Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक वर्षानंतर . . .

श
श्रीगुरुजी
Mon, 05/25/2015 - 09:01
🗣 1265 प्रतिसाद
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

प्रतिक्रिया द्या
309978 वाचन

💬 प्रतिसाद (1265)
म
मदनबाण Tue, 05/26/2015 - 10:00 नवीन
च्यामारी अमित शहा आता त्याला "जुमला" म्हणुन टाळताना दिसतो आहे... हा कुठला जुमला ? मी विचार केला चांगले १५ लाख मिळाले असते तर भविष्यासाठी काही योग्य तरतुद करता आली असती ! एखादा सोम्यागोम्या खासदार झाला तरी आयुष्यभरासाठी पेंशनची सोय होते...आमच्या सारख्या आयटीमाथाडी कामगारांना साधे पेंशन सुद्धा नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
काळा पहाड Wed, 05/27/2015 - 06:57 नवीन
सगळ्यांना १५ लाख दिले तर त्या पैशाची किंमत नलिफाय होवून सगळ्यांच्या किंमती वाढतील आणि तो फायदा शून्य होईल.
आमच्या सारख्या आयटीमाथाडी कामगारांना साधे पेंशन सुद्धा नाही !
पेंशन स्कीम चालू आहे (एन.पी.एस) आणि त्यात या वर्षी पासून ५०,००० रुपयांपर्यंत करमुक्त रकमेचा फायदा आहे.
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कहर Wed, 05/27/2015 - 11:47 नवीन
तुम्हाला हि पेंशन योजना चालेल का ?
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कहर Wed, 05/27/2015 - 11:47 नवीन
तुम्हाला हि पेंशन योजना चालेल का ?
↩ प्रतिसाद: मदनबाण
D
dadadarekar Fri, 06/26/2015 - 19:21 नवीन
इलिजिबिलिटी ३.१ बघा. सरकारचे काँट्रीब्युशन नॉन ट्याक्सपेअर लोकाना आहे. वीस वर्षानी त्या पाच हजार मासिक पेन्शनीत रोजचा चहा तरी सुटेल का?
↩ प्रतिसाद: कहर
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 11:27 नवीन
काळ्या पैशांच्या बाबतीत मोदींच्या भाषणाची लिंक तूनळी वर उपलब्ध आहे. दुसर्‍या एका धाग्यावर पूर्वी मी ती लिंक दिली होती. त्या भाषणात मोदी असे म्हटले होते की, "परदेशात एवढा काळा पैसा आहे की जर तो सगळा परत आणला तर भारतातल्या प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला सरासरी १५-१६ लाख रूपये येऊ शकतील." भारतातल्या प्रत्येक कुटुंबाला आम्ही १५ लाख रूपये देऊ असे मोदी कधीही म्हटले नव्हते. असे कोणतेही आश्वासन त्यांनी दिलेले नव्हते. ते खरोखरच असे म्हटले असल्यास त्याची लिंक द्यावी. कोणतेही सरकार जप्त केलेला काळा पैसा जनतेला रोख वाटत नसते. तो पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतो, हे लक्षात घ्या.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
D
dadadarekar Fri, 06/26/2015 - 19:24 नवीन
बेंबट्या , बाजारातुन वीस आंबे आणले तर प्रत्येकाला चार येतील बघ. असे बाप म्हणतो तेंव्हा यदाकदाचित आंबे आणले तर वाटले जातील हाच अर्थ असतो. चार नाही निदान दोन आंबे तरी बेंबटा खाइलच ना ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नाव आडनाव Tue, 05/26/2015 - 09:49 नवीन
डाळ ही एक गोष्ट झाली. दुधाचं तसंच. दूध उत्पादकांना मिळणारा सरकारी भाव आधी २७ रुपये होता तो काहि महिन्यांआधी १७ रुपये केला. तेंव्हा (भाव कमी होण्याआधी) तुमच्या - आमच्या सारख्या लोकांना दूध ~५० रुपये लिटर मिळत होतं, ते आजंही ~५० रुपये लिटर भावानेच मिळतंय. हा फरक (१०+ २३) रुपये जातोय कुठे? पुरवठादारांची एक साखळी असते आणी त्यांचा नफा होणं अपेक्षित आहे, पण तो इतका? किंमत तिप्पट? "महंगाई कम हो गई. शून्य प्रतिशद महंगाई." अश्या बातम्या नभाटा मध्ये जेंव्हा येतात आणी सामान्य माणूस बघतो कि काय कमी झालंय तेंव्हा त्याला कळणार देखील नाही. याच बातम्यांचा पाच वर्षांनी "एक सालमे कर दिखाया" असा रेफरन्स दिला जाइल.
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
काळा पहाड Wed, 05/27/2015 - 08:10 नवीन
महागाई हा आधीची किंमत आणि आताची किंमत यातल्या फरकाचा ग्राफ असतो. महागाई कमी झाली याचा अर्थ किंमत कमी झाली असा होत नाही, तर किंमतीमध्ये होणार्‍या फरकातला बदल कमी झालाय असा त्याचा अर्थ असतो. महागाई १०% वरून ५% झाली याचा अर्थ असा की किंमती हळू वाढतील. महागाई उणी जेव्हा असते, तेव्हा किंमती कमी होतात. पण ती स्थिती अर्थव्यवस्थेला धोकादायक असू शकते.
