Welcome to misalpav.com
लेखक: नीलमोहर | प्रसिद्ध:
रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल. रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी. गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले. या संदर्भातील काही लेख आंतरजाल तसेच व्हॉटसएप इ.वर उपलब्ध आहेत त्यातील हा एक त्यात असलेल्या तपशीलवार माहितीमुळे इथे देत आहे. *** बहुचर्चित अशा सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा आज निकाल लागलाय. सलमान या प्रकरणात दोषी आढळलाय... त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय तसंच २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पण, ही शिक्षा रविंद्र पाटीलच्या उद्ध्वस्त आयुष्यासमोर काहीच नाही... रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला. ➡रविंद्रनं दाखल केली होती एफआयआर...  याच रविंद्र पाटीलनंच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल.... मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. रवींद्रचे दोन्ही मोठे भाऊसुध्दा पोलीस दलातच कार्यरत होते.   ➡रविंद्रनं कोर्टात दिली होती खरी साक्ष...  रविंद्र हा या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार होता... रविंद्रनं वांद्रे कोर्टात, सलमाननं जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला... यावेळी तो मद्य प्यायलेला होता... आपण त्याला याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.  ➡रविंद्रवरचा दबाव वाढला...  यानंतर, 'हिट अॅन्ड रन' प्रकरणामुळे रविंद्रवरचा दबाव वाढला होता. तो कोर्टात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायलाही घाबरत होता. त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये गेला...  ➡पोलिसांचीच रविंद्रला वाटत होती भीती...  सीनिअर पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीवर अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रविंद्रला नोकरीवरून काढलं होतं. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला... त्यामुळे रविंद्रच्या डिप्रेशनमध्ये अजूनच वाढ झाली. त्यानं मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.  ➡कुटुंबीयांपासूनही दूर झाला रविंद्र...  मुंबई सोडल्यानंतर रविंद्र अनेकदा चोरून लपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता हात घेण्याचा सल्ला दिला होता पण रविंद्रनं त्यांचं ऐकलं नाही...  ➡साक्ष बदलण्यासाठी दबाव...  रविंद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी रविंद्रवर खूप जास्त दबाव होता. परंतु, रविंद्रनं शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष बदलली नाही. कुठलीही लाच त्यानं स्वीकारली नाही. धमक्यांना भीक घातली नाही.   ➡कोर्टात अनुपस्थित राहण्यासाठी तुरुंगवास... सलमान खान प्रकरणात कोर्टात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला जेलमध्ये धाडण्यात आलं. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत रविंद्रनं आपल्याला तुरुंगात सीरियल किलर्सपासून दूर ठेवण्याची विनंती कोर्टात केली होती. पण, त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.  ➡भीक मागण्याची वेळ...  कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रविंद्र बेपत्ता झाला होता... त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं. ➡रविंद्रचे अखेरचे काही क्षण...  दारूचं व्यसन... आणि क्षयरोग २०००७ मध्ये तो सेवरी म्युनिसिपल हॉस्पीटलमध्ये सापडला. खूप दारू प्यायल्याचा परिणाम म्हणून रविंद्रला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम झाला नाही... आणि खंगून खंगून रविंद्रनं याच हॉस्पीटलमध्ये ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. यावेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपैकीही कुणी उपस्थित नव्हतं.  ➡न्यायालयानं रविंद्रची साक्ष ग्राह्य धरली...  रविंद्रच्या मृत्यूनंतर २०१४ साली जेव्हा सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला पुन्हा सुरू झाला तेव्हा रविंद्रनं वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य धरण्याची सरकारी वकिलांची मागणी मान्य करण्यात आली... सलमान खान ला पाच वर्षाची सजा झाली. सेशन कोर्ट जवळ बरेच सेलिब्रिटी सपोर्ट करीता आले होते. ब-याच जणांनी टीव्ही चॅनेल समोर चमकून घेतले. काहींनी अकलेचे तारे तोडले. या सर्व केसचा उत्कृष्ट तपास करणा-या पोलीसांसाठी एकाही व्यक्तीने किंवा मिडीयाने प्रशंसा उद्गार काढलेले दिसले नाही. सिनेस्टार ला शिक्षा झाली म्हणून सगळे चवीने चर्चा करतात. मिडीया टी.आर.पी. वाढवत बसली. हिरोला आणखी सूपरस्टार बनवतील. जर हि शिक्षा झाली नसती तर पोलीसांचे वाभाडे मिडीयाने काढले असते आणि पोलीस तेव्हा बदनामीच्या किताबातील हीरो झाले असते. *** सौजन्य: zeenews.india.com या बाबतची आणखी माहिती खालील दुव्यांवर मिळू शकेल. १. http://m.indiatimes.com/news/india/even-death-didnt-shake-his-convictionwe-remember-ravindra-patil-the-prime-witness-in-salman-hitandrun-case-232455.html २. https://patil.wordpress.com/2013/07/08/ravindra-patil-salman-khan-hit-run-case-the-wretched-witness/ ३. http://lighthouseinsights.in/blogger-soumyadipta-banerjee-deletes-his-posts-on-actor-salman-khans-2002-hit-and-run-case-issues-a-public-apology-to-salman-too.html/ दि. ०७/०५/२०१५ च्या मटा मध्येही याबद्दल बातमी आली आहे. या शिवाय अजूनही बरेच दुवे गुगल वर 'रवींद्र पाटील' या नावाने शोध घेतल्यास मिळू शकतात. या खटल्यामुळे त्यांची माहिती थोडीफार वर येत आहे नाहीतर ज्या एका माणसाच्या साक्षीमुळे मुख्यत्वे सलमानवर खटला दाखल झाला आणि तो दोषी ठरून शिक्षा ही झाली, त्याचं जगणं आणि मरण दोन्ही अंधारातच राहिलं असतं. एका धडधाकट देखण्या तरुणाचे केवळ पाच वर्षांच्या कालावधीत झालेले विदारक परिवर्तन मनाला चटका लावून जाते. त्यांची शोकांतिका वाचून कोणाही संवेदनशील माणसाचे मन हेलावून जाईल. सगळ्यात वाईट गोष्ट ही की एका होतकरू तरूणाच्या आयुष्याची परवड होत असतांना कोणीच त्याची मदत केली नाही, स्वत: त्याचं कुटुंब, त्यातही २ भाऊ पोलीस दलातच असतांनाही असं बेवारस मरण एखाद्याला यावं याहून दुर्दैव ते काय? पोलिस खातं आपल्या रक्षणासाठी आहे असा आपला समज आहे पण हे पोलिसच जेव्हा काही पैशांसाठी विकले जातात आणि अधिकारांचा गैरवापर करून आपल्याच एका सहकाऱ्याच्या जिवावर उठतात तेव्हा कायदा आणि न्यायाची अपेक्षा आपण कोणाकडून करायची ? 