Welcome to misalpav.com
लेखक: मार्मिक गोडसे | प्रसिद्ध:
शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी महिनाभर राहून मनसोक्त हुंदडायचे,मामेभाऊ व त्याच्या मित्रांबरोबर खेळायचे , टिंगलटवाळ्या करायच्या व सुट्टी संपली की ही आठवणींची शिदोरी घेवून आपल्या घरी परतायचे हा माझा दरवर्षीचा कार्यक्रम असे. अकरावीची वार्षिक परिक्षा संपल्यावर दरवर्षीप्रमाणे आजोळी गेलो. दुपारची वेळ असूनही घरात आजी आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. मामेभाऊ-बहीण कोणीही घरात नव्ह्ते, प्रत्येकाने स्वतःला अभ्यासापासून ते पोहण्यापर्यंतच्या क्लासेसमध्ये गुंतवून घेतले होते. हातपाय धूवून फ्रेश होवून आजी-आजोंबांबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या व बाहेर सटकलो. शेजारी मित्राच्या घरी गेलो तर तोही असाच कुठल्यातरी क्लासला गेला होता, बरोबरीचे कोणीही आजुबाजुला खेळताना दिसत नव्हते, फक्त चिल्लिपिल्ली मुले भर उन्हात खेळत होती. ते रखरखीत ऊन व आजुबाजूचे वातावरण मला अधिक उदास वाटू लागले,ह्याच उन्हात मित्रांबरोबर खेळताना असे कधीही जाणवले नव्हते. संध्याकाळी भावंडांबरोबर बाहेर मॉलमध्ये खरेदी,खादाडणे, इ.व्हायचे. एखाद दोन दिवस हे ठिक वाटले नंतर त्याचाही कंटाळा येवू लागला. अशी मजा मला माझ्या शहरातही मिळत होती. आजोळी मी ज्यासाठी आलो होतो त्या मजेला यंदा मी मुकलो होतो, पहिल्यांदा मी आजोळी कंटाळलो होतो. आजीआजोबांच्या आग्रहामुळे मी कसाबसा एक आठवडा आजोळी काढला. दरवर्षीप्रमाणे मला निरोप देण्यासाठी बस स्टँडवर आज कोणीही उपस्थीत नव्हते. गर्दी भरपूर होती. मुंबईला जाणारी बस आली. जो तो बसमध्ये चढण्यासाठी दरवाज्यात गर्दी करत होता, मीही त्यात सामील झालो. एव्हाना अर्धी गाडी भरली होती. मी पायरीवर पाय ठेवणार तितक्यात एका उंचपूर्‍या मजबूत देहयष्टीच्या माणसाने माझ्यासकट सगळ्यांना मागे ढकलून गाडीत शिरकाव केला. मी पुन्हा गाडीत चढण्याचा नाद सोडला व मागे जाऊन हताशपणे गाडीकडे बघत उभा राहिलो. तितक्यात त्या गाडीतील मागून दोन नंबरच्या खिडकीतून कोणीतरी हात काढून मला बोलवत होते. ते दूसरे तिसरे कोणीही नसून ज्यांनी मला ढकलले होते तेच गृह्स्थ होते. त्यांनी माझ्यासाठी जागा पकडली होती. गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती कसाबसा मी मागे पोहोचलो. ए पोराला रस्ता द्या असे त्या गृह्स्थाने आपल्या खणखणीत आवाजात लोकांना फटकारले. आजुबाजुच्या प्रवाशांच्या चेहर्‍यावर नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते इतक्या गर्दीतही आपल्याला विनासायास बसायला मिळते ह्यामुळे मनातल्या मनात सुखावलो होतो. थँक्यु आजोबा असे म्हणुन मी बसलो. पांढरी टोपी, पांढरा सदरा व पायजामा वय अंदाजे ६५ च्या पुढे असावे. कोण लागत होते हे आजोबा आपले? का आपल्यासाठी जागा पकडली असेल? कंडक्टरने बेल वाजवली व गाडी सुरू झाली. गर्दीमुळे कंडक्टरला मागे यायला बराच वेळ लागणार होता. तरीही मी पाकिटातून तिकिटाचे नेमके पैसे काढून शर्टच्या खिशात ठेवणार तिततक्यात आजोबा म्हणाले तू तिकिट काढू नकोस तू माझ्याबरोबर आहे असे मी कंडक्टरला सांगीन. तू काळजी करू नकोस. स्वातंत्र्यसैनिकाबरोबर एक व्यक्ति मोफत प्रवास करू शकते हे माहित होते. परंतू आजोबांचे वय ८० च्या आसपासही वाटत नव्हते. मला तर लॉटरीच लागली असे वाटले. बाळ तू काय करतोस ? आजोबांनी विचारले. ११ वी कॉमर्सची परिक्षा दिली.- मी. कॉमर्स?? दहावीला कमी मार्क मिळाले का?- आजोबा. नाही- मी. मग सायन्सला का गेला नाही, करीअरच्या संधी इ. आजोबांचे लेक्चर सूरू झाले. त्यांच्या बोलण्यातून मला समजले की आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्‍यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अ‍ॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते. आजोबांचे भारदस्त व्यक्तिमत्व व स्पष्टवक्तेपणामुळे मी भारावून गेलो होतो त्यांच्याविषयी आदर वाटू लागला होता. तुम्हाला कुठे जायचे आहे? सहज चौकशी म्हणून मी आजोबांना विचारले. आजोबा म्हणाले मुंबईला. मुंबईला कोणाकडे ? मी विचारले. आजोबांनी माझा डावा हात पकडला व त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूवर ठेवला. कडक झाकणासारखा हाताला स्पर्श झाला. मला काही समजले नाही हे आजोबांन कळाले. व त्याणीच सांगायला सुरवात केली. मला पोटाचा कॅन्सर आहे. टाटामध्ये ऑपरेशन करुन खराब झालेले आतडे काढून टाकले. मलविसर्जनाचा नैसर्गीक मार्ग नसल्यामुळे पोटाला छेद घेउन एक छोटी नळी आतड्याला जोडुन शरिराच्या बाहेर जोडली आहे. एक सक्शन पंप जोडून मल बाहेर काढून व नळी साफ करुन त्याला झाकण लावावे लागते. अधून मधून टाटाला यावे लागते उपचारासाठी. हे ऐकल्यावर मला आजोबांविषयी आदराबरोबर सहानुभूती वाटू लागली. मग तुम्ही प्रवासात सोबतीला कोणाला का नाही घेतले? मी विचारले. मला काय गरज कोणाला सोबतीला घ्यायची. मी ठणठणीत आहे, मला कोणाच्या आधाराची गरज नाही, थोड्या घुश्यातच आजोबा गरजले. गाडीत चढताना अनुभव घेतला होताच मी त्यांच्या फिटनेसचा. आजोबांनी बॅगेतून एक फाईल काढली. त्यात उपचारांची अनेक कागदपत्रे होती त्याच बरोबर अनेक राजकीय व्यक्तिंची शिफरसपत्रे होती. मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते. हे सर्व एक माजी शिक्षक मोठ्या अभिमानाने मला सांगत होते. कॅन्सरचा रुग्ण असल्यामुळे रुग्णाबरोबर एका व्यक्तीला मुळ गावापासून टाटा हॉस्पिटल पर्यंत एस.टी. प्रवास मोफत असल्याचे एक सवलतपत्र माझ्यापुढे धरले. माझ्यामुळे तुझे तिकिटाचे पैसे वाचतील त्यातील थोडे म्हणजे ४० रुपये तू मला दे. टॅक्सिवाला फुकटात थोडाच नेणार आहे मला? आजोबा म्हणाले. आता मला माझ्या मोफत प्रवासाचे गुपित उलगडले.मी एकटा आहे हे आजोबांनी (धूर्त) हेरले होते. मी सहज नकार देवू शकणार नाही सोपी शिकार आहे असेही वाटू शकले असेल. मी ह्या आमीषाला बळी पडलो तर एक प्रकारे मी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले असे होइल. घरातून झालेल्या संस्काराचा अवमान केल्यासरखे होइल. कंडक्टर जवळ आला मी एक ठाण्याचे तिकिट काढले. ठाण्याचा का तू? म्हणुनच असा वेडेपणा केलास तू. आजोबांनी संतापाने मला टोमणा मारला. मी उठलो व बाजूच्या प्रवाशाला बसायला जागा दिली. त्या जागेवर बसण्याचा मला काहीही नैतिक अधिकार नव्हता.बाजूच्या प्रवाशांच्या नजरेतून ते मला जाणवत होते. थोड्याच वेळेपूर्वी ज्या वक्तीबद्दल मला आदर व सहनुभूती होती ती आता पुर्णपणे नष्ट पावली होती. कदाचीत मोफत उपचारांमुळे आजोबांना आजाराचे गांभिर्य समजले नसेल नाहीतर एक शिक्षक असूनही ते जर कॅन्सरसारख्या आजारातही लोभीपणा सोडू शकत नसतील व उलट भ्रष्टाचाराला जन्म देत असतील तर भावी पिढीला ते नक्किच चुकीचा संदेश देत आहेत.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मुद्द क्र. १, २, ३ मध्ये प्रश्न आहेत. उत्तरे जमल्यास लिहावे. मुद्द क्र. ४ मध्ये चूक कबूल करा असेही म्हटले आहे त्याकडेही लक्ष द्यावे. उत्तर द्याच असे म्हटले नाही पण यातल्या एकाही प्रश्नाबद्दल न बोलता तुम्हास दुर्मिळ न होणार्‍या स्वा.सै. बद्दल प्रश्न निर्माण झालाय त्याला काय म्हणावे (ते अर्थातच अगदीच अवांतर, पण तरीही.).