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
न
नाव आडनाव Wed, 05/27/2015 - 08:22 नवीन
जसं मी लिहिलं की थोडयाफार फरकाने तुम्हाला - आम्हाला मिळणारी किंमत तीच राहिली पण त्याचवेळी दूध उत्पादकाना मात्र तोटा झाला. २७ मधले १० रुपये म्हणजे ~४० टक्के तोटा. त्यांचा तोटा हा मधल्यांचा फायदा :) असा माझा मुद्दा आहे. डाळींच्या कीमती वाढल्या आहेत, ती गोष्ट अजून वेगळी. बिनडोक - नाव आडनाव. (राजकारणातल्या चर्चेसाठी माझी सही. नंतर सुद्धा तितकीच ऍप्प्लिकेबल :) )
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Wed, 05/27/2015 - 08:48 नवीन
मी तुमच्या खालील पोस्ट बद्दल लिहिलं होतं
"महंगाई कम हो गई. शून्य प्रतिशद महंगाई." अश्या बातम्या नभाटा मध्ये जेंव्हा येतात आणी सामान्य माणूस बघतो कि काय कमी झालंय तेंव्हा त्याला कळणार देखील नाही. याच बातम्यांचा पाच वर्षांनी "एक सालमे कर दिखाया" असा रेफरन्स दिला जाइल.
आता
२७ मधले १० रुपये म्हणजे ~४० टक्के तोटा. त्यांचा तोटा हा मधल्यांचा फायदा
बद्दल. याला केंद्र सरकार कसं जबाबदार असू शकतं? सरकार प्रत्येक गोष्ट कंट्रोल करत नाही. केंद्र सरकार तर नाहीच. मधला फायदा व्यापार्‍यांचा होता. ते पैसे सरकारला थोडेच गेले? सरकार आधारभूत किंमती ठरवून देतं, मार्केट मधल्या किंमती ठरवत नाही. त्या किंमती या डिमांड-सप्लाय वर ठरतात. (माझ्या अंदाजानं पूर्वीच्या एनडीए सरकारनं तेही करून पाच वर्षं किंमती स्थिर ठेवल्या होत्या, पण ती गोष्ट मुळातच योग्य नव्हे). तेव्हा या बाबतीत दुसरं काहीतरी करण्याची गरज आहे. चीन मधलं स्वस्त दूध उपलब्ध करता येवू शकतं. त्यावरचा बॅन (http://profit.ndtv.com/news/economy/article-india-extends-ban-on-import-of-milk-and-milk-products-from-china-571663) जून २०१५ मध्ये संपतोय. अर्थात हे दूध धोकादायक असणार(च) पण "मधल्यांचा फायदा" होवू द्यायचा नसेल तर हे ही करूया.
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
न
नाव आडनाव Wed, 05/27/2015 - 09:35 नवीन
सरकार आधारभूत किंमती ठरवून देतं, मार्केट मधल्या किंमती ठरवत नाही. जर मार्केट मधल्या किंमती तेव्हढ्याच राहिल्या (जे मी लिहिलंय), तर त्याचा अर्थ होईल डिमांड - सप्प्लाय बदलला नाही. तर, आधारभूत किंमती कमी करून काय फ़ायदा? हा फ़ायदा कुठे जाणार आहे हे सरकारला माहित असणारच की. हे न बघता चीनी दूध कशाला पाहिजे. अश्याने आधारभूत किंमती कमी केल्या की हळू हळू सगळ्याच गोष्टी चीन मधून आणायला लागतील :) बिनडोक - नाव आडनाव (राजकारणातल्या चर्चेसाठी माझी सही. नंतर सुद्धा तितकीच ऍप्प्लिकेबल :) )
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ख
खंडेराव Wed, 05/27/2015 - 10:25 नवीन
कडे बरिच आयुधे असतात किंमती कमी करण्याची १) आयात वाढवा, इंपोर्ट डुटी कमी करा. २) निर्यात कमी करा, निर्यात कर वाढवा ३) स्टॉक लिमिट कमी करा, काळाबाजार कमी होतो. ४) धाडी घालणे ५) स्वतःचे स्टॉक खुले करणे ६) PDS 7) Subsidies त्यामुळे सरकार काय करेल असे म्हणता येणार नाही. माझा वैयक्तिक अनुभव, शेतीमालाशी संबंधीत भाववाढीबद्दल असा आहे ( त्यात दुध ही आले ) कि शेतकरी सोडुन बाकी सर्व पैसे कमवतात. हे मार्केट दलांलाच्या हिताचे आहे, शेतकरी व ग्राहकाच्या नाही.
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
क
काळा पहाड Wed, 05/27/2015 - 10:27 नवीन
आधारभूत किंमती कमी करून काय फ़ायदा?
आधारभूत किंमत कमी केलेलीच नाहीये. कारण दुधाला आधारभूत किंमतच नाहीय. सध्या व्यापारी शेतकर्‍यांना कमी देतायत. त्याचं कारण आहे की सरकारचा यावर कंट्रोल नाहीये. म्हणून तर खडसेंना खालील स्टेट्मेंट करावं लागलं. Khadse said that the government is also prepared to promulgate an ordinance for providing a fixed rate of Rs 20 per litre to milk-producing farmers who are facing difficult times owing to the steep fall in milk prices.