'बीइंग ह्यूमन' ही संस्था काढणाऱ्या चि.कु.सलमानच्या माणूसकी बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. स्वत: गुन्हा करूनही तो कबूल न करता सुटकेसाठी कोणत्याही थराला जाऊन, गुन्हा आपल्या ड्रायव्हरवर ढकलू पाहणारा आणि कोर्टात शपथ घेऊन निर्लज्जपणे खोटं बोलणारा हा माणूस ढोंगीपणाचा कळस आहे. त्याची बाजू घेणारे फिल्म इंडस्ट्रीतील लोक आणि बथ्थड बिनडोक चाहते त्याला डोक्यावर घेऊन नाचताएत, त्याच्या नावावर अजूनही बरेच गुन्हे जमा आहेत हेही ते सोयिस्कर रित्या विसरतायत. चित्रपटात अन्यायाविरुध्द पेटून उठणारा, वाईट प्रवृत्तिंचा विनाश करणारा हा 'हिरो' प्रत्यक्ष आयुष्यात किती खलप्रवृत्तिचा निघाला हे कळूनही लोक त्याला सपोर्ट करणे सोडत नाहीत !! अपघातानंतर सलमानने स्वत:हून जखमींची मदत करायला हवी होती, पोलिसांना कळवायला हवे होते, पण त्याने तिथून पळ काढण्यात धन्यता मानली, तेव्हा त्याची ह्यूमैनिटी कुठे गेली होती ? नंतरही झालेली चूक सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला नाही, उलट हे प्रकरण कुठल्याही प्रकारे दडपण्याचाच त्याचा आणि संबंधितांचा प्रयत्न होता. त्याने सरळ मार्गाने गुन्हा कबूल केला असता तर केव्हाच कायद्यानुसार मिळालेली शिक्षा भोगून आज एक प्रामाणिक नागरिक म्हणून तो उजळ माथ्याने फिरू शकला असता, पण एवढा उदात्त विचार त्याने केला असता तर काय होते.. या खटल्यातील अजुन एक दुर्लक्षलेली व्यक्ति म्हणजे कमाल खान, सलमानचा गायक मित्र/चुलत भाऊ, अपघाताचा दुसरा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार !! त्याला ह्या पूर्ण खटल्यातून पध्दतशीरपणे वगळण्यात आलं, तो कधीच समोर आला नाही जेव्हा खरंतर पहिली साक्ष त्याची असायला हवी होती. १ साक्षीदार ज्याला साक्षीला कधी बोलावलेच गेले नाही २ रा साक्षीदार ज्याला साक्षीदार संरक्षण (witness protection) मिळायला हवे होते ते दिले नाही, तो देशोधडीला लागून हाल हाल होऊन गेला तरी कोणाला काही पत्ता नाही. हे सर्व आपल्या देशात, आपल्या कायद्या अंतर्गतच होऊ शकते, कोणी कसा विश्वास ठेवायचा अशा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर !! सलमानला शिक्षा झाली नाही झाली तरी त्याच्यामुळे हकनाक गेलेले दोन जीव परत येणार आहेत थोडीच, फक्त त्यांना न्याय मिळाला तरी ठीकच म्हणायचं. यातील दुवे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लोकांनी सलमानचा मुखवट्या आडचा चेहरा ओळखून त्याचा उदो उदो करणं बंद करावं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न.. हा धागा रवींद्र पाटील यांना एक श्रध्दांजली म्हणून ... त्यांच्या आत्म्याला शांति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करण्याशिवाय अजून आपण काय करू शकतो ?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