अहो कुठे नेताय विषयाला? त्यांच्या मनात आलेल्या भावनेसाठी पण तुम्ही धारेवर धरायला निघालात का आता? म्हणजे एक माणुस ज्याला कॅन्सर झालाय, त्याने काहीही केलं तरी क्षम्य (!) पण लेखकाच्या मनात हे असं आलंच कसं म्हणून आता त्याला जाब विचारणं चालू आहे....!! जरा फॅक्टस मांडून बघा तरी किती कहर हास्यास्पद प्रकार चालू झालाय इथे ते. दुसर्‍या पद्धतीने बघू या- क्षः माझ्या मनात आहे की मी जगातली सगळ्यात मोठी कंपनी काढावी...पण मी काहीच करत नाही. यः मला बसून रहायला आवडतं ...पण मी दिवसरात्र काम करून एक छोटी कंपनी चालवतो. यातल्या 'क्ष' ला तुम्ही दोष देताल की 'य' ला? अहो केलं काय ते बघा ना....कृती मग ती कितीही लहान असो, जास्त महत्त्वाची असते.

अहो कुठे नेताय विषयाला?
ऑ ? कुठे नेला विषय ? तो आहे तिथेच आहे. आपण त्या आजोबांचा कँसर बाजूस ठेवू व त्यांची कृती, नैतिकताही बाजूस ठेवू आणि असे गृहित धरु आणि मग नैतिकता या समान धाग्याबद्दल प्रश्न विचारलेत. त्यात गैर ते काय ? त्यांना विचार तरी करु द्या ना त्यांची पण काय चूक झालीय त्याबद्दलच, की संयतपणे देखील त्याबद्दल बोलायचे नाहीच ?
पण लेखकाच्या मनात हे असं आलंच कसं म्हणून आता त्याला जाब विचारणं चालू आहे....!!
तुम्हाला जाब वाटला तिथेच प्रॉब्लेम आहे. त्यांनी जसा विचार केला असा विचार करणे तुम्हाला गैर वाटत नाहिच्चे. तुम्हीपण त्या उपनिर्दिष्ट मुद्द्यांबद्दल फक्त विचार केलात तरी चालेल.
दुसर्‍या पद्धतीने बघू या- क्षः माझ्या मनात आहे की मी जगातली सगळ्यात मोठी कंपनी काढावी...पण मी काहीच करत नाही. यः मला बसून रहायला आवडतं ...पण मी दिवसरात्र काम करून एक छोटी कंपनी चालवतो. यातल्या 'क्ष' ला तुम्ही दोष देताल की 'य' ला?
उदाहरण इथे कसं लागू होतं ते कळालं नाही. काही (बादरायण) संबंध (असलाच तर) विस्कटून सांगावा. लेखकाबद्दल प्रश्न उपस्थित करु नयेत असे लेखक देखील म्हणत नाही मग तुम्हाला काय बोचलेय ते कळत नाही. आणि हे अवांतर मुळीच नाही. साधारणतः वयस्कर लोकांना काही सांगून फारसा उपयोग होत नाही असा अनुभव आहे. इथे लेखक वयाने आमच्या आसपास किंवा लहानच आहे असे दिसतेय, तसे असेल तर त्याला त्याच्या विचार करण्यातली चूक वाटलेली (वाटलेली असे म्हटले आहे, असलेली नव्हे!) गोष्ट नमूद करून विचार करायला सांगितलंय तर तुम्ही "कहर" वगैरे म्हणायचा काय संबंध ?