हा फ़ायदा कुठे जाणार आहे हे सरकारला माहित असणारच की.
डेअरीला आणि व्यापार्‍यांना.
हे न बघता चीनी दूध कशाला पाहिजे. अश्याने आधारभूत किंमती कमी केल्या की हळू हळू सगळ्याच गोष्टी चीन मधून आणायला लागतील :)
व्यापारी त्यांचा तोटा करून व्यापार करणार नाहीत. एक तर शेतकर्‍यांनी स्वतः दूध पाश्चराईझ, पॅकेज करून ते मार्केटिंगची व्यवस्था करायला शिकावं अन्यथा व्यापारी मधल्या आर्बिट्रेशनचा फायदा घेणारच. शिवाय ते लोकांना परवडायला पाहिजे. जर पर्यायी व्यवस्था उपलब्ध असेल तर मार्केट त्याचा फायदा घेतंच. तुम्हाला शेतकर्‍यांना पुरेसे पैसे देवून ग्राहकालाही स्वस्तात गोष्टी उपलब्ध करायच्या असतील तर तशी व्यवस्था उभी करणं गरजेचं असतं. सध्याची व्यवस्था तशी नाही. आणि व्यापार्‍यांना सक्ती करणं म्हणजे दुधाच्या वितरणाची संपूर्ण साखळी बंद पडून देशात दुधाचा काळाबाजार सुरू होईल. तो व्यापार्‍यांनाच फायद्याचा असेल हे लक्षात ठेवा. आणि हे फक्त दुधाबाबतीतच होतंय असं नाही. हा फ्री इकॉनॉमीचा एक पैलू आहे. त्यात सुधारणा करणं शक्य आहे पण त्यात गुडघा मनोवृत्ती वापरणं म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणं
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
श
श्रीगुरुजी Wed, 05/27/2015 - 11:18 नवीन
शेतकरी आणि ग्राहक यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात. शेतकर्‍यांना जास्त भाव मिळाला तर किंमती वाढून ग्राहक हैराण होतात आणि शेतकर्‍यांना पिकाची किंमत कमी मिळाली तर अन्नधान्यांचे भाव कमी राहिले तरी शेतकरी नाराज होतात. शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही एकाच वेळी आनंदी ठेवणे अवघड आहे. परंतु यात एक वेगळा व्ह्यू आहे. शेतकरी हा प्रत्येक धान्य, प्रत्येक भाजी, प्रत्येक फळे आपल्या शेतात पिकवू शकत नाही. तो आपल्या शेतात काही मर्यादित पिकेच घेऊ शकतो. उर्वरीत मालासाठी त्याला बाजारात जावे लागते. शेतकरी हा एकाच वेळी शेतकरी असतो आणि ग्राहकही असतो. परंतु ग्राहक हे ग्राहक असताना शेतकरी असतीलच असे नाही. त्यामुळे शेतमालाला जास्त भाव देऊन भाववाढ झाली तर जरी शेतकर्‍याला जास्त उत्पन्न मिळाले तरी भाववाढीची झळ इतर ग्राहकांप्रमाणेच सर्व शेतकर्‍यांना सुद्धा पोहोचते. त्यामुळे शेतमालाला भाव कमी मिळाला किंवा जास्त मिळाला तरी शेतकर्‍याला दोन्ही बाजूने झळ पोहोचते.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ख
खंडेराव Wed, 05/27/2015 - 11:32 नवीन
शेतकरी आणि ग्राहक यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात.
बहुतांशी पिकांच्या बाबतीत ग्राहक जे देतो त्यातले ३०-३५% शेतकर्यापर्यंत पोहोचते. यात मी प्रक्रिया उद्योग ग्रुहित धरला नाहीये. जेव्हा भाववाढ होते, तेव्हा शेतकरी सोडुन इतरच पैसे कमावतात. कांद्याची भाववाढ हे उत्तम उदाहरण आहे. याला कारण म्हणजे चुकीची वितरण व्यवस्था. भाव कमी असतात तेव्हा, आणि वाढतात तेव्हाही दलालच पैसे कमावतात. जर ही व्यवस्था निट असेल, तर ती ग्राहक आणि शेतकरी दोघांना योग्य किंमत देइल.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 12:30 नवीन
