Welcome to misalpav.com
लेखक: नीलमोहर | प्रसिद्ध:
रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल. रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी. गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले. या संदर्भातील काही लेख आंतरजाल तसेच व्हॉटसएप इ.वर उपलब्ध आहेत त्यातील हा एक त्यात असलेल्या तपशीलवार माहितीमुळे इथे देत आहे. *** बहुचर्चित अशा सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा आज निकाल लागलाय. सलमान या प्रकरणात दोषी आढळलाय... त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय तसंच २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पण, ही शिक्षा रविंद्र पाटीलच्या उद्ध्वस्त आयुष्यासमोर काहीच नाही... रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला. ➡रविंद्रनं दाखल केली होती एफआयआर...  याच रविंद्र पाटीलनंच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल.... मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. रवींद्रचे दोन्ही मोठे भाऊसुध्दा पोलीस दलातच कार्यरत होते.   ➡रविंद्रनं कोर्टात दिली होती खरी साक्ष...  रविंद्र हा या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार होता... रविंद्रनं वांद्रे कोर्टात, सलमाननं जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला... यावेळी तो मद्य प्यायलेला होता... आपण त्याला याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.  ➡रविंद्रवरचा दबाव वाढला...  यानंतर, 'हिट अॅन्ड रन' प्रकरणामुळे रविंद्रवरचा दबाव वाढला होता. तो कोर्टात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायलाही घाबरत होता. त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये गेला...  ➡पोलिसांचीच रविंद्रला वाटत होती भीती...  सीनिअर पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीवर अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रविंद्रला नोकरीवरून काढलं होतं. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला... त्यामुळे रविंद्रच्या डिप्रेशनमध्ये अजूनच वाढ झाली. त्यानं मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.  ➡कुटुंबीयांपासूनही दूर झाला रविंद्र...  मुंबई सोडल्यानंतर रविंद्र अनेकदा चोरून लपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता हात घेण्याचा सल्ला दिला होता पण रविंद्रनं त्यांचं ऐकलं नाही...  ➡साक्ष बदलण्यासाठी दबाव...  रविंद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी रविंद्रवर खूप जास्त दबाव होता. परंतु, रविंद्रनं शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष बदलली नाही. कुठलीही लाच त्यानं स्वीकारली नाही. धमक्यांना भीक घातली नाही.   ➡कोर्टात अनुपस्थित राहण्यासाठी तुरुंगवास... सलमान खान प्रकरणात कोर्टात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला जेलमध्ये धाडण्यात आलं. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत रविंद्रनं आपल्याला तुरुंगात सीरियल किलर्सपासून दूर ठेवण्याची विनंती कोर्टात केली होती. पण, त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.  ➡भीक मागण्याची वेळ...  कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रविंद्र बेपत्ता झाला होता... त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं. ➡रविंद्रचे अखेरचे काही क्षण...  दारूचं व्यसन... आणि क्षयरोग २०००७ मध्ये तो सेवरी म्युनिसिपल हॉस्पीटलमध्ये सापडला. खूप दारू प्यायल्याचा परिणाम म्हणून रविंद्रला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम झाला नाही... आणि खंगून खंगून रविंद्रनं याच हॉस्पीटलमध्ये ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. यावेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपैकीही कुणी उपस्थित नव्हतं.  ➡न्यायालयानं रविंद्रची साक्ष ग्राह्य धरली...  रविंद्रच्या मृत्यूनंतर २०१४ साली जेव्हा सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला पुन्हा सुरू झाला तेव्हा रविंद्रनं वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य धरण्याची सरकारी वकिलांची मागणी मान्य करण्यात आली... सलमान खान ला पाच वर्षाची सजा झाली. सेशन कोर्ट जवळ बरेच सेलिब्रिटी सपोर्ट करीता आले होते. ब-याच जणांनी टीव्ही चॅनेल समोर चमकून घेतले. काहींनी अकलेचे तारे तोडले. या सर्व केसचा उत्कृष्ट तपास करणा-या पोलीसांसाठी एकाही व्यक्तीने किंवा मिडीयाने प्रशंसा उद्गार काढलेले दिसले नाही. सिनेस्टार ला शिक्षा झाली म्हणून सगळे चवीने चर्चा करतात. मिडीया टी.आर.