ऑ ? कुठे नेला विषय ? तो आहे तिथेच आहे.
इथे हशा. पुणेरी मराठीत पहिल्या तीन वाक्यात हशा घेतला नाही तर तो फाऊल समजतात...तुमचा हशा मिळवलात! अभिनंदन.
ना विचार तरी करु द्या ना त्यांची पण काय चूक झालीय त्याबद्दलच,
चुक झालीच नाही. मनात हजार विचार येतात अन जातात. त्यावरून माणसाला दोषी ठरवणे हे भोळसटपणाचे आहे. शेवटी त्यातल्या कुठल्या विचारावर तो कृती करतो हेच महत्त्वाचे.
तुम्हाला जाब वाटला तिथेच प्रॉब्लेम आहे. त्यांनी जसा विचार केला असा विचार करणे तुम्हाला गैर वाटत नाहिच्चे. तुम्हीपण त्या उपनिर्दिष्ट मुद्द्यांबद्दल फक्त विचार केलात तरी चालेल.
परवानगीबद्दल धन्यवाद. हे शेवटचे वाक्यच फक्त सेन्सिबल आहे. बाकी सगळी वाक्ये काहीतरी प्रतिसाद यावा म्हणून मुद्दामच अर्धवट प्रकारे आणि चुकीची बनवली आहेत. त्याला माझा पास.
उदाहरण इथे कसं लागू होतं ते कळालं नाही. काही (बादरायण) संबंध (असलाच तर) विस्कटून सांगावा.
'बादरायण' आणि 'असलाच तर' हे शब्द कंसात घातले आहेत. ते प्रश्नाचा भाग आहेत की नाहीत हे आधी विस्कटून किंवा न विस्कटता कसेही - पण समजेल अशा साध्या सोप्या भाषेत सांगावे.
लेखकाबद्दल प्रश्न उपस्थित करु नयेत असे लेखक देखील म्हणत नाही मग तुम्हाला काय बोचलेय ते कळत नाही
आपल्याला काय कळत नाही हे वेळीच कळले म्हणजे अनेक फायदे असतात. त्या फायद्यांचा आता आपल्याला नक्कीच लाभ होइल.
साधारणतः वयस्कर लोकांना काही सांगून फारसा उपयोग होत नाही असा अनुभव आहे
साधारणतः हे नक्की कशाचे विशेषण आहे? वयस्कर चे? की अनुभवाचे? काय ते नक्की सांगावे. दोन्हीपैकी काहीही असेल तरी ही नक्कीच फार रोचक अशी माहिती असेल...
इथे लेखक वयाने आमच्या आसपास किंवा लहानच आहे असे दिसतेय, तसे असेल तर त्याला त्याच्या विचार करण्यातली चूक वाटलेली (वाटलेली असे म्हटले आहे, असलेली नव्हे!)
आपल्याला कंसात का लिहावेसे वाटते? मुळात ही गोष्ट तशी नसून अशी आहे हे तरी का सांगावेसे वाटले असेल? दुसर्‍याच्या चुका काढण्यात ते कायसंसं मॉरल हाय ग्राउंड नसतं का?
त्याला त्याच्या विचार करण्यातली चूक वाटलेली (वाटलेली असे म्हटले आहे, असलेली नव्हे!) गोष्ट नमूद करून विचार करायला सांगितलंय तर तुम्ही "कहर" वगैरे म्हणायचा काय संबंध ?
त्यांना विचार करायला सांगताना आपला त्यांच्याशी होता तोच...! दुसरा कुठला?

बाब्बौ.. चांगलंच झोंबलेलं दिसतंय की हो तुम्हाला.. :))) मुद्दे सोडून बराच फापट-पसारा उगी मांडलाय राव तुम्ही. असो. मूळ प्रतिसाद मार्मिक यांना होता, त्यांना पटले तर ते विचार करतील, नाही पटले तर सोडून देतील. किमान विचार करा म्हणण्यालाही इतका तीव्र विरोध असेल तर मग असोच. तुम्ही तुम्हाला पटेल ते करा काहीच पटले नाही तर काहीच करु नका (तुम्हाला पटेल ते करा अथवा करु नका म्हटले तरी झोंबायचे नै तर..). कुठल्याही अभिनिवेशाशिवाय चर्चा तुम्हास शक्य नाहीसे या प्रतिसादावरून दिसतेय (तशी सरांची आठवण आलीच पण तुमच्या भावना दुखवू नयेत म्हणून तुलना करीत नाही इतकेच) अशीही तुमच्याशी चर्चा सुरु नव्हतीच, तेव्हा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा .. :)

(कोणी साठीच्या आतला स्वातंत्र्यसैनिक भेटल्यास सांगा मला तसे. ) माझ्याकडे कसले आलेय स्वा.सै.चे वयानुसार रेकॉर्ड ? त्यामुळे मी ती लिंक दिली. वाटले सापडतील तेथे तुम्हाला अपेक्षीत वयाचे स्वा.सै. ह्यात गैर काय केले?

(कोणी साठीच्या आतला स्वातंत्र्यसैनिक भेटल्यास सांगा मला तसे. ) माझ्याकडे कसले आलेय स्वा.सै.चे वयानुसार रेकॉर्ड ? त्यामुळे मी ती लिंक दिली. वाटले सापडतील तेथे तुम्हाला अपेक्षीत वयाचे स्वा.सै. ह्यात गैर काय केले?
याला जोक म्हणायचा का हो मार्मिक ? म्हंजे बघा हं, भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झालीत, ६५ पेक्षा जास्त झालीत की नै ?? आणि तुमचा प्रसंग नक्की कधीचा आहे ते माहीत नाही म्हणून या ५ वर्षातील आहे असे गृहित धरलेय ना? मग (कोणी साठीच्या आतला स्वातंत्र्यसैनिक भेटल्यास सांगा मला तसे. ) यातला उपरोध लक्षात घ्या ना. हे असं काय करताय ? आणि हा काय महत्त्वाचा मुद्दा नाहीय असे सांगून पण त्याबद्दल कशाला इतकी चर्चा. असो. पटले ते घ्या बाकी सोडा..

