला असताना तिखट आणून देणे आणि चाट मसाला संपला असे सांगणे.. अशा वेळी तक्रार करणे योग्य असते परंतु आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याची शिकार होईल ही भावना टोचत राहतेच. :(१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय?हेच नाही पण एक दोनदा असे प्रसंग झाले होते. सध्याचे माहिती नाही. आपण पैसे देवून त्यांचा माज सहन करणे जमत नसल्याने चितळ्यांच्याऐवजी काका हलवाईला पसंती दिली जाते.१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय?कोणत्या ग्रहावरून आला आहात ? चितळ्यांच्या दुकानांत असे प्रसंग झाले नाही तर सूर्य पश्चिमेला उगयला सुरूवात करेल! "ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या कडून उपकार किंवा अपमान करून घ्यायला येत नाहीत. ग्राहक यायचे बंद झाले तर इथल्या मालकाचा धदा बंद होईल आणि कर्मचार्यांची नोकरी जाईल." असे दोन-तीनदा तेथिल कर्मचारी, व्यवस्थापक आणि मालक यांना सांगून झाले आहे. प्रत्येक वेळेला त्या सगळ्यांच्या चेहर्यावर "कायच्या काय बोलतात बुवा माणसे" असाच आश्चर्यमिश्रित भाव दिसला आहे !शेवटी ते "चितळे" आहेत. सोने घेताना "गाडगीळ", घर बूक करताना "परांजपे" लोक डोळे झाकुन घेतात.मान्य आहे पण म्हणून मालकांनी डोळे झाकून बसू नये असे वाटते. गाडगीळांच्याकडे असा कधीही अनुभव येत नाही - कोणाला आला असल्यास वाचण्यास उत्सुक.