शेतकरी नसलेल्या सामान्य शहरी ग्राहकांचे असेच बाळबोध विचार असतात. शेतकरी राहत असलेल्या गावात इतर शेतकर्‍यांनी पिकवलेले धान्य, भाजीपाला, त्याला अतिशय स्वस्तात घेता येतो. बरेचदा ह्या सगळ्यांचा खर्च नगण्य असतो. शहरी लोकांप्रमाणे मंडईत जाऊन खरेदी करत नाही शेतकरी. त्यामुळे त्याला भाववाढीची झळ बसत असेल हा निष्कर्ष कल्पना म्हणून ठिक आहे. एका खेड्यात असलेली पावकिलो वांग्याची किंमत २ रुपये असेल तर तालुक्याच्या ठिकाणी ७-८ रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी १२-१५ रुपये तीच मुंबईसारख्या शहरात २५ रुपये असते. माझ्या एका शेतकरी मित्राने ६०-८० पैसे किलोने व्यापार्‍याला विकलेला कांदा किरकोळ बाजारात ८-१० रुपयांनी विकल्या जातांना स्वतः बघितलंय. किमान २५ ते ३० फ्लॉवर भरलेलं एक पोतं आजही शेतावर फक्त ५० रुपयांत उचललं जातं. किरकोळ बाजारात त्याच एका फ्लॉवरची किंमत ३०-५० रुपयांपर्यंत जाते. शेतीमालाचा काय दर असावा हे उत्पादक नाही तर दलाल ठरवतात. दलालांशिवाय शेतीमाल विकता येत नाही. अशी जीवघेणी व्यवस्था इतरत्र कुठल्याही उत्पादनक्षेत्रात नाही. एवढी क्रूर व्यवस्था बदलण्याची हिंमत हे तरी सरकार दाखवेल तो सुदिन. पण हे होणे नाही. गरिबांना जीवनावश्यक वस्तू स्वस्तात मिळणार नाहीत ही भीती घालून शेतकरी आणि ग्राहक दोघांचीच लूट चालू आहे, दलाल गब्बर होतायत, पैसे नीट पोचतायत. यावर सरकारने करण्यासारखं असूनही काहीही केलेलं नाही. आणि म्हणे भ्रष्टाचार आणि महागाई कमी झाली.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीरंग_जोशी Wed, 05/27/2015 - 19:28 नवीन
या प्रतिसादाच्या आशयाशी सहमत.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 09:48 नवीन
हे महागाई निर्देशांक वैगेरे मला तरी फारसं कळत नाही. पण तुमच्या प्रतिसादाचा अर्थ काढला तर असा आहे की मार्केटमधल्या किंमतीवर सरकारचा अंकुश नसतो. तेव्हा वाढणार्‍या घटणार्‍या महागाईबद्दल सरकारला का धरतात नेहमी? महागाईबद्दल सरकारच्या हातात काहीच नाही तर मग आम्ही महागाई कमी केली असे सरकारचे म्हणणे याला काय आधार? एखाद्या बाबतीत भ्रष्टाचार होतो म्हणजे पैसे सरकारच्या तिजोरीत जातो असं नसतं ना? सरकारी धोरणांना वाकवण्याची मुभा मिळावी म्हणून संबंधीत लोकांकडे पैसे पोचते होतात. यालाच भ्रष्टाचार किंवा घोटाळा म्हणतात बहुधा. याची पावती मिळत नसते. साठेबाजी करणार्‍यांवर, कॄत्रीम पद्धतीने भाव वाढवणार्‍यांवर सरकारला कडक कारवाई करण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. ते न करण्याबद्दल योग्य ठीकाणी पैसे पोचतात. (मध्यंतरी साखरेचे दर वाढत होते तेव्हा मोठ्या काकांकडे त्यांचे खोके व्यवस्थित पोचवणारा एक व्यापारी माझ्या संपर्कात... ... ... असो.)
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ख
खंडेराव Wed, 05/27/2015 - 10:31 नवीन
सोपे उदाहरण घ्या..जेव्हा वायदेबाजारात एखादा निर्णय होतो ( हे केंद्र सरकारशीच संबंधीत असतात ) तेव्हा हजारो कोटिंची उलाढाल होते, आणि ज्याला निर्णयाची आधी माहीती मिळते तो अक्षरशः पैसे छापतो.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
काळा पहाड Wed, 05/27/2015 - 10:43 नवीन
हे महागाई निर्देशांक वैगेरे मला तरी फारसं कळत नाही. पण तुमच्या प्रतिसादाचा अर्थ काढला तर असा आहे की मार्केटमधल्या किंमतीवर सरकारचा अंकुश नसतो. तेव्हा वाढणार्‍या घटणार्‍या महागाईबद्दल सरकारला का धरतात नेहमी? महागाईबद्दल सरकारच्या हातात काहीच नाही तर मग आम्ही महागाई कमी केली असे सरकारचे म्हणणे याला काय आधार?