१. बर्‍याच खटपटी-लटपटी करून कायदेशीरपणे पण अनैतिकतेने कर वाचवणारे हे भ्रष्टाचारी असतात की नसतात.? २. सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असतांना खाजगी वाहनाचा वापर करणे सुविधाजनक आहे की पेट्रोलची उधळपट्टी? ३. बायकोच्या नावावर घर घेऊन कसला तरी आर्थिक फायदा होतो म्हणतात. त्याचं काय? ४. गॅस-सिलेंडरची सबसिडी घेणारे भ्रष्टाचारी की गरीब? ५. पावतीशिवाय वस्तू घेऊन पैसे वाचवणे कायदेशीर गुन्हा आहे की बचतीची वृत्ती? ६. खोटी बिले सादर करून एलटीए ढापणे हुशारी कि गुन्हेगारी? ८. ठार स्वार्थी समाजात शिक्षक, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, सरकारी नोकर ह्यांनीच प्रामाणिकतेचे पुतळे असावे अशी अवास्तव अपेक्षा कशासाठी? ९. नैतिकतेची अधिकृत कायदेशीर व्याख्या कुठे मिळेल? १०. "अमुक असून त्याने 'असे' वागावे म्हणजे काय?" या वाक्यामागे असा अर्थ आहे का की अमुक नसणारांना कसेही वागण्याची मुभा किंवा सवलत आहे?

थोडक्यात एखादी गोष्ट कायदेशीर आहे म्ह्णुन नैतिक आहे व एखादी गोष्ट बेकायदेशीर आहे म्हणुन अनैतिक आहे असे म्हणता येत नाही. यात नैतिकता ही स्थल काल व्यक्ति समाज सापेक्ष आहे हे गृहीत आहेच.

अनैतिक आहे असे म्हणता येत नाही. यात नैतिकता ही स्थल काल व्यक्ति समाज सापेक्ष आहे हे गृहीत आहेच.
घाटपांडे काका - नैतिकता ही बर्‍यापैकी स्थिर असते म्हणजे सापेक्षता कमी असते. पण कायदेशीरपणा हा मात्र नैतिकते पेक्षा फार जास्त सापेक्ष आहे.

१. बर्‍याच खटपटी-लटपटी करून कायदेशीरपणे पण अनैतिकतेने कर वाचवणारे हे भ्रष्टाचारी असतात की नसतात.?
एखादे उदाहरण दिले असते तर बरे झाले असते. असे करणार्‍यांमुळेच कायद्यातील त्रुटी समजतात व संबंधित कायद्यात सुधारणा करण्यास मदत होते. सी.ए. व वकील ह्यांच्या व्यवसायाचा हा भाग आहे.
२. सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असतांना खाजगी वाहनाचा वापर करणे सुविधाजनक आहे की पेट्रोलची उधळपट्टी?
ह्या प्रश्नाचा धाग्याच्या विषयाशी काही संबंध ? तरीही उत्तर देतो. इंधन म्हणा, फक्त पेट्रोल म्हणल्यास बाईकवाले नाराज होतील. मुंबईतील तुडुंब भरलेल्या लोकल व बेस्ट बसेस कशाचे द्दोतक आहेत?
३. बायकोच्या नावावर घर घेऊन कसला तरी आर्थिक फायदा होतो म्हणतात. त्याचं काय?
आर्थिक तोटा होत नसेल कशाला काळजी करता?
४. गॅस-सिलेंडरची सबसिडी घेणारे भ्रष्टाचारी की गरीब?
ह्या ज्वलंत व गुंतागुंतीच्या प्रश्नावर एक मोठा लेख होइल. ह्या विषयावर धागा काढा तेथे प्रतिसादातून योग्य ते उत्तर दिले जाईल.
५. पावतीशिवाय वस्तू घेऊन पैसे वाचवणे कायदेशीर गुन्हा आहे की बचतीची वृत्ती?
गुन्हाच आहे.
६. खोटी बिले सादर करून एलटीए ढापणे हुशारी कि गुन्हेगारी?
खोटी बिले कशी तयार करतात ? ह्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला जातो का?
८. ठार स्वार्थी समाजात शिक्षक, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, सरकारी नोकर ह्यांनीच प्रामाणिकतेचे पुतळे असावे अशी अवास्तव अपेक्षा कशासाठी?
लहानपणापासून आपल्यावर सर्वाधीक काळ आई,वडील व शिक्षक हेच संस्कार करत असतात. तेच आपले आदर्श असतात. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' अशी शिकवण देणार्‍याचे पायच मातीचे निघाल्यास धक्का बसणे साहजिकच आहे. लोकप्रतिनिधी व सरकारी नोकरांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो तो आपल्या कररूपी गोळा झालेल्या पैशातून. असे असताना त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा का करू नये ? तुम्हीतरी तुमच्या घरी किंवा दूकानात अप्रामाणिक नोकर ठेवाल का? अहो चराचरात स्वार्थीपणा आहे त्यामुळेच जीवन सुरळीत चालू आहे. स्वार्थी व प्रामाणिकतेत गल्लत करत आहात तुम्ही.
९. नैतिकतेची अधिकृत कायदेशीर व्याख्या कुठे मिळेल?
आई वडील बहीण भाऊ ह्यांच्याशी आपले सबंध नैतिकतेवर आधारित असतात त्याठी कायदा करावा लागत नाही.परंतू जेथे समाज नैतिकतेची बंधने झुगारतो तेव्हा त्याला अशी कृती करण्यापासून रोखण्यासाठी कायदा करावा लागतो. उदा. चोरी करणे. एखाद्या गुन्ह्याची तिव्रता ही गुन्हेगाराच्या नैतिक अधःपतनावर अवलंबून असते आणी हे ठरविण्याचा अधिकार कोर्टाला असतो. नैतिकतेचे मोजमाप प्रत्येक कोर्टात वेगवेगळे आढळते. त्यामुळे नैतिकतेची अधिकृत कायदेशीर व्याख्या कुठेही मिळनार नाही.
१०. "अमुक असून त्याने 'असे' वागावे म्हणजे काय?" या वाक्यामागे असा अर्थ आहे का की अमुक नसणारांना कसेही वागण्याची मुभा किंवा सवलत आहे?
ज्या पेशाला/व्यक्तीला समाजात आदर असतो अशांकडूनच नैतिकतेची अपेक्षा केली जाते, चोर दरोडेखोरांकडून नाही.