पी. वाढवत बसली. हिरोला आणखी सूपरस्टार बनवतील. जर हि शिक्षा झाली नसती तर पोलीसांचे वाभाडे मिडीयाने काढले असते आणि पोलीस तेव्हा बदनामीच्या किताबातील हीरो झाले असते. *** सौजन्य: zeenews.india.com या बाबतची आणखी माहिती खालील दुव्यांवर मिळू शकेल. १. http://m.indiatimes.com/news/india/even-death-didnt-shake-his-convictionwe-remember-ravindra-patil-the-prime-witness-in-salman-hitandrun-case-232455.html २. https://patil.wordpress.com/2013/07/08/ravindra-patil-salman-khan-hit-run-case-the-wretched-witness/ ३. http://lighthouseinsights.in/blogger-soumyadipta-banerjee-deletes-his-posts-on-actor-salman-khans-2002-hit-and-run-case-issues-a-public-apology-to-salman-too.html/ दि. ०७/०५/२०१५ च्या मटा मध्येही याबद्दल बातमी आली आहे. या शिवाय अजूनही बरेच दुवे गुगल वर 'रवींद्र पाटील' या नावाने शोध घेतल्यास मिळू शकतात. या खटल्यामुळे त्यांची माहिती थोडीफार वर येत आहे नाहीतर ज्या एका माणसाच्या साक्षीमुळे मुख्यत्वे सलमानवर खटला दाखल झाला आणि तो दोषी ठरून शिक्षा ही झाली, त्याचं जगणं आणि मरण दोन्ही अंधारातच राहिलं असतं. एका धडधाकट देखण्या तरुणाचे केवळ पाच वर्षांच्या कालावधीत झालेले विदारक परिवर्तन मनाला चटका लावून जाते. त्यांची शोकांतिका वाचून कोणाही संवेदनशील माणसाचे मन हेलावून जाईल. सगळ्यात वाईट गोष्ट ही की एका होतकरू तरूणाच्या आयुष्याची परवड होत असतांना कोणीच त्याची मदत केली नाही, स्वत: त्याचं कुटुंब, त्यातही २ भाऊ पोलीस दलातच असतांनाही असं बेवारस मरण एखाद्याला यावं याहून दुर्दैव ते काय? पोलिस खातं आपल्या रक्षणासाठी आहे असा आपला समज आहे पण हे पोलिसच जेव्हा काही पैशांसाठी विकले जातात आणि अधिकारांचा गैरवापर करून आपल्याच एका सहकाऱ्याच्या जिवावर उठतात तेव्हा कायदा आणि न्यायाची अपेक्षा आपण कोणाकडून करायची ? 'बीइंग ह्यूमन' ही संस्था काढणाऱ्या चि.कु.सलमानच्या माणूसकी बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. स्वत: गुन्हा करूनही तो कबूल न करता सुटकेसाठी कोणत्याही थराला जाऊन, गुन्हा आपल्या ड्रायव्हरवर ढकलू पाहणारा आणि कोर्टात शपथ घेऊन निर्लज्जपणे खोटं बोलणारा हा माणूस ढोंगीपणाचा कळस आहे. त्याची बाजू घेणारे फिल्म इंडस्ट्रीतील लोक आणि बथ्थड बिनडोक चाहते त्याला डोक्यावर घेऊन नाचताएत, त्याच्या नावावर अजूनही बरेच गुन्हे जमा आहेत हेही ते सोयिस्कर रित्या विसरतायत. चित्रपटात अन्यायाविरुध्द पेटून उठणारा, वाईट प्रवृत्तिंचा विनाश करणारा हा 'हिरो' प्रत्यक्ष आयुष्यात किती खलप्रवृत्तिचा निघाला हे कळूनही लोक त्याला सपोर्ट करणे सोडत नाहीत !! अपघातानंतर सलमानने स्वत:हून जखमींची मदत करायला हवी होती, पोलिसांना कळवायला हवे होते, पण त्याने तिथून पळ काढण्यात धन्यता मानली, तेव्हा त्याची ह्यूमैनिटी कुठे गेली होती ? नंतरही झालेली चूक सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला नाही, उलट हे प्रकरण कुठल्याही प्रकारे दडपण्याचाच त्याचा आणि संबंधितांचा प्रयत्न होता. त्याने सरळ मार्गाने गुन्हा कबूल केला असता तर केव्हाच कायद्यानुसार मिळालेली शिक्षा भोगून आज एक प्रामाणिक नागरिक म्हणून तो उजळ माथ्याने फिरू शकला असता, पण एवढा उदात्त विचार त्याने केला असता तर काय होते.. या खटल्यातील अजुन एक दुर्लक्षलेली व्यक्ति म्हणजे कमाल खान, सलमानचा गायक मित्र/चुलत भाऊ, अपघाताचा दुसरा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार !! त्याला ह्या पूर्ण खटल्यातून पध्दतशीरपणे वगळण्यात आलं, तो कधीच समोर आला नाही जेव्हा खरंतर पहिली साक्ष त्याची असायला हवी होती. १ साक्षीदार ज्याला साक्षीला कधी बोलावलेच गेले नाही २ रा साक्षीदार ज्याला साक्षीदार संरक्षण (witness protection) मिळायला हवे होते ते दिले नाही, तो देशोधडीला लागून हाल हाल होऊन गेला तरी कोणाला काही पत्ता नाही. हे सर्व आपल्या देशात, आपल्या कायद्या अंतर्गतच होऊ शकते, कोणी कसा विश्वास ठेवायचा अशा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर !! सलमानला शिक्षा झाली नाही झाली तरी त्याच्यामुळे हकनाक गेलेले दोन जीव परत येणार आहेत थोडीच, फक्त त्यांना न्याय मिळाला तरी ठीकच म्हणायचं. यातील दुवे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लोकांनी सलमानचा मुखवट्या आडचा चेहरा ओळखून त्याचा उदो उदो करणं बंद करावं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न.. हा धागा रवींद्र पाटील यांना एक श्रध्दांजली म्हणून ... त्यांच्या आत्म्याला शांति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करण्याशिवाय अजून आपण काय करू शकतो ?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