अहो साधी गोष्ट आहे, युपीए सरकारच्या जेव्हा लक्षात आलं की महागाईमुळे आपल्याला जनता रिटायर करणार आहे, तेव्हा त्यांना महागाई कमी करावी वाटत नसेल का? त्यांनी सगळे हातपाय आपटूनसुद्धा महागाई ढिम्म हलली नाही. सरकारच्या हातात अगदीच काही नसतं असं नाही पण त्यांचे उपाय हे काही जागी चांगला परिणाम करतात पण बाकीच्या ठिकाणी वाईट परिणाम करतात. किंमती कमी झाल्या तर शेतकरी नाराज होतो आणि वाढल्या तर ग्राहक. शिवाय हे उपाय 'मॅक्रो' या सदरात येतात. सरकार मायक्रो मॅनेजेमेंट करू शकत नाही. व्याजाचे दर कमी करणे, अर्थव्यवस्थेत पैसा ओतणे, बाँड वितरीत करून पैसा कमी करणे वगैरे सारख्या गोष्टी सरकार केंद्रीय बँकेच्या माध्यमातून करू शकतं. पण याचा हवा तसा परिणाम होतोच असं नाही. कारण अर्थव्यवस्था हे एक जटिल जनावर आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक हे सर्व गोष्टींवर परिणाम करतात. फक्त कांद्याचे भाव कमी होतील असं नसतं. जेव्हा अर्थव्यवस्था उसळी घेत असते, तेव्हा ती सर्वांसाठी उसळी घेवू शकते. मग भाव वाढू शक्तात. जेव्हा ज्यादा नोकर्‍या निर्माण होतात, तेव्हा हे नवीन नोकरदार खरेदी करून उपलब्ध वस्तू कमी करू शकतात आणि भाववाढ होवू शकते. म्हणून नोकर्‍या वाढाव्यात असं वाटणं आणि भाव कमी व्हावेत असंही वाटणं हे रिआलिस्टीक एक्स्पेक्टेशन नाही.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 12:03 नवीन
अगदी बरोबर. त्यामुळेच महागाई आपल्यामुळेच कमी झाली असा दावा सरकारने करू नये किंवा वाढली तर विरोधकांनी सरकारविरूद्ध बोंब मारू नये असं मला वाटतं. महागाई ही एक फारच विचित्र संकल्पना आहे. १०० वर्षांआधीही महागाई होती आणि ती कायम राहणार आहे. त्याला हजारो अर्थशास्त्रीय कारणं आहेत. पण महागाई म्हणजे धनाढ्यांचा गरिबांविरुद्धचा कट असा काही समज जनमानसांत पसरून आहे. गरिबांच्या, सामान्य लोकांच्या अर्थविषयक अज्ञानाचा राजकिय फायदा उकळण्यासाठी राजकिय पक्ष याचे भांडवल करत असतात. वाढणारी भरमसाठ लोकसंख्या हे एक फार महत्त्वाचे कारण राजकिय पक्ष जनतेस सांगत नाहीत. माझा आक्षेप फक्त साठेबाजांवर, कृत्रिम भाव अचानक वाढवणार्‍यांवर, मधल्या अनावश्यक दलालांवर सरकारतर्फे न होणार्‍या कारवाईवर आहे. तिथे भाजप सरकारच काय कोणतेच सरकार काहीच करू शकत नाही. कारण निवडणुकीला उभे राहण्यास हेच लोक मदत करतात आणि निवडून यायला गरिब लोक. तेव्हा दोघांचीही तोंडदेखली मर्जी राखणे एवढेच सरकारचे काम उरते. ठराविक कालाने एक एक कमोडीटीची किंमत योजनाबद्ध पद्धतीने वाढत असते. आज काय तर दाळ, त्याच्याविरूद्धची बोंबाबोंब शांत झाली की साखर, मग तेल, मग धान्य. बोंबाबोंब होत राहते, भाव वाढत राहतात. लोक सहन करत राहतात. हे अर्थशास्त्राबाहेरचे चक्र आहे. त्यावर सरकारी अंकुश अपेक्षीत आहे. दुधाची किंमत वाढवू नये म्हणून दुधविक्रेत्यांवर, उत्पादकांवर दबाव आणला. पण इतर महागाई वाढत असतांना त्यांना त्यांचे दर वाढवणे अपरिहार्य होते. त्यांनी संगनमताने दुधाचा दर्जा कमी केला आहे. नाशिकमधल्या मी मी म्हणणार्‍या सगळ्या दुधउत्पादकांचे दुध आणून बघितले. आधी जेवढी साय निघायची ती ३०% नी कमी झाली आहे. सामान्य नागरिकांस हा फरक लक्षात येत नाही. पण मोठ्या प्रमाणावर हा एक घोटाळा आहेच. अन्न आणि औषध प्रशासन, दुध महामंडळ यात कायदेशीररित्या काहीच करू शकत नाही.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
न
नांदेडीअन Tue, 05/26/2015 - 08:55 नवीन
मिडियाने काल मोदींचे भाषण अगदी नॉनस्टॉप दाखवले. पण त्याच सभेतली ही दृष्यं नाही दाखवली. http://www.amarujala.com/photo-gallery/samachar/national/disturbance-in-modi-mathura-rally/
क
कहर Tue, 05/26/2015 - 12:37 नवीन
मानले राव तुम्हाला … तुमच्या लिंक मध्ये मुख्य बातमीच्या आजूबाजूस असलेल्या बातम्यांवरून त्या झालेल्या प्रकाराची आणि चित्रांची बातमी कशी तयार केली गेली असेल याचा अंदाज आला… रच्याकाने सुर्या वहिनींची बातमी खाशी आहे … शौकीनांनी नक्की वाचा
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Tue, 05/26/2015 - 08:56 नवीन
खाद्य मंत्रालय की प्राइस मॉनिटरिंग सेल के पास मौजूद आंकड़ों के मुताबिक, 26 मई 2014 से 22 मई 2015 के बीच दिल्ली में उड़द दाल 71 रुपये प्रति किलो से बढ़ कर 109 प्रति किलो यानी 54% महंगी हो गई । यही ट्रैंड अरहर की कीमतों में भी दिखा । अरहर दाल पिछले साल 26 मई 2014 को 75 प्रति किलो थी, जो 22 मई 2015 को बढ़ कर 108 रूपये प्रति किलो हो गई, यानी 44% की बढ़ोत्तरी । चना दाल पिछले एक साल में 50 रुपये प्रति किलो से बढ़कर 68 प्रति किलो यानी 36% महंगी हुई । मसूर दाल इस दौरान 70 प्रति किलो से 94 प्रति किलो यानी 35% महंगी हुई । - NDTV