स्वार्थी व प्रामाणिकतेत गल्लत करत आहात तुम्ही. >> हाच तर मुद्दा आहे राव सगळ्या प्रश्नांचा. स्वार्थ आणि प्रामाणिकपणा सोयीनुसार वापरल्या जातो 'खर्‍या जगात'. कुणी अप्रामाणिक वागू नये म्हणून नोकरीवर घ्यायच्या आधीच नोकरांशी हजार अटी असलेले करार केले जातात. ह्याचे कारण हेच आहे. त्यामुळे तुमची जी मुदलात गल्लत झाली आहे त्याकडे जरा विश्लेषण करून पहा. एखाद्या गुन्ह्याची तिव्रता ही गुन्हेगाराच्या नैतिक अधःपतनावर अवलंबून असते आणी हे ठरविण्याचा अधिकार कोर्टाला असतो. नैतिकतेचे मोजमाप प्रत्येक कोर्टात वेगवेगळे आढळते. त्यामुळे नैतिकतेची अधिकृत कायदेशीर व्याख्या कुठेही मिळनार नाही. >> यावर एखाद्या वकिल मिपाकराचा प्रतिसाद आल्यास बरे होईल. माझ्यामते एखाद्या गुन्ह्याची तिव्रता नैतिक अधःपतनावर अवलंबून नसून परिस्थितीजन्य पुरावे आणि त्याआधारे गुन्हेगाराच्या तत्कालिन मनस्थितीचे केले गेलेले विश्लेषण यावर शिक्षेची तिव्रता ठरवण्याचा अधिकार न्यायालयास असतो. त्यामुळे नैतिकतेचे अधिकृतच काय कुठलेच मोजमाप कुठल्याच कोर्टात असू शकत नाही. ज्या पेशाला/व्यक्तीला समाजात आदर असतो अशांकडूनच नैतिकतेची अपेक्षा केली जाते, चोर दरोडेखोरांकडून नाही. >> चोर दरोडेखोरांकडूनही नैतिकची अपेक्षा केली जाते साहेब. "न्यायचे तर सोने, पैसा ने पण आमचा जीव घेऊ नको" ही विनवणी दरोडेखोराच्या नैतिकतेलाच आवाहन आहे ना? मुळात जे अपेक्षा करतात इतरांकडून त्यांना स्वतःकडून झालेल्या अनैतिकतेची जराशीही जाणीव नसते. कारण नैतिकता सापेक्ष असते. माझ्या प्रश्नांमधूनच मी तुमच्या लेखावर प्रतिक्रिया देण्याचा क्षीण प्रयत्न केला. पण आता जरा सविस्तर मांडतो. ज्यांच्याकडे पाहून आपण नैतिकेचे धडे घेतो तेच असे अनैतिक वागले तर काय? असा तुमचा मूळ प्रश्न आहे. यात तुमचे समाजाचे निरिक्षण खरे तर कमी पडले असे म्हणावे लागेल. आपण कधीही धडे घेत नाही तर ते आपल्याला देण्याचे प्रयत्न केले जातात. आई-वडील-शिक्षकांकडून रोमँटीक असा आदर्शवाद आपल्या मनावर बिंबवला जातो. आता जे आदर्शवादाची शिकवण देतात त्यांच्यात खरेच काही आदर्श असते तर सगळे जग आदर्श दिसले असते. जर प्रत्येकाला आपले आई-वडील-शिक्षक आदर्श आहेत असे वाटते तर ते इतरांनाही अनुभवास यायला हवे. काही लोकांना हा आदर्शवाद किती पोकळ आहे हे खर्‍या जगाशी संबंध आल्यावर लगेच समजते. काहींना नाही समजत. याच आदर्शवाद शिकवलेल्यांमधून काही शिक्षक होतात आणि प्रत्येक जण आई-वडील होतो. आता जे प्रामाणिक नाहीत त्यांना त्यांच्या आई-वडील-शिक्षकांकडून असे काही धडे मिळतात का? तर नाही. प्रत्येक आई-वडील-शिक्षक आपल्या पाल्यांना-विद्यार्थ्यांना प्रामाणिकतेचे आदर्शाचेच धडे देत असतात. भले ते प्रत्यक्ष आयुष्यात आदर्श-प्रामाणिक असो वा नसो. तशी प्रतिमा मात्र पाल्य-विद्यार्थ्यांसमोर उभी करतात. आपण जे खरे धडे घेतो ते प्रत्यक्ष जगतांना. माझा स्वार्थ कुठे पुर्ण होतो हाच कळीचा मुद्दा असतो प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आदर्शाची वाट उपयोगाची नाही हेही अनुभवानी लक्षात येते. प्रत्यक्ष आयुष्यातले अनुभव व्यक्तिमत्व घडवतात. ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे आणि लोकलाज झुगारून द्यायच्या क्षमतेप्रमाणे लोक खरे-खोटे काम करत पुढे जात असतात. यात कुणीच अपवाद नाही. शिक्षकही नाही, डॉक्टरही नाही. या सगळ्या आपल्या लहानपणीच्या कवीकल्पना आहेत. जसा बागुलबुवा नसतो तसेच हे कुणीही पूर्ण आदर्श नसतात. आज शिक्षकांना प्रवेश मिळवण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी दणदणीत डोनेशन द्यावे लागतं. विद्यापिठात सुवर्ण मिळवणार्‍या माझ्या मित्राला प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितले होते. एवढी पात्रता असतांना असा धडा मिळत असेल तर कोण कशाला प्रामाणिकतेचे-आदर्शाचे वृथा सोंग करत फिरेल? तत्वज्ञान आणि आदर्शवाद म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं ठाम मत होत जातं. आता त्या निवृत्त मुख्याध्यापकाचंच घ्या. बढती व्हावी, वेतनवाढ व्हावी, भत्ते मिळावे म्हणून त्यांच्याच विद्यार्थ्यांसारख्या सरकारी बाबूंनी त्याच्याकडून पैसे उकळले असणार. त्या बाबूंचे शिक्षक आदर्श नव्हते का? जेव्हा सगळा समाज स्वत:च्या स्वार्थासाठी अप्रामाणिकपणा करत असेल तर त्या समाजाला काही पेशांकडून नैतिकतेची अपेक्षा ठेवायचा नैतिक अधिकार आहे का? असो, इसी बातपें अजून काही नवीन प्रश्नः हजारो मुले शाळेत शिकतात. इंजिनीअर, डॉक्टर व्हायला. थोडेसेच होतात. पण चोर कुठल्या शाळेत जातात? दारू प्यायला कुठे शिकवतात? पान्, गुटखा, सिगरेट तोंडी लावायला शिकवणारा कोणता शि़क्षक असतो? शाळेत शिकवतात. रांगेचा फायदा सर्वांना. मग गर्दीच करायचे माहीत असलेले कुठल्या शाळेचे विद्यार्थी? रांगेत उभे राहून लोकलचे टि़कीट काढणारे लोकलमधे शिरतांना गर्दी करतात तेव्हा पाच मिनिटापूर्वी आदर्शतेने वागणारे असंस्कृतासारखे का वागतात?