प्रचंड संताप आणि तिरस्कार वाटतो. पण आपण काही करू शकत नाही म्हणून हतबलता येते. काल फेसबुकवर लिहिले होते तेच इथे विचारते. पाकिस्तानला कशाला हसायचं? Aren't we too a failed state?

ही काळी बाजू पण लोकांसमोर आली पाहिजे. हा धागा वेगवेगळ्या माध्यमांवर/संकेत्स्थळांवर प्रकाशित केला तर चालेल ना?

ओह .. हे मला माहीत नव्हते.. अतिशय वाईट वाटले ... या केसची एकही बातमी मी नंतर कधे वाचली नव्हती कारण शिक्षा होणार नाही याला असे वाटले होते... तरीही शिक्षा झाली तरी हे सुट्ट्या घेवु शकतात.. आणि सामान्य माणुस पोलिस कचाट्यात सापडल्यावर मरणे ही मुश्किल त्याचे.. अवघड आहे सारे

हे वाचल्यावर असे वाटते, की या जगांत जर खरंच देव असता आणि सर्व गुन्हेगारांना शिक्षा करत असता तर किती बरं झालं असतं.

हाय कोर्टानी निर्णय रद्द केला :( ... http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5761903029856800459&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150508&Provider=-&NewsTitle=LIVE:%20%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE,%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80

खूप वाईट झाले रविंद्र पाटील यांच्या बरोबर... एका सेलिब्रिटीच्या अमानुष गुन्ह्याची एफ आय आर नोंद करुन त्याला शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करणार्‍या एका कर्तव्यदक्ष पोलिसाचा बळी गेला. आज बर्याच वर्तमान पत्रांनी पाटील यांची आठवण काढली पण त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगी प्रसार माध्यमे कुठे गेली होती कुणास ठाऊक? असो...कै.पाटील यांना श्रद्धांजली,अमानुषपणे निष्पाप जीवांना यमसदनी धाडणार्‍या सो कॉल्ड दानशूर सेलिब्रिटीचा निषेध आणि भारतीय न्यायव्यवस्थेचा विजय असो(जरी १३ वर्षांनी न्याय मिळाला असेल तरीही). धन्यवाद नीलमोहर साहेब या लेखाबद्दल...

काय सिद्ध झालं शेवटी? हरअमखोर, लाचखोर, हत्यारे आणि राक्षसीवृत्तीच्या लोकांच काहीही वाकडं आणि वाईट होत नाही. चांगले लोक मात्र तळतळुन मरतात.

आणि असं असूनही या देशातली न्यायव्यवस्था किती चांगली आहे हे सतत सांगितलं जातं....बारा वर्ष झाली. काय उपयोग ह्या असल्या निकालाचा!! थोडक्यात काय पैसा आणि प्रसिद्धी असली की तुम्ही काहीही करायला मोकळे!!

नुसती न्याय व्यवस्थाच नव्हे सूड, साध्या आपल्या त्पल्या आयुष्यात पहा. हेच दिसत. घाण तोंडाच्या माणसाच्या तोंडाला लागू नको, तुझाच अपमान होइल. तो भांडखोर आहे सोडून दे. तो व्यक्तीसापेक्ष वागतोय, त्याच्या अधिकाराचा वापर करुनब्दबाव टाकतोय. असू दे! सोडुन द्या! कशाला भांडन? लबाड माण्स तर हमखास यशस्वी होतात. खरं बोलणारा वाईट होतो. निरपेक्ष वागणारा गरीब रहातो, साधी वागणुक असणारा लाथा खातो. प्रेमळ आहे म्हणुन फायदा घेतला जातो.

खरयाचा जमाना आधी नव्ह्ता, आत्ता नाही आणि कधीच नसेल, काय करता बोला !!