स
संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 09:18 नवीन
आणि हे भाव एका दिवसात वाढले आहेत. तुरदाळ एका दिवसात ८० रुपयांवरून १२० रुपये किलो झाली. तीन दिवसांनी वर्तमानपत्रात भाव १०० रुपयांपर्यंत उतरल्याची 'बातमी' होती पण खर्‍या बाजारात (मॉल आणि किरकोळ) उतरले नव्हते. मी वर म्हटल्याप्रमाणे चोराची ष्टाईल बदलली म्हणून चोरीच झाली नाही असे म्हणणे आंधळी भक्ती आहे. एलबीटी व टोलविरुद्ध गगनभेदी गर्जना करणारे भाजप नेते पावसात भिजलेल्या मांजरासारखे घाबरून बसले आहेत. हा सरळ जनतेचा विश्वासघात आहे.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 05/26/2015 - 11:19 नवीन
जीएसटी आल्यानंतर एलबीटी जाईल असे देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात ऐकले होते. जीएसटी विधेयक सध्या संसदेत अडकले आहे काँग्रेसमुळे. ते तेथून निघाले की काय होते ते पाहता येईल.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नाव आडनाव Wed, 05/27/2015 - 08:03 नवीन
"सत्तेत आल्यानंतर टोल बंद करू" म्हणणारे वाक्य फिरवून "अन्यायकारक टोल बंद करू" (चंद्रकांत पाटील - सहकारमंत्री) म्हणू लागले. त्यानंतरच्या कोणत्याच चर्चेत (टीवी / पेपरातल्या) मुंबई-पुणे टोल - जिथे मला वाटतं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त टोल कलेक्शन असेल - बद्दल चर्चा / बातमी मी तरी ऐकली नाही. रोज या रास्तावरून काही शेकडो / हजारो वाहनं जातात. एमएसआरडीसी ला हा ९४.५ कि.मी. चा रस्ता बांधायचा खर्च कधीच वसूल झाला असेल कारण रोज काही लाख रुपये तर नकीच जमा होत असणार. जर फक्त डागडुजीचा खर्च ते घेत असतील तर तो आता असलेल्या रेट इतका असावा का? कांग्रेस - राष्ट्रवादी असताना त्यांनी काही केलं नाही, टोलविरोधकह्रदयसम्राट काही बोलत नाहीत आणि सरकारला हा टोल अन्यायकारक वाटत नाही. असं का असेल बरं? बिनडोक - नाव आडनाव. (राजकारणातल्या चर्चेसाठी माझी सही. नंतर सुद्धा तितकीच ऍप्प्लिकेबल :) )
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कहर Tue, 05/26/2015 - 12:50 नवीन
पेट्रोल चे भाव कमी झाले कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर घटले… सरकारने काय केले ? दुष्काळ आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले … म्हणल्याप्रमाणे महागाई कमी होऊ शकली नाही … सरकार काय करतंय … एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काही करत नाही म्हणायचे … दुसरीकडे शेतकी मालाचे भाव कमी करा म्हणून दंगा करायचा … आणि सगळे एका वर्षात झाले पाहिजे अशी डेडलाइन पण लावायची… चांगली नीती आहे राव … म्हणजे काटा पडला तर मी जिंकलो नि छापा पडला तर तू हारला असेच ना … यालाच विरोधासाठी विरोध करायचा असे म्हणतात
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
म
मदनबाण Tue, 05/26/2015 - 12:55 नवीन
पेट्रोल चे भाव कमी झाले कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर घटले मागच्याच आठवड्यात भरले ! ७५ रु / प्रति लिटर.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding
↩ प्रतिसाद: कहर
ग
ग्रेटथिंकर Tue, 05/26/2015 - 08:57 नवीन
श्रीगुरुजी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत.ते प्रचारकी थाटाचे लेखच टाकणार.कागदावर जरी आकडेवारी योग्य वाटत असली तरी ती दिशाभूल करणारी आहे,ग्राउंड रीएलीटी मदनबाण यांनी मांडली आहे.टोलमुक्ती,महागाई,शेतकरी आत्महत्या या सर्व आघाड्यांवर मोदी सरकारला भक्तच शुन्य मार्क देत आहेत.
H
hitesh Tue, 05/26/2015 - 09:16 नवीन
http://m.ndtv.com/india-news/separate-water-source-for-dalits-in-madhya-pradesh-village-its-the-governments-solution-765783 निषेध
स
संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 09:21 नवीन
जे काका पवारांनी साखरेसोबत केले ते आताचे सरकार दाळींसोबत करत आहे. 'एकही मोठा घोटाळा नाही' याचा अर्थ असंख्य छोटे घोटाळे आहेत असा घ्यायचा का?
द
दा विन्ची Tue, 05/26/2015 - 09:26 नवीन
मला तर अशी शंका आहे कि श्रीगुरुजी हा नरेंद्र मोदींचा मिपा वरचा आय डी आहे . आणि समग्र मिपाकरांशी हा लेख म्हणजे मन कि बात आहे.