६. खोटी बिले सादर करून एलटीए ढापणे हुशारी कि गुन्हेगारी? एक उदाहरण -- एल टी ए( सुटीचा प्रवास भत्ता) चा हिशेब देण्यासाठी रेल्वे च्या तिकीटाची सत्यप्रत जोडणे आवश्यक असते. लोक तिकीट विकत घेतात त्याची सत्यप्रत काढतात आणि मग तिकीट रद्द करून त्याचे पैसे मिळवतात आणि खोटा एल टी ए चा क्लेम टाकतात. हि हुशारी नसून भुरटी चोरी आहे. गॅस-सिलेंडरची सबसिडी घेणारे भ्रष्टाचारी कसे? सरकारने ती सर्वानाच दिलेली आहे. पिवळ्या का हिरव्या रेशन कार्ड वाल्यांना नव्हे. पण खोटे स्वातंत्र्य सैनिकाचे प्रमाणपत्र मिळवणे हा नक्कीच भ्रष्टाचार आहे. आज स्वातंत्र्याला ६७ वर्षे झालेलि आहेत तेंव्हा जो माणूस ८५ वर्षांच्या खालील आहे ( ६७ + १८) तो खोटा स्वतंत्र्य सैनिकच आहे. स्वातंत्र्य सैनिकाचे प्रमाणपत्र किंवा निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी असणारी सरकारी व्याख्या म्हणजे ज्याने किमान काही दिवस तुरुंगवास भोगला आहे तो . आणि ब्रिटीश सरकारच्या काळात सुद्धा १८ वर्षाच्या खाली तुरुंगात पाठवीत नसत. ( बाल सुधार गृहे हि ब्रिटीशांचीच देणगी आहे) सुटीचा प्रवास भत्ता, मोटार विमा किंवा वैद्यकीय खर्चाचा परतावा यात फार मोठ्या प्रमाणात खोटी बिले सदर होतात असे निरीक्षण आहे

स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात असलेल्या आईच्या गर्भात होता म्हणून एकाला स्वातंत्र्यसैनिक असे प्रमाणपत्र मिळाले असे फार पुर्वी कधी वाचले होते. बर्‍याच गुंड-पुंड-चोरांना त्या काळात कारावास भोगल्याचे पुरावे सादर केल्यावर स्वातंत्र्यसैनिकाचे प्रमाणपत्र मिळत असे असेही ऐकले आहे जुन्या लोकांकडून. सबसिडी घेणे न घेणे ऐच्छिक आहे. सरकार देतंय तरी श्रीमंतांनी सबसिडी घेऊ नये असे सरकारचे आवाहन आहे. त्यामुळे हा नैतिक-अनैतिक, भ्रष्ट-गरिब हा प्रश्न उभा राहिला आहे. बाकी खोटे स्वातंत्र्य सैनिकाचे प्रमाणपत्र मिळवणे हा नक्कीच भ्रष्टाचार आहे यासाठी सर्वथा सहमत.

त्या सहप्रवाशाचं कृत्य क्षम्य असून लेखकाची मात्र काही तरी चुक होतीये असं वर अनेक लोक म्हणलेत. मला ते 'क्षम्य असणं' अगदीच कळत नाहिये...जरा कुणी मला समजावून सांगेल का? म्हणजे नक्की काय करायला हवं होतं लेखकाने? त्याचं लॉजिकल एक्स्टेंशन हे असं होइल का - ? तिथेच बसून तिकिट न काढता त्यांना चाळीस रुपये द्यायचे असंच म्हणायचं आहे का?

कुणी अप्रामाणिक वागू नये म्हणून नोकरीवर घ्यायच्या आधीच नोकरांशी हजार अटी असलेले करार केले जातात मी(स्वतः) स्वार्थी आहे असे प्रामाणिकपणे कबूल केल्यास एखाद्या स्वार्थी नोकराकडून कोणतेही करार न करता त्याच्या कामाचा योग्य तो मोबदला देऊन त्याच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करू शकतो का? विद्यापिठात सुवर्ण मिळवणार्‍या माझ्या मित्राला प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितले होते. एवढी पात्रता असतांना असा धडा मिळत असेल तर कोण कशाला प्रामाणिकतेचे-आदर्शाचे वृथा सोंग करत फिरेल? आता त्या निवृत्त मुख्याध्यापकाचंच घ्या. बढती व्हावी, वेतनवाढ व्हावी, भत्ते मिळावे म्हणून त्यांच्याच विद्यार्थ्यांसारख्या सरकारी बाबूंनी त्याच्याकडून पैसे उकळले असणार. Anti Corruption Bureau ला तक्रार करता येत नसेल तर काय उपयोग त्या सुवर्णपदकाचा व उच्च शिक्षणाचा.

Anti Corruption Bureau ला तक्रार>> भाऊ तुम्हाला ह्याचा काही अनुभव? तक्रार करून पुढे तुम्ही त्या ठिकाणी लागल्यावर तुम्हाला डावलले आणि बसवले मास्तर म्हणून तर? असो. आपला अनुभव सांगा.