एका देखण्या आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा कारुण्यमय अंत झाला भ्रष्ट समाजव्यवस्थेद्वारे.

फार वाईट झालं. ही रामकहाणी माहित नव्हती, दोन दिवसांपूर्वी समजली आणि अस्वस्थता आलीये ती अजून जात नाही. सलमान किंवा तसलेच लोक कितीजणांचे शाप घेऊन मरणार आहेत कोणास ठाऊक! रविंद्र पाटील एवढा चांगला, तरणा मनुष्य पण दशा केलीन त्या मेल्या सलमाननं!

हे एवढं असूनही सलमानला जामीन मिळावा म्हणून लोक उपासतापास करत होते. कुठे जर सो कॉल्ड देव असेलच तर असल्या देशात का जन्माला घातलंस हे एकदा तरी विचारावं म्हणतो!!

सलमानला जे जे लोक सपोर्ट करत आहेत त्यांना देव करो नि फुटपाथवर उभे असताना कुणी तरी जोरदार धडकावं.. हातपाय तरी मोडु देत साल्यांचे..

नीलमोहर,राविन्द्राची कथा आणि व्यथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न पाहून बरे वाटले.इथल्या सर्वांनी त्याची व्यथा वाचून वाईट वाटले,संताप आला.पण अजून एक गोष्ट कळली ताल त्याची प्रतिक्रिया काय असेल?.माझ्या माहितीप्रमाणे रविन्द्रला तुरुंगात घातल्यवर एड्सचे इंजेक्शन देण्यात आले होते.कुठे फेडतील हे पाप?.बाकी हे सगळे समजल्यावर देव खरेच आहे का?याची शंका येते,आणि बाबा सलीम सेलेब्रेशनच्या गोष्टी करताहेत.

ती एड्सची बातमी खरी नसावी कारण त्यांचा मृत्यु टीबी नेच झाल्याचे ऐकिवात आहे. तरी काही सांगता येत नाही, या देशात आता काहीही होऊ शकतं.

त्याला एड्स चे इंजेक्शन दिले होते की नाही हे माहित नाही. एड्स मुळे रुग्णाची प्रतिकारक्षमता खालावते आणि बर्याच वेळा रुग्ण टीबीला प्रतिकार करू न शकल्याने दगावतो. अशा प्रकारे एड्स हे root cause असून मृत्यूचे final cause टीबी होते.

तरीही रक्त तपासणीमधे HIV होता काय याचे निदान होतेच होते. त्यामुळे एड्स चे इंजेक्शन ही शक्यता कमीच. कारण अजुन गदारोळ उठला असता (?).

त्याच्या रक्त तपासणीमधे HIV आढळला होता की नाही हे माहित नाही. कदाचित आढळला असेल पण दडपले असेल. अथवा आढळला नसेल आणि तशी नोन्द असेल. नाही तर गदारोळ झाला असता.

रवींद्र पाटील याचा मृत्य नाही झाला अपितु जाणून बुजून केलेली हत्या आहे. दोषी मुंबई पोलीसचे अधिकारी आणि सलमान खान आहेत. त्यांच्यावर रवींद्र पाटील याच्या हत्याच मुकदमा चालला पाहिजे. पण काय करणार शेवटी 'गांधीजींचे चित्र" जिंदाबाद म्हणावे लागेल. आज न्याय परिसरात न्यायाची हत्या झाली हेच म्हणता येईल.

वाईट झाले पाटील बाबतीत.. रवींद्र पाटील यांना श्रध्दांजली!! मला कळत नाही इतके दिवस ही बातमी का समोर आली नाही? त्या सल्लूला चांगलीच अद्द्ल घडली पाहिजे.

पैसा आणि प्रसिद्धी असली तर न्यायव्यवस्थेला किती चपळ बनवता येते याचे आणि आपल्या खरेपणाची शान शेवटपर्यंत शाबूत ठेवणार्‍या माणसाची किती परवड होऊन मृत्यू होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण असलेली केस !!! मनात चीड आणि शरम यापेक्षा इतर कोणत्या भावना उरत नाहीत. :(

सत्यपथावर चालणे सौपे नसते, सत्ययुगात राजा हरिश्चंद्राचे हाल हाल झाले होते. बहुतेकांना ही कथा खोटी वाटते. पण सत्य मार्गावर चालणार्यासाठी ही कथा एक चेतावणी आहे. रवींद्र पाटील यांनी ही कथा ऐकली होती, पण पोलिसात असून ही त्याला कथेतला मर्म कळले नसावे. सत्यमार्गावर चालण्याचा परिणाम भोगावे लागला. एका पद्धतशीर रीतीने त्याची हत्या झाली.