प
पिलीयन रायडर Tue, 05/26/2015 - 10:54 नवीन
मला एक गोष्ट कळत नाही की आता मिळालं ना सरकार? दिलं ना बहुमत? मग काय करायचं ते करुन दाखवा की.. एक वर्ष झालं अजुनही प्रचारकी लेख का लिहत आहेत? फेसबुक, वॉट्सअ‍ॅप सगळी कडे काही ना काही फिरत असतंच की मोदी किती महान. अनेकदा ठोकुनही दिलेलं असतं. अशाने आता खर्‍या गोष्टींवरचाही विश्वास उठत चाललाय माझा तर. आता हा लेखही काही दिवसांनी वॉट्सअ‍ॅपवर फिरेल.
ख
खंडेराव Tue, 05/26/2015 - 11:04 नवीन
जशी मागची निवडणुक जिंकली तगड्या प्रचाराने आणि कॉंग्रेसच्या एकुणच गलथानपणामुळे, तशी पुढचीही जि़ंकायची आजपासुनच सोय आहे ही. दिल्ली निवडणुकीत तोंडावर पडले इतका प्रचार करुन तरी लक्षात येत नाहीये भाजपाच्या. हो, आणि हे कंटेट आता कुठे कुठे वापरतील, याचा हिशेब नाही. अवांतर - मतदानाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत सगळ्या मोठ्या पेपरांचे पहिले पान विकत घेतले होते भाजपने. इंडिया शायनिग ची गत होइल अशाने.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 11:43 नवीन
>>> दिल्ली निवडणुकीत तोंडावर पडले इतका प्रचार करुन तरी लक्षात येत नाहीये भाजपाच्या. ते भाजप बघून घेईल हो. तोंडावर पडायचं का दुसर्‍याला पाडायचं ते भाजपलाच ठरवू देत. >>> हो, आणि हे कंटेट आता कुठे कुठे वापरतील, याचा हिशेब नाही. समजा वापरले तर तो काय गुन्हा आहे का? >>> अवांतर - मतदानाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत सगळ्या मोठ्या पेपरांचे पहिले पान विकत घेतले होते भाजपने. इंडिया शायनिग ची गत होइल अशाने. भाजप बघून घेईल हो ते. आपण कशाला काळजी करायची? एकंदरीत भाजप विरोधकांनाच भाजपची जास्त काळजी दिसतेय.
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Tue, 05/26/2015 - 11:57 नवीन
>>> दिल्ली निवडणुकीत तोंडावर पडले इतका प्रचार करुन तरी लक्षात येत नाहीये भाजपाच्या. ते भाजप बघून घेईल हो. तोंडावर पडायचं का दुसर्‍याला पाडायचं ते भाजपलाच ठरवू देत.
तुम्ही कशाला उत्तर देताय मग? तुम्ही भाजपा आहात का?
>>> अवांतर - मतदानाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत सगळ्या मोठ्या पेपरांचे पहिले पान विकत घेतले होते भाजपने. इंडिया शायनिग ची गत होइल अशाने. भाजप बघून घेईल हो ते. आपण कशाला काळजी करायची? एकंदरीत भाजप विरोधकांनाच भाजपची जास्त काळजी दिसतेय.
माझा वरचा प्रतिसाद परत लागु इथे!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 12:06 नवीन
नाही हो, रागावतोय कशाला? तुम्ही मी लिहिलेल्या लेखात प्रतिसाद दिलात म्हणून उत्तर दिलं. नसेल आवडलं तर राहिलं.
↩ प्रतिसाद: खंडेराव
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 11:40 नवीन
तुम्हाला असे लेख वाचून काय खटकतंय ते समजलं नाही. आजच्या गतिमान युगात प्रत्येक गोष्ट ही लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचविली जाणारच आणि प्रत्येक गोष्टींवर चर्चा होणारच. हे फक्त मी एकट्याने लिहिलेले नाही. जवळपास सर्व वृत्तपत्रांतून या विषयावर लेख येत आहेत व उलटसुलट मते व्यक्त होत आहेत. द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, इंडिया टुडे इ. दैनिकातून्/साप्ताहिकातून याच विषयावर अनेक तज्ज्ञांच्या लेखमालिका येत आहेत. आजच दैनिक सकाळ ने याच विषयावर पानेच्या पाने भरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्व हिंदी/इंग्लिश/मराठी वृत्तवाहिन्यांवर "मोदी सरकारची १ वर्षातील कामगिरी" या एकमेव विषयावर जोरदार चर्चासत्रे होत आहेत.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 05/26/2015 - 11:46 नवीन
होत आहेत आणि व्हावीत. पण सामान्य माणुस म्हणुन सांगते की मी सुद्धा भा.ज.प समर्थक आहे, मोदींवर माझाही विश्वास आहे. पण त्यांचा इतका उदो उदो कशाला हे कळत नाही. गरज नसताना मार्केटींग होतेय. तुमचाही लेख मला तरी बायस्ड वाटला (आहेच तो). थोडक्यात प्रचारकीच वाटला. पण दुर्दैवानी समतोल कुणी लिहीतच नाहीये. सगळ्यांनी काही ना काही बाजु पकडली आहेच.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 11:56 नवीन
अभिप्रायाबद्दल आभार!