Anti Corruption Bureau ला तक्रार करता येत नसेल तर काय उपयोग त्या सुवर्णपदकाचा व उच्च शिक्षणाचा.
बळंच =))

तुम्हाला मुद्दाच समजून घ्यायचा नसेल तर राहीलं राव. उगा आकांडतांडव करून काय उपयोग? ८. ठार स्वार्थी समाजात शिक्षक, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, सरकारी नोकर ह्यांनीच प्रामाणिकतेचे पुतळे असावे अशी अवास्तव अपेक्षा कशासाठी? मग आपण कोणाकडून प्रामाणिकतेची अपेक्षा करायची ? का करूच नये ? असा मी काढलेला अर्थ आहे. चुकत असल्यास समजाउन द्यावे. तुमच्या प्राध्यापक मित्राला एवीतेवी (पैशाच्या मागणीमुळे) ती नोकरी मिळणारच नव्हती तर काय हरकत होती Anti Corruption Bureau ला तक्रार करायला. आपल्यावर अन्याय होत असेल, सरकारी कामे वेळेवर होत नसतील तर माहीतीच्या अधिकारासारखी कायदेशीर आयुधे असताना त्याचा वापर केला तर अनेक बेकायदेशीर घटना कमी होण्यास मदत होइल. आता जे आदर्शवादाची शिकवण देतात त्यांच्यात खरेच काही आदर्श असते तर सगळे जग आदर्श दिसले असते. जर प्रत्येकाला आपले आई-वडील-शिक्षक आदर्श आहेत असे वाटते तर ते इतरांनाही अनुभवास यायला हवे मूळ लेखात मी असे का वागलो ह्याचे श्रेय घरातून झालेल्या संस्कारांना दिले आहे. तुम्हाला मान्य असो व नसो परंतू जेव्हा अनावधानाने किंवा नेणीवेतून माझ्याकडून चुकीची कृती होत असेल तर त्यातून सावरण्यामध्ये घरातील संस्कार, आदर्श ह्यांचा वाटा मोठा असतो त्यात सद्सद्विवेकबुद्धी ही आलीच. माझे पालक हे प्रत्यक्ष आयुष्यात आदर्श-प्रामाणिकच आहेत ह्याची मला खात्री आहे. तुमचे समाजाचे निरिक्षण खरे तर कमी पडले असे म्हणावे लागेल. असे तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही माझ्या भल्याकरताच सांगत असाल. परंतु तुमच्या माहितीकरीत सांगतो, मी ग्रॅजुएट झाल्यावर माझ्याकडे जितके व्यावहारीक ज्ञान होते त्याच्या कैकपट अधिक व्यावहारीक ज्ञान रेल्वे स्टेशनवरील माझ्यापेक्षा वयाने लहान अशा बुटपॉलिवाल्या मुलाकडे होते, हे सर्व निरिक्षण असल्यामुळेच मला समजले असावे. असो, मला समाजातील अनैतीक व्यवहारांचे चिलखत घेउन खोटे आयुष्य जगण्यापेक्षा नैतिकतेने भोंगळे परंतू स्वाभिमानाने व ताठ मानेने जगण्यात अधिक समाधान वाटेल. नैतिकता पतिव्रतेसारखी असते व अनैतिकता छीनालीसारखी असते. उगाच नाही म्हणत 'सतीच्या दारी बत्ती अन छीनालीच्या दारी हत्ती'. दोघींपैकी कोण आयुष्यात अधीक समाधानी असते? तक्रार करून पुढे तुम्ही त्या ठिकाणी लागल्यावर तुम्हाला डावलले आणि बसवले मास्तर म्हणून तर? प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितल्याचे उदाहरण हे ऐकिव आहे. सुवर्णपदकाचा व प्रत्यक्ष मुलाखतीचा काहीही संबंध नाही. दुसरे उदाहरण लेखातिल आजोबांचे हायपोथेटिकल प्रकारचे आहे. अहो आपले अपयश झाकण्यासाठी व अशांचे समर्थन करण्यासाथी रचलेल्या ह्या क्लुप्त्या आहेत. अशी लोकं डोक्यात जातात अगदी. अनेक अशिक्षीत शेतकर्‍यांनी तलाठ्यांना लाच घेताना पकडून दिलेले आहे त्यांनाही आयुष्याभर तलाठ्याशी संबंध येत असतो, त्यांनाही भीती असतेच म्हणुन ते हतबल होत नाही. त्यामुळे अशा सुशिक्षित भेकड लोकापेक्षा अशिक्षीत शेतकर्‍यांचा मला अभिमान आहे.

बंधो, तुम्हास मुद्दा खरंच कळलेला नाहीयेहो. प्रत्येक विधानात तुमचे तुम्हीच व्यक्तिगत घुसणार तर कसं चालेल? तुम्ही परत एकदा माझा मूळ प्रतिसाद शांतपणे वाचा. तिथे कुठेही वैयक्तिक टिप्पणी केली आहे का ते सांगा. तुमच्या आई-वडीलांच्या आदर्श-प्रामाणिकतेबद्दल कुणी शंका घेतली ज्यामुळे तुम्हाला खात्री द्यावी लागते? असो. ती खात्री देऊन तुम्ही हे तरी सिद्ध केले की इतरांचे आई-वडील प्रामाणिक-आदर्श असतीलच अशी खात्री नाही. माझाही मुद्दा तोच आहे हो. मला एक तरी माणूस दाखवा जो म्हणेल माझ्या आई-वडीलांकडून मी खोटेपणा-बेईमानी शिकलोय म्हणून. मग समाजात इतका सगळा भ्रष्टाचार बोकाळला आहे तो कुणाच्या आई-वडीलांच्या संस्कारांमुळे? तुम्ही तुमच्या घराचे आदर्श-संस्कार वैगेरे सांगताय. असे कुठले घर आहे की जे आदर्श-संस्कार करत नाही? दाऊद इब्राहिमनेही आपल्या मुलाला 'बेटा, हमेशा सच बोला करो' अशीच शिकवण दिली असेल. असो. नोकरीसाठी लाच मागणारे-देणारे एकाच माळेचे मणी असतात. जिथे माझ्या मित्राला लाच मागितली ते खाजगी कॉलेज होते. 'तिथेही' एसीबी चालते हे माहित नव्हतं. माहितीच्या अधिकारात सगळ्या खाजगी संस्थांमधले भ्रष्टाचारांविरुद्ध माहिती मिळते हे ही नवीनच समजले. की फक्त सरकारी यंत्रणेशी संबधीत लोकांनी भ्रष्टाचार करू नये अशी आपली अपेक्षा आहे? बरं एसीबीचेच काही लोक भ्रष्टाचार करतांना पकडल्या गेलेत त्यांचं काय? तुम्ही इतके वैयक्तिक घेतलेच आहे तर तुमचेही भ्रष्टाचार-विरोधी लढ्याचे अनुभव सांगा. कारण भ्रष्टाचाराशी अजिबात संबंध आलेला नसेल तर ती व्यक्ती या ग्रहावरची तरी नाही किंवा चार भिंतीबाहेर पडून कधी व्यवहार करायची गरज पडणार नाही इतकी संरक्षित असेल. कृपया वाईट वाटून घेऊ नका पण मला तरी तुमचे सगळे विचार बाळबोध आणि शाळकरी वाटतात. तुम्ही लोकलच्या गर्दीतही शिस्तीने रांगेत चढत असाल. सत्य स्विकारणे हे तुम्हाला जमत नाही आहे असे दिसत आहे. यात तुम्हीही भ्रष्टाचारी, अप्रामाणिक व्हा असं कुणीच म्हणत नाही आहे. पण अभ्यास, चिंतन वाढवा. ग्रॅजुएट होईपर्यंतच काय कित्येकांना रिटायर होईपर्यंत चपला शिवणार्‍या पोराइतकं व्यवहार-चातुर्य येत नाही असं निरिक्षण आहे. मानवी व्यवहारांचं जग अगम्य आहे. त्याला आदर्शाच्या कॅलिडोस्कोपमधून पाहण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. भ्रमनिरासच होईल. परिस्थितीत बदल घडवून आणण्याच्या इच्छेचा, प्रयत्नांचा मला नेहमीच आदर आहे. पण त्यासाठी आधी परिस्थिती समजून घ्यावी लागते. समजून न घेता फक्त तोंडाची वाफ दवडत 'हे बरोबर नाही', 'असे कुठे असते का' ह्याला उंटावरून शेळ्या हाकलणे म्हणतात. तुम्ही भ्रष्टाचाराचे पीडीत लोकांना ज्या प्रकारे सल्ले देताय त्यावरून तर तुम्ही अजून तंबूतच आहात असे वाटत आहे. अधिक काही बोलण्याची गरज भासत नाही. इथेच थांबतो. धन्यवाद. जाता जाता एक सल्ला: एकूणच भारतात इतका भ्रष्टाचार का आहे याचा जरा मध्ययुगीन काळापासून अभ्यास कराच. आम्हालाही सांगा काही कळलं तर. (सगळ्या जगात भ्रष्टाचार आहे. पण असं बोलत नसतात)

प्रत्येक विधानात तुमचे तुम्हीच व्यक्तिगत घुसणार तर कसं चालेल? तुमचे समाजाचे निरिक्षण खरे तर कमी पडले असे म्हणावे लागेल. ह्या तुमच्या विधानामुळे मला तसे स्पष्टीकरण करावे लागले. तुम्ही म्हणता तसे मी कोषात नक्किच नाही. तुमच्या सर्व प्रतिसादात मी विचारलेल्या प्रश्नांना मला समजेल अशा भाषेत उत्तर दिले नाही किंवा गोल गोल फिरवत बगल दिली. उगाचच विषय दुसरिकडे फिरवत राहीले. मी लेखात माझ्या पालकांशिवाय इतरांच्या पालकांच्या आदर्शांवर भाष्य केलेले नाही. तरी तुम्ही बळेच कोणाचे पालक मुलांना चोरी करायला किंवा वाईट गोष्टी करायला शिकवतात असे मला विचारता. वजनात काटा मारायला वाण्याच्या मुलापासून ते रद्दीवाल्याच्या मुलापर्यंत सगळे त्यांच्या बापापासूनच शिकतात. भंगारवाल्यापासून ते कचरा वेचणार्‍या बायकांची मुले सोसायटितील वस्तू त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली कसे चोरतात हे तुम्ही कदाचीत पाहिलेले नसेल. उदाहरणांची भलीमोठी यादी तयार होईल. विद्यापिठात सुवर्ण मिळवणार्‍या माझ्या मित्राला प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितले होते. हा तुमचाच प्रतिसाद जिथे माझ्या मित्राला लाच मागितली ते खाजगी कॉलेज होते. 'तिथेही' एसीबी चालते हे माहित नव्हतं. पहिल्या प्रतिसादात खाजगी कॉलेज होते असा स्पष्ट उल्लेख केला असता तर असा प्रश्न पडला नसता. माहितीच्या अधिकारात सगळ्या खाजगी संस्थांमधले भ्रष्टाचारांविरुद्ध माहिती मिळते हे ही नवीनच समजले. असे मी कुठे म्हणले आहे ? आपल्यावर अन्याय होत असेल, सरकारी कामे वेळेवर होत नसतील तर माहीतीच्या अधिकारासारखी कायदेशीर आयुधे असताना त्याचा वापर केला तर अनेक बेकायदेशीर घटना कमी होण्यास मदत होइल असा माझा प्रतिसाद होता. निट वाचत जा. बरं एसीबीचेच काही लोक भ्रष्टाचार करतांना पकडल्या गेलेत त्यांचं काय? कसं बोललात ? जसा बागुलबुवा नसतो तसेच हे कुणीही पूर्ण आदर्श नसतात. आता का तुम्ही त्यांच्याकडून प्रामाणिकतेची अपेक्षा करता? तुम्ही लोकलच्या गर्दीतही शिस्तीने रांगेत चढत असाल. असे मी कुठे म्हणले आहे ? तुमचा गैरसमज होतोय समजण्यात. खरे तर आपण वयस्करांना गाडीत चढण्यास प्राधान्य दिले पाहीजे असे मी वेगळ्या संदर्भात म्हणले होते. तुम्ही इतके वैयक्तिक घेतलेच आहे तर तुमचेही भ्रष्टाचार-विरोधी लढ्याचे अनुभव सांगा. नक्किच सांगीन. तुम्ही असे किती स्वतःचे अनुभव ह्या धाग्यावर सांगितले. जे काही सांगितले ते ऐकीवच होते. व माझे भ्रष्टाचार-विरोधी लढ्याचे अनुभव जाणुन घेण्यामागील तुमचा हेतू स्पष्ट करा. जाता जाता माझ्या शेवटच्या प्रश्नाचे उतार द्या. तुम्ही कधी कोणाकडूनही आयुष्यात प्रामाणिक सल्ल्याची मागणी केली आहे का? मागितला असल्यास त्याच्याकडून प्रामाणिक सल्ला मिळेल असे आपल्याला का वाटले ? त्यासाठी तुम्ही काय क्रायटेरिआ वापरता?