धन्यवाद ! तुमची परवानगी येण्याच्या अगोदर लिंक दिली होती पण लोक लिंक उघडून वाचायची तसदी घेत नाहीत ना म्हणून लेख टाकायचा .

"सलमान ला जर शि़क्षा झाली असती तर माझा पैशांवरचा विश्वास उडाला असता" अशी एक पोस्ट पण व्हत्सप्प वर फिरत होती

व्हत्सप्प वर सध्या एक कार्टून फिरतंय. फूटपाथवर झोपलेल्या सर्वांना कुशलतेने चुकवून ड्रायव्हिंग करणार्‍या ड्रायव्हरला, आरटीओ ऑफिसर एक दारुची बाटली दाखवून म्हणतोय," आता हेच परत, ही बाटली पिऊन केलंस तर लायसेन्स मिळेल! कार्टून कर्त्याला सलाम.

मराठी माणसाचा कैवार घेणारे थोर राजकारणी सलमानच्या भेटीला धावत गेले... त्यांना हे पाटलाचं पोर हकनाक मेल्याचं काहि सोयरं-सुतक नसावं.

आमच्या एक काकु.. ज्या जनरली बर्‍याच सेन्सिबल आणि त्यांच्या मते मॉडर्न वागतात त्यांचा हा डायलॉग.. "का ग?? का चिडलीएस आमच्या सलमानवर एवढी? भेट बर तू मला एकदा..." "का चिडु नये काकु?" "ए तो इंडियाचा हार्ट थ्रॉब आहे बरं का..." "म्हणुन माणसं मारायची परवानगी मिळते का?" "अगं पण झाले ना त्याला १३ वर्ष.. आता काय त्याचं.." सासरचं नातं आहे म्हणुन संताप गिळत..."मी नाही सहन करु शकत असल्या गोष्टी... " मी जरा ऐकवायच्या मुड मध्ये येतेय म्हण्लं की काकु लगेच "अरे काका आला वाटतं.. बोल त्याच्याशी..." हे शिकले सवरले लोक असं बोलतील तर रस्त्यावर फटाके फोडणारे आणि कॅमेरासाठी सलमानची गाणी गाणारे लोक वेगळं काय करणारेत अजुन??

हे शिकले सवरले लोक असं बोलतील तर रस्त्यावर फटाके फोडणारे आणि कॅमेरासाठी सलमानची गाणी गाणारे लोक वेगळं काय करणारेत अजुन??
सहमत. हे पाहील्यावर, त्याच्या सिनेमावर बहीष्कार टाकणे वगैरे गोष्टी अशक्यप्राय वाटतात.

अवघड आहे !!! आणि खरंच उद्वेगजन्य प्रकार. प्रॉब्लेम असा आहे की आज सुपात आहेत त्यांना विसर पडलाय की आपण ही जात्यात भरडले जाऊ शकतो. फुटपाथ वर झोपायचं की नाही हा फक्त तांत्रिक मुद्दा झाला. दारु पिऊन गाडी फक्त फुटपाथवर च नाही जात, रस्त्यावर देखील कुणाला ही धडकु शकते. तेंव्हा काय म्हणणार अभिजीत (गायक) सारखे लोकं? सगळा पैशांचा माज आहे. हायकोर्टाने चक्क एका दिवसात आधीच्या सगळ्या कोर्ट्स चे निकाल फिरवले. शरमेची बाब आहे. हे प्रकरण चालू असताना, त्याला शिक्षा सुनावलेली असताना देखील बजरंगी भाईजान तुफान चालला. आता तर तो निर्दोष सुटलाय. आता विचारायलाच नको/ आपल्या सहिष्णुतेला अजुन नवे धुमारे फुटतील.

सुशिक्षित सुजाण नागरिकांनी बहिष्कार टाकूनही फार उपयोग नाही (मला नाही वाटत हे लोक सलमानचे पिक्चर पहात असतील), कारण आपल्या देशाची कमाल लोकसंख्या ही अशिक्षित अडाणी लोकांपासून बनली आहे जे अशा माणसांना डोक्यावर घेऊन नाचतात भलेही तो गुन्हेगार का असेना. सलमान सारख्या हिरोचे पिक्चर कोट्यावधींचा गल्ला कमावतात ते अशाच अर्धवट लोकांच्या जीवावर. बहिष्कार हीच शिक्षा त्याच्यासाठी योग्य आहे आणि लोकांनी हे करावंच..

हे सुशिक्षित अडाणी, ती एक वेगळीच जमात असते. 'न्यायालयातील वकीलवर्ग एकीकडे त्याचे मोबाइलद्वारे छायाचित्र घेण्यास धडपडत होते, तर तरुण महिला वकिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. एरव्ही न्यायालयात मोबाइल वापरण्यावर बंदी आहे. छायाचित्र काढणे तर दूरची गोष्ट. परंतु दुसऱ्यांना सल्ला देणाऱ्या वकीलवर्ग व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाच त्याचा विसर पडल्याचे चित्र होते.' - हे तर खासच. it happens only in india

तुम्हाला कधीतरी न्याय मिळेल अशी आशा होती, आपल्या देशाच्या थोडा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता, चमत्काराचीच आस होती बहुधा. सगळं फोल ठरलं शेवटी. सराईतपणे खर्‍याचं खोटं आणि खोट्याचं खरं सिध्द केलं गेलं, त्याच न्यायाने तुम्हालाही खोटं ठरवलं गेलं. ' रविंद्र पाटील पूर्णपणे अविश्वसनीय साक्षीदार ' - हाय कोर्ट - सलमानची निर्दोष सुटका. अंतिम विजय सत्याचा होतो म्हणतात, अंतिम सत्य - गाडी कोणीच चालवत नव्हतं, अ‍ॅक्सीडेंट आपोआप झाला, एक माणूस गेला, काही जखमी झाले कायमचे अपंग झाले, प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं, साक्षीदारांनी सांगितलं ते सगळं खोटं. सगळं खोटं - फक्त एक सलमान खरा, त्याचं नाव खरं, त्याचा पैसा खरा.. हेच अंतिम सत्य. माफ करा रविंद्र पाटील __/\__

देवापुढे काय,
तुम्हाला खरंच वाटतं अशी कोणती तरी शक्ती शिक्षा देत असते? मी अजून तरी अशी शिक्षा मिळालेली बघितली नाहीये.

ते एक वाक्य आहे बघ, बर्‍याच लोकांच्या नावावर खपवले जाणारे. मथितार्थ असा की टेररिस्ट लोकांना काय शिक्षा द्यायची ते देव बघून घेईल. माझे काम म्हणजे त्याच्यापर्यंत त्यांना पोचवणे हे आहे.

त्यांना बहुधा नियती किंवा कर्माचे फळ या अर्थाने म्हणायचं असेल. माझाही असाच समज होता की माणूस जे कर्म करतो चांगलं/ वाईट तशीच फळं त्याला या जन्मातच मिळतात. मात्र तसं काही नसतं हे अनेकदा सर्रास दिसून येतं. अशी अनेक उदाहरणं दिसतात की चांगले लोकं विनाकारण त्रास काढतात आणि दुष्ट प्रवृत्ती करून सवरून आरामात राहतात. जसं सलमान अनेक गुन्हे करून उजळ माथ्याने, गुर्मीत समाजात वावरतोय आणि रविंद्र पाटील सत्याच्या, न्यायाच्या मागे लागून हकनाक जीव गमावून बसले. Poetic justice नावाचं काही अस्तित्वात नसतं बहुतेक.

परवा एका काळवीटाचा आत्मा जोधपुर न्यायालयाच्या आसपास घुटमळतन दिसला. तिथल्या मुख्य न्यायाधीशांना भेटून म्हणाला साहेब मी आत्महत्या केली आहे. उगाच सलमानला का अडकवता? सोडून द्या बिचार्याला.

@ डॉक त्या काळवीटाच्या आत्म्याचे म्हणणे ऐकुन "केवळ" अर्ध्या मिनीटाच निकाल दिला जाईल बघा ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference

डॉक्टर तुमच्यासारख्या सुजाण आणि सुशिक्षीत लोकांनी अंधश्रद्धा पसरवणे चूक आहे. हे आत्मा वगैरे थोतांड आहे. खरी आतली बातमी अशी आहे. (खास प्रतिनिधीकडून) "काही बिश्णोई लोकांनी काळवीटाची शिकार केली. आपल्या सल्लूभाईला ते कळलं. नायकचं तो! निघाला वाचवायला काळवीटाला. नायिकाही सोबत त्याची (काळवीटाची हो) काळजी घ्यायला. सोबत स्वसंरक्षणासाठी बंदुक होती. जंगलात काळवीट सापडले पण ते जखमी. त्याला घेऊन भरधाव वेगाने नायक परतले उपचारासाठी. पण रस्त्यात काळवीट मरण पावले. पण दुष्ट बिश्णोई लोकांनी शिकार हातची गेली म्हणून नायकाला अडकवले. साधाभोळा नायक अडकला जसा नेहमी सिनेमात अडकतो. (वाचा फारएण्ड यांची परीक्षणे)." पण काळजी नसावी. शेवटी हे सत्य समोर येणार व काळवीटाला न्याय मिळणार. पण निकाल येईपर्यंत ही गुप्त बातमी फोडू नये.

वाईट वाटले. पण कंपनीत/मित्रांमध्ये त्याबाबत जे ऐक्ले ते धक्कादायक होते जवळच्या लोकांनीही त्यांची साथ सोडली होती आणि सतत धमकीच्या दडपणाखाली रहावे लागले होते.पोलिस विभागाने तर अक्षरशः वाळीत टाकले होते. खरं का आपुलकी वाटावी या खात्याबद्दल. का फक्त सिंघम सारखा सिनेमा पाहून टाळया पिटाव्यात??? माफ करा रविंद्र पाटील __/\__

अचूक माहिति दिल्याबद्दल धन्यवाद. इतक्या लवकर उच्च न्यायालय असा निर्णय देइल अशी अपेक्शा नव्हती. मी आता सलमानचा एकहि चित्रपट पाह्णार नाहि इतकेच नव्हे तर सलमानच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन माझ्या परीने सर्वान्ना करेन.

झालं ते सगळं संशयास्पद आहेच. पण "आता यापुढे सलमानचा चित्रपट बघणार नाही" असं अनेकजण अनेकठिकाणी म्हणताना दिसताहेत. आज निर्दोष मुक्ततेचा निर्णय आला म्हणून बहिष्कार? --- म्हणजे आजचा निर्णय चुकीचा आहे याची खात्री वाटताना दिसते. म्हणजे तो गुन्हेगार आहे हे स्वत:शी पटलेलं होतं. मग आत्तापर्यंत सिनेमे पाहणं चालू का ठेवलं होतं? आज दोषी ठरवून शिक्षा झाली असती (आत्ताच्या उलट निर्णय) तर सिनेमे बघणं चालू ठेवलं असतं का? निव्वळ उत्सुकतेपोटी प्रश्न उत्पन्न केलेत. प्रतिसाद इथे असला तरी तो एका कोणाला उद्देशून नाही.

मुळात सलमान किंवा अगदी शाहरूख, आमिरच्या सद्य चित्रपटांतून कोणाला काय मिळतं हा मोठा प्रश्न आहे. यांचे शेवटचे कोणते सिनेमे पाहिले तेही आठवत नाही. सलमानच्या फॅन्ससाठी 'भाईटार्डस' bhaitards हा अगदी चपखल शब्द ज्याने शोधून काढलाय त्याला खरंच सलाम !! हे लोक नवीन आले होते तेव्हा त्यांनी काही चित्रपटात चांगलं काम केलेलं आहे, उदा: अंदाज अपना अपना, कभी हां कभी ना, जो जिता वही सिकंदर इ. मात्र जसे ते स्टार झाले, डोक्यात हवा जाऊ लागली, तसतशी त्यांच्या सिनेमांची गुणवत्ता घसरू लागली आणि तद्दन गल्लाभरू चित्रपट करणे त्यांनी सुरू केले आणि सुरूच ठेवले आहे.(थोडाफार आमिरचा अपवाद वगळता)

गवि साहेब सलमान, शाहरुख, अमीर खान आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे लोक पाहतात कसे याचे मला आश्चर्य वाटते. पन्नाशीला आलेले किंवा झालेले नायक म्हणून २० वर्षच्या मुलीबरोबर प्रणय अभिनय करतात. हेच मला किळसवाणे आणि वैचारिक दिवाळखोरीचे वाटते.(मराठीत एके काळी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेरडे सोडून नायक नव्हते तशीच गत.) अ १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात तुम्हाला एकही तरुण चेहरा सापडत नाही? ( १२५ कोटीच्या देशात तुम्हाला पंतप्रधान होण्यसाठी एकही लायक नेता सापडत नाही आणि तुम्हाला परदेशाकडे पाहावे लागते याच लयीत वाचावे). याकारणास्तव नेते आणि अभिनेते यांबद्दल मला फारसा आदर नाही. यांचे सिनेमे पाहणे मी सन २००० पासूनच सोडून दिलेले आहे.

त्याच्या चित्र॑पटावर बहीष्कार घालणे सामान्य माणसाला सहज शक्य असताना त्याचे सिनेमे हाउसफुल्ल चालतात. त्यावर भरभरुन लिहले जाते, त्याच्या जाहीरती सतत झळकत असतात. आपला समाज अजुन परीपक्व झाला नाही असे म्हणावेसे वाटते. तो निर्दोष आहे आणि अपघात तर झाला आहे, मग आता काय नव्याने शोध सुरु होणार का ? की आता आम्ही हे सर्व विसरुन जायचे ?

धिक्कार असो याला डोक्यावर घेऊन नाचणार्यांचा... बिंग ह्युमन असो व आणखी केलेल्या समाजसेवा असो... असली समाजसेवा कोर्टात पुराव्यानिशी सादर करून, केलेल्या गुन्ह्यातून सवलत वा मुक्ती मिळवण्यासाठी केलेली योजनाबद्ध धडपड आहे. याच्या घरात गणेशोत्सव साजरा होतो, हे दाखवण्यासाठी प्रसारमाध्यमे पुढे पुढे करतात याने एक मुलगी बहिण म्हणून दत्तक घेतली आणि तिच्या लग्नासाठी केलेला खर्च बातमीदार दिवसभर दूरदर्शनवर दाखवतात कशासाठी ???????

च्र्निजीव सलमान खान टी आर पी आहे मेडिया साठी त्यमुळे हे सर्व चालते आहे भारतात . सलमान नंतर पण अशी बरीच पक्राने झाली त्यातील आरोपींना शिक्षा पण झाली पण भारतात पैसेच जीक्तात नाय विकत घेत येतो

जे काही झालं त्यातून एक समाज म्हणून आपली लायकी दिसते. आपण इतरवेळी निवांत असतो. चलता है. छोटे-मोठे नियम तोडतो; चिरीमिरी देतो. आपल्याला वाटतं काही होत नाही. पण त्यातून कणाहीन, लाचार समाज घडत जातो. नियम तोडून स्वतःचा फायदा करुन घेणार्‍याला व्यवहारचतुर आणि नियमासाठी नुकसान करुन घेणार्‍याला मूर्ख ठरवले जाते. योग्य त्या गोष्टीसाठी ठामपणे उभे राहणे हा जिथे मूर्खपणा समजतात त्या समाजात वेगळं काय अपेक्षित आहे? आता समजा लोक धिक्कार करतील, बहिष्कार घालतील वगैरे आणि कोणी-कोणी यथामती-यथाशक्ती शिक्षा द्यायला बघेल. अशाने त्याला कमी-जास्त शिक्षा होईलही पण दारु पिऊन निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरला असल्यास कायद्याने जी वाजवी सजा व्हायला पाहिजे ती होणार नाही. महासत्तेच्या गप्पा मारणे सोपे आहे; पण त्यासाठीची साधी बाराखडीही आपल्याला येत नाही.

एकाने चूक केली म्हून पूर्ण समाज दोषी कसा काय असू शकतो परतेक समज मध्ये चागले आणि वाईत असे दोनी परकारचे लोक असतात

निष्क्रिय बघ्यांना, कोणाच्याही अध्यात-मध्यात नसलेल्यांना, सगळं काही खपवून घेणार्‍यांना चांगले लोक म्हणत नाहीत. आता सांगा आपल्या समाजात चांगले लोक किती?

मोठ्या गोष्टी तर सोडूनच द्या .. साधे साधे प्रश्न , पण जे रोज डोक्याला त्रास देतात. सोसायटी मधल्या अध्यक्ष / सेक्रेटरी यांना नुसते ते सांगायला पण लोक तयार नसतात. तक्रार तर लांब राहिली. मुळात काही प्रश्न आहे हे पण मान्य करायला तयार नसतात. आपणच कशाला वाईट पण घ्यायचा अशी विचारसरणी !! भारतीय समाज म्हणजे फक्त बघ्यांचा समाज आहे. उच्च मध्यम वर्गीय सोसायटी मध्ये - जिथे सर्व लोक राहतात. आगरी / मराठी / ब्राम्हण / UP वाले / गुज्जू. एकजात सर्व गप्प !!

सलमानला मिळालेला न्याय(?) त्याच्या वकीलांच्या हुशारीमुळे मिळाला आहे. त्याच्यामुळे सगळे लोक 'पैसाच जिंकला' वगैरे आणि रविंद्र पाटीलच्या नावानी टाहो फोडताहेत. पण खरंच एवढे कायदाप्रिय लोक आहोत आपण? साधा प्रश्न विचारतो. प्रत्येकानी स्वतःशीच प्रामाणिक उत्तर द्यावे. तुमच्या हातून गाडीचा अपघात झाला आणि तुम्हाला बचावाची पुर्ण संधी आहे. किती जण पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली द्याल? आता जरा मॅटर इंटेन्स करुया.. अपघात-कुणीतरी जखमी-बचावाची संधी.. अपघात-कुणीतरी मेलं-बचावाची संधी.. द्या उत्तर, स्वतःशीच, प्रामाणिक !! तपासकाम गलथान झालंय, ते मुद्दाम किंवा आणखी काही कारणाने, असं न्यायालयात सिद्ध झालंय. आणि तसंही आपलं न्यायतंत्र 'शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये' वर चालतं.. सलमान सध्या निरपराधी ठरलाय. संपलं! Ypu get what you deserve.. We deserved this, and this only...

ते मुद्दाम किंवा आणखी काही कारणाने
इथेच ती गोम आहे. तो सगळा तपास इतक गलथान होता की वकीलांना ते सोपे गेले असावे. सामान्य माणसाच्या बाबतीत पोलीस असे करणार नाहीत.

तुमच्या हातून गाडीचा अपघात झाला आणि तुम्हाला बचावाची पुर्ण संधी आहे. किती जण पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली द्याल?
खरच माझी काहि चुक नसताना केवळ अपघात म्हणुन अपघात झाला हे कायदा मान्य करायला तयार असल्याची खात्री असल्यास मी जरुर तशी कबुली देईल. आणि कायदा वाकवता येत नाहि हे मला पक्कं माहित असेल तर मी मुळात दारु ढोसुन गाडी चालवणारच नाहि.

आणि कायदा वाकवता येत नाहि हे मला पक्कं माहित असेल तर
बास्स.. ह्यानंतर काहीही बोलायची गरजच नाही ना राव..

'कायदा वाकवता येत नाहि हे मला पक्कं माहित असेल तर मी मुळात दारु ढोसुन गाडी चालवणारच नाहि.' - हे वाक्य फक्त 'मी मुळात दारु ढोसुन गाडी चालवणारच नाहि' मध्ये परिवर्तित होईल तो सुदिन.

माझं उत्तर केवळ कायद्याच्या संदर्भात आहे. तसं पाहिलं तर मी दारु ढोसणारच नाहि तो अनेकांचा सुदीन असेल :)

आजिबात आश्चर्य वाटलं नाही, इथे ऑर्गनाईझ्ड दंगली करून, हजारो निश्पापांचे बळी घेऊन निर्दोष सुटणारे लोक आहेत... त्यांच फॅन फॉलोईंग सुद्धा सलमानला लाज वाटावी असं आहे