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 12:03 नवीन
माझं सोडा हो. खालील लेख वाचा आणि मोदींविषयी मत ठरवा. हा लेख लिहिणारी व्यक्ती ही अत्यंत समतोल, निष्पक्षपाती व सभ्य विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मराठी वाहिन्यांवरील चर्चेत अ‍ॅंकरसकट इतर सर्वजण एकमेकांना बोलून न देता स्वतः बोलत राहून गोंधळ माजवून देतात. परंतु ही व्यक्ती काटेकोरपणे थोडक्यात आपले मुद्दे मांडून इतर बोलत असताना अडथळे न आणता शांतपणे ऐकत असते. हा लेख प्रचारकी आहे का अभ्यासू हेही ठरवा. http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=545620&boxid=12411328&pgno=4&u_name=0 याच लेखात १५ लाख रूपयांबद्दल स्पष्टीकरण आले आहे (लेखात चुकुन १५ हजार रूपये असे छापले गेले आहे) तेही वाचा.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मदनबाण Tue, 05/26/2015 - 12:27 नवीन
श्री. अविनाश धर्माधिकारी सरां बद्धल मला प्रचंड आदर आहे ! If you promised Rs 15 lakh each to Indians, fulfil it: Anna to Modi टिप :- मोदींनी कुठलेही "आश्वासन" दिले नाही,परंतु सामन्य व्यक्तीस किंवा ज्यांनी हे भाषण ऐकले नसेल त्यांचा तसा "समज" होण्याची मात्र दाट शक्यता निर्माण होते. असो... गरिबांची चिंता दर्शवणारे पंतप्रधान जेव्हा १० लाखाचा सुट घालतात तेव्हा मात्र नक्की "जुमला" कुठला समजावा हे मात्र कळत नाही ! १ वर्ष गेले, आता पुढील ४ वर्षात काय काय होते ते पाहण्यास उत्सुक असलेला तुमच्या सारखाच एक अतिसामान्य हिंदूस्थानी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 12:33 नवीन
>>> मोदींनी कुठलेही "आश्वासन" दिले नाही,परंतु सामन्य व्यक्तीस किंवा ज्यांनी हे भाषण ऐकले नसेल त्यांचा तसा "समज" होण्याची मात्र दाट शक्यता निर्माण होते. नक्कीच. आणि लोकांचा तसा गैरसमज व्हावा यासाठी विरोधी पक्षांकडून देखील जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मिपावरील काही आयडी देखील स्वतः ते भाषण न ऐकता मोदींनी प्रत्येकी १५ लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले होते ही बाजारगप्प खरी मानून प्रतिसाद देत आहेत. >>> असो... गरिबांची चिंता दर्शवणारे पंतप्रधान जेव्हा १० लाखाचा सुट घालतात तेव्हा मात्र नक्की "जुमला" कुठला समजावा हे मात्र कळत नाही ! तो सूट १५ लाखांचा नव्हता. मोदींना भेट मिळालेल्या कापडाचा सूट त्यांनी शिवला. त्याच्या किंमतीचा पावती देखील वाहिन्यांवरून नंतर दाखविली गेली. या सूट प्रकरणावर दिल्ली निवडणुकीच्या धाग्यावर लिहिलेले आहे. ते परत टंकायची इच्छा नाही. >>> १ वर्ष गेले, आता पुढील ४ वर्षात काय काय होते ते पाहण्यास उत्सुक असलेला तुमच्या सारखाच एक अतिसामान्य हिंदूस्थानी. सेम हिअर
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बाळ सप्रे Wed, 06/03/2015 - 11:09 नवीन
मला एक गोष्ट कळत नाही की आता मिळालं ना सरकार? दिलं ना बहुमत? मग काय करायचं ते करुन दाखवा की
एक्झॅक्टली.. प्रचाराच्या हँगओव्हरमधून बाहेर आले तर काम करायला जरा सवड मिळेल.. काँग्रेसला त्यांची जागा दाखवलीये निवडणूकित.. मग अजूनही "MNREGA will continue, it is living example of Congress's failure" हा अ‍ॅटीट्युड का??
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पाटील हो Tue, 05/26/2015 - 11:14 नवीन
+१००
ब
बबन ताम्बे Tue, 05/26/2015 - 14:10 नवीन
मागच्याच आठवड्यात दिल्लीचा पाहुणा येऊन गेला. संभाषणाची गाडी शेवटी केजरीवाल सरकारकडे गेली. मी विचारले "केजरीवाल सरकार कैसे चल रही है. मेडिया मे अरविंद केजरीवाल के बारे मे बहुत हंगामा चल रहा है ". ते ग्रुहस्थ उत्तरले " बहोत अच्छी चल रही है. बिजली का बिल बहुत कम आता है. और भी काम चल रहे है. प्रॉब्लेम ऐसा है की बाकी लोग टांग डाल रहे है. उनको काम करने नही देते है. दिल्ली की जनता तो केजरीवाल सरकार से संतुष्ट है " खरे खोटे दिल्लीवालेच जाणे .
त
तुषार काळभोर Wed, 05/27/2015 - 09:10 नवीन
कॉलिंग पटाईत साहेब .. तुमची प्रतिक्रिया मोलाची आहे.
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ग
ग्रेटथिंकर Tue, 05/26/2015 - 14:56 नवीन
केजरीवालांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरु आहेत, चांगले काम करणार्यालाही मोदी जर असे खिंडीत पकडणार असतील तर कसे येतील अच्छे दिन.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा